अलीकडेच "ख्रिच्चन धर्मगुरू राजकिय दलाल?", ह्या विषयावर मी लेख लिहिला. गुजरात मधील प्रचार संपला आणि मतदानही संपले. असे असूनही हा लेख लिहावा असे मला का वाटले हा प्रश्न तुम्हाला सतावीत असेल. म्हणून प्रथम मी प्रांजळपणे सांगतोय, गुजरातमधील निवडणूक प्रचार सुरू होण्याअगोदर "निवडणूका लोकशाहीचा अंलकार कि ज्वर?". ह्या विषयावर लेख लिहीण्याचं मनात आले आणि तो लेखही लिहून झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात विविध राजकिय प्रवाह कसे अस्तित्वात होते, तसेच स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या राजकिय पक्षांचा जन्म,निवडणूक यंत्रणा, त्यातील त्रुटी, प्रचार आणि खालावत जाणारी पातळी, मतदान त्यातील टक्केवारी, प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या स्तरावरील सततच्या होणार्या निवडणूका आणि त्यावर होणारा खर्च, लागणारे मनुष्यबळ, इत्यादीसंबंधी चर्चा, पर्याय तसेच उपाय इत्यादी बाबींचा तपशील त्या लेखात आहे. पण तो लेख पुढे कधीतरी पब्लीश करण्याचे ठरविले आहे. ह्याच करण, गुजरात निवडणूकीच्या प्रचारातून रोज असं काहीतरी बाहेर येत गेलं कि त्यावर सर्वत्र चर्चा सुरू झाली आणि निकाल लागेपर्य॔त सुरू राहील असेच दिसते.
काॅग्रेसचे एक वरिष्ठ आणि विचारवंत नेते मणीशंकर अय्यर ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना पत्रकारासमोर 'नीच' संबोधून एक नवा वाद निर्माण केला. त्या पाठोपाठ श्री मणीशंकर अय्यर ह्यांच्या घरी पाकिस्थानचे उच्चआयुक्त तसेच पाकिस्थानचे माजी परराष्ट्रमंत्री समवेत एक गुप्त बैठक झाली, त्यांत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग तसेच माजी सेनादल प्रमूख दिपककुमार, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे ही उपस्थित होते अशी माहिती बाहेर आली. ह्या सार्या प्रकाराचा पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील निवडणूकीच्या प्रचारात समाचार घेतला. प्रश्न असा आहे की पंतप्रधान मोदींनी अशा घटनांचा समाचार घ्यावयाचा की नाही? काँग्रेसचे नेते राहूल गांधींनी सल्ला दिल्यानंतर मणीशंकर अय्यर ह्यांनी पंतप्रधानांची माफी मागितली. परंतु तो पर्यंत पंतप्रधान मोदीनी भावनीक आवाहन करीत काँग्रेसवर जोरदार हल्ले करावयास सुरूवात केली. मणीशंकर अय्यर ह्यांच्याकडून झालेला प्रमाद मोठा होता असे जाणवल्यानंतर काँग्रेसने मणीशंकर अय्यर ह्यांना निलंबित केले. आपला जन्मच मूळी संघ आणि भाजपावर टिका करण्यासाठीच झाला आहे अशी समजुत ज्यांची झाली आहे अशी पत्रकार आणि संपादकीय मंडळीं, काँग्रेसचे नेते, आणि इंग्रजाळलेले विचारवंत म्हणत राहिले कि मणीशंकर अय्यरांनी माफी मागितली आहे, तर पंतप्रधानांनी हा विषय संपवावा आणि विकास मुद्यावर प्रचार करावा. ह्या सार्या मंडळीची भाषा सुचनावजा असती तर समजण्यासारखं असतं, पण ह्यांची भाषा मोदींना आव्हान देत आहे अशी वाटली. ह्याचा अर्थ असाच होतो की श्री मणीशंकर अय्यरच्या विधानाने फटका बसणार ह्याचं भय काँग्रेसला आणि काँग्रेसी मित्रांना वाटल होतं. श्री मणीशंकर अय्यरनीं माफी मागितली परंतु नीच शब्दाचा हिंदी भाषेत अनेक अर्थ निघतात हे ठाऊक नव्हते अशी पुष्टी करीत स्वतःला जंटलमॅन दाखविण्याचा आव आणला.
गुजरात निवडणूक प्रचारात विकास मुद्दा गायब केला असा आरोप काँग्रेसचे नेते करीत होते. गुजरातमध्ये विकास झाला नसता तर इतकी वर्षे भाजप सत्तेवर राहिला असता का? विकास झालेला आहे आणि होत आहे हे निच्चित आणि तशा प्रकारची भावना गुजरातमधील बर्याच मतदारांमधे आहे. असे एकंदरीत प्रचारमध्ये दिसले. आता हा विकास मुख्यत्वे शहरी भागात झाला की ग्रामीण भागात हा वादाचा विषय ठरू शकतो. काँग्रेस आणि तीन जातीय युवक नेत्यांनी मोदी विरोधात रान पेटवले असले तरी पर्यायी विकास आराखडा ह्याच्यांपाशी नव्हता. तसेच भाजपा नको तर पर्याय कुठला? हा प्रश्न समोर होताच. काँग्रेस आणि सोबत असलेले तीन भिन्न जातीय युवक ज्यांच्या मागण्या एकमेकांच्या मागण्यांना छेद देतात अशांना निवडावे ह्या बद्दल मतदार सांशक दिसले. नोटबंदी आणि जीएसटी निर्णयानंतर उत्तरप्रदेशच्या निवडणूका भाजपाने दोन तृतीयांश जागा पटकावून जिकंल्या. तिथे विरोधकांनी नोटबंदी आणि जीएसटी निर्णयावर मोदी सरकारवर सडकून टिका केली तरी मतदारांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. कारण असे की उत्तरप्रदेश विकसित राज्य नाही. त्यामुळे सामान्यजनांना नोटबंदी तसेच जीएसटी संबंधीचे निर्णय हे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी चांगला निर्णय आहे अशी भाजपाने मांडलेली भूमिका पटली. त्याहूनही हे निर्णय कर चूकविणारे आणि काळा पैशाचा व्यवहार करण्यांना सरळ करण्यासाठीच आहे हे मनोमन पटले. म्हणून भाजपाच्या झोळीत भरभरून मते तेथील लोकांनी दिले. गुजरातमध्ये विकास झालेला आहे. उद्योग धंदे आहेत, म्हणून नोटबंदी आणि जीएसटीमूळे उद्योगधंदे करणार्यानां दैनंदिन रोकडीवर होणारा व्यवहार तसेच नवीन कररचना इत्यादी अडचणीनां तोंड द्यावे लागले. परंतु हे दोन्ही निर्णय केंद्र सरकारचे आहेत आणि त्यातील जीएसटीचा निर्णय सर्वपक्षीयांनी घेतलेला आहे. तसेच तात्पुरत्या अडचणीतून मार्ग निघेल आणि विकासाची गाडी पूर्वपदावर येईल असा विश्वास ठेवणारे बर्यापैकी संख्येने असलेल्या व्यापारी आणि उद्योगधंद्यावाल्यांनी तसे बोलून दाखविल्याचेही टिव्ही चॅनेलवर दिसले. गुजरातमधील भाजपा सरकारने काही भ्रष्टाचार केला असेल तर तशी प्रकरणे काँग्रेसने प्रचारात मांडायला हवी होती. गुजरात सरकारने लोकहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी केली नसेल किंवा निर्णयाची प्रक्रीया ढिली पडली असेल तर त्यावर काँग्रेसने टिका करावयास हवी. काँग्रेसच्या प्रचारात हे मुद्दे दिसले नाहीत. ह्याकडे बुध्दीवान पत्रकारांचे लक्ष का बरे गेले नाही? वस्तुस्थिती अशी आहे की गुजरात सरकारवर टिका करण्यासाठी विरोधकाच्या हाती काहीही नव्हते. म्हणून नोटाबंदी आणि जीएसटी निर्णयानंतर स्वाभाविकरित्या थोडाफार उलटा परिणाम झाला आहे त्यावरच काँग्रेसने प्रचारात भर दिला. साधारणतः धाडसी आर्थिक निर्णयामूळे फटका बसला तर विरोधक काय म्हणतात हे ऐकण्यासाठी मतदार सभेला गर्दी करतात. तसेच जातीय अस्मीता चेतावली गेली की सळसळतं रक्त असणार्या युवकांना आकर्षित करणे सोपे जात असते. आणि अशा युवकांमध्ये मतदानाचा हक्क नसणारे प॔धरा ते सतरा वर्षाची मूलंही प्रचारफेरीत आणि सभेत भाग घेत असतात. पुष्कळदा असे मोर्चे, फेर्या, सभा ह्यासाठी लागणारा पैसा प्रचारात सामील होणार्यांच्या खिशातला नसतो, त्यातून जवळपासच्या तीन-चार विधानसभा मतदारसंघात तीच तीच युवकमंडळी सहभागी झालेली असू शकते. म्हणून प्रचार सभेला झालेली गर्दी मतदानात भर टाकते असे होत नाही. परंतु गुजरातमधील प्रचारात एक गोष्ट स्पष्ट दिसली. ती म्हणजे मतासाठी खुलेआम आरक्षण, जाती-जमातीमध्ये समाज तेढ उत्पन्न करून आपल्या देशाला मध्ययुगीन काळात ढकलण्याची धोकादायक खेळी काँग्रेसने केली. ती देशाला परवडणारी नाही असे माहीत असुनही काही संपादकीय मंडळीला आणि पत्रकारांना अग्रलेखातून काँग्रेसला चपराक द्यावी असे वाटलं नाही. वाटणार तरी कशी? कारण स्वातंत्र्यपुर्व काळापासून त्यांचे हित जपले ते काँग्रेस पक्षानेच.(वाचंकानी कृपया ह्याच ब्लाॅगवरील 'मिडीया मधील सूत्र नावाचं अपत्य ' हा लेख वाचावा). गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं आणि गुजरातचा विकास ज्यांनी घडविला अशा पंतप्रधान मोदींना विकासाची भाषा करावयाची गरज भासत नव्हती. कारण काँग्रेसने गुजरात विकास माॅडेलला पर्याय दिलाच नाही. त्यामूळे नाराज मतदारांना 'जायें तो जायें कहाॅ' असेच वाटले असणार. त्याचवेळी गुजराती अस्मीतेचं भावनिक आवाहनावर भर देण्याची आयती संधी श्री मणीशंकर अय्यर आणि कपील सिब्बल ह्या दोन नेत्यांनी दिली. ती मोदीजीं कशी सोडणार होते? आणि का म्हणून सोडावी? क्रिकेट मध्ये गोलंदाजांने फलंदाजाला पुलटाॅस टाकला तर फलंदाज त्याला सीमापार पाठविणारच. राजकारण हा ही एक खेळच आहे.
हा खेळ खेळताना मोदीजी राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करीत आहेत असे दिसत नाही. उलट श्री मणीशंकर अय्यरांच्या घरी पाक उच्चआयुक्त आणि पाकचे माजी परराष्ट्रीय मंत्र्यांच्या समवेत झालेली बैठक प्रथमदर्शनी तरी राष्ट्रहिताला बाधक आहे असे कोणाही भारतीयांस वाटू शकते. कर्नाटकात झालेल्या गौरी लंकेशच्या हत्येस संघ आणि भाजपाचा हात आहे असा सरळ सरळ धादांत खोटा आरोप करण्याचा खेळ काॅग्रेस खेळली. काय झालं? काॅग्रेस आणि मार्क्सवादी दोघेही आपटले. 'विकास पागल झाला आहे ' असा प्रचार काँग्रेसने केला आणि ते ही गुजरातमधील जातीयवादी युवकांना हाताशी धरून. काय होणार? काँग्रेस जरी गुजरातमध्ये निवडून आली तरी त्या जातीयवादी युवकांच्या आरक्षणाच्या मागण्या काँग्रेस कशा पुर्या करणार? मृगजळाच्या मागे लागलेल्या युवकांच्या पदरी निराशा येईल तेव्हा आरक्षण मागणारे लाखो युवक पागल होतील ह्याचा विचार काँग्रेसने करावयास हवा होता कि नाही? विकासाच्या मुद्यावर काँग्रेसला निवडणूक लढता येत नाही,म्हणून जातीय राजकरणाचा धोकादायक खेळी काँग्रेसने सुरवात केली. उत्तर प्रदेश मध्ये ही खेळी फळास लागली नाही. गुजरातमध्ये जरी उत्तरप्रदेश सारखं यश मिळणारं नसले तरी भाजपा पुन्हा गुजरातमध्ये सत्तेवर येणार असाच अंदाज Exist Poll मध्ये वर्तावलेला दिसतोय. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्तेपासून रोखणारे समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष होते आणि त्यांचा कारभार तेथील जनतेला आवडत नव्हता, परंतु पर्याय मिळालाच नव्हता. मोदीजी आणि भाजपा असा पर्याय मिळाला म्हणून भाजपाचं उत्तर प्रदेशमधील यश लॅन्ड स्लाईडींग ठरलं. जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे मोदीजी प्रचाराला जाणार आणि भाजपा यश मिळविणार. जिथे भाजपाचं सरकार नाही तिथे भाजपा टक्कर देत जाईल आणि शक्य असेल तिथे स्वबळावर नाहीतर दुसर्या पक्षाला घेऊन सत्तेवर येत जाणार असेच दिसते.
राहता राहीला प्रश्न श्री मणीशंकर अय्यरच्या घरी झालेल्या बैठकीसंबधी. ह्या बैठकीत काय शिजले, ह्याबाबतची माहिती हाती आलेली नाही. तरीही अशा प्रकारच्या बैठकीचं समर्थन करता येईल का? माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी अशा गुप्त बैठकीस हजर होते ही माहिती उजेडास आली. ह्याचा अनेक भारतीयांना धक्का बसला आहे. गुजरात राज्याची निवडणूक संपेल. निकालही हाती येतील. परंतु ह्या बैठकीभोवती निर्माण झालेला संशय कसा दूर होणार? कि हाच मुद्दा पुढील लोकसभेच्या निवडणूकीतही राहणार? आणि राहिला तरी नवल वाटणार नाही. राजकारणवर लेख लिहीताना मी क्रिकेट खेळातील क्लृप्त्यांचा उल्लेख केला असला तरी राजकारण हा कबड्डी सारखा खेळ आहे. इथे प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूची चढाई आपल्या लाॅबीपर्यंत आणू द्यावयाची आणि जेव्हा त्याला दम लागेल तेव्हा त्याला पकडावयाचे असते. ह्या विषयांवर काॅग्रेसला थकवावयाचे आणि पराभूत करावयाचं धोरण मोदीजींनी आखले तर त्यांना रोखता कोणाला येणार? भाजपामध्ये मोदी युग सुरू झाले, आणि विरोधकांना लालकृष्ण अडवानी आवडायला लागले. सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली तेव्हा त्यांना ते प्रतिगामी वाटले. अटलबिहारी वाजपेयी विरोधकांना उदारमतवादी वाटले, त्यात नवल नाही. कारण वाजपेयीजी भारतीय राजकारणातले एकमेव वादातीत व्यक्तिमत्व. परंतु ह्याच लाडक्या व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाखालील सरकार एका मताने विरोधकांनी पाडले आणि देशावर तेरा महीन्यानंतर निवडणूक लादली. हे तर किळसवाणे राजकिय डावपेच. आता काॅग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना त्यांनीच तयार केलेल्या खेळपट्टीवर मोदी त्यांना लोळवत असतील तर जे पेरिले ते उगवते,वा करावे तसे भरावे किंवा जे तुम्ही देता तेच फिरून तुमच्याकडे येते ह्या नियमानुसार आहे असेच समजावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा