२८डिसेंबर गुरूवार. परवाची मध्यरात्र. एके काळी रोटी, कपडा, मकान ह्या तीन मुलभूत गरजांपैकी कपडा ह्या गरजेची पुर्ती करणारं, मुबंईची ओळख असलेलं, मुबंईची शान समजलं जाणारं गिरणगाव, जिथे कापुस उत्पादक शेतकर्यांच्या, आणि गिरणी कामगारांच्या घर्मबिंदूतून अहोरात्र वस्त्रयज्ञ घडत असे, तिथे चंगळवादाच्या आणि अनधिकृत बांधकामाच्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराने थैमान घालावा. काय म्हणाव? नरेची केला नर किती हीन! गोरगरीब कामगारांच्या कुटुंबियांच्या आर्थिक आधारावर कुर्हाड मारून, त्यांना देशोधडीला लावून उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारतीत अनधिकृतरित्या बांधलेल्या पबमध्ये मिणमिणत्या दिव्याच्या साक्षीने आग लागून चौदाजण मृत्युमूखी आणि तीसजण आगीने होरपळून गेले. शिवसेनेचे युवा नेते श्री आदित्य ठाकरे ज्यांनी मुबंई अहोरात्र पब बनविण्याचं दिव्य स्वप्न उराशी बाळगले आहे, त्यांनी घोषणा केली, ' दोषींवर कारवाई होईल'. पाठोपाठ त्यांच्या पिताश्रींची घोषणा 'दोषी अधिकार्यांना सोडणार नाही'. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी घटना. दोषी अधिकार्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत'.
थोड्या अवधीत भलीमोठी ब्रेकींग न्यूज ' अभियंता आणि अधिकारी निलंबित'. पुढे काय? देव जाणो. अशा दुर्दैवी घटनेची वार्ता टिव्ही चॅनेल्सवरून इतक्या जोशपूर्ण आवेशात ऐकू येते कि समाजबांधवांच्या दुर्दैवी, हकनाक मृत्युसंबंधीची हळहळ कमी आणि सार्या गैरव्यवस्थापनासंबंधीतला निवाडा देणारे न्यायदंडाधिकारी आम्ही असा सुत्रचालकांचा अभिनिवेशच जास्त. नवीन विषय हाती लागला कि ही बातमी, घटना स्क्रिनवरून गायब. का तर शिळी बातमी. वर्तमानात रहावयाचं. दर दिवशी टीआरपी वाढायलाच हवा. हेच टार्गेट, हाच अजेंडा. रोज कसं, नवं, ताजं हवं. चमचमीत हवं. मस्त धुंदीत सरत्या वर्षाला निरोप द्यावयाचा. नव वर्षाचं स्वागत उजाडेपर्यंत करायचं. उजाडलं कि काल परवा काय घडलं ते सारं स्मृतीआड.
हाच जगाचा न्याय खरा ! हीच जगाची परपंरा ! तु जपून टाक पाऊल जरा !
हाच नव्या वर्षाचा संदेश; मुबंईकरांना तीन दिवस अगोदर मिळाला आहे. तो स्विकारावा, आणि आपआपल्या राजकीय नेतेमंडळींचा डावपेचाचा खेळ पाहात बसावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा