नवरात्रोत्सव जवळ आला होता. तेव्हा माझ्या मित्राने नवरात्रोत्सव आणि विजया दशमी या उत्सवाचे महत्व सांगणारे स्वतंत्र लेख लिहावे अशी सुचना केली होती. पण मला सवड काही मिळाली नाही. पण मित्राने दोन्ही लेख लिहीण्यासाठी प्रेरीत केले होते, ही जाणीव मला शांत बसू देईना. विचारचक्र सुरू झाले.' आपण व आपली दैवते ' ही लेखमाला खंडीत झाली होती. ती या निमित्ताने सुरू करीत आहे. या लेख मालिकेतील दैवत अर्थातच ' शक्ती देवता ' होय. ही देवता ब्रह्मांडात खचाखच भरलेली आहे. म्हणून तिच्या महात्म्यावरील चर्चेचा विस्तार नऊ भागा पर्यंत पोहचला आहे. आज भाग १ आणि भाग २ आपल्या समोर मांडतो आहे. आपण या लेखमालिकेला योग्य तो प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो.
नवरात्रोत्सव संपला. विजया दशमी येऊन गेली. दोन्ही उत्सव आपल्या श्रद्धेचे आणि अभिमानाचे ! त्यावरील चर्चा उत्सव दिनीच व्हावी असे काही नाही. उलट उत्सवातील देवतांचे रोज स्मरण करावे किंवा जप व्हावा असे आपल्या संत-महंतानी ही सांगितले आहे. त्याचेच नाव ' नामस्मरण ' आहे. त्यासाठी संयम व चिकाटी आवश्यक असते. ही जोडी म्हणजे शिव- पार्वतीच नव्हे काय ?
विजया दशमी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक ! म्हणजे मंगल कार्य करावयास शुभ तसेच प्रेरणा देणारा दिवस. नवरात्र उत्सव संपला की दुसर्या दिवशी येतो, तो दसरा सण. नवरात्रीच्या उपवासाचे, पराक्रमाचे फलित म्हणजे विजया दशमीच्या उत्सवाची गोडी होय.
नवरात्रोत्सव संबंधी एक पौराणिक कथा आहे. महिषासुर नावाचा एका राक्षसाने शक्ती च्या जोरावर देवांचा व माणसांचा छळ सुरू केला. राक्षसी शक्ती पुढे दैवी सज्जन शक्तींचा टिकाव लागेनासा झाला. गलितगात्र झालेल्या देवांनी उमादेवीची पुजा सुरू केली. त्यातुन अनेक हातात शस्त्रे घेतलेली देवी अवतरली. तिने महिषासुराशी लढाई सुरू केली. घनघोर युद्ध झाले. शेवटी देवीने महिषासुराचा वध केला. म्हणून तिचे नाव महिषासुरमर्दिनी असे झाले. उत्तर महाराष्ट्रात वणी येथे डोंगरावरून ज्या देवीचं मंदिर दिसते आहे तीच महषासुरमर्धीनी असे मानले जाते. उमा देवीचे शक्तीरूपी अवतार अनेक झाले आहेत. म्हणून तिला शक्ती देवता ही म्हटले जाते. नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीदेवतेची उपासना. म्हणजेच शरीर बळकट करणें होय.
आपल्या संस्कृतीत म्हटले आहे की शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् | म्हणजे सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शरीर हे एकमेव साधन आहे. म्हणून शरीर निरोगी ठेवणे आवश्यक असते. म्हणजेच बलोपसना करणे. यात योगासनाचा ही अंतर्भाव आलाच. बलोपसना केली की शरीर निरोगी राहते. शरीर निरोगी असले की बुद्धी निरोगी; बुद्धी निरोगी असली की विचार शुद्ध होतात; विचार शुद्ध असले की आहार - विहार शुद्ध ; त्यातून हृदयात सदभाव पाझरतो. मग आपले आचरण ही शुद्ध होते.
