बुधवार, १७ एप्रिल, २०२४

लोकसभा निवडणूका २०२४ इस बार चारसो पार बनाम हटाव मोदी सरकार (भाग-१ भाग-२)



१८ व्या लोकसभेच्या निवडणूक प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांचे क्षेपणास्त्र फेकत आहेत. अनेक आश्वासनांचे फूगे आकाशात उडत आहेत. तसे पाहता या निवडणूकाच्या प्रचाराचं स्वरूप मागील दोन लोकसभाच्या निवडणूकांच्या प्रचाराच्या स्वरूपा सारखंच आहे. असे असले तरी सन २०१४ पासून दहा वर्षे भाजपा आणि विरोधी पक्षांमधील वाद हा जितका सत्तेसाठी आहे तितकाचं तो दोन राजकीय विचारसरणीतला आहे हे ही स्पष्ट दिसत आहे. दोन राजकीय विचारसरणी म्हणजे एका बाजूला राष्ट्रवाद म्हणजेच हिंदुत्व, संघ, भाजपा व मोदी सरकार तर दुसर्या बाजूला काॅग्रेस म्हणजेच समाजवाद, साम्यवाद व सर्वधर्म समभाव. 

एनडीए आणि इंडी आघाडी चे नेते परस्परांवर जी काही चिखलफेक करीत आहेत, त्यावर चर्चा करण्यापेक्षा ज्याला आपण देशातले राजकारण मानतो, त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करीत आपल्याशी संवाद करावा असे मला वाटले, म्हणून या लेख मालिकेचा प्रपंच.

विद्यमान भारतातील राकारणाचं मूळ शोधावयाचं म्हटले तर निदान अर्वाचीन भारताचा इतिहास विशेषतः ब्रिटीश राजवटीचा अंमल सुरू झाला तिथपर्यंत आपल्याला मागे जावे लागेल हे ओघाने आलेच. मला इतिहास विषय आवडतो पण मी इतिहास विषयाचा तज्ञ नाही. म्हणून  इतिहास व पुरातत्व या विषयाचे अभ्यासक व संशोधक, आणि धर्मशास्त्र इत्यादी विषयावरील पुस्तकांचा आधार घेऊन, ही लेखमालिका आकारास आली आहे हे मी  प्रांजळपणे कबूल करतो.

भारत हा जगाच्या पाठीवरील बहुधा एकमेव देश असेल ज्याच्या वैभवशाली इतिहासातील घटनांची नेहमीच मोड-तोड करून मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून सादर करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या विदेशी  शक्तींनी वेगवेगळ्या कारणास्तव हे केले असले तरी त्यांचे स्वार्थ एकमेकांचे जुळत असल्यामुळे गेली ३०० वर्षे हून अधिक काळ ही दिशाभूल अविरतपणे सुरू आहे.  

संपुर्ण असत्य आणि काल्पनिक गोष्टी कुठलाही पुरावा नसताना इतिहास म्हणून प्रस्थापित करण्यात आल्या आहेत. तसेच शेकडो पुरावे असलेल्या घटना घडल्याच नाहीत म्हणून बेदरकारपणें नाकारण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर या खोटेपणा विरूद्ध आवाज उठविणार्यांना आणि खरा इतिहास सांगू पाहणार्याला प्रतिगामी, धर्मांध ठरवून वैचारिक परिघा बाहेर ढकलून देण्यात आले आहे आणि त्याचं प्रतिपादन जगासमोर येणारच नाही अशा रितीने दडपून टाकण्यात आल्या आहेत." 

या सार्या विकृतीच पण आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्याऐवजी देशी मेकाॅलें पुत्र, साम्यवादी व काही भाजपेतर पक्ष त्या विकृतीचे उदात्तीकरण करण्यात धन्यता मानू लागले. त्याचा फायदा त्यांना मिळत राहिला. पण सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकांनंतर विरोधी पक्षांच्या राजकीय दुकानातला फायदा कमी होत आहे. म्हणून संविधान धोक्यात, अघोषित आणिबाणी इत्यादी आरोप विरोधी पक्ष करीत आहेत. त्यातून त्यांच्या हाती फारसे काही लागणार नाही. 

यंदाच्या लोकसभेच्या  निवडणूकीचा मुख्य मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा असा असला तरी सन २०१४ पासून प्रखर राष्ट्रवाद व आत्मनिर्भर भारत या कल्पना प्रत्यक्ष अनुभवास येत आहेत हे बहुतांश मतदार आपल्या मतदानातून व्यक्त करीत आहेत.

