आपल्या देशाच्या लोकशाहीला खरा धोका घराणेशाहीच्या पक्षांचा आहे. जागतिक लिबरल लाॅबीला आपल्या देशातले फक्त मोदी सरकार उलथावयाचे नसून केंद्रस्थानी काँग्रेस म्हणजे गांधी घराण्याची सत्ता व सर्व राज्यांत प्रान्तिय पक्षाचे सुभेदार अशी मध्ययुगीन सरंजमशाही, म्हणजेच चीनी साम्राज्याची वसाहत भारतात स्थापन करावयाची आहे. अशा सरंजमशाही- घराणेशाही च्या विरोधात मतदारात जागृती होत आहे. याची चुणूक उत्तर कोकणातील वसई, नालासोपारा व पालघर मतदार संघात पाहायला मिळाली आहे. मला विशेष आनंद झाला. कारण वरील तिन्ही मतदार संघातील भाजपाचा विजय हा आमच्या तालूक्यातला म्हणजे वसई चा. आमच्या गावाचा म्हणजे नालासोपाराचा विजय आणि तिसरा पालघर मतदार संघाचा म्हणजे आमच्या जिल्ह्याचा.
या तिन्ही मतदारसंघातील विजय अपूर्व आहे. हा विभाग माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराचा बालकिल्ला. यंदा प्रथमच ठाकूर परिवाराचा पराभव झाल्यामूळे महाराष्ट्रात या विभागातील भाजपाचा विजय अनेक राजकीय अभ्यासकांचा चर्चेचा विषय झाला आहे.
नालासोपारा मतदारसंघातून निवडणून आलेले भाजपा उमेदवार आमच्या गावातले. आमच्या नाळा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत पढई नावाची छोटी वाडी आहे. जागृत दत्तमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मी प्राथमिक शाळेत असताना सन १९५८ ला तत्कालीन युवक कै भालचंद्र आप्पा म्हात्रे, कै वासुदेवदादा म्हात्रे, श्री बाळकृष्ण अण्णा नाईक या त्रिमूतींने कै दामुआप्पा म्हात्रे, कै बबनतात्या म्हात्रे श्री गजानन वामन म्हात्रे इत्यादींच्या सहकार्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू केली. संघस्थान अर्थातच आमच्या गावातल्या पुर्वाश्रमींनी सन १९४९ ला बांधलेले प्रसिद्ध श्री दत्तमंदिर हेच आहे. तमाम गावकरी सध्या श्री दत्त जन्मोत्सव व दत्तमंदिराच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याच्या तयारीत आहेत. या आनंदाच्या सोहळ्यात राजन नाईक यांचा तसेच वसई व पालघर विधानसभा मतदारसंघातला भाजपाचा विजयाने आमचा आनंद द्विगुणीत केला आहे.
राजन नाईक हे आमच्या गावातले. ज्यांनी शाखा सुरू केली अशा पाच-सहा युवकांपैकी श्री बाळकृष्ण नाईक हे राजन नाईक यांचे पिताश्री. राजन नाईक हे ही बालपणापासून संघ स्वयंसेवक आहेत. व्यवसाय निमित्ताने त्यांचा नालासोपारा येथील जनतेशी संपर्क झाला. ते यशस्वी व्यवसायिक व दिलदार समाजसेवक आहेत. त्यांचा नालासोपारात व्यवसाय असला तरी रात्री ते झोपायला पढई गावातल्या घरी येतात.
सन १९६४ साली पंचक्रोशीतल्या समाजबांधवानी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची शोकसभा घेऊन पहिल्या पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली ती पढई वाडीतच. सन १९७७ च्या आणिबाणीच्या निषेधार्थ झालेल्या सत्याग्रहाचे नियोजन केंद्र आमचे गाव होते. श्री दत्तात्रेय म्हात्रे, श्री सदानंद म्हात्रे व अनंत म्हात्रे, या तिघानी सत्याग्रहात भाग घेतला होता. आजही ही पढई नावाची ही वाडी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई चे अधिवेशन, पंचक्रोशीतले रेल्वे कर्माचार्यांचे संपकाळातले केंद्र स्थान, वसई तालुका स्तरावरील जनता पार्टीचे पहिल्या अधिवेशनाचे स्थळ, उत्तर मुबंईतले खासदार माजी रेल्वमंत्री व उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्रीराम नाईक यांचे प्रचार-दरम्यान निवासाचे स्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोरीवली भाग सन १९९९ च्या वार्षिक नियोजन बैठकीचे स्थान, तसेच विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनाचे यजमान म्हणून पढई ओळख ठेवून आहे.
राजकारणातल्या घराणेशाहीवर मी लेखाद्वारें टिका करीत असतो. घराणेशाही पक्षांच्या कार्यकर्त्यांना भाजपात काय होत आहे याकडेच अधिक लक्ष असते. ती एक खोड आहे. लोकसभेच्या निवडणूकात चांगले यश प्राप्त झाल्यामूळे बोरीवलीत काही ठिकाणी ' इथे माज उतरवला जातो ' असे बॅनर्स रस्त्यावर लावलेले दिसले होते. अशी कृत्यें करणे ही मविआच्या कार्यकर्त्यांची खोड झाली आहे. मविआंच्या कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष बूथ, वार्ड, व वस्तीत जाऊन पक्ष बळकट करण्याची सवयच मोडली आहे. यांच्या पक्षात पक्षप्रमुख म्हणजे मालक व कार्यकर्ते म्हणजे मजूर. त्यामूळे वरून जे काही आदेश येतात ते निमूटपणे स्विकारतात. सोनिया गांधी व राहूल गांधीनी काँग्रेस पक्ष चीन देशाच्या गोठयात बांधून ठेवला आहे. उद्धव ठाकरेने बाळासाहेबांच्या शिवसेनेला मौल्लवींच्या चरणीं ठेवले आहे. शरद पवारांना आपल्या पक्षाचं काय करावयाचे आहे हेच कळेनासे झाले आहे. शेवटी शरद पवार आपल्या पक्षाला काँग्रेसच्या गोठ्यात ठेवतील असे दिसते.
या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते व समर्थक भाजपाच्या अंतर्गत काय चालत आहे यावर पोटतिडकीने हुज्जत घालत असतात. अर्थात स्वतःचा मेंदू गहाण ठेवलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांशी हूज्जत घालण्याने दोघांचा वेळ वाया जातो. उगीच वादविवाद करून ब्लडप्रेशर नावाच्या रोगाला का आमंत्रण द्यावे ? आमच्याकडे आदेश नसतो. असते ती फक्त आज्ञा. संघाच्या दिक्षेतून मिळालेल्या प्रेरणेतून स्वयंसेवक समाजोन्नतीच्या अनेक क्षेत्रात संस्था उभारतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फक्त स्वयंसेवकांवर संस्कार करतो. स्वयंसेवकांचे कार्य हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका निमीत्ताने निवडणूक आयोग मतदारांसाठी अनेक सुविधा पुरवित आहे. हे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. शंभर टक्के मतदानासाठी निव्वळ जाहिरात करून थांबत नाही. ज्यांना प्रकृती अस्वास्थ्याने मतदार केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही, त्यांच्यासाठी त्यांच्या घरी जाऊन गुप्तपणे मतदान करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. टपाला मत पद्धतीत सुधारणामुळे मतदानाचा टक्का वाढत आहे. प्रत्येक पंचक्रोशीत मतदान केंद्राची संख्या, कर्मचारी, पोलीस दल, अधिकार्यांची संख्या वाढवित आहे.
मतदान केंद्रावर जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोयी पुरवित आहे. त्यामुळे मतदान करण्यात अडचण येत नाही. उन्हाच्या तडाख्यात उभे राहावे लागू नये म्हणून मतदान केंद्र वाढवून केंद्रावर मंडप ही घातलेले दिसत आहेत. मतदान केंद्रांना शुभकार्याच्या मंडपाचे स्वरूप आलेले पाहावयास मिळत आहे. पाणी, व्हिलचेअरच्या खुर्च्या इत्यादी सुविधामूळे मतदान केंद्राना आधूनिकतेचं स्वरूप आले आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहावयास मिळाल्या. प्रत्येक केंद्रावर झेपेल इतकेच मतदान संख्या ठेवली. त्यामूळे मतदान सुरळीत व जलद गतीने होत असल्याचा अनुभव मिळाला. पण--
पण मतदान जलद गतीने होत असल्यामूळे मतदान केंद्रावर गर्दी दिसत नव्हती. त्यामूळे राजकीय पक्षांच्या निरीक्षकांना ही मतदान कमी होत आहे असे वाटत होते. शेवटी मतदान केंद्रातील टक्केवारी पोलिंग एजंट कडून कळली तेव्हा राजकीय पक्षांच्या विशेषतः महायुतीच्या कार्यकर्त्याना हायसे वाटले. निवडणूक आयोगावर टिका करणार्यांनी प्रथम निवडणूक आयोग पुरवित असलेल्या सोयी पाहाव्यात. उगीच मोर्चा, घेराव करण्याच्या भानगडीत विरोधी पक्षांची स्थिती आणखिन खालावत जाईल असे मला वाटते. राहीला प्रश्न विरोधी पक्ष कमकुवत होत गेले तर देशाची लोकशाही संपुष्टात येईल अशी जी भिती दाखवून विरोधी पक्ष व त्यांचे समर्थक मिडीया हाऊसेस मतें मागत आहेत, त्यावरील चर्चा निरर्थक आहे. कारण विरोधी पक्षांकडे भाजपा सरकारावर टिका करण्याचा राजकीय मुद्दाच राहीला नाही हे मतदारांना ठाऊक झाले आहे. या शिवाय या तथाकथित सेक्युलर व घराणेशाही पक्षांची दुकाने बंद झाली तरी अनेक आक्रमणें होऊन जी सनातन संस्कृती आज ही सुस्थितीत आहे, तीला जराही धक्का लागणार नाही. उलट आपला देश अधिकाधिक प्रगत व सशक्त होत जाणार आहे अशी खात्री बहुतांश मतदारांना वाटत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा