बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

लिबरल मंडळींचा प्रचार आणि विरोधी पक्षांचा व्यवहार (भाग १ )



या लेखाच्या शिर्षकाचे नाव थोडसं चमत्कारी वाटते पण तसे काही नाही. व्यवहार या शब्दाचा अर्थ सामान्यतः व्यापार व त्यातून होत असलेली पैशाची उलाढाल असा आहे. तसे पाहता सरकार साठी निवडणूका या खर्चीक असतात. राजकीय पक्षांना ही प्रचार करण्यासाठी पैसा लागतो. उद्योगपती अधिकृतपणे राजकीय पक्षांना आर्थिक मदत करीत असतात. त्या बदल्यात ते सरकार कडून आपल्या उद्योगासाठी सोयी व सवलती घेतात. हा व्यवहार स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून सुरू आहे. तसेच जगभरातील लोकशाही देशात ही असा व्यवहार होत असतो. मतदारांना आपल्याकडे यावे या हेतूने पैशाचे प्रलोभन सर्वच राजकीय पक्ष करीत असतात. हे एक आपल्याला न पचलेलं सत्य. जगभरातील सर्व लोकशाही देशात हे कटु सत्य वावरत असते फक्त त्याची वावरण्याच्यी पद्धत भिन्न असू शकते. थोडक्यात पैशाची उलाढाल राजकरणात ही असतेच की. राजकारणातला व्यवहार म्हणजे काय या संबंधीतली चर्चा कधी न संपणारी आहे. कारण आज केलेली चर्चा पुढल्या दहा वर्षात बदलेली असू शकते. कारण काळानुसार तसा बदल अपरिहार्य असतो. 

आजच्या घडीला राजकारणतला व्यवहार म्हणजे " राजकीय पक्षांचे वर्तन. म्हणजेच नेते आणि कार्यकर्त्यांच्या चालण्या बोलण्यातले तारतम्य; सोबत पक्षाच्या विचारसरणीनुसार आमदार खासदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी राबवलेली कार्यपद्धत ; लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्याचे आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण करून राष्ट्रीय पातळीपर्यंत इतर पक्षांहून अधिक समर्पित व सांघिक भावनेचं उत्कट दर्शन मतदारांना व्हावे यासाठी घेतलेले कष्ट; काळानुसार अचूक पद्धतीने स्पर्धक पक्षांवर कुरघोडी ठरू शकतील अशा राजकीय चालीची रचना करणे. मग त्या रचना कृतीत उतरविण्यासाठी थेट राष्ट्रीय अध्यक्षापासून ते बुथ पातळी वरील कार्यकर्त्यांचे प्रयत्न, प्रचार करताना मतदारांची नाडी ओळखून हवा तयार करणे, पक्षात एकच शिर्षस्थ नेता व त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी निर्माण केलेली सक्षम यंत्रणा, आणि पक्ष सत्ताधारी असेल तर पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यानुसार दिलेली वचनं बहुतांशी पाळली आहेत आणि बाकी राहिलेल्या वचनांची गॅरेन्टी इत्यादी गोष्टींची मतदारांना होत असलेली खात्री,  सत्ताधारी पक्षाने कल्याणकारी योजना पुर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे केलेला आटोकाट प्रयत्न, त्यातून मतदारांनी दिलेली दाद, निवडणूका जिंकल्याच्या नशा पासून दूर राहण्याची नेते आणि कार्यकर्त्यांनी जपलेली संकृती,    देशाची सुरक्षतता, विकास, कायदा व सुव्यवस्था इत्यादी बाबतीत कटीबध्दता, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा स्वाभिमान गहाण न ठेवता  भारतियांची 'जगभर शांतता नांदावी' या भावनेची कदर करीत रचलेले परराष्ट्रीय धोरण इत्यादींचा समावेश म्हणजे राजकीय पक्षाचा व्यवहार." 

मी वर नमुद केलेली राजकीय पक्षांच्या व्यवहाराची व्याख्या म्हणा वा व्याप्ती संबंधीत दुमत असू शकते . या ठिकाणी भ्रष्टाचारा पासून दूर राहण्याच्या वृत्तीचा मी उल्लेख केला नाही. याचे कारण असे की आपण इथे राज्यव्यवस्था कशी असावी या विषयावर चर्चा करीत नाही. दुसरे असे की निवडून आलेले खासदार, आमदार, नगरसेवक, स्थानिक संस्थांचे लोकप्रतिनिधी आपआपल्या सभागृहात शपथ घेत असतात. आता त्या शपथेची किती इमान राखतात हा एक स्वतंत्र विषय आहे. तरीही राजकीय पक्षांच्या प्रमुखाने या बाबत दक्ष राहावे आहे अशी अपेक्षा असते. त्यातल्या त्यात ज्या पक्षातील नेते व लोकप्रतिनिधींचे कार्य स्वच्छ आहे त्या पक्षाला निवडणूकात अधिक यश मिळते. जसे कर्म तसे फल हा निसर्ग नियम आपले काम चोख करीत असतो. 

कदाचित राजकीय पक्षाचा व्यवहाराची जी मी व्याख्या केली ती भाजपाच्या व्यवहाराची आहे असे आपल्याला वाटत असावी. त्याबद्दल माझा आक्षेप नाही. पण ती वस्तुस्थिती आहे. सतत भाजपा जिंकत असेल तर त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न प्रथम लिबरल मंडळींनी करावयास हवा आहे. कारण विरोधी पक्ष लिबरल मंडळींच्या तत्वज्ञानालाच सर्वेसर्वा  राजकीय व्यवस्थेचं आदर्श माॅडेल मानत आहेत. 

मी पत्रकार नाही आणि राजकीय अभ्यासक ही नाही. मी राज्यशास्त्राचा पदवीधर ही नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की मला या लेखाची सुरूवात करण्याची प्रेरणा अलिकडील पाच राज्यांच्या निवडणूकांच्या निकालाचे लिबरल मंडळींनी केलेलं विश्लेषण ऐकल्यानंतर मिळाली. तसे पाहता  सन १९८९ पासून म्हणजेच भाजपाची वाढ होऊ लागल्या पासून  या लिबरल मंडळींनी हिंदुत्व, राष्ट्रवाद, महात्मा गांधीची हत्या करणारी ही मंडळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा एजंडा, इत्यादी मुद्यांवर भाजपाला घेरत असताना मी यांना पाहिले आहे, ऐकले आहे आणि यांचे लेख, विश्लेषण वाचत आलो आहे. भाजपाच्या ताकदीत वर चढत गेलेला ग्राफ ही वाचला आहे आणि अनुभवला ही आहे. त्यातून राजकीय चाल रचण्यात भाजपा वरचढ झालेला दिसतो तर लिबरल मंडळी विसाव्या शतकापासून मांडत आलेले तत्वज्ञान आणि त्यावर आधारीत कृतीचा आग्रह करीत आहेत. या लिबरल मंडळींच्या विचारसरणीचा तसे पाहता विरोधी पक्षांना म्हणजे इंडी नावाच्या आघाडीतल्या पक्षांसाठी लोकसभेच्या निवडणूकांत फायदा होत नाही असे २०१४ पासून दिसत आहे.

मागील लेखाचा शेवट करतांना मी म्हटले होते की,  "आता माझ्याकडे अधिक काही लिहावे असे राहीले नव्हते म्हणून मी थांबलो." तरी ही राजकीय लेख लिहावयास बसलो आहे. म्हणतात ना, सुंभ जळले तरी पीळ काही जात नाही हे सत्य मला ही लागू आहे. हे मी नाकारीत नाही. पण मला आपल्या देशात खरोखरी द्विपक्षीय राजवट असावी असे वाटते. पण भाजपा व संघाचा द्वेष विरोधी पक्ष जितका करीत आहेत, त्याहून अधिक जहरी द्वेष ही लिबरल मंडळी इलेक्ट्रानिक्स, प्रिन्ट आणि सोशल मिडीयावर ओकत आहे. दोन राजकीय शक्ती आमने सामने असल्या तरी सहमतीचा बिंदु शोधता येतो. पण या लिबरल मंडळींची भुमिका सतत टोकाची राहिली आहे. म्हणून या संबंधीत सविस्तरपणें व्यक्त व्हावे असे वाटले. या लेखात लिबरल मंडळींनी पाच राज्यातल्या निवडणुकांच्या निकालाचे जे विश्लेषण केले आहे त्यांच्या पैकी दोन अभ्यासकांच्या प्रतिक्रीया केंद्र स्थानी ठेवून या लेखाची मांडणी करीत आहे. म्हणून या लेखाची  व्याप्ती दोन ते तीन भागा पर्यंत वाढेल हे प्रांजळपणे कबूल करतो. कृपया ही मालिका आपल्या देशातील राजकीय पक्षांच्या व्यवहाराशी निगडीत आहे. कुठल्याही दोन वा तीन राजकीय विचारप्रणालीचा तौलानिक अभ्यास केला आहे आणि त्यावर चर्चा करीत आहे असे मुळीच नाही. तितकी माझी कुवत नाही हे आपणास ठाऊक आहे.

प्रथम लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर हे बीबीसी न्युज चॅनेलवर झालेल्या त्यांच्या मुलाखतीत ते काय म्हणाले आहेत ते पाहू या. 
१) काँग्रेसला एका राज्यातील विजयानंतर सुस्ती येते. तर भाजपा व्यावसायिक राजकारण खेळते.
२) काँग्रेसचे राहूल गांधी फूलटाईम काम करीत नाही. तर भाजपा मधील दोन नंबरचे नेते अमित शहा छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये ठाण मांडून काम करीत असतात.
३) काँग्रेस राज्यस्तरावरील नेत्यांना  विश्वासात घेत नसते. तर भाजपा स्थानिक नेत्यांना गतिमानता देते.
भाजपाने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधील शिवराज चौहान, राजमाता वसुंधरा राजे, आणि रमणसिंग यांना तिकीट देण्यासाठी थोडा उशीर केला पण नंतर त्यांचा योग्य तो सन्मान ही केला. भाजपा आपल्या राजकारणात सतत लवचिकता ठेवते. काँग्रेसला राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन नेत्यांमध्ये समेट घडवुन आणणे जमले नाही. 
४) भाजपा शेवटच्या क्षणापर्यंत लढत असते. भाजपाला ॲन्टी इनकम्बन्सी नसते. कारण कल्याणकारी योजना कार्यन्वीत झाल्याशिवाय आमदार खासदारांना आराम वा विश्रांती मिळत नसते. या शिवाय भाजपा कडे सशक्त केंद्रीय सत्ता आहे. विरोधी पक्षांच्या रेवडी योजनांचा बोजवारा वाजतो. उदाहरण तेलंगणातील केसीआरांच्या योजना हवेतच विरल्या. भाजपा योग्य ठिकाणी भावनिक राजकारण ही खेळते.
५) भारताच्या उत्तर भागात खासदारांची संख्या अधिक असते तर दक्षिण भागात संख्या कमी असते.
६) भाजपा आपल्या रेवडी योजनाला धर्माची जोड देत असते. भाजपाकडे हिंदुत्व, राष्ट्रवादी चेहरा आहे.
७) मध्यप्रदेश मध्ये काँग्रेस जिंकणार असे वाटले होते. पण कमलनाथने संपुर्ण प्रचार हेलीकॅप्टर वापरून केला. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादवांना काडीची ही किंमत कमलनाथनी दिली नाही. 

गिरीष कुबेर यांचे विश्लेषण मी  थोडक्यात मांडले आहे. वरवर त्यांनी भाजपाच्या संघटन शक्तीचं कौतुक केलं आहे. ते तसे त्यांनी केले यासाठी की विरोधी पक्षांपैकी एखादा पक्ष विशेषतः काॅग्रेस ने संघटन शक्ती वाढवावी अशी इच्छा ते व्यक्त करत असावेत. एरवी राजकीय विचारसरणी संबंधीत काही काळानुसार बदल करावा असा सल्ला कोणताही लिबरल राजकीय अभ्यासक इडीतील घटक पक्षांना देत नाही. कारण ती सारी मंडळी आपल्या वैचारीक कुंपणातून बाहेर पडण्याची शक्ती गमावून बसले आहेत. म्हणूनच गिरीश कुबेर यांनी भाजपा प्रचारात हिंदुत्व, मोदीचा चेहरा, रेवडी योजनाला धर्माची जोड देणे, इत्यादी बाबी ठळकपणे ठेवल्या आहेत. गिरीशजीने भाजपाकडे राष्ट्रवादाचा चेहरा आहे असे म्हटले आहे पण भाजपाला अपेक्षित असलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादावर जरा ही भाष्य केले नाही. इथेच भाजपा आणि समस्त विरोधी पक्ष, व त्यांची समर्थक लिबरल मंडळीमध्ये भली मोठी तेढ आहे. दक्षिण भारतात लोकसभेच्या जागा कमी आहेत असे म्हणत गिरीश कुबेर, यांनी अप्रत्यक्ष रित्या कुमार केतकर यांच्या 'भाजपा राष्ट्रीय पक्ष नाही ' या भाष्याला समर्थन दिले आहे असे दिसते. 

कुमार केतकर हे आजपावेतो नेहरू-गांधी घराण्याची पुजा करीत आले आहेत. या घराण्यातील प्रत्येक व्यक्ती देशाच्या उच्च स्थानी विराजमान होण्यासाठी जन्मले आहेत अशी त्यांची धारणा आहे. राजापेक्षा भाट अधिक राजनिष्ठ अशी कुमार केतकरांची प्रकृती आहे. इंडी नावाच्या आघाडीतील घटक पक्षांना राहूल गांधीचे नेतृत्व मान्य होणार नाही. तसेच काँग्रेसचा उत्तरेकडील तीन राज्यांच्या पराभवा मूळे इडी आघाडीत काँग्रेसला वर्चस्व मिळण्याची संधी हुकली आहे. म्हणून केतकरांच्या भाष्यावर अधिक चर्चा न करता लेखाचा भाग १ ची समाप्ती इथे करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...