गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

शक्ती देवता : भाग ८


शक्ती देवता या विषयावर सुरू झालेली आपली चर्चा थेट विश्वाच्या उत्पत्ती पर्यंत मागे जाते, तेव्हा आपल्याला समजू लागते की जसे एखाद्या वस्तु निर्मितीत कच्चा माल, उर्जा लागते, तद्वत विश्वाच्या उत्पत्तीत ही कुठली तरी शक्तीची गरज लागली असणारच. ती शक्ती दिसत नाही पण जाणवली तर जातेच ना ! त्या शक्ती देवीचे व्यापक रूप कसे आहे ते या भागात पाहू या.


विश्वाची उत्पत्ती संबधी जे अर्धनारीनटेश्वर रुप वर्णिले जाते, ते पुर्णपणे विज्ञानाच्या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. एक पेशीय तून द्विपेशीय, द्विपेशीय तून त्रिपेशीय असे होत प्राणीमात्र जन्मत गेले असे विज्ञान म्हणते. तर आपले धर्मशास्त्र सांगते, तो स्वेच्छामय परमेश्वर सृष्टीच्या प्रारंभी स्वतः दोन रुपांनी प्रगट झाला. त्यांची नावे आहेत एक शिव म्हणजे पुरूष तर दुसरी शक्ती म्हणजे प्रकृती म्हणजे उमा होय.

" स्वेच्छामयः स्वेच्छाया च द्विधारूपी बभूव | स्त्रीरूपो वामभागांशी दक्षिणांशः पुमान् स्मुतः || " याचा अर्थ परमेश्वराच्या डावीकडील अंशाला स्त्री म्हणतात आणि उजवीकडील अंशाला पुरूष मानतात. म्हणून तर अनेक स्त्रीयांनी सुद्धा रणांगणावर पराक्रम केल्याचा इतिहासात दाखले सापडतात. आपल्या अमृतानुभव या ग्रंथाच्या प्रारंभी श्री ज्ञानेश्वर महाराज याच स्वरूपात ईश्वराला वंदन करतात.
 ' ऐसी ही निरूपाधिके
जगाची जिथे जनके
तिथे वंदिली मिया मूळिके
देवोदेवो ||
जया एकसत्तेचे बैसणे
दोघां एका प्रकाशनाचे लेणे
जे अनादी एकपणे
नांदती दोघे || '
सृष्टीच्या उत्पत्ती बाबत अंबा मातेच्या स्त्रोतात ही म्हटले आहे,
" मिळवूनी पंचमहाभूतांचा मेळ |
अंबे त्वां रचिला ब्रह्मांड गोळ || "

परमेश्वर एक आहे असे भारतवर्षात अनादी काळापासून मानले जात आहे. अर्धनारीनटेश्वर प्रतिक कसले आहे ? तो एक वैज्ञानिक दाखला आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत विचारसरणीचे होते पण तसेच ते द्रष्टा होते. हिंदु समाज अभंग राहावा म्हणून पंचायतन पुजा पद्धत सुरू केली. त्यात देवीला स्थान आहेच.

पुरूष स्त्री शिवाय राहू शकत नाही तसेच स्त्री पुरूष शिवाय राहू शकत नाही. समाज जीवनाचा हा मूलाधार आणि विवेक सांभाळला नाही तर व्यक्तीगत जीवन खुंटते आणि सामाजिक जीवन विस्कळीत होते. घराला घरपण उरले नाही तर धर्माची घडी विस्कळते. अर्थ आणि काम साधले जात नाही मग मोक्ष तरी कसा मिळणार ?

लक्ष्मी ही सुद्धा शक्तीचे रूप च होय. अगस्ती ऋषी रचित महालक्ष्मीच्या स्तोत्रात स्पष्टपणे म्हटले आहे,
' पान्डीत्यं शोभते नैव न शोभन्ते गुणा नरः | शीलंत्व नैव शोभते महालक्ष्मी त्वया विना | ' 
( आपल्याकडे फक्त पांडीत्य असेल पण कुटुंबाचा निर्वाह करता येत नसेल तर व्यवहारी जगात आपला टिकाव लागणार नाही. तसेच आपण केवळ वाड-वडीलांकडून मिळालेली संपत्तीत वाढ करू शकत नसाल तर तेव्हा ही तुमची टर उडवली जाईल. पैसा असुन तुमच्या कडे पांडित्य असेल तर लोक तुमच्याकडे गौरवाने पाहतील. तुमचे शील, आणि  गुण ही पैशाने शोभून दिसतात.)

पैशाचा जसा प्रभाव नसावा असे आपल्याला वाटते तसे अभाव ही नसावा. पुष्कळदा पैशाचा अभावाच्या पाठीमागील सत्य हे आहे की आपण उद्यमशिलता वाढवत नाहीत. दुसरे असे की पैशाबद्दल कमालीची अनास्था. बेकारी ही समस्या फक्त आपल्या देशातच आहे असे नाही. कोरोना संकटामूळे बहुतांशी देशात आर्थिक मंदी आली आहे.  कोरोना काळात नोकर्या गमावून बसलेल्या बांधव आणि भगिनींनी घरपोच जेवण फराळ, भाजीपाला हा व्यवसाय सुरू केलेला आपण अनुभवलं आहे. व्यवसायाच्या संधी जो शोधतो तो लौकर आत्मनिर्भर बनतो. इंग्रजीत म्हटले जाते Opportunity is a course of action which is immediately possible. दुसरं असे की Growth is the evidence of life. वाढदिवस साजरा करण्याचा सोहळा म्हणजे  आपली आर्थिक, बौद्धिक, आणि  शारिरीक आणि मानसिक उन्नतीचा दाखला ठरावा. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, चैतन्य म्हणजे जीवन आणि नैराश्य म्हणजे मृत्यु होय.
 
संसार रथाला दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके सबल आणि प्रगतीशील असली पाहिजेत. घरात आणि बाहेर, पारिवारीक जीवनात आणि सामाजिक जीवनात समतोल साधला जावा हीच उद्दिष्टे आपल्या पुर्वाश्रमीनी डोळ्यासमोर ठेवून अनेक उत्सवाची योजना आखली आहे. त्या योजनेचं वैशिष्टं म्हणजे सारे उत्सव ऋतुमानानुसार आहेत. त्या उत्सवांमार्फत एक प्रकारे पर्यावरणाचं संतुलन बिघडू द्यावयाचे नाही, हा हेतू स्पष्ट दिसतो.

ऋतुमनानाुसार आपण आहार घ्यावा. असा जो आग्रह धरला जातो, त्यासंबंधी आधुनिक शरीर विज्ञान आणि औषध शास्त्राने सहमती दर्शवली आहे. ऋतुनुसार आहार घेतल्याने आपल्या शरीरातील कफ, वात, पित्त याचं संतुलन होते. त्यातून आपली शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक शक्तीचे  संवर्धन होते. सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोना काळापासून अधिक चर्चा होत आहे ती म्हणजे रोग प्रतिकार शक्ती ! तिचे संवर्धन होते. तीच ती शक्तीदेवी !

या शक्तीदेवीचे अनेक अवतार आहेत. म्हणजेच ही शक्ती ब्रह्मांडात खचाखच भरलेली आहे. जर पार्वती, लक्ष्मी आणि शारदा इत्यादी एकाच शक्ती देवतेची रूपें आहेत तसेच ब्रह्मः विष्णु आणि महेश हे त्रिदेव सुद्धा एकाच ईश्वराची तीन रूपे आहेत. या सत्याची पुष्टी मिळू शकते, असे दोन दाखले आपल्या समोर मांडतो आणि  या लेखाची समाप्ती करतो.

श्री दत्तगुरूचा अवतार म्हणजे त्रिदेवांचं रूप. हे दत्तात्रेय स्वामी अत्री-अनुसूयाचे पुत्र आहेत. त्यासंबंधीची कथा सर्वांना ज्ञात आहे. या कथेतला बोध काय आहे ते पाहु या.
अत्री म्हणजे जे तीन नव्हेत ते ! आणि अनुसूया म्हणजे समाजात  विष्णु श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ या संबंधीची भक्त गणात सुरू झालेला संघर्ष म्हणजेच असूया, ती नष्ट व्हावी, समाजात अनुसूयाचे राज्य यावे यासाठी त्या विश्वातील तीन मुख्य शक्तींचा जन्म म्हणजे दत्तदेव.  अनुसयाचे पतिव्रत इतकं तेजस्वी होतं की त्रिदेवांना अनुसयाची मागणी पुरी करावी लागली आणि तीन बालकं रूपात जन्म घ्यावा लागला. ज्यांची नावे ब्रह्म (सोम म्हणजेच चंद्र), दुर्वास (शिव) आणि शेवटी विष्णुरूपी देवाचा जन्म होण्यास थोडा वेळ लागला, तेव्हा ब्रह्म आणि शिवाचा ही अंश अनुसूयाच्या  गर्भात आला आणि दत्तात्रेय रूपी  विष्णु जो जगाचा उद्धार आणि कल्याणासाठी म्हणजे तात्काळ संकट निवारण करण्यासाठी समोर दर्शन देतो तो दत्त आणि अत्रींचा पुत्र असा हा दत्तात्रेय ! (अत्रेः आपत्यं पत्रान् आत्रेयः) भगवान विष्णु सारखा शंख आणि चक्र हाती, आणि शीवा सारखं अंगाला भस्म लावलेला व हातात कमंडलु आणि त्रिशूळ असा तो जगद्गुरु दत्तात्रेयस्वामी, ज्याचा जन्म अनुसूयाच्या तपशक्तीतूनच झाला. इथे ही शक्तीदेवतेचं दर्शन होते.

आता आद्य शंकराचार्यांनी मांडलेला एक दृष्टांत आपल्या समोर ठेवतो. ' एक शिष्य भगवान विष्णुकडे जातो आणि प्रश्न विचारतो, ' देवा रामेश्वर हे लिंग आहे. मग ते रामेश्वर कसे? भगवान विष्णु उत्तर देतात,
' रामस्य ईश्वर सः रामेश्वर ' (षष्ठी तत्पुरुष समास )म्हणजे रामाचा
(माझा) ईश्वर शंकर आहे. मी त्याचा सेवक आहे. 

त्या शिष्याला वाटले विनयामुळे  भगवान विष्णू असे म्हणतात. म्हणून तो  शंकराकडे  जातो. त्याने शंकराला विचारले, तुम्ही भगवान विष्णुचे ईश्वर आहात का? त्यावर शंकर देव म्हणाले, ' भगवान विष्णूने चातुर्याने मला त्याचा ईश्वर घोषित केलं. रामेश्वर हे लिंग आहे हे सत्य आहे. परंतु  रामेश्वराचा अर्थ असा आहे,  ' रामः ईश्वरः यस्य रामेश्वर '(बहुर्विहि समास ) ज्याचा ईश्वर राम आहे तो मी लिंग रूपात रामेश्वर येथे आहे.

तो शिष्य गोंधळून जातो आणि ब्रह्म देवाकडे जातो आणि म्हणतो, " हा काय गोंधळ आहे, भगवान विष्णु शंकराला स्वतःचा ईश्वर मानतात, आणि शंकर विष्णुला ईश्वर मानतात. खरें उत्तर काय ? " त्या वर ब्रह्मदेव म्हणतात, ' रामः एव ईश्वरः ' (कर्मधारय समास) राम म्हणजेच ईश्वर. अर्थात विष्णू व शंकर यांच्यामध्ये अभेद आहे. दोन्ही एकाच ईश्वराची रूपे आहेत.

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...