तपास यंत्रणा कामाला लागली आहे. मोर्च्यातील कामगारांची अटक, गुणवंत सदावर्ते यांची अटक आणि चौकशीचा सिलसिला सुरू झाला आहे. आता तर या चौकशीवर ही चर्चा सुरू झालेली दिसते. अशी घटना महाराष्ट्र राज्यात प्रथमच घडली आहे. त्यातून या घटनेवर मला ही व्यक्त व्हावेसे वाटले. म्हणून हा लेख प्रपंच.
जशी महाराष्ट्रातील ही पहिली घटना, तशी महाराष्ट्रात तीन मुख्य पक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर आहे ही सुद्धा पहिलीच घटना आहे. पुर्वी शरद पवारांनी महाराष्ट्रात जनता पक्षाच्या साह्याने पुरोगामी लोक दल असे सरकार अस्तित्वात आणले होते. ते सरकार महाराष्ट्रातील काॅग्रेस सरकाराला उलथावून अस्तित्वात आले होते. त्यावेळी जनता पक्षात हिंदुत्ववादी (सध्याच्या भाजपाची) मंडळी होती. मविआ सरकारचे शिल्पकार ही शरद पवारच आहेत. या सरकारात ही एक हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना आहे. पण सोबत काॅग्रेस पक्ष आहे. पुलोद सरकार स्थापन करताना जनमताचा आदर न करता शरद पवार काॅग्रेस मधून बाहेर पडले. पण शरद पवारासोबत काॅग्रेस मधून बाहेर पडणार्या आमदारांची संख्या कमी होती. ते सरकार शरद पवारांनी बंड करून स्थापन केले असेच म्हटले गेले होते. मविआ सरकारात संपुर्ण शिवसेना पक्षच दाखल झाला. म्हणून खरे तर शिवसेनेने जनादेश धाब्यावर बसविला असे मानणे जाणे आवश्यक होते. परंतु तसे मिडीयात मानले गेले नाही. याचे कारण मिडीयाला असलेली भाजपाची ॲलर्जी हे आहेच पण सोबत तीच मिडीया मविआ समर्थक झाली आहे हे ही कारण आहे. पुलोद सरकारचा प्रयोग केला, तेव्हा शरद पवार तरूण होते. त्यावेळी मुख्यमंत्रीपदावर सहकारी क्षेत्रातले लोकप्रिय नेते स्वर्गीय वसंतदादा पाटील होते. म्हणून त्या वेळी शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे मिडीयाने वर्णन केलेले आज ही स्मरणात आहे. पण तसे मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर पवार आणि उद्धव ठाकरेनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला असे वर्णन मिडीयाने का केलं नाही, हा एक तसा लोकशाही मुल्यांशी सुसंगत असलेला प्रश्न. पण मिडीयाला असा विचारण्यात अर्थच राहिला नाही. मराठी मिडीया मग ती प्रिन्ट असो वा इलेक्ट्राॅनिक्स, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यां वर इतकी मेहरबान का झाली आहे याच्या उत्तरात ' अर्थ ' दडला आहे. म्हणजेच
' अर्थस्य पुरूषो दासः | '
वर्तमान मविआ सरकाराचे एक वैशिष्ट्य हे आहे की त्यात काॅग्रेस पक्ष ही सामील झालेला आहे. काॅग्रेस पक्ष सन २०१४ पासून कमकुवत झालेला आहे. देशभर काॅग्रेसची जागा भाजपा घेत आहे. त्यामूळे काॅग्रेसचे समर्थक मिडीया आणि कार्यकर्ते, सेना आणि राष्ट्रवादी सोबत भाजपावर सतत टिका करीत असतात. श्री अमित शहा आणि उद्धव ठाकरें मध्यें एका बंद खोलीत काय चर्चा झाली होती असा पुरावा नसताना ही महाराष्ट्रातील काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते मंडळीनी शिवसेनेची बाजू घेतली. सध्याचा मविआ सरकारचा कारभार पाहता मला आता वाटते की सन २०१९ च्या निवडणूकीच्या प्रचाराच्या अगोदरच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा गुप्त करार झाला असावा. परंतु माझ्याकडे तसा पुरावा नाही. पुरावा नसला म्हणून काय झाले, आपल्याला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. पण म्हणून आपण पलटी मारणे योग्य आहे का असा प्रश्न राजकारणावर चर्चा करणार्यानी म्हणजेच प्रिन्ट, इलेक्ट्राॅनिक्स आणि सोशल मिडीयावर आपल्या सारख्यांनी स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे. इतकी महाराष्ट्रातील राजकीय स्थिती खालावलेली आहे. शिवसेनेने दगा दिला म्हणून भाजपा शिवसेनेवर हल्ला करत आहे हे स्वाभाविक आहे. त्याला ही मर्यादा हवी आहे असे मला मनापासून वाटते. पण शिवसेनेच्या जागी भाजपा असता तर शिवसेनेने किती धुमाकूळ घातला असता यासंबंधीत प्रिन्ट, इलेट्राॅनिक्स आणि सोशल मिडीयात चर्चा होताना दिसत नाही. राजकारणात फार शुचिता पाळल्यामूळे भाजपाला गाव पातळी पासून ते दिल्लीपर्यंत अत्यंत खालच्या पातळीवर अनेक वर्षे टिका सहन करावी लागलेली आहे. या इतिहासातून धडा घेत भाजपाने आपल्या कार्यशैलीत बदल केलेला दिसतो. मुद्दा हा आहे की पुलोद सरकार आणि मविआ सरकाराच्या जन्मात म्हणजे स्वरूपात जो विलक्षण फरक दिसतो आहे तो सर्व राजकीय अभ्यासकांनी न्याहाळून पाहावा आणि नंतरच आज घडत असलेल्या राजकीय घटनेवर आपआपली प्रतिक्रीया द्यावी असे मला वाटते. पुलोदच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना किती यातना झाल्या होत्या हे आमच्या वाचनात आल्या आहेत. पण सध्याच्या भाजपाच्या नेते मंडळींचा आणि कार्यकर्त्यांच्या यातनांचा विचार कुठल्याही मुख्य मिडीयातून दिसत नाही. त्यामूळेच विद्यमान मविआ सरकारच्या काळात अनेक घटना महाराष्ट्रात प्रथमच घडत असल्याचे दिसत आहेत. मराठी मिडीयाचा मिळणारा पाठींबा आणि हाती आलेल्या सत्तेचा माज म्हणजे काय हे मविआ सरकारच्या काळात अधिक दिसतो आहे. तुलनेने मविआच्या इतर दोन घटक पक्षांपेक्षा शिवसेनेचाच माज अधिक दिसतो आहे. म्हणून पुलोद सरकारात जनता पक्षातील हिंदुत्ववादी मंडळीचा व्यवहार दुःस्वासाचा नव्हता, हे शिवसेनेच्या समर्थक मिडीयांनी शिवसेनेला पटवून द्यावे असे मला वाटते. अन्यथा शिवसेनेचे नुकसान इतर घटक पक्षांपेक्षा अधिक होत जाईल.
शरद पवारांच्या घराकडे जो मोर्चा झाला त्या संबंधी पोलीस यंत्रणेला सुगावा लागला नाही. यावर विरोधी पक्षाने किती मोठे रान उठवावयाला हवे होते ? पण फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांनी संयम पाळला आहे. ही घटना घडली तेव्हा जर शरद पवार आपल्या घरीच असते तर त्यांना काय वाटले असते असा विचार केला तर या घटनेचे गांभिर्य आपल्या लक्षात येऊ शकते. ही घटना निश्चीतच दुर्दैवी आहे. अशी घटना घडावयास नको होती. मविआ सरकारच्या पोलीस यंत्रणेला पवारांच्या घराकडे मोर्चा होणार आहे याचा सुगावा लागला नाही. म्हणूनच त्या घटनेवर अनेक तर्क काढले जात आहेत. आता गृहखाते म्हणत आहे, की मास्टर माईन्ड कोण आहे याचा शोध घेत आहोत. मोर्चात सामील झालेले लोक एसटी कामगार आहेत, मग एसटी कामगारांच्या युनियनच्या नेत्यांचाच हात आहे हे प्रथम दर्शनी मानावे लागते. कुठल्याही युनियनमध्ये ही राजकारण असतेच हे काही नव्याने मांडण्याची गरज नाही. युनियनमधील दोन नेत्यांमधील गुप्त सत्तास्पर्धा नसेल असे ठामपणे आपण म्हणू शकत नाही. ही घटना घडली याचे मूळ कारण, मविआ सरकारने एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनात तोडगा काढण्यात प्रंचड विलंब लावला हे आहे. जेव्हा सरकार संपवाल्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहात बसते तेव्हा उद्रेक होतो हा सार्वत्रिक अनुभव आहे. यात नवल ते काय ? पण मोर्चा शरद पवारांच्या घराकडे गेला म्हणून चर्चा अधिक होत आहे. ही या घटनेतील खरी मेख असावी.
या घटनेसंबंधी अनेक तर्क लढविले जात असल्याचे आपण चॅनेल्स वरून ऐकतो आणि पाहात आहोत. कोणी म्हणतं अर्बन नक्षलवाद्यांची फूस असावी. नक्षलवाद्यांचा इतिहासच घातापाताचा आहे. आपल्या देशात अस्थिरता माजावी असे साम्यवाद्यांचे एकमेव धोरण आहे. जर या घटनेत नक्षलवाद्यांचा हात असेल असे दिसले तर सरकारने त्या दिशेने तपास यंत्रणेला कामाला लावावे. पण प्रश्न हा आहे की साम्यवादी पक्ष आणि संघटनांशी मविआ सरकारची मैत्री वाढली असतांना मविआ सरकार त्या दिशेने पाऊल उचलेल का? मोर्चाच्या दिवशी काही मिडियांना असा मोर्चा होणार अशी माहिती सकाळीच मिळाली होती. या बाबत नागपूर मधून आलेल्या फोन काॅल आणि वाॅट्स-ॲपवरील मेसेजच्या आधारे तपास यंत्रणेने दुजोरा दिल्याचे ऐकीवात आले आहे. आता नागपूरात भाजपांचे दोन मोठे नेते केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणविसांचा मोठा प्रभाव आहे. म्हणून भाजपाला विशेषतः देवेंद्र फडणविसांना टार्गेट करण्याचा मोह मविआ सरकारला होऊ शकतो. तसेच नागपूर हे शहर डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्याचे स्थान आहे. म्हणून आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांवर ही आरोप केले जाण्याची शक्यता आहे. या जगात सर्वात सहज आणि सोपी गोष्ट म्हणजे इतरांवर आरोप करणे ही होय. म्हणून या संबंधी अधिक तर्क लढविणे योग्य नाही असे मला वाटते. पण - - - -
राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील भांडणापेक्षा पुष्कळदा सरकार मधील घटक पक्षांच्या सत्तास्पर्धेतून जे परस्परांवर शह-कटशहाच्या खेळी होतात, त्यापैकीच ही घटना असू शकते. महाराष्ट्रातल्या मविआ सरकार मधील राष्ट्रवादी काॅग्रेस आणि शिवसेना या दोन घटकांमध्ये एक प्रकारचे शीत युद्ध सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात गृहखाते हवे आहे अशी चर्चा उघडपणे होत आहे. यावर तर्क लावायचा म्हणजे राष्ट्रवादी काॅग्रेसचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या खात्यावर ताशोरे ओढण्यासाठी शिवसेनेने हे घडवून आणलेले कारस्थान आहे असे मानावे लागते. तर दुसर्या बाजूला राष्ट्रीय पातळीवर राजकारणाची सुत्रे आपल्याकडे यावीत अशी आत्यंतिक गरज शरद पवार यांना झाली असावी. त्यातून सहानुभूतीची थोडी फार लाट निर्माण करण्यासाठी आपल्या घराकडे मोर्चाची कल्पना दस्तूरखुद्द शरद पवारांनी कृतीत आणली असावी. असा ही अंदाज काढला जातो याचे कारण शरद पवार ही पंतप्रधानाच्या स्पर्धेत आहेत. शरद पवारांनी निवडणूक जिंकून देण्याचे कसब ज्यांच्याकडे आहे अशा प्रशांत किशोरांना आपल्या घरी बोलावून चर्चा केल्याचे आपण ऐकले आहे. याच प्रशांत किशोरांनी ममता बॅनर्जीना आणि जगन रेड्डींना विधानसभेच्या निवडणूकीच्या ऐन धामाधूमित खोट्या कारणाचे निमित्त दाखवून व्हिल चेअरवरून प्रचार करण्याचे नाटक करवून घेतले होते. त्यात ममता बॅनर्जी आणि जगन रेड्डींना भला मोठा फायदा झाला हे दिसून आले आहे. मग शरद पवारांना ही असा मोह झाला नसावा असे धरून कसे चालेल?
अलिकडे शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यावर ही माध्यमात बरीच चर्चा झाली. अशा प्रकारे माध्यमात चर्चेत राहण्याचा जसा फायदा होतो तसा तोटा ही होऊ शकतो. उत्तर भारतातील काही चॅनेल्सवरील राजकीय अभ्यासक जे भाजपा विरोधी आहेत त्यापैकी एक विनोद शर्मा. ते म्हणतात, ' लेकीन शरद पवार इस तरह पंतप्रधान मोदींसे क्यों मिलते हैं ? किस कॅपॅसिटीमें शरद पवार मोंदीसें मिलते है ? आप ना लोकसभाके विरोधी दल नेता है , ना राज्यसभाके विरोधी दल के नेता है | इससे राष्ट्रीय स्तरपर विरोधी दलकी एकताको बाधा पहुंचतीं है | ' विनोद शर्मानी शरद पवार पंतप्रधान मोदींशी अधून मधून घेत असलेली भेट हे निव्वळ नाटक आहे असे स्पष्टपणे मांडले नसले तरी त्यांच्या देहबोलीतून मला तसे जाणवले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमूख निर्मळ मनाने, हसत हसत म्हणत असत की ' आम्ही राजकारणातील मंडळी रंगमंचावरील किंवा सिनेमातल्या नटा सारखे कलाकार आहोत. ' ते महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. याचे कारण त्यांची प्रतिमा लोकांना स्वच्छ वाटली. या उलट शरद पवार कोणत्या राजकीय खेळी करतील हे सांगता येत नाही असे अनेक राजकीय अभ्यासक म्हणत आहेत. यातील बहुतांश अभ्यासक, पत्रकार आणि संपादक मंडळींना वश करून घेतल्यामूळे ती मंडळी शरद पवारांचा हा गुण मानतात. वस्तुतः मिडीयाला मॅनेज करण्याची सवय हा दुर्गूण आहे. लोकांच्या नजरेत असा दुर्गूण वा सवय येते तेव्हा त्या नेत्याची विश्वासहर्ता कमी होत जाते. म्हणूनच एखादी राजकीय घटना सामान्यजनांच्या आकलना पलीकडची असली तर त्या पाठीमागे हमखास शरद पवार आहेत अशी चर्चा सुरू होते.
हिंदी भाषिक प्रदेशातील राजकीय अभ्यासक आणि राजकीय नेत्यांना विशेषतः काॅग्रेसच्या समर्थक मंडळींना शरद पवारांबद्दल जितका आदर वाटावयास हवा होता तितका नाही. याचे कारण महाराष्ट्रात पुलोद सरकारचा केलेला प्रयोग. दुसरे कारण सिताराम केसरी सारख्या बुजूर्ग नेत्याबद्दल दाखविलेला अनादार हे होय. तिसरे कारण सोनिया गांधीच्या वर्मावर हातोडा मारून राष्ट्रवादी काॅग्रेसचा संसार मांडला. शरद पवारांची ही घोडचूक ठरली. चौथे अतिशय महत्वाचे कारण मी सतत मांडत आलो आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील विधान सभेच्या निवडणूकीच्या प्रचार सभेतील त्यांचे आवडते वाक्य ' आम्ही महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होऊ देणार नाही ' हे होय. मुंबईतील हिंदी भाषिक समाज राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षापासून दूर का आहे याचे कारण हेच होय. आपण हिंदी भाषिक राज्यातील चॅनेल्सवर फेरपटका मारला तर शरद पवारांच्या राजकारणाच्या पद्धतीबद्दल फारसे चांगले ऐकू येत नाही. दक्षिणेतील भाषा अवगत नसल्याने तेथील चॅनल्सवर फेरपटका मारणे शक्य होत नाही. पण तेथील राजकीय अभ्यासक जे इंग्रजी वृत्तपत्रात वा चॅनेल्सवर असतात ते ही शरद पवारां संबंधी फारसे चांगलं म्हणत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे शरद पवारांनी पंतप्रधान कै नरसिंहरावांशी तंटा उभा केला होता हे होय. त्या चूकी मूळेच शरद पवारांनी पंतप्रधान पदावर विराजमान होण्याची संधी कायमची गमाविली. आता म्हणे त्यांना राष्ट्रपती पदावर बसायचे आहे असे मिडीयातून ऐकू आले आहे.
शरद पवारांचे मविआ सरकारात वाढते वजन कमी करण्यासाठी त्यांच्या घराकडे गेलेला एसटी कामगारांचा मोर्चा हे काॅग्रेसने घडविलेले कारस्थान असावे का असा ही एक तर्क ऐकू येतो. पण सध्या देश पातळीवर काॅग्रेस संकटात आहे. शिवाय काॅग्रेसला अनासायाने सत्तेत बसायला मिळाले आहे. या कारणांमूळे काॅग्रेसने असे कारस्थान केले असेल हे बिलकूल संभवत नाही.
एकंदरीत मविआ सरकारच्या काळात उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरासमोर ते ही मुबंई सारख्या महानगरीत, दशहतवाद्यांची कार उभी केलेलं नाट्य घडते, पालघर मधील साधूंना चोर समजून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून हत्या होते, सुशांतसिंग, दिशा सॅलियान, इत्यादींचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे. मविआ सरकार हे विविध कट कारस्थानांनी भरलेले, कायदा-सुव्यवस्थेचा वापर राजकीय सूडबुद्धीने होत असलेले तसेच खंडणी वसुलीने माखलेले, घटक पक्षांतर्गत स्पर्धा, अविश्वास, आणि त्यामूळे कल्याणकारी योजनांचा उडालेला बोजवारा, मंत्र्याच्या भ्रष्टांचारांच्या प्रकरणांनी तुडूंब भरत आलेले, प्रशासनात सावळा गोंधळ, विकासाची कामे ठप्प इत्यादी रोगांनी दिवसेंदिवस अधिक जर्जर होत आहे. त्यामूळे बहुमताच्या दृष्टीने मोठे पण कार्यक्षमतेच्या दृष्टीने सर्वात कमकुवत, केंद्र सरकारशी भांडत राहून थकलेले, न्यायालयांकडून आलेल्या तिक्ष्ण अशा असंख्य बाणाने रक्तबंबाळ झालेले, अशी मविआ सरकारची इतिहासात नोंद होईल असे दिसते. अनाकलनिय घटना आणि चमत्कारीक तर्क-वितर्कांनी वेढलेल्या या मविआ सरकारच्या मंत्र्यावर आणि नेत्यांवर ईडी, आयटी, सिबीआय इत्यादी संस्थांच्या होणार्या धाडी पासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सरकारचे दोन शिल्पकार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहमतीने पवारांच्या घरावर चालून आलेला मोर्चा हा एक बनाव असू शकतो आणि अशी चर्चा ऐकू आली तरी नवल वाटणार नाही. या घटनेचा हा शेवटचा तर्क आहे. खरंखोटं काय हे फक्त तो ईश्वरच जाणो !
विष्णुजी,
उत्तर द्याहटवाविषय छान निवडला आहे.मल्लीनाथीही मार्मिक आहे.
विशेषतः माध्यमा संबंधी आपलं विश्लेषण फारच चपखल. मलाही नेहेमी वाटत असत की ही मराठी माध्यमं, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक दोन्हीही इतकी विवेक शुन्य का ॽ सरकार बद्दल आपल अनप्रेडीक्टेबल विशेषण मात्र फारस भावल नाही कारण हे सरकारचीर आल्यापासुनच इतकी कायदा धाब्यावर बसवुन केलेली भ्रष्ट कामगिरी, वझे नियुक्ती, खंडणी, वसुली, दिशा सुशांत हीरेन प्रकरणं, मनी लाॅंडरींग, प्लाॅट्स् फ्लॅट्स हडपणं, आणी सर्वांवर कळस म्हणजे, यशवंत जाधव-मातोश्री-दोनकोटी-50 लाखाच घड्याळ-39 फ्लॅट्स ई.सराईत दृष्य गुन्हेगारी कृत्यं पाहता हे सरकार दरोडेखोर माफिया टोळी याच उपाधीस लायक आहे व फार पुर्वीच बरखास्त व्हायला हवं होत.
सुंदर लेखासाठी धन्यवाद.