महाराष्ट्रातील काॅग्रेसचे दोन मातब्बर नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अलिकडच्या मविआ सरकारचे उपमुख्यमंत्री राहिलेले बाळासाहेब थोरात यांनी ' अशोक चव्हाण काॅग्रेस मधुन बाहेर जावयास नको होते असे म्हणत दोघांनी आपले दुःख व्यक्त केले.' पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रकाराने अशोक चव्हाणांनी काॅग्रेस सोडल्यामुळे काॅग्रेसचे महाराष्ट्रात नुकसान होईल का या असा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर दिले की 'अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काॅग्रेसला नक्की तोटा होईल. '
महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय स्थिती अशी आहे की काॅग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते मंडळी संभ्रमात आहेत.
त्यामूळे पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी दिलेली प्रतिक्रीया अप्रत्यक्ष रित्या काॅग्रेस हायकमांडनी अशोक चव्हाण यांना भाजपात जाण्याअगोदर रोखायला हवे होते, असे सुचविलेले असावे. हा एक प्रकारे काॅग्रेस हायकमांडकडे मवाळ भाषेत नोंदविलेला निषेध आहे असे मला वाटते. याला आधार काय आहे असा प्रश्न आपल्याला पडला असावा. याचे उत्तर हायकमांड राहूल गांधी यांनी अशोक चव्हाणांची सन २०१९ पासून केलेल्या मानहानीत दडले आहे. अशोक चव्हाण हे राहूल गांधीच्या चमत्कारीक वागण्याचे बळी पडलेल्या अनेक जेष्ठ काॅग्रेसच्या नेत्यांच्या हालाखीच्या स्थितीचे एक प्रतिनिधीक स्वरूप आहे.
सन २०१९ पासून अशोक चव्हाण यांची काॅग्रेस हायकमांडने म्हणजे राहूल गांधींनी जी मानहानी केली आहे ती फारशी ऐकावयास आली नाही. त्याचा थोडा-फार तपशील माझ्या वाचनात आणि ऐकण्यात आला आहे तो लेखात मी पुढे देणार आहे. अशोक चव्हाण काॅग्रेसचा राजीनामा देऊन लागलीच दुसर्या दिवशी भाजपात प्रवेश करून थांबले नाहीत तर भाजपा द्वारे राज्यसभा निवडणूकीचा अर्ज ही दाखल केला याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. वरवर पाहता हा तडकाफडकी घेतलेला निर्णय आपल्याला वाटतो, पण तसा नाही हे या लेखमालिकेचे भाग-३ आणि भाग-४ वाचल्यानंतर तुम्हाला खात्री होईल अशी मला आशा वाटते.
आपल्या येथील न्यूज चॅनेल्स आणि प्रिन्ट मिडीया बहुतांशी असे आहेत की ते सतत भाजपाची कोंडी कशी करता येईल यात मग्न असतात. म्हणूनच अशोक चव्हाण यांचे पक्षांतर भाजपाने आदर्श सोसायटीतील भ्रष्टाचाराला ईडीचा धाक दाखवून घडवून आणले आहे असा आरोप करीत आहेत. यावर अशोक चव्हाण यांनी बहुतांश सर्व चॅनेल्स वर शांततेने उत्तर दिले की ' हा शिळ्या कडीला उतू देण्याचा प्रकार आहे.'
महाराष्ट्रातील काॅग्रेसच्या तीन नेत्यांनी काॅग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर, महाराष्ट्रात काॅग्रेसमध्ये भूकंप होणार अशा बातम्या न्यूज चॅनेल्सवरून प्रसारीत केल्या जात असतांना तसे काही घडेल असे मला वाटले नाही. कारण महाराष्ट्रातल्या कुठच्याही काॅग्रेस नेत्याला नवा पक्ष स्थापन करावयाचा असेल तर त्यांना नव्या पक्षाच्या नावा मागे काॅग्रेस हे सरनेम लावणे आवश्यक आहे. पण तसे करण्यासाठी एक ही नेता पुढाकार घेणार नाही. त्यांच्या समोर राष्ट्रवादी काॅग्रेसची हालत काय झाली याचे चित्र प्रत्यक्ष दिसत आहे. काॅग्रेसचा राजीनामा देऊन अनेक नेत्यांना बाहेर पडण्याची इच्छा झालेली असू शकते. असे नेते शिवसेना व राष्ट्रवादी काॅग्रेस पेक्षा भाजपात जाण्याची शक्यता अधिक आहे. शेवटी राजकीय नेत्यांना ही त्यांच्या भवितव्यात स्थिरता कोठे मिळेल याचा हिशोब करावा लागतोच. पण----
याचा धसका मात्र लिबरल पत्रकार-संपादक आणि राजकीय अभ्यासक मंडळींनी घेतला आहे. म्हणूनच ती मंडळी काॅग्रेसला राजीनामा देणार्या नेत्यांना भाजपा ईडीची भिती दाखवते असा आरोप करीत असतात. त्यांना तसा आरोप करण्याची इतकी सवय झाली आहे की जोपर्यंत भाजपाचं सरकार केंद्रात येत जाईल तो पर्यंत लिबरल मंडळींचा असा आरोप ऐकावयाची तयारी आपल्याला ही ठेवावी लागेल असे स्पष्ट जाणवते.
क्रमशः-
(या लेखमालिकेचा चौथा आणि शेवटचा भाग सोबत जोडला आहे.)
-------------------------------------------
राज्यसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील तीन काॅग्रेस नेत्यांचे पक्षांतर (भाग - ४)
H/W News English (Editorial) या न्यूज चॅनेल्सचे एमडी सुजीत नायर यांनी अलिकडे त्यांच्या चॅनेल्सवर अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरा संबंधीचे विश्लेषण केले आहे. ते करीत असताना सुजीत नायर यांनी म्हटले आहे की, " मविआ सरकार स्थापन होताना अशोक चव्हाण यांना विधानसभेचे सभापद हवे होते. त्यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविलेले होते. त्यामूळे एखादे मंत्रीपद घेण्यात त्यांना स्वारस्य नव्हते. तसे त्यांना वाटणे हे स्वाभाविक होते. मविआ आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना ही अशोक चव्हाणांची मागणी रास्त वाटली होती आणि त्यांनी तसे मविआ च्या कोअर बैठकीत संमती दिली होती. पण काॅग्रेसच्या श्रेष्ठींनी अशोक चव्हाणाची विनंती धुडकावून लावली. बरे इतकं करून ही काॅग्रेस श्रेष्ठी अर्थातच राहूलबाबा थांबले नाहीत. त्यांनी अशोक चव्हाण यांना हलक्या खात्याचे मंत्रीपद स्विकारण्याचा आदेश दिला. हा आदेश म्हणजे अगोदरच दुखावलेले अशोक चव्हाण यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय."
H/W News English (editorial) एम डी सुजीत नायर यांनी अशोक चव्हाण यांच्या बाबत घडलेल्या आणखिन दोन घटनाचं स्मरण करून देतात. सन २०१९ ला अशोक चव्हाण महाराष्ट्र काॅग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी विधानसभेच्या निवडणूकी साठी नवी दिल्लीत काॅग्रेस श्रेष्ठींकडे निधी मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी राहूल गांधींनी दखल ही दाखविली नाही. त्यांना ' परत जावे ' असा आदेश दिला होता.' भिक्षा देऊ नका पण कुत्रा तरी आवरा ' अशा मनःस्थितीतून अशोक चव्हाण मुंबईत परत आले.
अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरावर विश्लेषण करताना सुजित नायर यांनी सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीच्या धामधुमीतली एक ऑडीओ क्लीप दाखविली आहे. त्या ऑडीओच्या सत्यते बाबत नायर जबाबदारी स्विकारीत नसले तरी त्यांनी अशोक चव्हाणांच्या पक्षांतराचे विश्लेषण करताना दाखविले आहे की अशोक चव्हाण यांनी पक्षांतर केले असे म्हणण्यापेक्षा काॅग्रेसने त्यांना हाकलून दिले आहे असे आपल्याला ही पटू लागते. ती ऑडीओ क्लीप थोडक्यात अशी आहे --
चंद्रपूर येथील लोकप्रिय नेते भालू दातुरकर यांनी शिवसेनेतून काॅग्रेस मध्यें प्रवेश केला होता. तेथील बहुतांश काॅग्रेस कार्यकर्त्यांना लोकसभेसाठी भालू दातुरकरांनी तिकीट मिळावे असे वाटत होते. पण काॅग्रेस श्रेष्ठींनी विनायक बांगडेंना तिकीट दिल्याचे जाहीर केले. लागलीच चंद्रपूर येथील एका जिल्हा स्तरावरील काॅग्रेस नेता फोन वरून बोलत आहेत--
' अहो अशोकराव, विनायक बांगणेंना तिकीट का दिले, ते निवडून येणार नाहीत .' त्यावर अशोक चव्हाणांनी उत्तर दिले, ' मी हायकमांडशी तुमची बाजू मांडली, पण इथे माझे कोणी ऐकून घेत नाहीत. सर्व निर्णय मुकूल वासनिक घेतात. मी काय करू, मीच अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत आहे हे आपल्या सर्व जिल्हा कार्यकर्त्यांना सांगा.'
मला ही आठवतंय की त्यावेळी अशोक चव्हाण काॅग्रेस काॅग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात जाणार अशी बातमी न्यूज चॅनेल्स वर व्हायरल झाली होती. अनेक जेष्ठ नेत्यांची पदोपदी मानहानी केलेली आहे व आज ही करीत आहेत. स्वतः राहूल गांधींना वारस हक्काने काॅग्रेसची इस्टेट मिळाली, काॅग्रेसचे सर्वेसर्वा पद मिळाले आहे. देशाचा इतिहास माहीत नाही, भूगोल माहीत नाही. धड बोलता येत नाही. असे काॅग्रेस श्रेष्ठींच्या घराण्यातले हे युवराज उठसूठ असे काही प्रताप करतात की त्यांना भाजपाचा स्टार प्रचारक म्हणून लोक हिणवू लागले आहेत. अलिकडे काही न्यूज चॅनेल्सनीं अशोक चव्हाण यांनी काॅग्रेस पक्षांचा राजीनामा दिल्याचे वृत्त सांगतांना यात आश्चर्य काय ते? असे म्हटलेले मी ऐकले आहे.
एकंदरीत महाराष्ट्रातील काॅग्रेसच्या तीन नेत्यांचे पक्षांतर हेच दर्शविते की काॅग्रेस मध्यें आता राम राहीला नाही अशी काॅग्रेस नेत्यांची भावना झाली आहे. विरोधी पक्ष व त्यांच्या समर्थक पत्रकार - संपादक व लिबरल अभ्यासकांनी भाजपावर किती ही आरोप केले तरी काॅग्रेस मधून भाजपात आयारामाची संख्या वाढतच जाणार आहे. ज्या काही राज्यात काॅग्रेस शक्तीशाली आहे तिथल्या काॅग्रेस मध्ये फूट ही पडणार आहे. इतकेच नव्हे तर दक्षिणेकडील प्रांतीय पक्षांना ही फूट व पक्षांतराची लागण पसरत जाणार आहे. या जगात सारं काही बदलत जात असते. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव आहे. जे उपजे ते नाश पावते वा रूप बदलते.
येणार्या लोकसभेच्या निवडणूकां, त्याचा प्रचार, विरोधी पक्षांची इंडी आघाडी, भाजपाने दक्षिण भारतात मारलेली मुसंडी, निवडणूकांच्या निकालाचे ओपिनीयन पोल पाहता देशातील राजकारणाचा प्रवाह कसा असेल, विविध राजकीय पक्षांचे स्वरूप कसे बदलत जाणार, लोकसभा व राज्यसभा निवडणूक आणि त्या संबंधित उमेदवारांची निवड करण्याची राजकीय पक्षांची दृष्टी व अपरीहर्ता इत्यादी विषयांवर लौकरच एक छोटी लेखमालिका ती ही लोकसभेच्या निवडणूकांची घोषणा होण्याअगोदरच मी पब्लीश करणार आहे. तो पर्यंत माझा आपल्याला रामराम !
जय श्रीराम !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा