गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

शक्ती देवता : भाग ६


आज ही जगात ' जीवो जीवस्य जीवनम् ' हाच न्याय दिसतो. म्हणून शक्तीची उपासना करायला हवी. 'बळी तो कान पिळी ' हाच जागतिक राजकारणाचा नियम आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी तयार केलेल्या परराष्ट्रनीतीने आपल्या देशावर वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत बड्या राष्ट्रानांही होत नाही.

शस्त्रात्रे अद्ययावत बनत आहेत. विद्यमान केंद्र सरकार संरक्षण खात्यासाठी बजेट मधील तरतुद दर वर्षी वाढवित आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्रता ही साक्षात देवी भगवती चे रूप आहे हे आपल्या धगधगत्या जीवनयात्रेतून आणि तळपत्या लेखणीतून शब्दात साकारले आहे. शक्ती गमावून बसणे म्हणजेच स्वातंत्र्य गमाविणे. पाठोपाठ लक्ष्मी निघून जाते. हा अनुभव आपण एक हजार वर्षाहून अधिक काळ असलेल्या गुलामीत घेतला आहे. त्या कटु आठवणीतून धडा घेत मोदी सरकारने अग्नीपथ कल्पना कृतीत आणली असावी असं मला वाटतं.  पोस्ट कोरोना जगात आर्थिक मंदीची शक्यता मोदी सरकारने वेळीच हेरली आणि देशात आत्मनिर्भरतेचा नारा आणला आहे. अत्याधुनिक शस्त्रात्रे असलेल्या काही देशांना युद्धाची खुमखुमी वाढलेली दिसते. पण  तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता नाही. फार तर जग पुन्हा शीतयुध्दाच्या स्थितीत आणण्याचे प्रयत्न ते देश  करतील. हे शीत युद्धाचे स्वरूप अमेरिका विरूद्ध चीन असे असेल असा अंदाज वर्तविलेला असला तरी तो खोडून काढण्याची तयारी रशिया करीत आहे असे दिसते. या संबंधीचे दोन दाखले स्पष्ट दिसत आहेत. त्यातील पहिला दाखला म्हणजे युक्रेन शी सुरू केलेले युद्ध आणि शस्त्रात्रांच्या बाबतीत  रशिया दाखवित असलेला आक्रमकता. दुसरा दाखला म्हणजे  भारताच्या कुटनीतीची रशिया कडून  सतत होत असलेली प्रशंसा हा आहे.  चीनला कुठल्याही परिस्थीतीत नंबर दोन क्रमाकांची महासत्ता होऊ न देण्याचा प्रयत्न रशिया अप्रत्यक्षपणे करीत राहणार असे वाटते. एकंदरीत शस्त्रात्राचा व्यापार वाढावा आणि त्यातून कोरोना काळात ढिली झालेली आपआपली आर्थिक स्थिती सुधारावी हे एकमेव ध्येय अमेरिका आणि रशियाचे आहे.  अशा स्थितीत विद्यमान केंद्र सरकारने देशाच्या परराष्ट्र धोरणात कणखरपणा आणून भारत आपल्या हिताला तिलांजली देणार नाही तसेच भारताचे परराष्ट्र धोरण कुणाच्या ही दबावाला  बळी पडणार नाही, असे स्पष्टपणे मांडले. सोबत जगाला विकास हवा असेल, तर भारताचा अनादी काळापासून चालत आलेल्या  विश्वास, सहकार, आणि शांती या त्रयीसुत्रीचा मार्ग जगाने स्विकारावा हा संदेश ही दिला आहे. अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना  'युद्ध हा विनाशाचा मार्ग आहे.' असे सांगत शीतयुद्धाची स्थिती सुद्धा पोस्ट कोरोना जगताला परवडणारी नाही असे अमेरिका आणि रशियाला जाणीव करून दिली आहे. एका परीने अनेक शतके खंडीत झालेली शक्तीची उपासना मोदी सरकारने पुन्हा सुरू केली आहे असे मला दिसते. शेवटी शक्ती देवताचं स्वरूप जसे शस्त्रात्रांत  असते तसे ते जागतिक स्तरावरील परराष्ट्र धोरणाच्या युक्तीवादात ही असते. शक्तीचे आणखीन रूप म्हणजे युक्ती. 

लक्ष्मीदेवी म्हणजे दुर्गा मातेचा अंशच होय. कोल्हापूरची महालक्ष्मी देवी अंबामाता या नावाने ही ओळखली जाते. इंद्रदेव रचित स्तोत्रात महालक्ष्मीचे वर्णन पाहा --
आदि-अंत रहिते देवी
आदि शक्ती महेश्वरी ; |
योगजे योगसंभूते
महालक्ष्मी नमोस्तुते ||
महालक्ष्मी ला ही आदि शक्तीच मानले आहे. मग ती आपल्यापाशी नाही म्हणून दुसर्यांच्या नावाने बोटे मोडण्यात काय हशील ?

महालक्ष्मी नावाच्या शक्तीरूपी देवतेची हेटाळणी हा अपराध आहे. नोकरी नाही म्हणून हताश होऊन कसे चालेल? पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर बना अशी फक्त घोषणा केली नाही. कोरोनोच्या काळातच बेरोजगार युवक, युवती, महिला इत्यादींना आत्मनिर्भर बनविण्याच्या योजनांची आखणी झाली होती. जे बेरोजगार लघुउद्योग सुरू करण्यासाठी पुढे येतील तर त्यांना कर्ज विना तारण आणि विना जामीन मिळावे अशा सुचना बँकांना दिल्या आहेत. लघुउद्योगावर माहीती तसेच प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. दिनांक १२ जानेवारी २०२२ ला स्वावलंबी भारत या संस्थेची स्थापना झाली आहे.

छोटे आणि मध्यम उद्योग उभारण्यासाठी युवक वर्गाने पुढे यावे म्हणून मध्यवर्ती ठिकाणी स्वावलंबी भारत योजनेचे केंद्र उभारले जात आहेत. स्वावलंबी भारत योजना गोरेगाव केंद्रातर्फ २ आक्टो गांधी जयंती दिनी दहिसर (प) नवागाव, समाज कल्याण केंद्रात ' स्वरोजगार और रोजगार मेला ' आयोजित केली होता. मी त्या कार्यशाळेत उपस्थित होतो. केंद्र सरकारच्या अनेक योजनांची माहिती मिळाली. जवळपास ५०० घरोपयोगी वस्तुंची मोठं भांडवल न लावता निर्मिती आपल्या घरी करू शकता. १५ वस्तूंच्या निर्मितीची प्रात्यक्षिके मी पाहिली. स्वावलंबी भारत योजना म्हणजे SBY च्या पोर्टल वा साईट वर अधिक माहिती मिळू शकते.
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...