राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसची सुत्रें फक्त गांधी-नेहरू घराण्यापाशींच राहणार असे दिसू लागल्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांना सन १९६६ पासून घुसमटल्या सारखे वाटू लागले होते. शेवटी १९६९ साली काॅग्रेसमध्ये उभी फूट पडली. पण १९७१ सालच्या लोकसभा निवडणूकात फूटीर गटाचा पराभव झाला. नंतर इंदिरा गांधीची काॅग्रेस हीच राष्ट्रीय काॅग्रेस मानली गेली. १९७४ पासून इंदिरा गांधीच्या सरकार विरोधात देशभर विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू झाली. ६९ साली काॅग्रेसचा फूटलेला गट जनता पार्टीत विलीन झाला. १९७७ झाली स्थापन झालेल्या जनता पार्टी व १९८९ चा जनता दल या दोन पक्षांमधील अधिकांश काॅग्रेस व समाजवादी पक्षांच्या प्रान्तीय नेत्यांनीं आपआपले प्रान्तीय पक्ष स्थापन केले. या सर्व प्रान्तीय पक्षांचे मूळ काँग्रेस असल्यामूळे या सर्व प्रान्तीय पक्षांच्या संस्थापकांची घराणेशाही निर्माण झालेली दिसते. पण नव्याने स्थापन झालेल्या भाजपातील घराणेशाही फक्त निवडणूकीचे तिकीट देण्यापुरता आहे. कुठल्याही एका घराण्याच्या ताब्यात पक्ष कधी जाणार नाही. इथे पक्ष परिवार असतो. परिवाराचा पक्ष नसतो.
देशात दुर्दैवाने राजकीय पक्ष म्हणजे एका घराण्याची खाजगी मालमत्ता ठरू लागल्याने पक्षाच्या विचारसरणीपेक्षा मालमत्तेतील आपला वाटा/ हिस्सा व गॅल्मर म्हणजे मुख्यमंत्री पदाची झिंग हीच मूळ कारणे आहेत ज्यामूळे प्रान्तीय पक्ष विकंलाग होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात पवार, ठाकरे यांचे पक्ष खर्या अर्थाने प्रान्तीय पक्ष पण स्वरूप घराणेशाहीचेच. दोन्ही पक्षात अंतर्गत कलह वाढले आणि शेवटी उभी फूट पडली. आज हे दोन पक्ष जात्यात गेले तर इतर पक्ष म्हणजे विशेषतः तृणमूल काँग्रेस डीएमके, तृणमूल काँग्रेस, अकाली दल, वायएसआर, केसीआर, आरजेडी व सपा फूटीच्या वेंटीग लिस्टवर आहेत. एडीएमकेला जयललीतांच्या निधनानंतर आता प्रभावी नेता उरला नाही. म्हणून त्या पक्षातील नेते भाजपाच्या वळचणीला लागलेले दिसतील.
महाराष्ट्रातील शिवसेनेचे तीन पक्ष झाले. याहून अधिक फूट होणार नाही. तसेच वर नमूद केलेल्या सार्या प्रान्तीय पक्षात फूट पडणार असे आपण म्हणत असलो तरी एकेक पक्षाचे तुकडे तरी किती पडणार ? तिथे ही सीमा आहेच. या सर्व प्रान्तीय पक्षाच्या प्रमुखाच्या कुटुंबातील चौथी पिढी राजकारण खेळण्याइतकी सक्षम राहणार नाही. ७००-८०० वर्षापूर्वीची राजेशाही नष्ट पावल्या. तशीच गत आपल्या येथील घराणेशाही पक्ष नष्ट होणार ही काळ्या दगडावर काळाने लिहिलेली पांढरी रेष आहे.
राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला चांगला नेता मिळत नाही हीच मोठी विद्यमान समस्या आहे. नेहरू-गांधी परिवाराचं वलय वाळून गेले आहे. राहूल गांधी यांच्या शिवाय पर्याय नाही असे म्हणत राहूल यांच्या यात्रेचा जो शो मांडला आहे तो इंडीच्या घटक पक्षांना फारसा आवडलेला दिसत नाही. राहूल गांधीच्या पदयात्रेतून ते भारताचे पंतप्रधान पद भूषवू शकतील असे मूळी जनतेलाच वाटत नाही. तो पर्यंत काँग्रेस पक्षांच्या झोळीत वाढीव मते पडणार नाहीत.
याचा अर्थ असा आहे की आज आपण ज्याला भारतीय काँग्रेस पक्ष म्हणून समजतो त्याची उत्तर प्रदेश मध्ये जी स्थिती झाली आहे तशीच स्थिती उत्तरेतील राजस्थान, मध्यप्रदेश, आणि दक्षिणेतील कर्नाटक, आन्ध्र, व तेलंगणा मध्ये हळूहळू होताना दिसेल. हे भाकीत काँग्रेस समर्थकांना पटणारें नाही. कारण त्यांची भक्ती काँग्रेस पक्षावर नसून काँग्रेस पक्षांच्या श्रेष्ठीरूपी गांधी घराण्यावर आहे. हे स्वाभाविक आहे कारण त्या घराण्यातून तिघांनी पंतप्रधानपद भूषविले आहे हे काँग्रेस समर्थकांना भूषण वाटते. पण देशात घराणेशाही पक्षां- संबंधीत जी आस्था दिसते, तीला नवा युवा मतदार अंधश्रद्धा मानत आहे. त्यावर घराणेशाही पक्ष विचारमंथन कधी करणार?
आज काँग्रेसची स्थिती विकलांग का झाली आहे याचे एक आणखिन कारण आहे. ते म्हणजे काँग्रेसचे सतत समर्थन करणारे विचारवंत काँग्रेसला मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेताना दिसले नाहीत. त्यांनी फक्त मिडीयात चमकत राहून फक्त चमचेगिरी केली आणि राज्यसभेत खासदारकी उपभोगली. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर उभी फूट पडण्याइतकी काँग्रेसकडे शक्तीच राहिली नाही. वय वाढले की जसे शरीर हळू हळू गलितगात्र होत जाते आणि माणसाला नैसर्गिक मृत्यू येतो, तसाच काँग्रेसचा अंत होईल असे दिसते. असे व्हावयास नको आहे पण आपण तरी काय करणार हो?
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षांची स्थिती कुठल्यातरी राष्ट्रीय महामार्गावर एखादा ड्रायवर स्वतःहाच्या बेफिकीरपणा मुळे, वा मद्यपान केल्यामुळे, वा इतर गांड्यांना मागे ठेवण्याच्य्या जबरदस्त खुमखुमीतून ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडीचा स्पीड वाढवीत जातो आणि शेवटी ब्रेकवर नियंत्रण न राहिल्याने गाडी उलटून भीषण अपघातात ड्रायवरचे शरीर विकलांग होते ' तशी झाली आहे.'
दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात भाजपाने इतकी जोरदार मुसंडी मारली आहे की डीएमकेचे सर्वेसर्वा स्टॅलीन यांना घाम आलेला दिसतो आहे. सनातन धर्मावर नको तितकी जहरी भाषा त्यांचे पूत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी केल्यामूळे तामिळनाडूत पंतप्रधान मोदींच्या रोड शो मध्ये तुफान गर्दी झालेली आपण पाहिली. या अगोदर अन्नामलईने आपल्या पदयात्रेने व सहज, सरल भाषेत आणि सुंदर शैलीत तामिळी असल्याचा अभिमान व्यक्त करीत हिंदू जीवन पद्धत हाच तामिळनाडूच्या विकासाचा राजमार्ग आहे हे संन्यस्त वृत्तीने पटवून दिले. हे कार्य निश्चीतच एकविसाव्या शतकातील भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले जाईल आहे.
या खेपेस लालू यादवांनी ' मोदींना परिवार आहे कुठे ? ' असे वादग्रस्त विधान करून भाजपावर उदयनिधी स्टॅलीनच्या पाठोपाठ दुसरा पूलटाॅस टाकला आहे. त्यावर भाजपाच्या प्रत्येक नेत्याने षटकार ठोकला आहे. उदयनिधी स्टॅलिनच्या पूलटाॅसवर देशभरातून मतदार जय श्रीराम म्हणत षटकार ठोकत आहेत. अनेकदा राहूल गांधींच्या अतार्कीक विधानाने भाजपाचा फायदा होत आला. आज ही होत आहे. याही निवडणूकात शक्ती देवता वर काही तरी बोलले आणि शेवटी गेला याॅर्कर टाकायला आणि पडला पूलटाॅस असे झाले. या खेपेस लालू यादव आणि उदयनिधी स्टॅलीन च्या विधानांमूळे भाजपाच्या फायद्यात भर होईल असे दिसते. उदयनिधी स्टॅलीन याने सनातन धर्मावर टिका केल्यानंतर मला एक प्रश्न पडला आहे. तो म्हणजे जे पक्ष भाजपाचा टोकाचा द्वेष करीत आहेत अशा घराणेशाही पक्षांचे वारस स्वपक्षासाठी ओझे (Liabality) का बनते? यावर राजकारणात तरी काही उपाय नाही. असलाच तर तो फक्त मानसशास्त्रज्ञाकडेच.
या संपुर्ण लेखमालिकेत काही भागाचा विस्तार वाढला आहे. हे मी प्रांजळपणें कबूल करतो. तसेच लेखांत भाजपा सोडून इतर पक्षांत कलह, फूट, पक्षांतर व गटबाजी इत्यादी समस्यांची लागण कमी अधिक प्रमाणात झालेली मी मांडली आहे. भाजपात कुरबुरी नाहीच असे मी मानत नाही. पण सद्यस्थितीत भाजपात फूट पडण्याची लक्षणें मला तरी दिसत नाहीत.
मी भाजपाचा समर्थक आहे हे मी मान्य केलेलं आहेच. पण काही मिडीया हाॅऊसेस तसेच प्रिन्ट मिडीयात इतर पक्षांतल्या कुरबुरीचे व फूटीचे खापर भाजपावर फोडले जाते त्यावर मला उत्तरें द्यावयास वाटली. ती मी इथे व्यक्त केली आहेत. ती आपल्यापैकी काहींना उचीत वाटतील तर काहीना अनुचीत वाटतील. त्यातच लोकशाही राज्यप्रणालीची सुंदरता आहे. शेवटी आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला सामान्य मतदार म्हणून आपले विचार मांडता येतात यातूनच आपली लोकशाही शाबूत आहे आणि मजबूतही आहे हे सिद्ध होते. मग विरोधी पक्ष कितीही टिका करो त्याचा फायदा त्यांना मिळेल असे मला वाटत नाही. उलट भाजपाच्या फायद्यात वाढ होण्याची शक्यता दिसते.
वन्दे मातरम् |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा