रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? (भाग-२)

 क्रमशः भाग एकवरून ....

माणूस सामाजिक प्राणी मानला जातो ; याचा अर्थ तो मुलतः प्राणी असतोच की ; पण जो सामाजिक बनतो, त्याची वाटचाल देवत्वाकडे सुरू होत असते. सामाजिक म्हणजे घोळक्यात राहणे नव्हे. तसे तर पशू ही कळपात राहतात. सध्याच्या काळातील आघाडीचे सरकार म्हणजे कळप. माणूस म्हणजे देव व प्राणी मधला एक ताण होय. देवत्वाकडे जाण्याचा प्रयत्नाला सुरूवात झाली असे कधी म्हणता येईल? जेव्हा माणूस समाजाच्या हिताचे काहीतरी चांगले कार्य करू लागतो तेव्हा. म्हणजे  प्रत्येक जन्मात उत्तरोत्तर जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न करतो तो खर्या अर्थाने सामाजिक बनतो. अशा अनेक जन्मातील पुण्याईची गंगाजळी घेऊन जो जन्मतो तो समाजाचाच बनतो. त्याचा दिनक्रम समाजाच्या कार्याने सुरू होतो आणि संपतो तोही सामाजिक कार्यानेच संपतो. त्याची इहलोकांची यात्रा संपेपर्यंत त्याचे समाज व देशकार्य सुरूच असते. तोच खरा कर्मयोगी. अर्वाचीनच नव्हे तर भारताच्या प्राचीन  इतिहासात ही राजकारणात फक्त लेखणी हे शस्त्र वापरून ज्यांनी समाज व देशासाठी पत्रकारीता, रूग्ण सेवा, शिक्षण संस्थेच्या द्वारे विद्यादान, स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वतःला झोकून घेत, कारावासात गेले आणि तिथे ही  गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहून अध्यात्मिक क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठले असा अद्वितीय कर्मयोगी म्हणजे लोकमान्य टिळक. लेखणी कशी असते याचे साधे उत्तर म्हणजे , ती एक सामान्य वस्तू. पण ती दुरदृष्टी असलेल्या व्यक्तीच्या हातात आली की ती लेखणी त्या व्यक्तीला विभूतीचे रूप देते.  प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता यावे अशी व्यापक इच्छा ज्या व्यक्तीच्या नसानसात भिनते आणि त्यासाठी आपले जीवन खर्ची करते, तेव्हाच ती व्यक्ती आपल्या लेखणीतून किंवा वाणी द्वारें 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ' अशी सिंहगर्जना करू शकते. ती ही सामर्थ्यशाली ब्रिटीश सरकारच्या विरोधात. त्या सिंहगर्जनेत इतकी ताकद होती की देशभरातील अनेक युवकांनी प्रेरणा घेत टिळकांनी मांडलेल्या स्वराज्यरूपी यज्ञकुंडात उडी घेतली.

आज आपण काय पाहतो आहोत? 'आम्ही वाघ ' इतकी एकच पोकळ वल्गना अनेक वर्षे ज्यांच्या मुखातून ऐकत आलो आहोत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत आणि अप्रत्यक्ष रित्या सामना या वृत्तपत्राचे संपादक आहात. बरं सत्तेत कसे बसले? मागच्या दारातून. मग समाज यांना वाघ कसे मानणार? बरं 'आम्ही वाघ ' अशी पोकळ वल्गना  आपल्या शत्रूदेशाविरूद्ध असती तरी ती चालली असती. कारण यांना थोडीच शत्रुदेशांविरूद्ध लढाई उभारायची आहे. ती जबाबदारी केंद्र सरकारची असते आणि केंद्रात तर आता जे मोदी सरकार आहे, ते चीन सारख्या शत्रूदेशाच्या तोंडातले पाणी पळवित असल्याचे आपण पाहतो आहोत. पण मोदी सरकारचा द्वेष करण्याची इतकी सवय भाजपेतर सरकारला व पक्षांना लागली आहे की  मोदी सरकारने शत्रुदेशावर सर्जीकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला तरी त्याचे पुरावे मागितले. जणू काही ही नेतेमंडळी सीमेवरून लढलेले व सेनाधिकारी म्हणून निवृत्त झाली आहेत. काय यांचा हा तोरा ! त्यामूळेच भाजपेतर पक्षांचे नुकसान होत आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात काॅग्रेस सरकारने १९७५ साली आणिबाणी आणली होती, तेव्हा काही लोक बिळात लपले, काहीनी घाबरून आणिबाणीला पांठींबा दिला तर काहीं नी तत्कालीन पंतप्रधान व त्यांच्या पुत्राचे जोडे हातात घेतले. अशी मंडळी ज्यांचे पुर्वज आहेत असेच लोक आज  महाराष्ट्रात सत्तेत आहेत.  त्यामूळे गेली सहा वर्षे 'आम्ही वाघ ' असे काही कर्कश शब्दात  ऐकू येते, ती वाघाची डरकाळी नसून भितीने धास्तावलेल्या शेळीचे रडणे आहे, हे मतदारांनी २०१४ च्या लोकसभा व विधानसभा तसेच २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भाजपाला मतें देऊन सिद्ध केले आहे.

लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या सिंहगर्जनेचा खोलवर जाऊन अभ्यास केला तर त्यात जगभरातले राजकारण कसे असावे, राज्यकर्त्यांनी आपले आचरण कसे ठेवावे याचा एक वस्तुपाठ आहे. स्वतंत्रता ही प्रायः सर्व प्राणीमांत्राना हवीसी वाटणारी गोष्ट. स्वातंत्र्य,अन्न, निवारा आणि सुरक्षा या चार गोष्टी निश्चीत झाल्या की  निश्चींत झालेले मन विकासाकडे धावते. त्यातूनच त्याची अंगभूत  सृजनशिलता जागृत होते. याची जाणीव अध्यात्माचे गाढे अभ्यासक असलेल्या लोकमान्यांना असणे ही बाब तर स्वाभाविक होती.'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ' ही घोषणा अखिल मानवजातीच्या विकासाची दिशा दाखविणारे एक होकायंत्र आहे. हेच होकायंत्र महाविकास आघाडी सरकारने मोडण्याचे सत्र आरंभिले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. तसे पाहता प्रत्येक व्यक्ती प्रथम स्वतःशीच व्यक्त होत असते. प्रत्येक व्यक्तीचे एक स्वतंत्र ब्रम्हांड असते. तिच्याकडे अनेक अंगभूत गुण म्हणा वा कुशलता असते. आर्य चाणक्यांनी म्हटले आहे अयोग्यः पुरूषा नास्ती | त्या व्यक्तीला व्यक्त होणावर निर्बध घालू नका. मग त्यातूनच तिचा प्रवास विकासाच्या वाटेवर सुरू होतो. दुसर्यांशी व्यक्त होणे म्हणजे संवाद. मनमोकळ्या वातावरणात संवाद साधत अनेकांशी संवाद होत गेला की समाजातील प्रत्येक व्यक्ती परस्परात सुसंवाद निर्माण होऊन समाज एकजीव होतो त्याचेच नाव सामाजिक समरसता आहे. त्यातून समाजाचा जो विकास होतो तो चिरस्थायी ठरतो. लोकमान्य टिळकांच्या  स्वराज्याच्या कल्पनेत समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे समाज व राष्ट्राच्या स्वार्वभौभत्वाच्या पायाच्या विटा आहेत. प्रत्येक देशात अशा लोकशाही कल्पनेची गुंफण घातली गेली की जगात शांती, ज्ञान, आणि विकासाचे राज्य निर्माण होऊ शकते. म्हणूनच पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहणे आवश्यक आहे.  लोकमान्य टिळकांनी देश इंग्रजाच्या दडपशाहीत असताना सरकार विरूद्ध रोखठोक भूमिका मांडली होती. ते अत्युच्च शिखरावरील पराक्रमी संपादक होते. वाघाच्या चित्राचे कागद आपल्या अंगावर धरल्यानी कोणी संपादक वा नेता वाघ होत नाही. 

वाचक व श्रोत्यांच्या म्हणजेच जनतेच्या समोर सरकारच्या काळ्या कारस्थानांचे बाभाडे काढणार्या व्यवस्थेला चिरडून टाकण्याची भाषा वा व्यवहार तो ही  स्व- सरकारनेच सुरू केला तर स्वराज्य आणि परवशतात फरक तो काय राहीला? कार्तविर्यासारखे राजे महाराज जनतेची छळवणूक करू लागले,  तेव्हा अत्री ऋषीने प्रजेमध्ये जागृती निर्माण केली. त्या जागृतीत इतकी ताकद होती की भगवान विष्णूला सहावा अवतार घ्यावा लागला. भगवान परशूरामांनी मस्तवाल राजे-महारांजाना यमसदनास पाठवून पृथ्यी सतरा वेळा निःक्षत्रीय केली होती. या इतिहासापासून महाराष्ट्रातील विद्यमान सरकारने धडा घेत आपला व्यवहार सुधारयला हवा. कलियूगात भगवान परशुराम अवतरणार नाहीत पण त्यांची शक्ती चिरंजीवी आहे. ती कलियुगातील राजकारणात मतदारांच्या सद्विवेक बुद्धीत साठलेली असते. आपण प्रातः स्मरणात
           अश्वत्थामा बर्ली व्यासो हनुमंतच्च बिभिषणो |
           कृपा परशूरामाच्च सप्तैनै चिरंजीवीना ||
या प्रार्थनेत व्यक्तींची जी नावे आहेत, त्यांची प्रत्येकाची एक वृत्ती अशा सात वृत्ती चिरंजीवी आहेत.  यात अश्वत्स्थामा म्हणजे सुडाने पेटून राहण्याची वृत्ती. ती वृत्ती काळ बदलला तरी चिरंजीवी राहते आहे. अश्वत्स्थामाच्या आत्म्याला सूडबुद्धीमूळे मुक्ती मिळणार नाही असा जो शाप मिळाला होता त्याचा अर्थ असा आहे की सुडबुद्धीने व्यवहार करण्याची सवय लागली की ती जन्मोजन्मी टिकते. 

यंदाच्या दसर्या मेळाव्यात शिवसेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ' आम्ही वाघ ' असे म्हणत त्यांनी अर्णव गोस्वामी, माजी मुख्यमंत्री श्री देवेद्र फडणवीस,  देशाचे गृहमंत्री  श्री अमित शहा, आणि पंतप्रधान मोदी यांना हा इशारा दिला. आपल्या पंतप्रधानाची शक्ती जागतिक नेत्यांना कळली आहे. ती कळण्यासाठी परदेश दौरे करावे लागणार नाहीत. आता शिवसेना नेते ज्यांच्या मांडीवर बसून राज्याचा कारभार करीत आहेत त्या शरद पवारांना पंतप्रधानपदी असलेल्या नेत्याची शक्ती काय असते हे विचारून पाहावे. सुडाच्या भावनेने पंतप्रधान नरसिंहरावांना आव्हान देण्याचे सत्र तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवारांनी सुरू केले होते. बस पंतप्रधान नरसिंहरावांनी शरद पवारांना केंद्रातले संरक्षणमंत्री पदावरून हटविण्याचे ठरविले.  मुबंई बाॅम्ब स्पोटाच्या निमित्ताने ' तुम्हाला महाराष्ट्रात परत जावयाचे आहे ' अशी विनंती पंतप्रधान नरसिंहरावांनी संरक्षण मंत्री शरद पवार यांना केली. ती शरद पवारानीं आव्हानत्मक भाषेत म्हणे नाकारली.  त्यावेळी नरसिंरावांनी  " ठिक है तो मैं अपने गृहमंत्री शंकरराव चव्हाणजीके हातोंमे ही महाराष्ट्र राज्यका कारोबार सौपता हूँ | " असा इशारा देताच शरद पवार मुकाट्याने महाराष्ट्रात परत आले. हे तर जाऊ द्या, नरसिंहराव पंतप्रधान पदावर नव्हते पण माजी पंतप्रधान व काॅग्रेसचे माजी अध्यक्ष या नात्याने त्यांनी श्रो सितराम केसरींकडे काॅग्रेसचे अध्यक्षपद जावे अशी इच्छा काॅग्रेस वर्कींग कमिटीत केली. तेव्हा शरद पवार केसरींच्या विरूद्ध काॅग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीला उभे रहीले. काय झाले? शरद पवारांचा दारूण पराभव. तेव्हा पासून शरद पवारांची ताकद पश्चीम महाराष्ट्रापूरती सिमीत झाली. शरद पवार यांना शिवसेनेने गुरू मानले तर तो त्यांचा प्रश्न. पण शरद पवार कधीच राष्ट्रीय स्तरावर शक्तीशाली नेते गणले गेले नाहीत. याचे कारण ते राजकीय जगात विश्वासू म्हणून गणले गेले नाहीत. नरसिंहरावांना जसे शरद पवारांनी आव्हान देऊन चूक केली तशीच चूक उद्धव ठाकरे मोदींना आव्हान देऊन करीत आहेत. यात उद्धव ठाकरेंची वैयक्तिक राजकीय शक्ती क्षीण होत जाईल. मग शिवसेनेला तरी काय भविष्य राहील?  आणखिन एक चूक उद्धव ठाकरें यांनी केली ती म्हणजे भाजपाला हिंदुत्वाची शिकवणी देण्याची.

सन्माननिय मुख्यमंत्री साहेब, आपण भाजपाला हिंदुत्वाची व्याख्या शिकविणे म्हणजे एखाद्या टिटवीने आपल्या चोचीने सागराचे जल मोजण्याचे काम हाती घेण्यासारखे आहे. भाजपातील बहुतांश नेते व कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून बालपणापासून संस्कार घेतलेले आहेत.  भारतीय राजकारणात लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील मतदारांसमोर आपल्या कामाचा अहवाल ठेवण्याच्या प्रथेचे श्रेय भाजपाकडे जाते. मतदारांच्या समोर आपल्या कार्याचा अहवाल सादर करणे म्हणजे 'आम्ही करून दिखविले 'अशी नाक्यानाक्यावर पोस्टर्स लावून जाहिरात करणे नव्हे. तसे असते तर स्वबळावर आपल्याला सत्ता मिळाली असती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व क्षेत्रातील महान कार्याची नुसती जंत्री पाहिली तरी बावनकाशी सोन्याप्रमाणे चमकणार्या हिंदुत्वाने आपले डोळे दिपून जातील. संघाचे हिंदुत्व समजण्यासाठी संघाच्या शाखेत जावे लागेल. जीवन कसे जगावे याचे बाळकडू संघाच्या शाखेत मिळते. हिंदुत्व विचार प्रत्यक्षपणे समाज जीवनात कसा आणता  येईल असा एक अभ्यासक्रम असतो. त्याचे प्रशिक्षण स्वयंसेवकांना दिले जाते. शिवसेनेत अभ्यास आणि प्रशिक्षण याला स्थानच नाही. संघाच्या स्वयंसेवकांनी आपल्या प्रपंचावर तुळसी पत्र ठेवून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सेवा प्रकल्प उभे केले आहेत. अनेक भटक्या विभूक्त जमातींच्या जीवनाला स्थैर्य दिले, व्यसनांच्या आहारी गेलेल्या समाजबांधवांच्या जीवनात भक्तीचा मळा फुलविला, रूग्णांच्या वेदनांवर रूग्णालय उघडून मायेची फूकंर घातली, आश्रम शाळा व संस्कार केंद्र  उघडून वनवासी बांधवांच्या जीवनात तमसो मा ज्योतिर्गमय ही प्रार्थना प्रत्यक्षात उतरविली. कृषी, संगीत, कला, उद्योग,  बँका, लघुउद्योग, ग्राहक, वन औषधे निर्मिती इत्यादी क्षेत्रात सहकाराच्या तत्वावर संस्था उभारून, आपल्या संस्कृतीतील जीवनमूल्यांच्या आधारे  रोजगार निर्माण करून अर्थव्यवस्थेला गती आणण्याचे काम संघ व भाजपाची मंडळी करीत आहेत. आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आत्मनिर्भरतेचा नारा दिला आहे कारण ते मूलतः संघाचे प्रचारक आहेत. उद्ववजी, आपण ब्राह्मणाचे हिंदुत्व अशी शेलकी लावून भाजपा आणि पर्यायाने संघावर टिका करता म्हणून सांगु इच्छीतो की प्रथम आपल्या हिंदुत्वाची व्याख्या काय आहे ती तरी मांडा. शिवसेनेने कार्यकर्त्यांना हिंदुत्व विचारसरणी आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण घेतल्याचे ऐकीवात नाही. शिवसैनिकांसाठी दोन सत्राचे एक दिवस  प्रशिक्षण शिबीर आयोजीत करा. जिथ ठेवाल, तिथे दोन सत्रे तुमच्या मार्गदर्शानाचे होऊ द्या. आम्ही येतो ऐकावयास. आमच्या ज्ञानात भर होईल.  तुम्ही आता मुख्यमंत्रीपदावर विराजमन आहात ना, तर संघाचा प्रत्येक क्षेत्रात फडकत असलेला सेवाधर्माच्या ध्वजाचे दर्शन घ्या, संघाच्या शाखेत जाऊन पाहा. इतकेच नव्हे तर आजच्या काळात आपल्या वाढत्या धार्मिक उत्सवांची संख्या पाहून अपुरा पडणार्या पुरोहीत वर्गाचे क्लासेस उभारून तिथे सर्व जाती-जमातींना पौराहित्याचे शिक्षण देण्याची जी व्यवस्था आहे ती संघाच्या पुढाकाराने सुरू आहे. तिथे सवड काढून जावे.

संघ स्वतः प्रकल्प उभे करीत नाही. संघाचे स्वयंसेवक त्यांना मिळालेल्या संस्काराच्या बळावर अनेक क्षेत्रात आपल्या परीने अशी कार्ये करीत आहेत. त्यातील काही कार्यें खरं म्हणजे सरकारने करायला हवीत. पण आमचा संघ हा समाजाचा आणि देशाचा आहे, हीच भावना स्वयंसेवकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. त्याचेच नाव आहे हिंदुत्व. सरकारी व खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे म्हणजे हिंदुत्व नाही. रत्नागिरीत नारायण राणेंचे समर्थक व शिवसेनेचे समर्थक आपआपसात भांडण करीत मारामारी व शेवटी समाजबांधवाचे रक्त सांडतात तेव्हा हिंदू म्हणून दुःख होत असेल तर ते खरे हिंदुत्व. संघाचे हिंदुत्व साता समुद्रापलिकडे पोहचलेले आहे. बाकी नैसर्गिक आपत्तीत पडलेल्या देशबांधवांना अर्धी विजार घालून संघाचे स्वयंसेवक मदत करीत असताना धर्म जात भाषा असा भेदभाव न पाहता मदत करतात. हे आपण न्यूज चॅनेलवरून पाहाता आहात. बरखा दत्त सारखी वाम पंथीय संपादिका कोरोनाच्या आपत्तीत रूग्णांना मदत करताना शिवसैनिक कुठे  दिसत आहेत का हे पाहण्यासाठी वस्ती वस्तीत  फिरल्या तेव्हा त्यांना सर्वत्र संघाचे स्वयंसेवक दिसले. सन्माननिय उद्धवजी, आपली दृष्टी फोटोग्राफरची असल्याने आपणांस संघाच्या हिंदुत्वाचे दर्शन चांगले होईल अशी आशा आहे.

उद्धवजी, आपण संकुचित राजकारणासाठी आणि आपल्या पुत्र लोभाने महाराष्ट्राचा धृतराष्ट्र बनू नका. आपल्या पिताश्री प्रमाणे दिलदार व्हा. त्यांनी समाजकार्याचा वसा घेतला होता त्याचे रोज स्मरण करीत जा. आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू नका, मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा मुख्य तसेच प्रगल्भ असलेला प्रथम नागरिक असतो. त्याचे कार्य समाज बांधवांचे साथीच्या रोगापासून, भूकेने व्याकूळ होत समाज बांधवाचं मृत्यूच्या दारात जाण्यापासून, राज्याची तिजोरी भ्रष्टाचाररूपी भस्मासुराकडे जाण्यापासून, कधी मुसळधार तर कधी कमी असे पर्जन्यमान होत असल्यामूळे पीचत चाललेल्या शेतकर्यांचे नैराश्यापासून, माता-भगिनीचे दृष्ट लोकांपासून, धर्माचे अधर्मापासून  युवकांचे बेकारी मुळे आलेल्या नैराश्या पासून, आणि साधू-संताचे दुष्टांपासून रक्षण करणे हे मुख्यमंत्री म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडत राहा. तसे जमत नसेल तर तुमच्या कारभाराचा बाभाडे काढून मतदार राजाला जागृत करणार्या पत्रकार, व संपादकांचा छळ करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हाच लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाचा खरा अर्थ आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सांघिक भावनेने चालते. तिथे सर्वत्र सुसंवाद असतो. तिथे सर्व कार्य सहमती, सहकार व समरसता या त्रिसूत्रानुसार चालते. अशा कार्याचे प्रत्यक्ष दर्शन आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी व लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी घेतले आहे आणि या दोन विभूतींने संघाची प्रंशसा केली आहे. हा इतिहास जरूर वाचा आणि सध्या ज्या पुरोगामी, गांधीवादी मंडळी समवेत आपण बसत आहात, त्यांना ही वाचावयास द्या. आपण मुख्यमंत्रीपदाचा भार स्विकारल्यापासून राज्यात जे द्वेषाचे वातावरण सुरू झाले आहे, ते सुधारण्यासाठी leading from the front या न्यायाने आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. अन्यथा एक अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून आपले नाव महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहास कोरले जाईल. तसे होणे टाळावयाचे असेल तर लौकर भानावर या आणि शुद्ध मनाने राज्यकारभार चालवा ही नम्र विनंती.

२ टिप्पण्या:

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...