सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

घाऊक पक्षातंर व काॅग्रेस मुक्त भारत


अलिकडे देशात तसेच अनेक राज्यात काॅग्रेस व काॅग्रेसचे मित्र पक्षांचे नेते पक्षांतर करीत भाजपात प्रवेश करीत आहेत. त्यावर प्रिन्ट, ईलेक्ट्रानिक्स तसेच सोशल मिडीयावर चर्चा होत आहे. ह्या तिन्ही प्रकारच्या मिडीयात राजकीय अभ्यासक, संपादक मंडळी, व विविध पक्षांचे नेते मंडळी व कार्यकर्ते आपआपल्या परिने सोयीस्कर अर्थ काढून वक्तव्यें करीत आहेत. हे स्वाभाविक असे मानले तरी त्यावर उपाय सुचविताना कोणी दिसत नाही. 

पंतप्रधान मोदींनी सोळाव्या लोकसभेच्या प्रचारात काॅग्रेस मुक्त भारत अशी घोषणा केली होती, त्यावेळी अनेक पुरोगामी संपादक मंडळी आणि राजकीय अभ्यासकांनी मोदींची खिल्ली उडविली होती. पंतप्रधान मोदींचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर अडीच वर्षेच पुर्ण झाली असतांना टिव्ही वरील चर्चेत मोदी सरकारवर टिका करताना जेष्ठ पत्रकार श्री प्रकाश बाळ ह्यांनी मोदींना उद्देशून म्हटले होते की, " काॅग्रेस मुक्त झालीं आहे ना, आपणास बहूमताने जनतेने सत्ता दिली आहे नां, मग करा की आश्वासने दिल्याप्रमाणे कामें ? " श्री प्रकाश बाळ ह्यांना भाजपाचे राज्यसभेत बहूमत नव्हते हे माहित होते तसेच इतकी वर्षे राजकीय अभ्यासक म्हणून समाजात वावरत असल्यामूळे त्यांना हे देखील ठाऊक होते की संसदेच्या दोन्ही सभागृहाची मान्यता मिळाली तरच बहूतांश बीलांच कायद्यात रूपांतर होते. मुद्दा हा की काॅग्रेस आणि मित्र पक्षांचा सतत पाठिराखा म्हणून वावरणारी संपादक व राजकीय अभ्यासक मंडळीं, भाजपेतर पक्षांच्या वर इतकी निष्ठा दाखवितात, की त्या पक्षांचे नेते ही त्या प्रमाणात आपल्या पक्षाशी निष्ठावान राहात नाहीत. बहूतांश पत्रकार, संपादक, व पुरोगीमी विचारवंतानी भाजपेतर पक्षावर अधिक निष्ठा दाखविण्याचा उतावेळपणा अनेक वेळा केला आहे आणि आज ही करीत आहेत. आज काॅग्रेस व त्याच्या मित्र पक्षातील नेते भाजपात जात असल्यामूळे ते तोंडघाशी पडले आहेत.

पक्षातंराचे जनकत्व तसे पाहता काॅग्रेसच्या नेत्या व माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीकडे जाते. इंदिरा गांधींच्या पश्चात सहानुभूतीच्या लाटेवर १९८४ साली झालेल्या निवडणूकीत काॅग्रेसला प्रचंड बहूमत मिळाले. पण त्यानंतर काॅग्रेसला आहोटी लागली व काॅग्रेसचे नेते आपल्या पक्षातून बाहेर पडू लागले. तेव्हा पक्षांतर रोखण्याचा उपाय करावा असे काॅग्रेसला वाटले व पक्षातंरा संबंधीचा कायदा काॅग्रेसने आणला. त्या कायद्यानुसार ज्या लोकप्रतिनिधीला पक्षांतर करावयाचे असेल त्याने/ तिने पक्षांतर केल्यानंतर संसद तसेच विधानसभा सदस्याचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी अशी अट वा तरदूत अस्तित्वात आली. म्हणजे पक्षातंर बंदीच्या कायद्याचे ही जनकत्व काॅग्रेसकडे जाते. पक्षात बंडाळी माजवून स्वतंत्र पक्ष, वा आघाडी निर्माण करणे किंवा दुसर्या पक्षात जाणे असे प्रकार व संख्या काॅग्रेस व काॅग्रेसच्या मित्र पक्षांत अधिक आहे. ह्याचे कारण साम्यवादी पक्ष वगळता इतर काॅग्रेस सकट सार्या विरोधी पक्षांची जातकूळी वा रचना " विभिन्न भागातील खानदानी प्रमुखांना एकत्र करून राज्यातील एका खानदानी घराण्याच्या किंवा केंद्र स्तरावरील एका खानदानी घराण्याच्या चरणी आपली निष्ठा वाहून सत्तेतील आपला वाटा घेणे " या अघोर सिध्दांतावर आधारलेली आहे. जगातल्या एकाही विद्यापिठात राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील पक्षीय राजकारण प्रकरणात अशा प्रकारचा सिध्दांत नाही. राजकीय पक्षांचे असे घाऊक घराणेशाहीचे स्वरूप फक्त भारतात आढळते. त्यामूळे घाऊक पक्षांतराची लाट ही आपल्या देशात येणार ह्यात नवल ते कसले, आणि त्यावर भारतभर चर्चा तरी का हवी ? चर्चा हवी आहे पण ती  देशभरातील  राजकारणात काही खानदानी घराण्यांची मक्तेदारी झाली आहे त्यावर झाली तर ती आपल्या लोकशाहीला खरा अर्थ प्राप्त करून देईल असे वाटते.

देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या अकाली निधनानंतर इंदिरा गांधीच्या काळात काॅग्रेस फुटली व काॅग्रेसचा कारभार वर नमूद केलेल्या सिद्धांतानुसार सुरू झाला. तेव्हाच खर्या अर्थाने भारत काॅग्रेस मूक्त झाला आहे. आणखिन खोलात जाऊन विचार केला तर असे ही म्हणता येईल की जेव्हा महात्मा गांधीजींनी काॅग्रेस विसर्जीत करावयास सांगितली होती तेव्हाच भारत सच्च्य्या काॅग्रेसला मुकला. मला वाटतं हे सत्य सच्च्या गांधीवाद्यांनी मान्य करावयास हवे. त्याही अगोदरच्या काळात मागे जाऊन विचार केला तर आपल्याला दिसून येते की  लोकमान्य टिळकानंतर ब्रिटीश सरकारने आपली सत्ता अधिक काळ टिकावी म्हणून  काॅग्रेसची  जाज्वल्य राष्ट्रवादी (जहाल) गट व मवाळ गट अशी फाळणी केली. पुढे जहाल गटाला नामशेष केले. बहुतांश काॅग्रेसमधील जहाल नेत्यांना क्रान्तीचा मार्ग अवलंबावा लागला असे दिसते. लोकमान्य टिळकांच्या काळात काॅग्रेसचे हिंदू स्वरूप कोणालाच खटकत नव्हते म्हणून ' वंदे मातरम् वेद मंत्राहून वद्य असा मंत्र ' ठरला होता.  पुढे ब्रिटीश सरकारने हिंदू-मुस्लीम मध्ये भेद निर्माण करून सच्ची काॅग्रेस संपविलीच पण त्यासोबत अखंड हिंदूस्थानची फाळणी केली.  

इतर पक्षातील नेते भाजपात प्रवेश करीत आहेत ह्या मागे मोदी सरकार दबावाचे राजकारण खेळत आहे, विरोधी पक्षांच्या नेत्यांना भ्रष्ट्राचाराच्या केसेस मध्ये अडकाविण्याची धमकी देत आहे असे अनाठायी आरोप आज भाजपावर होत आहेत. खरं म्हणजे 'कर नाही त्याला डर का असावे ? ज्या महात्मा गांधीजींनी सत्यमेव जयते सोबत निर्भयतेचा उपदेश दिला त्याच काॅग्रेसची मंडळींना भ्रष्टचाराच्या खोट्या केसेला घाबरून पक्ष सोडून जाण्याची गरजच काय आहे ?  ह्या प्रश्नाचे उत्तर शरद पवार का देत नाहीत ?

काॅग्रेस व इतर पक्षांना नामशेष करण्याचा कट मोदी सरकार करीत आहे हा आरोप बिनबुडाचा आहे. काॅग्रेसचे मित्र पक्ष व देशातील प्रादेशिक पक्ष ही सारी मंडळी पुर्वी काॅग्रेसमध्येच होती. काॅग्रेसला सत्तेची चव स्वातंत्र्यपुर्वकाळातच लागली होती. लागली होती असे म्हणण्यापेक्षा ब्रिटीश सरकारने लावली होती, असे म्हणणे अधिक उचीत ठरेल. भारतीयांना प्रांतीय स्तरावर सत्तेत प्रतिनिधित्व ( काही अधिकार नसलेले सत्तेच्या शोभेचे बाहूले ) देण्याची पद्धत सुरू झाली त्यातून सत्तेत विविध समाजगट निर्माण झाले. म्हणून काॅग्रेसला राजकीय पक्ष म्हणण्यापेक्षा सत्तेतील वाटेकरी लोकांचा समूह असे म्हणावेसे वाटते. हा समूह गट प्रथम विविध पक्षात विभागला गेला. म्हणजे काॅग्रेसला कमजोर केलं ते काॅग्रेस मंडळीनीच. आता उरली सुरली खानदाने भाजपात जाऊ लागली आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात मुस्लीम लिग हा पक्ष निर्माण झाला तो ब्रिटीश सरकारच्या फोडा व झोडा ह्या कूटील नीतीतून झाला. मुस्लीम लिगला गोंजारण्याचे तत्कालीन  काॅग्रेसच्या नेत्यांच्या प्रयत्नात काॅग्रेस मध्ये हिंदू हिताची चर्चा ही थांबली. लोकमान्य टिळकांच्या काळात काॅग्रेसचे धोरण राष्ट्रीय अस्मिताच्या सिध्दांताला अनुसरून होते. म्हणून शिवजयंती व गणेशोत्सव राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे करण्यास सुरूवात झाली. लोकमान्य टिळकावर लखनौ करार केल्याबद्दल आरोप झाले. पण त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट सांगितले होते की, " मुस्लीमांना ह्याहून काहीही अधिक दिले जाणार नाही आणि मुस्लीमांनी राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष केले तर त्यावर काॅग्रेसने कठोर पावले उचलविण्यास कुचराई करू नये."  काॅग्रेस मध्ये हिंदू हित जपले जात नाही, ब्रिटीश सरकार फोडा व झोडा नीती सोडणार नाही असे दिसू लागल्याने टिळकांच्या महानिर्वाणानंतर काॅग्रेस मधील जहाल गटाला क्रान्तीचा मार्ग अवलंबवा लागला. त्यांचे नेतृत्व स्वातंत्र्यवीर सावरकार करीत होते. त्यातूनच हिंदू महसभा हा हिंदूत्ववादी पक्ष निर्माण झाला. दरम्यान मुस्लीम लिगची स्थापना झाली होतीच. रशियात कामगार वर्गांचा उठाव झाला व जगात साम्यवादा बद्दल आकर्षण वाढले. त्याचा परिणाम काही प्रमाणात देशातील युवकांना साम्यवादाबद्दल आकर्षण स्वातंत्र्य पूर्व काळातच निर्माण झाले होते. त्याच काळात काॅग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते पुजनीय डाॅ केशव बळीराम हेडगेवार ह्यांनी काॅग्रेसचे कार्य करण्याचे सोडून दिले. राजकारणाच्या माध्यमातून देशाच्या समस्या सुटणार नाहीत असे निदान काढून राष्ट्रीय बाण्याची हिंदुची एक संघटना  नागपूरला स्थापन केली, तिलाच आज वटवृक्षाचे स्वरूप झालेले पाहात आहोत. तिचेच नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. पुढे स्वातंत्र्यानंतर पंडीत नेहरूच्या मंत्रीमंडळातील मंत्री डाॅ शामाप्रसाद मुखर्जीनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन थेट नागपूरात संघाचे द्वितीय सरसंघचालक पुजनीय गोलवकर गुरूजींची नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी संघाच्या प्रचारकांची मागणी केली. तेव्हा गोलवलकर गुरूजींनी, अटलबिहारी वाजपेयी, पंडीत दिन दयाळ उपाध्याय, नानाजी देशमूख, कुशाभाऊ ठाकरे सारख्या प्रचाराकांना संघाच्या कार्यातून मूक्त केले, मग डाॅ शामा प्रसाद मुखर्जींनी १९५२ साली भारतीय जनसंघ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. तोच आताचा भाजपा आहे.  ढोबळ मानाने भारतात, स्वातंत्र्य पूर्व काळात काॅग्रेस, हिंदुत्व व साम्यवादी अशा तीन राजकीय विचारप्रणाली अस्तित्वात होत्या. मुस्लीम लीग पक्ष खरे म्हणजे स्वतंत्र भारतात फळ्यावर नावा पुरता पण राहू नये. कारण धर्माच्या नावाखाली पाकिस्तान निर्माण झाले. तरी सुद्धा मुस्लीम लीगचे दृष्कृत्यें विविध दशहतवाद्यांच्या गटातून सुरू आहेतच. हे ही एक महत्वाचे कारण आहे, ज्यामूळे  हिंदुत्व पक्ष म्हणजे भाजपाला आज सर्वाधिक पंसती मिळत आहे. त्यामूळे आज काॅग्रेस, काॅग्रेसचे मित्र पक्ष, साम्यवादी पक्षांची पडझड होत आहे. कदाचित भविष्यात प्रादेशिक पक्षांनी घराणेशाही सुरू ठेवली तर त्यांची अवस्था ह्या नामशेष होणार्या पक्षांसारखी होण्यास सुरूवात होईल. काॅग्रेसचा इतिहास व स्वातंत्र्या पुर्व काळात असलेले राजकीय प्रवाह ह्या संबंधीचा उहापोह ह्यासाठी केला कि त्यातून काॅग्रेसच्या पडझडी मागचे खरे कारण काय हे शोधता यावे.

राहता राहिला प्रश्न भाजपात सामील होणार्या काॅग्रेसी नेत्यांचे काय ? भाजपाचे स्वरूप काय राहील ? भाजपात काही प्रमाणापुरता काही काळापुरता काॅग्रेसी खानदानांची संसद व विधानसभा सदस्यासंबंधीत तिकीट वाटपा पूरता सोय होत राहील पण त्यांची काॅग्रेसमध्ये जशी सुभेदारी होती तशी राहणार नाही. कदाचित काॅग्रेसमधील आयारामांना भाजपात कोंडल्या सारखे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा एक अंदाज असा आहे की काॅग्रेस खानदानातील युवकांनाही संघ आणि भाजपाच्या हिंदुत्वासंबंधी आकर्षण वाढलेले दिसत आहे.  काही समाजशास्त्रज्ञ, राजकीय अभ्यासक, भारत बदलतोय असे म्हणत आहेत. ह्यात पाश्चीमात्य तसेच पौर्वात्य विचारवंताचा ही सहभाग आहे. ह्याचा अर्थ हाच की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचा प्रभाव वाढला आहे. भारताततील राजकीय अभ्यासकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी, संघाची कार्यपध्दत, संघाचा वाढता प्रभाव ह्यासंबंधी उत्सुकता म्हणून नव्हे तर काळाची गरज म्हणून अभ्यास करणे आवश्यक आहे. गांधी हत्येपासून  झापडबंद स्टाईलने संघावर टिका करणे थांबविणे आवश्यक आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्याप्ती वाढती आहे, समाजमनावर संघाचा प्रभाव वाढत आहे ह्यात भारतीय समाज चुकत आहे असे मानून पुरोगामी विचारवंत, पत्रकार,  संपादक मंडळी संघाचा द्वेष करीत राहणार असेल तर त्यात ना संघाचे नुकसान होणार, ना भाजपाचे. जे काही नूकसान होत राहील ते विरोधी पक्षांचेच होईल. भाजपा हा संघ परिवाराचा एक सदस्य आहे. संघ राजकारण करीत नाही. तसे पाहता संघ संस्कारक्षम व्यक्ती निर्माण करण्याची एक शाळा आहे. आज प्रत्येक क्षेत्रात संघाचे विविध लोकपयोगी प्रकल्प आहेत. ते प्रकल्प , त्या आश्रमशाळा, ती रूग्णालये, त्या शाळा इत्यादी स्वयंसेवकांच्या पुढाकारने निर्माण झाल्या आहेत. संघ परिवारातील संस्थांची नुसती जंत्री द्यावयाची म्हटले तर एक मोठा अंक पुरा पडणार नाही.  सारं काही सरकार करेल अशा आशेत समाजबांधवांने राहू नये असे संघाचे मत आहे. बरं संघ स्वयंसेवक जी काही समाजसेवा करीत आहे ती ही पुर्णतः निरपेक्ष भावनेने करीत असतात. त्याग ही स्वार्थ भावने सारखी नैसर्गिक नसते. त्यागाची वृत्ती अंगी बाणावण्याचे प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी एक यंत्रणा तयार करावी लागते. संघाकडे तशी यंत्रणा आहे. तिचेच नाव शाखा आहे. ती शाखा कशी असते ह्याबाबतचा अनुभव न घेता संघावर टिका करणे चुकीचे आहे.  संघ स्वयंसेवक स्वतःहून सेवेचं व्रत घेतात. स्वयंसेवकांना संघ फक्त मार्गदर्शन करीत असतो. प्रत्येक स्वयंसेवकांला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करण्याची मूभा असते. भाजपातील नेत्यांनी मागितले तरच संघ मार्गदर्शन करतो, अन्यथा नाही. संघाच्या शाखेवर शारिरीक कवायती होतात, त्या पाहून संघात हिटलरशाही आहे असा आरोप करणे हास्यास्पद आहे. बलोपसना ही आपल्या संस्कृतील एक अनोखे जीवनमूल्यं आहे. शाळेतही पीटीचा एक तास असतोच ना ! शाळेतल्या विद्यार्थ्यांनांही योग, लेझीम, शारिरीक कवायती करताना एक साथ सावधान अशा आज्ञा द्याव्या लागतातच की ! संघात हुकूमशाही सारखे आदेश नसतात. तिथे फक्त आज्ञा असतात हे जाणून जे घेत नाहीत त्यांना काॅग्रेस मूक्त भारत ह्या कल्पनेत दोष दिसत असेल तर तो त्यांच्या दृष्टीतला दोष आहे. संघाने कधी ' काॅग्रेस मुक्त भारत ' अशी कल्पना मांडलेली नाही. पंतप्रधान मोदींनी ही स्पष्ट केले आहे, की , " काॅग्रेस मुक्त भारत ह्याचा अर्थ असा आहे की,  काॅग्रेसमध्ये ज्या अनाठायी  कुप्रथा आहेत, दोष आहेत, ते सुधारावयास हवेत."  संघाचे एक विचारवंत म गो वैद्यांनी म्हटले आहे की, " काॅग्रेसने पक्षातील घराणेशाही संपावयास हवी आणि तातडीने नेतृत्व बदलावे." ह्याचा अर्थ नेहरू-गांधी घराणेशाहीतून काॅग्रेसची मुक्तता होणे गरजेचं आहे. एकाच घराण्याची काॅग्रेसवर मक्तेदारी हे काही काॅग्रेसचं मूळ स्वरूप नव्हे, तो काॅग्रेसमधील एक मोठा दोष आहे. काॅग्रेस पासून फुटून ज्यांनी पक्ष निर्माण केले, त्या पक्षांतही हा दोष आहे. हा दोष दूर करण्याचा सल्ला पुरोगामी संपादकांनी, विचारवंतानी भाजपेतर पक्षांना अग्रलेखा द्वारे करावयास हवा. संघ, भाजपा, मोदी ह्यांच्यावर टिका करण्यासाठी आपल्या अग्रलेखाची जागा वाया घालविणे बंद करावे. त्याऐवजी विरोधी पक्ष नेत्यांचे प्रबोधन करावयास हवे.

सारांशाने असे म्हणता येईल की,  काॅग्रेस मुक्त भारत ह्या संकल्पनेने कोणाचा संभ्रम होऊ नये, तसेच कोणी भिऊन जाऊ नये. कुठल्याही एका व्यक्तीचा, एका पक्षाचा, वा एका विचारसरणीचा मृत्यू झाला म्हणून देश चालणार कसा, असा प्रश्न पडण्याचे कारण नाही. वस्तुतः जे शाश्वत ते ही ईश्वर आणि जे नश्वर ते ही ईश्वरच. कारण नाश पावलेले दुसर्या रूपाने जन्मते. ' जे नाशे ते उपजे ' हेच सत्य. आज भाजपाची सरशी होत आहे, ती कायम  राहील असे ही नाही.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या स्थितीतही आपले कार्य जोमाने करीतच राहील. विरोधी पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील संघभावना जरी आत्मसात केली तरी त्यात त्यांचे भले आहे, तसेच देशाचे ही भले आहे, त्यातच  देशाचा विजय आहे. " संघौ शक्ती कलियुगे " हाच आजच्या युगाचा मंत्र आहे.  संघ व भाजपाला विरोध करणार्यांनी प्रथम आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे, आणि त्यात कमीपणा ही वाटून घेऊ नये. जो चूकतो तो माणूस आणि जो चूका मान्य करतो तो भला माणूस व चुका मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करतो तो सुसंस्कृत.

२ टिप्पण्या:

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...