गुरुवार, ६ जुलै, २०१७

आषाढी एकादशी निमित्ताने



आज आषाढी एकादशी. आपल्या हिंदू धर्मातील मान्यते नुसार भगवंत चार महिन्यासाठी झोपी जातात. मागील लेखात मी भगवंतांचं स्वरूप जशी दृष्टी तसे त्या शक्तीचं रूप असे म्हटलेलं आहे. आणि त्यातूनच विविध स्वरूपाने नटलेल्या त्या शक्तीचं रूप ज्यांना जसं दिसलं ते ते त्या धर्माचे संस्थापक म्हणून गणले गेले आणि त्यानुसार धर्मांची नावे उदयास आली असावीत. असा निष्कर्ष आपण काढला. आपल्या धर्माची व्याख्या फार व्यापक असल्यामुळे,आणि कोणी संस्थापक नसल्यामुळे 'जो समाजाची धारणा करतो तोच धर्म ' तोच शाश्वत धर्म,असे आपण मानले. आणि तोच हिदूं ह्या नावाने ओळखला जातो. त्यामुळे आपल्या सर्व सणांच्या उद्दिष्टांमागे कुठलंतरी एक सामाजिक प्रयोजन असतेच. ह्यासंबंधीचं परिपूर्ण आणि सुरेख विवेचन स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांच्या ' संस्कृती पूजन ' ह्या पुस्तकात आढळते. पूजनीय शास्त्रीजी देवशयनी एकादशीच्या निमित्ताने संदेश देतात तो असा "कर्म करा पण अभिमान करू नका. कर्म करतांना ' मी ' ची समाधी लागू दे. 'अहम ' गाडा, झोपू द्या. प्रभू झोपी गेला म्हणजे अहम् न ठेवता तो स्वतःचे कर्म म्हणजे जगव्यवहार करीत राहिला". अशा प्रभूचं स्वरूप ज्यांना पुर्णपणे कळले आणि आपल्यातील 'अहम् ' ला गाढून ज्यांनीं जगाच्या उद्धारासाठी आपलं जीवन वेचलं ते देवदूत वा संतजन. त्यांचा ह्या भूतलावरील वावर ही सृष्टीची आपल्याला मिळालेली देणगी होय.

संतांच्या शिकवणीत आणि त्यांच्या साहित्यात समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणी शुद्ध भाव निर्माण करण्याची क्षमता आहे. संतंमंडळींचं चरीत्र आणि त्यांचे साहित्य थोडेफार जरी कळले, तरी त्यांच्या बुद्धीमत्तेचा आवाका पाहून आपण अचंबित होतो. ह्या संतमडंळींचा भूतलावरील वावर पाहिला, तर आपल्या लक्षात येते कि ही सारी मंडळी एकाच जन्मात शांतीदूत, तत्ववेत्ता, साहित्यिक, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, प्रबोधनकार, समुपदेशक, व्यवस्थापनकुशल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानवजातीचेच नव्हे तर सार्या प्राणीमात्रांचे पालक होते. आपण म्हणतोच कि "जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती!". मंडळी, आपल्याच नव्हे तर जगभरातील सर्वच संतांनी आपआपल्या परीने, आपआपल्या भाषेत जो काही उपदेश दिला आहे, त्यात फारसा फरक नाही. तसेच संतांच्या वाटेला आलेली उपेक्षता, छळ ह्यातही बरेच साम्य दिसून येते. संतांच्या संपूर्ण कार्यावर तसेच साहित्यावर चर्चा करणे ही अशक्यप्राय बाब आहे. एक सत्य असे आहे कि संतांना सारी सृष्टी प्रिय होती तसेच सृष्टीतील सत्यें त्यांनी जाणली होती आणि ही बाब त्यांनी आपणांस सांगितलेल्या जीवनमूल्यांतून समजू शकते. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शुध्द भाव रूजावा ह्यासाठी संतांनी नामस्मरणावर भर दिला. ह्यामागे एक मानसशास्त्रीय सत्य असावे ते असे की, माणूस जन्मतो आणि चालायला, बोलायला लागतो,असे घडत नसते. संतानांही संतपदापर्यत पोहोचताना कुठली तरी शक्ती मग ती गुुरूरूपाने किंवा एखादी घटना वा अनुभूतीच्या रूपाने मदतगार ठरली होती.  कुठलीतरी एक शक्ती ह्या विश्वाचं नियंत्रण करीत असते. त्या शक्तीचं जे रूप आपल्याला भावते त्या शक्तीला शरण जाणे म्हणजेच नामस्मरण होय!  त्यातून आपला अंहकार जो जन्मताच आपल्यात असतो, तो कमी होतो. तसेच जन्मतः भीती असते तीही नष्ट होण्यास मदत होते. म्हणजेच आत्मविश्वास वाढतो. आणखिन सांगायचे म्हणजे, आपल्या शरीरात ऊर्जेचा प्रभाव हृदयाखालोखाल मेंदूत जास्त असतो. नामस्मरणामूळे आपल्या शरीरात विराजमान असलेली सकारात्मक ऊर्जा सशक्त बनते आणि चंचल असलेले मन स्थिर बनते. त्यातून एकाग्रता वाढते. कुठल्याही क्षेत्रातील यशाचा मार्ग आत्मविश्वास आणि एकाग्रतेतूनच दिसतो. हे सत्य तर आपल्याला दैनंदिन जीवनातही अनुभवयास येते. शेवटी यश हेच तर स्वर्गीय आंनदाचं दूसर नाव आणि तेच परमआत्म्याचे सत् चीत् आनंदमय रूप. 

नामस्मरणाबरोबर सुसंगतीचं महत्व, श्रमाचं वा प्रयत्नाचं महत्व, परोपकार आणि परपीडा न देणे ह्यावरही संतानी जास्त भर दिलेला आहे असे मला वाटतं. आपले तुकाराम महाराज म्हणतात "संग सज्जनांचा, उच्चार नामाचा!". मोरोपंतांनी म्हटलं आहे, "सुसंगती सदा घडो!". दूर्जनांची संगत घडली कि, निसर्ग नियमानुसार आपण सराईत गुन्हेगारच होणार. मग कूठल्या क्षेत्रात काम करता हा प्रश्न गौण आहे. प्रत्येक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात फसवाफसवी, बनावटगिरी असतेच. दूर्जन वा दूष्टप्रवृत्तीची लोक मूळात असतातच कां? किंवा सामान्यतः माणूस पूर्णतः शुध्द अंतःकरणाचा का नसतो? हा आपल्याला नेहमी सतावणारा प्रश्न. त्याचही उत्तर सृष्टीचा नियम वा तत्व ह्यातच दडलं आहे. जशी झाडावरून कोकीळेचं मधुर कुजंन ऐकू येते तसाच आपणांस भयभीत करणारा घुबडाचे कर्कश खेसकणेही ऐकू येते. निसर्गात काटेरी झूडपे कशीही आणि कोठेही वाढतात. त्यांना त्यांच्या वाढीसाठी, ना सूर्यप्रकाश लागतो, ना पाणी! ना खतें, ना मशागत! आंबा-फणसांच्या झाडांच्या वाढीसाठी किती अपार कष्ट लागतात, हे आपण पाहतोच आणि म्हणूनच सत्संगला संतांनी मानवी जीवनात अग्रकमाने महत्व दिल्याचे दिसून येते. सत्संग महत्वाचा का? असा प्रश्न नारदमूनींनाही पडला होता. तेव्हा भगवंतांनी त्यांच्या शंकेचं निरसन केले. त्यासंबंधीची एक कथा पूजनीय श्री रामकृष्ण क्षीरसागरमहाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितली आहे. ती थोडक्यात अशी आहे.