आपल्या इथे आचारः प्रथमो धर्मः असे मानले जाते.आचारः परम धर्म ; आचारः परम तपः | आचारः परम ज्ञानं, आचारः किम् न साध्यते ? असे ही शास्त्रात म्हटले आहे. यावर ब्लाॅग वर एक सविस्तर लेख आहे. सदाचरण हे सर्वात उच्चतम जीवन मूल्य मानले जाते. याचा अर्थ आपले कर्म थोड्याशा प्रमाणात का असेना,
निष्काम कर्माच्या जवळपास जाते, ज्यावर भगवंताने अठरा अध्यायात अर्जुनाला मार्गदर्शन केले. तिचे नाव आहे गीता ! तिला गीताई संबोधले जाते. ती सुद्धा शक्ती देवताचं रूपच
की !
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात "आपला एक भ्रम असतो. असूर म्हणजे मोठ्या दातांचे, मोठ्या नखांचे, लांब केसांचे आक्राळ-विक्राळ दिसणारे कोणी भयंकर राक्षस. पण तसे काही नसते. असूर म्हणजे 'असुषु रमते इती असुरः |' प्राणात आणि भोगात रमणारे ते लोक म्हणजे असुर होय, आणि महिषा म्हणजे रेडा. रेडा हा सर्वात स्वार्थी प्राणी. नवरात्रोत्सव म्हणजे आपल्यातील आसुरी वृत्तीचा त्याग करणे होय. आळस,स्वार्थ, क्रोध, मत्सर, अहंकार इत्यादी अवगुणांवर मात करण्याचा प्रयत्न ते ही सतत नऊ दिवस करीत राहणे होय.
आज ही समाजात अनेक दुर्गुणांने युक्त झालेले राक्षस आहेत. ते आज महिषासुर रूपात नाचत आहेत. संघ शक्ती: कलौ युगे | हा मंत्र ध्यानात घेऊन नवरात्रात समाजातील सज्जन शक्तीने संघटीत होण्याची गरज आहे. एका लयीत सुर व तालाची योग्य ती सांगड घालून एका रिंगणातून जो भव्य- दिव्य सामुहीक नृत्याचा अविष्कार होतो तो गरबा होय. शब्द स्वर- सुर, संगीत, ताल,आणि नृत्य म्हणजे महासरस्वतीची उपस्थिती होय. नवरात्रोत्सव साजरा करावयाचा म्हणजे पैसे हवेत. म्हणजे महालक्ष्मीची उपस्थिती असते. महासरस्वती आणि महालक्ष्मी या दोन्ही शक्तीदेवींचेच रूप ! या संबंधी विस्ताराने चर्चा पुढे होईल. सामुहिक वर्गणीतून जो उत्सव होतो, त्यात आपल्यातला 'मी ' चा प्रवास 'आम्ही' कडे जातो. त्याचे नाव आहे सहकार ! ' सहकाराने आपल्या कष्टाचा भागाकार होतो , शक्तीचा गुणाकार होतो, आणि फलाचा वर्ग होतो.'
दक्षिण मुंबईत डायमंड व्यापाराचे केंद्र मानले जाते अशी एक पंचरत्न नावाची इमारत आहे. तिच्या दर्शनी भागावर एक वाक्य कोरलेलं आहे. ते असे आहे ' Path of cooperation is so narrow that, individual and society can not walk on it unless they become one. '
क्रमशः
म्हात्रेजी,
उत्तर द्याहटवानमस्कार, शक्ती देवता- महिषासुरमर्दिनी विषयी केलेलं अर्थपुर्ण विवेचन वाचनीय!
शेवटच्या पॅरा मधे उल्लेखित आधुनिक महिषासुर ही उपमा समर्पक आहे. धन्यवाद.
प्रणाम.
उत्तर द्याहटवाअर्थपुर्ण विश्लेशण.
धन्यवाद
नमस्कार, समर्पक व अर्थपूर्ण माहिती.सर्व शक्तीदेवताना नमस्कार
उत्तर द्याहटवा