'सरत्या वर्षाची आग , नववर्षाचे आगमन ' ह्या लेखात मी म्हटले आहे की नवीन काही घडलं की काल परवा जे घडलं ते होणार स्मृतीआड. मुबंईतील आगीची घटना एका दिवसाच्या आत स्मृतीआड गेली. त्या लेखाच्या शेवटी मी म्हटले आहे कि 'आता आपण आपआपल्या नेत्याचा डावपेचाचा खेळ पाहात बसावे'. 'मिडीया मधील सूत्र नावाचे अपत्य' ह्या लेखातही म्हटले होते की, राजकारण हा राजकीय नेत्यांचा व्यवसाय आहे. व्यवसायाचा स्वभाव बनतो. आणि स्वभावाला औषध नसते. म्हणून सर्वसामान्य राजकिय कार्यकर्त्यांनी आपली राजकीय अस्मीता, जातीय अस्मीता टिकविताना आपआपल्या नेतमंडळीच्या आवाहनाला फार आहारी जाऊ नये, त्यातून दंगल उद्भवते, रक्त आपल्याच बांधवाचे सांडले जाते. राजकीय नेत्यांची मूले वयात आली की आपोआप नेते होतात त्यामुळे ते कुठल्याच अंदोलनात सामील नसतात. मात्र आपल्या पाठीमागे दंगलीचा गुन्हा, मग पोलीस कचेरी आणि कोर्टाच्या पायर्या चढण्याचा ससेमिरा लागतो. पण ऐकतो कोण? राजकीय नेते आपली पोळी भाजतात. कच्ची राहीली की पुन्हा तवा गरम करीत असतात. तवा तोच पण पोळीचं पीठ आणि शेगडी वेगळी.
आपला देश पहिल्यादां महंमद गझनी, खिलजी तैमूरलंग असे आक्रमक ह्यांच्या ताब्यात. नतंर तुर्की, मोगल, पुढे इंग्रजांच्या गुलामीत राहीला. दुर्दैवाने आपण एक हजाराहून अधिक वर्षे पारतंत्र्यात का राहीलो ह्यामागची कारणें नीटपणे इतिहासाच्या अभ्यासात शिकविली गेली नाहीत. म्हणून स्वातंत्र्याची खरी किंमत आपल्याला कळलीच नाही कि काय असा प्रश्न जातीय तणाव निर्माण झाल्यानंतर पडतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे झटले, जे फासावर गेले, जे कारावासात गेले अशा थोर पुरषांचेही आपण विभाजन करून ठेवले आहे. गांधीवाद्यांना गांधी कळले नाहीत; आबेंडकरवाद्यांना आबेंडकर कळले नाहीत, मार्स्कवाद्यांना कार्ल मार्क्स समजले नाहीत. सावरकर समजण्याची कुवत कुणाकडे नव्हतीच. कुठे इंदिरा गांधी कुठे राहूल गांधी, कुठे साबरमतीचे संत कुठे बारामतीचे संत, कुठे बाबासाहेब आबेंडकर कुठे प्रकाश आबेंडकर आणि रामदास आठवले. मुळात आपला देश जातीवादात दुभंगलेला, त्यात राजकीय विचारसरणीच्या नावाखाली आणखीन एक आधूनिक विभाजन का व्हावे? सध्यातरी आपले सर्वात मोठे शत्रू गरीबी, अंध्दश्रध्दा, अज्ञान, आर्थिक निरक्षीरता, दहशतवाद हेच होत. देशाच्या कुठल्याही भागात, कुठल्याही ज्ञातीत, कुठल्याही संप्रदायात हे सारे शत्रू ठाण मांडून बसलेले आहेत. ह्या शत्रूंचा पराभव आपल्यालाच करावा लागणार. कुठलीही परकीय शक्ती मदत करणार नाही आणि केली तरी त्यात स्वातंत्र्याला, स्वार्वभौमतेला धोका असणारच. कारण जागतिक राजकारणाच्या रंगमंचावर कसलेही आरक्षण नसते. तिथे बळी तो कान पिळी हाच न्याय आहे.
ह्याच न्यायाचा खोलवर विचार करून एके काळी काँग्रेसचेच कार्यकर्ते असलेले डाॅ. केशव बळीराम हेडगेवार ह्यांनी देशहिताला सर्वोच्च प्राधान्य ठेवून १९२५मध्ये सारा हिंदू समाज एका छत्राखाली, उच्च-नीच्च भेदभाव विसरून, समरसतेच्या भावनेने नैसर्गिक रित्या एकत्र येईल अशी संघटना स्थापन केली. तिचेच नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ह्या संघटनेची व्याप्ती, इतिहास, त्यागी नेत्यांची, स्वयंसेवकांची चरीत्र तसेच समाज व राष्ट्र निर्माणातील योगदानाची माहीती द्यावयाची झाल्यास एक मोठा ग्रंथ निर्माण होऊ शकेल. विस्ताराभयाने इतकंच सांगतो कि इथे कोणीही किशोर वयीन, युवक, जेष्ठ नागरिक प्रवेश घेऊ शकतो. ना प्रवेश फी, ना प्रवेशासाठी फार्म. असे एकही क्षेत्र नाही, ह्या खंडप्राय देशाचा एक कोपरा ही नाही, जिथे संघाची सेवाभावी संस्था, आणि शाखा नाही. अनेक नैसर्गिक आपत्तीत देशवासीयांच्या मदतीला स्वयंसेवक धावून जातात. हे सर्वश्रूत आहे. महात्मा गांधीजी, लोकनेता जयप्रकाश नारायण सारख्या विभूतींनी ह्या संघटनेच्या सेवा कार्याबद्दल प्रशस्तीपत्र दिलेले आहे. अशा संघटनेवर भाजपा सोडून सारे पक्ष सतत टिका करीत असतात. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधीनी लागलीच ट्विटद्वारे कोरगाव भीमा येथील तणावाला RSS आणि भाजपावर दोष ठेवला. श्री शरद पवारांना उजव्या शक्तीचा हात दिसला. सत्तेसाठी काँग्रेसचा हात दिसतो. कारण तो तसा उबदार असतो. काँग्रेस आणि समाजवादी पक्षांची राष्ट्रसेवा दले होती. परंतु त्या संघटनां अंकूर येण्याअगोदरच मृत अवस्थेत गेल्या. आपलं मुल नापास झाल्याचं दूःख दुसर्या कोणाच्या मुलाच्या यशाबद्दल हेवा करून कमी होत असते कां? राहूल गांधीचं सोडून देऊ पण ज्यांनी पुरोगामी आघाडीचं सरकार स्थापण्यासाठी संघाची मदत घेतली त्या शरद पवारांना पटत कसे नाही? समाजात स्थायी समता ही कायद्यापेक्षा समाजबांधांवामधील परस्पर स्नेह आणि ममत्ववर अधिक अवलंबून असते. तसेच लोकशाहीचा कारभार कायद्यापेक्षा देशवासीयांच्या सामंजास्यांतून लौकीकास पात्र होत असतो. ह्याची प्रचीती ज्या कोणाला घ्यावयाची आहे त्यांने कसलाही संकोच न करता संघाचा स्वयंसेवक बनावे. येत्या ७ जानेवारी सांयकाळी ५ ते ७ ह्या वेळात कोकण, रायगड मुंबई ,ठाणे पालघर ह्या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदू चेतना दिवस साजरा होत आहे. आपला हुद्दा, आपली मातृभाषा, लींग जात-पात विसरून ह्या कार्यक्रमात सामील होऊन सज्जन शक्ती सर्वत्र निर्माण करण्यासाठी आपले योगदान देण्याचे संघाने जे आवाहन दिले आहे त्यास समस्त हिंदूनी प्रतिसाद द्यावा. संघ कसा आहे हे ही प्रत्यक्ष अनुभवयास येईल.
कोरेगाव भीमाच्या लढाईसंबंधी पुष्कळशी माहीती सोशल मिडीयावर झळकलेली आहे. म्हणून त्यासंबंधी चर्चा करावयाची गरज नाही. त्या लढाईसंबधीची खरी सत्यता हीच की ती घटना ब्रिटीश सत्ता स्थिरावत होत असतेवेळी झालेली आहे. म्हणून जो काही पराभव झाला होता असं म्हटलं जातं, तो संपूर्ण भारतीय समाजाचा झाला होता. आपल्या देशाचाच तो पराभव होता. त्या लढाईस ब्राह्मणां विरूध्द महारबांधव असं स्वरूप नंतरच्या काळात प्रचलित झालेलं दिसतयं. पेशव्यांच्या सैन्यात फक्त ब्राह्मण सरदार होते का? शिवशाही वेगळी आणि पेशवाई वेगळी, ही व्याख्या हिंदवी स्वराज्यात कधीही नव्हती. मराठ्याचा इतिहास पेशवाई शिवाय लिहीता येईल का? पानिपतावर प्राण गमावलेल्या आणि तिथून प्राण वाचवून पळून आलेल्यांच्या जाती आपण तपासणार आहोत का? तसे असते तर माधवराव पेशव्यांनी महादजी शिंदे, मल्हारराव होळकरांना पुन्हा उत्तरेची धूरा दिली नसती. त्याच माधवराव पेशव्यांनी शनिवारवाड्यातील यज्ञयागावर तसेच शिवाशीव, पाळण्यास बंदी घातली होती. का तर शनिवारवाडा राजकारणाचा आखाडा आहे, तिथे कर्मकांड नको, तसेच दरबारातील दौलतीच्या नव्हे तर खाजगी पैशातून अशा समारंभाचा खर्च करण्याची ताकित खुद्द आपल्या मातोश्रींना दिली होती. त्यामुळेच गोपिकाबाई शनिवरवाडा सोडून गेल्या. हा इतिहास कूणाला आठवतो की नाही? अस्पृशता हा शाप आहे आणि दुर्दैवाने त्याचे उच्चाटन मराठ्यांच्या राज्यात होऊ शकले नाही. परंतू जरी एकवेळ आपण हे खरे मानले की महारांनी ब्रिटिशांना विजयी केले तरी तो समाज म्हणून ,राष्ट्र म्हणून आपलाच पराभव ठरतो. विविध आक्रमकां विरूध्द ज्या काही लढाया आपले राजेमहाराज हरले त्यास मुख्यत्वे राजे महाराजांमधील एकतेचा अभाव, विलासी वृत्ती, फितूरी, गृहकलह ह्याच कारणांमुळे. फक्त क्षत्रियांनीच शस्त्रे हाती घेण्याचा मानलेला धर्म, हे ही एक मोठं कारण होतच की. इतिहास हा जेत्यांचाच असतो. आपल्याला प्रत्येक क्षेत्रात विजयी व्हावयाचं असेल तर पराभवाचा इतिहास उगाळीत बसण्यासारखा मुर्खपणा करून चालणार नाही. अशाप्रकारचा इतिहास उगाळीत बसलो तर आपल्या देशातील युवकांच्या शक्तीचं जिला आजच्या आर्थिक जगात एक Powerful Human Resources मानलं जातं, तिच खच्चीकरण होईल.
आरक्षण,जातीय अस्मीता इत्यादी शस्त्रे काॅग्रेसने गुजरातच्या निवडणूकीत वापरले. त्यावेळी काॅग्रेस फार मोठी धोकादायक खेळी करीत आहे असे तेथील निवडणूकीच्या संदर्भातील लेखात मी म्हटले आहे. गुजरातमधील जिग्नेश मेवानी पुण्यात येऊन गुजरात निवडणूक पॅटर्नचा खेळ मांडून गेला. मुबंईतील उद्योगधंदे गुजरात मध्ये घेऊन जातात, असा मोदीजींवर खोटा आरोप करणारी काॅग्रेस आणि राष्ट्रवादीची मंडळीं जिग्नेश मेवानीला पाठींबा कसा काय देतात? उत्तर एकच. येणार्या निवडणूकीसाठी दिसणारा फायदा. काॅग्रेस आणि राष्ट्रवादी ह्याची सध्या पाण्याविना माशाची तडफड होते, तशीच स्थिती झाली आहे. विकास पागल झाला असा प्रचार करणार्या काॅग्रेसला पाटीदारांना आरक्षण देता येणार आहे कां? विकास पागल कधी झाला वा कधी होणार, तो होऊ द्या, पण आरक्षणाच्या मृगजळावर अनेक सवर्ण जातीतील लाखो युवक पागल होतील त्याच काय? कोरेगाव भीमा लढाईवरून जो जातीय तणाव निर्माण झाला आहे, त्या सदंर्भात जवळपास जाईल असे भाष्य करणारी व्यक्ती दुसरी तिसरी नसून ज्या ब्रिटीशाने आपल्यावर राज्य केले, त्याच देशाच्या बीबीसी ह्या मिडियातील जेष्ठ पत्रकार मार्क टूली ह्यानींच केलेलं आहे. पंतप्रधान मोदीजींची स्तुती करताना एके ठीकाणी त्यांनी म्हटले आहे की "मोदींजीनां अपेक्षीत असलेला भारत निर्माण करण्याच्या मार्गात काही लोक काटे ठेवत जातील, निरनिराळे अडथळे निर्माण करतील , तरीही मोदीजी भारताला प्रगतीपथावर नेतील". आपल्या पंतप्रधानाचं कौतुक थोडा वेळ बाजूला ठेवू या. ज्यांनी फोडा आणि झोडा ही निती अवलंबून आपल्या देशावर राज्य केलं त्या देशातल्या पत्रकाराला त्यांच्यांच पुर्वजांनी दिलेला कुटील नीतीचा विषारी डोस भारतीयांच्या मनांत किती खोलवर साचून गेला ह्याबाबत इतकी पक्की खात्री असणं ही बाब मार्क टूलींच्या देशवासीयांसाठी कौतुकास्पद पण आपल्यासाठी पराकोटीची लज्जास्पद बाब आहे. आम्हाला एक समाज म्हणून होऊ द्यायचंच नाही असेच ब्रिटीश कालीन धोरण राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्या नंतर सुरूच ठेवले. राजा कालस्य कारणंम्!
आपल्या देशातीलच विविधता काय घेऊन बसता राव, जगभरच्या सार्या देशात, इतकचं काय ह्या विश्वातही विविधता थाट मांडून बसली आहे. जसे आपल्या समाजात दोष होते, आहेत तसे जगातल्या प्रत्येक देशातील समाजात वेळोवेळी होतेच. आणि कमी अधिक प्रमाणात आजही आहेत. Imbalance is the feature of this universe. ( माझ्या ब्लाॅगवर 'चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविगाशः' ह्या लेखात सविस्तर वाचावयास मिळेल) परंतु निसर्गात विविधता असूनही एक सुनियोजीत व्यवस्था आहे, तशी ह्या भूतलावर निर्माण करता येऊ शकते. परंतु तशी आदर्श समाज व्यवस्था जगात निर्माण करून दाखवायाची असेल तर प्रथम आपल्याला देशापासून करावी लागेल. कुठच्याही अंदोलनात मी जेव्हा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो, तेव्हा मी कुठल्याही जातीचा नसतो, कुठल्याही संप्रदायाचा नसतो,कुठल्याही प्रान्ताचा नसतो, मी असतो फक्त आणि फक्त भारतीय नागरिक असतो. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करून हक्क मागतो तेव्हा मला ज्या आईने वाढविले, तिच्याकडून काय हवे ते मागण्यासाठी तिचीच मारझोड करीत आहे, हे लक्षात येत नसेल तर मी नराधमच की. माझे हक्क मागताना मी दुसर्या नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत करणार नाही अशी भावना उत्पन्न होऊन आचरण करणे, हीच देशभक्तीची बावनकाशी व्याख्या आहे. ह्यासंब॔धीचं माझं सविस्तर मनोगत ' देशभक्ती नारेबाजीत नव्हे, अंतःकरणात असावी '. ह्या लेखात मी मांडले आहे. जे काही फोडायचं आहे, तोडायचं आहे, मोडायचे आहे, ते म्हणजे आपले अवगुण, आपला अंहकार, जातीय अस्मीता, आणि राजकीय विचारसरणीच्या शृखंला. कन्हैया, मेवानी, अल्पेश ठाकोर इत्यादी मंडळीं सतत आजादीचा घोष करीत आहेत. खरोखरच आजादी हवी असेल तर माझं त्यांना सांगणं आहे कि स्वतः पंतप्रधान बनण्याचं स्वप्न उराशी बाळगा. ठोस कार्य करा. व्यापक व्हा. विधायक कार्य करा. स्वाभिवानी व्हा, आणि जिथे तुम्हाला पंतप्रधानपद तुमच्या कौशल्यावर मिळेल तिथे जा. आपल्या देशात मोदीजी पंतप्रधान बनू शकतात तर तुम्ही का होणार नाहीत? हा आपला इतिहास नाही का? महामानव बाबासाहेब आबेंडकर हा ही आपला इतिहास आहे ना? आधूनिक भारताच्या इतिहासातील सोनेरी पानें वाचा. डाॅ बाबासाहेब आबेंडकर म्हणाले होते कि संघर्ष करा पण इतिहासात माझं नाव वितंडवादी होईल असे कृत्य करू नका. हा उपदेश सदैव ध्यानात ठेवा. यशश्री तुमची वाट पाहात आहे.
उत्कृष्ट!म्हात्रेजी,फारच छान!या लेखाला व्यापक प्रसिध्दि मिळायला हवी.
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट,माहितीपूर्ण लेख आहे!
उत्तर द्याहटवा