गेल्या काही वर्षात काही विद्वान, इतिहास तज्ञ, पुरातत्व अभ्यासक- संशोधक, अध्यात्मिक गुरू,  संघ परिवार सारख्या स्वयंसेवी संस्था इत्यादीनीं वैचारिक दडपशाही विरूद्ध हार न मानता भारताचा खरा इतिहास सप्रमाण जगासमोर आणणारं मौलिक कार्य  केले आहे. त्यापैकी एक विद्वान ज्यांचे नाव आहे अभिजित जोग ! त्यांनी लिहलेला  'असत्यमेव जयते ' हा ग्रंथ देशातील तथाकथीत पुरोगामी विचारवंत, सर्वधर्मसमभावी,  साम्यवादी, व समाजवादी इत्यादींनी खचाखच भरलेल्या जागतिक लिबरल लाॅबीच्या वैचारिक आक्रमणाचा सामना करण्यासाठी जितके उपयुक्त आहे तितकेच ते ब्रिटीश राजवटीतून आपल्या समाजाला जडलेल्या मानसिक गुलामीतून बाहेर काढण्यासाठी उपयोगी पडणारं आहे.

देशाच्या आजवरच्या इतिहासा बद्दल करण्यात आलेली दिशाभूल देशासाठी फारच हानिकारक ठरली आहे. कित्येक पिढ्या न्युनगंड आणि पराभूत मनोवृत्तीच्या बळी ठरल्या आहेत. वैदिक काळापासून ते स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर झालेली दिशाभूल अवाढव्य आहे. त्याचे निराकरण करून देशाचा खरा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सांघिक प्रयत्न करण्याची निरंतर गरज आहे. कारण -- 

शेवटची दिशाभूल दूर होईपर्यंत, नव्या दिशाभूलींची भर होत राहणार आहे. कारण जगातील एकेश्वरी पंथाचे म्हणजेच इस्लामी व ख्रिस्ती लोक जिथे राहतात तिथे साम्यवाद्यांचे सरकार असो वा राजेशाहीचे, लष्करशाहीचे असो वा हुकूमशाहीचे असो, किंवा अमेरिका- युरोप येथील लोकशाही सरकार असोत, हिंदू समाजाची मानहानी करण्याची संधी सोडत नाहीत.                                                                    क्रमशः--    (सोबत भाग--२ जोडला आहे.)         ------------------------------------------

भाग-२

श्री अभिजित जोग यांच्या असत्यमेव जयते या ग्रंथाची थोडीफार ओळख मी अलिकडील एका लेखात संक्षिप्त रित्या केली आहे. त्यांनी या ग्रंथात आर्यन इन्व्हेजन थेअरीचा फोलपणा पुर्णपणे पुराव्यासकट उघड केला आहे. त्यातील आर्यन इन्व्हेजन थेअरी थोडक्यात अशी आहे -- 

" आर्य लोक रशियाच्या दक्षिणेकडील प्रदेशातून भारतात आले; नंतर सिंधू नदीच्या काठी राहात असलेल्या अडाणी अशिक्षीत आदिवासीयांचा पराभव केला व त्यांना भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात पिटाळून लावले; अशा पिटाळून लावलेल्यांची संस्कृती द्रविडीयन आहे; भारत हा कधीही देश नव्हता; प्राचीन काळात पश्चिमी देशातून (म्हणजेच रशियाच्या दक्षिणेकडून) आलेल्या गोर्या आर्यांनीच तुम्हाला भाषा आणि संस्कृती दिली; आणि आज ही तुम्हांला सभ्यता आणि संस्कृती शिकविण्याचं काम ब्रिटीशानांच करावे लागत आहे;  तुमचा हिंदू धर्म जुनाट, मागासलेला व नैतिक अधःपतनामुळे रसातळाला गेलेला आहे. या सारख्या गोष्टी इतिहास म्हणून लादल्या गेल्या."

" भारताचा इतिहास  हडप्पा संस्कृती, आर्याचे आक्रमण, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, मुघल साम्राज्य, अकबर बादशाह, इंग्रज, गांधी-नेहरू ' यांच्या पुरताच सिमीत ठेवला गेल्यामुळे हिंदू संस्कृतीची दैदीप्यमान परंपरा पूर्णपणे नाकारली गेली. आपल्या संस्कृतीने गणित, विज्ञान, साहित्य, संगीत, कला, भाषाशास्त्र, स्थापत्य शास्त्र यात गाठलेली शिखरं भाकड कथा म्हणून नाकारली गेली. इंग्रजी शिक्षण पद्धतीतून देशी इंग्रज बनलेल्या आपल्या लोकांनी हा समज जोपासणं हीच आधुनिकता असं मानलं."

ब्रिटीश राजवटीत आपल्या समाजला जे जे काही इंग्रजी दिसले ते ते सारे चांगले असे वाटू लागले. त्यातून इंग्रजी राजवटीला विरोध करण्याची आपली मानसिक शक्ती कमी होत गेली. अशी स्थिती निर्माण करण्यात कारणीभूत असलेला खलनायक ब्रिटीश विचारवंत थाॅमस मेकाॅले आणि त्यांच्या सोबत असलेले जर्मन विचारवंत मॅक्सम्युलर हे ही खलनायक होत. 

भारतात शिक्षण पद्धत कशी ठेवावी या विषयी  ब्रिटीश राज्यकर्त्यामध्ये झालेल्या चर्चेत दि.२ फेब्रुवारी १८३५ रोजी थाॅमस मेकाॅले याने खालील शब्दात आपली योजना मांडली होती.

" We must at present do our best to form a class who may be interpreters between us and millions whom we govern." मेकाॅलेच्या या सूचनाचा आशय हाच की  ' भारतियांना स्वधर्म, स्वसंस्कृती संबंधी न्यूनगंड उभा केला की आपण दिर्घकाळ भारतावर राज्य करू शकतो.'

" ब्रिटीश राजवटीने मेकाॅले योजनेप्रमाणे प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या सनातन संस्कृतीचे नामोनिशाण उध्वस्त केले, गुरूकूले व विद्यापीठ बंद केले. उपयुक्त ग्रंथ जाळले. इंग्रजी शिक्षण पद्धत सुरू केली. भारताचा संपूर्ण इतिहास बदलून नवीन अभ्यासक्रम शाळा-काॅलेजात अशा पद्धतीने शिकविला की आपले विद्यार्थी, युवक, नोकर ,कामगार, पोलीस इत्यादी महत्वाच्या घटकांमध्ये प्रचंड न्यूनगंड निर्माण केला. या शिवाय आर्य विरूद्ध द्रविड, उत्तर भारत विरूद्ध दक्षिण भारत, संस्कृत विरूद्ध तामिळ असे वाद ही निर्माण केले." 

ते वाद अधून मधून आपल्या सोयीनुसार विरोधी पक्ष आज ही उफाळून वर आणतात. त्याचा अनुभव आपण अलिकडे तामिळनाडूचे युवराज उदयनिधी स्टॅलीन यांच्या मुखांतून सनातन धर्मासंबंधीतली जहरी टिका ऐकली  आहे. काश्मीर पासून ते कन्याकुमारी, गुजरात पासून ते थेट ईशान्याच्या टोकापर्यंत एकजिनसी समाज निर्माण करीत ' समर्थ भारत विकसित भारत ' हे ध्येय मोदी सरकार समोर असावे. म्हणूनच पंतप्रधान मोदी 'अबके बार चारसौ पार ' ' बडे बदल और बडे निर्णय के लिए तैयार रहो ' अशी साद मतदारांना घालत असावेत.

" मेकाॅलेच्या या योजनेप्रमाणे निर्माण झालेल्या या मेकाॅलेपुत्रांमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा प्रामुख्याने समावेश होता. ते आचार, विचार व शिक्षणाने पूर्णतः मेकाॅलेच्या स्वप्नातले ' देशी इंग्रज ' होते. त्यांच्याभोवती जमलेला राज्यकर्ता वर्ग याच पठडीतला इंग्रजीतून विचार करणारा, भारतीय संस्कृती आणि विशेषतः हिंदू परंपरांबद्दल उपाहासाची व तुच्छतेची भावना बाळगणराच होता. "

' मी शिक्षणाने इंग्रज, संस्कृतीने मुस्लीम, आणि अपघाताने हिंदू आहे.' असे पंडीत जवाहरलाल नेहरू म्हणाल्याचे माझ्या वाचनात आले आहे.  हे सत्य आहे की नाही या संबंधी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. पण नेहरूवंर इंग्रजांचा मोठा प्रभाव होता हे नाकारता येत नाही. 

                                       क्रमशः-----------------------------------------------


                                    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...