बर्याच महीन्यानंतर म्हणजे ' इशावास्यम इदं सर्वम ' हा लेख लिहील्यानंतर आज मी 'आपण व आपली दैवते ' या विषया वर लेख लिहीण्यासाठी बसलो आहे. तसे पाहता कोजागिरी पौर्णिमा, कार्तिकी एकादशी, अस्पृशता एक बडी भूल, मकर संक्रातीके पर्वपर, इत्यादी अराजकीय लेख पब्लीश केले असले तरी १५ जानेवारी नंतर ब्लाॅगवर राजकीय घडामोडीनेच जागा व्यापली. समाजाची धारणा ज्यातून होते तो धर्म. धर्म कल्पनेत राज्यव्यवस्थेचाही समावेश असतो. म्हणून राजकीय घडोमोडीवर विशेषतः निवडणूकीच्या काळातील राजकीय पक्षांच्या प्रचार सभा, रणनीती, जय-पराजय ह्या संबंधी लेख लिहीण्याकडे कल अधिक राहीला. पुर्वी सात-आठ वर्षे राजकारणात सक्रीय भाग घेतलेल्या निदान माझ्या सारख्यांसाठी ती स्वाभाविक प्रवृत्ती आहे, असे आपण मानाल अशी आशा व्यक्त करून मी आजच्या विषयाकडे वळतो.
ईशावास्यम इदं सर्वम ह्या लेखात ईश्वराच्या व्याप्तीचे वर्णन केले आहे. चराचरात ईश्वर व्यापला असल्यामूळे सार्या चल-अचल वस्तूत ईश्वर आहे हे ओघाने आलेच. ईश्वर दिसत नसला तरी तो आपल्याला चल अचल वस्तूत आहे असे जाणवते. ईश्वराचे आणखिन एक अदभूत वैशिष्ट्य असे आहे की त्याने आपले भावविश्वही व्यापले आहे. म्हणून तो करूणासागर आहे ; भक्तवत्सल आहे; तो सगुण आहे तसेच निर्गुण आहे; तो पतीत पावन आहे; तो सत् चीत आनंद आहे असे त्याचे वर्णन कवी, लेखक गीतकार, संतानी आपआपल्या साहित्यकृतीतून केले आहे. त्यांच्या साहित्यकृत्या म्हणजे देवाच्या स्वरूपाची त्यांना झालेली अनुभूती. असा आपला विश्वास आहे. ह्याच विश्वासाचं हळूहळू श्रध्देत रूपातंर होत गेलं. हे सुध्दा नैसर्गीक आहे. शेवटी जगाचा कारभार श्रध्देवरच चालतो ना ! आपली दिनचर्या, आपले आचार-विचार, आहार-विहार, बोलणं-वागणं, इत्यादीवर कोणीतरी पाळत ठेवीत आहे, आणि ती शक्ती म्हणजे देव आहे असे आपण मानतो. त्यामुळे पापकर्म करण्याचा मोह टळला जातो. अनायसे आपल्यात विविध गुणांची जोपासना होत असते. आपल्या अंतःकरणात विभिन्न गुणांची जोपासना होण्याची जी प्रक्रीया घडत असते तिचेच नाव देवाची अनुभूती असावी. शेवटी चांगले कार्य ते देव. चांगले बोलणे ते देव, चांगणे ऐकणे ते देव. चांगले देणे- घेणे ते देव. चांगल्या प्रकारे उपयोगी पडता येणे ह्या सार्या दैवी शक्ती. त्या अर्थाचं सुभाषितच आहे.
हस्तस्य भूषणम् दानम् ! सत्यं कंठस्य भूषणम्!
श्रोतस्य भूषणम् शास्त्रम्! भूषणैः किम प्रयोजनम्!!
दान, सत्याची कास, व शास्त्र श्रवण ह्या सार्या दैवी शक्ती वा दैवीसंपत् होत. सोप्या भाषेत म्हणावयाचे तर ही जीवनमूल्यें, म्हणजेच गुणांची खाण समजू या.
अनेक गुणांची जोपासना करणे हेच मानवी जीवनाचे प्रयोजन असावे. पण ते कार्य महाकठीण असते. म्हणून आपल्या ऋषीमूनींच्या वाणीतून,
तमसो मा ज्योतिर्गमय
असतो मा सद् गमय
मृत्युर्मा अमृतं गमय
असा उपदेश सार्या मानव जातीसाठी बाहेर आला. पण ह्या लेखाचे शिर्षक मात्र मृत्युर्मा अमृतं गमय असे का ठेवले हा प्रश्न आपल्या मनात उद्भवला असणार. त्याचे कारण असे आहे की ऋषीमुनींच्या वाणीतून निघालेल्या पहील्या दोन उपदेशाचे अर्थ आपण जाणतो पण मृत्युवर अमृतसिंचन कसे होऊ शकते, ह्याबाबतचे ठोस असे उत्तर मी शोधू शकलो नाही. मग ठरले की आपल्याशी चर्चा व संवाद करून काही उत्तर मिळते का हे पाहावे. म्हणून हा लेख प्रपंच.
देव चांगला आहे. मग आपल्यावर संकटे का येतात? संकटे आपली परीक्षा पाहण्यासाठी येतात. हे ही क्षणभर मानले, तरी एखाद्या घरात एकूलता एक मुलगा देवाघरी का जातो? मृत्यु अटळ आहे , हे ही मानले तरी माता-पित्याच्या अगोदर मुलाला किंवा मुलीला मृत्यु का यावा? देव करूणासागर आहे, पतीतपावन आहे, मग असे का घडते ? देवाच्या दरबारात न्याय आहे की नाही ? भुकंप, पूर, अपघात, वादळ, त्सुनामी, अशा आपत्तीत निष्पाप माणसे आपला जीव का गमावितात? असे प्रश्न सदैव आपल्याला सतावीत असतात. अशाच प्रश्नांनी एका सिद्धार्थ नावाच्या राजकुमाराला सतावीले होते. मृत्युचे अनाकलनीय तांडव पाहून त्याचे संसारतून मन उडते. प्रपंच सोडतो. घराबाहेर पडतो आणि तप करतो. दिर्घ तपश्चर्या नंतर बोधी वृक्षाखाली त्याला ज्ञान प्राप्त होते. तोच राजकुमार सिध्दार्थ म्हणजे भगवान बुध्द, भगवंताचा अंहिसारूपी अवतार ! प्राणीमात्रांवर दया करावी हा सार्या मानवजातीला दिलेला त्याचा उपदेश. सर्व प्राणीमांत्रावर दया करणार्या एकनाथ महाराजांच्या चरीत्रात वाचलेल्या एका कथेची इथे आठवण झाली . ती अशी आहे ---
एका गावात एक भांडखोर माणूस होता. तो रोज कोणाच्या तरी कामात अडथळा उत्पन्न करीत असे. सतत दुसर्याशी भांडण उरकून काढीत असे. त्याच्या भांडकुदळ स्वभावाने त्याची पत्नी व मुले कंटाळून गेली होती. सारा गाव त्याच्या स्वभावाने त्रस्त झाला होता. सार्या ग्रामस्थांनी गावाच्या पंचाकडे काही तरी ह्यावर उपाय शोधावा अशी विनंती केली. पंचांनी एक ग्रामसभा आयोजित केली व सर्वानुमतें त्या भांडखोर माणसावर बहिष्कार टाकावा असा ठराव पास केला. दुसर्या दिवसापासून तो रस्त्यात भेटला की गावकरी मंडळी आपली मान फिरवू लागली. त्या भांडखोर माणसावर त्याच्या पत्नीने व मुलांनीही अबोला धरला. महीना उलटला. त्याला आता एकाकीपणाचा कंटाळा येऊ लागला. आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतला हे त्यास उमजू लागले. पंचाकडे जाऊन त्याने माफी मागितली. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तो संत एकनाथ महाराजाकडे गेला. त्याने आपली व्यथा सांगितली. एकनाथ महाराज म्हणाले, " ठीक आहे, तुझ्या उजव्या हाताचा तळवा बघू या." त्याने उजवा हात पुढे केला. त्याच्या उजव्या हाताचा तळवा न्याहाळून एकनाथ महाराज म्हणाले, " मित्रा, तुझा मृत्यु जवळ आला आहे. पुढल्या सोमवारी रात्री बारा वाजता तुझा मृत्यू होणार आहे." तो भांडखोर माणूस घाबरून गेला, आणि काकळूतेने म्हणाला, "महाराज, काही तरी करून मला मृत्युपासून वाचवा." एकनाथ महाराज म्हणाले,"ह्यावर माझ्याकडे काही उपाय नाही. पण एक आठवड्याचा अवधी तुझ्यापाशी आहे. तु सर्वांशी प्रेमाने वाग. लोकांनी तुझ्याशी अबोला धरला आहे. ते तुझ्याशी बोलणार नाहीत. म्हणून तु कोणाशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या मृत्युसंबंधी सांगितलेले भाकीत कोणालाही सांगू नकोस. अगदी तुझ्या पत्नीला व मुलांनाही तुझ्या मृत्युचे भाकीत सांगू नकोस. न बोलता सकाळी लवकर ऊठून घरातील छोटी-मोठी दैनंदिन कामें करीत जा. रस्त्यावर लोकांना ओझे उचलावयास मदत करीत जा. कोणा बाईच्या एका कड्यावर बाळ आहे, व दुसर्या हातात सामानाची पिशवी असेल तर ती पिशवी हातात घेऊन तिच्या घरापर्यंत जा. रस्त्यावरून वृध्द व्यक्ती कोणी दिसली तर तिचा हात धरून चालण्यासाठी आधार देत जा. सात दिवसात घरातील मंडळी व गावकर्यांना जितकी मदत करता येईल, तितकी मदत कर. बाकी सारे देवाच्या हातात आहे, म्हणून सतत रामनाम मुखी असू दे. मी तुला सांगितलेले भाकीत कोणालाही सांगू नकोस. फक्त मी म्हटले आहे तसे वागत जा." एकनाथ महाराजांचा सल्ला त्याने मनापासून पाळायला सुरूवात केली. लोकांना आश्चर्य वाटले. लोकांना माहीत पडले कि तो एकनाथ महाराजांना शरण गेला होता. पण लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला होता, तो सुरूच ठेवला. कारण तो पंचाचा निर्णय होता. मरणाच्या भितीने त्याला ग्रासले होते. पुन्हा गुरूवारी सकाळी तो एकनाथ महाराजाकडे गेला. एकनाथ महाराजाने काही दाद दिली नाही. फक्त दिलेल्या सल्ल्याने वागत जा असे सांगितले. दुसरा सोमवार उजाडला. त्याला मृत्युची भिती वाटू लागली. सकाळी दहा वाजता तो एकनाथ महाराजांना भेटावयास गेला. एकनाथ महारांजानी फक्त इतकेच सांगितले, की " आज शेवटचा दिवस आहे, लोकांच्या कामात मदत सुरू ठेव, रात्री पावणे बारा वाजता मला भेटावयास ये. ते ही गुप्तरित्या. तो पर्यंत मला भेटायला येऊ नकोस, मी सांगितलेले भाकीत कोणालाही सांगू नकोस. मुखी रामनामाचा जप सुरू ठेव . आता निघ." तो इसम आपल्या घरी परतला. प्रत्येक मिनिटाला त्याच्या छातीतली धडधड वाढू लागली. रात्रीचे अकरा वाजले. त्याला रहवेना. एकनाथ महाराजांच्या घरी जाण्यासाठी निघाला. दहा मिनिटात नाथमहाराजांच्या घरी तो पोहचला. महाराजांच्या चरणी लोटांगण घालीत रडू लागला. महाराजांनी त्याला धीर देत उठविले व म्हणाले बघ बाराचा ठोका झालेला नाही. तु लौकर आला आहेस, पण हरकत नाही. इथेच माझ्या घरी बारा वाजेपर्यंत रामनामाचा जप चालू ठेव. त्याने नाथांचे म्हणणे ऐकले. व तिथेच बसून रामनामाचा जप पुन्हा सुरू केला. नाथांच्या घरातील भिंतीवरील मोठ्या घडाळ्यात बाराचे ठोके वाजले. एकनाथ महाराज, त्याला म्हणाले, मित्रा, उठ. तुझे मरण टळले आहे." एकनाथ महारांजाची इतकी मोठी कृपा पाहून तो पुन्हा पुन्हा त्यांच्या पाया पडू लागला. नाथमहाराजांनी त्याला मिठीत घेऊन कुरवाळले आणि त्याला म्हणाले, मित्रा, मला ज्योतिष विषयातले काही कळत नाही. मी मुद्दामहून तुला खोटे भविष्य सांगितले." तरीही त्याला ते पटेना. तेव्हा नाथ महाराज म्हणाले, मित्रा, आम्हाला आमचे मरण कधी येणार हे कळत नाही, तर आम्ही दुसर्यांच्या मरणाचे भाकीत कसे सांगणार ? " त्यावर त्याने विचारले, महाराज , मग तुम्ही इतके संयमी आणि शालीनतेने कसे सर्वांशी वागता ? एकनाथ महाराज म्हणाले, " मित्रा, मृत्यु हेच जीवनातले अंतिम सत्य आहे, मानवाचा जन्म मिळणे ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. कधीतरी आपल्याला मरण येणार आहे, हे सतत ध्यानात ठेवावे, मग आपोआप आपण सर्वांशी प्रेमाने वागू लागतो." एकनाथ महाराजांचा उपदेश ऐकून त्या इसमाचे समाधान झाले. मग पुन्हा एकनाथ महाराजांचे चरण स्पर्श करून त्याने आपल्या घराची वाट धरली.
मृत्यु हे जीवनातलं अंतिम सत्य. कोणा माता-पित्याला आपला पुत्र वा कन्या गमाविण्याचा शोक वाट्याला येतो, तर कोणाला आपल्या कोवळ्या वयातच आईच्या मायेला व वडीलांच्या छत्राला मुकावे लागते. जीवन हे सुखःदुखाने भरलेले असते. त्यावर शोक करू नका असेच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. आपल्याला जी काही संकटे येतात ती आपल्या संचीत कर्माची फलं असतात. हाच नियम भंगवंतांनी गीतेत विस्ताराने समजावून दिले आहे. त्यामूळे ' जसे आपण जीवन जगाल तसाच मृत्यु आपल्या वाट्याला येत असतो ' ह्या विचारपाशी आपली बुद्धी थांबते. त्यातून आपण म्हणतो, ' मृत्यला ना क्रम असतो. ना कोणाच्या शोकाचं व भावनांचं सोयर-सुतक. मृत्युला ह्या भूतलावरील मानवाने बनविलेल्या नियमांचे बंधनही नसते. आपण कोठे, केव्हा, कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते. आपण केव्हा, कोठे आणि कसे मृत्युच्या विळख्यात सापडणार हे ही सांगता येत नाही.' ह्या संबंधी पुराणात एक कथा आहे, ती अशी आहे,
महर्षी व्यासांच्या एका सर्वोत्तम व आवडत्या शिष्याचे मरण जवळ आले होते. व्यासमुनींना त्या शिष्याचे मरण पुढे ढकलावयाचे होते. म्हणून ते आपल्या शिष्याला घेऊन ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाने म्हटले, " माझं कार्य जन्म देणे आहे. तुम्ही ह्यासाठी महादेवाकडे जा." मग ते महादेवाकडे जातात. त्यांनीही ह्याबात मी काही मदत करू शकणार नाही, तुम्ही नारारणा कडे जावे, असे सांगितले. व्यासमुनींचा पारा चढला. ते रागाने बेभान होतात आणि तसेच तडक भगवान विष्णूकडे जातात. वैकुंठाच्या पायर्या चढत असताना आठव्या पायरीवर व्यासांच्या त्या शिष्याला ठेच लागते आणि लागलीच त्याचा प्राण जातो. त्याचवेळी तिथे भगवान श्रीविष्णू अवतारतात. व्यासमुनींनी रागातच भगवान विष्णूला विचारतात "का माझ्या सर्वोत्तम शिष्याचे प्राण घेतले? " भगवान विष्णू व्यासमुनींना म्हणाले " मुनिवर्य तुम्ही राग आवरा." मग चित्रगुप्ताला बोलावितात. चित्रगुप्त मृत्युची नोंदवही घेऊन येतात. व्यासमूनींना त्यांच्या शिष्याच्या मृत्यूची नोंद दाखविली. त्यात व्यासमूनींच्या शिष्याचे नाव, त्याच्या मरणाची तारीख व वेळ तसेच मृत्युचे स्थान (वैंकुठाच्या आठव्या पायरीवर) दाखविले. ते तंतोतंत अचूक दिसले. व्यासमुनींचा राग आटला. भगवान विष्णू म्हणाले, " मुनिवर्य आम्ही देव जरी असलो तरी आम्ही काळ नावाच्या देवतेशी बांधील असतो." त्या देवतेचं आपल्या अध्यात्मात नाव आहे यमराज ,तोच काळ, तोच महाकाळ, तोच शिव. म्हणजे ब्रह्मा विष्णु महेश मधील 'महेश' म्हणजेच महादेव. जन्म देतो तो ब्रह्म, पालन करतो तो विष्णू आणि नाश करतो तो महेश. इंग्रजीत The God असे म्हटले जाते. G for Ganerator, O for Observance, and D for Destruction. आपली संस्कृती म्हणते, शेवटी जीव शिवाच्या भेटीला जातो. तेच ते अनंतात विलीन होणे होय.
इतकं सारं समजले तरी ' मृत्योर्मा अमृतं गमय ' चा अर्थ काय लावावा ? ' तमसो मा ज्योतिर्गमय ' ह्याचा अर्थ मनाला पटतो. अंधकार, अज्ञान दूर होवो व सर्वत्र प्रकाशाचे राज्य असावे. म्हणजेच ज्ञानाची कास धरणे. त्याला जीवनात पर्याय नसतो हे उघड आहे. तसेच तेज म्हणजे सूर्य, व सूर्य प्रकाशात जीवाचे रोपण होते व चंद्राच्या शीतल छायेत त्याचे पोषण होते हे सुद्धा आपल्याला उपनिषदकारांनी पटवून दिले आहे.'असतो मा सद्गमय ' ह्याचाही अर्थ मनाला पटतो. वाईट, खोटे सारे नष्ट होवो, व चांगले ते घ्यावे, व्हावे, टिकावे. आता आपल्या पुढे एक कार्य उरते ते म्हणजे ऋषीमुनींच्या वाणीतील ' मृत्योर्मा अमृतं गमय ' ह्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे. हे कार्य कसे पार पाडावयाचे? जगात व्यापलेल्या मृत्युच्या तांडवावर अमृत सिंचन करणे ही सोपी गोष्ट थोडीच आहे. मागे मी कोजागिरी पौर्णीमेवर एक लेख लिहीला आहे. त्यात कोजागिरी पौर्णीमेला जो जागरण करेल त्याच्या घरी लक्ष्मी येते अशी कल्पना का मांडली गेली असावी ह्यावर सविस्तर लिहीले आहे. तिथे मी म्हटले आहे की कोजागिरी पौर्णीमेला लक्ष्मी मिळेल इतकेच ऋषीमुनींने सागितले आहे. लक्ष्मी प्राप्त कशी करावी हे आपल्यावर सोपविले असावे असा तर्क काढून ' को जागर्ती ' (जागरण) ह्या शब्दाचा अर्थ माझ्या बुद्धीच्या कुवतीनूसार दिला आहे. आज इथे ' मृत्युर्मा अमृत गमय ' ह्या संबंधीचा अर्थ काढण्याचे कार्य ऋषीमूनींनी आपल्यावरच सोपविले असे मी गृहीत धरून माझ्या बुद्धीच्या कुवतीनुसार त्याचा अर्थ खाली देत आहे. अर्थात आपल्याशी ह्या चर्चेच्या माध्यमातून काढलेला हा अर्थ आहे, तो अंतिम नाही हे सांगावयाची गरज नाही.
" मृत्यूर्मा अमृत गमय ' म्हणजे संजिवनी विद्या प्राप्त करणे नव्हे. ते कार्य कलीयुगात कोणी करू शकेल असे संभवत नाही. माझ्या गावी नालासोपारा (प) येथे संजीवनी परिवार नावाची एक संस्था आहे . अनेक लोकोपयोगी व काळाला अनुसरून समाज प्रबोधनाचे काम करते. एका अर्थाने जागरणाचे काम करते. हीच ती संजीवनी विद्या असावी. राष्ट्रीय पातळीवर आपल्या संस्कृतीतल्या जीवनमूल्यांच्या आधारावर निरपेक्ष भावनेने देशात सामाजिक समरसता आणि देशभक्तीचा अविरतपणे मळा फुलविणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची सास्कृतिक संघटना जीवन कसे जगावे ह्या संबंधीचे एक मुर्तीमंत उदाहरण आहे. मृत्यु नंतरचे जीवन ह्यावर अनेक पुस्तके आहेत. तसेच गरूड पुराणासारखे धर्मग्रंथ ही आहेत. मरणात खरोखर जग जगते, जन पळभर म्हणतील हाय हाय, मृत्यु इत्यादी कविताही आहेत. तो एक स्वतंत्र विषय आहे. ' मृत्यु म्हणजे संपल की पुढे जीवन आहे? आणि असल्यास तो परलोकातील प्रवास आहे का? प्रवास असल्यास नरक-स्वर्ग असे टप्पे असतात का? त्यातून पुन्हा इहलोकात येणे असते का आणि असल्यास कुठल्या रूपात इत्यादी मुद्याच्या अनुषंगाने पुढे कधीतरी स्वतंत्र पणे चर्चा करता येईल.' मृत्यूर्मा अमृत गमय ' ह्याचा गर्भीत अर्थ समर्थ रामदास स्वामींच्या ' मरावे परि किर्ती रूपाने उरावे ' ह्या उपदेशाशी साधर्म्य दाखवित आहे, असे मला वाटते. किर्ती सहज मिळणारी वस्तू नाही. ती मिळविण्यासाठी चांगली लोकोपयोगी कामे करणे गरजेचे असते. परंतु किर्तीच्या पाठीमागे लागून लोकोपयोगी कामें करणे ही बाब जीवनमूल्य म्हणून समजले जात नाही. म्हणजे निरपेक्ष भावनेने सत्कार्य करीत राहून किर्ती रूपाने उरावे हाच उपदेश समर्थ रामदासांना अभिप्रेत आहे. त्यासाठी चांगल्या गुणाची जोपासना करणे ओघाने आलेच आणि हे तर पहील्या दोन पंक्तीत ऋषीमूनींनी दिलेले आहे. ज्ञानाची उपासना, व सदाचाराचा अंगिकार ह्या बाबी प्रत्येक जीवनमूल्यांच्या कसोटी आहेत. तेथूनच मानव देवत्वपदाच्या शिडीवर चढू लागतो. त्या शिडीवरून कुठपर्यंत चढल्यावर देवत्वपद प्राप्त होते ह्याचा निकष समाज ठरवित असतो. ज्याला आपण दैवी शक्ती वा दैवीसंपत् म्हणतो त्या एका परीने आपल्या संस्कृतीत वर्णिलेले अनेक जीवनमूल्यें होत. जीवनमुल्यें वा गुण त्यांचा ही एक धर्म असतो, म्हणून गुणधर्म हा शब्द भाषेत आला असावा. आपल्यात गुणांची जाणीवपुर्वक जोपासना करणे वा जीवनमुल्यांचा अंगिकार करून तेच आपल्या जीवनाचे ध्येय मानणे, ह्याचाच अर्थ सार्या जगावर अमृतसिंचन करणे होय. हेच ॠषीमुनींना सुचवयाचे आहे असे मला वाटते. ही जीवनमूल्यें म्हणजे एक प्रकारे आपली दैवते आहेत. ह्या गुणांची, ह्या दैवतांची ज्या महापुरूषांनी पूजा केली ती सारी मंडळी देवत्वपदास पोहचली. हा मानवाचा इतिहास व अनुभव आहे. त्यामूळे आपली दैवते जशी गहन तशी संख्येनेही अगणित आहेत. ह्याच आधारावर आपली ही लेख मालिका पुढे सरकत जाईल अशी आशा बाळगतो."
अत्यंत सुंदर
उत्तर द्याहटवा