अलिकडे WhatsApp वर एका ग्रुप वरून पोस्ट आली होती; त्यात म्हटले होते कि "जीवनात अर्धे दुःख चुकीच्या माणसावर विश्वास ठेवल्याने येते, तर बाकीचे अर्धे दुःख खर्या लोकांवर संशय घेतल्यामुळे येते". WhatsApp वरील ही पोस्ट चुकीची नाही. कारण व्यवहारी जगात विश्वासघाताचा प्रसंग सामान्यतः प्रत्येक व्यक्तीला अनुभवास आलेला असतो. तसेच सच्च्या माणसांवर संशय घेतल्याने स्वतःचेच नुकसान झाल्याचा अनुभवही प्रत्येक व्यक्तीस आलेला असतो. हे मान्य करीत त्या पोस्ट वर मी माझं मत मांडले ते असे, "आपण चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतो ही आपली चूक आहे तसेच खर्या माणसांवर संशय घेतो तीही आपली चूक असते; After all man is a servant of circumstances ".
मी माझं मत नोंदविल्यानंतर लागलीच, मला माझेच मत अपूर्ण वाटू लागले. मग विचारचक्र सुरू झालं. त्यातूनच हा लेख आकारास आला. म्हणून वरील पोस्ट ज्या व्यक्तीने WhatsApp वर पाठविली त्याने मला उपकृतच केले आहे, असेच मी मानतो. ब्लॉग वर लिहणं हे मी संवाद मानतो. संवादातून लेखनासाठी विषय सुचतात. ख्यातनाम लेखिका आणि मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे 'युगान्त' ह्या पुस्तकातील प्रस्तावनेत सांगतात, "आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटते ते इतरांना सांगावे ही एक दबून न राहणारी प्राथमिक प्रवृत्ती आहे". इरावतीमॅडमचं म्हणणं इतकं खरं आहे कि सामान्यतल्या सामान्य व्यक्तीमध्ये असलेल्या ह्या प्रवृत्तीला संवादातून तसेच लिखाणाद्वारे न्याय मिळतो. "प्रतिपदा संवादाची" ह्या माझ्या पहील्या लेखातच मी ही बाब कबूल केलेली आहे. संवादातून जीवनाला गोडी प्राप्त होत असते. संवादात आपण स्वतः व्यक्त होत असताना,समोरच्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान राखण्यासाठीचा संयम म्हणा वा सकारात्मक प्रतिसाद देण्याची सवय आपसुक आपल्या अंगात भिनते. हे लोकशाहीच्या मूल्याशी सुसंगत आहे. आणि लोकशाही हीच आजच्या सुसंस्कृत मानवाला सर्वात साजेशी अशी राज्यप्रणाली आहे. कारण ''जशी दृष्टी तशी सृष्टी" आणि ''व्यक्ती तितक्या प्रकृती'' इत्यादी नैसर्गिक सिध्दांतांच्या जवळपास जाणारी ती एकमेव अशी राज्यप्रणाली आहे. असो. आता आपण मूळ विषयाकडे येऊ या.
To err is human being. जो चुकतो, तो माणूस. असे जे म्हटले जाते ते चुकीचे नाही. अगदी आपणास वंदनीय असलेल्या थोर पुरूषांच्या हातून चूका झालेल्या आहेत हे ही आपल्या वाचनात आलेले आहे. साधारणतः हातून होणार्या चुकासंबंधी चर्चा करते वेळी कुठल्या परिस्थितीत त्या चुका होतात ह्यावर फारसा विचार करण्याचा प्रघात नसतो. ज्यांच्या हातून किंवा ज्यांच्यामुळे चुका झाल्या त्यांना जबाबदार धरण्याची ही एक सहज मानवी प्रवृत्ती आहे. एखाद्या व्यक्तीने आपला विश्वासघात केल्यामुळे आपलं नुकसान होते किंवा आपल्याला एखाद्या कार्यात अपयश येते. हे अगदी बरोबर आहे. परंतु जेव्हा आपण विश्वासाने काही काम सोपवितो तेव्हा ती व्यक्तीच चुकीची आहे, हे लक्षात आलेलं नसते. त्यामुळे चुक ही अप्रत्यक्षरित्या आपलीच असते, नाही का. म्हणून मी माझ्या पोस्ट मध्ये प्रांजळपणे मांडले कि व्यक्ती निवडण्यात आपली चूक होते. परंतु माझं हे मत ही पूर्णतया बरोबर नाही. कारण एखाद्यावर आपण विश्वास ठेवतो, तेव्हा कुठलीतरी परिस्थिती जिच्यावर आपलं नियंत्रण नसते, ती आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर कब्जा मिळवित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यावर विचार करता करता सविस्तर रित्या माझं मत मांडण्याचा हा खटाटोप करीत आहे.
आता त्या पोस्टच्या उत्तरार्धाकडे वळू या. खर्या माणसांवर संशय घेतल्यामुळे आपल्या पदरी दुःख येते. हे ही खरेच आहे. परंतु ह्या ठिकाणीही आपण संशय का घेतो, किंवा कुठल्या परिस्थितीत संशय घेतो ह्यावर चर्चा केल्याशिवाय ठोस अशा उत्तरापर्यंत आपण पोहचू शकणार नाही. आदीमानव समूहात का राहात होता? असुरक्षिततेची भावना हा दोष वा वैशिष्ट्य माना, परंतु ती जन्मतः माणसांमध्ये विराजमान असते. त्यातूनच संशय नावाचं भूत माणसाच्या मानगुटी वर सतत बसलेले असते. अतीसावधनेतूनही संशयवृत्ती जन्मास येते हे सत्य आपण नाकारू शकतो का? विशेषतः आर्थिक व्यवहारात कोणातरी व्यक्तीवर संशय येणे वा त्या व्यक्तीवर भरवसा न ठेवणे हे ही नैसर्गिक आहे. परंतु अशा व्यक्ती खरोखरीच खर्या आणि प्रामाणिक असतात, असा निष्कर्ष काढणे हे ही धाडसाचे ठरते. परंतु आपण तसे करतो. ह्याचं कारण ज्यांच्यावर आपण संशय घेतला, त्या व्यक्ती वाईट आहेत असं अनुभवयास आलेलं नसल्यामुळे आपल्यामध्ये एक अपराधपणाची भावना बळावत असते. आणि त्यातून त्यांच्या प्रती एक सहानुभूती निर्माण होते. खरं पाहता जेव्हा आपण अशा व्यक्तींशी व्यवहार करू आणि आपला विश्वासघात झाला नाही असा प्रत्यय आपल्याला येईल तेव्हाच त्यांना प्रामाणिकतेचं सर्टिफिकेट देणे योग्य होईल, असे मला वाटते.
सारांश असा की विश्वास आणि संशय ह्या परस्पर विरोधी गोष्टी असल्या तरी आपल्या मनात त्या जन्मतः विराजमान असतात. फक्त विश्वास कोणावर ठेवायचा आणि संशय कोणावर घ्यावयाचा हा प्रश्न सोडवता येणे आवश्यक असते. परंतु त्यात सर्वोच्च श्रेणीतील यश मिळेल ह्याची शाश्वती जवळपास नसतेच. काही दुःखे प्रारब्धानुसार भोगणे, ह्या पलीकडे आपल्या हाती काही नसते. आणि प्रारब्ध म्हणजे तरी काय, आपल्याच कर्माची ती फळं ! अनेक विद्वानांनी श्रीमद्भगवदगीतेतील कर्मयोगावर भाष्य केलं आहे. बहुतांश विचारवंतानी पुर्व जन्मातील कर्मांची चांगली-वाईट फळे आपल्याला वर्तमान जन्मात चाखावी वा भोगावी लागतात, असे म्हणत जन्माचा फेरा आपल्याला चुकवीता येत नाही ह्या मान्यतेला दृढ केले आहे. अलीकडे 'Prominent Scientists Claim That Death Does Not Exist' ह्या मथळ्याखाली
www.dailyamaze.com ह्या साईटवर लेख वाचला. त्यात पदार्थविज्ञानाचे ब्रिटिश शास्त्रज्ञ डाॅ राॅजर पेनरोझ आणि त्यांची टीम तसेच म्यूनीच येथील Institute of Physics मधील शास्त्रज्ञ बराच अभ्यास केल्यानंतर आपल्या धर्मातील आत्म्याचं अमरत्व, मनकोश,पारब्ध इत्यादी संबंंधी पुष्टी देऊ लागलेत असं दिसतंय. आपले समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
मना त्वाचीं रे पूर्वसंचित केले!
तयासारखी भोगणे प्राप्त झालें!!.
पुढे ते म्हणतात,
मनीं मानव व्यर्थ चिंता वहाते !
अकस्मात होणार होऊनि जातें!!
घडे भोगणें सर्वही कर्मयोगें!
मतीमंद ते खेद मानी वियोगें!!
समर्थांच्या शिकवणीची प्रचीती खाली दिलेलं उदाहरण वाचल्यावर आपणांस येऊ शकते.
ग्रहांचे शोध लावणारे महान गणिती भास्कराचार्यांना लीलावती नावाची मुलगी होती. तिच्या जन्मकुंडलीत ती विधवा होणार असे लिहले होते. म्हणून त्यांनी तिचे लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्या शिष्यांना हे काही रुचले नाही. ते भास्कराचार्यानां म्हणाले अमुक एका मुहूर्तावर लग्न झाले तर तिला वैविध्य येणार नाही. त्यावर भास्कराचार्यांनी शंका काढली की तुम्ही सांगता त्या मुहूर्तावर लग्न लागेल का? त्यावर शिष्य म्हणाले, "त्याची आम्ही हमी देतो!". एकाहून एक सरस अशा त्यांच्या विद्वान शिष्यांनी हमी दिल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे लग्न करावयाचे ठरविले. मुलीच्या लग्नाच्या दिवशी भास्कराचार्य आत देवघरापाशी जाऊन बसले. ठरल्याप्रमाणे लग्न विधीला सुरवात झाली. सारे काही व्यवस्थीत सुरू होते. एवढ्यात लिलावतीच्या गळ्यातील मोत्याच्या हारातील एक मोती केव्हा पडला आणि घटीकापात्राच्या छिद्रात कधी जाऊन पडला हे कोणालाच कळले नाही. भास्कराचार्य आतील देवघरापाशी बसले होते तरी, त्यांच लक्ष बाहेर होतं. पोरीचं लग्न अजुनही कसे नाही लागले? झाले तरी काय, हे पहावयास ते बाहेर आले आणि घटीकापात्रात डोकावून त्यांनी पाहिले. तर घटीकापात्राच्या छिद्रात एक मोती पडलेला दिसला. ते म्हणाले "चुकले, मुहूर्ताची वेळ निघून गेली".त्यांनी मग शिष्यांना हाका मारल्या. त्यावर शिष्य म्हणाले "अजूनही घटीका भरली नाही महाराज " ते ऐकून भास्कराचार्य म्हणाले "अरे, भरली नाही काय म्हणता? नीट बघा". तेव्हा शिष्यांनाही घटीकापात्राच्या छिद्रावर पडलेला तो मोती दिसला. मग कसेबसे मुलीचे लग्न लावणे भाग पडले. थोड्याच दिवसात नियतीप्रमाणे लीलावती विधवा झाली. इथे भास्कराचार्यासारख्या विभुतींनी आपल्या शिष्यावर विश्वास कसा काय ठेवला,असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. परंतु उत्तर काय?
सतरा वेळा युध्दात पराभव ज्याचा केला त्या महंमद घोरीला पृथ्वीराज चौहान का क्षमा करतो? केवळ कैकयीने हट्ट धरला आणि श्रीरामाच्या वाटेला वनवास आला. का? केवळ सीतेने हट्ट केला म्हणून श्रीराम कांचनमृगाच्या मागे धावतात. असे सोनेरी हरीण असते का, असा प्रश्न श्रीरामाला का पडला नाही? लक्ष्मणाने आखलेली रेषा ओलांडून सीता रावणाला भिक्षा देते.का? भिष्माला प्रतिज्ञापूरतीचा कैफ; तो का व कसा वाढत गेला? द्रौपदी स्वतःच्या रूपाभिमाने भरलेली का राहते? एकदा घेतलेला त्रागा ती अखेरपर्यंत का सोडीत नाही? युध्दिष्ठीर द्यूत खेळणं सोडत नाही. का? भीम कौरवांना जळावयाचे सोडीत नाही, अर्जुन लढायचे सोडत नाही, दुर्योधन द्वेष सोडीत नाही, कर्ण पीळ सोडीत नाही, कुंती खंत सोडीत नाही; धृतराष्ट्र आधीच दृष्टीहीन परंतु त्याबाबत महाभारताच्या वाचकांनी कधी चेष्टा केली असावी असे संभवत नाही. परंतु तो पितृप्रेमाने इतका अंध होतो कि भर दरबारात वस्रहरण होताना कुलवधुचा त्रागा त्याला ऐकू का येत नाही? ह्या बाबतीत सारा दोष त्याच्या पदरात पडलाच ना; पुत्रप्रेम ही स्वाभाविक बाब; पण त्याला मर्यादा असणे ओघाने येतेच ना! आपल्या देशाची फाळणी ही आपल्यासाठी शोकांतिकाच. परंतु सत्ताधारी तर ब्रिटिश होते ना! बॅरिस्टर जीनाची महत्वाकांक्षा का कशी वाढली? इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत राष्ट्राच्या, समाजाच्या, आम आदमीच्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात, अनेक चुका घडतात. आणि त्यांची किंमत मोजतच पुढे वाटचाल करावी लागते. का? उत्तर एकच. ते म्हणजे After all man is servant of circumstances. मनुष्य परिस्थितीचा गुलाम असतो. हे सत्य पडताळून पाहणे शक्य आहे, परंतु ज्या गोष्टी आपल्या आधीन नाहीत त्यावर आपण मात करू शकत नाही. हे ही तितकेच खरे .
आपले डोळे (दृष्टी), वाणी (आवाज), नाक(वास), त्वचा(स्पर्श), जिव्हा(रस/चव) आणि कान (ऐकू येणं) ही आपली ज्ञानेंद्रिये. मेंदू आपल्या शरीराचा राजा आणि बुध्दी ही मेंदूच्या कार्याचा भाग आहे. इथपर्यंत विज्ञानाने आपल्याला ज्ञात केलं आहे. मग विचार-विकार, संस्कृती -प्रवृत्ती- विकृती, पाप-पुण्य, सुख-दुःख, हार-जीत, आशा-निराशा, संशय-विश्वास, मोह- लोभ, दया-क्रोध, प्रेम-मत्सर इत्यादी भावना मनामध्ये विराजमान आहेत असे आपण मानतो, ते मन कुठे असतं? मन म्हणजे नेमके काय? परंतु मनाची व्याख्या आजपावेतो पूर्णत्वास गेलेली नाही. मन हे फार चंचल असते. ते काबूत ठेवण्यासाठी ध्यानधारणा, योग, इत्यादी उपाय आपल्यासाठी उपलब्ध असतात. तसेच आधुनिक वैद्यकीय शास्त्रातही औषधें उपलब्ध आहेत. परंतु तशा प्रकारांच्या उपाययोजनेचा फारसा उपयोग होत नसतो. कारण त्या उपाययोजना कार्यन्वयीत करण्यात आपलं सातत्य कमी पडत असते. मग सातत्य कमी पडल्यावर काही उपाययोजना आहे का? असा प्रश्न पडतो. हो, उत्तर आहे. ते म्हणजे चिकाटी. परंतु चिकाटीने ज्या काही कार्यात आपण यश प्राप्त करतो ती सारी कार्यें प्रथमदर्शनी बहुतांश वैयक्तिक पातळीवरची असतात. एखाद्या परीक्षेतील यश वा संशोधनातून शास्त्रज्ञांनी तयार केलेले यंत्रे ही त्यापैकी काही उदाहरणे होत. टेलीफोनचा शोध लावणारे थोर शास्त्रज्ञ एडिसनचे ९९९ प्रयत्न चुकले आणि हजाराव्या प्रयोगात ते टेलीफोनचे यंत्र बनवू शकले. त्यावर ९९९ वेळा प्रयत्न केले म्हणून यश मिळाले अशी मार्मिक प्रतिक्रिया एडिसनने दिल्याची वाचनात आले आहे. ह्याचा अर्थ असा की एडिसन ह्यांचे ९९९ प्रयत्न चुकीचे नव्हते, ते तर त्यांच्या शोधकार्यातील टप्पे होते असेच मानायला हवे. पोर्तुगीज खलाशी कोलंबस सागरमार्गे भारताकडे यावयास निघाला, परंतु पोहचला दुसर्या देशात. त्याचेच नाव अमेरिका असे पडले. एडिसन असो वा कोलंबस ह्यांच यश वैयक्तिक पातळीवरील मानले तरी त्यातही त्यांचे आई-वडील, गुरूजन (शास्त्रज्ञांच्या बाबतीत पूर्वासुरीचे शास्त्रज्ञ किंवा निसर्गरूपी गुरू) ह्यांची मदत झाली होतीच की. कोलंबसने म्हणे, तेथील राणीला भारतातील सुंदर नक्षीकाम असलेले दागिने आणण्याची लालूच दाखविली होती आणि त्याचमुळे त्याला परवानगी मिळाली. शिवाय राणीतर्फे प्रवासाचा खर्च, सरकारी गलबतही मिळाले. तात्पर्य हेच कि समाजाचा एक घटक म्हणून आपण वावरत असतो, त्यावेळी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अनेक आपले आप्त, इष्ट- मित्र, शेजारी, अशा अनेक आपल्या संपर्कातील समाजबांधवांच्या वर्तणूकीचा आपल्यावर सकारात्मक तसेच नकारात्मक प्रभाव पडत असतो. कारण ह्या विश्वाची उत्पत्ती ऊर्जेतून झाली असं विज्ञान सांगते. तेच अध्यात्मिक गुरूही सांगत असतात. फक्त ते ऊर्जाऐवजी चैतन्य हा शब्द वापरतात. विश्वातील ऊर्जा दोन प्रकाराची असते. एक सकरात्मक(धन) दुसरी नकारात्मक (ऋण). ह्या विश्वाची निर्मिती हा एक अपघात आहे असे विज्ञान मानते, तर अध्यात्मशास्त्र विश्वाची निर्मिती ही ईश्वराची लीला मानते. परंतु त्यामुळे विश्वाच्या रचनेत, स्वरूपात, वैशिष्ट्यात तसेच दोन्ही प्रकारच्या ऊर्जातही काही फरक पडत नाही. आंब्याच्या झाडावरून कोकीळेच्या सनईचे गुंज ऐकू येते तर दुसर्या बाजूला ताडाच्या वृक्षावरून घुबडाचा भयभीत करणारं कर्कश खेसकणेही ऐकू येत असते. ह्या सत्यातही अजूनही बदल झाला नाही आणि होणार ही नाही. त्यामुळे विश्वासू माणसांचा शोध करावयाचा तरी कसा? प्रत्येक व्यक्तीत रज, तम, सत्व हे त्रिगुण विसावलेले असतात. त्यामुळे कोणी मानो वा न मानो दैवी शक्ती आणि आसुरी शक्तीं मधील दंद्व सतत आपल्या अंतःकरणी सुरू असते. आणि बहुतांशी आसुरी शक्ती लौकर उफाळून वर येत असते. कारण काटेरी झुडपं सुर्यप्रकाश, खते आणि मशागताविना वाढत असतात. तीच निसर्गाची नियमावली आहे. आणि तिचं परिचीत नाव आहे 'नियती '. नियतीचा पराभव आपण करू शकत नाही. मानवी रूपात अवतार घेणार्या विभूतीनांही दुःख भोगावं लागलं. त्यांना ही छळ, चुका, मानहानी, वादविवाद आरोपांना सामोरे जावे लागले. शेवटी काय 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा '. हेच सत्य. म्हणून जीवनात आलेल्या संकटांना, आरोपांना, अन्यायाला फसवणूकीला, मानहानीला, हसतमुखाने स्विकारत, मुखी हरीनाम घेत, जे सदेही वैकुंठात गेले अशा संत तुकाराम महाराजांचा खालील अभंग सदैव ओठीं, कंठी, ठेवणे हाच सुखःदुखा वरील रामबाण उपाय असावा असेच मला वाटते.
मन करा रे प्रसन्न! सर्व सिद्धीचें कारण!
मोक्ष अथवा बंधन! सुख समाधान इच्छा ते!
(विशेष सूचना:- प्रस्तुत लेखक दैववादाचा पुरस्कार करीत नाही. प्रयत्न हाच देव ह्यावर त्यांची निष्ठा आहे. ह्याच ब्लाॅगवरील 'आपल्यातला देव ' तसेच 'आपली वाणी आणि आपलं यश ' ह्या लेखावरुन प्रचीती येईल)