काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर ताशोरे ओढण्याइतकं, राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचे मला ज्ञान नाही. त्यामूळे मी ह्या विषयावर लेख लिहीण्याचे टाळत होतो. कारण कोठल्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात अनेक जनहिताय योजना, प्रकल्प, आश्वासने इत्यादी संबंधीचा वर्षांव असतो. त्यासाठी लागणारा निधी कोठून येतो, सरकार बाजारात रोखे कसे आणते, विदेशी कंपन्यांशी व्यवहार असला, तर त्याचे स्वरूप कसे असते, विनिमयाचा दर काय ठेवला जातो, सामाजिक योजना असेल तर त्या योजनेमागील तत्व काय, इत्यादी प्रश्न मनात आल्यानंतर ह्या विषयावर आपण न बोलले तर बरे असेच वाटते. पण नंतर मनात आले कि काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांना तरी ह्यातले काय कळत असावे? कारण एका रॅफेल विमानाची किंमत प्रत्येक भाषणात त्यांनी भिन्न ठिकाणी भिन्न मांडली आहे. मग आपण पण आपले विचार मांडायला काय हरकत आहे? सोशल मिडीयानी निदान इतके तरी आपल्यावर उपकार केले आहेत हे पटले. प्रिन्ट आणि ईलेट्रानिक्स मिडीया आपल्या सारख्या सामान्यांना काही थारा देत नाहीत. बरे नको देऊ देत, का राग मानावा त्यांचा ? पण हीच माध्यमें आपण सोशल मिडीयावर व्यक्त होत असतो त्यासंबंधी सतत टिका करीत असतात. जणू काही ही मंडळी सच्या निष्ठेने पत्रकारितेचं व्रत पाळत आहेत, हे एक दुसरे कारण आहे, ज्यामूळे राजकारण आणि राजकीय व्यवस्था ह्या विषयावर व त्या अनुषंगाने येणार्या विषयावर ब्लाॅगवर मला व्यक्त व्हावेसे वाटते.
आपल्यापैकी काहींना ह्या लेखाचे शिर्षक अजब वाटले असावे. त्याबद्दल 'व्यक्ती तितक्या प्रकृती ' असेच मी मानतो. कारण तसे मानण्याची सहजप्रवृत्ती प्रकृतीने जन्मजात आपल्याला दिलेली आहे. तशी म्हटली तर ती सृष्टी कडून आपल्याला मिळालेली एक अमूल्य देणगीच आहे. कारण आपल्या विचारावर कोणी टिका टिप्पणी केली तरी त्यात आपल्याला वावगे वाटावयास जागा नसते. पुष्कळदा एखाद्या गोष्टीत, वा घटनेत विसंगती दिसली, किंवा एखादी व्यक्ती सतत दुसर्यावर टिकेचा, खोट्या आरोपांचा भडीमार करीत करीत शेवटी असे काही म्हणून जाते की आपोआप ज्याच्यावर टिका केली त्याचेच अप्रत्यक्षरित्या त्याच्या हातून गुणगान होते, तेव्हा आपल्या सारख्या तटस्थांचा हात आपोआप कपाळावर जातो आणि आपल्या मुखातून 'अरे रामा ' हे बोल सहज बाहेर पडतात. काँग्रेस पक्षाने नुकताच आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात गरीब कुटूंबाला दरमहा सहा हजार रूपये देणार अशी योजना जाहीर केलेली वाचली मग आपोआप माझ्या मुखातून ' अरे रामा ' हे बोल बाहेर पडले आहेत.
काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधीनी पक्षाच्या जाहीरनाम्यात न्युनतम आय योजनेत प्रत्येक गरीब कुटूंबाला वर्षाला बहात्तर हजार रूपये देण्याची घोषणा केली आहे. खरेतर महिना १२००० पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटूंबांना फरकाचे (Delta) देण्याची योजना आहे. हा फरक ६००० च्यावर किंवा खाली असू शकतो मग सरधोपटपणे ६००० चा आकडा कुठून आला? नेमका खर्च किती ? ह्यात आपण उत्पन्न वाढवायला प्रोत्साहन देणार कि फरकाचे जास्तीत जास्त पैसे मिळावण्यासाठी आहे ते उत्पन्न लपवून लाभ मिळवण्यास प्रोत्साहान देणार, इत्यादी मुद्द्यांवरून अनेक आकडेशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञांनी ह्या योजनेवर टिका केली आहे तसेच काहींनी स्वागतही केले आहे. ज्यांनी टिका केली आहे त्यांनी देशाचा महसूल कसा असतो आणि सरकारी खर्च कसा असतो त्यासंबंधी प्रत्यक्ष गणित मांडून ही घोषणा देशाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने तसेच समाजातील श्रमप्रतिष्ठेचं मूल्य हद्दपार जाऊ नये, ह्या दृष्टीकोनातून अव्यवहार्य मानली आहे. अर्थशास्त्र ह्या विषयासंबंधी माझे एक मत आहे ते अगदी सामान्य आहे, पण तरी आपल्यासारख्यांना पटेल असे वाटते. ते म्हणजे ' घड्याळ निर्मीती करणार्या जगातल्या नामांकीत कंपन्यांनी कितीही दावा केला तरी त्या त्या कंपनींचे एखाद्या माॅडेलची घड्याळे एकाच वेळी अगदी तंतोतत एका संकंदाचा फरक न दाखविता अचूक वेळ दाखवित असतात का? नाही ना, मग अर्थशास्त्रज्ञांची मते एखाद्या निर्णयासंबंधी भिन्न असणारच.' हेच माझे मत मोदी सरकारने नोटाबंदी केलेल्या निर्णयाला जेव्हा देशातील गल्लीबोळात अर्थशास्त्रज्ञ म्हणून वावरणार्यांची इतकी पैदास झाली होती व तावातावाने विरोध करीत होते ,तेव्हा मी ब्लाॅगवर 'युद्ध मोदी समर्थकांचे व विरोधकांचे ' ह्या शिर्षकाखालील लेखात मांडले आहे. त्यावेळी माजी पंतप्रधान व विख्यात अर्थतज्ञ श्री मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री सी चिदम्बरम हे सर्वत्र चर्चा सत्र आखत विरोध करीत होते. अजूनही नोटाबंदीमूळे देशाचे फार फार नुकसान झाले असे म्हणणे सोडलेले नाही. देशाचा जीडीपी घसरला, रोजगार घटला, अर्थव्यवस्था डब्यात गेली, काय काय आणि किती किती म्हणून टिका करीत सुटले त्याचा हिशोबच करता येत नाही. काँग्रेस व मित्र पक्ष गोबेल्सचे तंत्र वापरून जनतेला भ्रमीत करीत राहीले त्यातून तेच स्वतः भ्रमीत झाले आणि शेवटी दहा वर्षाच्या युपीए सरकारच्या काळात स्वतःचा सर्वात जास्त फायदा करून घेतला त्याच चिदम्बरम महाशहांनी आपल्या पक्षाच्या जाहिरनाम्यातील NIYN संबंधी चेन्नई मध्ये दि हिंदु बिझनेस लाईनला २७ मार्चला (wwwthehindubusinessline) दिलेल्या मुलाखतीतून आपोआप मोदी सरकारने केलेल्या आर्थिक विकासाचे बोल त्यांच्याच मुखातून बाहेर पडले आहेत.
काय म्हणाले आहेत चिदम्बरम महाशय, "आम्ही ह्या योजनेबाबत फार होम वर्क केले आहे आणि अनेक अर्थशास्त्रज्ञांशी चर्चा केली आहे आणि त्यांनीही सहमती दर्शविलेली आहे की, देशाचा वाढता जीडीपी आणि टॅक्सद्वारा जमा होणारा महसूल पाहता, आपल्याला (म्हणजे आपल्या देशाला) हे करता येणे शक्य आहे. आमच्या हातात सत्ता आली तर आम्ही प्रत्येक गरीब कुटूंबाला मासिक सहा हजार रूपये सहज देऊ." म्हणे आम्ही होमवर्क केले आहे. खरे आहे ते खोटे का मानावे? पाच वर्षे घरी बसले होते ना ! पण कोणाच्या जोरावर बोलतात? देशाचा वाढता जीडीपी, आणि वाढता महसूल हे शब्द कसे काय आले चिदम्बरम महाशयांच्या मुखी ? नोटाबंदीमुळे बँकेंत भरपूर पैसा जमा झाला आहे. बँका कर्ज देण्याच्या स्थितीत आल्या. टॅक्स भरणार्यांची संख्या देशात वाढली. बेनामी कंपन्यांच्या संपत्ती सरकारच्या खात्यात जमा झाल्या. मल्यापासून नीरव मोदी सारख्या धेंड्याच्या संपत्ती सरकार खात्यात जमा होणार आहेत. विविध रस्ते, महारस्ते, प्रकल्प जोरात सुरू झाले आहेत. अर्थव्यवस्थेत गती आली. "अहो चिंदम्बरम महाराज, तुम्हीच ह्या मुलाखतीत म्हणाला आहात, भारताची अर्थव्यवस्था २०० लाख कोटीच्या घरात गेली आहे आणि दर वर्षी जीडीपी १२% टक्याने वाढत पाच वर्षानी दुप्पट होणार ! सरकारचा महसूल १८% टक्याने वाढत राहणार असेही म्हणाला आहात ना ! मग कशाला नोटाबंदी आणि जीएसटीवर टिका करून लोकांना भ्रमीत केलं तुम्ही ?
चेनईतील 'दि हिंदु ' चे संपादक भाजपाचे समर्थक नाहीत. म्हणजे चिदम्बरम ह्यांनी दिलेली मुलाखत खरी आहे. आपल्या येथील लोकसत्तेचे गिरीश कुबेरांनी ही मुलाखत वाचली आहे की ठाऊक नाही पण त्यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटी निर्णयावर जी जहरी टिका केली होती ते ही उघडे पडेल आहेत. अलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अक्षय फाटक नावाच्या एका युवक प्रचारकाने गिरीश कूबेरांच्या एका लेखातील खोट्या माहीतीसंबंधी प्रेस कौन्सीलकडे दाद मागितली. शेवटी गिरीश कुबेरांना माफी मागावी लागली. मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. सरकारवर टिका कमी पण मोदीवरच अधिक टिका असे करताना अनेकांनी मर्यादेचे उल्लंघन केले आहे. ती सारी मंडळी उघडी पडली आहेत. आपल्या समोर कोणी 'अकलेचे तारे तोडले आणि ते सिद्ध झाले की आपले हात कपाळावर जातात आणि आपल्या मुखातून ' अरे रामा ' हे बोल येतात पण कुत्सितपणे नाही. त्या पाठीमागे आपला भाव शुद्धच असतो. तो म्हणजे,
' हे श्री रामा ह्या सर्वांना सुबूद्धी दे ! '
सर्व वाचकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
छान लिहिले आहे
उत्तर द्याहटवात्यांचेच दात त्यांच्याच घशात
योग्य विश्लेषण, आपल्या मताशी पूर्ण पाने सहमत. UPA 1 वाजपेयी सरकारने केलेल्या परिश्रमामुळे मिळालेल्या यशावर स्वार झाली. आता देखील आयजीच्या च्या जीवा वर बायजी उदार झाला आहे, ती वेळ येऊ नये (UPA 3) हीच प्रार्थना.
उत्तर द्याहटवासुयोग्य आणि परखड विश्लेषण.अर्थात सतत विचार आणि परिश्रमाशिवाय असे मतप्रदर्शन करणे अशक्यच. शुभेच्छांंसह.💐
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाआपल्या सर्वांचे मनापासून आभार ! असाच लोभ ठेवा आणि लेखामध्ये त्रुटी असल्या तर परखडपणे मांडाल अशी आशा बाळजतो. हिंदु नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
उत्तर द्याहटवाफारच छान!!
उत्तर द्याहटवानितिन म्हात्रे व Unknown ह्यांना धन्यवाद!
उत्तर द्याहटवा