वीस पंचवीस वर्षानंतर दिवाळी सणासाठी गावी गेलो होतो. सोमवार ३० नोव्हेंबरला बोरीवलीत परतलो. संध्याकाळी पुजनीय बाबा आमटेच्या आनंदवनाच्या सिईओ डाॅ शितल आमटे यांची आत्महत्या अशी बातमी ऐकली. क्षणभर विश्वास बसेना. मुळात अकस्मात मृत्यूच्या बातमीवर विश्वास बसत नाही. त्यात सेवाधर्मातील अग्रणी संस्थापैकी आनंदवनाच्या डाॅ शितलजींची आत्महत्या ! अनेकांना दुःख झाले. घटना दुर्दैवी पण तितकीच गंभीर अशी. आतापर्यंत गवगवा होत असणार्या समाजकारणात घडलेली भूकंप सद्दश ही घटना. देशाच्या राजकीय मंचावर उठसूठ भूकंप होत असतात. खरं म्हणजे पत्रकार व संपादक मंडळी पक्षांतरासारख्या गोष्टींना भूकंपाची संज्ञा का देतात हाच प्रश्न पडतो. राजकारणात या घटना नित्याच्या झाल्या आहेत, सदा मरे त्याला कोण रडे अशा धर्तीच्या त्या घटना. परंतु सामाजिक संस्थेतील एका अग्रणी संस्थेच्या सिइओ डाॅक्टर शितल आमटेंच्या आत्महत्येची जी कारणें ऐकू आली, त्यावर विश्वास ठेवणे जड जात आहे. कारण स्वर्गीय बाबा आमटेंनी निर्माण केलेले आंनदवन म्हणजे कुष्ठरोगाच्या रूग्णांचा या भूतलावरील स्वर्ग आहे. म्हणूनच या बातमी संबंधी संवाद कसा साधावयाचा हा माझ्यासमोर पेच उभा राहीला आहे, हे प्रथम प्रांजळपणे कबूल करतो.
स्वर्गीय बाबा आमटेंनी कुष्ठरोग्याच्या जीवनात जो आनंद निर्माण केला, ते कार्य शीव धनुष्य उचलण्याइतके महाकठीण होते. भारतियांची कुष्ठरोगांसबंधी असलेल्या मानसिकतेवर आधूनिक विज्ञानशास्त्राच्या आधारे एक हाती मिळविलेला तो एक मोठा विजय आहे. जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारून ' कुष्ठरोग ना मागील जन्माचे पातक, ना संसर्ग रोग ' हे सिद्ध झालेले प्रात्यक्षिक म्हणजे त्यांनी उभारलेले आनंदवन. त्यामूळे त्यांचे ते कार्य त्यांच्या कुंटुंबियांच्या तिसर्या पिढीपर्यंत प्रेरणा देणारे ठरले. पण ही प्रेरणा कुठे कमी पडली असावी? समाजसेवेचे व्रत नसानसात भिनलेल्या, उच्चविद्याविभूषित, संयमी व सद्भभावी डाॅ शितल आमटे यांच्या अकाली व अकल्पनीय रित्या देवाघरी जाण्याने आपल्या समाजाला भूतकाळात नेहमीच पराभवाच्या खाईत लोटत असलेला, राजकीय सत्तास्पर्धेतून निर्माण झालेला गृहकलह वा घरेभेदीपणा, समाजकारणात आणि तो ही सेवा क्षेत्रात घुसून समाजालाच विळखा घालील कि काय अशी भिती वाटू लागली आहे.
बाॅलिवूड मधील सिने कलाकार सुशांतसिंगच्या मृत्युचे कारण आत्महत्या आहे असे महाराष्ट्रच्या गृहमंत्र्यांनी काहीही चौकशी झाली नसताना लागलीच जाहीर केले. त्यावरून वादळ उठले व त्यांसंबधीत चौकशी सुरू आहे. त्यावर आपण चर्चा केलेली आहे आणि पुढे ही आपल्याला करावी लागेल. पण त्या निमित्ताने आत्महत्येची संख्या वाढत का जात आहे यावर मतप्रदर्शन करतांना मी म्हटले होते की, आजच्या स्पर्धेच्या युगात Level of ambition आणि Level of Satisfaction यामधील सुवर्णमध्य साधणे गरजेचे आहे. पण शितल आमटे ह्या बाॅलीवूडमधील कलाकार नव्हत्या. त्यांनी स्वंयस्पूर्तीतून समाजकार्यात ओढून घेतले होते. तिथे दुसर्या संस्थेशी कुठलिही स्पर्धा नव्हती. मग शितल आमटेंनी आत्महत्या का केली असावी? यावर चर्चा सुरू झालेली आहे आणि अनेकांनी आपले मतप्रदर्शन ही केलेले आहे.
श्री महेशजी काळे यांची या संदर्भातील सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्या पोस्ट चे शिर्षक ' सामाजिक कार्याच्या प्रेरणा पुन्हा तपासून पाहाव्यात ' असे आहे. ती पोस्ट सर्वांनी वाचावयास हवी. ती पोस्ट इतकी अभ्यासू वृत्तीतून आकारास आली आहे की स्वर्गीय बाबा आमटेंच्या आनंदवनात घडलेल्या दुर्दैवी घटनेवर अधिक काही लिहावे असे शिल्लक राहीले नाही. डाॅ शितल आमटेंच्या संबंधी काळे यांनी गौरवोद्गार काढले आहेत. बाबा आमटेच्या निधनानंतर बाबांनी निर्माण केलेल्या एका प्रकल्पाला त्यांच्या घरात समातंर प्रकल्प अस्तित्वात आला आहे असे म्हटले आहे. याचा अर्थ हाच आहे की बाबा आमटेंच्या कटुंबिंयातच स्पर्धा सुरू झाली असल्याचे कळते. हे सत्य मांडतांना श्री महेशजी काळेंना अतिव दुःख झाल्याचे त्यांच्या शब्दातूनच दिसून येते. या ठिकाणी मला माझे मन सांगते, की " जसे अट्टल गुन्हेगाराच्या उलट्या काळजाच्या एका कोपर्यात सत्प्रवृत्तीची इवलिशी ज्योत निर्माण होते, तद्वत ज्यांच्या नसानसात सेवा वृत्तीची ज्योत तळपती आहे असे बाबांच्या कुटुंबियांच्या मनात बदलत्या परिस्थितीत इवलिशी स्वार्थी वृतीचा शिरकाव झाला असावा. त्या उलट्या काळजाच्या गुन्हेगाराला क्षमा व्हावी असे आपले मन इच्छीत असते की नाही? याही पुढे जाऊन स्वतःला लिबरल म्हणवून घेणारे विचारवंत त्याला माफी मिळण्यासाठी हिंसक अंदोलनही करण्यास मागे पुढे पाहात नाहीत. म्हणून आमटे कुटुंबियात घडलेल्या घटनेमूळे त्या कुटुंबांची बदनामी होईल असे वक्तव्ये करण्याचे हितचिंतकांनी टाळावे. बाबा आमटेच्या आनंदवनात जी काही चूक घडली असेल ती समाजाने पदरात घ्यावी आणि बाबा आमटेंच्या कुटुंबियांनी बाबांचे कार्य बांबाच्या प्रतिष्ठेला शोभेल अशा प्रकारे सुरू ठेवावे हीच आजच्या घडीची गरज आहे."
बाबा आमटें स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांच्या कार्याला आणि संस्थांना रोडवत चाललेला आर्थिक मदतीचा ओघ, वाढता खर्च, मिडीयांतर्फे स्वर्गीय बाबा आमटेंच्या कार्याला मिळत असलेला ग्लॅमर इत्यादी कारणांचा ही उहापोह श्री काळे यांनी केला आहे. स्वर्गीय बाबा आमटेच्या कार्यावर पराकोटीचा आदर व्यक्त करीत त्यांनी उभारलेला सामाजिक कार्याचा डोलारा कोसळू नये अशी प्रार्थनाही केली आहे. महेश काळेंनी आपल्या पोस्ट मध्ये जे मांडले आहे, त्यातून सामाजिक संस्था म्हणजे आपल्या समाज- जीवनाचा आधार आणि तो टिकला पाहिजे अशी तळमळही व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणतात की , " अर्थप्राप्ती, कुटुंबाचे हित, आणि प्रतिष्ठा या प्रेरणा समोर ठेवूनच मनुष्य कुठले तरी कार्य करीत असतो. पण आपल्या येथे आणखिन कुठे लिखीत स्वरूपाची नसली तरी आपल्या साधू-संतानी, महापुरूषांनी आपल्या कृतीतून एका प्रेरणेचे दर्शन समाजाला घडविले आहे. " आपल्या संस्कृतीतील समाज सेवेच्या पाठीमागे असलेल्या या अलौकीक अशा प्रेरणेचे वर्णन अधिक स्पष्ट होण्यासाठी त्यांनी राजा रंतीदेवचा एक श्लोक दिला आहे, तो खालील प्रमाणे आहे,
न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुर्भवम् |
कामये दुःखताप्तातां प्राणिनाम् अर्तिनाशनम् ||
(अर्थ- मला राज्य, स्वर्ग किंवा पुनर्जन्माची इच्छा नाही, तर दुःखितांचे दुःख दूर झाले पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे)
श्री महेश काळेंनी योग्य ठिकाणी, योग्य तो अर्थबोध होणारा, योग्य तो श्लोक आपल्यासमोर ठेवला याबाबत त्यांचे कौतूक करावे तितके कमी आहे. अर्थात ' कामये दुःखताप्तातां ' अशी इच्छा सर्वसामान्यांनी धरावी असे महेश काळेंना अपेक्षित असली तरी तसा ते आग्रह करीत आहेत असे सूचीत होत नाही. पण निदान सेवा धर्माचे प्रकल्प राबविणार्यांची इच्छा मात्र दुःखितांचे दुःख दूर करणे हीच असावी असा त्यांचा आग्रह आहे. म्हणूनच त्यांनी तो श्लोक आपल्या समोर ठेवला असे मला वाटते. कारण जर का समाजकारणाला राजकीय व्यवस्थेप्रमाणे किड लागली तर सामान्यजनांचा समाजव्यवस्थेवरचा विश्वास उडेल. मग पुढे ती तर अराजकतेची नांदी ठरू शकते. म्हणून समाजातील सज्जन शक्ती सतत जागरूक असणे गरजेचे आहे असे मला वाटते. मग या सज्जन शक्तीला जागरूक कसे करावे, कोणी करावे, सरकारने केलेले कायदे तोकडे पडतात कि कायदे राबवणारी यंत्रणा भ्रष्ट आहे , अशा यंत्रणेत विदेशी पैसा, शक्ती घूसल्या आहेत, आणि त्यांच्याकडून येणार्या पैशाची, प्रतिष्ठेची नशा चढू लागली आणि त्यातून स्पर्धा, वाद, कलह होऊ लागले, आणि मग असहायतेने कोणी आत्महत्या केली तर तो एक प्रकारें घरभेदीपणाच की नाही इत्यादी प्रश्नांची शृखंला समोर उभी राहते. शेवटी या सर्वांचे उत्तर एका वाक्यात मांडायचे असेल तर एक वाक्य माझ्या वाचनात आले आहे तेच समर्पक ठरते. ते असे आहे, ' The progress of the nation or for that matter of any society or community in general is far less depend upon the form of it's institution rather than character of it's own men.' आनंदवनातील दुर्दैवी घटनेचे आपल्या राज्यातील सरकारला सोयरसूतक आहे की नाही हेच अजून स्पष्ट झाले नाही. त्यावरून माझ्या वाचनात आलेले ते वाक्य किती सत्यतेशी जूळत आहे हे आपल्या ध्यानात आले असणारच !
सामान्यतः हाव मग ती कशाची का असेना त्याकडे मानवी मन चटकन धावते. पण तेच त्याचे मन सहजा सहजी त्याग करण्यास तयार नसते. कारण उपभोगाइतकी त्यागाची प्रवृत्ती स्वाभाविक नाही. माणसाला चांगले बनवावे लागते. तो तसा बनला, तरी त्याचे चांगूलपण टिकवावे लागते. पण त्यासाठी पूरक अशी सामाजिक परिस्थिती निर्माण करणे हे सर्व काळी, सर्व क्षेत्रातल्या नेत्यांचे काम असते. पण नेते म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते फक्त राजकीय क्षेत्रातलेच. त्यापैकी बहुताशांनी राजकीय पक्षच आपल्या घराण्यातील वारसांच्या दावणीला बांधले आहेत. सहकार क्षेत्रातील बँका, पतपेढ्या, साखर कारखाने, शेतमाल, दुध डेअर्या, पासून ते विविध खते, पशुखाद्याच्या, अन्न-धान्य पुरविणार्या संस्था सहकाराच्या नावाखाली लुटल्याची उदाहरणे बरीच आहेत. तिथेही त्यांचे वारस मालक झालेले दिसतात. अशा शेंबड्या मुलानांही आम्ही त्यांच्या बापजाद्यांच्याप्रमाणे देवघरात बसविले. म्हणूनच ध्येयवादी महात्म्यांच्या स्पूर्तीतून आणि त्यागातून निर्माण झालेल्या संस्था एकतर लयास गेल्या किंवा त्या निव्वळ नफेखोरीचे अड्डे बनले. कारण संस्था संस्थापकाचा ध्येयवाद ती चालविणार्या पुढल्या पिढीच्या आचरणात उतरत नाही. संस्थेचा उज्वल ध्येयवाद बहुधा एका पिढीभरच टिकतो. कारण दुसर्या पिढीला तो हिणकस झाल्याशिवाय राहात नाही. बाबा आमटेचे कुटुंबीय एक अपवादात्मक उदाहरण आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनाच्या काही संस्थाच्या तीन पिढ्यांचा इतिहास पाहिला तर पहिल्या पिढीची ध्येयाची पताका कधीच उडून गेलेल्या दिसतात. मग क्षेत्र कुठलेही असो. आता तर हा दुबळेपणा लपविण्यासाठी 'संस्था जगली पाहीजे' हे एक सूत्र संस्थाचालकांनी चतुराईने वापरण्याची सुरूवात केलेली दिसते. क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांनाही आम्ही देवत्व बहाल केले. याच्यांपैकी कितीजणांनी कोरोना संकट निवारण्यासाठी आर्थिक मदत केली? या क्षेत्रातील लोकांनी सुद्धा राजकीय नेत्यांप्रमाणे बेनामी मालमत्ता निर्माण केली नाही का? अशा मंडळींचा बेटींग, अन्डरवर्ल्ड लोकांशी मिलीभगत आहेच ना ! अशाच नेते मंडळीना व सेलेब्रटींना समाजातील महाजन वर्ग म्हणून प्रशस्तीपत्रके मिळू लागली असताना प्रवाहपतीत असलेल्या सामान्यजनांनी कुठल्या मार्गाने जावयाचे? या संबंधीत पत्रकार व संपादक मंडळींकडून काही अपेक्षा ठेवावी तर अशी उरली सुरली आशा कधीच मावळली आहे. कारण हीच मंडळी वरील नेतेमंडळी व तथाकथीत सेलेब्रटींचे दलाल आहेत हे उघड होत आहे.
आपल्या देशात सज्जन माणसे कमी आहेत असे नाही. आजही असंख्य प्रामाणिक आत्मे कोणत्याही मोहाला बळी न पडता आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. शहाणी माणसे ही थोडी थोडकी नाहीत. तसेच सेवा परमो धर्मः या तत्वाचे पालन करीत काम करणारी माणसे ही असंख्य आहेत. पण ते अलग अलग पडली आहेत. त्यातील काही आपल्या पायापुरते पाहात आहेत तर काहींना मार्ग सापडला आहे पण पुढची दिशा सापडत नाही. काही जणांची परोपकाराय पुण्याय पापाय परपिडनम् या महर्षी व्यासांच्या उक्तीवर प्रचंड श्रद्धा आहे. पण आपण समाजासाठी काही करू शकतो असा आत्मविश्वास नाही. असे ते लोक, म्हणजे विखूरलेले तेजःकण आहेत. अशा सर्व सत्प्रवृत्त लोकांनी समाजधर्माच्या म्हणा वा सेवा परमो धर्मः या ब्रीदवाक्याने प्रेरीत होऊन सांघिकतेने आपले बळ वाढविले तर असत् प्रवृत्तीचा पराभव होऊ शकतो. जीवन म्हणजे एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या कुटुंबाचे जगणे नव्हे. ते सार्या समाजाचे जगणे आहे असा विचार म्हणजेच सामाजिक समरसता. म्हणजेच देशाचे सार्वभौमत्व होय. जेव्हा आपण सार्वभौम आहोत असे म्हणतो त्यातून आपण संघटीत आहोत असा ही अर्थ अभिप्रेत असतो. " देशाची, समाजाची उन्नती ही तिथे राज्यप्रणाली कुठली, सरकार कुठच्या विचारसरणीचे आहे, इत्यादी राज्यशास्त्रीय नियमांपेक्षा तेथील याच्चवत प्रत्येक नागरिकाच्या चारित्र्यावर अधिक अवलंबून असते." मग चारित्र्यवान नागरिक कसे घडवावयाचे? एखाद्या महात्मा वा महामानवाच्या जीवनचरीत्राच्या पारायणातून हवा तसा परीणाम हाती लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तसेच काळ इतका बदलला आहे की एखादी व्यक्ती कितीही ज्ञानी आदर्शवादी, परोपकारी कर्तबगार, शक्तीमान असली तरी ती व्यक्ती संपूर्ण देशाला वा जगाला मार्गदर्शन करीत दशांगुळे वर उरेल असे संभवत नाही हे सत्य आहे. त्यामूळे समाजापुढील आणि पर्यायाने देशापुढील समस्या संघटीत शक्तीनेच सुटू शकतील. म्हणतात ना ' संघौ शक्ती कलियुगे | ' हे शंभर टक्के पटते.
श्री महेश काळेची ती पोस्ट बोरीवलीतील परांजपे नगरात राहणारे माझे परम मित्र श्री श्रीधर साठेंनी मला फारवड केली आहे. श्रीधर साठे यांचा ही व्यासंग फार मोठा आहे. ते ही सतत समाजसेवेत व्यस्त असतात. त्यांनी ती पोस्ट मला फारवड केली, त्या सोबत त्यांनी त्यांची छोटीसी प्रतिक्रीया दिली आहे, ती अशी आहे,
"आपल्या संस्थेबद्दल आपुलकी असावी पण स्वामित्व नसावे. अर्थात संघ परिवारातील अनेकनेक संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते आपुलकीने काम करतात. पण संघाने कोणत्याही संस्थेचं व्यवस्थापन वा रूपांतर हे वैयक्तिक किंवा कौटुंबिक मालमत्तेत होऊ दिले नाही. हां काही जण कौटुंबिक मालमत्तेत ट्रस्टचा मुखवटा चढवून तसा आभास निर्माण करतात. पण अशा संस्थाना संघ परिवार आपल्या पंखाखाली कधीच घेत नाही. संघाच्या धुरीणांनी किती खोल विचार केलाय ना !"
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या सेवा संस्थेतील आजपावेतो कुठल्या ही संस्थाची मालकी कोणा व्यक्तीच्या वा त्याच्या वारशांच्या मालकीची झाली नाही हे जे श्रीधरजी साठेंनी म्हटले आहे ते सत्य आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भर चारित्र्यवान नागरिक बनविण्यावर अधिक आहे. म्हणून बालवयात संस्कार होण्यासाठी शाखेत थोर, त्यागी महापुरूषांच्या कथा सांगितल्या जातात. शिवाय बलोपसना तसेच घोष वादन, एकल गीत, सांघिक गीत गावयाचे शिक्षण शाखेत दिले जाते. विविध प्रकारचे शारिरीक व बौद्धिक खेळ शिकविले जातात. ते ही मुफ्तपणे. संघात प्रवेश घेण्यासाठी ना प्रवेश फाॅर्म आहे, ना कुठली अट. त्यामूळे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ अशी दान व त्याग ही जीवनमूल्यें बाल स्वयंसेवक आपसूक आत्मसात करतात. मग पुढे हे बाल स्वयंसेवक मोठे झाल्यावर स्वतः पुढाकार घेऊन सेवा प्रकल्प उभे करतात. कारण त्यांच्यातील सदगुणांची निकोप वाढ झालेली असते. सदगुणी मनुष्य या जगात सुखी होईलच असे नाही. किंबहुना मनुष्याचा आत्मा जितका अधिक विकसित, तितके त्याचे दुःख अधिक ! पण हा आत्मा सुखी नसला तरी इतरांना सुखी करण्याच्या कामी तो सतत झटत असतो; कारण त्याच्या भावविश्वात केवळ स्वतःच्या सुखाच्या इच्छांनाच स्थान असते असे नाही. त्याच्या सुखाशी ज्यांचा काडीइतका संबंध नाही, अशा जीवनाला उपकारक असणार्या सर्व गोष्टींना त्यात स्थान असते.
संघ या शब्दाचा अर्थ म्हणजे सांघिकतेने समाजसेवा व देशसेवा करणारी संस्था. संघ म्हणजे ' मी ' ने 'आम्ही ' त कायम स्वरूपात सामील होणे . म्हणून तिथे रूसवे फुगवे दिसत नाहीत. संघ कधीही सेवा प्रकल्पाची आपलीच मक्तेदारी आहे असे मानत नाही. इतर सेवा संस्थाना संघ कमी लेखीत नाही. उलट स्वयंसेवकांना सर्व समाजसेवी संस्थांमधून सेवा धर्म निभावा असा सल्ला देत असतो. नव्हे तशी शिकवण स्वयंसेवकांच्या नसनसात भिनलेली असते. कोरोनाच्या साथीत अनेक देवालये व इतर सहकारी आणि सेवा संस्थाच्या सोबत संघाने कार्य केले आणि अजूनही सुरू ठेवले आहे. सन २०२५ च्या विजया दशमीला संघाची जन्मशताब्दी साजरी होणार आहे. त्यासाठी संघ विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे. समाजातील सर्व स्तरावरील भेद, विवाद, भिडस्तपणा जाऊन समरसतेची श्रीमंती नांदावी असा प्रयत्न संघाचा राहील. त्यातून सांघिक शक्ती वाढीस लागेल आणि अंती आपला देश समर्थ बनण्याचे उद्दीष्ट संघ साकार करेल अशी आशा बाळगून मी आपली रजा घेतो.
म्हात्रेजी,
उत्तर द्याहटवानमस्कार,आपल्या पुढील लेखाची वाट पहात असतांना, आज वरील दुःखद घटनेवर भाष्य करणारा लेख समोर आला. गेल्या महिन्या पासुन तिथुन येणार्या बातम्या,डाॕ कौस्तुभना समितीवरुन काढण, परत नेमणुक करण, सर्व मतभेद मिटल्याच सर्वांच्या सहीच पत्रक काढण, यावरुन सर्व ठीक नसल्याचच दिसत होत, पण त्याच अशा दुःखद घटनेंत पर्यावसन होणं, हे धक्कादायक होय.
खरं म्हणजे इतक अवघड कार्य निस्वार्थीपणै, बाबांच्या पश्चात तिसर्या पिढीपर्यंत चालु रहाण हेच मुळी अपवादात्मक होत.
वार्षिक अल्प देणगी निमित्ताने डाॕ प्रकाश यांच्याशी संपर्क होतो.वडिलांच कार्य दोन्ही बंधु, प्रकाश, विकास यांनी नेटानं चालवल हे अतिशय कौतुकास्पद आहे, पण पुढच्या पिढीकडुन ते तस न चालवल गेल्याचा हा धक्कादायक दुष्परीणाम.कालाय तस्मै नमः
धन्यवाद.
धन्यवाद !तुम्ही बरोबर बोललात ' कालाय तस्मै नमः | '
उत्तर द्याहटवाडॉ शीतल जी चा मृत्यू हा खरोखरच दुःखदायक तितकाच वेदनादायी व निराशाजनक आहे . त्याबद्दल केलेलं विवेचन व संघाचे निस्वार्थी कार्य मात्र आशादायी आहे ते तसेच सुरू राहील व त्यासाठी आपण सर्वांनी तसे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद ! Be blessed.
उत्तर द्याहटवा