गेल्या आक्टोबर महिन्यात ' शक्ती देवता ' या विषयावर ९ भागाची लेख मालिका पब्लिश केली. नोव्हेंबर महिना दिल्ली पालिकेच्या, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या धामाधुमीचा होता. तेथील निवडणूका संपल्या आणि निकाल ही लागले तरी ही मी त्यावर लेख लिहीले नाहीत. याचे आपल्याला आश्चर्य वाटले असेल. म्हणून प्रथम त्या संबंधीचा खुलासा करतो.
या खेपेस निवडणुक प्रचारसभा तसेच त्यावरील बातम्या आणि ओपिनियन पोल इत्यादी कार्यक्रम मी फारसे पाहिले आणि वाचले नाहीत. सन २०१७ पासून ब्लाॅगवर राजकीय क्षेत्रातील अनेक घटनांवर नियमितपणे लेख मी लिहिले आहेत. पण अलिकडे अधुन- मधून राजकीय लेख विशेषतः निवडणूका आणि निकाला संबंधीत लेख लिहीण्याची इच्छा होत नाही. याचे पहिले कारण आपल्या देशात दर वर्षी कुठल्या ना कुठल्या तरी प्रदेशात निवडणूका होत असतात. त्यामुळे निवडणुकांवरील खर्चाचा बोजा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो हे मनाला खटकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींजीनी या संबंधीत लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणूका एकत्रितपणे घ्याव्यात असा उपाय सुचविला होता. पण विरोधी पक्षांनी त्यावर प्रतिसाद दिला नाही.
दुसरे कारण असे आहे की सततच्या निवडणूका आणि प्रचारसभामुळे प्रिन्ट, इलेक्ट्रॉनीक्स आणि सोशल मिडीयात चालणार्या वादविवादात बहुतांश युवकांची मानसिक, शारिरीक आणि बौद्धिक शक्ती खर्ची पडते. भारत युवकांचा देश आहे हे बिरूद निव्वळ मिरविण्यापुरता राहण्याचा धोका निर्माण होऊ लागला आहे असे वाटते. युवाशक्तीचा उपयोग विधायक कार्यासाठी झाला तर भारत महाशक्ती बनु शकतो या बाबत दुमत नसावे. एक इंग्रजी वाक्य आठवले ते इथे मांडतो. ' The progress of the nation is far less depend upon the form of it's institution rather than character of it's own men.' (देशाचा विकास तिथे कुठल्या प्रकाराची राज्यप्रणाली आहे यापेक्षा तेथिल नागरिकांच्या चारित्र्यावर अधिक निर्भर असतो.)
तिसरे कारण असे आहे कि बहुतांशी विरोधी पक्षांच्या प्रचार सभेत प्रमुख मुद्दा ' मोदी हटाव ' हाच असतो. हा मुद्दा वापरून इतका गुळगुळीत झाला आहे की, विरोधी पक्षांना त्याचा फारसा फायदा होतो असे दिसत नाही. एखाद्या गोष्टीची सवय झाली की माणूस सवयीचा गुलाम बनतो मग ती व्यक्ती सामान्य असो वा असामान्य. सवय कधी छंदातून उत्पन्न होते तर कधी आपले मन एखाद्या विषय, व्यक्ती, वा कार्या बाबत द्वेशाने माखले जाते तेव्हा.
भाजपा हटाव ऐवजी मोदी हटाव हे लक्ष्य ठरविल्यामूळे देशात संसदीय प्रणाली आहे याचा विसर विरोधी पक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनां पडू लागला आहे की काय अशी शंका येते. कारण अशा लोकांच्या समवेत राजकीय घडामोडी वर चर्चा करण्यात अर्थ उरला नाही इतकं राजकारण हातघाईवर येऊ लागले आहे. यातून 'आम्ही म्हणतो तेच खरे ' या वृत्तीचे पीक वाढत असल्याचे दिसते.
निवडणूकीतला दुसरा मुद्दा विकास असतो. लोकसभापासून ते थेट ग्रामपंचायत स्तरावर तसेच विविध सहकारी बँका, कारखाने आणि मार्केटिंग सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीच्या निवडणूकीत ही हा मुद्दा असतो. सत्ताधारी पक्ष आपण केलेल्या विकास कामांची जंत्री मांडतो तर दुसर्या बाजूला विपक्ष सत्ताधारी पक्षाने किती चूका केल्या, त्याचा पाढा वाचतात. हे ही आपल्या सर्वांच्या अंगवळणी पडले आहे.
एका परिने २०१४ सालच्या लोकसभा निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीं ' सबका साथ सबका विकास ' अशी जी टॅग लाईन वापरली होती, ती आता सर्व पक्षांच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मुखीं आली. ही बाब आपल्या देशाची लोकशाही, राज्यव्यवस्था व प्रशासनाच्या भवितव्याच्या दृष्टीने उपकारक ठरू लागली असल्याचे दिसू लागले आहे. कारण मतदार जागरूक झाला आहे. जो पक्ष जनहीत आणि देशहीत जपेल आणि ज्या पक्षाकडे खंबीर नेतृत्व आहे व ते धोरणात्मक निर्णय घेण्यात तत्परता दाखविते, अशा पक्षाला मत देऊ लागला आहे. जे लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघातील जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक पणे कार्यरत आहेत, शिवाय आपल्या मतदार संघाच्या पलिकडे जाऊन विभिन्न क्षेत्रात समाजहीताची कामें करतात, अशांना मतदार हमखास निवडून देत आहेत. याची प्रचिती उत्तरोत्तर वाढताना दिसते आहे. अशी तीन उदाहरणं माझ्या मनात प्रत्यक्ष घर करून बसली आहेत. त्या महनीय व्यक्ती म्हणजे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळजी शेट्टी, दहिसरच्या आमदार मनिषाताई चौधरी व बोरीवलीचे आमदार सुनिलजी राणे हे आहेत. मी बोरीवलीत राहतो आणि बोरीवली- दहिसर परिसरात माझा काहींना काही कामा निमित्ताने प्रवास होत असतो. म्हणून स्वाभाविकतः वरील तिन्ही लोकप्रतिनिधींचे कार्य माझ्या नजरेत अधिक भरले आहे हे मी नाकारत नाही. पण या तिन्ही लोकप्रतिनिधींचं खास व समान वैशिष्ट्य म्हणजे आपत्कालीन घटनेत अर्ध्या तासाच्या आत सुमारे एक हजारहून अधिक कार्यकर्त्यांची फौज उभी करू शकतात. पक्षाचे कार्यकर्ते व नगरसेवक म्हणजे आपले कुटुंब आणि समाज म्हणजे आपला सगासोयरा ही भावना या तिन्ही नेत्यांच्या कार्यातून मी अनुभवतोय.
हा लेख सोमवार ११ डिसेंबर संध्याकाळी ५ च्या सुमारास लिहावयास बसलो होतो. त्यावेळी मी ज्या शाळेच्या सेक्रटरी पदाची जबाबदारी सांभाळतो आहे त्या आनंदराव पवार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ महाजन मॅडम यांचा फोन आला म्हणून लेख लिहिणे थांबविले. महाजन मॅडम यांनी फोनवरून मला सांगितले की, ''आमदार सुनिलजी राणेंनी शिंपोली बोरीवली (प) येथील Wikky International School च्या सभागृहात भारतिय लष्कराचे निवृत्त कमांडर शुरवीर मधुसूदन सुर्वे यांचा आज संध्याकाळी ७ वाजता सन्मान सोहळा आयोजित केला आहे, त्या सोहळ्यास अगत्याने उपस्थित रहावे असे फोनवरून आमंत्रण केले आहे.'' हा सोहळा घाईगर्दीत आखला गेला असल्याकारणाने आमंत्रण पत्रिका छापली नसल्याची पुष्टी महाजन मॅडम यांनी सोबत जोडली.
अथर्व फाउंडेशनच्या माध्यमातून देशाच्या सीमेवर प्राणपणाने आपले रक्षण करण्यार्या जवानांच्या व त्यांच्या कुटुंबियांना मुलखावेगळ्या मदतीचे कार्य आमदार सुनिलजी राणे करीत आहेत. हे सर्वश्रुत आहे. गेल्या सोमवारच्या त्या सोहळ्यात सत्कार मुर्ती निवृत्त शूरवीर कमांडर मधुसूदन सुर्वेंनी आपल्या पाऊण तासाभराच्या भाषणात कारगीलच्या लढाईत प्रत्यक्ष रंणागणावर घडलेला थरारक प्रंसग सभागृहात मांडला तेव्हा सारा सभागृह भारावून गेला. सभागृहातील उपस्थित महानुभव, निवृत्त लष्कर अधिकारी, आणि श्रोत्यांनी उभे राहून कमांडर मधुसूदन सुर्वेंना मानवंदना दिली.
या सोहळ्यास जे निवृत्त लष्कर अधिकारी उपस्थित होते, त्यांनी युद्धात दिव्यांग झालेल्या तसेच वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीच्या कार्याला वाहून घेतले आहे. ही बाब आम्हां श्रोत्यांच्या कानावर प्रथमच आली. निवृत्ती पर्यंत देशाच्या सुरक्षितेसाठी प्रत्यक्ष सीमेवर आयुष्य वेचले आणि निवृत्ती नंतर वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या आणि दिव्यांग जवानांच्या मदतीसाठी निवृत्त सेनादलाच्या अधिकार्यांच्या अंतःकरणातून निरंतर तेवत असलेल्या त्यागाच्या ज्योतींचं विलोभनीय दर्शन झाले तेव्हा श्रोत्यांनी उभे राहून ' इथे कर आमचे जुळले ' असे प्रात्यक्षिक सादर करीत पुन्हा मानवंदना दिली.
देशी- विदेशी मिडीयात विचारवंत व मानवतावादी असा चमकता बिल्ला लावून वंचित-शोषितांचं भलं करण्यासाठी, त्यांच्या न्याय-हक्काच्या लढाईसाठी आयुष्य वेचत आहोत असा आव आणत कुठे पर्यावरणाच्या नावाने विकास प्रकल्पात अडथळा तर कुठे औषधपाणी पुरूवित हिंदु समाजबांधवाचं धर्मांतर, कुठे विदेशी पैशाच्या बळावर देशात हिंसा व रक्तपात घडवित राज्य व केंद्र सरकारला आव्हान दिले जाते. अशी लिबरल लाॅबीतील मंडळी आपआपल्या एनजीओ द्वारें स्वतःच्या कुंटुंबाच्या २१ पिढ्यांच्या तुंबड्या पुरेल इतकी माया जमवित आहे. त्यांचे कौतूक करणार्या काही समाजबांधवांचे लक्ष जवानांच्या हितासाठी सुरू असलेल्या एनजीओंची माहिती मिळावी या हेतूने मी या लेखात वरील सोहळ्याचे संक्षिप्त वृत्त मांडले आहे. वरील सोहळ्याची यशोगाथा व एनजीओंची विस्तृत माहिती मिडीयातून तसेच विडीओद्वारें आपल्या पर्यंत आली असावी. माझी विनंती आहे की वरील सोहळ्याचे व जवानांसाठी कार्यरत असलेल्या एनजीओ संबंधीचा विडीओ आपण अवश्य पाहावा. मुद्दा हा की अध्यात्मिक बैठक आणि सामाजिक बांधिलकीचं भान जे लोकप्रतिनिधी अंतःकरणी जपतात त्यांना मतदार हमखास निवडून देतात. अशा नेत्यांना कुठलाही सोहळा आणि कार्यक्रम अगदी ऐनवेळेवर पार पाडण्याची जबाबदारी आली तरी त्यांचे कार्यकर्ते ती जबाबदारी इतकी चोखपणे पार पाडतात की जणू काही त्या कार्यक्रमाची तयारी एक महिन्यापासून सुरू होती.
आमदार सुनिलजी राणें शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असल्यामुळे नवीन राष्ट्रीय शिक्षण नीतीचं महत्व ते जाणतात. म्हणूनच त्यांनी गेल्या सोमवारी सोहळा झाला त्याच सभागृहात मागे बोरीवलीतील शिक्षण संस्थांतील पदाधिकार्यांना एकत्रित आणून बोरीवली एज्युकेशन फोरमची अनौपाचारिक स्थापना केली आहे. मी त्या कार्यक्रमात उपस्थित होतो. लौकरच या फोरम द्वारे शिक्षण संस्था, शिक्षक, विद्यार्थी, व पालक यांना नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती संबंधीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने, तरीही अगदी सोप्या भाषेत, छोट्या कथा, उदाहरणे व प्रात्यक्षिंकांच्या आधारे आकलन होईल अशी स्थायी व्यवस्था दहिसर- बोरीवली परिसरात उभी राहील अशी आशा आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती वर दोन लेख मी पब्लिश केले आहेत. या राष्ट्रीय शिक्षण नीती चे स्वरूप काळानुरुप आहे. जगभरात वाढत असलेली बेकारी पाहता कारकून निर्माण करणारी शिक्षण व्यवस्थेचं अस्तित्व आता संपत आले आहे. नव्या युगात शिक्षणाचे स्वरूप कसे असेल या संबंधी माझ्या वाचनात आलेली मौल्यवान शिक्षणाची व्याख्या (ज्यावर मी सन २०१७ ला एक स्वतंत्र लेख लिहीला आहे) आपल्या समोर मांडून या लेखाच्या अंतीम चरणाकडे आपण जाऊ या.
'' The best valuable of all the education is to make yourself to do a job which you have to do and it ought to be done by you whether you like it or not."
मोदी हटाव हा मुद्दा विरोधी पक्ष किती वर्षे वापरणात आहेत या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या राजकीय सल्लागारांपाशी नाही. याचे कारण मोदींना टक्कर देऊ शकेल असा नेता राष्ट्रीय स्तरावर त्यांना ही दिसत नाही. त्यामुळे मोदी हटाव असे म्हटले की त्यासोबत हिंदुत्व, संघवादी, नथुराम गोडसेवादी, सावरकरवादी, प्रतिगामी, मनुवादी, ब्राह्मणी वर्चस्ववादी, संविधानात्मक संस्थांचे खच्चीकरण करणारे आणि अल्पसंख्याकाचे वैरी इत्यादी आरोपांची शस्त्रें विरोधी पक्षांच्या पोतडीतून सवयीनुसार बाहेर पडतात. ही शस्त्रे कुचकामी झाली आहेत, हे त्यांना ही ठाऊक आहे. पण करणार तरी काय?
विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. त्यांना केंद्र सरकार विरूद्ध ना संसदेत लढता येते, ना रस्त्यावर लढता येते. म्हणून त्यांचे समर्थक मिडीया आणि राजकीय अभ्यासक मंडळी कुठल्या तरी एखाद्या राज्यातील किंवा महापालिकेच्या निवडणूकीत भाजपा चा पराभव झाला की ' कधी राहूल गांधी तर कधी नितिशकुमार, कधी ममता बॅनर्जी तर कधी केजरीवाल, कधी प्रियंका गांधी-वड्रा, अखिलेश यादव किंवा के सी राव अशा नेत्यांपैकी एकाला मोदींशी टक्कर देण्याची ईश्वरी शक्ती प्राप्त झाल्याची हवा वेळोवेळी निर्माण करीत असते.' या मंडळींना इंदिरा गांधीत दुर्गामाता दिसली, तर प्रियंका वड्रा मध्ये इंदिरा गांधी दिसत आहे. गंमतीचा भाग असा की ही मंडळी ईश्वराचं अस्तित्वच मानत नाहीत. शरद पवार ईश्वराचं अस्तित्व मानत नाहीत. तरीही शरद पवार पंतप्रधान होतील अशी हवा ही लिबरल मंडळी निर्माण का करीत नाहीत हा प्रश्न मला नेहमी पडतो. ' मोदी हटाव ' म्हणणारी मंडळी महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात आहे. अशा मंडळीच्या निदान समाधानासाठी शरद पवारांची हवा निर्माण करावयास हवी असे एक मराठी माणूस म्हणून मला पदोपदी वाटू लागले आहे.
जो पर्यंत ही सारी राजकीय अभ्यासक आणि संपादक मंडळी भाजपाच्या संघटन शक्तीचा, भाजपाच्या विचारसरणीचा व त्याचा वाढता प्रभाव आणि देशातील मतदारांत होत असलेला बदल यावर निपक्षपातीने चिंतन करीत नाहीत आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनां खडे बोल सुनावित नाहीत, तोवर केंद्रातील मोदी सरकारला पर्याय निर्माण होणार नाही. हे मी वेळोवेळी मांडत आलो आहे. म्हणूनच मी नुकताच पार पडलेल्या निवडणुकांच्या प्रचार दरम्यान लेख लिहीण्याची तसदी घेतली नाही. पण शेवटी निवडणूका व त्यांच्या निकालाच्या अनुषंगाने इतर सामाजिक औद्योगिक, कला-क्रिडा, शेती, शिक्षण , आरोग्य , विकास, देशातील सुरक्षा व्यवस्था इत्यादी विषयासंबंधीत आपल्याशी थोडाफार संवाद होतो , म्हणून हा लेख लिहिला आहे. लवकरच दिल्ली एमसीडी, हिमाचल प्रदेश व गुजरात विधानसभेच्या निवडणूक निकालांवर स्वतंत्र विश्लेषण असेल असे लेख पब्लिश करणार आहे, तो पर्यंत आपला रामराम घेतो. धन्यवाद !
विष्णुजी, 🙏
उत्तर द्याहटवाबर्याच
दिवसांनी विचार मंथनला खाद्य दिल्याबद्दल धन्यवाद.
लेख नेहेमीप्रमाणे वाचनीय आहे. आपला
प्रमुख मुद्दा वारंवार होणार्या निवडणुकांमुळे त्यांतल गांभिर्य कमी होतय. त्यावर उपाय म्हणजे, मोदीजींच्या एक देश- एक निवडणुक घोषणेप्रमाणे लवकरच कालबध्द, शिस्तबध्द निवडणुका घेणे.
दुसरा मुद्दा, घसरलेली प्रचार पातळी. त्यावर सर्वपक्षीय निवडणुक आयोगासह कठोर संहिता/ निर्बंध निश्चित करावेत.
गंभीर विषयावर सुरेख विवेचन.
धन्यवाद व🙏
धन्यवाद !
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
उत्तर द्याहटवा