गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

लिबरल मंडळीचा प्रचार आणि विरोधी पक्षांचा व्यवहार (भाग -२)


आता आपण लेट्स-अप युट्युब चॅनेलवर ४ डिसेंबर रोजी राजकीय अभ्यासक हेंमत देसाई यांच्या मुलाखती वर चर्चा करणार आहोत. हेमंत देसाई हे मराठी माध्यमातील चॅनेल्सवर राजकीय अभ्यासक म्हणून अवतरत असतात. त्यांचे राजकीय घडामोडी वरील विश्लेषण लिबरल मंडळी सारखेच असते. अलिकडील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालासंबंधी हेमंत दैसाई यांनी केलेलं विश्लेषण थोडक्यात आपल्या समोर ठेवतो.

१) सुरवातीसच हेंमत देसाई यांनी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड च्या निवडणूकात काँग्रेसचा झालेल्या पराभवचे वर्णन अत्यंत त्वेषाने ' दारूण पराभव 'असे केले. विरोधी पक्षांनी ओबीसींच्या जनगणनेची केलेल्या मागणीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  खिल्ली उडविली. ' मी किसान, गरीब आणि महिला यांचे कल्याण पाहतो. हाच माझा धर्म आहे. मी जात-पात बघत नाही.' हे पंतप्रधान मोदींचे जाहीर भाषणातले उद्गार हेमंत देसाईने स्वतः म्हणून दाखविले.
२) भारत जोडो कुठे आहे ? त्या यात्रेतून झालेला संपर्क टिकून राहावा यासाठी काही प्रयत्नच झाले नाहीत.
३) काँग्रेसला मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड येथे घवघवीत यश कधीच मिळाले नाही.
४) भाजपाकडे ४० लाख समर्पित कार्यकर्ते आहेत. गुजरात पेक्षा ही मध्यप्रदेशमध्ये भाजपाची ताकद अधिक आहे. संघाचे आणि वनवासी कल्याण आश्रमचे कार्य गुजरात पेक्षा कितीतरी वर्षे अगोदर पासून मध्यप्रदेशात सुरू आहे.
५) अयोध्येत फुकट वारी करून देण्याची, सर्वत्र हनुमानाची मंदिरे, कौसल्यामातेची मंदिर बाधण्याच्या कमलनाथाच्या घोषणा हवेत विरल्या.
६) भाजपा संकल्प यात्रा काढणार
७) राजस्थान मध्ये सती जोहर मध्ये गेली पण सतीचे मंदिरे बांधली आहेत.
८) राजस्थान मध्ये एका हिंदुची निर्घूण हत्या. गेहलोतचे सरकार निष्क्रीय. भाजपाने फायदा घेतला.
९) राजस्थान मध्ये भाजपाने निष्क्रीय आमदारांना घरी बसविले.
१०) मोदींची इमेज व मोदींची गॅरेन्टी
११) गेहलोत यांच्या ओबीसी, आर्थिक दृष्ट्या गरीब, महिलांचा उत्कर्ष अशा रेवडी योजनांचा फज्जा उडाला
१२) महाराष्ट्रात तर मविआ सरकारची credibilty संपली आहे. 
१३) भाजपा पराभवाने खच्चीत होत नाही.
१४) आता तर काँग्रेसला इंडी आघाडीत अधिक जागा मागण्याची संधी हूकली आहे.
१५) राजकारण एकांगी होत आहे. ही धोक्याची सूचना आहे. लोकशाही संविधान धोक्यात आले आहे.
१६) गेहलोत आणि सचिन पायलट मधील वैर कमी करण्याची ताकद काॅग्रेस पक्षांच्या श्रेष्ठींकडे राहिली नाही. 

संपुर्ण मुलाखतीतुन तीन राज्यातील काँग्रेसचा दारूण पराभव हा जणू काही हेमंत देसाई यांचा स्वतःचा पराभव झाला की काय हे पदोपदी जाणवले आहे. मोदी, भाजपा व संघाची ज्यांना कावीळ झाली आहे अशापैकी हेमंत देसाई एक राजकीय अभ्यासक आहेत. विरोधी पक्षांची ओबीसीच्या जनजणनेच्या मागणीवर नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत खिल्ली उडविली आणि ती पाहिली तेव्हा हेमंत देसाई गर्भगळीत झालेले असावेत असा माझा अंदाज आहे. लिबरल मंडळींचं एकच ध्येय असते ते म्हणजे हिंदू समाजाला वेगवेगळ्या जाती-पंथात विभक्त करणे. ही त्यांची राजकीय चाल तलवारीच्या एका फटक्याने ते ही जाहीर सभेत मोदींनी कापून टाकली. त्याच्या वेदना सर्वच लिबरल राजकीय अभ्यासकांना सहन कराव्या लागत असतील. भाजपाच्या संकल्पित संकल्प यात्रेने सर्व विरोधी पक्षांना संपुर्णपणे उखडून फेकून दिले जाणार असे चित्र हेमंत देसाईच्या यांच्या प्रतिक्रीयेतून स्पष्ट दिसले. नैराश्याने ग्रासलेले असुनही हेमंत देसाई यांनी शेवटी आपली लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल असा शेरा मारलाच. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशातली ही गत. अशी गत फक्त हेमंत देसाईं, गिरीश कुबेर आणि कुमार केतकर यांचीच झाली आहे असे नाही. हिन्दी, इंग्रजी तसेच इतर प्रांतीय भाषेतील न्यूज चॅनेल्स आणि वृत्तपत्रातील लिबरल पत्रकार-संपादक मंडळीची हीच गत आहे. म्हणून त्या मंडळींनी चार राज्यातील निवडणूक निकालाचे जे विश्लषण केले आहे ते सादर न करता या भागाची समाप्ती करतो.

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

लिबरल मंडळींचा प्रचार आणि विरोधी पक्षांचा व्यवहार (भाग १ )



या लेखाच्या शिर्षकाचे नाव थोडसं चमत्कारी वाटते पण तसे काही नाही. व्यवहार या शब्दाचा अर्थ सामान्यतः व्यापार व त्यातून होत असलेली पैशाची उलाढाल असा आहे. तसे पाहता सरकार साठी निवडणूका या खर्चीक असतात. राजकीय पक्षांना ही प्रचार करण्यासाठी पैसा लागतो. उद्योगपती अधिकृतपणे राजकीय पक्षांना आर्थिक मदत करीत असतात. त्या बदल्यात ते सरकार कडून आपल्या उद्योगासाठी सोयी व सवलती घेतात. हा व्यवहार स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून सुरू आहे. तसेच जगभरातील लोकशाही देशात ही असा व्यवहार होत असतो. मतदारांना आपल्याकडे यावे या हेतूने पैशाचे प्रलोभन सर्वच राजकीय पक्ष करीत असतात. हे एक आपल्याला न पचलेलं सत्य. जगभरातील सर्व लोकशाही देशात हे कटु सत्य वावरत असते फक्त त्याची वावरण्याच्यी पद्धत भिन्न असू शकते. थोडक्यात पैशाची उलाढाल राजकरणात ही असतेच की. राजकारणातला व्यवहार म्हणजे काय या संबंधीतली चर्चा कधी न संपणारी आहे. कारण आज केलेली चर्चा पुढल्या दहा वर्षात बदलेली असू शकते. कारण काळानुसार तसा बदल अपरिहार्य असतो. 

आजच्या घडीला राजकारणतला व्यवहार म्हणजे " राजकीय पक्षांचे वर्तन. म्हणजेच नेते आणि कार्यकर्त्यांच्या चालण्या बोलण्यातले तारतम्य; सोबत पक्षाच्या विचारसरणीनुसार आमदार खासदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी राबवलेली कार्यपद्धत ; लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्याचे आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण करून राष्ट्रीय पातळीपर्यंत इतर पक्षांहून अधिक समर्पित व सांघिक भावनेचं उत्कट दर्शन मतदारांना व्हावे यासाठी घेतलेले कष्ट; काळानुसार अचूक पद्धतीने स्पर्धक पक्षांवर कुरघोडी ठरू शकतील अशा राजकीय चालीची रचना करणे. मग त्या रचना कृतीत उतरविण्यासाठी थेट राष्ट्रीय अध्यक्षापासून ते बुथ पातळी वरील कार्यकर्त्यांचे प्रयत्न, प्रचार करताना मतदारांची नाडी ओळखून हवा तयार करणे, पक्षात एकच शिर्षस्थ नेता व त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी निर्माण केलेली सक्षम यंत्रणा, आणि पक्ष सत्ताधारी असेल तर पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यानुसार दिलेली वचनं बहुतांशी पाळली आहेत आणि बाकी राहिलेल्या वचनांची गॅरेन्टी इत्यादी गोष्टींची मतदारांना होत असलेली खात्री,  सत्ताधारी पक्षाने कल्याणकारी योजना पुर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे केलेला आटोकाट प्रयत्न, त्यातून मतदारांनी दिलेली दाद, निवडणूका जिंकल्याच्या नशा पासून दूर राहण्याची नेते आणि कार्यकर्त्यांनी जपलेली संकृती,    देशाची सुरक्षतता, विकास, कायदा व सुव्यवस्था इत्यादी बाबतीत कटीबध्दता, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा स्वाभिमान गहाण न ठेवता  भारतियांची 'जगभर शांतता नांदावी' या भावनेची कदर करीत रचलेले परराष्ट्रीय धोरण इत्यादींचा समावेश म्हणजे राजकीय पक्षाचा व्यवहार." 

मी वर नमुद केलेली राजकीय पक्षांच्या व्यवहाराची व्याख्या म्हणा वा व्याप्ती संबंधीत दुमत असू शकते . या ठिकाणी भ्रष्टाचारा पासून दूर राहण्याच्या वृत्तीचा मी उल्लेख केला नाही. याचे कारण असे की आपण इथे राज्यव्यवस्था कशी असावी या विषयावर चर्चा करीत नाही. दुसरे असे की निवडून आलेले खासदार, आमदार, नगरसेवक, स्थानिक संस्थांचे लोकप्रतिनिधी आपआपल्या सभागृहात शपथ घेत असतात. आता त्या शपथेची किती इमान राखतात हा एक स्वतंत्र विषय आहे. तरीही राजकीय पक्षांच्या प्रमुखाने या बाबत दक्ष राहावे आहे अशी अपेक्षा असते. त्यातल्या त्यात ज्या पक्षातील नेते व लोकप्रतिनिधींचे कार्य स्वच्छ आहे त्या पक्षाला निवडणूकात अधिक यश मिळते. जसे कर्म तसे फल हा निसर्ग नियम आपले काम चोख करीत असतो. 

कदाचित राजकीय पक्षाचा व्यवहाराची जी मी व्याख्या केली ती भाजपाच्या व्यवहाराची आहे असे आपल्याला वाटत असावी. त्याबद्दल माझा आक्षेप नाही. पण ती वस्तुस्थिती आहे. सतत भाजपा जिंकत असेल तर त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न प्रथम लिबरल मंडळींनी करावयास हवा आहे. कारण विरोधी पक्ष लिबरल मंडळींच्या तत्वज्ञानालाच सर्वेसर्वा  राजकीय व्यवस्थेचं आदर्श माॅडेल मानत आहेत. 

मी पत्रकार नाही आणि राजकीय अभ्यासक ही नाही. मी राज्यशास्त्राचा पदवीधर ही नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की मला या लेखाची सुरूवात करण्याची प्रेरणा अलिकडील पाच राज्यांच्या निवडणूकांच्या निकालाचे लिबरल मंडळींनी केलेलं विश्लेषण ऐकल्यानंतर मिळाली. तसे पाहता  सन १९८९ पासून म्हणजेच भाजपाची वाढ होऊ लागल्या पासून  या लिबरल मंडळींनी हिंदुत्व, राष्ट्रवाद, महात्मा गांधीची हत्या करणारी ही मंडळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा एजंडा, इत्यादी मुद्यांवर भाजपाला घेरत असताना मी यांना पाहिले आहे, ऐकले आहे आणि यांचे लेख, विश्लेषण वाचत आलो आहे. भाजपाच्या ताकदीत वर चढत गेलेला ग्राफ ही वाचला आहे आणि अनुभवला ही आहे. त्यातून राजकीय चाल रचण्यात भाजपा वरचढ झालेला दिसतो तर लिबरल मंडळी विसाव्या शतकापासून मांडत आलेले तत्वज्ञान आणि त्यावर आधारीत कृतीचा आग्रह करीत आहेत. या लिबरल मंडळींच्या विचारसरणीचा तसे पाहता विरोधी पक्षांना म्हणजे इंडी नावाच्या आघाडीतल्या पक्षांसाठी लोकसभेच्या निवडणूकांत फायदा होत नाही असे २०१४ पासून दिसत आहे.

मागील लेखाचा शेवट करतांना मी म्हटले होते की,  "आता माझ्याकडे अधिक काही लिहावे असे राहीले नव्हते म्हणून मी थांबलो." तरी ही राजकीय लेख लिहावयास बसलो आहे. म्हणतात ना, सुंभ जळले तरी पीळ काही जात नाही हे सत्य मला ही लागू आहे. हे मी नाकारीत नाही. पण मला आपल्या देशात खरोखरी द्विपक्षीय राजवट असावी असे वाटते. पण भाजपा व संघाचा द्वेष विरोधी पक्ष जितका करीत आहेत, त्याहून अधिक जहरी द्वेष ही लिबरल मंडळी इलेक्ट्रानिक्स, प्रिन्ट आणि सोशल मिडीयावर ओकत आहे. दोन राजकीय शक्ती आमने सामने असल्या तरी सहमतीचा बिंदु शोधता येतो. पण या लिबरल मंडळींची भुमिका सतत टोकाची राहिली आहे. म्हणून या संबंधीत सविस्तरपणें व्यक्त व्हावे असे वाटले. या लेखात लिबरल मंडळींनी पाच राज्यातल्या निवडणुकांच्या निकालाचे जे विश्लेषण केले आहे त्यांच्या पैकी दोन अभ्यासकांच्या प्रतिक्रीया केंद्र स्थानी ठेवून या लेखाची मांडणी करीत आहे. म्हणून या लेखाची  व्याप्ती दोन ते तीन भागा पर्यंत वाढेल हे प्रांजळपणे कबूल करतो. कृपया ही मालिका आपल्या देशातील राजकीय पक्षांच्या व्यवहाराशी निगडीत आहे. कुठल्याही दोन वा तीन राजकीय विचारप्रणालीचा तौलानिक अभ्यास केला आहे आणि त्यावर चर्चा करीत आहे असे मुळीच नाही. तितकी माझी कुवत नाही हे आपणास ठाऊक आहे.

प्रथम लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर हे बीबीसी न्युज चॅनेलवर झालेल्या त्यांच्या मुलाखतीत ते काय म्हणाले आहेत ते पाहू या. 
१) काँग्रेसला एका राज्यातील विजयानंतर सुस्ती येते. तर भाजपा व्यावसायिक राजकारण खेळते.
२) काँग्रेसचे राहूल गांधी फूलटाईम काम करीत नाही. तर भाजपा मधील दोन नंबरचे नेते अमित शहा छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये ठाण मांडून काम करीत असतात.
३) काँग्रेस राज्यस्तरावरील नेत्यांना  विश्वासात घेत नसते. तर भाजपा स्थानिक नेत्यांना गतिमानता देते.
भाजपाने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधील शिवराज चौहान, राजमाता वसुंधरा राजे, आणि रमणसिंग यांना तिकीट देण्यासाठी थोडा उशीर केला पण नंतर त्यांचा योग्य तो सन्मान ही केला. भाजपा आपल्या राजकारणात सतत लवचिकता ठेवते. काँग्रेसला राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन नेत्यांमध्ये समेट घडवुन आणणे जमले नाही. 
४) भाजपा शेवटच्या क्षणापर्यंत लढत असते. भाजपाला ॲन्टी इनकम्बन्सी नसते. कारण कल्याणकारी योजना कार्यन्वीत झाल्याशिवाय आमदार खासदारांना आराम वा विश्रांती मिळत नसते. या शिवाय भाजपा कडे सशक्त केंद्रीय सत्ता आहे. विरोधी पक्षांच्या रेवडी योजनांचा बोजवारा वाजतो. उदाहरण तेलंगणातील केसीआरांच्या योजना हवेतच विरल्या. भाजपा योग्य ठिकाणी भावनिक राजकारण ही खेळते.
५) भारताच्या उत्तर भागात खासदारांची संख्या अधिक असते तर दक्षिण भागात संख्या कमी असते.
६) भाजपा आपल्या रेवडी योजनाला धर्माची जोड देत असते. भाजपाकडे हिंदुत्व, राष्ट्रवादी चेहरा आहे.
७) मध्यप्रदेश मध्ये काँग्रेस जिंकणार असे वाटले होते. पण कमलनाथने संपुर्ण प्रचार हेलीकॅप्टर वापरून केला. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादवांना काडीची ही किंमत कमलनाथनी दिली नाही. 

गिरीष कुबेर यांचे विश्लेषण मी  थोडक्यात मांडले आहे. वरवर त्यांनी भाजपाच्या संघटन शक्तीचं कौतुक केलं आहे. ते तसे त्यांनी केले यासाठी की विरोधी पक्षांपैकी एखादा पक्ष विशेषतः काॅग्रेस ने संघटन शक्ती वाढवावी अशी इच्छा ते व्यक्त करत असावेत. एरवी राजकीय विचारसरणी संबंधीत काही काळानुसार बदल करावा असा सल्ला कोणताही लिबरल राजकीय अभ्यासक इडीतील घटक पक्षांना देत नाही. कारण ती सारी मंडळी आपल्या वैचारीक कुंपणातून बाहेर पडण्याची शक्ती गमावून बसले आहेत. म्हणूनच गिरीश कुबेर यांनी भाजपा प्रचारात हिंदुत्व, मोदीचा चेहरा, रेवडी योजनाला धर्माची जोड देणे, इत्यादी बाबी ठळकपणे ठेवल्या आहेत. गिरीशजीने भाजपाकडे राष्ट्रवादाचा चेहरा आहे असे म्हटले आहे पण भाजपाला अपेक्षित असलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादावर जरा ही भाष्य केले नाही. इथेच भाजपा आणि समस्त विरोधी पक्ष, व त्यांची समर्थक लिबरल मंडळीमध्ये भली मोठी तेढ आहे. दक्षिण भारतात लोकसभेच्या जागा कमी आहेत असे म्हणत गिरीश कुबेर, यांनी अप्रत्यक्ष रित्या कुमार केतकर यांच्या 'भाजपा राष्ट्रीय पक्ष नाही ' या भाष्याला समर्थन दिले आहे असे दिसते. 

कुमार केतकर हे आजपावेतो नेहरू-गांधी घराण्याची पुजा करीत आले आहेत. या घराण्यातील प्रत्येक व्यक्ती देशाच्या उच्च स्थानी विराजमान होण्यासाठी जन्मले आहेत अशी त्यांची धारणा आहे. राजापेक्षा भाट अधिक राजनिष्ठ अशी कुमार केतकरांची प्रकृती आहे. इंडी नावाच्या आघाडीतील घटक पक्षांना राहूल गांधीचे नेतृत्व मान्य होणार नाही. तसेच काँग्रेसचा उत्तरेकडील तीन राज्यांच्या पराभवा मूळे इडी आघाडीत काँग्रेसला वर्चस्व मिळण्याची संधी हुकली आहे. म्हणून केतकरांच्या भाष्यावर अधिक चर्चा न करता लेखाचा भाग १ ची समाप्ती इथे करतो.

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

देशाच्या राजकीय पटांगणावरील सेमीफायनल सामन्याचा निकाल

 


गेल्या ऑगस्ट २३ तारखेनंतर आज मी प्रथमच ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या समोर संवाद करण्यासाठी आलो. तो लेख अराजकीय होता. मात्र २० जुलैचा लेख राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये उभी फूट पडली त्या संबंधित होता. त्या नंतर देशाच्या आणि जगाच्या राजकीय पटंगणावर अनेक घटना घडल्या आणि घडत ही आहेत. तरी ही मी लेख लिहले नाहीत. याचा अर्थ मी अन्य क्षेत्रात व्यग्र होतो असे नाही. आपल्या देशातील राजकारणाचं स्वरूप सन २०१४ पासून 'जैसे थे' असेच राहिले आहे. म्हणून विरोधी पक्षांवर टिका करण्यातही फारसा अर्थ राहीला नाही अशी माझी समजुत झाली आहे. ती चार राज्याच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालातून खरी ठरली आहे. विरोधी पक्ष सततच्या चुकांची दुरूस्ती करू इच्छीत नाहीत हे पुन्हा स्पष्ट झाले. जुलै पासून मला जी सवड मिळत होती तिचा उपयोग मी जागतिक राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी करू लागलो आहे.                                        चार राज्यांच्या निवडणूकाच्या प्रचाराची धामाधूम मी पाहिली नाही. मोदी सरकार उलथून पाडण्याची किंवा भाजपाला पर्ययाने मोदींना पुन्हा सत्तेवर येऊ द्यावयाचे नाही असा चंग जगातील सर्वात श्रीमंत असे जाॅर्ज सोरास महाशय व शक्तीवान पण दृष्कृत्यें करणार्या लिबरल लाॅबीनी बांधला आहे. त्यामुळे चार राज्यातील विधानसभा निवडणूका २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकाची सेमी फायनल मॅच असे मानले गेले. त्या चार राज्यातील निवडणूकापैकी तीन राज्यात भाजपाने प्रचंड विजय मिळविला. त्यामुळे लिबरल लाॅबीची फजिती झाली. त्या फजिती संबंधित चर्चा करावी असे मला वाटले म्हणून हा लेख प्रपंच. 

काळ कसा बदलतो ते पहा. सन १९९८ ला दैनिक लोकसत्तेत माझा  'सर्वधर्म समभाव व राजकीय पक्षांचा व्यवहार ' या शिर्षकाचा लेख संपादकीय म्हणून प्रकाशित झाला होता. त्या काळात केंद्रात राजकीय अस्थिरता होती. म्हणून देशाच्या आर्थिक स्थिरते साठी राजकीय पक्षात मतैक्य व्हावे या शिर्षकाचा मी लिहलेला एक छोटा लेख दै लोकसत्तेत पब्लीश झाला होता. नंतर लोकप्रभात या साप्ताहीकात 'अल्पसंख्यांक कोणाला म्हणावे ' या शिर्षकाचा माझा लेख प्रकाशित झाला.  सन १९९१-९२ साली  'आयुर्विमा क्षेत्रात  स्वदेशीचं महत्व ' हा १५०० शब्दाचा लिहलेला माझा लेख अर्थ वृत्तान्त पुरवणीत छापून आला होता. अर्थात हे सर्व लेख माझे परम मित्र, आर्थिक गुंतवणूक सल्लागार व अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे श्री विनायक कुळकर्णी यांच्या सहाय्याने छापून आले होते.   दै लोकसत्तेचे संपादक बदलले गेले आणि माझ्या लेखांना स्थान मिळेनासे झाले. सन १९७५ ला देशात आणिबाणी लावून वैचारीक स्वातंत्र्य छाटले गेले होते त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सरकारच्या विरोधात लढा उभारला गेला त्यात अग्रणी स्थानावर राहीलेले दै लोकसत्ता आज लिबरल अभ्यासकांचे हातचे बाहूले झाले आहे. माझे वृत्तपत्रात लेख छापून येण्याचा मार्ग बंद झाला तरी मी लेखन चालू ठेवले होते. त्यात राजकीय, सामाजिक तसेच अध्यात्मिक विषयावर ही लेख आहेत. त्यातील तत्कालीन राजकीय घटनावरील लेख ऑउट ऑफ डेट झाले आहेत असे नाही. कारण त्या घटनांना ऐताहासिक महत्व कायम असते. म्हणून सामाजिक विषयाच्या लेखांसोबत ते लेख ही मी जपून ठेवले आहेत. योग्य त्या वेळी ते ब्लाॅगवर प्रकाशित करीत राहणार आहे.                                                          आजच्या Digital युगात आपल्या सर्वसामान्यांना ही व्यक्त होण्यासाठी (ज्याला सोशल मिडीया मानतो अशी) blog, whatsapp,Twiter  इत्यादी माध्यमें अस्तित्वात आल्यामुळे जगभरातील कुठल्या ही देशातील कुठल्याही घटनां किंवा राजनैतिक विषयांवर नेगेटिव नॅरेटिव मांडून तेथील सरकार उलथुन पाडण्याची प्रचंड शक्ती असलेल्या लिबरल लाॅबीचा भारतीय खेळपट्टीवर पराभव होत आहे. जेव्हा सोशल मिडीया शक्तीशाली नव्हती अशा काळात अटल बिहारी वाजपेयींचे सरकार लिबरल लाॅबीने दोन वेळा पाडले होते. तिसर्यांदा निवडणूका झाल्यानंतर वाजपेयी सरकार विजयी झाले आणि पाच वर्षाचा काळ ते सरकार टिकले. पण २००४ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी लिबरल लाॅबीने मिडीया द्वारे नेगेटिव्ह नॅरेटीव मांडून वाजपेयी सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले. पण नरेंद्र मोदी यांचे सरकार दोन टर्म पुर्ण केलेलं युपीए नावाचं काॅग्रेस प्रणित आघाडी सरकारचा गलथान, मुस्लीम धर्जिणा,  प्रचंड भ्रष्टाचाराने माखलेला असा कारभार आणि खोटा-नाटा भगव्या दशहतवादाचे भूत उभे करण्याचे महापाप केल्यामुळे  जनतेच्या मनात प्रचंड असंतोषातून उदयास आलेलं आहे. याचं स्मरण जनतेला आज ही आहे. ही बाब लिबरल लाॅबीच्या ध्यानांत येत नाही. बरं दोन-तीन राज्यात काॅग्रेस सत्तेवर आली तरी त्या राज्यातील जनता लोकसभेच्या निवडणूकीत मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना व विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्याची धमक पाहून भाजपाला मतें देते. या शिवाय मोदी सरकारच्या कार्याची स्तुती करणारी सोशल मिडीयावरील यु ट्युब चॅनेल्स, ब्लाॅग्ज सोबत मेन मिडीयातील चॅनेल्स आणि वृत्तपत्रांची संख्या वाढत आहे.                                                                    कोरोना नंतर आर्थिक मंदीच्या तडाख्याची झळ लागू नये म्हणून ज्यांचा व्यवसाय शस्त्रास्त्रे विकण्याचा आहे अशी बडी राष्ट्रे जगात काही तरी कुरापती काढून  युद्ध खेळतील वा खेळवतील असा अंदाज मी रशिया आणि युक्रेन मधील युद्ध सुरू होण्याच्या अगोदर एका लेखात मांडला होता. तसेच सांप्रत काळात महायुद्धापेक्षा आर्थिक महासत्तेची प्रचंड लालसा व त्यातूनच विकसनशील व अविकेसित देशात आपली हुकमत व आपल्या विचारसरणीचा प्रसार वाढावा म्हणून तेथील सरकार उलथुन पाडण्याचा उद्योग बडी राष्ट्रे करू लागली आहेत हे सत्य मी सतत मांडत आलो आहे. सन २०२४ च्या निवडणूकीत मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये असा चंगच काही बड्या राष्ट्रांनी बांधला आहे हे ही आपण जाणत आहात.                                                नेमक्या अशा वेळी रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धात मोदी सरकार रशियाच्या समर्थनासाठी पुढे आले. त्यानंतर इजरायल आणि हमास मध्ये युद्ध  सुरू झाले. तेव्हा भारताने इजरायलला समर्थन दिले. रशिया- युक्रेन युद्धात अमेरिका व नाटो देशांना आपण दुखाविले. इजरायलचे समर्थन करून आपण मुस्लीम देशांना दुखविल्यामुळे आपल्या देशातील लिबरल लाॅबीचे चमचेगिरी करणारे पत्रकार व संपादक मंडळीं मोदी सरकारवर टिका करू लागले. आपला देश जगात एकाकी पडला आहे अशी अफवा पसरविण्यासाठी गल्ली-बोळातील डाव्या विचारसरणीच्या टपोरी मुलांनी सुद्धा आपल्या ज्ञानाची (वस्तुतः अज्ञानाची) तलवार पाजळयला सुरूवात केली. नेमक्या याच वेळी चार विधानसभा निवडणूकाचा प्रचार सुरू झाल्यामुळे, राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेमुळे संघ व भाजपाचे नफरतीचे राजकारण आता उघडे पडणार आणि चार ही राज्यात भाजपाचा दारूण पराभव होणार अशी आशा काॅग्रेस व तिचे समर्थक मिडीयातील मंडळींना लागली. आपल्या देशातील लिबरल लाॅबी चालवित असलेल्या पत्रकार व संपादक मंडळीकडून होणार्या टिकेवर सडेतोड आणि सत्य ती उत्तरे देण्याची अद्यावत यंत्रणा भाजपाने ही उभी केली आहे. तसेच काही यु ट्युबवरील इंग्लीश  हिन्दी आणि मराठी चॅनेल्स तटस्थेने माहिती देत आहेत. या सर्वांचा उपयोग मी गेल्या एप्रिल पासून करू लागलो आहे. त्यामुळे  मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येईल या संबंधित मी निंश्चीत आहे.                                                                    इजरायल आणि हमास मधील युद्ध तात्पुरता का असेना पण थांबलेले दिसते. तसे पाहता ते दोन देशातील युद्ध बिलकूल नाही. हमास या दशहतवादी संघटनेने इजरायलवर हल्ला केल्यानंतर स्वरक्षणासाठी इजरायलने केलेला तो प्रतिकार आहे.  इजरायलने हमासाचा खात्मा केला तरी तिसरे महायुद्ध होईल असे संभवत नाही. याचे कारण कुरापत काढणारा इराण स्वतः इजरायल समोर आलेला नाही. आपली हत्यारें कितपत उच्च दर्जाची आहेत या संबंधीची चाचणी इराणला करावयाची होती असे मला वाटते. दुसरे कारण असे आहे की अरबियन देश उघडरित्या हमासच्या पाठीमागे असली तरी त्यातील काही देश खाजगीत अमेरिका आणि काही देश चीनला हे युद्ध थांबवावे अशी विनंती करीत आहेत. अमेरिका आणि चीन या देशांची ' सांगता येत नाही आणि सहन होत नाही ' अशी अवस्था झाली असावी असा माझा अंदाज आहे. तथापी या युद्धा संबंधीत लष्कर व जागतिक राजकारणातील, अनेक देशाच्या परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक हे युद्ध थांबेल असे ठामपणे मांडत नाहीत.                                                                                    इस्लामी दशहतवादी संघटनांना अमाप पैशाचा वाटप करून जगभर अशांतता निर्माण करण्याची खाज  लिबरल मंडळीला जडली आहे. ही खाज फक्त काही इस्लामी देशांनाच जडली आहे असे नाही. अमेरिका, चीन, रशिया व कॅनडा इत्यादी देशाच्या नेत्यांना आणि तेथील पत्रकार मंडळीला ही जडली आहे. इस्लामी दशहतवादी संघटनांचा दशहत हा धंदा झाला आहे. त्या संघटनांचे नेते आणि त्यांची मुलें पॅलेस्टाईन मध्ये राहात नाहीत. ती मंडळी ऐषारामाचे जीवन जगत आहेत. पाकिस्तान व कतार सारखे देश हे दलालीचे काम करीत आहेत. या दोन्ही देशातील राजकीय नेते ही करोडपती आहेत. पैशाची लालच आणि धार्मिक गुरूच्या शिकवणीतून इस्लामी दशहतवादी रक्तपिपासू झाले आहेत. त्यांच्यावर युनोचा धाक काल ही नव्हता व आज ही नाही. स्वतः इराण आर्थिक बंधनात अडकला आहे त्यामुळे तो आणखिन बंधने वाढवून घेईल असे वाटत नाही. कारण तेथील नेत्यांना ऐषारामी जीवन जगण्याची नशा आहे. ते स्वतः व आपल्या कुंटुबियांना रस्त्यावर कधीच आणणार नाहीत. 

जगभरातील लिबरल पत्रकार मंडळींना माध्यमांद्वारें राजकीय घटनांवर मग त्या घटना कुठल्याही देशातील असो, त्यासंबंधी केवळ नेगेटिव्ह नॅरेटिव्ह मांडण्यासाठी लाखो - करोडो रूपये मिळत असतात. त्यांतूनच ते ऐषारामी जीवन जगत आहेत. ऐषारामात जगण्याची इच्छा झाली की मग आपल्या मालकांनी जसे लिहावयास सांगितले तसे लिहीले किंवा म्हटले की काम फत्ते. मग सर्वत्र प्रकाशझोतात राहण्याचा आटापाटा सुरू होतो. त्यानंतर ऐषारामाची सवय जडते. सवयीच्या पुढली पायरी म्हणजे नशा. आपल्या देशातील लिबरल मंडळी ही याच गोत्रातील आहेत. जगभरातील शोषण नष्ट करावयाचे आहे अशी भाषा करणारी हीच ती मंडळी. पण मुलतः ती जगातील सर्वात नराधम जमात.

ऑगस्ट महिन्यात इजरायल व हमास मधील सुरू झालेल्या लढाई बाबतचे दैनिक वृतान्त आणि त्यासंबंधीत जगभरातील विशेषतः अमेरिका, रशिया, चीन, भारत , युरोपियन देश आणि अरेबियन देशातील राजकीय नेते, राजकीय अभ्यासक, लष्करी तज्ञ आणि मिडीया काय म्हणत आहेत हे मी ऐकतो आहे. त्यातून  जे काही मला उमजले ते सत्य मी वरती मांडले आहे. लेखाचं शिर्षक आपल्या देशातील चार राज्याच्या निवडणूकां संबंधित आहे, पण तरी ही इजरायल व हमास मधील युद्धाचा विषय मी इथे मांडला. याचे कारण असे आहे की आपल्या देशातील  विरोधी पक्ष आणि त्यांची समर्थक मिडीया सन २०१४ पासून स्वतःला लिबरल म्हणवत भाजपा, मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खोटे-नाटे आरोप करीत जनतेला भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपा, पंतप्रधान मोदी, व संघाच्या पाठिशी बहुतांश मतदार  ठामपणे उभा आहे. चार पैकी तीन राज्यात भाजपाला यश मिळाले आहे याचे मला बिलकूल आश्चर्य वाटले नाही. कारण जगात जी अशांतता आहे त्याला कारणीभूत असलेली वर नमुद केली आहे त्या नराधम जमातीचे साहाय्य आपल्या देशातील विरोधी पक्ष उघडपणे घेत आहेत. त्याबद्दल ही जनतेत असंतोष आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या  सांप्रत जगात आपल्या देशातील बहुतांश मतदार देशाचे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण कसे आहे या मुद्यावर ही मतदान करू लागला आहे. यावर विरोधी पक्षांचे लक्ष जात नाही. पंतप्रधान मोदींनी इजरायलच्या प्रतिकाराचे समर्थन केले. कारण दशहतवाद्यांची झळ जगात भारता इतकी दुसर्या कुठल्या ही देशाला पोहचली नाही. पण चार राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आपल्या येथील विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींवर टिका करावयास सुरूवात केली. पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाईनच्या हक्काचे ही समर्थन केले आहे. मुळात पॅलेस्टाईन अस्तित्वात नव्हतेच पण इजरायल अस्तित्वात होते. जगातल्या पाशवी वृत्तीच्या राक्षसांनी इजरायल व भारतीय जनतेला सर्वात अधिक त्रास दिलेला आहे. यावर विरोधी पक्षांची नेते मंडळी सतत मौन पाळतात. पण हिटलर वर टिका करतात कारण त्यांना चर्चील आणि स्टॅलीन यांची शांततेचे दूत म्हणून जगाच्या इतिहास कोरून ठेवायाचे होते. तसे त्यांनी केले. पण काळ बदलला आणि या लिबरल मंडळीच्या घराचे वासे ही फिरू लागले आहेत.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी कतार ला सरळ केले आणि चीन, अमेरिका, तुर्की देशांची फिकीर बाळगली नाही. पाकिस्तानला त्यांनीच तयार केलेल्या विषाचे डोस पाजायला सुरूवात केले असल्याचे ऐकीवात आहे. ते खरे आहे की नाही यावर विचार करण्याची गरज नाही. कारण जिथे चीन सारख्या देशाला चूपचाप बसविले आहे तिथे पाकिस्तान ' किस पेड की मूलीं !' तरीही विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या जिभेवर मुस्लीम समाजाच्या मताच्या चवीची हाव काही केल्या सुटत नाही. मुलतः जगभरातील  लिबरल मंडळी लिबरल नाहीच. ती एक extrimist टोळी आहे. काँग्रेस पक्ष त्या extremist टोळीच्या चरणी लोंटागण घालीत आहे. सन २०१४ पासून सुरू झालेला हा सिलसिला आजही कायम आहे. मोदी सरकारचा सर्व क्षेत्रातातला कारभार जनहिताचा व राष्ट्र हिताचा आहे हे बहुतांश मतदारांना वाटत आहे. हे सत्य मी ब्लॉगवर सतत मांडत आलो आहे. 

भाजपाने सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषीत केले, तेव्हा  केंद्रात युपीएचे सरकार होते. निवडणूक संपल्यानंतर मी दै मुबंई सकाळ मध्ये पाठविलेला ' लोकसभा निवडणूक २०१४  शोध व बोध ' हा संपादकीय लेख प्रकाशित झाला होता. त्या बद्दल दै मुंबई सकाळच्या संपादकांचे जीमेल वरून आभार ही मानले. त्या निवडणूकीच्या प्रचाराच्या धुलवडीत महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रताप आसबेंचा ' मोदी नावाचा जाहिरतीचा चेहरा ' असा लेख आला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून मी मटाकडे लेख पाठविला होता पण छापून आला नाही. तो ही वेगळ्या शिर्षकाने योग्य वेळी प्रकाशित करीन. सन २०१४ च्या निवडणूकीत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगचा चेहरा कमकुवत ठरला. त्यात ही ते नामधारी पंतप्रधान होते. प्रत्यक्ष सरकार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी सरकार चालवत होत्या. त्यावेळी कधी नव्हता इतका प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. त्याचे स्मरण जनतेला आज ही आहे. मोदींनी पंतप्रधान या नात्याने देशातील बहुतांश राज्यात विकासाचे प्रकल्प सुरू केले आहेत. त्यातील बहुतांश प्रकल्प जलद गतीने पुर्ण करून दाखविले आहेत. म्हणून ' मोदी म्हणजे गॅरेन्टी ' ही टॅग लाईन तीन राज्यातल्या लोकांना चांगलीच भावली असे दिसते. 

ज्यावेळी देशातील इतर राज्यातील मुख्यमंत्री झोपा काढत होते तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदींनी वायब्रन्ट गुजरात असा नारा देत, अहो रात्र मेहनत करून गुजरातला उद्योगाची हब बनविले. गुजरात राज्याला देशातील सर्वात विकसीत राज्य म्हणून असा दर्जा मिळवून दिला. विकासाचे गुजरात मॉडेलवर सतत टिका करणे, त्यांना मौतका सौदागर, एक चायवाला, चौकीदार चोर आहे, पाकवर केलेला सर्जिकल स्ट्राईक खोटा आहे, रॅफेल घोटाळा आणि अलिकडे पनौती अशी लेबलं राहून पंतप्रधान मोदीं हुकूमशहा आहेत असा अपप्रचार करण्यात विरोधी पक्ष आणि त्यांचा समर्थक मिडीया गुंतला आहे. केवळ गुंतला असता तर चालले असते पण त्यातच विरोधी पक्ष रमत आहेत. विरोधी पक्षांनी राजकारणाचं रूपांतर चिखलात केले आहे. त्या चिखलात विरोधी पक्षांचे नेते मंडळी अधिकाधिक रूतून जात आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे  कार्यकर्ते, आणि समर्थक पत्रकार व संपादक मंडळी सुद्धा रूतत आहे. मी या खेपेस निवडणूक प्रचाराच्या ना सभा पाहिल्या, ना इलेट्रॉनिक्स मिडीया तर्फे रस्त्यावर, चौकात, व मतदारांच्या वस्तीत जाऊन घेत असलेल्या मुलाखती पाहील्या. निवडणूक प्रचार काळात आणि निवडणूकीनंतर सुद्धा मी ना ओपिनियन पोल पाहिले, ना राजकीय अभ्यासकांची चर्चा पाहिली. कारण निवडणूका हा लोकशाहीच्या गळ्यातील दागिना राहीला नाही. त्याला प्रत्येक प्रान्तात निर्माण झालेले घराणेशाही पक्ष, डावे पक्ष,  राजकारणात घराणेशाहीला जन्म देणारा काँग्रेस पक्ष आणि देशातील अनादी काळापासून चालत आलेल्या सनातन संस्कृतीची हेटाळणी करणारे विरोधी पक्षांचे नेते मंडळी व लिबरल नावाची भुतें जबाबदार आहेत.                                                          चार राज्यातील निवडणूका च्या निकालाने सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकात भाजपाला व मोदी सरकारला विजय मिळणार आहे हे अधोरिखीत झाले आहे. प्रश्न भाजपाला किती सहजपणे आणि किती मोठ्या प्रमाणात विजय मिळेल हाच उरला आहे. यापेक्षा इथे अधिक काही लिहीण्याचे उरले नाही. म्हणून मी इथे थांबतो. 

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

ओम् स्वतंत्रते भगवती नमः |


बृहनमुंबईच्या उपनगरातील मालाड (पश्चीम) येथे  संत तुकाराम साल्वेस्टर मिशन नावाची शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी एक अग्रणी संस्था आहे. मालाड(प)येथे मराठी आणि इंग्लीश माध्यमाच्या पुर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या अशा एकूण सहा शाळा आहेत. तसेच बोरीवली (प) आणि विरार (प) येथे अशा दोन मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. ही संस्था दर वर्षी ५ ऑगस्ट रोजी वर्धापान दिन साजरा करीत असते.  या संस्थेच्या बोरीवली (पश्चीम- वझिरा) येथील आनंदराव पवार शाळेच्या सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर आहे. मी त्या कार्यक्रमात उपस्थित होतो. कार्यक्रम नीट-नेटका होता. मला फार आवडला. 
तिथे काही नव्हते भंपक | 
होते ते सारे मंगल आणि रंजक || उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी देशाच्या स्वातंत्र्य अमृतोत्सवानिमीत्त आपल्या देशाची वाटचाल  या विषयावर उस्फूर्त  निबंध लिहीण्याची स्पर्धा पार पडली. निबंधाचा हा विषय यथोचित होता. मला फारच आवडला.

शुक्रवार ११ऑगस्ट २०२३ ला विश्व संवाद केंद्र, कोकण प्रान्त तर्फे आयोजित  समान नागरी संहीता या विषयावर ॲडव्होकेट अंजलीताई हेळेकर यांचे ऑनलाईन व्याखान ऐकले. हा विषय तसा क्लिष्ट. पण सध्या जनसामान्यांची उत्सुकता आणि रूची वाढती आहे. अंजलीताईने हा विषय आपल्या ओघवत्या शैलीत सोपा करून मांडला. या शिवाय व्याख्यान संपल्यावर उपस्थितांकडून प्रश्न घेत समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे चार-चौघात सहजपणे या संबंधी चर्चा करू शकतो असा आत्मविश्वास श्रोत्यांना नक्कीच आला असावा. समान नागरी संहीता ही बाब विवाह, घटस्पोट, दत्तक विधान, धार्मिक कायद्यातील तफावत, वारस हक्क, सोशल वेलफेअर इत्यादी बाबीशी निगडीत आहे. त्यावर लाॅ कमीशन कडून जनमत घेतले जात आहे. त्यासंबंधी  स्वतंत्रपणे आपण चर्चा करणार आहोत. पण --- 

स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या संकल्पना आपण उसन्या घेतल्या आहेत हे तितकसं पटत नाही. आपल्या देशात  वैदिक काळापासून समानो मंत्रः समितीः, समानी व आकृतिः आणि ओम सहनाववतु इत्यादी प्रार्थना स्वरूपात आज ही म्हटल्या जातात. वसुधैव कुटुम्बकम् हे संस्कृत बोधवचनाचा आपल्या येथे किर्तन प्रवचनांपासून तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात मुक्त कंठाने उपयोग केला जातो. इतकेच नव्हे तर राजकीय पक्षांच्या प्रचारसभांत ही उपयोग होत असतो. वसुधैव कुटुम्बकम् या संस्कृत वचनाचा मूळ संदर्भ स्त्रोत हा महाउपनिषद् नावाच्या उपनिषादात येतो. या वचनाचा श्लोक असा आहे - अयं बन्धुरयन्नेति गणना लघु चेतसाम् उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||याचा अर्थ आहे " हा माझा बंधू आणि हा नाही असा विचार संकुचित किंवा क्षुद्र बुद्धीचे लोक करतात. उदार चारित्र्याचे लोक (अर्थातच हिंदू) संपूर्ण पृथ्वी(वसुधा) हेच कुटुम्ब मानतात.

कायद्यापुढे सर्व समान असे बोल आपल्या मुखीं आणि आपल्या कानीं सहजपणे आणि सराईतपणे येतात. आपल्या संस्कृतीत आपण सारें ईश्वराची लेंकरे आहोत अशी धारणा वैदिक काळापासून प्रचलीत आहे.  समान नागरी संहिता हे जितकं लोकशाही व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण आहे तितकचं ते एक मानवी जीवनमूल्य आहे अशी आपली धारणा आहे. म्हणून शाळेत प्रार्थना सोबत जीवनमुल्यावरील कथा आणि चर्चेसाठी वेळ ठेवण्याचा प्रघात सुरू झालेला असावा. 

रविवार १२ ऑगस्टच्या रात्री विश्व संवाद केंद्राच्या साईट वरून अखंड भारत या विषयावरचा लेख वाचला. लेख इतका अभ्यासपुर्ण आहे की वाचताना हा एक अप्रतिम ऐताहासीक दस्तऐवज आहे अशी पदोपदी धारणा होते. या तिन्ही गोष्टी म्हणा वा प्रसंगातून मला लिखाण करण्याची प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त काही लिखाण केले नाही अशी माझ्या मनात खंत निर्माण झाली होती. तीच उफळून येत आहे असे जाणवले. त्यातून स्वातंत्र्य आणि लोकशाही या दोन मोठ्या जीवनमुल्यांवर चर्चा करता करता छोट्या छोट्या जीवनमुल्यांचे ही उकल होईल असा मी अंदाज बांधला. अर्थात यात कितीपत यश मिळेल हे या घडीला सांगता येत नाही. पण प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. आपण वाचक मित्र सांभाळून घेतील आशा बाळगुन आपल्या समोर आलो आहे.

सोमवार १४ ऑगस्ट  २०२३ चा दिवस उजाडला. पण माझी संभ्रम अवस्था संपली नाही. ७६ वर्षापुर्वी मध्यरात्री पर्यंत आपला देश अखंड हिंदुस्थान होता. दिनाक १५ ऑगस्ट १९४७ साली मध्यरात्री दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ब्रिटीश राजवटीचा युनियन जॅक खाली उतरविला आणि स्वतंत्र भारताचा  तिरंगा ध्वजाहोरण झाले. आपल्या  दुर्दैवाने देशाची फाळणी झाली होती. फाळणीचे शल्य टोचत होते.  मुस्लीम बहूल प्रान्ताचं पश्चिमेला आणि पुर्वेला बंगाल प्रान्ताला जोडून इस्लामिक रिपब्लीक पाकिस्तान नावाचा  देश उदयास आला.  दुसर्या महायुद्धात पराभूत झालेल्या जर्मन देशाची फाळणी झाली होती. पण दोन्ही जर्मनी देश एकत्र आले. आपला देश पुन्हा अखंड स्वरूपात पाहावयास मिळेल का ? या प्रश्नाने मन पुन्हा अस्वस्थ झाले.

मंगळवार १५ ऑगस्ट २०२३ उजाडला. आपल्या  देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन ! सर्वत्र आनंदाने साजरा झाला. सकाळी आमच्या आनंदराव पवार शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गेलो होतो. दर वर्षी आमच्या शाळेतून शालान्त परीक्षेत ज्याने पहिला क्रमांक पटकाविला त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. या वर्षी अमृता कांबळे या विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अमृता कांबळे शाळेतून पहिली आलीच पण शालान्त परीक्षा बोर्डाच्या बोरीवली-कांदिवली मराठी माध्यमाच्या विभागात ही तिने ९७-७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमाक पटकाविला आहे. ध्वजारोहणा नंतर एका पाठोपाठ एक  डोळ्याचे पारणे फिटावे असे कार्यक्रम विद्यार्थ्यानी सादर केले. आजी-माजी विद्यार्थी आणि पालक वर्ग सकाळी ७ वाजल्यापासून उपस्थित होते. उशीर झाला होता. शेवटी उपस्थित विद्यार्थी- पालक वर्गाला शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपला. संध्याकाळी घरी देशभक्तीपर गाणी ऐकत होतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची                                  ' जयोस्तु ते  श्रीमहान्मंगले शिवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवति त्वामंहम् यशोयुतां वंदे || ' ही कविता ऐकली आणि या लेखाचं शिर्षक गवसले.    "||ओम् स्वतंत्रते भगवती नमः ||"

या लेखाचे नाव बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी सोपे आहे. पण इतिहासातून या देवतेचं यथार्थ स्वरूप मांडणे हे माझ्यासाठी अशक्यप्राय आहे. याची मला जाणीव आहे. पण गेल्या काही महिन्यात देशात विशेषतः आपल्या महाराष्ट्र राज्यात रोज घडणार्या तथाकथीत राजकीय भूकंप, व दोन्ही पवारांची पाॅवर संबंधीत झालेल्या घालमेलाच्या बातम्यामुळे तो विषय सोडून वेगळ्या विषयावर लिहावे असा पर्याय शोधत होतो, तो प्राप्त झाला. हा पर्याय साधासुधा नाही. प्रयत्न सुरू केले की थोडंफार यश पदरात पडेल अशी आशा आहे. अशा लेखांत राजकारणातल्या दैनंदिन घटना, तसेच सामाजिक, आर्थिक, कला- क्रिडा इत्यादी क्षेत्रातील  घडामोडीचा समावेश नसेल. तसेच हा विषय गहन ही आहे. पुर्णपणे अभ्यास करून लेख लिहावे लागतील. म्हणून या मालिकेत जे लेख पब्लीश होतील ते सलगतेने होणार नाहीत. हे प्रांजळपणे कबूल करून ठेवतो. आपण नेहमीप्रमाणे  अशा लेखांना ही आपलेसे करून घ्याल अशी आशा आहे. 

स्वतंत्रता ही प्रायः सर्व  प्राणीमात्रांना प्रिय असते. कुठल्याही पक्षी वा पशूला मानवाने तयार केलेल्या पिंजरात अडकण्याची भिती असतेच. बालपणी आकाशात उडणारे पक्षी पाहून आपल्याला ही पंख असते तर आपण ही आकाशात स्वैरपणे विहार केला असता असे वाटत असे.जंगलात वाघ, सिंह सारखे हिस्त्र पशू स्वैरपणे हिंडत आपल्या ताकदीच्या जोरावर भक्ष्य मिळवित असल्याच्या कथा ऐकताना किंवा वाचताना, अशा प्राण्यांचा ही हेवा वाटत असे. शाळा नाही, होमवर्क नाही, आई-वडील शिक्षकांचा धाक नाही, अशी स्वतंत्रता आपल्याला असती तर, पण--

जसे आपण मोठे होत जातो तेव्हा लक्षात येते की या पशू-पक्ष्यांपाशी बुद्धी नाही. त्यांच्याकडे उद्यासाठीचं भक्ष्य वा अन्न साठविण्यासाठी फ्रिज नसतात. तिथे कोणी राजा नसतो आणि प्रजा नसते. बळी तो कान पिळी हाच जीवनाचा धर्म. अनेक पक्ष्यांना आणि प्राण्यांना सतत मरण्याची भिती सतावत असते. कारण  ' जीवो जिवस्य जीवनम् ' हा या मानवेतर जगातला मुख्य नियम आहे.  तिथे पक्षी आपल्या पिल्लूंना आकाशात कसे उड्डाण करावे असे शिकवित नसतात. सिंह आपल्या छाव्याला शिकार कशी करावी याचे शिक्षण देत नसतो. गुरू-शिष्य व्यवस्था फक्त माणसात असते.  पशु-पक्षांचा कळप व थवा असतो. तर माणसासाठी समाज व्यवस्था असते. पशु-पक्षांचे जीवन सामुदायिक असते तर माणसाचे जीवन सामाजिक असते. माॅन्टेस्क नावाच्या पाश्चात्य विचारवंताने म्हटले आहे की  Man is a social  being formed to enjoy in society. "  मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. तो समाजात असला म्हणजे त्याला प्रसन्न वाटते. सुखाचा खरा आनंद त्याला समाजातच मिळतो. हा मनुष्य स्वभाव आहे. हाच माॅन्टेस्क यांच्या व्याख्याचा भावार्थ आहे ". म्हणून त्यांच्या व्याखेला अधिक मान्यता मिळाली. 

इतर अनेक पाश्चात्य विचारवंतानी  समाज  या शब्दाच्या आपआपल्या परीने अनेक उपपत्ती सांगितल्या आहेत. त्या बहुतांशी भौतिक सुखाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या आहेत. त्यात गैर काही नाही पण स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार माजतो. सुख, मग हव्यास पुढे नशा त्यातून नैसर्गिक संपत्तीचे नुकसान, शेवटी व्यक्ती बेताल, समष्टी गोंधळात आणि सृष्टी प्रदुषणात, शेवटी सर्वनाश मग उरते काय? नरेची केला नर किती हीन ! हिंदी चित्रपटातले एक गीत आठवले. " देख तेरे संसारकी हालत क्या हो गयी भगवान | कितना बदल गया इन्सान." 

आपल्या भारतवर्षातील ऋषीमुनींनी समाज म्हणजे ईश्वर आणि ईश्वराचे वर्णन करतांना प्रचंड विराट पुरूषाचे चित्र रेखाटले आहे :--  

ओम सहस्त्रशिर्षः पुरूषः सहस्त्राक्षः सहस्त्रपात् || स भुमीं विश्वतो वृत्वात्य-तिष्ठद्दशांगुलम् || " याचा असा अर्थ -- त्याला हजारो मस्तके आहेत, हजारो डोळे आहेत आणि हजारो चरण आहेत. सकलप्राणी रूपाने अनंतशः अनंत अवयव धारण करणारा विराटसंज्ञक पुरूष ब्रह्मांडास सर्व भागी व्यापून दहा अंगुळे उरलाच आहे असा तो परमेश्वर सर्वभूतांतरात्मा आहे. म्हणून माझा आणि सगळ्या समाजाचा, संपुर्ण सृष्टीचा अत्यंत आत्मियतेचा संबंध आहे. सगळं जग माझे आहे व मी सगळ्या जगाचा आहे. ही भावना आपल्याकडे अनादी काळापासून जोपासली जात आहे, त्यांत खंड पडला नाही. आपल्या संस्कृतीच्या या अभूतपुर्व वैशिष्ट्याचं जगातील बहुतांश विचारवंतांनी कौतूक केले आहे.

ग्राम पातळीवर ग्रामपंचायत नावाची राजकीय व्यवस्था आणि समाज व्यवस्था असते, तर शहरात  महापालिका असते व हाऊसिंग सोसायट्या असतात.  राज्य पातळीवर राजकीय व्यवस्था म्हणजे विधानसभा आणि राज्य सरकार असते तर देशपातळीवर लोकसभा आणि केंद्र सरकार असते. या शिवाय न्यायालय आणि अनेक एजन्सीस असतात. मी स्वतंत्र आहे पण इतका नाही की ग्रामपंचायतने केलेल्या  नियमाची मी पायमल्ली करेन; मी ज्या शहरात राहतो तेथील महापालिकीचे नियम मला पाळणे आवश्यक असते; राज्यस्तरावर राज्य सरकार ने तसेच देशपातळीवर केंद्र सरकारचे नियम आपल्या पाळावे लागतात. यातच स्वातंत्र्याचा आनंद सामावलेला असतो.

स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन हे दोन्ही राष्ट्रीय उत्सव आहेत. आपल्याला स्वांतत्र्यचा व्यापक अर्थ कळावा व त्याचे भान ठेवून प्रत्येक नागरिकाने आपले आचारण ठेवावे हा हेतू साध्य व्हावा म्हणून हे उत्सव आपण साजरे करीत असतो.

 तसेच अहिंसा व सत्याग्रह ही दोन शस्त्रे हाती घेतलेली नेतेमंडळी, सशस्त्र क्रान्तीमार्ग स्विकारून प्राणाची आहूती देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि ज्यांनी देशाचे संविधान तयार केले त्या घटना समितीचे सदस्य, संत मंडळी इत्यादी थोर पुरूषांच्या प्रती कृतज्ञता कायम राहावी आणि त्यातून देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याची क्षमता आपल्यात कायम राहावी इत्यादी हेतू ही या दोन्ही उत्सवाच्या माध्यमातून साध्य होत असतात.

वस्तुतः आपला देश हजार वर्षे परवशतेच्या पाशात अडकलेला होता.  म्हणून मध्ययुगात वेळोवेळी परकीय आक्रमकांशी कडवी  झुंज ज्यांनी दिली ते ही स्वातंत्र्यसैनिकच होत. त्यात काही ठिकाणी पराभव झाला, तर काही ठिकाणी विजय मिळविला. तो आपल्या समाजाचा होता असे मानून ते ही राष्ट्रपुरूषच होते असे प्रान्त, भाषा, जात व धर्म असा भेद सोडून मानणे हा आपला स्वभावधर्म व्हावा, हा ही स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक साजरा करण्याचा आणखिन एक उद्देश असतो.  देशातील थोर पुरूषांनी आपआपल्या क्षेत्रात दाखविलेल्या पराक्रमाची केवळ थोरवी गाऊन आपले कार्य वा कर्तव्य संपले असे मानून चालणार नाही.त्यासाठी --

प्रत्येक नागरिकाने आपले शरीर कणखर बनविणे आवश्यक आहे.  बलोपसनेची गरज असते. बलोपसना म्हणजे दैनंदिन जीवनात काही यम-नियम आहेत ते ही पाळणे आवश्यक असते. शरीर सुदृढ तर मन, व बुद्धी सुदृढ मगच खरे स्वातंत्र्य उपभोगता येते. स्वतंत्रतेची व्याख्या फार व्यापक आहे. त्यावर जसजशी आपली चर्चा पुढे जात जाईल तशतशी तिचे दर्शन अधिकाधिक भव्य होत जाईल. स्वतंत्रता असली की माणसाच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. हे आधुनिक शरीर -विज्ञान आणि मानसशास्त्राने मान्य केले आहे. विख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन  एके ठिकाणी म्हणतात की Imagination is more important than knowledge. याचा अर्थ नव्याचा ध्यास घेतला, की नवे उपयोगी ज्ञान म्हणजेच नवीन तंत्रज्ञान जन्मास येते. आजच्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा साह्याने  देशाच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शस्त्रे निर्माण करता येतात. अशा शस्त्रांची निर्मिती स्वबळावर आपल्या देशात सुरू झालेली आहे . स्वतंत्रते तून हाती आलेली ही देशाची मोठी संपदा आहे.

स्वतंत्रता, सुरक्षता व समता यांचा संगम झाला की अंतर्गत दुही, भेदाभेद लयास पावतात. त्यातूनच  इतर व्यवस्था सुद्धा ओघाने सक्षम होत जातात. हजार वर्षाच्या परवशतेच्या पाशातूनच आपल्या देशातील अनेक प्रकारच्या संपदा आक्रमकाने लुटल्या. आणि नको ती मानसिक व वैचारीक गुलामी आपल्यात जडली गेली. दुर्दैवाने ती आजही आहे. जो पर्यंत तिचे उच्चाटन होत नाही तो पर्यंत संपुर्ण स्वतंत्रता अनुभवयास येणार नाही. 

मानसिक व वैचारीक गुलामी  दूर करण्यासाठी सांघिक प्रयत्न व्हावेत तसेच सतत दक्षतेने राहण्याची इच्छा अबाधित ठेवणे गरजेचं आहे. यालाच जन जागृती वा जनजागरण म्हटले जाते. सरकार मग ते केंद्रातले असो वा राज्यातले असो जनजागृतीचे कार्यक्रम करीत असते याबाबत दुमत नाही. असे असले तरी जनजागरणाचे कार्यक्रम सरकारच्या कायदा व सुव्यवस्था, तसेच सांस्कृतिक व क्रिडा खात्यांच्या मार्फत होत असताना त्यावर थोडी-फार राजकारण नावाचे एक ग्रहण आहे त्याची छाया पडते. या उलट काही सांस्कृतिक संस्थां व शैक्षणिक संस्थां तर्फे एखाद्या विषयावर वा समस्यावर जनजागृतीचे कार्यक्रम राबविले जातात ते मोठ्या प्रमाणात स्मरणीय ठरतात, असा आपला सार्वत्रिक अनुभव आहे. कारण अशा संस्थाच्या द्वारें बालवयातच विद्यार्थावर चांगले संस्कार होऊ शकतात. मुलांवर शिशु अवस्थेत चांगले संस्कार झाले की पुढे तेच चारीत्र्यवान नागरिक होतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पुज्यनीय श्री गोलवलकर गुरूजींनी आपल्या विचारधन या पुस्तकात छोटीसी कथा मांडली आहे. ' सामर्थ्य हेच जीवन आणि दुर्बलता म्हणजे मृत्यू ' हेच आपल्या सर्व धर्मग्रंथाचे सार आहे असे म्हणत शरीर बलवान असणे किती आवश्यक आहे हा मुद्दा श्री गुरूजींनी एका कथेतून समजावून दिलेला आहे. त्या कथेत चारित्र्याचे महत्व पटवून दिले आहे. ती कथा भक्त प्रल्हादाच्या चरित्रातील आहे. ती अशी आहे --

'' पुण्य कर्माच्या बळावर इंद्राला पदच्युत करून प्रल्हाद स्वतः देवेंद्र बनला. तेव्हा देवांचे गुरू बृहस्पती यांच्याकडे जाऊन इंद्र म्हणाला, 'महाराज, माझी दयनीय अवस्था आपल्याला माहिती आहे. काय केले म्हणजे माझे सिंहासन मला परत मिळेल?' बृहस्पती म्हणाले, ' एखाद्या सामान्य अतिथीचा वेष धारण करून तू प्रल्हदाच्या दरबारीं इच्छादानाच्या वेळी जावे. याचक जे मागेल ते  प्रल्हाद देतो. त्यावेळी तु जा आणि त्याच्यापाशी त्याचे शील माग. इंद्राने ते मानले आणि अथितीच्या वेषात प्रल्हादापाशी जाऊन त्याचे शील मागतो.

प्रल्हादाने अतिथीला (अर्थातच इंद्र देवाला) विचारले ' माझ्या केवळ शीलावर तू संतुष्ट आहेस हे कसे ? ' अतिथीने उत्तर दिले, ' मला एवढेच पुरेसे आहे. ' प्रल्हाद म्हणाला, ' हे माझे शील तुला दिले.' त्याने असे म्हणताक्षणीच त्याच्या शरीरातून एक आकृती बाहेर पडली आणि अतिथीच्या शरीरात प्रविष्ट झाली. प्रल्हादाने त्या आकृतीला विचारले, ' तु कोण आहेस ? माझे शरीर सोडून अतिथीच्या शरीरात का प्रवेश करीत आहेस?' त्या तेजस्वी आकृतीने उत्तर दिले, ' मी तुझे शील आहे. मला तू या अतिथीला  देऊन टाकले आहेस. त्यामुळे मला आता त्याच्या शरीरात प्रवेश करणे भाग आहे.' क्षणार्धात आणखी एक तेजस्वी आकृती प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडली. प्रल्हादाने त्या आकृतीस विचारले ' तू कोण आहेस ? माझे शरीर सोडून तू बाहेर का जात आहेस? ' त्या आकृतीने उत्तर दिले, ' मी तुझे शौर्य आहे. मी शीलाचा सेवक आहे. तुझ्यापाशी जे शील होते तो पर्यंत मी तुझ्या शरीरात होतो आणि तो पर्यंत मी तुझी सेवा केली, आता शील निघून गेले आहे. त्यामुळे त्याच्या मागोमाग मी ही जात आहे.'  अशा प्रकारे आणखिन आकृती प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडल्या. शेवटी अतितेजस्वी अशी एक स्त्रीरूपी आकृती प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडली. ती म्हणाली, ' मी तुझी राज्यश्री आहे. मी ही शीलाचीच सेवक आहे. तू तुझ्या शीलाचा त्याग केला असल्यामूळे आता मी ही निघून जात आहे. अशा प्रकारे प्रल्हाद आपली सर्व सत्ता व वैभव गमावून बसला आणि इंद्राला त्याचे सिंहासन परत मिळाले.  तात्पर्य शील असेल तर कोणतेही गोष्ट सहज होऊ शकते. ही गोष्ट जितकी व्यक्तीच्या बाबतीत खरी आहे तितकीच राष्ट्राच्या बाबतीत ही खरी आहे. "

वाचक मित्र हो, वरील कथेवरून मला एक वाक्य आठवले. चर्चेच्या ओघात जिथे आवश्यक वाटते तिथे माझ्या वाचनात आलेले ते वाक्य रेफरन्स म्हणून मी देत असतो.  ते वाक्य माझ्या वाचनात २४ ऑगस्ट सन १९७३ ला आले होते. ते आज ही स्मरणात आहे. त्यावेळी दक्षिण मुंबईच्या  हुतात्मा चौकातील (फोर्ट सर्कल) अकबरअलीज् स्टोअरच्या समोर एलआयसीची शाखा क्रमांक ९०१ चे ऑफीस डॅडी हाऊस या इमारतीत होते. तो नोकरीतील माझा पहीला दिवस होता. लंच ब्रेक झाले. डब्बा खाल्यानंतर  जिथे विकास अधिकारी बसतात त्यांचा परिचय करून घ्यावा या उद्देशाने मी त्या विंग मध्ये गेलो. प्रथम श्री माधव बर्वे या जेष्ठ विकास अधिकारीशी ओळख करून घेतली. त्यांच्या टेबलावर छोटेसे ग्रिटीग कार्ड लॅमिनेट करून त्यावर प्रिन्ट केलेलं एक वाक्य मी पाहीले आणि वाचले.  त्या वाक्याच्या खाली उद्गाता कोण हे लिहीलेलं नव्हतं. मी माधवजींना विचारले तर त्यांना ही ते वाक्य कोणी म्हटले हे ठाऊक नव्हते. मला वाटतं त्या वाक्याचा उगम भक्त प्रल्हादाच्या कथेतुनच झाला असावा. ते वाक्य असे आहे--

' Progress of the nation is far less depend upon form of it's institution rather than character of it's own men.'  (अर्थ-- कुठल्या ही देशाचा विकास हा तेथे कुठल्या प्रकारची राज्यव्यवस्था आहे या पेक्षा त्या देशातील नागरिकांच्या चारित्र्यावर अधिक अवलंबून असते.)

वाचक मित्र हो, पुजनीय गोलवलकर गुरूजींनी अनेक जीवनमुल्यांची मांडणी विचारधन या पुस्तकात केली आहे. आपल्या धर्मशास्त्रांच्या बहुतांश पुस्तकातून मानवी जीवनमुल्यांवर आधारीत कथा असतात. त्या कथा छोट्याशा असल्या तरी गगनाला गवसण घालण्याइतकी प्रेरणा त्यातून मिळत असते. चराचर स्षृष्टीतील पहीलं वाहीलं जीवनमूल्य म्हणजे 'स्व' हे होय.  एक चैतन्य रुपी शीवाला अनेक व्हावयासं वाटले आणि त्यातून हे विश्व अवतरलेले आहे. त्यात सहस्त्र आकाशगंगा आहेत, सहस्त्र सूर्य आहेत, अगणीत ग्रह-तारे नक्षत्र आहेत. प्रा पु ग सहस्त्रबुद्धे म्हणतात, स्व म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणे. यातील स्व आणि तंत्र हे दोन्ही शब्द अत्याधिक महत्वाचे आहे. स्व म्हणजे मी, स्वतः आपण, स्व म्हणजे अस्मिता, स्व म्हणजे सर्व शरीराचे अधिष्ठान, स्व म्हणजे कर्तृत्वशक्तीचे मूळपीठ.' या संबंधी सविस्तर चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत. लेखाचा विस्तार वाढला आहे म्हणून मी आता या लेखाच्या समाप्ती कडे जात आहे.

In political science it is said, ' the Government is a machinery of the state.  Demoncrcy  is a form of government of the people, for the people and by the people.'  In  social studies,     ' Liberty means to have the spirit of togetherness.' In civic science ' Liberty means to have a civic sense. It is not just about keeping the roads, gardens, public property clean. Civic sense is more than that. It has to do with law abiding, respect for fellow men and maintaining decorum in public places.  In true sense ' Liberyh means to know, What we owe to our nation and be a part of nation building activities in any form which is acceptable in general.'

थोडक्यात राष्ट्र निर्माणात, गरजू देशबंधु भगिनींना मदत करण्यात, चक्रीवादळ, भूकंप, पूर  अपघात इत्यादी आपात्तीत मदत करण्यात आपले योगदान असावे. याचेच नाव आहे सामाजिक बांधिलकी. त्यातूनच पुढे सेवा परमो धर्मः हे वचन जन्मास आले असावे. बंधनाशिवाय स्वातंत्र्याला ही अर्थ नसतो. प्रत्येक क्षेत्रात एक व्यवस्था असते. त्या व्यवस्थेत असलेले नियम पाळणे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासून गणराज्ये व राजेशाही एकत्र नांदत असल्याचे दाखले आहेत. त्यासंबंधी आपण सवड मिळेल तशी चर्चा पुढे करीत राहू. वैदिक काळापासून  देशात होऊन गेलेले ऋषीमुनी, वैज्ञानिक, समाज सेवक , साहित्यिक, आणि स्वातंत्र्य सैनिक इत्यादी थोर पुरूषांनी तपस्या आणि त्यागातून अनेक ज्ञानगंगा निर्माण केल्या आहेत. त्यातील एक एक थेंब म्हणजे तीर्थ आहे. ते आपण अधुन मधून घेत राहू  या. आपले सहकार्य मला लाभत राहील अशी आशा व्यक्त करून मी येथे थांबतो. धन्यवाद !

         भारत माताकी जय !

शनिवार, २२ जुलै, २०२३

राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड (भाग -४)



 

महाराष्ट्रातील व देशातील भाजपा विरोधी राजकीय अभ्यासक, पत्रकार, संपादक आणि साहित्यीक मंडळी महाराष्ट्रात एका वर्षात दोन मोठ्या पक्षांत फूट पडल्याबद्दल भाजपाला दोष देत आहेत. का तर भाजपा हिंदुत्वाचं कार्ड खेळते. गेली सात दशकं संघ-जनसंघ व पुढे भाजपावर आरोप करीत तथाकथीत सेक्युलर कार्ड जुनाट झाले आहे. यावर मिडीयातील तथाकथीत पुरोगामी मंडळी चिंतन करणार आहे की नाही? म्हणे, ' आमच्या पुरोगामी महाराष्ट्रात राजकारण इतके खालच्या पातळीवर कधी आले नव्हते.' असे म्हणणे हे निव्वळ चोराच्या उलट्या बोंबाच नव्हे काय !  घराणेशाही पक्षांचे समर्थन करणारी मंडळी पुरोगामी असू शकतच नाही. सन २०१९ ला  लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या भाजपा- शिवसेना युतीचे सरकार ज्यांनी महाराष्ट्रात येऊ दिले नाही अशा शरद पवार व उद्धव ठाकरें यांचा काही दोष नाही असे मानून भाजपाची जिरविली अशी भाषा करणारी हिच ती लिबरल लाॅबी ! मग अशांना पुरोगामी कसे मानता येईल ? ज्यांनी महाराष्ट्रात ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद पसरविला, मराठा - मागासवर्गीय असा वाद पसरविला अशी मंडळी समाजद्रोही आहे. आम्ही पुरोगामी, आम्ही शाहू, फुले आंबेडकरांचे वारसदार, आम्ही वंचीत आणि कष्टकरी वर्गाचं भले करीत असतो अशा थापा मारणार्यांनींच मुंबईतील गिरणगाव उद्धवस्त करून गिरणी कामगारांना देशोधडीस पाठविले. हे सत्य आहे. अशांना आपण सतत  निवडून देत राहीलो. पण ' नियती अपराध्यांना शिक्षा देण्याचे विसरत नाही.'  याचा अनुभव आपल्याला आलाच ना ! राजकारणातील शह-प्रतिशहात घराणेशाही- सरंजामशाही सारखी जुनाट, जळमळ वृत्ती जळून खाक होत राहणार आहेच. कुठल्याही व्यवस्थेत बदल होत असतो, तो टप्प्याटप्प्याने होतो. तो काळाचा महिमा होय. उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी जे शस्त्र भाजपावर फेकून महाराष्ट्र राज्याची गादी बळकाविली व देशातून भाजपाला संपविण्याची फुशारकी मारली शेवटी तेच शस्त्र अधिक धारधार व वेगाने परत येऊन त्यांच्यावर आदळले. दोघांचे पक्ष उध्वस्त झाले. जसे कर्म तसे फल ! 

महाराष्ट्रात जे काही होणार होते ते झाले. त्यावर अधिक काही सांगायचे उरले नाही. भाजपाने  बिहार, पंजाब, तामिळनाडू, राजस्थान व पश्चीम बंगालच्या सत्ताधार्यांना लक्ष्य करण्याचे ठरवित असल्याचे ऐकीवात आहे. अर्थात असे आरोप करीत राहण्याचे धोरण लिबरल पंथीय पत्रकार व संपादक मंडळी राबवित असतात. वस्तूस्थिती ही आहे की भाजपा धुरीणांना प्रत्येक प्रांतात आपल्या पक्षाचा जनाधार वाढवयाचा आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य- संगीत- कला, सेवा, कृषी, उद्योग जवळपास सर्वच क्षेत्रात ज्यांनी अलौकीक कामगिरी केली आहे, (यातील काही विस्मरणात गेली आहे) अशांच्या नावाने अनेक योजना केंद्र सरकार राबवित आहे. पद्मश्री सारखे बहुमान जे खर्या अर्थाने पात्र आहेत, अशा व्यक्तीनांच दिले जात आहेत. त्यात राज्य, भाषा, प्रान्त, राजकीय विचारसरणी असा भेदभाव केला जात नाही. संघराज्याची कल्पना जी आपल्या देशाच्या घटनाकरांना अभिप्रेत होती ती प्रत्यक्षात मोदी सरकार कृतीत उतरवित आहे. हे सत्य आहे. याचे दर्शन देशाच्या राष्ट्रपती पदी आज विराजमान आहेत यातून दिसले आहे. फक्त मोदी सरकार आणि संघावर टिका करण्यात विरोधी पक्ष आणि त्यांचे समर्थक मिडीया धन्यता मानत आहेत. देशभरात इडी, सिबीआय सारख्या एजन्सीचा गैरवापर होत आहे असा आरोप करीत असले तरी मोदी सरकार देशहीत जपत आहे अशीच धारणा सर्वसामान्य मतदारांची होत आहे. जर का ईडी, सिबीआय सारख्या एजन्सीज खोट्या केसेस दाखल करीत असतील तर विरोधी पक्षांच्या नेत्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. केंद्र सरकारचे हे हत्यार आपोआप बोथट होईल. त्यातून विरोधी पक्षांच्या हातात केंद्र सरकार विरूद्ध प्रचार करण्याची सुवर्णसंधी लाभू शकते. पण वस्तुस्थिती तशी नाही. म्हणूनच प्रिन्ट सारख्या चॅनेल वरील डाव्या- पुरोगामी राजकीय अभ्यासकांना मोदी सरकारचा पराभव होण्याची शक्यता दिसत नाही. 

सन २०१९ पासून महाराष्ट्रातील राजकारणात जी उलथापालथ झाली. त्याला उद्धव ठाकरे व शरद पवार  कारणीभूत आहेत. त्यांनी जनादेशाचा अनादार केला. पंतप्रधान मोदी शरद पवारांचा आदर करतात, तितकाच आदर उद्धव ठाकरेंचा करीत होतेच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा सोबत सरकार बनविण्यासाठी उत्सूक होता आणि तसा दोनदा प्रयत्न केला. तरी आपल्या २५ वर्षाच्या मित्र असलेल्या शिवसेनेला वार्यावर सोडणार नाही असे भाजपाचे श्रेष्ठी म्हणाले होते. हे गुपीत अजित पवारांनी अलिकडे एका जाहीर सभेतून उघड केले आहे. यातून उद्धव ठाकरे एक्सपोज झाले आहेत. पण पवार- ठाकरे समर्थक मिडीया या बाबतीत मौनच पाळत राहणार. कारण अजित पवारांनी आपल्या भाषणातून जो काही गौप्यस्पोट केला आहे, त्यात तथ्य आहे. पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, याच्या पाठीमागे दोन कारणें होती. त्यातील पहिले कारण अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळता कामा नये. दुसरे असे की उद्धव ठाकरेंवर स्वतःचा रिमोट ठेवणे सोपे होते. शरद पवारांनी भाजपाला महाराष्ट्रातील सत्तेपासून दुर ठेवल्याचा राग पंतप्रधान मोदीं आणि गृहमंत्री अमीत शहांना आला होताच. शेवटी संधी मिळताच शरद पवारांचा ही गेम केला.  उद्धव ठाकरें आणि शरद पवार यांच्या पक्षातले आमदार- खासदार इतक्या मोठ्या संख्येने  दूर का गेले असा आत्मपरीक्षण करू देणारा प्रश्न मिडीयांनी ना उद्धव ठाकरेंना विचारला ना शरद पवारांना विचारला. मिडीयातील मंडळींनी शिवसेनेतल्या फुटीर गटाला गद्दार अशी शिवी देण्यात आनंद मानला. तो आनंद राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुट आणि अजित पवारांच्या भाषणामुळे कायमचा गायब झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूटी संबंधीत टाईम्स नाऊ वर जेष्ठ विधीतज्ञ हरिष साळवे यांनी  एका वाक्यात  विश्लेषण केले आहे ते वाक्य आहे, ' All over the world change in political leadership happens. It is a  natural process. But in India except  BJP and leftist parties, all other political parties are  dynastic. साम्यवादी पक्ष धर्म मानत नाही पण मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मियांना सतत झुकते माप देत असतात. तसेच ते पक्ष क्रान्तीची भाषा करतात. आपल्या देशात सार्वजनिक मालमत्तेची फोडतोड, निरपराधी लोकांची हत्या करीत अस्थिरता निर्माण करणे हा त्यांचा छुपा एजंडा समाजाला कळून चुकला आहे. आपल्या समाजाचा क्रान्तीवर विश्वास नाही, त्याची उत्क्रान्ती वर गाढ श्रद्धा आहे. त्यामूळे साम्यवादी पक्ष भारतात जम बसवू शकत नाही. हीच मंडळी राजकारणातली नेहरू-गांधीच्या घराणेशाहीला सतत पाठींबा देत असते. या पृथ्वीवर जगातल्या सर्व कामगारांचे राज्य येवो असे ध्येय उराशी बाळगणारी हे साम्यवादी पक्ष प्रत्यक्षात हुकूमशाही प्रवृत्तीचे असतात. हाच या पक्षांचा इतिहास आहे. ' जिथे घराणेशाही आहे, तिथे भूमी, सत्ता आणि संपत्ती साठी  भांडण अटळ असते.' त्यामूळे मतदार आणि इतर पक्षातील असंतुष्ट नेत्यांना भाजपा शिवाय दुसरा पर्याय राहीला नाही.  

मागे एका लेखात आपल्या देशातील राजकीय पक्षांत जी घराणेशाही आहे ती २०५० ला संपुष्टात येईल असे मी म्हटले होते.  उद्धव ठाकरे आणि शरद पवार इतक्या झटपट धोबीपछाड होतील असे मला वाटले नव्हते. आपल्या धर्मशास्त्रात  संघौ शक्ती कलियुगे | असे म्हटले आहे, त्यात तथ्य आहे. पण घराणेशाहीचं स्वरूप असलेल्या पक्षांच्या नेत्यांना हे कळतंय कुठे ?  एन टी रामरावांचा तेलगु दसम पक्ष त्यांचे जावई एन. चंद्राबाबू नायडू यांनी  ताब्यात घेतला. आज त्यांची काय स्थिती आहे ?  स्टॅलीन, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव इत्यादी नेत्यांच्या पक्षात आज ना उद्या अंतर्गत दुही माजणार आहेच.  इतकेच नव्हे, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आपआपले पक्ष आपल्या  स्वतःच्या वारसांना मालकी हक्काने मिळविण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे पक्ष ही नामशेष होतील.  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील दुफळीतुन देशातील सर्व घराणेशाही पक्षांसाठी हा इशारा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड (भाग -३)

 


शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी फूट पडली आहे, त्यात फरक इतकाच आहे की राष्ट्रवादी पक्षातील फूटीमुळे विद्यमान सरकारच्या च्या वैधतेसंबधींत कुठलाही विवाद उत्पन्न होणार नाही. जो काही गोंथळ होईल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा की अजित पवारांचा या प्रश्नासंबधींचा असेल.  शिवसेनेतील अशा गोंधळाचा निकाल लागला आणि उद्धव ठाकरें आपला पक्ष आणि धनुष्यबाण ही निशाणी गमावून बसले. तशीच  वेळ शरद पवारांवर येईल असे आज जितक्या आत्मविश्वासाने अजित पवार मिडीया आणि कार्यकर्त्यासमोर जात आहेत त्यावरून दिसते.  

बुधवार ५ जुलै पासून शरद पवार आणि अजित पवार याच्यांत पराकोटीचे शाब्दिक भांडण सुरू झालेले दिसत आहे. त्यामूळे अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचा मूक पाठींबा असावा अशी जी चर्चा  सुरू होती ती थांबेल. अर्थात अशी चर्चा शरद पवारांच्या बाबतीत का होत आहे,  याचे कारण शरद पवारांनी स्वतःची विश्वासाहर्ता आपल्या कर्मानेच गमाविली आहे. शिवाय शरद पवारांशी एकनिष्ठ असलेले पत्रकार प्रत्येक घटनेत शरद पवारांची चाणक्यनिती आहे असेच म्हणत आले आहेत. सारे डावे व पुरोगामी  संपादक- पत्रकार मंडळी या मोहीमेत सामील झाली आहे. हाच काय तो लोकशाहीचा चौथा स्तंभ, असा प्रश्न पडतो. या संबंधित सविस्तर चर्चा ब्लाॅगवर तारीख १४ मार्च २०१९ चा ' शरद पवारांची माघार की हार '  तारीख १२ फेब्रुवार २०२० चा  'शरद पवार ना चाणक्य ना वारकरी फक्त राजकारणी ' आणि २० मे २०२० चा महाराष्ट्रातील राजकारण - थोडसं मागे वळून '  इत्यादी लेखात मांडली आहे. म्हणून या मुद्यावर अधिक चर्चा इथे प्रशस्त वाटत नाही.

आता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यासाठीचे अर्ज दाखल झाले आहेत. ही लढाई या घटकेला न्यायालयात जाईल असे दिसत नाही. पण विधानसभेत विरोधी पक्ष नेता काँग्रेसचा की राष्ट्रवादी काँग्रेसचा, तसेच राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा की अजित पवारांचा, अजित पवारासोबत किती आमदार आहेत इत्यादी प्रश्नांची उत्तरे विधानसभेतून मिळतात की निवडणूक आयोगाकडून यावर  मिडीयात चर्चा रंगल्या जातील. अशा प्रकारच्या संघर्षात सर्वात मोठा फायदा मिडीयाला होतो. कारण त्यांचा टीआरपी वाढतो. तसाच वकील वर्गाला ही फायदा होत असतो. कारण अशा प्रकारची याचिका निवडणूक आयोगासमोर असो वा न्यायालयात असो, अशा याचिकेत दोन्ही गटातील नेत्यांना कायद्याच्या कसोटीला उतरू शकतील असे पुरावे द्यावे लागणार आणि त्यासाठी वकील मंडळींचा सल्ला घ्यावा लागतो. मग वकीलांना भलीमोठी फी द्यावी लागणार हे ओघाने येतेच. तितकी फी राजकीय नेत्यांचा पाॅकेट मनी असतो. 

आधुनिक जगात सारा व्यवहार पैशाने होत असल्यामूळे  One man's expenditure is another man's income हे स्वाभाविकतः अर्थव्यवस्थेचं प्रमुख तत्व झाले आहे. पैशाने सर्व काही खरेदी करता येते हे आजच्या युगातील सामाजिक व  राजकीय व्यवस्थेतील भले आपल्याला रूचत नसले तरी ते खणखणीत नाणें ठरले आहे. त्यामुळे आपले राजकीय नेते ही धनवान झाले आहेत.आपणच मतदार म्हणून त्यांना निवडून देत असतो. निवडणूका व त्यातील दोष, राजकीय पक्षांचे स्वरूप, राजकारणात शिरलेली घराणेशाही, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, आणि पक्षांतरासंबंधीच्या कायद्यातील पळवाटा इत्यादी बाबत काही ठोस उपाय व्हावेत अशी साधक-बाधक चर्चा व त्यासंबंधीचा कमालीचा आग्रह मिडीयाकडून तसेच समाजातील ष्रतिष्ठीत वर्गाकडून होईल असे संभवत नाही.  

लोकशाहीत ' यथा राजा तथा प्रजा ' असे आता म्हणता येत नाही. कारण लोकशाहीत प्रजाच राजा असते. आपणच मतदानाचा हक्क बजाविताना, राजकारणातील घराणेशाही स्विकारली ; आपणच फौजदारी गुन्ह्याचा आरोप असलेल्यांना नगरसेवक, आमदार व खासदार म्हणून निवडून देतो; आपणच राजकीय नेतेमंडळींना 'साहेब' असे संबोधून त्यांना दैवत मानू लागलो. त्यामुळे त्यांनी पक्षांतर करून सत्ता मिळविली तरी त्यावर आपण साधी नाराजी व्यक्त करू शकत नाही. आपल्या अशा असहायतेचं प्रमुख कारण राजकीय पक्षात असलेली घराणेशाही. घराणेशाही म्हणजे नव्या अवतारात आलेली राजेशाही व हुकूमशाही आहे.नगरसेवक,आमदार-  खासदारांच्या पक्षांतरांतून सत्तांतर झाल्यावर जे संघर्ष होतात त्यावर निर्णय घेण्यासाठी न्यायालयात केसेस उभ्या राहतात. अशा प्रकारच्या केसेसचा निकाल लागण्यात न्यायालयात जो विलंब होत असतो तो का होतो हे जाणून घेण्याचा हक्क मतदार राजाला असतो का ?  मिडीयात अशा केसेस संबंधीत सतत चर्चा होत राहावी अशा दुष्ट चक्रात आपल्याला अडकविले जात आहे का?  शिवसेनेतील बखेडाचा निकाल राखून ठेवण्याचे कारण आपल्याला समजू शकले का ? न्यायालयात ही अशा केसेस  High Profile cases मानले जात असावे का, लोकशाहीच्या चार स्थंभात  Nexus  आहे का इत्यादी शंका ब्लॅागवरील राजकीय खटल्या संदर्भातील लेखांवर वाचकांनी उपस्थित केल्या आहेत. मी आपल्या पैकी एक सामान्य माणूस, अशा शंकाचं निरसन कसे करणार ?  पण वाचकांच्या म्हणजेच मतदारांच्या शंका अनाठायी मानता येत नाही.

क्रमशः


राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड (भाग -२)

 


कुठला ही राजकीय पक्ष असो, वा कुठलिही संस्था असो शिर्षस्थ नेत्यांत हुकूमशाहीची वृत्ती वाढू शकते. कारण सत्ता ही मुलतः नशा आणि अहंकार निर्मितीची अदृष्य फॅक्टरी असते. त्यातच पक्ष घराणेशाहीचा असेल तर पक्षाची सुत्रे आपल्या वंशाला मिळावीत असा लोभ पक्षाच्या शिर्षस्थ नेत्याला जडतो. हे आपल्या देशाच्या राजकीय इतिहासातून प्रत्ययास आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष घराणेशाहीचे आहेत. मग आपण म्हणाल की या दोन्ही पक्षात केंद्रात मोदी सरकार आल्यानंतरच का फूट पडली ? प्रश्न रास्त आहे. पण उत्तर ही तितकेच रास्त आहे. 

स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान मोदींच्या अगोदर सामान्यजनातील पंतप्रधानपदी खर्या अर्थाने विराजमान झालेले पहीले पंतप्रधान म्हणजे स्वर्गीय लालबहादूर शास्त्री हे होत. त्यांचे अकस्मात आणि संशयास्पद रित्या मृत्यु झाला. त्यानंतर विराजमान झालेल्या पंतप्रधान इंदिरा गांधीं  ह्या देशाचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. तत्कालीन काँग्रेस वर्कींग कमिटीतील सदस्य तसेच संसद सदस्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी नेहरूंच्या कन्या होत्या, म्हणूनच त्यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. त्यावेळी काँग्रेसच्या संसंद सदस्यांमध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी पेक्षा अधिक  कुवतीचे, अनुभवी आणि जेष्ठ नेते होते जे पंतप्रधान होऊ शकले असते. इंदिरा गांधीमुळे काँग्रेसमध्ये फुट पडली. त्यावेळी इंदिरा गांधीनी Collective Wisdom चा उपयोग करीत सरकारचा कारभार हाकला असता तर काँग्रेस पक्ष आजच्या इतका दुबळा झाला नसता. 

सन १९७१ च्या लोकसभा निवडणूकात मिळालेल्या  प्रचंड यशातुन  इंदिरा गांधींना सत्तेचा कैफ  जडला. त्यांनी निवडणूक प्रचारात सत्तेचा गैरवापर केला हे सिद्ध झाल्यामूळे त्यांची निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्दबदल ठरविली. इंदिरा गांधीनी न्यायालयाचा अवमान करीत देशात आणिबाणी आणून देशाच्या घटनेत बदल केला आणि पंतप्रधानपद कायम राखले. त्याच काळात काँग्रेसची सुत्रे इंदिराजीचे पुत्र संजय गांधींकडे आले होतेच. नंतर पक्षाची सुत्रे राजीव गांधींकडे, पुढे सोनिया गांधी, आणि आता राहूल गांधी आणि प्रियंका वड्रा-गांधी हा इतिहास सर्वांना ठाऊक आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी नंतर नेहरू-गांधी घराण्यात कर्तबगार व प्रभावशाली नेता झाला नाही. विद्यमान नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी -वड्रा या दोन्ही नेत्यांची राजकीय जाण कामचलाऊ पेक्षा कमी आहे. प्रत्येक प्रांतातील काॅगेसजनांना पक्षात आपले भवितव्य अंधूक वाटू लागले आणि ती मंडळी काँग्रेस मधून बाहेर पडली व स्वतःचे पक्ष निर्माण करीत गेले. शेवटी काँग्रेस विकलांग झाली.

वरील इतिहासातून असा अर्थ निघतो की मोदी सरकार केद्रात सत्तेवर नसते तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडणार होतीच. या उलट घराणेशाही नसलेल्या भाजपा पक्षात एक गरीब घराण्यातील नरेंद्र मोदी  पंतप्रधान होऊ शकतात, ही बाब सामान्य मतदारांना कुतूहूलाची तशीच कौतुकास्पद वाटते. स्वच्छ व तत्पर प्रशासनाच्या बळावर देश सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर जात आहे. म्हणून दोन टर्म मोदींनी पुरी केलीच आणि तिसर्या टर्मसाठी ही तेच पंतप्रधान होतील असे दिसत आहे.  त्यामुळे घराणेशाही पक्षात उच्च स्थान तर सोडाच पण तुच्छतेची वागणूक मिळत राहील्यामुळे जेष्ठ नेत्यांना आपला पक्ष सोडून भाजपात जाण्याचा एकमेव पर्याय राहिला आहे. त्यात मोदी सरकारने जनहिताची अनेक कामें केली आहेत. या शिवाय आपले राजकीय करिअर फक्त भाजपा सोबत गेल्याने शाबूत राहील असे आमदार-खासदारांना वाटत आहे. हेच महत्वाचे कारण आहे ज्यामुळे भाजपात आयारामाची संख्या वाढते आहे. 

दुसरे असे की  विरोधी पक्षांचे अल्पसंख्याकांचे लांगुनचालन हे धोरण मतदारांना फारसे पसंत पडत नाही. त्याऐवजी मतदार भाजपाचा सांस्कृतिक राष्ट्रवाद स्विकारीत आहेत. ज्या काही राजकीय चाली मोदी सरकार खेळत आहेत, त्यात ही देशहीत आहे अशी मतदारांना खात्री वाटत आहे. विरोधी पक्ष काही विधायक कार्य करीत आहेत असे दिसत नाही. कर्नाटकात भाजपाला पडलेल्या मतदानात घट झाली नाही. जी काही घट झाली ती देवेगौडाच्या पक्षाची झाली. कर्नाटकात काँग्रेस श्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांवर निवडणूक प्रचाराची व्युहरचनेचे पुर्ण स्वातंत्र्य दिले. म्हणून काँग्रेस पक्षाचा विजय झाला. अर्थात भाजपा सरकार विरूद्ध नाराजी होती तसेच नव्या दमाचा नेता भाजपाकडे नव्हता. या दोन गोष्टीची काॅगसला मोठं यश देण्यात मदत झाली. केवळ कर्नाटकातल्या विजयामूळे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना लोकसभेच्या निवडणूकीत सर्वच प्रान्तात विजय मिळेल असे बिलकूल संभवत नाही. हे सन २०१९ च्या लोकसभेच्या निकालातून सिद्ध झाले आहे.  

क्रमशः

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड (भाग -१)



गेल्या जुन महिन्याच्या ३ तारखेला महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली. यावर लागलीच  लेख लिहावा असे वाटले होते. पण मला सवड काढता आली नाही.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्रमांक दोन चे नेते, विरोधी पक्ष नेता अजित पवारांच्या सोबत आठ आमदारांचा विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथविधी झाला. या घटना संबंधीत न्यूज चॅनेलवरून तसेच वृत्तपत्रातून चर्चा आणि  विश्लेषण आपण ऐकले आणि वाचले असेलच. राष्ट्रवादी पक्षात पडलेली उभी फूट ही त्या पक्षांची अंतर्गत बाब आहे. पण मविआ सरकारचे शिल्पकार शरद पवार होते, तसेच त्यांच्या स्वतःच्या पक्षावर त्यांची पुर्ण पकड असते असेही मानले गेले होते. मविआ सरकार २५ वर्षे टिकेल असे भाकीत महाराष्ट्राच्या गल्लीबोळात पसरले होते. ते ही खोटे ठरले. अर्थात या पाठीमागे तथाकथित पुरोगामी मराठी न्यूज चॅनेल्स आणि वृत्तपत्रांनी अवलंबिलेले गोबेल्स तंत्र होते. त्या तंत्रात केवळ बिघाड निर्माण झाला असे नव्हे तर ते तंत्र संपुर्णपणे जळून खाक झाले. म्हणूनच या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर तसेच राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची होऊ घातलेल्या आघाडीच्या राजकारणावर ही होणार आहे. मविआ सरकारच्या जन्मापासून घडलेल्या घटना आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारण, राजकीय पक्षातील घराणेशाहीचा उदय आणि आता सुरू झालेली पडझड इत्यादी विषयांना स्पर्श केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडाळी संबंधीची चर्चा पुर्णत्वात जाणार नाही. परंतु त्यासाठी लेखाचा विस्तार वाढणार आहे. म्हणून प्रथम दिलगिरी व्यक्त करून या लेखाचे चार भाग आपल्या समोर ठेवतो.

मविआ सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील बंडाळीतून महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. सुप्रिम कोर्टाने आपल्या सुनावणीतून शिंदे-फडणवीस सरकार वैध ठरविले.  परंतु शिवसेनेच्या १६ आमदारांचे (ज्यात खुद्द विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समावेश आहे) विधानसभेतील प्रतिनिधीत्व अजुनही टांगलेल्या अवस्थेत असताना  पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. एखाद्या पक्षात फूट पडणे ही गोष्ट नवीन नाही. परंतु पक्षातील फूट दोन तृतीयांश असून फुटीर गटातील आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, ही बाब अधिक धक्कादायक आहे. म्हणून बहुतांश  विरोधी पक्ष या घटनेमागे केंद्र सरकारचा हात आहे, देशाची संघराज्य व्यवस्था आणि संविधान धोक्यात येत आहे असा आरोप करीत आहेत. असा आरोप करणारे विरोधी पक्ष आणि त्यांची समर्थक मिडीया मंडळींना मी सांगु इच्छीतो की सन १९८० साली इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत हरियाणा सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आपले मंत्रीमंडळ आणि सार्या आमदारांना घेऊन इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्या अगोदर केंद्रातील जनता पार्टीचे सरकार लिबरल लाॅबीने पाडले होते. सन १९७८ ला महाराष्ट्रातील शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करून विरोधी पक्षांचे सहकार्य घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. वरील घटना घडल्या, त्यावेळी  मिडीयातील लिबरल मंडळींना संविधान धोक्यात आल्याची आवई का ऊठविली नव्हती? केंद्रात इंदिरा गांधीचं एक जबरदस्त सरकार होते म्हणूनच पक्षांतर घडली होती की नाही ?  

लोकसभेच्या तसेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूका फार दूर नाहीत. या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुभवी  नेत्यांनी अंदाज बांधला आहे की  सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूका आणि पाठोपाठ आपल्या राज्याच्या विधानसभा निवडणूकीत भाजपा वरचढ राहणार आहे. म्हणून त्यांनी सरळ शिंदे-फडणवीस सरकारात प्रवेश घेतला आहे. त्यात ही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूका लोकसभेच्या निवडणूका सोबत होतील अशी जी हवा निर्माण झाली (किंवा केली)असली तरी तिचा परीणाम महाराष्ट्रातील भाजपेतर पक्षांच्या आमदार-खासदांरावर होत असावा. म्हणून राज्याच्या सत्तेत आपण राहू या असे मत अजित पवारांनी इतर नेत्यांसमोर ठेवले असावे. सत्य हे आहे की केंद्रात एक सशक्त मोदी सरकार आहे असल्यामंळे विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपा सोबत जावे अशी भावना निर्माण होत असेल तर भाजपा किंवा मोदी सरकार वर आरोप करण्यात काय अर्थ आहे.

उद्धव ठाकरें यांच्या पक्षातल्या फुटीच्या वेळी गद्दार,  करोडो रूपयांनी भरलेली खोकी, मोदी सरकार संविधानाचं अस्तित्व संपवत आहे इत्यादी आरोपांचा भडीमार झाला होता. त्यासंबंधीच्या चर्चेला मिडीयात उधाण आले होते. अर्थात  मिडीयातील लिबरल लॅाबीचाच त्यात पुढाकार होता. पुढे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह ही गमाविले. त्यावेळी शरद पवारांची प्रतिक्रीया फारशी तीव्र नव्हती. आपणच जन्माला घातलेल्या मविआ सरकाराचे पतन झाले तरी ते शांत राहीले. तथापी आपल्या सोयीच्या वेळी दोन सोयीच्या प्रतिक्रीया त्यांनी दिल्या. त्या अशा आहेत --
१) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावयास नको होता.
२) पक्षाची निशाणी आणि नाव गमाविणे ही तशी सामान्य बाब आहे. स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधीच्या पक्षाचे नाव आणि निशाणी निवडणूक आयोगाद्वारे दोन वेळा गोठवण्यात आले होते. 

वरील दोन प्रतिक्रीयेतून दोन गोष्टी स्पष्ट झालेल्या होत्या. एक, मविआ सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा निर्णय घेतला नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरेंनी घटक पक्षांना विश्वासात न घेता आपल्या पदाचा राजीनामा दिला. मविआ सरकारच्या पतनातून फक्त आपल्यालाच सहानुभूती मिळावी अशी चाल उद्धव ठाकरे खेळले हे ही उघड झाले. त्यातुनच मविआ सरकार मधील घटक पक्षांत परस्पर समन्वय नव्हता हे स्पष्ट झाले आहे. भाजपाने शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडावी म्हणून आमदारांना अमिष दाखविले, असे आपण क्षणभर मान्य केले तरी ते कारण दुय्यमच (Secondary) आहे.

शरद पवार म्हणजे राजकारणातला अजिंक्य पहेलवान असे म्हटले जाते शिवसेनेच्या फुटीमागील कारणें जसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी मंडळीनी मांडली तशीच पद्धत अजित पवार आणि त्यांचे सहकारी अवलंबीत असतांना दिसत आहेत. दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाविरूद्ध अंतर्गत असंतोष होता हे ही स्पष्टपणे दिसते. परंतु  मिडीया विशेषतः भाजपाची ॲलर्जी असलेली चॅनल्स आणि वृत्तपत्रें भाजपाच्या केंद्र सरकारला दोष देत आहेत. त्यात तथ्य आहे असे आपण मानले तरी दोन्ही पक्षातील भूकंपाची  तीव्रता  इतकी मोठी का झाली हा प्रश्न उरतोच. दोन्ही पक्षातील दोन तृतीयंश आमदार केंद्र सरकारच्या पाठींब्याने फुटले हे तितकसं न पटणारे आहे.  माझे प्रांजळ मत आहे की दोन्ही पक्षातील शिर्षस्थ नेत्यांचा व्यवहार आणि पक्ष चालविण्याची रीत हुकूमशाही पद्धतीची झाली आहे. शिवाय दोन्ही नेते आपआपल्या पक्षातील जेष्ठ नेत्यांना तिसर्या दर्जाची वागणूक देत गेले. शिवसेनेत आदित्य ठाकरें तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्यें सुप्रिया सुळेंचं प्रस्थ वाढत गेले. ही वस्तुस्थिती आहे. परंतु याबाबत भाजपा विरोधी मिडीया मौन पाळत आहे. 
क्रमशः

मंगळवार, १६ मे, २०२३

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि न्यायालयाचा निकाल

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष - स्वरूप आणि सुनावणी या शिर्षकाचा लेख गेल्या फेब्रुवारीच्या २७ तारखेला पब्लीश केला होता. त्या लेखात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय असू शकेल याचे भाकीत River can go no reverse या ओळीतून केले होते. ते खरे ठरले. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या संबंधित पाच-सहा लेखातून ब्लाॅगवर चर्चा केलेली आहे. त्यामुळे आता काही लिहावे असे वाटत नव्हते. तरी ही मी लेख लिहावयास बसलो आहे. याची काही कारणें आहेत. ती मांडून त्यावर चर्चा करीत या लेखाच्या समाप्ती पर्यंत आपण जाणार आहोत.      

१) केसचा निकाल लागला म्हणून महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष संपेल असे वाटत नाही. राजकारण हे असे क्षेत्र आहे की तिथे सतत संघर्ष होत असतात. थोड्या फार प्रमाणात संघर्षाचं स्वरूप बदलत असते तसेच कधीतरी भिडू ही बदललेले दिसतात. आता आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावरून संघर्ष सुरू झालेला दिसतो आहे. जगभरातील सर्वच देशातील राजकारणात अशा स्वरूपाचा संघर्ष असतो. कारण सत्तेचा हव्यास. सत्ता म्हणजे हुकूमत दाखविण्याची वृत्ती. ती सर्व प्राणीमात्रांत जन्मतः कमी अधिक प्रमाणात असते. मानवी जीवनातील सर्वच क्षेत्रात तिचे दर्शन होते. न्यायालयात ही तिचे अस्तित्व असतेच. एकदा का सत्तेची चव चाखली कि तिची सवय होते. त्यातून ती एक प्रकारे नशा बनते. जगाच्या इतिहासात ज्या काही लढाया, युद्धे- महायुद्ध झाली ती त्याच नशेतून. सर्व प्राणीमात्रांत सर्वाधिक प्रगत अशा मानवाची ही कथा, व्यथा आणि दशा आहे. थोडक्यात सृष्टीत ठायी ठायी असलेल्या जीवो जीवस्य जीवनम् या नियमाला अपवाद नाही हेच सत्य.

२) सर्वच क्षेत्रात संघर्ष असतो हा आपला दैनंदिन जीवनातला अनुभव आहे. उदाहरणार्थ पाण्याच्या नळावर, लोकल ट्रेन मध्ये जागा पटकाविताना, रेशनिंग दुकानातल्या रांगेत,  प्रापर्टीच्या हिस्सा, इत्यादी संघर्षाचं कारण आपला स्वार्थ. काॅरपरेट ऑफीस मध्ये सिईओ, चेअरमन, मॅनेजींग डायरेक्टर पदासाठी स्पर्धा असतेच. वरून स्वरूप स्पर्धांचं पण मूळाशी स्वार्थच तो. सरकारी हेड ऑफीसेस पासून ते ग्रामपंचायत स्तरावरील ऑफीसेस पर्यंत सर्वत्र संघर्ष नावाचा माणसांनीच निर्माण केलेला राक्षस व्यापलेला असतो. 

जिथे सर्व प्रकारच्या संघर्षाचं निवारण होते अशा न्यायव्यवस्थेत संघर्ष नसेल असे छातीठोकपणे कोणी ही सांगू शकत नाही. कोणी छातीठोकपणें सांगितले तरी त्यावर समाज विश्वास ठेवेल का ? उत्तर नाही असेच येते. का तर, खोटं सांगण्याच्या वृत्तीचा सर्वत्र इतका कल्लोळ माजला आहे कि त्यातून सत्याचा आवाज ऐकू तरी कसा येणार हो ! त्यात ही कान कवटारून ऐकावे असे ठरविले तरी आपला निश्चय ढासळणारच. कारण  आपण स्वार्थात रंगलेले असतो. 

३)आतापर्यंत आपण केलेल्या चर्चेचा प्रवास समष्टीतून व्यक्ती पर्यंत आला आहे. व्यक्ती कितीही उच्च पदावर असली तरी ती सर्वांशी जवळीक साधू शकत नाही. कारण Man can be civil to all but can not be social to all. Man can be social to many but can not be familiar with many. Man can be familiar with few but can not be friend to few.

कुठलिही व्यक्ती ईश्वरा इतकी निरागस आणि निरपेक्ष असू शकत नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयात ज्या पक्षाचा पराभव झाला आहे तो पक्ष, त्याचे कार्यकर्ते, समर्थक मिडीया न्यायालयाच्या निकालातील आपल्या सोयीचे जे आहे ते ही थोडसं फेरफार करीत त्याची दवंडी पिटविताना दिसत आहेत. तर ज्याचा विजय झाला तो पक्ष सत्याचा विजय झाला असं सांगताना दिसतो आहे.

४) मी वर जे काही मांडले आहे ते सारं काही आपल्याला पटलं असेलच असे नाही. भारताचे सरन्यायाधीश श्री चंद्रचूड याचे निकालपत्र वाचन मी लाईव्ह पाहात होतो. दुसर्या चॅनेल वर काय दाखवित आहे हे पाहण्यासाठी मी चॅनेल बदललं तर तिथे पाहातो तो चक्क उद्धव ठाकरें म्हणत होते की 
' मी राजीनामा देऊन नितीमत्ता पाळली. न्यायालयाने राज्यपालांवर इतके ताशेरे ओढले आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीं नितीमत्ता पाळून राजीनामा द्यावयास हवा.'

उद्धव ठाकरेंनी शिंदेंना नैतिकतेचा  धडा गिरवायला सांगितला त्यावर माझे लक्षच नव्हते. कारण माझ्या मनात ' सरन्यायधिशांचं निकालपत्राचं वाचन सुरू असताना उद्धव ठाकरें पत्रकार परिषदेत इतक्या लौकर कसे आले ' हा प्रश्न घोळत होता. कारण असे की सामान्यतः वकील मंडळी सुद्धा कुठल्याही केसचा पुर्ण निकाल हाती आला नाही तोपर्यंत न्यायालयाच्या निकालावर भाष्य करीत नाहीत. उद्धव ठाकरेंना फायनल वर्डीक्ट अगोदरच हाती आले होते की काय अशी शंका आली. नशीब माझं, शंका न्यायालयात दाखल केली जात नाही.

तर दुसर्या एका चॅनेलवर ' उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून एकनाथ शिंदेचं सरकार वाचले ' अशी हेडींग देऊन बातमी प्रक्षेपित होताना दिसली. मिडीयावाल्यांशी सलगी  शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरेंची  अधिक आहे असे प्रथमच जाणवले. उद्धव ठाकरे ही मिडीया वाल्यांचे आवडता नेता झाले आहेत. यात ही  राजकारण आहे. 

मविआ सरकार अस्तित्वात असतांनाच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात शीत युद्ध सुरू झाले
होते. अलिकडे शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचं नाट्य घडवून काॅग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला. शरद पवारांना प्रथम मविआ वर स्वतःचे अधिराज्य ठेवावयाचे आहे. ते अंशतः पार पाडले आहे. म्हणजे येणार्या निवडणूकात उमेदवार संख्या तसेच मतदार संघावरील हक्क इत्यादीवर स्वतःचे नियंत्रण ठेवता येईल. तसेच आपले पुतणे अजित पवार यांचे पंख छाटावयाचे होते. ते ही अंशतः पार पाडले आहे. 

उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेशीं लढावयाचे आहे तसेच मिडीयांना हाताशी धरून शरद पवारांना ही शह द्यावयाचा आहे. आपले सरकार पाडले या संबंधीतली सहानुभूती मिळवायची आहे. त्यात अधिक भागीदार नकोसे झाले तर प्रथम राष्ट्रवादी काॅग्रेसशी पंगा घेऊन  काॅग्रेसशी हातमिळवणी करणे त्यांना श्रेयस्कर वाटत असावे. 

शेवटी त्या चॅनेलवरून मी परत जिथे  सरन्यायाधीशांचे निकालपत्राचे लाईव प्रक्षेपण होते तिथे परत आलो आणि ते पुर्ण ऐकले. इथेच मला यावर लेख लिहावा अशी इच्छा झाली.
 
५) आपल्या सारख्या सामान्यजनांना उद्धव ठाकरे यांचा न्यायालयात पराभव झाला एवढी माहिती पुरेशी ठरते. तसे पाहता या केस मधील तीच खरी हेडलाईन आहे. तरीही काही प्रसारमाध्यमांनी खोडसाळपणा केलाच. याचे कारण लिबरल पत्रकारांची ती एक खोड आहे. दुसरे असे की काही प्रसारमाध्यमां समोर एक मोठी अडचण असते ती म्हणजे त्यांना उपकृत करणार्या नेत्यांच्या घरचे वासे ते कसे मोजणार?  ठीक आहे !  त्यांचा टिआरपी वाढतो, जाहिराती अधिक मिळतात,  धंदा वाढतो, उत्पन्न वाढते, काही हातांना रोजगार मिळतो हे ही नसे थोडके ! परंतु हेड लाईन्स बदलून जनता फसत नाही कारण सोशल मिडीयातून खरे वृत्त समजते. 

उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यामांच्या मेहरबानी वरून नैतिकतेचा मुद्दा मांडत संघर्ष नव्या जोमाने सुरू केला असला तरी त्यातून मूळ शिवसेना त्यांच्या हातात येणार नाही. तसेच त्यांच्या नैतिकतेचा लिलाव मुख्यमंत्री होतानाच झाला होता. म्हणूनच तर त्यांच्या पक्षात इतका मोठा भूकंप झाला. काही लोक उद्धव ठाकरेंनी पलायन केले असे ही म्हणाले आहेत. मी तसे मानत नाही. पण त्याच बरोबर उद्धव ठाकरें यांनी नितीमत्ता पाळुन राजीनामा दिला हे ही मला पटले नाही. उद्धव ठाकरेंच्या राजीनामा देण्याची खरी कारणें काय असावीत ती मी खाली मांडतो आहे ---
i) ते जे नैतिकता वर किर्तन करीत आहेत ना, त्यावर  शिंदे गटाचे वकील ज्यांचे नाव जगभर प्रसिद्ध आहे, असे भारताचे भुतपूर्व साॅलिसेटर जनरल श्री हरिष साळवे यांच्या मुखातून  सणसणीत उत्तर अगोदर मिळालेले होते. ते असे आहे,  There is no Law to fill the gap of morality. 
ii) उद्धव ठाकरेंना पक्षातल्या मोठ्या भूकंपाचा मोठा धक्का बसला त्यातून ते सावरले नव्हते. 
 iii) उद्धव ठाकरेंना विधानसभेत पराभवाला तोंड द्यावयाचे नव्हते. कारण त्यांच्या सरकारने बहुमत गमावले होते हे त्यांना ही कळले होते. iv)विधानसभेत वाटेला येणार्या नामुष्की पेक्षा राजीनामा हाच मार्ग उत्तम असे अनिल परब सारख्यांनी त्यांना पटवून दिले असावे. दुसरा पर्याय ही नव्हता.
v) शेवटची कॅबिनेट मिटींग संपल्यानंतर घटक पक्षांचे नेते 
आपआपल्या घरी गेले. उद्धव ठाकरें एकाकी पडले. त्यातून ना तुम्हाला ना मला या त्यांच्या अंगभूत वृत्तीचा मंत्रालयात असतानाच स्फोट झाला असावा. त्यातून त्यांनी राजीनामा दिला असावा. 
vi) घटक पक्षांबरोबर मंत्रालयात जी बैठक झाली होती त्यात खडाजंगी झालेली ही असू शकेल. त्यामुळे  अनासायाने वारस हक्कातून मिळालेले पक्षप्रमुख पद, ऐश्वर्य, प्रतिष्ठा आणि लोकप्रियता इत्यादी  तून वाढलेला त्यांचा अहंकार दुखावला गेला. त्यातून राजीनामा दिला असावा.
vii) प्रशासकीय कामकाजाच्या अज्ञानामूळे पदोपदी इतरांवर अवलंबून राहण्याच्या घटनांतून त्यांना आलेला वैताग यातून ही राजीनामा दिला असावा.

९) उद्धव ठाकरें यांच्यावर राजीनामा द्यावयास कोणीही दबाव आणला नाही, कोणी धमकी दिली नाही.  वरील सहा पैकी एक ही कारण असे नाही की सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद बहाल करू शकत होते. या शिवाय प्रशासनातले अज्ञान ही सबब कायद्यात चालतच नाही. कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेताना फेमस वाक्यें शिकलो आहे. त्यातील एक खाली देत आहे --
' Ignorance can not be an excuse before Law. ' 

वाचक हो, एकनाथ शिंदे गटाचे वकील हरिष साळवे यांचा युक्तीवाद कायदा आणि व्यवहार, संविधान आणि न्यायालय. विधानसभा व राज्यपाल, विधानसभा व न्यायालय निवडणूक आयोग व न्यायालय इत्यादी संस्थामधील बॅलन्स संबंधीचा युक्तीवाद इतका सहज सरल होता की  सरन्यायाधिश सकट पुर्ण घटनापीठ कान टवकारून ऐकत होते. केसच्या सुनावणी दरम्यान  कपिल सिब्बल सारख्यांना सरन्यायाधिशांनी एके ठिकाणी सहज  विचारले, ' क्या आप लोग हरिष साळवेजीसे डरते हो ? '  

वाचक मित्रहो, आपण आता लेखाच्या समाप्ती कडे जात आहोत म्हणून मला वाटते की हरिष साळवे यांनी जो काही युक्तीवाद केला होता त्याची थोडीशी झलक आपल्यासमोर ठेवुन या लेखातील चर्चेला विराम देतो.  
१) एखादा मुख्यमंत्री राजीनामा देतो आणि राज्यपाल तो राजीनामा स्विकारतात, त्यानंतर  राज्यपालांनी ते राज्य मुख्यमंत्री विना ठेवायचे असते का? ज्यांचा राजीनामा स्विकारला त्या मुख्यमंत्र्याची सत्ता जी गेली आहे, त्यावरील इथे जी चर्चा होत आहे ती फक्त ॲकॅडॅमिक ठरते. 
२) आपल्या येथे भारतात बर्याचदा आपण एका व्यक्तीलाच पक्ष मानण्याची चूक करतो. मुख्यमंत्र्या संबंधी त्यांच्या आमदारांत नाराजी असेल तर ते दुसरा नेता का निवडू शकत नाही. Anti defection law can not be Anti decent law.
३) Law can not treat Uddhav Thakare's resignation as illegal. 
४) उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता आणि त्यांना राज्यपालांनी विश्वास दर्शक ठरावास सामोरे जा असे सांगितले असते तर उद्धव ठाकरे जिंकले असते किंवा जिंकले नसते अशा प्रकारच्या चर्चांत आपण भाग घेऊ शकत नाही. अशी चर्चा इथे न्यायालयात अपेक्षित नाही. 
५)  Neither Governor nor this Court has got right to count the heads of the members of assembly. It is the right of the Speaker. And The flour test has to be carried out in the house of assembly. 

एकंदरीत ज्या केसचा फार गवगवा झाला, उलट सुलट फेक न्यूज ही येत राहिल्या, सगळी चॅनेल्स दोन-तीन महिने या केस भोवती घिरट्या घालत होते त्यातून कायद्याच्या विद्यार्थ्यापासून ते अभ्यासकापर्यंत, पत्रकारापासून ते संपादकांपर्यंत, राजकीय पक्षांच्या नेत्यापासून ते कार्यकर्त्यापर्यंत सर्वांना मार्गदर्शन मिळत राहील यात बिलकूल शंका नाही. परंतु त्यातून जनसामान्यांच्या हाती एक हेडलाईन आली. ती म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा पराभव तर लांबलचक न्यायालयीन लढाई ही 
' डोंगर पोखरून उंदीर ' ठरली.
 

शनिवार, २९ एप्रिल, २०२३

मोदी सरकार × विरोधी पक्ष + विरोधी मिडीया + विदेशी शक्ती ( भाग - २ )

मोदीजींनी आत्मनिर्भर भारत अशी घोषणा केली तेव्हापासून मिडीया मधील पुरोगामी मंडळींना अधून मधून वांतीचा विकार होत असावा असे वाटते. ज्यांना मोदी सरकारच्या कारकिर्दीत भारताची होत असलेली प्रगती पाहावत नाही, अशांपैकी जगावर राज्य केलेल्या इंग्लंडच्या बीबीसीनेच पूढाकर घेतला व आपल्या पंतप्रधानांची खोटी-नाटी डाॅक्युमेन्टरी बनविली. सोबत राहूल गांधी नावाचा पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची मुलाखत जी मोदींवरील टिकाने भरलेली होती ती पब्लिश केली. 

विरोधी पक्षांना एखाद्या परदेशाने  भाजपा सरकार विरूद्ध काही टिप्पणी केली की ते त्याचे स्वागत करून त्याचा राजकीय अजेंडा बनवितात.  राहूल गांधी म्हणाले होते की भारतात मोदींची हुकूमशाही आहे. आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांच्या (मनमोहन सिंग) निर्णयाचे कागद भर रस्त्यात फाडणारे राहूल गांधी हे रक्ताने हुकूमशाही वृत्तीचेच आहेत.  ही घटना बीबीसीला माहित होती. मग बीबीसी ने त्या घटनेची आठवण करून राहूल गांधींना त्यांची ती कृती हुकूमशाही वृत्तीची नव्हती का असा उलटा प्रश्न विचारला का नाही ? पण त्या पत्रकार परिषदेचा उद्देश   मोदींना हुकूमशहां म्हणण्यासाठीच होता. त्यामुळे भारतात बीबीसीची जी काही पत होती ती घसरली आहे आणि पुढे आणखिन घसरत जाईल.

बीबीसीने राहूल गांधींना भारताचा भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात राहूल गांधीचा दोष नाही. कारण गांधी- नेहरू घराण्यातील सदस्यांना जनतेने ७० वर्षे पाठींबा दिला होता. पण तत्कालीन  विरोधी पक्षांनी विदेशी शक्तीं च्या साह्याने  रक्तरंजित क्रान्ती घडवून काॅग्रेसची सत्ता उलथून पाडण्याचे दृष्कृत्य केले नाही. कारण आपला समाज क्रान्ती पेक्षा उत्क्रांती वर विश्वास ठेवतो. हे तत्कालीन विरोधी पक्षांच्या नेते मंडळींना ठाऊक होतेच शिवाय ते मनाने व बुद्धीने खरेखुरे लोकशाहीवादी होते. स्वर्गीय पंडीत नेहरू यांच्या धोरणामुळें भारत गरजेपेक्षा अधिक काळ कोलोनाईज्ड (म्हणजे ब्रिटीशांचा गुलाम सारखा) वाढत राहीला. त्याला जनतेने गेल्या दोन लोकसभा निवडणूकीच्या मतदानातून विरोध करून भाजपाचे सरकार सत्तेवर आणले. ही बाब प्रांजळपणे विरोधी पक्षांनी स्विकारावयास हवी. 

भाजपाला पराजित करायचे असेल तर राहूल गांधींना विदेशात जाऊन पंतप्रधान मोदीं वर टिका करण्याची गरज नव्हती. आपल्या देशाच्या घटनेतील कलमांचे पालन करून मतदारांची पसंती मिळवून सत्तेवर येण्याचा मार्ग खुला आहे. तो स्वीकारावा असे वाटते पण तेवढी ताकद, हुषारी, जाण असावी लागते ना ! नसेल तर राजकारणात शिरल्यानंतर राजकीय जाण व प्रगलभता  वाढविण्याचे प्रयत्न तरी राहूल गांधींनी करावयास हवे होते की नाही ? बापजात्यांच्या पुण्याईने सत्ताधारी बनण्याचे दिवस संपले आहेत हे पप्पू महारांजाना कधी कळेल हे फक्त देव जाणो !

जार्ज सोरास ने भाजपाला पराभूत करावयाचा विडा उचलला आहे. त्यामुळे भाजपा, मोदी आणि संघ विरोधात आपण काही ही लिहू शकतो, बोलू शकतो असा समज आपल्या येथील बहुतांश प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनीक्स मिडीयांचा ही झाला आहे. या सार्या नाट्यात प्रथम बीबीसीला घरचाच अहेर मिळाला. लागलीच मोदी सरकारने दिल्ली येथील बीबीसीच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स ची धाड टाकली आणि आमची पुढची पाऊले कशी असतील याची जाणीव करून दिली. 

नेमक्या त्याच वेळी राहूल गांधीवर सूरतच्या कोर्टात जुन्या केस मध्ये मोदींची बदनामी केलेला आरोप सुरत सत्र न्यायालयात सिद्ध झाला आणि  दोन वर्षाची तुरंगवासाची शिक्षेची घंटा राहूल गांधीच्या गळ्यात विनासायास अडकली गेली. 

असा हा आरोपी आपल्या येथे पंतप्रधान पदाचा उमेदवार कसा गणला जाणार हा पहिला आणि सर्वात मोठा अडथळा मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी  बाह्या वर चढवलेल्या कुस्तीगारांपुढे उभा राहिला आहे. आपल्या येथील लोकप्रतिनिधी कायद्यान्वये  मंत्री, आमदार, वा खासदार असो त्याचे संसद किंवा विधानसभाचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. तसे पाहता ही घटना आपल्या देशान्तर्गत मामला आहे. पण या घटनेमुळे इंग्लंड मध्ये फार कौतुकाची ठरलेली राहूल गांधी च्या मुलाखतीचे बारा वाजलेच पण मोदी सरकारचा पराभव करण्याचा निश्चय केलेल्या आंतरराष्ट्रीय टोळींचा दम घुटला गेला असावा. असे असले तरी भाजपाने या बाबत राहूल गांधींनी क्षमा मागावी इतकीच मागणी केली आहे. 

राहूल गांधींना हायकोर्ट कडून सुटकेचा श्वास दिला गेला तरी राहूल गांधींची वृत्ती हुकूमशाहीची आहे ही बाब जगभर पसरली आहे. त्यातून विनासायास भाजपाला राहूल गांधींच्या बदनामीचा बोनस (म्हणजेच भाजपाला कर्नाटकात होणार्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ) प्राप्त झाला. तसे पाहता राहूल गांधींचे संसद सदस्यत्व राहिले काय आणि रद्द झाले काय भाजपाला काही फरक पडत नाही. उलट केरळ मधून राहूल गांधींचा  पराभव करणे भाजपाला अधिक भावेल. संसद सदस्य म्हणून राहूल गांधींनी संसदेत व आपल्या मतदार संघात काय दिवे लावलेत? वारसहक्काने मिळालेला मतदारसंघ आपल्या कर्माने गमावलाच ना ! तो  संसदेत काॅग्रेसची संख्या ५० पर्यंत खाली आली. २५ -३० जेष्ठ काॅग्रेस नेते काॅग्रेस सोडून गेले. अनेक राज्यात काॅग्रेस ने सत्ता गमाविलीच नव्हे तर तिचे नामोनिशाण मिटले. हा राहूल गांधीच्या पक्षीय कामगिरीचा आलेख. बीबीसी ने भारताचा भावी पंतप्रधान म्हणून त्यांची मुलाखत घेतली खरी, पण त्यातूनच बीबीसीचे अधःपतन होत आहे असाच निष्कर्ष निघतो.

राहूल गांधी माफी मागत नाहीत. या कारणाने राहूल गांधींना जेल मध्ये का म्हणून भाजपा पाठविल ? नॅशनल हॅराॅल्ड केस संबंधीत गती आणण्याचे काम मोदी सरकारच्या हातात आहे.  दुसरे कारण असे आहे की राहूल गांधीमूळे भाजपासाठी निवडणूकीच्या प्रचारात आघाडी मिळत जाते. त्यांच्या भाषणातून जिथे शक्यता नाही तेथून भाजपाचे उमेदवार निवडून येणार असतील तर भाजपाला नॅशनल हॅराॅल्ड केस द्वारा राहूल गांधीना लोकसभा निवडणूकांच्या अगोदर जेल पाठविणे सोपे असले तरी भाजपा तसे करणार नाही. कारण राहुल गांधीच्या रूपाने अनासायाने  भाजपाला प्राप्त झालेला प्रचारक निवडणूक प्रचारात असणे हेच पसंद करीत राहणार." कायदेशीर बाबींतून विरोधकांना कसे अडकवून ठेवावयाचे आणि कधी शेवटचा ठोका हाणायचा यात भाजपा माहिर आहे. हे सी चिदमंबरम यांच्या केस मधुन सिद्ध झालेले आपण पाहतो आहोत. एके काळी काॅग्रेसेचा हुकमी एक्का मानला जाणारा चिंदमंबरम कायमचा अडगळीत पडला आहे. 
 
गेल्या दोन-चार वर्षात विरोधी पक्षांनी भाजपा विरोधात एक नवे अस्त्र वापरावयास सुरूवात केली आहे. यासाठी ही विदेशी शक्तीकडून मदत मिळत असावी. प्रत्येक प्रकरणात न्यायालयात धाव घ्यावयाची आणि भाजपाची सत्ता असलेली राज्यें तसेच केंद्र सरकार विरूद्ध  कोर्टात केस टाकावयाची आणि सरकारी कामकाजात दिरंगाई आणावयाची, जेणेकरून देशाची प्रगती रोखली जाईल असे डावपेच विरोधी पक्ष सतत करीत राहणार असे भाष्य बीबीसीचे मातब्बर पत्रकार टुही यांनी सन २०१५ लाच केलेले आहे. पण प्राॅब्लेब असा आहे की सुप्रिम कोर्टाला ही आपल्या निर्णयात फारसा हस्तक्षेप करू देणार नाही असे हे मोदी सरकार आहे. हे विदेशी शक्तींना ठाऊक कुठे आहे ?.

अलिकडे न्यायालयाने सरकार नपुसंपक आहे का अशी गलिच्छ टिका केली. तसे पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी रस्त्यावर येऊन मोदी सरकार विरोधात बंड केले होते तेव्हापासूनच विरोधी पक्षांना न्यायालियाचेही पाठबळ मिळतेय का अशी चर्चा जनमानसात सुरू झालीच आहे. तेव्हा ही मी न्यायालय राजकीय आखाडा बनतेयं या शिर्षकाचा लेख सन २०१८ साली लिहीला आहे. भारत सरकारच्या साॅलिसेटर श्री तुषार मेहता यांनी सुप्रिम कोर्टाला " हे केंद्र सरकार नपुसंपक नाही " असे ठणकावून उत्तर दिले आहे. केंद्रीय कायदा मंत्री  किरण रज्जू यांनी ही परखडपणे  'आपण बरे आणि आपले काम बरे' असा सल्लावजा इशारा न्यायालयाला दिला. 

मोदी सरकारचे मंत्री ज्यांना विकास पुरूष मानले जातात, असे श्री नितिन गडकरींनी सुद्धा मागे न्यायालयाची सरकारच्या कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रवृत्ती वर प्रखर टिका केली होती. सरकारच्या इनफ्रास्ट्रक्चर वा एखादा विज्ञान प्रकल्प उभा करण्याच्या योजनेवर  टिका करण्यापेक्षा न्यायालयाने सारासार विचार करून काही उपाय अथवा पर्याय सुचवावा किंवा त्या प्रकल्पातील व्यावसायिक तज्ञांशी प्रथम सल्ला मागावा आणि नंतरच प्रतिक्रीया द्यावी असे मला वाटते.

निवाडा, निव्वळ मतप्रदर्शन आणि शेरेबाजी ह्यात अंतर असते. म्हणून जनमानसावर आपण मारलेल्या  शेरांचा परिणाम होत असतो हे न्यायाधिशांनी अधिक ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. कारण राजकारणात कार्यरत असणार्या नेत्यांपेक्षा न्यायाधिशांच्या प्रति लोकांच्या मनात अधिक आदर असतो. 

लिबरल लाॅबीच्या बड्या वकीलांनी सुप्रिम कोर्टला जेव्हा मध्यरात्री आतंकवाद्यांच्या फाशीबाबत पुनर्विचारासाठी न्यायनिवाडा देण्याचे सांगितले, त्या त्या वेळी सुप्रिम कोर्टाने प्रत्येक केस सुनावणीला घेतली आणि निकाल ही दिला. त्यावेळी अशी काय मनःस्थिती सुप्रिम कोर्टांच्या न्यायाधिशांची होती, या संबंधी जनसामान्यांना काही ही माहिती न मिळणे हा कुठला न्याय ? न्यायाधिशांनी आपण हून लोकांचे प्रतिनिधी आहोत हे आपल्या कृतीने दाखविणे आवश्यक आहे. ती जबाबदारी आहे अशी जाणीव न्यायाधिशांच्या मनात असल्यावर न्यायपालिका आपल्या लोकशाहीच्या गळ्यातील तिसरा अलंकार अधिक शोभून दिसेल. 

सरकारला नपुसंपक म्हणून हिणविता आणि समलिंगीच्या विवाहास मान्यता देण्याची तयारी (भले ती कच्च्या स्वरूपात असली तरी) करणार्या न्यायधिशांना आपण काय आणि कसे संबोधणार हो ?  आपण ही माणसें आहात, नागरिक आहात, आणि महत्वाचे म्हणजे न्यायाधिश आहात.  मराठा इतिहासातील रामशास्त्री प्रभुणेंचे वारस आहात याचे भान ठेवावयास हवे. अन्यथा जनतेत न्यायालयिन व्यवस्थेवरील आदर कमी होत जाईल असे मला वाटते.  

सामान्य माणसांच्या किती केसेस प्रलंबित आहेत? वर्षातून किती वेळ न्यायाधिश सुट्टी (vacation) वर असतात, हेही आजच्या काळात सामान्यजनांत चर्चीले जाणारे विषय होत आहेत. सरकार व इतर तत्सम घटनात्मक संस्था प्रमाणे न्यायव्यवस्था ही जनतेच्या सेवेसाठी आहे. ती ना मिलोआर्डशिप पुरती आहे, ना केवळ श्रीमंतांच्या व दशहतवाद्याच्या केसेस प्राधान्याने सुनावणी साठी !  असे चित्र जनतेच्या मनात बिंबवण्यासाठी काही धोरणात्मक बदल करण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालय व Bar Council ने करायला हवा असे मनापासून वाटते. न्यायालयाकडून आडमुठेपणाचे दर्शन झाले तर जनसामान्यांत नैराश्य पसरण्याचा धोका अधिक असतो. सरकार नावाच्या व्यवस्थेबद्दल जनतेत नाराजी झाली त्या त्या वेळी सरकारचा जनतेने पराभव केला आहे. कारण संविधानाने तशी व्यवस्था केली आहे. सत्तेवर असलेल्या सरकार प्रती न्यायालयाने आदर बाळगावयास हवा. शेवटी कायदे संसद तयार करते ना ! ते ही संविधानातील तपशिलातूनच 
की ! हाच सर्वात मोठा न्याय ! सरकार कुठल्याही पक्षाचे का असेना  न्याराधिशांची जीभ घसरत असेल तर त्यांनी सरळ राजकारणांतच उतरावे. आणि पुन्हा त्यांना वकिली करता येणार नाही असा कायदा येणे आवश्यक वाटते. 

काँग्रेसच्या राज्यात इडी, सीबीआय आयटी व एनआयए या सरकारी एजन्सीजचे पंख छाटून ठेवले होते. तेव्हा सुप्रिम कोर्टात आता जशा भ्रष्टाचाराच्या केसेस पोहचत आहेत तसला प्रकार संख्येने फारच मामूली होता. कारण 'आओ, खाओ पिओ ' हाच सर्व व्यवस्थांचा धर्म झालेला होता. आता मोदी सरकारच्या धोरणामूळे भ्रष्टाचाराच्या केसेस वाढत आहेत. त्यातून कामाचा बोजा वाढला असेल तर अर्थसंकल्पेत अधिक स्टाॅफ साठी आर्थिक तरदूत मागता येऊ शकते ना ! 

न्यायव्यवस्थेत न्यायाधिश बनण्याची प्रक्रिया म्हणजे बाॅलीवुड मधील नेपोटीझम सारखीच असते, असे निवृत्त न्यायाधिशांनी न्यूज चॅनेलवरून मांडले असल्याचे मी ऐकले आहे. न्यायाधिश या देशाचे नागरिक आहेत त्यांना ही इथले कायदे लागू होणे अनिवार्य असते. न्यायाधिश मंडळी स्वर्गातून येत नसतात. वकिली चालत नाही म्हणून न्यायाधिश व्हावयास वाटणे हे स्वाभाविक आहे. कारण प्रत्येक प्रोफेशनमध्ये फार मोठी स्पर्धा असते. हे कलियुगातले दूषण आहे. त्यावर मानवाकडे काही इलाज नाही. काहींचे बाबा, काका, मामा, भुतपुर्व न्यायाधिश होते, अंशांची मुले, भाचे, पुतणे, जावई न्यायाधिश बनत असतात. असे मी म्हणत नाही तर निवृत्त न्यायाधिश न्यूज चॅनेल वरील चर्चेत मांडतात. न्यायाधिशांच्या अशा प्रकारे नेमणुका होत असतील तर  गुणवत्तेच्या कसोटीवर न्यायाधिश होण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांवर घोर अन्याय होतोच ना ! याचा अर्थ न्यायालयात  ही अन्यायाचे आणि अंधाराचे राज्य असते की काय? मोदी सरकार या पद्धतीत बदल करणार असल्याचे कळले आहे. त्याला न्यायव्यवस्थेने सहमती द्यावी अर्थातच घटनेतील कलमान्वयेच.  येथे मी एक कायद्याचा विद्यार्थी आणि पदवीधर असुनही लहान तोंडी मोठा घास घेतला असे मला वाटते. कारण माझ्यावर तसे संस्कार घडले आहेत. 

मागील कुठल्या तरी एका लेखात 
केंद्र सरकार आणि सुप्रिम कोर्ट यांच्या
मधील संबंध बिघडत आहेत असे वर्तमानपत्रात येत होते. त्या वेळी मी वाचकांना वचन दिले होते की योग्य वेळी व योग्य जागी मी माझे विचार मांडेन. ती वेळ व जागा साधून मी माझे वचन पाळले आहे. वचन पाळणे ही एक प्रामाणिकता व नितीमत्ता चं लक्षण आहे.

आजच्या घडीला भारत देशाच्या अंतर्गत राजकारणात  हस्तक्षेप करण्याचा विदेशी शक्तीचे जे डाव आहेत त्यातल्या पहिल्या डावात राहूल गांधींना लोकसभेची निवडणूक लढविण्यातच मोठा अडथळा निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. विदेशी शक्तीच्या व आपल्या येथील त्यांच्या चमच्यां च्या थोबाडीत सणसणीत चपराक हाणली गेली आहे. 

पुढच्या डावात राहूल गांधी यांच्या  परदेश दौर्याचा पुर्ण रिपोर्ट RAW ने  केंद्र सरकारकडे सादर केलेला असेल. त्या रिपोर्ट मधील एकेक अस्त्र केंद्र सरकार वापरण्याची शक्यता आहे.  विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा तपास सुरू झालेला आहे. तसेच चीनला आशिया आणि आग्नेय आशियात एकाकी पाडण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. यावरून केंद्र सरकार विरोधी पक्षांशी दोन हात करण्यासाठी सज्ज होत आहे असे दिसते.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...