रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

आर्यन खानला मिळालेला जामीन आणि त्या भोवती फिरणारे राजकारण



अफगणिस्तानात अस्थिरता आल्यानंतर जागतिक राजकारण जितकं सुरूवातीला गतिमान वाटत होतं तितकं गतिमान राहीलेलं नाही. ज्या देशांचे हितसंबंध अफगणिस्तानात आहेत ते देश' ' वेट ॲन्ड वाॅच '  या मोड मध्ये आहेत. असे असले तरी या काळात ही ते देश (ज्यात आपल्या देशाचा ही समावेश आहे ) आपआपले  डावपेच रचत आहेत. ते डावपेच कशा स्वरूपाचे आहेत, यावर चर्चा आपण पुढील आठवड्यात करणार आहोत. म्हणून तुर्तास आपल्या महाराष्ट्रात सिनेस्टार शाहरूख खानाचा मुलगा आर्यन याचा क्रुझ पार्टीतील सहभागातून उठलेल्या विवादावर चर्चा करू या.

मविआ सरकार महाराष्ट्रात विराजमान झाल्यापासून राज्यात ज्या घटना घडल्या आहेत, त्यावरील राजकीय डावपेचांचा खेळ न्यायालयाच्या पटागंणात पोहचत असल्याचे आपण पाहात आहोत. हे योग्य की अयोग्य यावर चर्चा करण्यात वेळ घालविणे हेच मुळी अयोग्य होऊ पाहात आहे, इतकी महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरत आहे.  अर्थात २०१९ च्या विधानसभेत पराभूत झालेल्या काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या साह्याने महाराष्ट्रात स्थापन केलेले सरकार हेच राजकरणाच्या पातळीने निचांक गाठल्याचं देशाच्या इतिहासातील सर्वात मोठं उदाहरण आहे. हेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या सुडाच्या राजकारणाचे बीज ठरले आहे.

सिनेस्टार सुशांतसिंगच्या कथित आत्महत्याच्या प्रकरणापासून महाराष्ट्रातील राजकीय वादळाचा केंद्रबिंदू बाॅलिवूड जगत झाले आहे. बाॅलिवूड जगतात चाललेला नेपोटीझम आणि त्या जगतावर अंडरवर्ल्डचं असलेलं नियंत्रण आणि त्यायोगाने काळ्या पैशाचा व्यवहार, बनावट नोटा, ड्रग्जचा धंदा इत्यादी दृष्कृत्यें उजेडात आले आहेत. अंडरवर्ल्ड जगताचा  कारभार आपल्या देशाच्या शत्रुच्या हद्दीतून चालविलेला जात असल्यामूळे बाॅलीवूड मधील कलाकार कितीही मोठा असला तरी त्या कलाकाराची बाजू घेऊन राजकारण करणार्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकीय पक्षांची प्रतिमा जनमानसात खालावत चालली आहे. ती न्यायालयाच्या एकाद्याला बेल दिल्याने वा एखाद्या अंतरीम आदेशाने किंवा निर्णयाने वर चढेल असे संभवत नाही. या शिवाय अफणणिस्तान अस्थिर झाल्यापासून देशाच्या अंतर्गत तसेच बाह्य सुरक्षतेपुढे जबरदस्त आव्हान समोर ठाकलेलं असताना देशातील विरोधी पक्षांच्या वर्तनाने (यात भाजपाचे माजी मित्र पक्ष शिवसेना,अकाली दल यांचा समावेश आहे) सर्वसामान्यांच्या मनात जो रोष उभा राहिला आहे तो पुढील वर्षात येणार्या काही राज्यांच्या निवडणूका आणि लोकसभेच्या २०२४ च्या निवडणूकात दिसून येणारच आहे.

शाहरूक खानच्या मुलाला बेल मिळाला. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारचा विजय झाला असे नाही. असे असले तरी, आर्यन खान जेलमधून सुटला, तो निर्दोष आहे हे सिध्द झाले अशा अहिर्भावात काही मिडीया हाऊस आणि मविआ सरकारातील घटक पक्ष बोलत आहेत. बोलणार्यांची तोंडं कोणी बंद करू शकत नाही. परंतु सर्वसामान्य जनांची प्रतिक्रीया ' आर्यन खान मोठ्या बापाचा मुलगा म्हणून सुटला ' अशी आहे. आणि असा  वर्ग देशभरात फार  मोठ्या संख्येने आहे. याबाबत न्यायालय आपले मतप्रदर्शन करू शकत नाही. कारण न्यायालयाचा तो अवमान ठरत नाही. शेवटी लोकशाहीत प्रजा हाच राजा असतो. आर्यन खानला बेल मिळावयास इतका विलंब का झाला, सेशन कोर्टातून बेल का मिळाला नव्हता. हायकोर्टाकडून आर्यनखानला बेल सशर्त का मिळाला इत्यादी प्रश्नाभोवती हे प्रकरण फिरत राहणार आहे ज्यातून आर्यन खान आणि शाहरूक खानची बेचैनी वाढत राहणार आहे.

सन्माननिय हायकोर्टापुढे आर्यनखानच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना  ' राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नवाब मलिकांनी सुरू केलेल्या राजकारणाशी आमचा बिलकूल संबंध नाही ' असे स्पष्ट केल्यामूळेच न्यायालयाने आर्यन खानला बेल देऊन तात्पुरता दिलासा दिला आहे. आर्यनच्या वकिलांनी फक्त आर्यनला बेल मिळावा याच मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले होते याची दखल हायकोर्टाने घेतली. पण त्यातून  प्रतिपक्षाचा पराभव झाला असा अर्थ निघत नाही. हायकोर्टाकडून आर्यन खानला बेल मिळविण्यात यश मिळाले म्हणून आर्यनच्या वकिलांनी सुद्धा आर्यन खान निर्दोष आहे असे मानलेले नाही.  म्हणून महाराष्ट्र सरकारने  उगीच आपल्या राजकरणातील डावपेचाचा विजय मानण्याचा प्रयत्न करू नये. तसेच एनसीबीच्या कारवाईचे समर्थन करणार्या  विरोधी पक्षाने न्यायलयावर पक्षपाताचा आरोप करू नये. पुष्कळदा न्यायालयात वादी आणि प्रतीवाद्याने आपली बाजू मांडताना दाखविलेला समंजसपणा न्यायालयाला भावतो. म्हणून कित्येकदा त्या केस संबंधीतले पुरावे न्यायालयात जमा होण्याअगोदर न्यायालय कथीत गुन्हेगाराचं वय पाहून बेल देत असते. म्हणून मविआ सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी या केस संबंधीत आपले पुढील वर्तन मिजाशीत करू नये याची दक्षता घ्यावयास हवी.  कारण ही लढाई ना केंद्र सरकारच्या विरोधात आहे ना सिबीआयच्या विरोधात आहे. ही लढाई एनसीबीशी लढावी लागणार आहे आणि त्यात राष्ट्रीय सुरक्षा, अन्डरवर्ल्ड जगत आणि प्रतिबंधीत ड्रग्जचे सेवन तसेच पुरवठा व व्यवसाय, त्यातून दशहतवाद्यांशी जोडले गेलेले संबंध इत्यादी  विषयांचा अंतर्भाव असतो. ही केस सुप्रिम कोर्टात जाईल तेव्हा या केस मधील सरकार पक्ष म्हणून महाराष्ट्र सरकारा ऐवजी  केंद्र सरकार असेल. शिवाय ड्रग्ज संबंधीतल्या कायद्याचा भंग हा जवळपास देशद्रोहाच्या स्वरूपाचा असतो हे दोन लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे आहेत. देशभर हजार हून अधिक लोक ड्रग्ज संबंधीतल्या कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. विद्यमान कायदा बदलण्यासंबंधीच्या सुचना येत असल्या तरी ड्रग्ड माफिया हे पाक पुररस्कृत दशहतवादी असल्याने विद्यमान सरकार त्यात बदल करणार नाही.

हायकोर्टाच्या  निर्णयाने महाराष्ट्र सरकारला दिलासा मिळालेला आहे का? याचे उत्तर  ' नाही' ' हेच होय. एनसीबीने उभा केलेल्या विद्यमान खटल्याशी आमचा संबंध नाही असे महाराष्ट्र सरकार म्हणू शकले असते. आणि तसे  म्हटले असते तर हा वाद महाराष्ट सरकार विरूद्ध केंद्र सरकार अशा स्वरूपाचा झाला नसता. उलट मविआ सरकारची  लोकांनी भरभरून स्तुती केली असती. पण तसे झाले नाही. म्हणून  मविआ सरकारची विशेषतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची अन्डरवर्ल्ड जगाताशी मैत्री आहे असे ऐकण्यात येत आहे.  त्यावर लोकांचा विश्वास बसला आहे. त्या विश्वासाच्या आधारावर लोक या दोन्ही नेत्यांना  बाॅलीवूड आणि अन्डरवर्ल्ड जगताच्या हातातील कठपुतली समजू लागले आहेत. लोकांचा असा समज झाला आणि तो व्यक्त स्वरूपात सोशल मिडियावर येत असेल तर त्यावर न्यायालय कुठलीच कारवाई करू शकत नसते.

श्री नवाब मलिकांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेवर सोशल मिडीयावर केलेल्या आरोपा संदर्भात समीर वानखेडे बदनामी ची फिर्याद नोंदवू शकतात. आणि तशी केस दाखल होण्याची वाच्यता वानखेडेंच्या कुटुंबियानी केली आहेच.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानींच आर्यनखानला बेल मिळावा म्हणून सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. इतक्या तातडीने मुख्यमंत्र्यानी सुप्रिम कोर्टात धाव घ्यावयाची गरज नव्हती. पण बुडत्याचा पाय खोलात जात असतो ना ! असेच या केस संबंधीत झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी कायद्यातील कुठच्या कलमाखाली आर्यन खान सारख्या प्रथमदर्शनी गुन्हेगाराची सुटका होण्यासाठी सुप्रिम कोर्टात धाव घेतली याचे उत्तर मराठी जनतेला मिळू शकेल का? प्रजेचा तो हक्क आहेच ना ! एनसीबी निश्चितच  सुप्रिम कोर्टात जाणार आहे. या संबंधीच्या खटल्याची सुनावणी करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आर्यनखानच्या सुटकेसाठी का जातीने प्रयत्न करीत आहेत याची नोंद घेणार आहेच. या शिवाय ही केस केंद्र सरकारच्या एनआयए कडे जाणार आहे असे ऐकैवात आहे.  नबाब मलिकांनी ज्या खटपटी केल्या आहेत. त्यावर सुप्रिम कोर्ट दुर्लक्ष करेल हे संभवत नाही. कारण आर्यन खान संबंधीत असे काही पुरावे नार्कोटीक ब्युराकडे असल्याशिवाय आर्यन खानला उगीच दोषी ठरविले नाही ही वस्तूस्थिती आहे. मुळात शाहरूकखानचा मुलगा आर्यनखान सदर क्रुझ पार्टीत सामील आहे या बाबत एनसीबीला कल्पना नव्हती. म्हणून शाहरूक खानला केंद्र सरकार जाणूनबुजून लक्ष्य करीत आहे या आरोपात दम नाही. एनसीबीएला सदरहू क्रुझ पार्टीचा सुगावा लागला तो एनसीबी च्या खबर्याकडून. या संबंधीत मविआ सरकारचे घटक पक्ष आणि समर्थक मिडीआ हाऊस ने जे रान उठविले आहे ते ही एक राजकीय नौटंकी आहे. 

सामान्यतः  प्रत्येक राज्यातील पोलीस यंत्रणे कडे असे खबरे असतात हे मविआ आघाडीच्या नेत्यांना ठाऊक आहे. पोलीस यंत्रणा, सीआयडी आणि केंद्रीय तपास एजन्सीज यांनी आपले खबरे कोण निवडावेत या बद्दल कायदा काही सांगत नाही. म्हणून एनसीबीच्या सोबत भाजपा कार्यकर्ते असल्याचा जी आरडा-ओरड मविआ सरकारचे नेते मंडळी आणि त्यांच्या समर्थक मिडीयानी आणि शाहरूक खानच्या फॅन्सनी सुरू केली आहे ती व्यर्थ आहे.  ड्रग्ज माफिया तसेच रेव, क्रुझ आणि तत्सम पार्टी संबंधीत काही माहिती भाजपा कार्यकर्ते तपास एजन्सींना देत असतील तर त्याचे सर्वत्र स्वागतच होईल कारण ते जागृत नागरिकांचे कर्तव्य पालन असे गणले जाते. नवाब मलिक महाराष्ट्र सरकार मधील  एक मंत्री आहेत.  त्यातही त्यांचा जावई सहा महिने अंमली पदार्थ सेवनाच्या गुन्ह्यामूळे जेल मध्ये होता. म्हणूनच त्यांनी द्वेषातून, सुडाच्या भावनेतून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे विरोधी आरोप केले आहेत. मुळात या आरोपांचा आर्यन खान संबंधीत केसशी  दुरान्वयाने संबंध नाही. पण नवाब मलीक यांनी  समीर वानखेडेंनी आर्यन खान यांच्या विरूद्ध खोटा आरोप करून त्याला जेलची हवा खावयास लावली असा जो आरोप सोशल मिडीयात केला आहे, तो उलटा चोर कोतवालको डाटें या प्रकारातला आहे. तो गुन्हा गंभीर  ठरू शकतो. कारण नवाब मलिक महाराष्ट्र सरकारातील एक मंत्री आहेत. अर्थात नवाब मलिकांच्या खटपटीतून काही फायदा झाला तर तो महाराष्ट्र सरकारच्या बाॅस मंडळीना हवा आहेच. यातून जर महाराष्ट्र सरकार अडचणीत येऊ लागले तर मविआ सरकार आपले हात झटकणार आहे. एकंदरीत काय तर नवाब मलिकांची स्थिती Between Deep Sea and Devil ' ( इकडे आड तिकडे विहीर ) अशी होईल.  नवाब मलिकने समीर वानखेडे साठी खणलेल्या खड्ड्यात ते स्वतःच पडणार असे दिसते. 

समीर वानखेडेची एस सी आयोगाच्या उपाध्यक्षांनी भेट घेतल्याचे वृत्त हाती आले आहे. या शिवाय राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमातीच्या आयोगाने महाराष्ट्र सरकारला समीर वानखेचा होत असलेल्या छळा संबंधी नोटीस पाठविली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी फक्त सात दिवसाचा वेळ दिला आहे.  दुसरीकडे  भाजपा ही नवाब मलिका विरोधात शंभर कोटीचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहेत असे ही वृत्त हाती आले आहे. समीर वानखेडेचच्या परिवारने ही नवाब मलिकांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्याचे जाहीर केले आहे. याचा अर्थ सलिम मलिकांना  चोहबाजूनी घेरण्याचे प्रयत्न सुरू झालेले दिसतील. अशा पद्धतीने रचलेल्या चक्रव्युहातून नवाब मलिक कसे बाहेर येणार? एकाच वेळी केंद्र सरकारच्या एजन्सीज आणि काही संस्था द्वारे दाखल केलेल्या केसेला तोंड देताना नवाब मलिकांच्या तोंडातून फेस येईल असे दिसते. नवाब मलिकाच्या खटपटीमूळे ठाकरे सरकार ही अडकण्याची शक्यता आहे. वर नमूद केलेल्या केसेस कोर्टात जशाजशा उभ्या राहू लागतील तेव्हा बालपणी ऐकलेल्या  ' मी खीर खाल्ली नाही ' या गोष्टीतल्या चोरीने खीर खालेल्या मांजराचे पाय जसे लटपटू लागले आणि त्या मांजराची चोरी उघड झाली तशीच अवस्था नवाब मलिकांची होईल असे वाटते.  पण त्या केसेस उभ्या राहण्या अगोदरच कदाचीत महाराष्ट्र सरकार आपले हात-पाय झटकून मोकळे होईल. त्यामूळे नवाब मलिकांची ही स्थिती निश्चीतपणे अनिल देशमुखांसारखी होणार आहे. 

राहता राहीला प्रश्न शरद पवार केंद्र सरकारवर करीत असलेल्या आरोपांचा.  मविआ सरकार स्थापन केल्यानंतर आपल्याला देशभरातून मोदी सरकार विरोधी आघाडी उभी करण्यासाठी आमंत्रणे येत होती असे पवार म्हणाले होते त्याचे काय झाले? कपटाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले हे मांजराने डोळे मिटून दुध पिण्याच्या प्रकारासारखे आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन केले हे जर शरद पवाराचे कपट नसेल तर केंद्र सरकारने तुमच्या कुंटुंबियांवर आयकराच्या धाडी टाकल्या त्याला कपट कृती कशी मानता ? ती राजकीय चाल कशी मानता येईल? शरद पवार पेट्रोल डिझेल च्या किमती वाढल्या आहेत यावर टिका करीत आहेत. पवार साहेब केंद्रातील सरकारमध्ये दहा वर्षे मंत्री होते. तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कधी वाढल्याच नाहीत का? आता ते शेतकर्यांचा कैवारी बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण ते केंद्रात सलग दहा वर्षे कृषी मंत्री असताना शेतकरी हितासाठी त्यांनी किती कामें केलीत? ती जनतेपुढे ठेवा की ! महाराष्ट्रातील मंत्र्यावर वसूली कांड आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. ते खोटे आहेत का? तसे असते तर  अनिल देशमूख का फरार आहेत? का परमवीर सिंग फरार आहेत? अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचारांचे  आरोप का होत आहेत? आणि त्यांच्या विरूद्धात खटला का उभा राहिला नाही. सुशांतसिगच्या हत्येत मुख्यमंत्री ठाकरेंच्या मुलाचे नाव का आले ? सहकारी बँक, सहकारी साखर कारखाने कोणी लुटले? महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे यश पद्मश्री बाळासाहेब विखे-पाटील आणि वसंतदादा पाटील सारख्या प्रामाणिक नेत्यांच्या प्रयत्नांना जाते. या दोन नेत्यांच्या पाठीत खंजीर तुम्हीच खुपसला की नाही? शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष देशात तर सोडाच पण पश्चीम महाराष्ट्रातही रूजला नाही. याचे कारण पवारांची सत्तेची आणि त्यातून मिळणार्या पैशाची लालच वाढत गेली. पैशाच्या जोरावर इतर पक्षातील नेते खरेदी करून त्यांचा पक्ष फक्त फुगीर झाला पण ताकदवान झाला नाही. मोदी-शहा हे काही एखाद्या राज्यातील जिल्हा स्तरावरील नेते नाहीत. त्यांना शह देण्याच्या प्रयत्नात पवार साहेब थकून गेले आहेत. पवार साहेबांनी पुर्वी माजी पंतप्रधान स्वर्गीय नरसिंह रावाशी दोन हात केले आणि शेवटी त्यांना दिल्लीतून महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर परत पाठविले. तेव्हापासून शरद पवारांचं पंतप्रधान होण्याची संधी कायम स्वरूपात नष्ट झाली. त्यामूळे त्यांचा पक्ष ही पश्चीम महाराष्ट्रा पुरता सिमीत झाला. सुश्री ममता बॅनर्जीना पवार विश्वासू वाटत नाहीत. राहूल गांधीनी पंतप्रधान डाॅ मनमोहन सिंगाचा किती आदर केला आहे, हे त्यांनी सरकरच्या निर्णयाचा कागद भर रस्त्यात फाडला तेव्हा दिसले आहे. मग राहूल गांधी शरद पवारांना नेता कसा मानतील ?  मायावती समोर पवार साहेब उभे राहू शकत नाहीत. अखिलेश यादवांनी आपल्या पित्याला जबरदस्तीने निवृत्त केले आहे मग ते शरद पवारांना नेता कसे मानतील ?  दक्षिणेकडील कुठल्या एका स्थानिक नेत्यांने राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे ऐकले आहे. या पेक्षा अधिक काही तेथून शरद पवारांच्या हाती काही लागणार नाही. मला वाटतं शरद पवारांनी  जाणता राजा या पदवीतून बाहेर यावे आणि स्वतःहाला जाणण्याचा प्रयत्न करावा. पुजनिय आचार्य विनोबा भावेंचा ' स्व रूप ओळखा ' हा उपदेश शरद पवारांनी स्विकारावा असे मनोमन वाटते. जर तो उपदेश स्विकारायाचा नसेल तर उरलेल्या आयुष्यात त्यांची राजकारणातील घसरण शिघ्र गतीने होत जाईल असे दिसते. मविआ सरकारचे जन्मदाता असुनही ज्यांना मुख्यमंत्री पदावर बसविले आहे असे उद्धव ठाकरें ही स्वतंत्रपणे आपल्या राजकीय चाल खेळत आहेत. शरद पवार सध्या आपल्या हयातीतील सर्वात बॅड पॅच मधून जात आहेत. म्हणून आपली अधीक बेअब्रू होण्यापेक्षा त्यांनी स्वेच्छेने राजकारणातून निवृत्ती घेणे हेच इष्ट ठरेल. 

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

जागतिक राजकारण आणि भारत (भाग ३) अमेरिकेचे धोरण



मागील लेखात आपण विद्यमान जागतिक राजकीय स्थिती संदर्भात अमेरीकेच्या धोरणावर चर्चा केली. अर्थात सोबत ओघाने येणार्या भारत अमेरिका मधील संबंधावर सुद्धा चर्चा केली. तो लेख वाचल्यानंतर एक  तल्लख बुद्धीचे परंतु संयमी, आणि अभ्यासू असे माझे जेष्ठ परम स्नेही बोरीवलीतील श्री दत्ताजी बिवलकरांनी त्यांची प्रतिक्रीया नम्रपणे माझ्या पुढ्यात ठेवली. ती अशी आहे,  " माजी राष्ट्राध्यक्ष श्री ट्रंप च्या कारकिर्दितील भारत-अमेरिकामध्ये असलेले घट्ट संबंध, विद्यमान राष्ट्रध्यक्ष श्री बायोडन काळात तितके घट्ट संबंध राहणार नाहीत असा आपल्या येथील सर्वसामान्यांचा जो समज होता तो चूकीचा ठरला असल्याचे वाटते. त्यामागील कारणें काय आहेत यावर चर्चा राहिली, आणि ती कारणें  वाचण्यात आणि  ऐकण्यात आले नाही. म्हणून पुढील लेखात यावर प्रकाश टाकल्यास बरें होईल "  मी दत्ताजींना खुप धन्यवाद दिले आणि लेखाचा सामारोप करण्याच्या घाई-गडबडीत तो मुद्दा हातून सुटला ही चूक मी मान्य केली. म्हणून या लेखात त्यावर चर्चा करता करता अमेरिकेच्या धोरणावरची चर्चा या लेखात पुर्ण करू या.

दोन देशांमध्ये व्यापार ,तंत्रज्ञान, शस्त्रात्रे, उद्योग,  आयात-निर्यात, शिक्षण, कला, इत्यादी बाबीतले द्विपक्षीय करार होत असतात. यामध्ये विना सहकार नाही उद्धार हे तत्व असते. असे असले तरी अशा दोन्ही देशामध्यें त्यातील व्यापार आणि शस्त्रात्रे या बाबतीत स्वार्थ कोणाला सुटला  नाही. इतकेच नव्हे तर दोन्ही देशांचे राष्ट्र प्रमुख शिखर परिषदेच्या निमित्ताने स्वदेशातील विशेषतः स्वपक्षात तसेच विरोधी पक्षात आपल्याला लौकर स्पर्धक निर्माण होणार नाही ही इच्छा काही प्रमाणात पुर्ण करून घेत असतात.

चाळीस वर्ष मागच्या कालखंडात वर्तमान काळातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील भव्य-दिव्य अशी क्रान्ती नव्हती. सध्याच्या काळात दोन देशातील प्रमुखांच्या भेटी अगोदर, त्यांच्या दौर्याचे दर्शन, विमान प्रवास मग विमानतळावर उतरल्यानंतरचे स्वागत, ज्या स्थानी पोहचायचे आहे त्या प्रवासातील चकाचक गाड्या, सुरक्षा दलांचा ताफा, त्यांच्या मागे मिडीया हाऊसच्या पत्रकारांच्या अत्याधूनिक कॅमेरा तसेच इतर साधनाने युक्त अशा गाड्या, दोन्ही देशाच्या प्रमुखांची औपचारीक भेट, लंच - डीनर पार्टी, सभागृहातील भाषणें, मग द्विपक्षीय करार,गळाभेट, पत्रकार परिषद इत्यादी गोष्टींचे लाईव कव्हरेज, चर्चा, फोटो सेशनमूळे आपले डोळे दिपून जातात. मला वाटतं मुळातच आपला मेंदु ,आपली दृष्टी आणि मन सहज भाळले जाते. ' आपल्याला जे दिसते ते खरोखरीच सत्य असते की त्याही पलिकडे काही वेगळे सत्य दडलेले असते? राजकारणातील मैत्री 'दुरून डोंगर साजरे ' या स्वरूपाची ही असू शकते असा अनुभव AUKUS च्या निर्मीत अमेरिकेच्या सर्वात जुना मित्र, फ्रान्सने ऑस्ट्रेलियाशी केलेल्या करारात अमेरिकेने विरजण घातले हे आपण पाहिले आणि ऐकले. विशेष म्हणजे पश्चीमी इंडो-पॅसिफिक रीजन मध्ये  फ्रान्स एक महाशक्ती मानली जाते. फ्रान्स हा युरोप खंडातील एकमेव देश आहे ज्याचे दोन मिलियन्स नॅशलन्स या रिजन मध्ये आहेत. इतकेच नव्हे तर फ्रान्सचे इंडो-पॅसिफीक रिजनमध्ये जवळपास अकरा स्क्वेअर किलोमिटर्स परिसरात  एक्स्लुसिव इकॉनॉमिक झोन्स आहेत. तरीही AUKUS मध्ये फ्रान्सला स्थान मिळाले नाही. आजचे राजकारण हे असे आहे.  

पुर्वीच्या काळात वर्तमानपत्रात फक्त फोटो पाहायला मिळत होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनडी यांचा चांगल्या पोझमध्ये एकत्र फोटो बालपणी कोठेतरी पाहिल्याचे आठवते. परंतु  पुर्वीच्या राजकारणाचा पोत उच्च प्रतिचा होता हे संपुर्णतः खरे नाही.  दोन महायुद्धे झालीच. युनोची स्थापना झाली. शीत युद्धाचा काळ अनुभवला.  जगभर छोट्या छोट्या चकमकी झाल्या. युद्धें झाली पुढे ही होत राहतील की काय? जगाची रहाटी अशीच असावी का?  महाविद्यालयीन दशेत अर्थशास्त्रात माल्थशियन थेअरी ऑफ पॉपूलेशन ने असेच मांडले हे शिकलो आहे.

तसे पाहता पंतप्रधान मोदींची जगभरातील अनेक देश प्रमुखांशी मैत्री आहे. मैत्री शुद्ध असेल पण त्यांचे ध्येय स्वप्नाळू नाही. ही पंतप्रधान मोदींची विशेषता आहे. अमेरिका महासत्ता असल्यामूळे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रंपशी असलेल्या मैत्रीला जागतिक राजकारणात अधिक महत्व आले. या उलट भारतियांच्या मनात बायोडनांची प्रतिमा केवळ ट्रंपचे विरोधक अशी न राहाता निवडणूकी पुर्वीच भारत विरोधी झाली. त्यांची तशी प्रतिमी कोणी केली या प्रश्नांचे उत्तर शोधून सापडणार नाही. अफगणिस्तानात अस्थिरता आणि गोंधळ माजला त्यावेळी आपल्या सरकारने तेथील भारतियांना सुखरूप परत आणण्याच्या कार्याला प्राधान्य दिले. तेथील सत्तांतरात माजलेल्या गोंधळावर लागलीच प्रतिक्रिया दिला नाही. त्यातही बायोडेन अलिकडेच राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. माझे स्नेही दत्ताजी बिवलकरांचे म्हणणे असे आहे की,  ट्रंपना जिंकून येण्याची खात्री असावी म्हणून भारताशी संबंध अफगणिस्तानातील सत्तातंराच्या नंतरही मैत्रीचेच राहतील असे ठरले असावे. ते खरे असावे. कारण  कुठल्याही देशात सत्तांतर अर्थातच रितसर होते तेव्हा, मागील पंतप्रधान वा राष्ट्रप्रमूखाने विशेषतः संरक्षण आणि  परराष्ट्र खात्यात घेतलेले निर्णय लागलीच बदलले जात नाहीत. हा आधुनिक राज्यव्यवस्थेचा पायंडा आहे.

अफगणिस्तान मधील गोंधळ हा अमेरिकेने जाणून -बुजून तयार केला आहे का, मध्य तसेच दक्षिण-पुर्व आशिया विभाग  अफणणिस्तानाच्या निमित्ताने यातच अडकला जावा का, अशी अमेरिकेचे चाल असल्याचा पुरावा नाही. म्हणून  जगभरातील सारेच देश यावर सहमत असतीलच असे नाही. अमेरिकेने हा गोंधळ मुद्दामहून केला आहे, असे गृहीत धरून काही देशाचे जागतिक स्तरावरील राजकारणाचे डावपेंच रचले जात आहेत. हे दिसून येत आहे. याबाबतचा योग्य तो अंदाज बांधून अफगणिस्तानात ज्या देशांचे हितसंबंध गुंतले आहेत, अशा देशांचे परराष्ट्र मंत्री आपले अंदाज आपआपल्या देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांना देत असतात. कुठल्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्याच्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याच्या समवेत अधिक बैठका झाल्या आहेत यावरूनही अमेरिकेच्या धोरणासंबंधीचा आपण अंदाज बांधू शकतो. आजपावेतो जी माहिती हाती आली आहे, त्यानुसार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ॲन्टोनी ब्लिंकीन यांच्या आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री जी एस जयशंकर समवेत अधिक बैठका झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये वेळी-अवेळी फोनवरून बोलणे होत असते अशी बातमी आहे. म्हणून भले अमेरिकेने AUKUS मध्ये स्थान दिले नसले तरी क्वार्ड मध्ये भारताचा रोल महत्वाचा आहे याचे भान अमेरिकेला आहे. याचे मुख्य कारण रशिया भारताचा सर्वात जुना मित्र आहे आणि ती मैत्री अजुनही टिकलेली आहे.  त्यातही अमेरिकेचा सर्वात जुना मित्र फ्रान्स नाराज आहे आणि  तो भारतासोबत आहे. हे ही एक कारण आहे की अमेरिकेचे भारताशी जे संबंध आहेत त्यात बदल झालेला दिसत नाही. आणखिन एक कारण हे आहे, ते म्हणजे अमेरिका, इजरायल, आणि सौदी अरेबिया असा एक ग्रुप जो इराणच्या विरोधात आहे. त्या इराणचा भारत मित्र देश आहे. अमेरिकेने आपले अफगणिस्तानातून सैन्य मागे घेतले तसेच त्याने इराण संबंधीचे धोरण बासनात गुंडाळून ठेवलेले दिसते.

चीनने कितीही आपल्या मनाची तयारी केली असली, आणि  तालिबानाला  पाठींबा दर्शवला असला तरी उघडपणे जिहादी- आतंकवादी तालिबानाला सहाय्य करण्याचे धाडस चीन या घटकेला करणार नाही.  एकंदरीत अफगणिस्तानात गुंतवणूक करण्यास आसूसलेल्या चीनला अडकवून ठेवण्याचे धोरण अमेरिकेचे दिसत आहे. इंडो-पेसेफिक रिजनमध्यें चीनने जे आक्रमक धोरण अवलंबिलेले त्यावर उपाय म्हणून क्वार्डचा जन्म झाला आणि आता AUKUS ची निर्मिती झाली. त्यावर ऑस्ट्रेलियाचे एक तज्ञ सॅम रॉग्गेएवीन यांनी  ' Extraordinary and truly historic announcement ' अशी प्रतिक्रीया दिली आहे. याचा अर्थ असाच होतो की सॅम रॉग्गेएवीन यांनी चीनची इंडो पॅसीफिक रिजन मध्ये वेगवान हालचालीचे ' Situation is more alarming ' असे वर्णन केले त्यांचा प्रभाव अमेरिकेचे अध्यक्ष बायडेनवर पडला असावा असे काही जाणकारांनी म्हटले आहे.

एकंदरीत अफगणिस्तानातील अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिकेचे राजकारण ज्या दिशेने पुढे जात आहे त्यावरून जगातील विशेषतः पुर्व आशियायी देश जपान, नार्थ कोरिया , साऊथ कोरीया इत्यादी, तसेच दक्षिण -पुर्व आशियायी देश, आणि अफगणिस्तानाच्या सिमा ज्या देशांशी जोडल्या आहेत अशा सार्या देशांच्या परराष्ट्र खात्याला आपल्या संरक्षण खात्याशी  कोऑरडीनेशन करूनच आपले राजकारण रेटावे लागत आहे असे दिसते. असे असले तरी अमेरेकेचे बायडोन आणि चीनचे शी जिनपिंग यांच्यातही फोनवरून बोलणे झाल्याचे वृत्त आले आहे. म्हणून प्रत्यक्ष तिसरे महायुद्ध होईल की ही शीतयुद्ध पर्वाची सुरूवात होत आहे , यावरील चर्चा आपण पुढील भागात करू या.

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

जागतिक राजकारण आणि भारत भाग २ (अमेरिकेचे धोरण )

 


जागतिक राजकारण आणि भारत या विषयावरील चर्चेचा दुसरा भाग सादर करताना मागील लेखाच्या शेवटी ज्या देशांचा उल्लेख केला आहे, अशा देशांचे विद्यमान राजकारण कुठल्या दिशेने चालले आहे आणि पुढे कसे राहील यावर क्रमशः चर्चा करू या. असे असले तरी पश्चीम आशियायी, नाटोतील सदस्य देश, आफ्रीखा खंडातील देश  लॅटीन अमेरिकन देश  पुर्व आशियायी, दक्षिण पुर्व आशियायी देश यांची विद्यमान जागतिक राजकारणावरच्या भूमिकेला महत्व नाही असे नाही. त्यांच्या भूमिकेवर ही चर्चा करावी लागणार आहे. म्हणून या लेखाचे भाग किती होतील हे सांगता येत नाही. मी पुन्हा नम्रपणे सांगतो की मी काही राजकारणातला तज्ञ नाही. पण जे काही ऐकतो, वाचतो, त्यातून व्यक्त होण्याचा हा प्रयत्न आहे. आपण सारे जण आधूनिक विज्ञानाच्या अत्याधूनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या उपकरणातून जगात काय चाललं आहे यासंबंधी माहिती गोळा करीत मेंदूत साठवत असतो. त्यातील बातम्या किती खर्या-खोट्या हा आधुनिक तंत्रज्ञानाचा शाप नाही तर ते काही मिडीया हाऊस च्या हातून होणारे पाप आहे. तरीही आपण वाचतो आणि त्यावर आपले मत तयार करून शेअर करतो. वस्तूतः मी लेख लिहीत नाही. मी चर्चेच्या माध्यमातून माझे मत मांडतो, आणि चर्चेला शब्द सीमा नसते. आमच्या वसई तालूक्यातील भुईगावातील माझे जेष्ठ साहित्यप्रेमी मित्र कै मधूशेठ नाईक यांनी सन १९८९ ला नवीन घर बांधले. त्या घराला त्यांनी नाव दिले आहे ' संवाद '. ते सतत आग्रहाने मांडत होते की " सततचा संवाद ठेवा, चांगले बोलायला पैसे मोजावे लागत नाही." आपल्या संस्कृतीत म्हटले आहे -

  ' सं गच्छध्म् सं वद् ध्वम् | '
(एकसाथ चाला आणि एकत्र मिळून बोला )
  ' सत्यम ब्रुयात प्रियम् ब्रुयात | '
( सत्य बोला आणि दुसर्यांना प्रिय होईल असेच बोला )  
आपण आज माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असलो तरी एका साहित्यिक की वैज्ञानिकाचे (नाव आता आठवत नाही) बोल मला आठवले. ते म्हणतात, The best time or way of communication is Tea Time.

मी सर्व काही बोलतो ते चांगले आहे असा माझा दावा नाही. निदान राजकीय क्षेत्रापुरता तर नाहीच नाही. म्हणून मी मांडलेले विचार सर्व वांचकांना पटतील असे नाही हे संवादामधील एक मुलभूत तत्व आहे. यावर माझी श्रद्धा आहे.  आता आपण अमेरिका या देशाची रणनिती काय आहे, कशी असू शकेल यावर चर्चा करू या.

कोणी कितीही म्हटलं तरी आर्थिक आणि युद्ध शस्त्रात्रांच्या बाबतीत आजच्या घटकेला अमेरिका महासत्ता आहे हे मान्य करावे लागते. सत्ता ही मादक असते. म्हणून महसत्ता होण्याचा कैफ प्रत्येक व्यक्तीला, समाजाला, देशाला असतो. हे मानवाच्या आदिकालीन इतिहासापासूनचे दृश्य स्वरूपातील सत्य आहे. अमेरिकाने अफगणिस्तानातून आपले सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला तो तडकाफडकी नव्हे. अमेरिका हा एक लोकशाहीप्रणाली देश आहे. जवळपास ३६००० आपले जवान अफगणिस्तानात शहीद झाल्यानंतर अमेरिकेतील संसंदेने अफगणिस्तानातून सैन्य माघारी घ्यावे हा निर्णय घेतला होता. एक तर ३६००० जवानांचे प्राण गेले आणि प्रचंड पैसा खर्च झाला. वीस वर्षात आपल्या हाती काही लागले नाही, ही एक घोडचूक झाली असे वाटल्यानेच अमेरिकेने घेतलेला निर्णय त्याच्या हिताचा असावा आणि तसा निर्णय घेण्याचा अमेरिकेला हक्क आहे या बाबत दुमत नसावे. या बाबतीत तालिबानाशी करार ही केला होता हे आपण जाणतोच. अफगणिस्तानात सर्वसमावेशक सरकार यावे असा आग्रह अमेरिकेना धरला नसावाच, आणि तुम्हाला जे वाटेल ते करा असे तालिबालांना सांगितले असावे असा पुरावा कोणाकडे आहे का?  द्विपक्षीय करारातील काही बाबी कुठलेच देश जाहीर करीत नाहीत. कारण मानव हा प्राणी आहे. आपण सामाजिक हे विशेषण लावले आहे. तो देव तर नाहीच पण देवदूत ही नाही. व पु काळेंनी 'आपण सारे अर्जून ' या पुस्तकात माणूस हा देव आणि प्राणी मधला ताण आहे.' हे मला पटले आहे. भिती, स्पर्धा, संशय हे विकार सार्या प्राणिजातीत आहेत. म्हणून या विषयावर चर्चा अधिक करण्याची गरज नाही.

अमेरिकेचे अफगणिस्तानावर वर्चस्व नव्हे पण प्रभाव असायला हवा होता आणि शांततेने अफगणिस्तानात सर्वसमावेशक सरकार येऊन शांती व्हावयास हवी होती हे आंतरराष्ट्रीय समुदयाला वाटणे हे यथोचीत आहे. तसे झाले नाही आणि घडले भलतेच. यातून अमेरिका हादरला नसेलच असे ठामपणे म्हणता येत नाही. अन्यथा AUKUS आणि QUARD च्या बैठका झाल्या नसत्या. जे काही अफगणिस्तानात घडले आणि घडत आहे या संबंधीत एक भारतीय म्हणून माझी तात्काळ प्रतिक्रीया होती ती अशी आहे, ' हा समाज हाती तलवार घेऊनच जन्मला आहे की काय? ' जागतिक राजकारण आणि भारत या विषयावर आपण चर्चा करताना अनेक यु ट्यूब चॅनेल्सवरील बहुतांश भारतियांच्या प्रतिक्रीया काय आहेत हे पाहता माझी प्रतिक्रिया असंमत किंवा अनुचित ठरेल असे मला वाटत नाही. पण देशाच्या काहीं भागात तालिबान जिंदाबादाच्या घोषणा झाल्या हे कशाचे द्योतक आहे? भारत हा पाकिस्तान आहे काय? बाॅलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार नसिरूद्दीन शहा या कलाकाराने अशांची कडक शब्दात हजेरी घेतली. त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. वैचारिक भिन्नता हा एखाद्या चांगल्या कार्याची स्तुती करण्यात अडथळा नसावा हे पथ्य पाळण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. परंतु याच नसरूद्दीन शहांनी सन २०१८ च्या डिसेंबर महीन्यात  उत्तर प्रदेशमधील एका पोलीसाच्या हत्यासंबंधी संवेदनशिलता दाखविताना गो रक्षा आंदोलनाची टिंगल उडविली.  तेव्हा महाराष्ट्र टाईम्सच्या अग्रलेखात नसिरूद्दीन शहाचे कौतूक केले होते. त्यावर मी
' बाटलीतले राक्षस आणि विचारवंत' या शिर्षकाचे दोन लेख लिहून नसिरउद्दीन शहा आणि मटाच्या संपादकांना मला जे योग्य वाटले ते उत्तर दिले.  कारण ' गाईला वैज्ञानिक दृष्ट्या माता मानणारा हा देश आहे हे स्पष्ट मांडणे हे मला गरजेचे वाटले. प्रश्न हा आहे की तालीबान जिंदाबादाच्या घोषणातून  जगातील एक शक्तीशाली लोकशाही देश आणि एक बलाढ्य लोकशाही देशांमध्ये सुसंवाद असणे हे आपल्या देशातील काही भागात अनैतिक का मानले जात आहे? हाच आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे का?

अमेरिकेचे जवळपास २०००० हजार सैन्य पाकीस्तान मधील एका हाॅटेलमध्ये ३१ ऑगस्ट नंतरही राहात आहेत अशी बातमी आहे. त्यावर पाकिस्तानातील मिडिया इमरानखानच्या सरकारवर टिका करीत असते आणि भारताला अमेरिका सन्मान देते या संबंधी आपला संताप व्यक्त करीत असल्याचे  पाहिले आहे. अमेरिकेची पुढील राजकीय चाल काय आहे या संबंधी अनुमान काढता येत नसल्याची स्थिती असताना आपल्या येथील संपादक आणि विचारवंतानी साप साप म्हणून भुई थोपटण्याची गरज नाही. कदाचीत अमेरिकेला अफगणिस्तानातल्या घटनांसंबंधी आशिया खंडातील भारत देशाच्या भूमिकेचं महत्व कळले असावे. पाकीस्तानावर वाजवी पेक्षा अधिक भरवसा टाकल्याची चूक ही लक्षात आली असावी. शेवटी जगाला जिहादी आणि दशहतवादाचा सर्वात मोठा धोका आहे अशी आपल्या सार्यांची धारणा आहे. त्याच धारणेतून भारत सरकार जगभरातील देशांना आपले मत पटवून देत राहील. कारण आपल्या संस्कृतीत आपली भावना  ' मा कश्चित दुःखभाग् भवेत् ' ( कोणावर दुःखाची वेळ न येवो ) अशी असावी हा आग्रह धरला आहे. म्हणजेच एक प्रकारे ' जियो और जिने दो | भारत वर्षातील सर्व वर्गातील लोकांचे याबाबतीत दुमत नसावे असे वाटते.

सुदैवाने १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत युएनसीच्या अध्यक्षपदी आपले पंतप्रधान मोदी असल्यामंळे अत्यंत शितेफिने भारताने अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या मदतीने तालीबानला मान्यता हवी असेल तर आतंकवादी संघटनांना आश्रय देणे सोडावे लागेल असे रेझूलेशन पास करून घेतले. यात अमेरिकेने स्थापन केलेल्या AUKUS मुळे नाराज झालेल्या फ्रान्सने ही संमती दिली. याचे श्रेय भारताच्या परराष्ट्र नीतीला जाते. वर्तमान जागतिक स्थितीत नाटोचे सदस्य देश गोंधळलेल्या स्थितीत किंवा एकमत साधण्यात वेळेचा अपव्यय करीत असताना भारत- फ्रान्स करार होऊन क्वार्डची बैठक ही यशस्वी झाली ती भारतामूळेच. आतंकवाद या शब्दाचे जनकत्व फ्रेंच क्रांतीला आहे. त्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या परम मंगल तत्वांचे उद्दीष्ट सामावलेले आहे. पण त्या शब्दाला अवकळा प्राप्त करून देण्याचे पाप जिहादी आणि साम्यवादी वृत्तीच्या प्रसारातून घडले आहे. जगभरातील राजकारण गुंतागुतीचे असताना, स्वतःच्या देशात विरोधी पक्षांतर्फे होणार्या शिव्याशापाचा सामना करीत पंतप्रधान मोदी एका परीने ' हे विश्वची माझे घर '  या नितीचा प्रसार करीत आहे. याला शुद्ध राजनिती म्हणावयास हवे.  राजकारण हा शब्द इंग्रजी भाषेतील Politics  या शब्दाचे भाषांतर आहे जे कधी शुद्ध आणि पवित्र नसते अशी माझी भावना आहे. रशिया आणि चीन या बैठकीत उपस्थित राहिले नाही यातच भारत आणि अमेरिकात विद्यमान जागतिक राजकारणात सहमती किती आहे हे दिसून आहे. या रेसुलेशनचे वैशिष्ट्य म्हणजे अफगणिस्थानात निर्बंध घालण्याची सार्या आतंदवादी संघटनाची जी यादी तयार केली आहे, त्यात इस्ट तुर्कीस्तान इस्लामिक मुव्हमेटला वगळले आहे.  ही संघटना चीनच्या मांचू साम्राज्याने काबीज केलेल्या Xinjiang मधील Uyghur वासीयांची स्वातंत्र्यासाठी आहे हे युएनसीच्या रेझूलेशनने स्पष्ट करून जगावर होणार्या चीनच्या संभाव्य दादागिरीला थोपविले आहे.

सारांशांने, मी फक्त एवढेच म्हणतो की '  कोरोना संकटातून आलेल्या आर्थिक मंदीमूळे आपला शस्त्रात्र विक्रीचा धंदा तेजीत आणण्यासाठी अमेरिकाने अफगणिस्तानाला वार्यावर सोडले असे आपण मानले, तरी सध्या तीच महासत्ता आहे. त्यातही ती लोकशाहीवादी आहे. म्हणून अमेरिका भारताला डावलून राजकारण करणार नाही. कारण अपगणिस्तानातून माघार घेतल्यामूळे ढासळलेली प्रतिमा अधिक मलीन करून घेण्याचा मुर्खपणा अमेरिका करेल असे मला वाटत नाही.'

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

जागतिक राजकारण आणि भारत (भाग १ )

आपल्या देशांतर्गत राजकारणावर फारसे काही लिहू नये असे वाटत असल्याचे मी मागील लेखात म्हटले होते. पण परिस्थितीचा किंवा सवयीचा गुलाम म्हणा शेवटी लेखणी हातात घ्याविसी वाटली. तब्बल एक महिन्यानंतर राजकीय विषयावर लेख लिहावयास बसलो.  महिन्यापुर्वी जे दोन लेख लिहले होते ते ही अस्थिर अफगणिस्तान आणि भारत या विषयावरचे आहेत. या लेखाचं शिर्षक जागतिक राजकारण आणि भारत असे असले तरी प्रथम देशांतर्गत राजकीय घडामोडीवर चर्चा करावी असे आज मला वाटते. कारण अफगणिस्तानात जे घडते आहे त्या संदर्भात जागतिक पातळीवर जी खलबतें होत आहेत त्यात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अग्रणी स्थानावर दिसत आहेत. पण देशांतर्गत राजकारणात विरोधी पक्ष, त्यांचे कार्यकर्ते, समर्थक मिडीया हाऊस, बाॅलीवूड मधील हलकट कलाकार, आणि लिबरल विचारवंत गेली सात वर्षे  सतत मोदींवर टिका करीत आहेत. पण तेवढ्यावर ही त्यांचे समाधान होत नाही. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मोदी यांच्या वरील टिका कुचेष्टाच्या स्वरूपाची असते. ' कुत्ते भूँकते है, हाथी अपने मार्गपर शांतीसे चल रहा है ' अशी भाषा २०१८ च्या एका लेखात मला वापरावयाची वाटली.  आता मोदीजी जागतिक राजकारणात अग्रणी स्थानावर आल्यामूळे  देशांतर्गत राजकिय घटना संदर्भात विरोधी पक्षांच्या मोदी  विरोधी मोहीमे वर अधिक चर्चा करण्यासाठी काही राहिले नाही. कारण त्या मोहीमेचा २०२४ च्या लोकसभेतील निवडणूकात विरोधकांच्या हातात फारसे काही हाती लागेल असे वाटत नाही.  सन २०२४ च्या लोकसभा निवडणूका वेळेवर होतील कि नाही अशी शंका वाटू लागली आहे, इतके जागतिक पटलावरील राजकारण धुमसते आहे. कोरोना नावाच्या महामारीचे संकट अजूनही संपले नाही तोवर तिसर्या जागतिक महामारामारीचे भाकीत अनेक राजकीय अभ्यासक मांडत आहेत. कदाचित कोरोनाच्या संकटामूळे आलेल्या आर्थिक मंदीमूळे भोगवादी वृत्तीचे जीवन जगायला मिळत नाही म्हणून बड्या देशांची ही राजकीय खेळी असावी का अशी शंका ज्यांची वैचारिक बैठक अध्यात्मिक आहे अशांना आली असावी. त्यात तथ्य आहे असे मला ही वाटते. असो. जागतिक राजकारण  या विषयाचा आवाका मोठा आहे. म्हणून या लेखात देशांतर्गत राजकारणार प्रथम चर्चा करू या. कारण त्यावर ही जागतिक राजकारणाचे पडसाद उमटणार आहेच की !

' महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया पश्चीम बंगाल ' अशी लेखमालिका लिहीत असताना मी म्हटले होते की काही महिन्यानंतर व्हाया पंजाब, व्हाया उत्तर प्रदेश असा ही या लेख मालिकेत समावेश करावा लागणार आहे. तसे निदान पंजाब पुरता भाकीत खरे ठरले आहे. परंतु अनपेक्षितपणे गुजरात राज्यातील संपुर्ण सरकार बदलले गेले. त्यासंबंधी बरीच टिका झाली. ते ही स्वाभाविकच होय. पण ती टिका आपआपले तर्क लढवून तयार झालेली आहे.  कारण भाजपात फारशी धुसफूस दिसली नाही. पण मोदी-शहा जोडीने निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबला आहे अशी टिका विरोधी पक्षांनी केली आहे. विरोधी पक्ष आणि त्यांचे समर्थक मिडीया व विचारवंतांना भाजपामध्ये काय घडतं आहे यावरच अधिक लक्ष असते. म्हणून राजकारणात त्यांची चलती संपली आहे. देशातील बहुतांश विरोधी पक्षांचा अंतर्गत कारभार रशिया आणि चीनमधील एक पक्षीय राजवटी सारखाच आहे.  रशियात स्टॅलीनने स्वपक्षातील लाखो विरोधकांना यमसदनासात पाठवले होते. ते मानवतेला शोभेसे होते का? त्यानंतर रशियात क्रुश्चेव सत्ताधिश झाल्यावर त्यांनी स्टॅलीनच्या धोरणालर एका जाहीर सभेत टिका सुरू केली. तेव्हा त्या सभेतील एका श्रोत्याने बसूनच विचारले, की " क्रुश्चेव साहेब आपण त्यावेळी स्टॅलीनच्या विरोधात आवाज का उठविला नाही? " क्रुश्चेवनी धमकी स्वरात विचारले," हे कोण म्हणाले, त्याने उभे राहावे ." ज्या श्रोत्याने हा प्रश्न विचारला होता तो भयभित झाला. कारण त्याला यमसदनास पाठविले जाईल ही भिती वाटली. कोणीच उभे राहात नाही हे पाहून क्रुश्चव म्हणाले, 'तुम्ही आता जे करीत आहात ना, तेच मी स्टॅलीनच्या काळात करीत होतो.' भारतातले इतर विरोधी पक्ष घराणेशाहीवर चालत आहेत. त्या पक्षांचा कारभार ही हुकूमशाहीनेच चालतो. कारण  स्टॅलीन, क्रुश्चेव, माओ, आणि नार्थ कोरीयाचे पमूख किम जोंग, चीनचे शी जिनपिंग (ज्यांनी आपल्या मृत्युपर्यंत चीनची सत्ता स्वतःच्या हाती राहील असा कायदा नव्हे फतवा काढला आहे), रशियाचे पुतीन (जे एनकेन प्रकारे पंतप्रधानपद किंवा राष्ट्राध्यक्षपद आपल्या हातीच आलटून पालटून ठेवत आहेत), काही इस्लामिक राष्ट्राचे प्रमूख इत्यादी मंडळी आपल्या येथील सद्याच्या विरोधी पक्षांचे आदर्श आहेत.

पंजाब मध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यामूळे तिथे चरणजीत चेन्नी मुख्यंमत्री झाले. तिथे सत्ता बदल झालेला नाही, हे सत्य. पण सत्ता अस्थिर आहे एवढे मात्र निश्चीत. येथे पंजाब संबंधीत मी किसान आंदोलनाच्या वेळी लिहिलेल्या लेखात जे  भाकीत वर्तवले होते ते खरे ठरणार असे दिसते. " किसान आंदोलनाचा फुगा फुटणार आणि येणार्या विधानसभेच्या निवडणूकीच्या अगोदर पंजाब मध्ये सत्ताधारी काॅग्रेसमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा अकाली दल आणि आम आदमी पार्टीला न होता भाजपा तिथे आपली ताकद वाढविणार आहे. अकाली दल एनडीए सरकारमधून बाहेर पडल्यानंतर भाजपाच्या शिर्षस्त नेत्यांनी अकाली दलाला दुर्लक्षीत धोरण अवलंबून संपविण्याचे ठरविले आहे. आणि पुढे येणार्या विधानसभा निवडणूकीत ' ड्रग्ससे और किसानोंके दलाल नामक दुष्मनोंसे पंजाबको बचाओ '  असा नारा भाजपाने तयार केलेला असावाच." हेच ते माझे भाकीत !  ताज्या वृत्तानुसार पंजाबची वाटचाल भाजपाची शक्ती वाढण्याच्या दिशेने सुरू झालेली दिसते. कॅप्टन अमरिंसिंग स्वतंत्र पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत आणि भाजपाशी युती ही करतील.  सोबत नवज्योतसिंह सिद्धू काॅग्रेसमधूनच बाहेर पडल्याची बातमी आली आहे. पश्चीम बंगाल बांगला देशाच्या सिमेवरील राज्य आहे. त्यामूळे तिथे घुसखोर बांगला मुस्लिमांनी ममता बॅनर्जीच्या आशिर्वादाने काय धुडगूस घातला आहे हे आपण पाहतो आहोत.  पंजाबात सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणूका होणार आहेत. ते पाकीस्तानाच्या सिमेवरील राज्य. तिथेही पाकीस्तान सरकार खलिस्तान चळवळ सुरू करण्याचे प्रयत्न करीत आला आहे. पण त्यासाठी पाकिस्तान एकसंघ देश म्हणून टिकेल का ही शंका बदलत्या जागतिक राजकीय स्थितीतून वाटत आहे. मग सोबत  बांगला देशाच्या मुस्क्या भारता तर्फे आवळल्या जातील. कारण या दोन्ही देशांचा सावकार चीन आर्थिक अडचणीत येतो आहे. सोबत त्या सावकाराचे तालिबान सरकारशी घरोबा करून अफगणिस्तानात गुंतवणूक करण्याचे मनसुबे क्वाडचे आणि नाटोचे घटक देश उधळून टिकतील असे दिसते. 

उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणूका मुख्यमंत्री योगीच्या नावावर की पंतप्रधान मोदीच्या नावावर लढल्या जाणार आहेत यावर विरोधी पक्षांचे नेते, कार्यकर्ते, आणि त्यांचे समर्थक मिडीया हाऊसमध्ये फार मोठी चर्चा सुरू झाली आहे. पण ती निरर्थक आहेच शिवाय वेळेचा अपव्यय आहे. विरोधी पक्षांनी त्या ऐवजी आपले संघटन बळकट करण्यावर लक्ष देणे अधिक उपयोगी ठरेल. पण त्यासाठी आपआपल्या पक्षातील घराणेशाही खालसा करावयास हवी. पण तसे होणे सभंवात नाही. कारण विरोधी पक्षांचे समर्थक, संपादक मंडळी आणि विचारवंत त्यांना तसा सल्ला देण्याची शक्तीच गमावून बसले आहेत. मग यांना विचारवंत तरी कसे म्हणावे?  केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असे म्हटले जाते. तिथे येणार्या विधानसभा निवडणूका घोषित होईतो पर्यंत जे काही राजकीय शह-काटशह पाहावयास मिळतील ते तेथील विरोधी पक्षांतर्गत असतील. कारण तेथील विरोधी पक्षांच्या नेत्यांना  एकतर पंतप्रधानपदाचे स्वप्न पडत असते किंवा किंग मेकर बनण्याचे स्वप्न पडत असते. सध्या तसे स्वप्न ममता बॅनर्जींना आणि शरद पवारांना ही पडत असल्याचे ऐकू येत आहे. पण त्यावर फारशी चर्चा करण्याची गरज भासत नाही हे मी मागील  लेखमालिकेत स्पष्टपणे मांडलेले आहे. 

सध्या महाराष्ट्र आणि पश्चीम बंगाल मध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत, मग त्या सिबीआय आणि तत्सम चौकशी एजन्सीच्या कारवाई असोत वा उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातून येणारे अंतरीम निकाल असो दोन्ही सरकारच्या नाड्या आवळणार्या आहेत. त्यासंबंधीत मी  मागील लेखात मी सविस्तर भाष्यं केले आहे. तेच येथे पुन्हा संक्षिप्तपणे मांडतो आहे. " महाराष्ट्रातील मविआ आणि पश्चीम बंगालमधील ममता सरकारने केंद्र सरकारशी निर्माण केलेल्या बखेडाचा अंत मविआतील घटक पक्ष आणि तृणमूल काॅग्रेसच्या दमशाकीनेच होणार आहे. कारण केंद्र सरकारशी त्यांनी पुकारलेल्या बंडातूनच मोठा चिखल होत चालला आहे. चिखलात रूतत जाताना माणसाची हालत कशी होते हे बाॅलीवूडमधील चित्रपटात खलनायकांनी नायकासाठी चिखलाचा साफळा कसा रचलेला असतो त्यातून पाहिले आहे. अर्थात शेवटी तो चित्रपट असतो. म्हणून नायक त्या चिखलातून शिताफिने बाहेर पडतो. कारण चित्रपटात नायकाचा मृत्यु दाखविणे म्हणजे निर्माता आणि दिग्दर्शकाला त्यांच्या मिळकतीच्या दृष्टीने परवडणारे नसते. पण राजकीय मंचावरील  नाट्य किंवा चित्रपट हा प्रत्यक्ष जीवाशी चाललेला खेळ आहे.  मविआ सरकारातील नेतेमंडळी आणि ममता बॅनर्जींनी स्वतःसाठीच चिखल निर्माण केला आहे. त्यांनी ज्याच्यांशी लढत पुकारलेली आहे ते फक्त भारताचे पंतप्रधान आहेत आणि ते हरू शकतात अशा मिजाशीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वावरत आहेत. पण ती त्यांची घोडचूक आहे." मला वाटतं सद्य राजकीय स्थिती पाहाता महाराष्ट्र आणि पश्चीम बंगाल मधील सरकारातील नेत्यांना आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे आता उमजले असावे. कारण ज्या मोदीशी त्यांनी बंड पुकारले आहे, त्यांची छाती छप्पन इंचाची आहे हे जगातील दादा देशांनाही कळले आहे.

अफगणिस्तानातील अस्थिरतेवरील इलाज फक्त नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारत करू शकतो असे जागतिक जनमानस तयार झाले आहे. म्हणूनच मी एक महिन्यानंतर देशांतर्गत राजकीय घडामोडी संबंधी चर्चा करण्याऐवजी  जागतिक राजकीय पटलावरील घटनासंबंधी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे.  मी  व्यवसायिक पत्रकार, संपादक किंवा राजकीय अभ्यासक नाही हे मी वेळोवेळी प्रांजळपणे कबूल करीत असतो. आपला भारत देश शक्यतो डिप्लोमासीचा अवलंब करेल आणि वेळ आल्यास दशहतवाद्यांचा खात्मा करण्यास दोन्ही हातात शस्त्रे घ्यावयास मागे पुढे पाहणार नाही." असे मी  अस्थिर अफगणिस्तान आणि भारत  या शिर्षकाच्या दोन लेखात म्हटले आहे. तेथूनच आपण विद्यमान चर्चा पुढे रेटू या.

अफगणिस्तानातील अस्थिरता संबंधी सुरू केलेली डिप्लोमासी आणि स्वरक्षणाची केलेल्या जय्यत तयारीमूळे आतंरराष्ट्रीय पटलावरील राजकीय सुत्रे आपल्या देशाच्या हातात आली असल्याचे दिसू लागले आहे.  मोदी सरकारचे परराष्ट्रीय धोरण कुचकामी ठरले अशी टिकेची सुरूवातच आपल्या देशातच झाली. त्यावर मी सविस्तर उत्तर मागील लेखात दिले आहे. अफगणिस्तानात अमेरीकेचा पराभव झाला हे मान्य करताना अफगणिस्तानात रशियाचा ही पराभव झाला होता याचा ही दाखला मी दिला आहे. दादागिरी फक्त अमेरिका करत असते असे नाही. रशिया ही दादा होताच की ! सन १९६५ मध्ये भारताने पाकिस्तानचा युद्धात दारूण पराभव केल्यानंतर  ताश्कंद येथे भारत-पाक करार झाला. रशिया आपला मित्र देश हे मान्य पण तह असा झाला की भारत युद्ध जिंकून तहात हरला अशीच कोट्यावधी भारतियांचा समज झालाच ना ! ती रशियाची दादागिरीच होती की ! शिवाय तिथेच युद्धातील विजयाचे शिल्पकार सर्वात सनदशीर आणि कर्तबगार असे आपले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचा संशयास्पद रित्या मृत्यु  झाला. आता रशिया दादा राहिला नाही पण चीनची दादागिरी सुरू झालेली दिसत नाही काय? प्रत्यक्ष आपल्या देशाच्या वायव्य, उत्तर आणि इशान्य सीमावर चीन खुरापती काढीत असतो. पण आपल्या येथील लिबरल विचारवंत त्याबाबत एक अवाक्षर काढीत नाहीत. 'अमेरिकेची जगाचे नेतृत्व करण्याची लायकी नाही. अमेरिका एक मोठा जागतिक दशहतवादी देश आहे ' असे  महाराष्ट्रातील  अष्टपैलू  विचारवंत सन्माननीय श्री अच्यूत गोडबोलेंनी म्हटल्याचे  मी वाचले. श्री अच्युत गोडबोले यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे. माझ्या ब्लाॅगवरील सन १९१७ साली पब्लीश केलेल्या ' मौल्यवान शिक्षण कोणते ' या लेखाचा शेवट अच्युतजींच्या दै सकाळच्या संकेत स्थळावरील '  सतत बदला नाहितर नष्ट व्हा ' या मोलाचा सल्ल्याने केला आहे. इथे अमेरीकाचे मी समर्थन करीत नाही. पण क्वाडच्या बैठकीत आपले पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौर्यावर जाण्याचे निश्चीत झाले असताना असे उद्गार काढण्यात गोडबोलेजीं कडून थोडीशी घाई  झाली असे मला वाटते. अफगणिस्तात  फक्त अमेरिकेचा पराभव झाला असे ज्यांना दिसले त्यांनी मोदी सरकारवर टिका केली आणि अजूनही करतील कारण तशी ती त्यांची खोडच आहे.

माजी पतप्रधान मनमोहनसिंग यांनी सुद्धा आपल्या देशातील डाव्या विचारसरणीच्या पक्षांचे  तसेच लिबरल विचारवंतांचे सरकारला समर्थन असुनही अमेरिकेशी करार केला होताच की नाही. याचा मात्र मोदी सरकारवर टिका करणार्यांना सोयिस्कर विसर पडतो. कारण माजी पंतप्रधान मनमोहनसिंग जाने-माने अर्थतज्ञ आहेत. हा एक सोयिस्कर रित्या आपल्या येथे समजला जाणारा दागिना आहे. परंतु त्यांच्याच काळात सर्वात अधिक आर्थिक घोटाळे झाले. काॅग्रेस सरकारनेच देशाचे सोने गहाण ठेवले होते. देशाची परकीय गंगाजळी व खजिना रिकामा केला, म्हणून डकंल सारखा प्रस्ताव आणि तत्सम इतर कराराच्या जाचक शर्तीवर  पराभूत स्थितीत सही करून आर्थिक उदारीकरण आणि खाजगीकरण आणले. पण टिका मात्र मोदी सरकारने देश विकायला काढला आहे असा प्रचार आपल्या कानठळया फूटेपर्यंत ऐकू येत आहे. जागतिकरण आणि आर्थिक उदारीकरणामूळे आपल्या देशात आपण ही डाॅ मनमोहनसिंगासारखे एक अर्थतज्ञ आहोत असे भासविण्याची फॅशन विरोधी पक्षांच्या नेत्यांत आणि कार्यकर्त्यांत निर्माण झाली असावी असे वाटते. 

चीनने केलेल्या प्रगतीचा दिंडोरा पिटण्याचा जो प्रकार आपल्या देशात  होत असतो त्याबाबत इथे नाराजी मांडण्याचे काही कारण नाही.  कारण चीनने आर्थिक प्रगती केली आहे हे मी मान्य करतो. पण भांडवलशाही स्विकारूनच ना ! चीनमधील भांढवलशाही म्हणजे शंभर टक्कै क्रोनी कॅपीटलीझम.  जर्मन आणि जपान सारख्या दुसर्या महायुद्धात बेचिराख झालेल्या देशांची आर्थिक व तांत्रिक क्षेत्रात जी प्रगती झाली त्याबद्दल चीनचे कौतूक करणार्यांना ती दिसत नाही. कारण ही माजी साम्राज्य विस्तारवादी देश.  चीनच्या प्रगतीबद्दल अभिमान बाळगणारे,  भारतात राजकीय दृष्ट्या कवडीमोल झालेले डावे पक्ष,, विचारवंत आणि संपादक मंडळी मोदी सरकारवर सतत टिका करीत असतात. पण आता चीनमधील रियल इस्टेट क्षेत्रातील जायंट कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर चूपचाप बसले आहेत. जणू काही त्यांच्या सासूचे अचानक निधन झाल्याचे  दु:ख झाले असावे. एकंदरीत चीनमधील साम्यवादी विचारसरणी  काय किंवा भांडवलशाही विचारसरणी काय शेवटी सत्ता राबविणारी यंत्रणा किती प्रामाणिक आहे यावरच देशाची उन्नती अधिक अवलंबून असते.  आर्थिक उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या युगासंबंधी मला सुचलेले विचार ' मुक्काम पोस्ट लाॅकडाऊनवरून ' भाग-२ ' या शिर्षकाचा १ मे २०२० रोजीच्या लेखात सविस्तर मांडले आहे. त्या लेखातील रियल इस्टेट संबधीतील चर्चा चीन मधील एवरग्रेड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दिवाळखोरीला ही तंतोतत लागू पडते. चीन नावापुरता साम्यवादी अर्थरचनेचा आधार घेत प्रत्यक्ष भांडवलशाहीनेच कारभार करत आला आहे. आर्थिक उदारीकरण म्हणजे एक प्रकारचे आर्थिक उधारीकरण. यावर एका काल्पनिक कथेने मी त्या लेखाची सुरूवात केली आहे. आपण तो लेख वाचावा अशी नम्र विनंती.

' जागतिक राजकीय मंचावरील घडामोडी आणि भारत ' हा विषय अफगणिस्तानातील अस्थिरतेतून उदयास आला आहे हे खरे आहे. पण भारत सरकारला या संबंधीचा अंदाज २०१८ सालीच आला होता. भारताने तालिबानाचा संपुर्ण बंदोबस्त करण्याची भुमिका घेतल्यामूळे या लेखाच्या विषयावर, अफगणिस्तानातील लोकांची आंदोलने, तालिबान, आएसआय, अल-कायदा,  नार्थन अलायन्सची तालिबानशी सुरू असलेली कडवी झूंज, मध्य आशियातील ताजिकास्ताशी आपली मैत्री, तुर्कीस्तान, इराण, Aukus, क्लाड् देशांची बैठक,  लसीकरणा संबंधी भारतियासंबंधी इंग्लडने घेतलेली भुमिका, प्रान्सचा भारताशी झालेला करार, तिबेट-चीन, चीन-तैवान यातील सीमावाद, इजराईल -अरबेयिन देशात अधून-मधून होणार्या चकमकी, रशिया, अमेरीका, आणि सौदी अरेबियाला उमगलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कणखरपणा, परराष्ट्रमंत्री एस जयशंकराचे डिप्लोमासी मधील अजब कसब, अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना आपल्या देशाच्या  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार धाडसी अजित डोव्हलांची घेतलेली भेट,  राजकीय अभ्यासकांनी जग तिसर्या महायुद्धाच्या ऊंबरठ्यावर असल्याचे केलेली भाष्ये, आपल्या देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांचे खात्यासंबंधीतले प्राॅपर  कोऑर्डिनेशन, तिन्ही संरक्षण दलाची सदैव असलेली युद्ध सज्जता, डीआरडीओ आणि आपल्या वैज्ञानिकांची योग्य दिशेने सुरू असलेला शस्त्रात्रे निर्मिताचा धडाका व चाचण्या, कोरोनाच्या लाटेत ही रस्ते, बंदर, तसेच इतर विकासाच्या प्रकल्पांचा विकासाचा केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरींनी सुरू केलेला सपाटा, आणि सर्वात महत्वाचे, मस्तवाल चीन आणि पाकिस्तानवर डोळे वटारावून पंतप्रधान मोदी आखत असलेली रणनिती इत्यादी बाबीवर आपण पुढील भागात चर्चा करू या.  तुर्तास या ठिकाणी थांबतो.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...