मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

कोजागिरी पौर्णिमा



परवा एका मित्राचा फोन आला व म्हणाला, आमच्या मंडळाच्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला येशील का आणि येऊन कार्यक्रमाच्या प्रारंभी कोजागिरी पौर्णिमेवर पंधरा-वीस मिनिटे भाषण करशील का? मी म्हणालो, येईन'.फोन ठेवला. मी होकार दिला खरा पण माझी चल-बिचल झाली. आपण म्हणाल, " त्यात काय आहे? भाषण करून परत या. मध्यरात्रीपर्यंत थोडेच थांबायचे? गुरू पौर्णिमेला जातो तसे जाऊन यायचे परत." प्रश्न मध्यरात्रीपर्यंत थांबण्याचा नाही. अलिकडे आषाढी अमावास्याला एक्सर गावदेवी मंदिरात दीपोत्सव साजरा झाला होता. तिथे मी प्रमुख वक्ता होतो. मंदिरात सर्वत्र पेटत्या दिव्यांची आकर्षक रोषणाई पाहून मी भाषणाचा प्रारंभच " कोण म्हणतेय आमावास्या अशूभ असते.हा दिव्यांचा लखलखाट पाहून मन प्रसन्न झाले आहे" ह्या वाक्याने केला. पुढे मी म्हटले " अमावास्येला दिवे लावले की भूत-पिच्चाश वैगरे पळून जातात. दिवे लावले कि अमावास्या शुभ झालीच म्हणून समजा. दिपोत्सव म्हणजे भक्तीयोग, ज्ञानयोग, आणि कर्मयोगाच्या संगमाचं विलोभनीय दर्शन होय.' दिवा म्हणजे तीन पंचमहाभूतांचा संगम. दिव्यात तेल असते. ते मिळते जमीनीतून. म्हणजे पृथ्वी. हे एक पंचमहाभूत.  दिव्याला नमस्कार करताना 'दीपज्योती नमोस्तुते' असे आपण म्हणतो. ज्योत हे तेजाचे प्रतिक आहे.   दिवा लावण्यासाठी अग्नी लागतो. ते ही तेज नावाचेच पंचमहाभूत. दिवा तेवत राहण्यासाठी तेल हवे असतेच. पण हवाही आवश्यक असते. म्हणजे वायू हे पंचमहभूतही दिव्यात समावलेले असते. दिवा तेवत राहणे हे दिव्याचे वैशिष्य. म्हणजे ज्ञानाची कास धरणे. म्हणजे ज्ञानयोगी बनणे. त्यासाठी तेलाची आवश्यकता असते. भक्ती विना ज्ञान अधुरे. तेल म्हणजे भक्तीयोगाचे प्रतिक. सारं काही आहे पण कर्म नाही केले तर कुठला भक्तीयोग आणि कुठला ज्ञानयोग? म्हणून वात आवश्यक. वात हे कर्म योगाचे प्रतिक.." दिव्याचे मला जसे आकलन झाले होते त्यानुसार मी गावदेवी मंदिरात झालेल्या दोपोत्सव समारंभात भाषण केले. ते भाषणच माझ्या मनचक्षूसमोर उभे राहीले. आणि आता तर पौर्णिमेच्या महत्तीसंबंधी बोलायचे आहे. सामान्यतः आपण अमावास्या आपण अशुभ मानतो पण पौर्णिमेला शुभ मानतो. त्यातही ही कोजागिरी पौर्णिमा. तिची महत्तीवर बोलायचे पंधरा-वीस मिनिटात बोलणे थोडेसे अवघडच म्हणायचे.

लागलीच दुसर्या क्षणाला मनात आले की आपण दिवा कशासाठी लावतो? उत्तर सोपे आहे. ' दिवा मांगल्याचे प्रतिक आहे, म्हणून आपण दिवा लावतो.परंतु हे उत्तर अपुर्ण वाटले. मग सुचले अंधार असतो म्हणून दिवा लावतो. आमावास्याला अंधार दाट असतो. ह्याचा अर्थ हाच की दाट काळोखी रात्र असल्याशिवाय ना दिव्याचे महत्त्व जाणता येते, ना पौर्णिमेचं महत्त्व कळणार. एका लेखकाचे बोल आठवले." अहो, जीवनात दुःख , संकटे आहेत म्हणून तर सुखाची मधुर चव चाखता येते.संकटे येतात,ती आपली परीक्षा पाहण्यासाठीच. जगात काळोखी रात्र आहे म्हणून चंद्राला महत्त्व आहे." मुलतः मनुष्याचे स्थानच ह्या विश्वाच्या विराट पसार्यात अगदीच नगण्य आहे. माणूस रड घेऊन जन्माला येतो आणि रडं ठेवूनच जातो. जीवनात अपरिहार्य असलेली दुःखे सहन करून नवनवीन स्वप्न पाहणं, ती फुलविणं, सत्याची पुर्तता करण्याचा आटोकाट प्रयत्न करणं आणि त्या धडपडीतला आनंद चाखणं ह्यातच जीवनाचं सार आहे. जीवनाचे हे सार प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी सर्वात उत्तम मुहूर्त म्हणजे कोजागिरी पौर्णिमा.  

दिवस-रात्र हा निसर्गाचा नियम. चंद्राच्या कला वाढत जातात, आणि कमी होत जातात. अमावास्याला समुद्राला मोठी भरती येते. जर आकाशातील चंद्राच्या भ्रमणामुळे समुद्राला भरती येत असेल, तर चंद्राच्या भ्रमणाचा आपल्या मनावर परीणाम होत नसतो असे कसे मानता येईल? ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक म्हणतात त्यात सत्य असावे. चंद्र फुलत गेला की आपले मनही फुलत जात असावे. जगभरातल्या सर्व कवी-कवीयत्रींना पौर्णिमेच्या चंद्राच्या सौंदर्याने भुरळ घातली आहे. प्रश्नोपनिषद मध्ये प्रजेची उत्पत्तीचे वर्णन आहे. वनस्पतीरूपी अन्नाच्या मंथनातून जीवबीज तयार होते. सूर्य हा जीवतत्त्वाचा वर्धक असल्याने त्याच्या प्रकाशात जीवतत्त्वाचें संवर्धन, जीवबीजाचा संग्रह होत असतो आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात त्याचे रोपण केले जात असते. म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी कुठला तरी सण व देवादिकांच्या, महानुभवाच्या जंयत्या आल्या असाव्यात. त्यातुन पौर्णिमेच्या उत्सवाला महत्त्व आले असावे. त्यात आजची ही कोजागिरी पौर्णिमा. आपल्या शास्त्रात ह्या पौर्णिमेला अनन्यो महत्त्व आहे. वर्षा ऋतु संपल्यानंतर ही आश्विन महीन्याची पौर्णिमा येते. वर्षा ऋतुत चंद्राचे फारसे दर्शन होत नाही. आपण चंद्राचे दर्शन घेण्यात उत्सूक असतो. घरात नवीन पीक आलेले असते. त्या नवान्नाचे प्राशन ह्या दिवशी केले जाते. रात्री चंद्राच्या किरणात दुध ठेवले जाते व नंतर ते आपण प्राशन करीत असतो. चंद्राच्या शितल किरणात आयुर्वेदीक शक्ती असते. नव्या कल्पना, नवे संकल्प करण्यास ह्या पौर्णिमेसारखा चांगला मुहूर्त नाही. तसे पाहता आपल्या ऋषीमुनींनी आपल्या सणांची योजना अशा रितीने केली आहे की, प्रत्येक सण हे ऋतुमानानुसार आहार-विहार करावा असेच शिकवितात. आहार-विहारावर आपले विचार, कर्म अवलंबून असते. कोजागिरी पौर्णिमेला मौज-मस्ती खाणे-पिणे, गाणे इत्यादी गोष्टी असतातच, पण त्याच बरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी जागरण करा असा सल्ला दिला आहे. मनुष्याला ऐश्वर्य आणि वैभवाची ओढ असते ह्या सहजवृत्तीची ऋषीमुनींना जाणीव होती. आज आपण कलीयुगात राहात असताना आपली वरील सहजवृत्ती कायम आहे. उलट वाढलीच आहे. ऋषीमुनींनी आपल्या सहजवृत्तीची जाण ठेवली, पण ' को जागर्ती? ' हा प्रश्न ठेवून. बघु या त्याचा अर्थ.

ह्या पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी माता 'कोण जागत आहे ? '( को जागर्ती?) असे विचारीत संचार करीत असते आणि सांगत असते कि, तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महतले | म्हणजे जो जागत आहे त्याला मी धन देईन. आपल्या शास्त्रात ऐहीक उन्नतीला त्याज्य मानले नाही. उलट लक्ष्मी स्त्रोतात अगस्ती ऋषी म्हणतात,
        " पांडीत्यम् शोभते नैव न शोभन्ते गुणा नरः |
          शीलत्वम् नैव शोभन्ते महालक्ष्मी त्वया विना ||
(धनसंपत्ती शिवाय ना विद्वत्ताला शोभा येते ना गुण शोभून उठतात. शीलाची शोभाही धनानेच वाढते.) 

अर्थात धन चांगल्या मार्गाने कमाविणे हे ही शास्त्रात सांगितले आहे. पण धन कमाविण्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यासाठी आपले शरीर सक्षम असावे लागते. म्हणजेच आपल्यात विराजमान असलेल्या शक्तीची देवता असलेल्या दुर्गामातेची उपासना आवश्यक आहे. शक्तीची देवता म्हणजे मजबूत एकता. आपल्या शरीरातील सर्व अवयवामध्ये परस्पर ताळमेळ ठेवला की शरीर सक्षम बनते. म्हणजे आपले कर्म आपण चांगल्या रितीने पार पाडू शकतो. एकदा कर्म उत्तम रित्या पार पाडले की कर्माचे फल चांगले मुबलक मिळते. आजच्या युगात कर्मफल म्हणजे पैसा वा धन हेच होय. जो नियम व्यक्तीला तोच नियम समाज आणि राष्ट्राला लागू होतो. को जागर्ती ह्याचा अर्थ कोण जागे आहे.म्हणजे समाजाची एकता आणि राष्ट्राची अखंडतेसाठी कोण खर्या अर्थाने जागे आहे तिथे लक्ष्मी येणार. राष्ट्राच्या जीवनात स्वतंत्रता देवतेचे नाव दुर्गामाता आहे. जर देश पारतंत्र्यात गेला की आपल्या सर्वांची प्रिय लक्ष्मी माता गायब होणार हे आपण अनुभविले आहे. एकदा का आपल्या शरीरातील, समाजातील, देशातील दुर्गामाता गेली की पाठोपाठ लक्ष्मी माता ही तिच्यासोबत निघून जातेच. शेवटी लक्ष्मीमाता ही दुर्गा मातेचेच रूप आहे की. तसेच लक्ष्मीचे वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, सौंदर्यलक्ष्मी, भावलक्ष्मी इत्यादी रूपांचे वर्णन आहे. ह्या सार्या देवता स्थायी स्वरूपात ठेवण्याची जाणिव रहावी म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाची योजना आपल्या ऋषीमुनींनी कलेली दिसते. आपल्या पुराणात वलीत नावाच्या विद्वान ब्राह्मणाची कथा आहे. परंतु अयाचक वृत्तीमुळे तो निर्धन होता. आणि  त्याची पत्नी त्याला दुषणे कशी देत असते, इत्यादीसंबंधीचे वर्णन आहे. तात्पर्य हेच की लक्ष्मीचा अभाव असणे ह्यात पुरूषार्थ नसतो. धनवान, ज्ञानवान, गुणवान, होण्यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे असते. जागरण ह्याचा अर्थ जीवनातील प्राणशक्ती, ज्ञानशक्ती, बलशक्तीचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे हेच होय. खगोलशास्त्रात म्हटले आहे की ह्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या फार जवळ आलेला असतो. म्हणून इतर पौर्णिमे पेक्षा ह्या पौर्णिमेला चंद्र अधिक मोठा दिसतो. त्यामूळेही कदाचित इतर पौर्णिमेपेक्षा ह्या पौर्णिमेचा उत्सव व्यापक रित्या साजरा होताना दिसत असतो. 

ह्या पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजाला भवानी मातेने दृष्टांत दिला होता असे इतिहासात म्हटले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अष्टपैलु व्यक्तीमत्व. सार्या गुणांची खाण म्हणजे शिवाजी महाराज. त्यांच्यातल्या गुणांचे संवर्धन अधिक झाले ह्याचे कारण त्यांनी स्वराज्याचा ध्यास घेतला होता. आपल्या धर्मसंस्कृक्तीचे रक्षण करणे, आपल्या समाजाच्या हातांना असलेल्या परकियांच्या शृखंला काढण्याच्या ध्येयाने ते सतत जागृत होते. कुठल्याही ध्येयाचे स्मरण ठेवुन त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच जागरण होय. संपूर्ण वर्ष चांगल्या कार्यासाठी सतत झटण्यासाठी एक वृत्ती बणावली की आपोआप कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मनाला एक अभूतपुर्व समाधान लाभते. म्हणजेच लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो. स्वामी विवेकानंदाच्या आयुष्यातला एक प्रसंग वाचलेला आठवतोय. ते अमेरिकेत व्याख्यान देण्यासाठी अमेरिकेत गेले होते तेव्हाची ही गोष्ट. दिवसभर व्याख्यानं आणि भेटायला येणार्या उत्सुक श्रोत्यांची इतकी गर्दी असे की त्यांना क्षणभरही उसंत मिळत नसे. रात्री अंथरूणावर पडल्यावर मात्र त्यांना उद्याच्या व्याख्यानात काय बोलायचे हे ओठावर येत असे. विशेष म्हणजे याला त्यांनी चमत्कार मानलं नाही. या घटनेचं विश्लेषण करताना ते म्हणाले, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की मनाला काही जाणवत जातं आणि मग आपलं मनच आपलं गुरू होऊन जातं. कुठल्या तरी ध्यासाने पछाडलेले असले की आपोआप मार्ग दिसतो. आपल्या धर्माचा प्रसार करण्याचे ध्येय, आपल्या समाजातील ग्लानी जावी ही तळमळ म्हणजे जागे राहणे. को जागर्ती ह्या प्रश्नाचे खरे उत्तर शोधावयाचे असेल, तर ते आपल्या संत-महंत आणि थोर पुरूषांच्या चरीत्रात मिळते.

कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो म्हणून स्वाभाविकतः चंद्राची सुदंरता व शितलता ह्यांचा समन्वय अधिक असतो. आपले  रामकृष्णादि अवतार पाहात्यांच्या सौदर्याचे, शितलतेचे वर्णन शब्दात  करता येत नाही. म्हणुनच त्यांना रामचंद्र आणि कृष्णचंद्र अशी नावे पडली आहेत.

चंद्राचा प्रकाश केवळ शीतल व शान्त आहे एवढेच नाहीतर तो प्रकाश वर्षा ऋतुत रूजलेल्या वनस्पती, अनेक औषधीच्या गुणांना, शेतात उगवलेल्या धान्याला पुष्ट करीत असतो. म्हणूनच ह्या पौर्णिमेचे महत्त्व अधिक मानले गेले आहे. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव आनंदाचा उत्सव ! म्हणूनच भगवंताने  विभूती योगात म्हटले आहे
                  नक्षत्राणाम् अहं शशी
पुढे भगवंत म्हणतात
        पुष्णामि च् औषधीः सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः |
(अर्थ रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करीत असतो) 
रामकृष्णादि वा संत-महंता सारखे आपण सार्या विश्वाच्या कल्याणाची चिंता वाहवू शकत नसलो तरी आपल्या मनात चागल्या विचारांचे, सद्गुणांचे संवर्धन करण्यासाठी जागरण करणे हेच कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यापाठीमागचे कारण आहे.

आज आपल्या समाजाला कुप्रथेने विळखा घातलेला आहे. भ्रष्टाचार, वैचारिक दिवाळखोरीने समाजाला ग्रासले आहे. माता-भगिनींवर अत्याचार होत आहेत. समाजात जाती-भेदाचे प्रमाण वाढत आहे. समाजातील व्यसनाधिनता, आळस, द्वेष, असुया, नैराश्य, इत्यादी दुर्गूणांचा नायनाट करून प्रेम, शांती, एकतासुबत्ता, शौर्य इत्यादी गुणांचे संवर्धन करण्याचा दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होय. 

गुरूदेव रविन्द्रनाथ टागोरांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. एकदा होडीत बसून ते यमुना नदी पार करीत होते. ती रात्रीची वेळ होती. मेणबत्तीच्या प्रकाशात, टागोर एक कविता करण्याच्या प्रयत्नात होते. परंतु काही केल्या त्यांची ती कविता साकार होईना. शेवटी त्यानी नाद सोडला आणि मेणबत्ती विझविली. मेणबत्ती विझविता क्षणीच शीतल चंद्र प्रकाशाने त्यांची होडी उजाळली आणि फार सुरेख दिसू लागली ! टागोरांना एका महान सौंदर्याची अनुभूती तेथे आली. तत्क्षणी, काव्य त्यांच्या हृदयातून ओसंडू लागले अगदी  विनासायास. तो दिवस कौजागिरी पौर्णिमेचा असावा.

संत कबीर म्हणतात, परमेश्वराचा शोध घेण्यासाठी मी मंदिरे, तलाव, मनोरे, पर्वत सारं काही पालथी घातली. शेवटी थकून भागून मी स्वतःस समजाविले, ' परमेश्वर भेटला नाही म्हणून काय झाले? शेवटी परमेश्वराची माझ्यावर अखंड कृपा आहे असे मानण्यास सुरूवात केली. आपसुकच प्रेम, शांती आणि आनंदाने तृप्त असे दैवी जीवन मी जगू राहिलो. दैवी शक्तीचा अंश माझ्यात आहे असा साक्षात्कार आला. अचानक चमत्कार घडला, आणि हे कबीर ! तू कुठे आहेस? मी तुलाच शोधत आहे, अशी परमेश्वर मला हाका मारीत असल्याचे ऐकू आले. कबीर म्हणतात, मी परमेश्वराला म्हणालो, हे भगवंता, आयुष्यभर मी तुला शोधत राहिलो, परंतु आता मात्र तू मला शोधत आहेस. माझ्या अंतरंगातील परमेश्वराला मी पाहिले आहे . म्हणून आता तुझ्याशी मला काहीच कर्तव्य नाही.

कबीर असो किंवा इतर संतमडळी असो, स्वामी विवेकानंद असो वा त्यांचे गुरू रामकृष्ण, अध्यात्मिक गुरू असो वा वैज्ञानिक असोसाहित्यकार असो वा संगीतकार, शिवाजी महाराज असो वा लोकमान्य टिळक ही सारी मंडळी निद्रेत सुद्धा जागेच असावेत. ध्येयाने प्रेरीत झालेली ही मंडळी.  आपण निदान कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी का असेना, चांगल्या विचाराची देवाण-घेवाण करू या. आजच्या रात्री एकत्र कुठल्यातरी सामाजिक समस्येवर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू या. देव फुलापासून फक्त सुगंध मागतो. वृक्षाला देव म्हणतो, तु फळाने बहरत राहा. कोकीळेला सांगत तु तुझे कुंजन सुरू ठेव पण मानवाकडून देवाच्या अपेक्षा मोठ्या आहेत. देव मानवाला सांगत आहे,  "मी तुला अंधार दिला आहे. तु प्रकाश निर्माण कर.(तमसो मा ज्योतिर्मय|) जिथे घाण आहे, तिथे स्वच्छता निर्माण कर.(असत मा सद्दगमय) मृत्युवर विजय मिळव. म्हणजे तुला दोन दिले आहेत कर त्याच्या साह्याने असे काही कर कि तु किर्तीरूपाने अमर होशील. तुला मन आणि बुद्धी दिली आहे. त्याचा उपयोग कर.( मृत्युर्मा अमृत गमय |)" मित्रहो, मानव ही ईश्वराची सर्वोत्तम निर्मिती आहे. ह्यात आपल्याला काही संदेह आहे का? नाही ना ! मग आपण संकल्प करू या की निदान मी सर्वांशी प्रेमाने  बोलेन. त्यामुळे माझ्या मनातील अंधकार नाहीसा होऊन एका पणती एवढा प्रकाश निर्माण करीन !      

आपल्या सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

४ टिप्पण्या:

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...