ह्या सृष्टीत काही शाश्वत सिद्धांत आहेत. ते कधीही बदलत नाहीत. त्यापैकी ' जो जन्माला आला, त्याला मृत्यू आहे.' हा एक सिद्धांत, ज्याचा आपण सारे पदोपदी अनुभव घेत असतो. देव माना वा नका मानू हा सिद्धांत सर्वांनींच मान्य केलेला आहे. म्हणजेच हे जगत मर्त्य आहे. एकदा हे जगत मर्त्य आहे, हे मान्य केले की, जगभरातील सार्या व्यवस्था मर्त्य आहेत हे ही पटते. जगभरातील जवळपास सार्याच राजेशाही संपुष्टात आल्या. राजघराणें ही नष्ट झाले. परंतु पुष्कळदा ज्या व्यवस्था संपुष्टात आल्या, त्या नव्या रूपातील व्यवस्थेत आपले अंश घेऊन येत असतात. आपल्या येथील आजच्या राजकारणातील घराणेशाही ही एक प्रकारे राजेशाहीचे अंश असलेले हे एक नमुनेदार उदाहरण. केवळ लोकशाही राज्यप्रणाली मध्येच असे घडते असे नाही. साम्यवादातील एक पक्षीय राजवटीत सरकारचा प्रमूख हा आजच्या काळातला नव्या रूपातील राजा झालेला आपण पाहातो. समाजवाद, मार्क्सवाद, भांडवलशाही, गांधीवाद, आंबेडकरवाद, ह्या सार्या राज्यवस्थेतील सामाजिक व आर्थिक धोरण कसे असावे ह्या संबंधीत दिशा ठरविणार्या विचारसरणी आहेत. ह्या विचारसरणी टाकाऊ नसतात तसेच चिरंतर टिकणार्याही नसतात. ह्या संबंधी आपण पुढे स्वंतत्र रित्या चर्चा करू. आज आपण आपल्या देशातील राजकारणावर सर्वाधिक प्रभाव टाकण्यार्या गांधी घराण्यातील प्रियंका गांधीनी वाराणसीमधून निवडणूक लढविण्यात घेतलेली माघार व त्यावर काँग्रेस पक्षात सुरू झालेल्या विवादावर चर्चा करू या.
' प्रियंका गांधीची वाराणसीतून माघार ' अशा आशयाची बातमी गुरूवारी २५ एप्रिलला सर्वच चॅनेलवरून प्रसारीत झाली. ती बातमी खरी ठरली. कारण काँग्रेसने २०१४ च्या निवडणूकीत मोदींच्या विरूद्ध हरलेले अजय राय ह्यानांच उमेदवारी दिल्याचे जाहीर केले. त्याबाबत' गांधी घराण्यात दुफळी पडत आहे का ' अशा प्रकारचे वृत्त प्रसारीत झाले. प्रियंका गांधींनी मोदीं विरूध्द निवडणूक लढवावी असे ज्यानां वाटत होते, त्या काँग्रेसजनांनी राहूल गांधींच्या सल्लागारांवर टिका केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की प्रियंका गांधींना वाराणसीतून तिकीट नाकारले आहे. परंतु राहूल गांधींच्या समर्थकांनी म्हटले की "वाराणसीतून निवडणूक न लढविण्याचा निर्णय हा सर्वस्वी प्रियंकाचा आहे." ह्याबाबत सत्यता पडताळून पाहावयाची गरज नाही. कारण श्रीमती इंदिरा गांधी हयात असताना गांधी घराण्यात विवाद घडलेला आपण पाहीला आहे. संजय गांधींच्या पत्नी मनेका गांधी व पुत्र वरूण गांधी कधीच भाजपावासी झाले आहेत. राजकारणात सत्तेसाठी पिता-पुत्रात, काका-पुतण्यात, भावा-भावात वादाच्या घटना जगभरात झालेल्या आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत, आणि आज अनुभवयासही येतात. वाराणसीतून काॅग्रेस तर्फे कोणी निवडणूक लढवावी आणि वाराणसीतून निवडणूक प्रियंका गांधीनी न लढविणे व त्यासंबंधी काँग्रेस पक्षांतर्गत उठलेला विवाद ह्या बाबी काँग्रेस पक्षाचा अतंर्गत मामला आहे. त्यावर भाजपाने टिका-टिप्पणी करावयाची काही गरज नव्हती. पण भाजपाच्या अतिउत्साही नेत्यांनी तिखट टिप्पणी केली. त्यातून काँग्रेस समर्थक व भाजपा समर्थकांमध्यें इलेट्राॅनिक, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर शाब्दिक चकमकी सुरू झालेली दिसली. कारण मौसम निवडणूकीचा आहे. एक तटस्थ मतदार म्हणून मी ह्यावर चर्चा मांडत आहे असे म्हटले तरी आपण सारेच मान्य करतील असे नाही. कारण माझ्या लेखातून भाजपाचे समर्थन होत असते, हे मी मान्य ही करतो. परंतू राजकारणातील घराणेशाहीवर मी वेळोवेळी नाराजी व्यक्त करीत आलो आहे. भाजपाचे मी समर्थन करतोय ह्याचे कारण केवळ मी हिंदुत्ववादी आहे म्हणून करीत आहे असे नाही. भाजपाने एका सामान्य घराणातल्या नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी नाव घोषित करण्याचे धैर्य दाखविले व जगाला दाखविले की इथे खरी लोकशाही नांदत आहे. जे राजकीय पक्ष पक्षांतर्गत लोकशाही पाळत नाहीत, त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी लोकशाहीचा उदोउदो का करावा? केवळ मतदानाचा हक्क बजावितात म्हणून? भाजपेतर पक्षात जी घराणेशाही आहे ती मला पटत नाही. म्हणून मी भाजपाचा समर्थक आहे. आजच्या पिढीतल्या असंख्य युवकांना राजकारणातील घराणेशाहीची घृणा वाटत आहे हे मान्य करण्याचे धाडस भाजपेतर पक्ष दाखवू शकतात का, हा एक दुसरा प्रश्न आहे. त्याचे उत्तर काळच देईल ह्यावर माझा विश्वास आहे. कारण एखाद्या घराण्यात एखादी शतकोत्तर व्यक्ती होऊन गेली की त्या शतकोत्तर व्यक्तींची पुण्याई फार तर पुढील तीन पिढ्या पर्यंत पुरते. मग क्षेत्र कुठलेही असो. हे सत्य आपण अनुभवत आहोत. अपवाद फक्त उद्योग क्षेत्रातील टाटा समूहाचा. ह्याचे कारण टाटा समूहाने सामूहीक नेतृत्वाची कास प्रथम पासूनच धरली हे होय.
प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढवित नाहीत अशी घोषणा झाल्यावर लागलीच भाजपा समर्थक व काँग्रेस समर्थक हे आपआपसांत मिडीयाद्वारें भिडायला लागले. भाजपाचे समर्थक म्हणत आहेत की ' मोदींच्या समोर लढायला प्रियंका बिथरली.' त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटले, " प्रियंकासमोर लढावे लागेल ह्या भितीपोटी मोदींनी भला मोठा रोड शो आयोजित केला व त्यासाठी बिहारमधून कार्यकर्ते आणले." पण हा युक्तीवाद तितकासा पटत नाही. उलट मोदींचा रोड शो पाहूनच प्रियंकाने माघार घेतली असावी हा अंदाज अधिक सत्यतेच्या जवळ जातो. कारण प्रियंका वाराणसीतून निवडणूक लढविणार अशी हवा निर्माण केली होती. ती मिडीयाने निर्माण केली असे म्हणता येत नाही. कारण काॅग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधीनी ह्या बाबत पत्रकारांसमोर जे उत्तर दिले होते ते पुरेसे आहे. काय म्हणाले होते राहूल गांधी ? राहूल गांधी म्हणाले होते की " सस्पेन्स रखना अच्छा है ना ! " मला वाटते, काॅग्रेसची ती एक राजकीय चाल होती. राजकीय चाल म्हणण्यापेक्षा रणनीती होती असेच मानणे योग्य होईल. कारण आपल्या येथे निवडणूक ही रणभूमीच ठरली आहे. वस्तुस्थिती अशी आहे की प्रियंका नवखी आहे. व प्रथमच निवडणूक लढवून पराभूत झाली तर काय, हा विचार काँग्रेस धुरीणांना सतावीत होताच. कारण मोदी सरकार विरूद्ध ॲन्टी इन्कम्बन्सी फॅक्टर तिव्र स्वरूपात दिसत नाही. त्यातही प्रियंका नावाचे कार्ड काँग्रेसने मैदानात आणले पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. मग ' झाकली मूठ सव्वा लाखाची ' हेच उचीत आहे, असे काँग्रेस धुरीणांनी ठरविले असेल तर त्यात वावगे काय आहे? प्रश्न भाजपाच्या समर्थकांच्या टिकेचा नाही तसेच काॅग्रेस समर्थकांनी त्यावर प्रत्युत्तर देण्याचाही नाही. त्यातून मुळ प्रश्न मागे पडला. तो मूळ प्रश्न हा आहे की काँग्रेस पक्षात राहूल समर्थक आणि प्रियंका समर्थकांत खरोखर भांडण आहे का, आणि असेल तर त्याचा परीणाम ह्या निवडणूकीत होईल का?
काँग्रेस पक्षाला आहोटी का लागली ह्यासंबंधीची कारणें सर्वांना ज्ञात आहेत. आज काँग्रेस प्रणित आघाडीचे अस्तित्व काही राज्यापूरता मर्यादीत आहे. राहूल गांधी व प्रियंका गांधी मातब्बर राजकीय नेते नाहीत. तसेच ते पुढे मातब्बर होतील असेही नाही. त्या संबंधीचा Law of Nature मी वर मांडला आहे. ह्या दोघां भावा-बहीणीतील समर्थकांमध्यें वर उल्लेख केला आहे तसा विवाद असेल का? तर त्याचे उत्तर ' असू शकतो आणि नसेल ही. ' आणि असला तरी तो आता उफाळून वर येईल असेही नाही. निवडणूका राहूल गांधीच्या नेतृत्वाखाली लढल्या जात आहेत. अगदी गांधी घराण्याशी जवळीक असलेल्या सुत्रातर्फे राहूलने प्रियंकाला तिकीट नाकारले असे कळले तरी काँग्रेसच्या शक्तीवर नकारात्मक परीणाम होणार नाही. कारण प्रियंका गांधीच्या प्रचारातील सहभागाने काँग्रेस साठी सकारात्मक बदल झालेला दिसलाच नाही. उद्या जरी ह्या भावा-बहीणीमध्ये राजकीय वारसा वरून कलह उद्भवला व दोन पक्ष झाले तरी त्याचे नवल वाटू नये. पण तसे उभे झालेले दोन्ही पक्ष युपीए मध्येच राहतील. युपीए मध्ये एका नव्या पक्षाची भर पडेल इतकेच. गरज नव-नवीन पक्ष निर्माण होण्याची आहे का? जितके पक्ष आजच्या घडीला घराणेशाहीवर आधारीत आहेत ते सारे आज ना उद्या फूटीच्या उबंरठण्यावर येणार आहेत. मग आम्ही नवीन भारत निर्माण करण्याच्या वल्गना कशाला मारावयाच्या? नवीन पक्षांची निर्मीती थांबविण्याचे कार्य घराणेशाही असलेल्या पक्षांचे कार्यकर्तेच करू शकतील. त्यांनीच आपआपल्या पक्षांतर्गत लोकशाहीचा हट्ट धरावयास हवा. एकदा की एका पक्षात असा अट्टाहास सुरू झाला की त्याचे लोण इतर घराणेशाही पक्षात आपोआप पसरेल. कारण पुढचे कार्य काळच उरकेल. पण काळाची वाट बघत बसलात, तर काळ महाकाळाचे रूप घेऊन येतो हे घराणेशाही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वेळीच लक्षात घेणे उचीत ठरेल.
तरीही आपल्या राजकीय व्यवस्थेत एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे साम्यवादी पक्षांत घराणेशाही नाही तरी त्यांचा र्हास का सुरू झाला? उत्तर अगदी सोपे आहे. पहीली गोष्ट म्हणजे साम्यवादी पक्षाने आपल्या भूमीत फारसे बाळसे धरले नव्हतेच. जे काही धरले होते ते ही पहीले पंतप्रधान पंडीत नेहरू व पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मेहरबानीमूळेच. साम्यवादी पक्षात घराणेशाही नसुनही उभी फूट पडली ह्याचे कारण आपल्या येथील साम्यवादी पक्षांचे नियंत्रण चीनमधील साम्यवादी नेत्याने ठेवावे की रशियातील साम्यवादी नेत्याने ठेवावे ह्यावरून भारतीय साम्यवादी पक्षातील कार्यकर्त्यात वांदग माजला. व त्यातून भारतिय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशी फूट पडली. मार्क्सवादी पक्षात प्रकाश करात, व सिताराम येचूरी असा वाद आहेच. भारतात छोटे-मोठे डावे पक्ष व संघटना अनेक आहेत. शेवटी प्रत्येकाचे हितसंबंध (विदेशी चलनातून मिळणारी मदत) असताच ना ! त्यातच जगभरात साम्यवादाची वर्गरहीत समाजाची कल्पना वास्तवात उतरली नाही. ह्या शिवाय आणखिन एक कारण आहे ते म्हणजे, 'धर्माचे अधिष्ठान मोडून रक्तरंजीत क्रान्तीतून सत्ता प्राप्त करण्याची साम्यवादी पक्षांची रीत भारतीय समाजाला भावली नाही. '
ह्या उलट शांततेच्या मार्गाने हिंदू जीवनमुल्यांवर आधारीत संस्कारक्षम व सेवाधर्माचे व्रत घेणारे, शारिरीक , मानसिक व बौद्धिक दृष्ट्या सक्षम असलेले लाखो स्वयंसेवक निर्माण करीत, अहोरात्र सामाजिक समरसतेचा व देशभक्तीचा मळा फुलवित असणारी, जगातील सर्वात मोठी अशी सांस्कृतिक संघटना म्हणून लौकीक प्राप्त केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय समाजाने आपलेसे केलेले दिसत आहे. हे ही एक महत्वाचे कारण आहे, की ज्यामूळे आज सर्वत्र भारतीय जनता पक्षाचा बोलबाला होताना दिसतो आहे. म्हणूनच प्रियंका गांधी नावाचे काँग्रेसचे ट्रम्प कार्ड निकामी ठरले आहे.
Kup sunder avlokan
उत्तर द्याहटवा