गुरुवार, २२ जून, २०१७

चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः |



आपल्या प्रातःस्मरणीय प्रार्थनेत,

"पृथ्वी सगन्धा सरसास्त आपः | स्पर्शीच वायू, ज्वलनच्च तेजः | नभः सशब्दम् महता सैहव|" असे  पंचमहाभूतांचं वर्णन आहे.

ओम् हे नादब्रह्म तसेच शब्दब्रह्म. सा,रे,ग,म,प, ध, नी, हे सप्त स्वर. कळकाच्या बेटातून वाहणार्या वार्याचा सळसळ आवाज, धबधब्याचा एकसूरी ताल, आंब्याच्या झाडावरून ऐकू येणारं कोकीळेचं सुमधूर कुजंन, समुद्राच्या लाटांचा चौघडा, उंच उंच ताडामाडाच्या गुजगोष्टी, विविध पक्ष्यांची सुरेल किलबिल, इत्यादींनी ज्यांच्यावर मोहिनी घातली, त्यापैकी कोणी गायक, कोणी वादक, तर कोणी संगीतकार वा वादन- यंत्रनिर्माते झाले. पृथ्वी ही रसपूर्ण आहे. जसा ज्यांचा स्वभावधर्म, त्याला अनुसरून कोणी काव्ये रचली,कोणी कथा,कादबंरी वा नाटय लिहली. बदलते ऋतुमानातूनही कोणाला काव्ये सूचली. ही सारी साहित्यिक मंडळी.  माणसांच्या, पशू-पक्षी इत्यादींच्या आहार-विहारावरून कोणाला विनोदी कथा,तर कोणाला चूटके- विडबंन स्फुरलें. तर काहींना मनोरंजन करण्याची स्फुर्ती मिळाली. ते कलाकार झाले. हिरव्यागार घनदाट जंगलातील निरव शांतता, खळखळणारे झरे,अजस्त्र डोंगर काहींच्या मनांत मूर्तीमंत पावित्र्य साकार करीत जीवनाचं दर्शन घडविणारे महाकाव्ये स्पूरली, ती मंडळी तत्ववेत्ता आणि संतजन म्हणून अजरामर झाली. पृथ्वीवरील ऋतुमानातील बदल, समुद्राला येणारी भरती-ओहटी, रोज उगवणारा सूर्य, कलेकलेने वाढत आणि कमी होत जाणारा चंद्रमा,मेघांचा गडगडाट, आकाशातून चमकणारी वीज,अंनत तारे-तारकांचा समूह इत्यादींबाबतचे गूढ, ह्यातून कवी मंडळी निर्माण झाली. आणि ह्यांत ज्यांना आव्हान वाटलं ती सारी मंडंळी शास्त्रज्ञ, संशोधक,तंत्रज्ञ,तसेच भौतिक, रसायन, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र इत्यादींचे अभ्यासक म्हणून उदयास आली. पुढे औषधनिर्मिते, डाॅक्टर मंडळी इत्यादी उदयास आली.

पंचमहाभूते म्हणजे सर्वात मोठी संसाधनं. जेथून सार्या प्रेरणा प्रक्षेपीत होतात, तेथेच सार्या घडमोडी, क्रिया विसावल्या जातात आणि त्याही जशाच्या तशाच,तेच आकाश नावाच महाभूत. आजचे रेडीओ, टेलीव्हिजन, मोबाईल, माहिती आणि तंत्रज्ञानातील आधूनिक क्रान्तीचं माहेरघर म्हणजे आकाश. ते ही शास्त्रज्ञांच्या मनाचं आणि बुद्धीच निवासस्थान ठरले. आपली धरतीमाता तर अनेक खनिज संपत्तीचा खजीना. वृक्ष,फळं फूलं,वन-वेली अनेक प्रकारच्या धांन्यांचीही खाण. त्यातून मानवाला लागणार्या भूकेचं शमन करण्यासाठी अन्न निर्माण करण्याची कल्पना सूचली ती सारी मंडळी शेतकरी ,ज्यांना वस्तूनिर्मितीचे अंग आहे अशांना विविध धातूपासून उपयोगी वस्तू, कारखाने, कलाकुसरी,हत्यारे उर्जा निर्मितीचं स्पुरण मिळाले आणि ते सारे उत्पादक वा उद्योजक असे गणले गेले. जिथे उत्पादन,तिथे मागणी आणि ग्राहक ही तयार. ही सुध्दा एक नैसर्गिक साखळीच. त्यातूनच व्यापार उदिम, विक्रीकला उदयास आली. आजच्या जगाचं जे स्वरूप दिसत आहे ते निसर्गाच्या परिवर्तनिय नियमाची म्हणा वा उत्क्रांतीवादाची परिणीती आहे. ह्या जगाचं वर्णन अनेक भागात करता येईल, इतकं ते विस्तराले आहे. हे जग आर्थिक-जगत, कला-जगत, राजकीय-जगत,शिक्षण-जगत, औद्योगिक- जगत,व्यापार-जगत, अध्यात्मिक-जगत, क्रिडा-जगत, स्पर्धा-जगत,विज्ञान-जगत, तंत्रज्ञान-जगत अशा विविध रूपात वाढत जात आहे. ह्यालाच आपण काळाचा महिमा म्हणतो. शास्त्रज्ञ म्हणतात "When there was nothing in existence, time was there". आपल्या संस्कृतीतला महाकाळ, शीवच तो आणि तोच ईश्वर. सृष्टीच्या स्वरूपाची व्याप्ती आपल्याला दिसू लागली, तरी ती अंशात्मकच. कारण अजूनही सृष्टीतील बरीच रहस्ये मानवाला ज्ञात झालेली नाहीत. आणि त्या रहस्यांमागे जितके आपण धावू, तितकी ती पुढे जात राहणार. काही रहस्ये आपल्या हाती गवसतील तर काही नवीन निर्माण होत राहतील. ह्या सृष्टीचा तो नियंता वा विश्वभंर म्हणा वा कानडाचा राजा, त्याचा अंतपांर वेदानांही कळलेला नाही, हेच खरे. आपण जे काही मिळवितो, ते सारे सृष्टीतूनच, आणि जे काही गमावितो ते ही सृष्टीतच समाविले जात असते.

मला वाटते, "विश्वाची निर्मिती ही ईश्वराची लीला आणि तिचा शोध ही मानवाची कला!". कलेचा जन्म मानवाच्या कल्पनाशक्तीतूनच होतो. दस्तुरखुद्द विख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन म्हणतात 'Imagination is more important than knowledge.' अर्थ हा कि, कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा महत्वाची असते. आपले शास्त्रकार म्हणतात, ज्ञान हे पूर्ण असते आणि त्या अनुषंगाने विचार करता आपली कल्पनाशक्ती हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचं माध्यम असावं. त्यामुळे साहित्य, संगीत, गायन, नाट्य, क्रिडा, जाहिरात, चित्रकला, शिल्पकला, अभिनय ह्याच केवळ कला नसून विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, शेती, छोटे-मोठे उद्योग, व्यापार ह्या सार्या कलाच ठरतात. इतकेच नव्हे तर ऋषीमुनींची तपश्चर्या ही सुध्दा एक कलाच होय.

क्षेत्र कुठलेही असो, प्रत्येक क्षेत्राच्या जन्मामागे जी प्रेरणा असते ती निसर्गातूनच प्राप्त होते. त्या प्रेरणाचं स्वरूप "जशी दृष्टी तशी सृष्टी" असेच असावे. त्यामूळेच कला क्षेत्र इतके विस्तृत झालेले आपण पाहात आहोत. कुठल्याही कलेच्या जन्मानंतर सराव, नंतर सवय, त्यापुढे स्वभाव बनत असावा आणि त्या स्वभावानुसार माणसं आपली विहीत कर्म पार पाडीत आली आहेत. त्यातून होणारा निर्मितीचा अविष्कार हा त्या त्या माणसांचा विशेषगूण मानला गेला आणि त्या त्या विशेषगुणांचे नामकरण आणि पाठोपाठ वर्गीकरण झाले असावे. पुढे अंकशास्त्र ,संख्याशास्त्र आणि पैसा नावाचं एक  विनिमयाचं साधन उदयास आले. त्यामूळे आर्थिक प्राप्ती,  ही बाब सुध्दा  समाजचं आणखीन वर्गीकरण करण्यासाठी एक निकष ठरू लागली आणि त्यातून आर्थिक स्तर निच्चित होऊ लागले. म्हणजे आधुनिक युगातही वर्गीकरणाची प्रक्रिया सुरू आहेच. ह्या सार्याचा अर्थ काय? " चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः"|. असाच मानावा कां? बहूदा तेच सत्य.

कलेच्या कुठल्याही वर्गात तुम्ही मोडत असाल तरी, एका विशिष्ट टप्प्यापर्यंत त्या कलेतील तुमच्या प्रगतीचा आलेख झटपट उंचावत जातो. परंतु त्या कलेत प्राविण्य मिळविण्यासाठी वा highly professional (निष्णांत) होण्यासाठी करावा लागणारा प्रवास फार खडतर तसाच प्रदीर्घ असतो किंवा अंनतच असतो असेच समजावे. प्रत्येक क्षेत्रात Sky is the limit and Excellence is always a moving target हाच आपला अनुभव. मग आपोआप मुखातून बोल उमटतात "ईश्वरी लीला अगाध; तिला नाही अंत" हेच सृष्टीतील सर्वात पहिले तत्व वा सत्य. आईन्स्टाईन ह्यांनी हीच बाब वेगळ्या शब्दात मांडली आहे. ते म्हणतात ह्या विश्वात सर्वात गुढ वस्तू कूठली तर ती "हे विश्वच होय".

मानवाच्या कल्पनाशक्तीतून विभिन्न कला उत्पन्न झाल्या. त्यातून पुढे कर्म आणि नंतर कर्मानुसार वर्गीकरण झाले असावे, असा निष्कर्ष आपण काढला. त्या व्यवस्थेला आपण जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था वा वर्गव्यवस्था असे जरी म्हणत असलो तरी मूलतः ती नैसर्गिक विविधता आहे. असेच मला वाटते. कारण त्या व्यवस्थेची उत्पत्ती "जशी दृष्टी तशी सृष्टी" ह्या सिध्दांतातून जन्मली आहे. सृष्टीतील विविधतेतून जशी प्रेरणा मिळते, तशी दृष्टी प्राप्त होत असते. दृष्टी म्हणजे नुसते पाहणे नसावे. पाहणे ही क्रिया घडताना मनाची शक्ती आणि बुद्धीची शक्ती किती प्रमाणात जोडली गेली ह्यावर पाहिलेली वस्तू वा प्रसंग ह्याची निश्चित अशी जाणीव निर्माण होत असावी. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या ठायी बौद्धिक पात्रता  भिन्न असते. आणि  मनाची  स्थिती  क्षणोक्षणी  भिन्न होऊ शकते. त्यामुळे सृष्टीतील आणखीन एका सत्याचा परिचय होतो. ते म्हणजे " जशी बुध्दी, जशी मनशक्ती, आणि हो, जसे प्रयत्न, (यत्न तोची देव जाणावा ही तर संत वाणी म्हणजे सृष्टीचेच बोल) तशी कुवत. कुुुवत म्हणजे गुण" . त्याही पुढे "जशी कुवत तसे कर्म". त्यातून समाजात वर्ग निर्मिती झाली असावी. भगवंतांनी गीतेत म्हटले आहे," चातुर्वण्यं मया सृष्टी गुणकर्मविभागशः|". ही सृष्टी तामस,रज,सत्व अशा त्रिगुणांची आहे. आणि जी वर्गवारी झाली ती गुणांनुसार. गुण परिवर्तनशील आहेत. उचीत साधनेद्वारे तामस गुणातून राजस गुणात व राजसमधून सात्विक गुणात प्रवेश मिळत जातो. हा उन्नतीचा मार्ग आणि उलटा प्रवास अवनतीचा. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मानुसार उच्च स्तरावर पोहचू शकते. जन्मानुसार कोणी उच्च नाही, ना कोणी नीच. परंतु जगभरातल्या प्रत्येक देशात सामाजिक संतुलन वेळोवेळी बिघडलयं आणि बिघडत असते. तसे आपल्या भूमीतही घडलं आणि घडतही आहे. परंतु भगवान श्रीकृष्णांनी कुठेही जात-जमात पाहून त्यांच्या आचरणातून आणि व्यवहारातून कोणावर अन्याय केलाय असे महाभारतात उदाहरण दिसत नाही. हो "जसे कर्म तसे फल". हे सृष्टीतील सत्य भगवंतांनी मांडले. ते सत्य पडताळून पाहणे अगदी सोपे आहे. भिंतीवर चेंडू आपल्याकडे परत येण्याच्या उद्देशाने फेकला तर तो आपल्याकडे परत येणारच. चेंडू फेकताना योग्य ती गती आणि योग्य ती दिशा साधली कि नाही हाच खरा प्रश्न असतो. त्याचेच नाव कुवत. म्हणजे गुण. इतकी चर्चा पुुरी करून आपण परत  गुणापाशीच येतो. गुण तसे कर्म आणि कर्म तसे वर्ग.  म्हणूनच ' चातुर्वण्यम मया सृष्टी गुणकर्म विभागशः'! असे  भगवंतांनी  म्हटले आहे, ते पटते. चातुुुर्वण्य व्यवस्था ही जात व्यवस्था नव्हती.  त्यामध्येे दोष उत्पन्न  झाले हेे मान्य. परंतु जगभरातील प्रत्येक देशात काही ना  काही ना दोष समाज व्यवस्थेत निर्माण झालेले आहेतच आणि ह्याचं  मूूूळ माणसांमाणसां मध्ये असलेली श्रेष्ठत्वाची भावना. आता  कर्म कसे  करावे ह्यावर  भगवंत काय  म्हणतात ते पाहू या. "योगस्थःकुरू कर्माणि सड्गं त्यक्त्वा|".आसक्ती सोडून कर्म कर. पुढे म्हटले आहे, "तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"|. एकदा आसक्ती सोडली कि एकाग्रता प्राप्त होते. पूर्णपणे समरस होऊन एकाग्रतेने पार पाडलेली जबाबदारी म्हणजे योग. योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. म्हणजे कर्म पार पाडताना फलाची आशा न धरता निष्काम कर्मयोगी बनण्याचा प्रयत्न जो करील तो श्रेष्ठत्वाची पायरी चढत जातो. जातीने नव्हे हे स्पष्ट आहे. 

ह्या विश्वाच्या निर्मितीच्या पाठीमागे कोणती तरी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचं स्वरूपही जशी दृष्टी तसे तिचं स्वरूप असावं. त्यामुळे तिथेही भिन्नता आलीच. त्यातून मानवजातीत विभिन्न धर्म,संप्रदाय,पंथ निर्माण झाले. त्या शक्तीच्या स्वरूपाचं ज्यांनी ज्यांनी वर्णन केले, स्वाभाविकतः ती मंंडळी  ईश्वराचे पूत्र, दूत,प्रेषित, वा त्या त्या धर्माचे संस्थापक गणले गेले. पुढे धर्माच्या नावावर श्रेष्ठता-कनिष्ठता असा मध्ययुगीन काळात संघर्ष झाला. मानवानेच मानवाचे रक्त सांडले. त्याचे इतिहासात नाव पडले क्रुसेड्स. तेवढ्यावर भागले नाही. पुढे बाटवा-बाटवी,जबरदस्तीने धर्मातंर ,साम्राज्यवादाची स्पर्धा आणि विनाशकारी दोन महायुद्धे झाली. आज जरी बहुतांश देश स्वतंत्र असले तरी साम्राज्यवादी अपप्रवृत्ती आणि धार्मिक उन्माद ह्या दोन्ही गोष्टी जिवंत आहेतच. जे काही धर्म आज गणले जातात, त्या प्रत्येक धर्माला संस्थापक आहे. फक्त हिंदू धर्म सोडून. आणि त्या अर्थी तोच शाश्वत तसेच वैश्विक धर्म आहे अशी आपल्या अध्यात्मिक क्षेत्रातील तज्ञ मंडळींची आणि स्वाभाविकपणे आपली धारणा आहे. राममहात्म्यामध्ये रामनामाचं महत्व विशद करताना " बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम्"| अस शेेेेवटचं चरण आहे. ह्याचा  अर्थ असा ' रामनाम धर्मरूपी वटवृक्षाचे बीज असून  रामनामाचा जप केल्याने सर्वजनांचे कल्याण होते. ह्या ठिकाणी  धर्म असे म्हटले आहे  तो शाश्वत वा वैश्विक धर्म असेच आपल्या शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. भगवंतांनी गीतेत म्हटले आहे,  "यदा यदा धर्मस्य ग्लानीर्भवती भारत|". ह्या ठिकाणीही धर्म म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, सदाचरण हेच अभिप्रेत आहे. जेव्हा ह्या गुणांच अवमूल्यन होते तेव्हा मी अवतार घेतो. आपल्या शास्त्राकारांनी" यथो धर्मः तथो जयः|." जिथे सत्याची बाजू ,    तिथे  विजय असतो. हा शाश्वत नियम मांडला आहे. आपण पूत्रधर्म, माताधर्म, पिताधर्म, शिष्यधर्म, राजधर्म, शरीरधर्म असा उल्लेख नित्याने करीत असतो. शिवाय क्षात्रधर्माचाही, उल्लेख करीत असतो. शांतीचे सारे मार्ग बंद झाले आणि युद्ध लादले गेले तर स्वरक्षणासाठी क्षात्रधर्म आचरणात आणावा असे आपले तत्वज्ञान सांगते. त्यामुळेच हिंदू धर्मीयांनीच आज तागायत सर्वात अधिक सहिष्णुता पाळत आणलेली दिसते. परंतु वाजवीपेक्षा अधिक सहिष्णुता दाखविल्यामूळे आपल्याला पारतंत्र्यात जावे लागले. भगवान श्रीकृष्णाने युध्दाच्या भीषण परीणामांच्या विचाराने हातातील शस्त्र टाकलेल्या अर्जूनाला "तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युध्दाय कृतनिश्चयः|" असे सांगत त्याला क्षात्रधर्माची आठवन करून दिली. येथे हे ही लक्षात घ्यायला हवे कि असा उपदेश श्रीकृष्णाने अर्जुनला केव्हा दिला? संभाव्य युद्ध टाळण्यासाठी स्वतः केलेली शिष्टाई फलद्रूप झाली नाही तेव्हाच. कारण सूर्यप्रकाश, खते,मशागत ह्यांच्या विना जशी काटेरी झुडपे उगवतात, तसेच माणसाच्या मनात ही दुष्ट भावना सहज रित्या उपजते. मग तिला मूळापासून काढावी लागते. बहुतांश देश "जीवो जीवस्य जीवनम्|" हाच मंत्र पाळणारे आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा "अंहिसा परमो धर्मः|" हे तत्व विशिष्ट मर्यादेपर्यंत पाळावे, कारण "देवो दुर्बलो घातकः|" हे ही सृष्टीतील सत्य आहे. भगवंतांनी पुढे विभूती योगात म्हटले आहे, "मृगाणाम मृगेन्द्र अहम् |" मी प्राण्यामध्ये सिंह आहे. असे का म्हटले? तर स्वरक्षण आणि दूष्टांचा संहार हेही धर्माचं अंग आहे. म्हणून आपल्याला सामरिक आणि तंत्रज्ञान दृष्ट्या अधिक सशक्त व्हावे लागेल. आणि त्यासाठी आपले वैज्ञानिक आणि सेनादले अहोरात्र मेहनत करीत आहेत. एकदा का आपण महासत्ता म्हणून उदयास आलो कि विविधता ही सृष्टीची देणगी आहे , सहजीवन हाच मानवाला निसर्गाने दिलेला मूलमंत्र आहे, तसेच आमची जीवनपध्दत ही विश्वकल्याणकारी आहे. हे पटवून देऊ शकतो. त्यासाठी देश, समाज म्हणून काय करावे आणि अडचणी कुठल्या ह्यावरील चर्चा राजकीय स्वरूपाची आहे ती येथे नको करू या.

वस्तूतः सारी मानवजात एक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ज्ञान, शक्ती, व्यापार, सेवा ही चार तत्त्वें चळवळ करणार्या चैतन्यात असतात. शरीरात असणारे चैतन्य तर एकच असते. "सृष्टी असो वा निसर्ग अथवा ईश्वर ह्यांच्या दरबारात भेदभाव नाही." हे सृष्टीतील अनादि कालापासून असलेले सत्य. नदी एका व्यक्तीला गोड आणि दुसर्या व्यक्तीला खारट पाणी देत नाही. परंतु 'River can go no reverse ', हा सृष्टीचा सिद्धांत. त्यात आपण हस्तक्षेप केला तर निसर्गाच्या कोपाला सामोरे जावे लागते. वृक्ष एका व्यक्तीला सावली देणार आणि दुसर्या व्यक्तीला नाकारेल असे होत नाही. परंतु वृक्षावरील फळांच्या मधुरतेत आणि आकारमानात भिन्नता राहणार. त्याचबरोबर आपण मर्यादे बाहेर वृक्षतोड करू लागलो तर ते सृष्टीला सहन होणारं नसतं. आपल्या शरीरात विभिन्न अवयव विद्यमान आहेत. त्यांची कामें ही विभिन्न,परंतु हृदयातूंन शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी रोहिणी नावाची रक्तवाहीनी हातांना जास्त रक्त आणि पायांना कमी रक्त पुरविते, असे होत नाही. इतकेच काय हा डावा हात आणि हा उजवा हात असा भेदभाव रोहिणी कडे नसतो. हा जसा शरीरविज्ञानाचा नियम तसाच तो एक सृष्टीचाही सिद्धांत. कारण आपल्या शरीरात पंचमहाभूते विराजमान असतात. सूर्य म्हणजे तेज, ते ही पाण्याच्या तुषारातून जाते तेव्हा सप्त रंगाचे दिसते. परंतु गतीरूप आणि एकरूप होता,एकच पांढर्या रंगाचे दिसते. जे त्या तेजाचे मूळ रूप. सूर्याची भ्रमंती अनेक युगापासून सुरू आहे. आपली पृथ्वी त्या सूर्याभोवती फिरते हे ही वैज्ञानिक सत्य. Sunset at one place is always Sunrise at another place. एका ठिकाणीचा सूर्याास्त हा पृथ्वीच्या दुसर्या भागातला सूर्योदय असतो. पृथ्वीचा आकर गोलाकार असल्या कारणाने आणि पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते म्हणून असे घडते.  हे ही सत्य. त्यातूनच पौवार्त्य आणि पाच्शिमात्य देश अशी विभागणी झाली. ती मानवाने केली. परंतु मूळ सत्य, "पृथ्वी तीच आणि सूर्य ही तोच ". जल पृथ्वीवर सर्वत्र आढळेल पण त्याचे घटक म्हणजे हैड्रोजन दोन भाग आणि ऑक्सीजन एक भाग असेेच सर्वत्र  असणार. सृष्टीत विविधता ठायीं ठायीं भरलेली आहे. जे ग्रह आपल्याला ज्ञात आहेत. त्याच्यांत ही विभिन्नता आहे. प्रत्येकाचा आकार वेगळा, गती भिन्न, कक्षा भिन्न, तसेच त्यांचेे  गुरुत्वाकर्षण  भिन्न.  ह्याचा अर्थ असाच कि Imbalance is the feature of this Universe. तरीही आजपावेतो कुठल्याही ग्रहाच्या भ्रमणातील गतीमध्ये असा काही मोठा बिघाड निर्माण झाल्याची घटना नाही. कुठल्याही ग्रहाने मर्यादा सोडलेली नाही. आपली कक्षा बदलली नाही. "स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे "असाच सृष्टीचा मानवाला संदेश असावा.  ब्रह्मांडामध्ये  एक सुनियोजित व्यवस्था आहे  असे दिसतेे जिच्यामूळे हे सृष्टीचक्र व्यवस्थित सूरू आहे.

सृष्टी म्हणा, ब्रम्हांड म्हणा, विविधता हे खास वैशिष्ट्य. भले चातुर्वण्यव्यस्थेत दोष निर्माण झाले, तरीही काळा-गोरा, पौवार्त्य-पाश्र्चिमात्य, विकसनशील-विकसित देश, विकसित-अविकसित देश, कुठे लोकशाही,तर कुठे एकपक्षीय राजवट,तर कुठे लष्करशाही,आणि  राजेशाही हे सारे भेद अलीकडच्या काळातील. कोणी श्रीमंत, कोणी मध्यमवर्गीय. कोणी गरीब, कोणी दारिद्र्यरेषेखालील. बरं हे वर्ग आर्थिक निकषावरून मानले तरी प्रत्येक देशातील मोजमाप ही वेगळे. कोणी अधिकारी तर कोणी शिपाई . कोणी राज्यकर्ते तर कोणी आम नागरिक,कोणी नोकरशहा. कोणी मालक कोणी नोकर. कोणी विक्रेता कोणी ग्राहक. असे अनेक वर्ग. प्रत्येक क्षेत्राचा विचार करता अगणीत वर्गवारी.
 I therefore feel that at any time, at any part of the world and in any system of government, there can be no classless society. वर्गरहित समाज ही जगातल्या कुठल्याही भागात आणि कुठलीही राजवट का असेना सदाकाळी स्वप्नवतच ठरेल, असं मला वाटते. परंतु सृष्टीत जशी एक सुव्यवस्था दिसते तशी मानव निर्माण करू शकतो. नव्हे ती मानवानेच करावी असा सृष्टीचा वा त्या नियंताचा संदेश असावा.

माझ्या शालेय जीवनात मराठी विषयाच्या पुस्तकात "मानव्याच्या दिशा" नावाचा धडा होता. लेखकाचे नाव वामन चोरघडे. त्या धड्यात एक मेंडपाळ आणि त्याच्याकडे असलेल्या मेंड्याशी त्याच नातं किती अतूट होतं ह्याच सुरेख वर्णन केलं आहे. तो धडा म्हणजे सहजीवनाचा एक आदर्शच. पंचमहाभूतांच कार्य पहा. समुद्र पाणी घेतो, सूर्य वाफ करतो पण संपूर्ण समुद्र आटवित नाही. का? सारा संसार अळणी होऊ नये म्हणून. आणि वाफ आकाशाकडे सोपावितो. आकाश वाफ घेते आणि ती मेघात साठवून गोड जलात रूपातंर करते. कसे? आपल्याला ठाऊक नाही. मग ते गोड जल पावसाच्या रूपाने भूमीकडे देेेते.  वनस्पती जल घेतात. आणि फळं, फुले देतात. एक आंब्याच बी रूजते, अनेक आंबे देते. भूमातेला एक दाणा द्या, हजारो दाणे घ्या. भूमातेचं स्वरूपही पृथ्वीवर विभिन्न. तशी फळं फूलं अन्नही विभिन्न. बस तिच्या पुत्राने देवाण-घेवाणाची सुव्यवस्था निर्माण करावी. सृष्टीचा संदेश आहे "जियो और जिने दो" हा मानव जातीसाठी. दूसरा "जीवो जीवस्य जीवनम्|" हा पशु-प्राण्यांसाठी. सृष्टी मानवाला सांगतेय Choice is yours.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...