शनिवार, २ डिसेंबर, २०१७

ख्रिश्र्चन धर्मगुरू की राजकीय दलाल?



गुजरात राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचत असताना काल गुजरातमधील ख्रिश्र्चन धर्मगुरू थाॅमस ह्यांनी एका पत्रकाद्वारे राष्ट्रवादी शक्तींचा पराभव करा असे आवाहन केले आणि एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुळात हे पत्रक आर्चबिशप ह्यांनी ख्रिश्र्चन समाजबांधवांसाठी प्रत्येक चर्च मध्ये पाठविल्याचं समजते. काल प्रत्येक न्यूज चॅनेलने ह्या वादग्रस्त पत्रका वर चर्चेचा कार्यक्रम घेतला. रिपब्लिक टिव्ही चॅनेलच्या पत्रकाराने आर्चबिशपवर प्रश्नांचा भडीमार करीत कुठल्या राष्ट्रीय शक्तीमुळे भारत देश आणि अल्पसंख्याक  धोक्यात आले आहेत, असा थेट (Specific) प्रश्न केला. त्यावर त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.  कदाचीत  त्यांनी जाणुनबुजून दिले नसेल. जर दिले असते तरी ते राजकीय स्वरूपाचेच असते. परंतु मौन पाळले तेही एक राजकीय खेळीच ठरल्यासारखी झालेली दिसते. आणि म्हणूनच ख्रिस्थी धर्मगुरू राजकीय पक्षाचे दलाल झालेत की काय अशी शंका येते.

आता पर्यंत आपल्या देशात निवडणूका येतात तेव्हा मुस्लीम बांधवासाठी एखाद्या राजकीय पक्षाला मते देण्याचा फतवा मुस्लीम बांधवाचे इमाम काढीत असल्याचं आपण ऐकलं आहे. परंतु ख्रिश्र्चन धर्मगुरू कडून असा फतवा काढल्याचं ऐकलं नव्हतं. चर्चमधून ख्रिश्र्चन बाधंवासाठी एखाद्या राजकिय पक्षाचा पराभव करा असा आदेश दिला जात असतो असं अनेकांना वाटत आलेले आहेच. तो अंदाज वा संशय खरा ठरतोय असे आज  मानावे लागते. रिपब्लिक टिव्ही चॅनेलवर एक फादर चर्चच्या वतीने प्रवक्ता म्हणून खुलासा करण्यासाठी आले होते. त्यांनी म्हटले की , "अशा प्रकारचे पत्रक आर्चबिशब त्यांच्या अधिकारात असणार्या चर्चच्या प्रमुखांना पाठवित असतात आणि तसा नेहमीचा रिवाज आहे.  ह्याचा अर्थ अशा प्रकारचा फतवा आर्चबिशब काढीत असतात परंतु ती बाब पब्लीक डोमेन मध्ये कधी आली नव्हती, असेच समजावे लागते. आजकाल मिडीयातील हुषार, चलाख पत्रकार कडून अशी खोडसाळ कृत्ये चव्हट्यावर आणली जातात. आणि ह्याबाबतीत आतापर्यंत पुर्णपणे गुप्तता पाळणार्या चर्च प्रशासनाचा ढोंगीपणा उघडीस आला असं दिसते. गुजरातमधील निवडणूकीत मतांचं धृविकरण करण्यासाठीच आर्चबिशबनी वक्तव्य केलं असण्याची शक्यता वाटते. कारण रिपब्लिक टिव्ही चॅनेलच्या पत्रकाराला उत्तर देताना ते म्हणाले, कि "अल्पसंख्याक आणि ओबीसी समाजाने राष्ट्रवादी शक्तीचा पराभव करण्यासाठी एक यावे ". केवळ अल्पसंख्याकांना उद्देशुन त्यांनी म्हटले नाही तर ओबीसींनाही आवाहन केलं, ते ही जाहीर मुलाखतीत. आर्चबिशबचं हे वक्तव्य पूर्णतः प्रचारात भाग घेणार्या राजकिय नेत्याच्या वक्तव्यासारखं वाटते. म्हणून ते निदंनीयच नव्हे तर धोकादायकही आहे तसेच निवडणूक कायदा व आचारसंहीतेचा भंग ठरू शकते. ह्या उपरान्त चर्चमधील कारभारासंबंधीची विश्वासहर्ता तसेच जो आदर येथील बहुसंख्यांना आहे त्याला तडा जाण्याचाही मोठा धोका आहे .

हिमाचल प्रदेश तसेच गुजरातच्या निवडणूका जाहीर झाल्या आणि राजकीय हवा तापू लागली. हिमाचल प्रदेशमध्ये काॅगेसचं राज्य आहे. त्यामुळे तिथे अॅन्टी इन्कबन्सी फॅक्टर असल्यामुळे काँग्रेसने सारी जबाबदारी मुख्यमंत्री धुमालवर सोपवून राहूल गांधीना तिथे प्रचारासाठी फारसं पाठविलं नाही. कारण गुजरात निवडणूकीच्या अगोदर राहूल गांधीना काॅग्रेसच्या अध्यक्षपदावर बसावयाचे असल्याकारणाने हिमाचल मधील संभाव्य पराभवाचं खापर राहूल गांधीच्या माथ्यावर कशाला फोडावयाचं हा हेतू काॅग्रेसने साधला. हिमाचल प्रदेशच्या निवडणूका ही संपल्या. त्यामुळे आर्चबिशबच्या पत्रकाद्वारे जो काही राजकीय हेतू चर्चला साधावयाचा होता तो गुजरात राज्याच्या निवडणूकासाठीच होता हे स्पष्ट आहे. म्हणून फक्त गुजरातमधील निवडणूकीच्या प्रचार डोळ्यासमोर ठेवून आर्चबिशबच्यां पत्रकावर चर्चा करावी लागेल.

गुजरातमधील निवडणूकीसाठीची तयारी काॅग्रेसने दिड-दोन वर्षापासून केलेली आहे हे एकूण प्रचाराचं स्वरूप आणि काग्रेसची रणनीती पाहता लक्षात येते. पटेल समाजाचा हार्दिक पटेल, ओबीसांचा आल्पेश ठाकोर आणि दलीत समाजाचा जिग्नेश मेवानी ह्या तिघां युवकांचे आपआपल्या जातीसाठी अंदोलने अगोदरच सुरू केली होती आणि ती करावीत ह्यासाठीची सारी व्यवस्ता काॅग्रेसनेच केली होती हेही आता स्पष्ट झाले आहे. ओबीसी युवक नेता ओबीसीच्या कोट्यातून पटेल समाजासाठी आरक्षण ठेवावयास विरोध करीत आहे. तर हार्दिक पाटीदार फक्त पटेल समाजासाठी आरक्षण मागत आहे आणि ह्यात काही जातीयवादी नाही असं स्पष्ट माडंत आहे आणि ते ही न्युज चॅनेलवरील ह्या दोन्ही युवकांच्या सयुक्त रित्या मुलाखतीच्या कार्यक्रमात. ह्या दोन्ही नेत्यांना न्युज चॅनेल चे अॅन्कर प्रश्न करीत आहेत कि एकविसाव्या शतकात युवकांना सरकारकडून सारं फुकट मागण्याची सवय लावण्याऐवजी युवकांमधील क्रियाशक्ती आणि उत्साह मारून टाकण्याचा प्रयत्न तुम्ही का करीत आहात? हा प्रश्न न्युज चॅनेलच्या अॅन्करनी वेळोवेळी विचारून सुध्दा ते पुन्हा पुन्हा आपआपल्या जातीबाधंवाच्यां मागण्याच मांडत राहात होते. ह्यावरून केवळ जातीय अस्मीता पेटविण्या व्यतिरिक्त ह्यांच्याकडे दुसरा कार्यक्रम दिसत नाही असे मतदारांना वाटू शकते. कारण असाच प्रयोग उत्तर प्रदेशमधील नेते अखिलेश यादव तसेच मायावतीचा सपशेल फसला. मतदार बदलत आहे असे दिसते.

काँग्रेसचा प्रचार राजकिय अभ्यासकांनुसार नेगेटिव्ह दिसतोय. विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षावर टिका कशी करावी हा काॅग्रेसचा हक्क आहे हे मान्य. पंरतु बीजेपीच्या गुजरात विकासाच्या माॅडेलला काँग्रेसने पर्याय सुचवावयास हवा कि नाही. गुजरातमध्ये २२ वर्षाच्या भाजपा कारभारासंबंधी नाराजी असु शकते, नव्हे आहेच असं मानलं तरी केन्द्र सरकारच्या नोटाबंदी, जीएसटी, घसरता जीडीपी इत्यादी वर टिकेचा सूर काँग्रेस लावत आहेत. नोटाबंदीला सामान्यजनांने पाठींबा दर्शविलेला आहे. जीएसटी हा सर्वपक्षीय निर्णय आहे. आणि जीडीपी सारख्या प्रश्नासंबंधी काही ऐकायची सामान्यजनांची मानसिकता नसते. भाजपा ह्या तिन्ही प्रश्नाला तोडीस तोड उत्तर देत आहे. ताज्या अहवालानुसार अर्थव्यवस्था गती घेऊ लागली आहे. महागाईचा मुद्दा काँग्रेस विसरलेली दिसते. फक्त पंतप्रधान मोदीजींवर टिका करण्याचा एकमेव मुद्दा काँग्रेसने घेतलेला आहे. काँग्रेसकडे भाजपा विरोधात फार मोठा भ्रष्टाचाराचा मुद्दा जो मतदाराला आकर्षित करेल असा नाही. आणखिन महत्वाचं म्हणजे काँग्रेसकडे स्थानीक नेता नाही. तसेच पक्ष संघटन नाही. उमेदवारांच्या यादीवरून जो काही गदारोळ झाला ह्यावरून वरवर आलबेल वाटणार्या काँग्रेसच्या गुजरात मिशनचे संघटनात्मक पातळीवर बारा वाजले असून केवळ माध्यमात झळकत रहाण्याची घाई तेवढी दिसून येते. निवडणूका जाहीर सभांसाठी गर्दी खेचण्यातून नव्हे तर बूथ पातळीवरच्या तयारीने जिंकावयाच्या असतात. म्हणून केवळ तीन नवीन युवकांच्या खांद्यावरून जातीयवादाच्या शस्त्राच्या आधारावर स्वतःला सर्वसमावेषक पक्ष समजणार्या काँग्रेसच्या सभांना गर्दी मिळत आहे म्हणून  भाजपा निवडणूकीत पराभूत होईल असे वाटत असलं तरी भाजपाला पराभूत करणे इतके सोपे नाही. कारण उत्तरप्रदेशमध्येही मायावती, अखिलेश आणि राहूल गांधीच्या सभेला ही गर्दी होती हे आपण पाहिले आहे. ह्या उलट पंतप्रधान श्री नरेद्र मोदी म्हणजे गुजराती अस्मीता. त्यांच्यापुढे सारे फिके. त्यांच्या सभांना जी गर्दी जमते ती सकारात्मक उर्जा निर्माण करीत असते. भाजपांकडे फर्डे वक्ते आहेत. तसेच कार्यक्रम आहेत. केवळ पंतप्रधान मोदीजीवर टिका करण्याची स्ट्रॅटेजी जी काॅग्रेसने आखली त्यामुळे गुजरात मधील लढाई गुजरात सरकार विरूध्द गुजरात काॅग्रेस पक्ष अशी पुसटशीही दिसत नाही. It is once again Modi v/s Rahul. त्यातही राहूल गांधीनी जे काही कमाविले होते ते सारं काॅग्रेसचे युवा नेते गमावित आहेत. कोणी एकाने ट्विटरवर पंतप्रधान मोदींची निंदानालस्ती केली. ती नतंर डीलीट केली. कोणी चाय बेचनेवाला अशी टिंगल उडविली. भाजपाला काॅग्रेसवर आक्रमण करण्याची संधी मिळाली. भाजपाने चाय पे चर्चा कार्यक्रम सुरू केला. मुडी तसेच वर्ल्ड बॅकेंचं भारतीय अर्थव्यवस्थासंबधीची सकारात्मक शेरे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या मुलीने हैद्राबाद येथे मोदींसंबधी काढलेले उद्गार ह्या सार्या गोष्टो भाजपासाठी जमेच्या ठरू लागल्या आहेत.

अलीकडे दिल्लीवरून मुबंईकडे रेल्वेने परतत असताना गुजरात राज्यातील रेल्वे स्टेशनवरून चढणार्या प्रवाशांशी गप्पा मारताना गंमत वाटली. गंमत अशासाठी कि ते प्रवासी जे म्हणत होते त्यावरून जीएसटीमुळे लोक नाराज आहेत हे कळलं. परंतु पुढे म्हणाले " मोदीजी हमारे लिये नही, लेकिन जो कर रहे है, वह हमारे बच्चोंके लिये अच्छा साबीद होगा ". आणि वर म्हणत कि "काँग्रेस कितना भी प्रयास करे लेकिन मोदीजी ही जितेंगे". वर मी म्हटलं आहे की काँग्रेसकडे स्थानिक नेतृत्व नाही. राहूल गांधीना प्रकाशझोतात ठेवण्याची ही कवायत आहे, आणि त्यात राहूल गांधी उत्तीर्ण झाले इतकं समाधान काॅग्रेसला निश्र्चीत मिळाले असावे. पण श्री नरेंद्र मोदीनी गेली वीस वर्ष गुजराती अस्मितेला फुकंर घातली ती इतक्या लौकर राहूल गांधी आणि तीन भिन्न जातीच्या युवकामुळे पुर्णतः  विझेल अशी शक्यता  दिसत नाही.

भाजपाचा पराभव होणे कठीण दिसू लागल्याने आता ख्रिश्र्चन धर्मगुरू राष्ट्रवादावर टिका करण्यास सरसावले असेच वाटते. परंतु ही गोष्ट भाजपाच्या पथ्यावर पडेल. असं ऐकिवात आले आहे कि भाजपा निवडणूक आयोगाकडे तक्रार नोदंविणार आहेत. आर्चबिशपांनी पुन्हा गुळगुळीत झालेला मुद्दा उचलेला आहे. म्हणे अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटत आहे. गांधीजीचां हा देश आहे. असे वाक्यही जोडले. आर्चबिशबने ख्रिश्र्चन धर्माभोवती संशय उभा केला आहे असेच रिपब्लीक टिव्ही न्युज चॅनेलवरील चर्चेत एका ख्रिश्र्चन युवकानी म्हटले; पुढे त्यांनी आर्चबिशबनी माफी मागावी असे त्याठीकाणी उपस्थित असलेल्या चर्चच्या प्रवक्त्याला (फादरला) टोलावतांना म्हटले. गांधीजीचे नाव मुखी ठेवणार्या आर्चबिशबांना ठाउक नाही कि महात्मा गांधींजीनी एके ठीकाणी धर्मातंरासारख्या कुटील कृत्याची कठोर शब्दात निर्भत्सना केली आहे. आर्चबिशबांना अप्रत्यक्षरित्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या राष्ट्रवादी विचारसरणीमुळे व्यक्तिशा असुरक्षित वाटत असेल तर तसं त्यांनी सरकारकडे लेखी तक्रार द्यावी आणि झेराॅक्स काॅपी पत्रकार मंडळीकडे द्यावी. गुप्तरित्या चर्चमध्ये पत्रक पाठवून राष्ट्रवाद्यांचा पराभव करा असा आदेश देण्याऐवजी आपल्या अंगावरील पवित्र पाढंरा शुभ्र झब्बा उतारावा आणि खुशाल राजकरणाच्या मैदानात उतरावे. माझं सांगण आहे, त्यांच्यासारख्या धर्मगुरूनी आपलं नियत कर्म करावे. परधर्मो भयावह !असे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं आहे ते लक्षात ठेवलेलं बरं. राजकीय अभ्यासक तर कालपासूनच आर्चबिशपची मुलाखत आणि पत्रक भाजपाच्या फायद्याचं ठरणार असा अंदाज बांधू लागले आहेतच. पण जर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पोहचलं तर आर्चबिशपना समज दिली जाण्याची शक्यता आहे. तदनंतर सोनीया गांधी तसेच राहुल गांधीच्या संबंधी डाॅ सुब्रमहण्यम् स्वामी जे आरोप करीत आहेत, त्यात तथ्य आहे असा समज पसरू शकतो. त्यातून काॅग्रेससाठी पुढील वाटचालीत एक मोठा अडथळा निर्माण होऊ शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...