देवर्षी नारद, भंगवंताना "सत्संगचे जीवनात महत्व काय?",असा प्रश्न विचारतात. तेव्हा नुकताच जन्मलेल्या एका किड्याला हा प्रश्न विचारून ये. असे भगवंतं सांगतात. नारदमूनी किड्याला तो प्रश्न विचारतात, तात्काळ किडा मरून पडतो. भगवंतं नारदानां नुकताच जन्मलेल्या कूत्र्याकडे पाठवितात. प्रश्न तोच. नारदानी प्रश्न विचारला तेव्हा ते कूत्रं मरण पावते. नंतर गाईच्या वासराबाबतीत असेच घडते. आपल्या प्रश्नामूळे तिघांना मरण आले ही बाब नारदांच्या जिव्हारी लागली. भगवंतांनी त्यांच सांत्वन केलं आणि हाच प्रश्न तेथील राजघराण्यात नुकताच जन्मलेल्या बालकाला जाऊन विचार अशी आज्ञा केली. नारदमूनी अनिच्छेनेच राजमहालात जातात. राजाने यथोचित स्वागत केले. नारदांनी राजाचे पूत्रलाभानिमित्त अभिनंदन केले आणि सांगितले कि मला तुमच्या बाळाला एक प्रश्न विचारायाचा आहे. राजाने आश्चर्याने म्हटले, "देवर्षी, ते नुकतेच जन्मलेले बाळ कसे काय उत्तर देऊ शकेल". नारदांनी म्हटले, "राजन तशी भगवंतांची आज्ञा आहे." राजाने नारदांना बाळापाशी नेले. नारदांनी बाळाला विचारले, "बाळा,संत्संगचे महत्व काय?" आणि काय आश्चर्य! त्या बालकाने उत्तर दिले, "देवर्षी मी किडा असताना तुम्ही हा प्रश्न विचारीत आहात, तेव्हापासून तुमच्या संगतीतून मला उत्तोरत्तर उच्च कूळात जन्म मिळत गेला आणि आता राजकूळात जन्माचं भाग्य लाभलं. नारदांना सत्संगचं महत्व कळले. सुसंगतीतून सत्याचा साक्षात्कार होतो तर कूसंगतीत सत्यानाश होत असतो. संतांनी सुसंगतीसाठी इतका कमालीचा आग्रह का धरला असावा, ह्याच कारण काय असू शकते? इथेही वैश्विक सत्य दडलेलं दिसते. ते सत्य असे कि "Man gets attracted towards bad ideas in faster manner". विकृतीकडे मानवी मन लौकर धावते. त्याच बरोबर विकृतीचं लोण ही लौकर पसरते. हयावरून संतांचा मानसशास्त्र व समूह मानसशास्त्राचाही (Group Psychology) अभ्यास होता, हे स्पष्ट दिसते. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम सत्संग निर्माण केला. त्यातून वारकरी पंथ निर्माण झाला,आणि बहरला. समतेचा झेंडा फडकला. आणि आज पढंरीची वारी जगभरातील अनेक विद्वानांच्या कुतूहलाचा विषय ठरला.

संतांनी सृष्टीतील आणखीन सत्य जे आपणासमोर मांडले आहे, ते हे कि "जी सृजन होते ती सृष्टी". आणि विधात्याने विश्वाची रचना अशी केली आहे, कि इथली सृष्टी सृजन करण्यासाठीचे प्रयत्न वेळोवेळी मानवालाच करावे लागणार आणि तेही आपल्यातील अंगभूत निर्मितीशक्तीतूनच. प्रत्येक व्यक्तीच्या ठायी निसर्गदत्त अशी कुठली तरी कला वा शक्ती असते. "अयोग्यः पुरूषः नास्ती|". समाजातील प्रत्येक व्यक्तीमधील निर्मितीशक्ती, सृजनशीलता शाबूत रहावी, तिच्यात नाविन्यता यावी, तसेच आळसरूपी राक्षसाने ती गिळू नये, त्यासाठी संतानी छोटे-मोठे दृष्टांत सांगून देवाची व्याख्या "यत्न तोची देव" किंवा "प्रयत्नांती परमेश्वर " अशी मांडलेली दिसून येते. क्षेत्र कोठलेही असो, नामस्मरण, सत्संग आणि अथक परिश्रम ह्या मूल्यांचे महत्व अपार आहे. संतंमंडळीनीं नामस्मरणावर भर निश्चित दिला,परंतु सर्वसामान्यांनी आकाशातील देव आपलं भलं करील अशी आशा बाळगून आपल्या ठायी असलेली निर्मितीशक्ती वाया घालवू नये, ह्यासाठी संतंमडंळीनी उपदेश देताना "प्रयत्नांती परमेश्वर " ह्यावर अधिक भर दिलेला दिसतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, " भाग्याचिये भडसे | उद्यमाचेनि मिषे | मग समृद्धीजात आपैसे | घर रिघे |. अग्नी अति सुक्ष्म असला तरी वार्याच्या साह्याने चेतून मोठा होतो त्याचप्रमाणे कर्माच्या साह्याने दैव कितीही दुबळे असले तरी ते चेतले जाऊन मोठं यश मिळून जाते. एडीसन ह्या शास्त्रज्ञाचे म्हणे नऊशे नव्याण्णव प्रयोग असफल झाले आणि नंतर हजाराव्या प्रयोगात त्यांना टेलीफोनचा शोध लावण्यात यश मिळाले. अशा प्रकारे सर्वच क्षेत्रात यश मिळाल्याची उदाहरणे देता येतील. मूळात विद्वत्ता आणि कुवत ह्यांच्यामध्ये एक फरक आहे. An intelligent man not necessarily be an abled man. विद्वान व्यक्ती कर्तबगार असतेच असे काही म्हणता येत नाही. परंतु विद्वत्ता नसतानाही एखादी व्यक्ती कर्तबगार बनू शकते. Ability has to be acquired. कुवत ही कमवावयाची असते. त्यासाठी आलेली संधी गमावयाची नसते. इग्रंजीमध्ये संधीची व्याख्या अशी आहे, Opportunity means a course of action which is immediately possible. काही शास्त्रज्ञ शालेय जीवनात अभ्यासात साधारण श्रेणीचे होते. तसेच काही उद्योगपतीही शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात उच्च श्रेणीचे नव्हते. मूळात जिज्ञासा महत्वाची आणि त्याच्या जोडीला चिकाटी असणे गरजेचे असते. चिकाटी विना जिज्ञासा माणसाला अधिक चंचल बनविण्याचा धोका असतो. एकदा एक अध्यात्मिक गुरू जीवनात चिकाटीचं महत्व आपल्या शिष्याला पटवून देत होते. त्यावेळी एका शिष्याला गुरूला निरूत्तर करण्याची इच्छा झाली. त्या शिष्याने गुरूला विचारले, "गुरूवर्य मी चाळणीत पाणी घालीत आहे,तर चालता चालता मी चिकाटीने कोठवर चालत जावे, जेणेकरून चाळणीत पाणी जमा झालेलं असेल. मला वाटतं ह्या ठिकाणी तुम्ही सांगितलेली चिकाटी उपयोगी पडणार नाही". परंतु गुरू ते गुरूच. गुरूने लागलीच उत्तर दिले, तू चाळणीत पाणी टाकत टाकत उत्तरेकडील शेवटच्या टोकापर्यंत चालत राहा. एक दिवस तु चाळणीत टाकत असलेले पाणी बर्फाच्या रूपात साचलेले आढळेल. संतांनी सांगितलेला यत्न तोची देव, तो अशाच रूपाने दर्शन देतो.

महर्षी व्यासांनी अठरा पुराणातील महत्वाची दोन वचने कोणती ह्यावर उत्तर देताना म्हटले आहे " परोपकाराय पुण्याय,पापाय परपीडनम्|". ह्या सृष्टीचा कारभारच मूळी कर्माच्या सिध्दांतावर आहे. असेच भंगवंतानी गीतेत पदोपदी सांगितले आहे. "पेरीले ते उगवते" "करावे तसे भरावे", संताची ही दोन्ही वचने म्हणजे सृष्टीतील सत्यच होत. पूजनीय स्वामी सुखबोधानंदानी आपल्या "हे मना, रिलॅक्स प्लीज!" ह्या पुस्तकात एक बोधप्रद सत्यकथा सांगितली आहे. ती थोडक्यात अशी आहे - 

फ्लेमींग या स्काॅटीश शेतकर्याने एकदा मदतीकरीता कुणीतरी धावा करीत असल्याचे ऐकले. एक छोटा मुलगा कमरेपर्यंत चिखलात रूतला होता. आणि सुटकेकरीता धडपडत होता. फ्लेमिंगने त्या मुलाचे प्राण वाचविले. दुसर्या दिवशी अत्यंत रूबाबदार पोषाख केलेली एक कुलीन व्यक्ती फ्लेमींगकडे आली आणि म्हणाली," तुम्ही माझ्या मुलाचे प्राण वाचविले. तुमच्या या सद्कार्याकरिता मला तुम्हाला बक्षिस द्यावयाचे आहे". "छे,छे, त्या कामाचे बक्षिस कशाला हो, ते तर माझे कर्तव्यच होते," फ्लेमिंग उत्तरला. तेथेच उभ्या असलेल्या मुलाकडे बोट दाखवित त्या घरंदाज व्यक्तीने विचारले,हा तुमचा सुपुत्र होय?"फ्लेमींगने होकारार्थी मान डोलाविली. सदिच्छेच्या भावनेतून त्या घरंदाज व्यक्तीने फ्लेमिंगच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली. काही वर्षे लोटली. फ्लेमिंगचा सुपुत्र पुढे सर अॅलेक्झांडर फ्लेमिंग झाला,ज्याने पेनिसिलीनचा शोध लावला. तर दुसरीकडे त्या कुलीन व्यक्तीचा पुत्र जिवघेण्या न्युमोनिया ह्या रोगाने आजारी पडला. त्या मुलाचे प्राण कुणी वाचविले? तर ती होती पेनिसिलीनची लस! त्या कुलीन व्यक्तीचे नाव होते लार्ड रॅन्डाॅल्फ चर्चिल आणि जे न्युमोनियातून वाचले ते त्यांचे सुपुत्र, त्यांच नाव सर विन्स्टन चर्चिल! दुसर्या महायुद्धांतील इंग्लंडच्या विजयाचे नायक! शेवटी "जे तुम्ही देता,तेच फिरून तुमच्याकडे परत येते. "परोपकाराय पुण्याय:" हेच सत्य. 


अशीच एक दुसरी कथा--- एका खेड्यातील दुधदुभत्याचा व्यवसाय करणारा एक शेतकरी गावातील बड्या दुकानदाराला रोज एक किलो लोणी विकत असे. एके दिवशी त्या दुकानदाराने त्या शेतकर्याकडून लोणी घ्यावयाचे नाकारले, आणि शेतकर्यावर रागावूनच म्हटले, "तु फसवेगिरी करतोस,तुझे लोणी शंभर ग्रॅम कमी भरते". त्यावर तो गरीब शेतकरी गयावया करीत म्हणाला " शेठजी, असे करू नका,माझ्यावर दया करा. मी खरच लबाडी करीत नाही. माझ्याकडे तराजू आहे पण वजनाचं माप कुठे आहे ?, 'आपणच मला एक किलोची साखर देता तेच माप म्हणून वापरतो". असे म्हणत त्या शेतकर्याने दुकानातील एक किलोच्या साखरेचं पाकीट तराजूत ठेवून दुसर्या बाजूला स्वतः आणलेल्या लोण्याचा गोळा ठेवला. पाहतो तर दुकानदाराचीच लबाडी उघडकीस आली. लोण्याचं वजन आणि साखरेचं वजन समसमान." पापाय परपीडनम्!".' करावे तसे भरावे '! "जे तुम्ही देता,तेच फिरून तुमच्याकडे परत येते". ह्याहून अधिक स्वच्छ सृष्टीचा नियम तरी कुठला?.

साध्या राहणीचे आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याचे महत्व संतानी वेळोवेळी पटवू दिले. उपयोग आणि भोग ह्यावर छोटे छोटे दृष्टांत देऊन भोगवृत्तीवर प्रहार केले. सर्वांच्या गरजा पुर्या करण्याइतकी क्षमता आपल्या धरणीमातेची आहे, परंतु लालसा पुरी करण्यात ती कमी पडणारच आणि म्हणून संतांनी स्वतःच्या गरजा कमीत कमी ठेवून आदर्श निर्माण केला. मग ते आपले तुकोबा महाराज असो वा साॅक्रेटिस असोत,संत हे देवदूतच हो.

सारांश रूपाने म्हणायचे असल्यास एवढंच म्हणू या की, मानवाची कितीही प्रगती झाली असेल आणि होत जाणार असली तरी सृष्टीतील महत्वाचं सत्य हे आहे कि विज्ञानातून येणारी हर एक नवीन सुविधा, एका नवीन असुविधाला जन्म देत असते. आणि त्यातून धोक्याची घंटी ऐकू येत असते. मग ती पर्यावरणासंबधी असो वा वाढते सायबर क्राइमच्या घटना असो. वाढते अत्याचार असो वा बलात्कार की गुंडगिरीच्या घटना असो. संपत्तीविषयक भांडणे वा सीमासंबंधीचे वाद असो. किंवा शस्त्रस्पर्धेतून घोघांवणारं तिसरे महायुद्धासंबंधी असो. पिण्याचे पाणी,ऊर्जा इधंन असे एक ना अनेक बाबींचा तुटवडा पडत जाणार. विचार तर संपूर्ण मानवजातीने करावयास हवा. शास्त्रज्ञांनी जे काही शोध लावले ते मानवाच्या कल्याणासाठी हे निश्चीत. उर्जेची कमतरता भासू नये ह्यासाठी अणूचा शोध लावला. विनाशकारी वा संहाकरक शस्त्रे बनविण्यासाठी नाही. असं म्हटलं जातं कि संपूर्ण सृष्टी ही एका नियमानुसार चालत आहे. तो नियम म्हणजे उत्पती, स्थिती आणि लय म्हणजे विनाश. आणि पुन्हा उत्पत्ती. सृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न म्हणजे यत्किंचित काजव्याने सूर्याचे तेज फिके पाडण्याचा प्रयत्न होय. एक सृष्टी नष्ट झाली तरी त्या विश्वाला काही फरक पडेल असे वाटत नाही. मानव नव्हता त्या कालातही पशू पक्षी इत्यादी प्राणी होतेच. समुद्र होते ,नद्याही वाहात होत्या. सृष्टीला आणि ह्या विश्वाला मानवाची अत्यंत गरज आहे, असे काही अनुभवयास येत नाही. उलट इतर प्राण्यांपेक्षा मानवाला विशेष उपयूक्त अशी ही सृष्टी आहे. सृष्टीत मानवासाठी असलेल्या अनुकुलतेचा फायदा मानवाने करीत रहावे, आपला ऐहिक आणि परलौकीक विकास करीत सहजीवनाचा आनंद घ्यावा. मानवाने स्वतःहून स्वतःच्या विनाशासाठी खड्डा खणू नये. हीच संतांची शिकवण. आणि हेच सृष्टीचे बोल. "नरेची केला नर किती हीन "अशी स्थिती येऊ द्यावयाची की, "नरकी करणी नरका नारायण हो जाय " हे सत्यात आणावयाचे. सृष्टी हसत हसत मानवाला सांगत आहे. Choice is yours. 

जय योगेश्वर !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...