गेले काही दिवस माढामधून शरद पवार लोकसभेची निवडणूक लढविणार अशी हवा निर्माण झाली होती. त्यावरही प्रिन्ट, ईलेक्ट्रानिक्स आणि सोशल मिडीयावर चर्चा रगंली. शेवटी शरद पवार निवडणूक लढविणार नाहीत हे जाहीर झाले. आता शरद पवार निवडणूक का लढविणार नाहीत ह्यावर चर्चा सुरू झाली आहे. "साहेबांनी निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे पण साहेब पुढची काय चाल खेळतील हे सांगता येणार नाही." असं शरद पवारांचे निष्ठावंत व त्यांचे निष्ठावंत पत्रकारांचे म्हणणे आहे. तर खुद्द शरद पवारांनी म्हटले, "एकाच परिवारातल्या तीन जणांनी आसपासच्या मतदार संघातून निवडणूक लढणविणे उचीत दिसत नाही, युवकांना संधी द्यावयास हवी." सोशल मिडीयावर भाजपा समर्थकांनी शरद पवारांनी निवडणूक रणगंणावरून पळ काढला आहे अशी टिप्पणी केली आहे. पण भाजपाची अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाही. कारण भाजपा अजूनही शरद पवारांनी २०१४च्या विधानसभा निवडणूकीनंतर देऊ केलेल्या पाठींब्याचा अशा रितीने उपयोग करीत आहे की जेणेकरून आपोआप शरद पवारांची विश्वासाहर्ता संपुष्टात येईल. मनसेने मौन धरले आहे. सेनेची काय प्रतिक्रीया आहे ह्यावर कोणी चर्चा करेल असे दिसत नाही. कारण पाच वर्षाची केंद्र आणि राज्यात सत्ता उपभोगून सतत भाजपावर टिका केली आणि आता पुन्हा भाजपाशी युती केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादींची निवडणूकी पूरता का होईना आघाडी झालेली दिसत असली तरी काँग्रेस सर्व मित्र पक्षांवर सर्वच प्रान्तात कूरघुडीचे तंत्र वापरीत आहे असे दिसते. विरोधी पक्षांची आघाडी व्हावी असे वरवरून काँग्रेस म्हणत असली तरी स्वतःची वाढ धोक्यात घालणार नाही. तेलगू दसमचे चंद्राबाबू नायडू व ममता बॅनर्जी ह्यांची साथ हवी पण ते डोईजड होऊ नयेत म्हणून त्यांना इतर राज्यात काँग्रेस अधिकच्या जागा देणार नाही झालेच तर स्वतःसाठी जास्त जागा बंगाल व आंध्रात काँग्रेसला हव्या आहेत. हाच डाव ओळखुन उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला सपा बसपाने आरसा दाखवला आहे व आपापसात जागावाटपही करून घेतले आहे. आता काँग्रेस तेथे दलीत व मुस्लीमांकडे आपला मोर्चा वळविताना दिसेल. शरद पवारांना वेळोवेळी काँग्रेसने चीतपट केलेले आपण अनुभविले आहे. ह्याचे कारणच मुळी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद सरकार स्थापन करण्याचे कृत्य त्यावेळेच्या काँग्रेसजनांना आवडले नव्हते. त्यातच जे मंत्रीपद देऊ ते शरद पवार घेतात ह्याचा अनुभव युपीएच्या काळात काँग्रेसकडे आहेच. एकंदरीत शरद पवारांची पंतप्रधानपदांची दावेदारी संपलेली दिसत आहे. अशी अवस्था शरद पवांराची का झाली, ह्यावर विचार करता कुठे शरद पवार कमी पडले आहेत हे पाहण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस मध्ये फूट पाडून पुलोद सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळविले तेव्हापासूनचा त्यांचा राजकीय प्रवास कसा राहीला हे पहावे लागते. शरद पवारांच्या १९७८ पासूनच्या राजकीय चाली पाहावयाचे झाल्यास ह्या लेखाचा विस्तार वाढेल म्हणून थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो.
पूलोद सरकार स्थापन केले तेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण तेव्हाही ते काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडू शकले नाहीत. स्वतःच्या आमदारांची संख्या कमी असून पवार मुख्यमंत्रीपदी बसले हे त्यावेळच्या जनता पार्टीच्या सहकार्यामूळे. विरोधी पक्षांचे सहकार्य घेऊन आपण सर्वसमावेशक आहोत अशी प्रतिमा उभी करण्याच्या नादात राजकरणातल्या मोठ्या चूका हातून घडल्या आहेत, हे त्यांच्या लक्षात आले नाही. ह्याचे कारण शरद पवार हे जातीय समीकरण मांडण्याचे राजकारण करीत राहीले असा सर्वसामान्यात समज पसरलेला होता. दुसरे असे की कुठल्याही पक्षांचा नेता आपल्या पक्षात बंड करतो, तो नेता भारतीय समाजाला फारसा आवडत नाही. त्यामुळे मिडीयांनी (पैशाच्या अमीषांनी) अशा नेत्याची लोकप्रियता वाढविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या नेत्यांचा राजकीय अवकाश सिमीत होतो. नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे, छगन भूजबळ, ह्यांची अवस्था शरद पवारांसारखीच झाली आहे हे आपण पाहात आहोत. शरद पवारांच्या पुढे बाबू जगजीननराम आणि बहूगुणांचे उदाहरण होतेच. शरद पवारानी बंड केले तेव्हा काँग्रेस आजच्या काळाइतकी दुर्बल झाली नव्हती. इंदिरा गांधी पराभूत झालेल्या होत्या पण त्या हयात होत्या. तदनंतर शरद पवारांनी राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला. असे असले तरी महाराष्ट्रीतील काँग्रेसचे नेते सतत शरद पवाराविरूद्ध दिल्लीत हायकमांडाचे कान भरवित होतेच. तीच चाल महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी नरसिंहराव पंतप्रधान असताना सुरूच ठेवली होती.
श्री शरद पवारांनी आणखिन एक मोठी चूक केली ती पंतप्रधानपदी श्री नरसिंहराव असतेवेळी. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी शरद पवारांकडे महत्वाचे संरक्षण खाते सोपविले होते. दिल्लीत कसा जम बसवावयाचा हे शिकण्यासाठी शरद पवारांना चांगली संधी होती. नरसिंहरावांना शह देण्याच्या नादात " पंतप्रधानाची व राष्ट्राध्यक्षाची ताकद काय असते हे विरोधी पक्षांच्या नेत्यांऐवजी स्वपक्षातील नेत्यांना अधिक जाणवते " हे जगभरातील राजकारणाचे सुत्र पवारांनी लक्षात ठेवले नाही. त्यामुळे त्यांच्या हातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री सुधाकर राव नाईक जे एव्हांना नरसिंहरावांच्या गटात सामील झाले होते, त्यांचे आसन डळमळीत करण्याचे डावपेच खेळले गेले. तेच डावपेच शरद पवारांच्या अंगाशी आले. पंतप्रधान नरसिंह राव हे उच्च विद्याभूषित तसेच इंदिरा गांधीचे सल्लागार होते. शरद पवारांकडे असलेल्या दांडग्या धनशक्तीच्या पाठीमागच्या रहस्याची माहीती नरसिंहरावांनी घेतली. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारासंबंधी बातम्या चर्चेला येऊ लागल्या आणि त्या चर्चेचा केंद्रबिंदू शरद पवारांकडे वळाला. बिल्डरांची व गुंडाच्या लाॅबीवर मेहरबानी शरद पवारांच्या सल्ल्याने होत आहे असे सर्वत्र ऐकू येऊ लागले. सुशिक्षीत वर्ग शरद पवारांपासून दूर गेला. महाराष्ट्रातील विभागीय विकासात असमतोल व असंतोष तसेच ब्राह्मण वर्गाच्या उपेक्षेला शरद पवारांची नीती कारणीभूत झाली असेही चर्चेला येऊ लागले. शरद पवार आणि सुधाकर राव नाईक ह्यांच्या भाडंणाचा फायदा नरसिंह रावांनी घेतला. मुबंईतील डी गँगने घडविलेल्या बाॅम्ब स्फोटातून नरसिंहरावांनी सुधाकररावांची उचलबंगडी केली पण शरद पवारांच्या निष्ठावंताला मुख्यमंत्री न बसविता शरद पवारानांच महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठविले. असे ऐकू येत होते की इंदिराजींचे निष्ठावान तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्रीपदी पाठवू असा गर्भित इशारा पंतप्रधान नरसिंहरावांनी दिला होता. म्हणून शरद पवारांना नाईलाजाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद स्विकारावे लागले. ह्यातही गोम अशी होती की मुख्यमंत्रीपदी शंकरराव चव्हाण आले असते तर शरद पवारांची राजकीय कारकिर्द संपली असती इतके हाडवैर ह्या दोन्ही मराठी नेत्यांमध्ये होते. आज विखेपाटील ह्यांचा नातू भाजपात प्रवेश करता झाला ह्याचे कारण पवारांनी पद्मश्री विखे पाटीलांचेही पंख कापण्याचे कारस्थानं केली आहेत. ह्या सार्या बाबी नरसिंहरावांना ठाऊक होत्या. तेथूनच शरद पवारांचा राजकीय प्रवास पश्चीम महाराष्ट्रापुरता सिमीत झालेला दिसतो. श्री नरसिंहराव पंतप्रधान असतेवेळी शरद पवारांनी आणखिन एक चूक केली ती म्हणजे काही गरज नसताना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली. नरसिंहरावांशी निष्ठा ठेवली असती तर शरद पवारांना पंतप्रधान बनण्याची संधी होती. शरद पवारांनी ती संधी गमाविली पण सोबत काँग्रेसचे सर्वसमावेशक व सामूदायिक नेतृत्वाचे मूळ स्वरूप परत येण्याची शक्यता कायम दुरावली. त्यामूळे काँग्रेसमध्ये गांधी घराण्याची हुकूमशाही जीवंत राहीली. सोनिया गांधीच्या काळात शरद पवारांच्या बंडखोरीला अर्थच राहीला नव्हता. महाराष्ट्रातील आपला जम आहे तो टिकून राहावा हीच काय ती शरद पवारांची धडपड राहीली होती.
आता काळ बदलला आहे. भाजपा विरूद्ध लोकांची नाराजी असली तरी घराणेशाहीच्या तत्वावर एखाद वेळी एखाद्या जिल्ह्याची सत्ता मिळेल पण राज्य व केंद्राची सत्ता मिळणे अशक्य होत आहे. दहा वर्षे मनमोहनसिंग पंतप्रधानपदी बसले पण गांधी परिवार पंतप्रधानपद घेऊ शकले नाही ह्या पाठीमागे सोनीया गांधींचा त्याग नसून त्यांच्या विदेशी होण्याचे कारण नसेल असे ठामपणे कोणी सांगू शकत नाही. त्यातही राष्ट्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून असंवैधानिक मार्गाने पंतप्रधान कार्यालयावर चाप कसा लावला होता हेही जनतेने पाहिले आहे.
आजच्या विरोधी पक्षांच्या दोन प्राथमिक गरजा आहेत. एक भाजपाचा पराभव करणे व दुसरी स्वतःचे अस्तित्व टिकविणे. ह्या दोन्ही गोष्टी परस्परांना छेद देत आहेत. त्यामूळे शरद पवार पंतप्रधानपदी बसणे तर सोडाच पण केंद्रात भाजपाचीच सत्ता राहण्याची चिन्हे दिसत आहेत. जिथे भाजपाचे अस्तित्व नगण्य आहे, अशा राज्यातही भाजपा चमकदार व अद्भूत कामगिरी करेल असे काही राजकीय जाणकारांचे मत आहे. घोडा मैदान जवळच आहे.
म्हात्रेजी, झकास.परखड, वस्तुनिष्ठ विवेचन.धन्यवाद.
उत्तर द्याहटवा