मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

आपण व आपली दैवते-(ईश्यावास्यम इदम् सर्वम्)


आपण व आपली दैवते ह्या विषयावर लेखमालिका सुरू केली त्यावेळी सुरवातीलाच मी कबुल केले आहे की हा विषय जसा अनादि तसाच अनंत आहे. पण अनंत म्हणजे तरी किती ह्या प्रश्नानेही मला सताविले. शेवटी अध्यात्म क्षेत्रातील महामेरूंनी 'ईश्यावास्यम् इदम् सर्वम्' ह्या प्रार्थनेचा जो अर्थ स्पष्ट केला आहे तो वाचला. पण केवळ वाचनाने तो  पुर्णपणे कळणार तरी कसा? कारण वाचन तरी किती? महासागराच्या पाण्यातील ओंजळीभर पाण्याहून ही कमी. कारण आपल्या ओंजळीतील पाणीही गळत असतेच ना.  अध्यात्म क्षेत्रातील ऋषीमुनींनी जे काही म्हटले आहे आणि त्यावर काही विचारवंतानी जे काही मांडले आहे त्या सर्वाचे सार इथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. ह्यात माझा वाटा शुन्यच.

आपली उपनिषदे म्हणतात 'हे विश्व ईश्वराने व्यापले आहे.' आज आपण सातासमुद्रापलीकडे जे काही घडते ते सारे टिव्ही चॅनेलवरून पाहतो. तिथे राहात असणार्या आपल्या नातलगाला पाहतो, त्याच्याशी बोलतो. हे सारे विज्ञान युगाचे चमत्कारच. शास्त्रज्ञांच्या कौतूकासाठी शब्द अपूरेच. तरीही हे शेवटी शोधच. संपूर्ण नवनिर्मीती तर निश्चीत नाही. कारण ह्या शोधात जी शक्ती, जी उर्जा, जे पदार्थ कामी येतात ते ह्या विश्वातीलच. ती शक्ती किंवा matter ईश्वरी स्वरूपाचेच एक दर्शन होय. आप, तेज, वायू, आकाश, आणि पृथ्वी ह्या पंचमहाभूतांच्या अनुभूतीतही तो देव आहे. तसाच तो शब्द, रस, स्पर्श, रूप, गंध ह्यामध्येही आहे. मानवाची बुध्दी कितीही प्रगल्भ असली तरी तिला मर्यादा आहेतच. ज्या,ज्या वेळी थोर शास्त्रज्ञांनी ह्या विश्वातील अनाकलनीय रहस्ये उलगडली, त्या त्या वेळेस त्यांनी भावपूर्ण उद्गार काढून ह्या विश्वाच्या रचनाकाराचे आभार मानले आहेत. म्हणून काही तत्ववेत्त्यानी म्हटले कि 'ज्ञान आणि विज्ञानाच्या परिसीमा ओलांडून जो दशांगुळे उरतो, तो देव'.

        वेदानांही नाही कळला अंतपार ज्याचा!
        कानडा राजा पंढरीचा!!
अंतपार नाही म्हणजे अनंत. अनंत हे ही देवाचे नाव. तो अनंत आहे . हेच परम सत्य. त्यातूनच ईश्वर वा देव म्हणजे सत्य. ही एक देवाची आणखीन व्याख्या झाली. मानव विज्ञानाच्या साह्याने ह्या विश्वाची गुढे उलगडीत  आहे. हे कार्य अविरतपणे करणार आणि त्याने करीतही राहिले पाहीजे. त्यातून काही गुढे गवसत जातील तसेच काही गुढे निर्माणही होत जातील. विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईन म्हणतात ह्या विश्वात सर्वात मोठे गुढ कोणते, तर हे विश्वच होय. त्यामूळे विज्ञानाचा प्रवासही अनंत आहे. देव म्हणजे अनंत. त्या अर्थी विज्ञान म्हणजे संशोधन म्हणजेच तपस्या. त्यामुळे वैज्ञानिक म्हणजे आधूनिक ॠषी मंडळी. हेही पटते. विज्ञानाद्वारेही जे काही शोधले जात आहे, ते सत्याशिवाय दूसरे-तिसरे काही नाही. छांदोग्य उपनिषद मध्ये सत्याची छान व्याख्या दिली आहे. सत्य हा शब्द स ति आणि य ह्या तीन मात्राने बनलेला आहे. स म्हणजे अविनाशी म्हणजे ईश्वर म्हणजे कारण. ति म्हणजे नाशिवंत म्हणजे सृष्टी म्हणजे कार्य. आणि य म्हणजे ह्यांचा योग म्हणजे जुळणी य ने झाली आणि सत्य झाले. कुठल्याही प्रसंगी कारण आणि कार्य ह्यामधील संबंधांचा यथार्थ जाणणे म्हणजे सत्य.  विज्ञानाची व्याख्या ह्याहून भिन्न नाही. म्हणजे विज्ञाननिष्ठ असणे हे काही नास्तिकाचं लक्षण नव्हे. कारण देव ह्या शब्दाचा अर्थच मुळी तेज असा आहे. आणि तेजोगोलापासून हे विश्व निर्माण झाले आहे असेच विज्ञान म्हणते. विज्ञानाचा भर असतो सत्य शोधण्यावर असतो, आणि जे वैज्ञानिक पातळीवर सिद्ध होते ते सत्य. सत्याचा महिमा गाताना आर्य चाणक्य सांगतात,

       " सत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तापते रवि |
        सत्येन वायवो वान्ती सर्व सत्ये प्रतिष्ठितम् ||"

"ह्या पृथ्वीचा आधार जर काही असेल तर तो सत्य हाच आहे. सत्यामुळेच सुर्य तेजस्वी झाला. सत्यामुळेच वारा वाहू शकतो. या जगात जे जे काही आहे ते ते सगळे सत्यावर अधिष्ठित आहे."

वरील व्याखेवरून असेच म्हणावेसे वाटते की सत्य शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विज्ञान.  म्हणजे सत्याची उपासना. विज्ञानामूळे मानवी जीवन सुकर झाले आहे. जे काही उपयोगी, सुकर तेही ईश्वर. विज्ञान ही सर्वत्र विद्यमान आहे. हे ही सत्य. वर म्हटले आहेच, 'ईश्यावास्यम इदं सर्वम्!'  ह्यावरून असे ही म्हणता येते की सर्वसामान्य भाविक मंडळी  कुठल्यातरी वस्तूला देव मानतात, ती वस्तु मुर्ती असो वा प्राणी, ती मुर्ती वा प्राणी ह्या विश्वातीलच की. इथे मुर्ती मानवाने निर्माण केली, तिला कसे देव मानता येईल असा आक्षेप पुढे येऊ शकतो, नव्हे येतोच. मग त्यावर उत्तर काय?  सामान्यतः जी काही वैज्ञानिक उपकरणे मानवाने निर्माण केली ती वैज्ञानिकांनी. पण त्यासाठी काही उपजत तंत्रज्ञ म्हणून जन्मले असतील अशांची मदत वैज्ञानिकांना झालीच नाही असे मानता येईल का? ती उपकरणे बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल हा ह्या सृष्टीतलाच आहे की नाही?  जसे एखादे वैज्ञानिक उपकरणे निर्माण करताना  बुद्धी,  मेहनत, प्रयत्न, कौशल्य वा कसब ह्या सार्या गोष्टी वैज्ञानिकाचे वा तंत्रज्ञाच्या असतात तसेच मुर्ती निर्माण करण्यापाठीमागे मुर्तीकाराचे कसब, चिकाटी, बुद्धी, मेहनत इत्यादी गुण कामी येतातच ना! जसे वैज्ञानिक उपरणे मानवाला उपयोगी पडतात आणि अंततः मानवाचे श्रम वाचतात तसेच मुर्तीची पुजा-अर्चा करताना मानवाची मानसिक शक्ती अप्रत्यक्ष रित्या वृदिगंत  होत असतेच की ! हे सत्य नाकारता येते का? नाही. हेच ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर. गणपती अथर्वशीर्षम् मध्ये गणक ऋषीने गणपती देवाचे वर्णन करताना म्हटले आहे, 
             ऋतं वच्मि || सत्यं वच्मि || 
ऋतं म्हणजे A fixed or settled rule, law. तर सत्य म्हणजे न बदलणारे. कारण सत्य हे पूर्ण असते. ह्यावर पुढे कधीतरी चर्चा करू. त्यातून 'जे पुर्ण आहे ते देव' ही आणखिन एक व्याख्या उपनिषदकारांनी मांडली.  

ईशोपनिषदाची प्रार्थना आहे, 
           'ओम् पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते!'
ईश्वर पूर्ण आहे. ईश्वरापासून उत्पन्न झालेले हे विश्व पूर्ण आहे. पूर्णापासून पूर्ण उत्पन्न झाले तरी शेवटी पूर्णच शिल्लक राहते. मातेचे पुत्रावरील प्रेम हे नेहमी पूर्ण असते. पुत्राने प्रत्येक क्षणी या पूर्ण प्रेमातून पूर्ण प्रेमाचा उपभोग घेतला तरी मातेचे हृदय पूर्ण प्रेमाने अथांग भरलेले असते. पार्याला नियमित आकृतीचा आकार असतो. ह्यातून काही पारा वेगळा केला तरी पार्याच्या दोन्ही राशी पुन्हा त्याच आकारात दिसतात. मूळ जीवपेशीची वाढ एका पेशीच्या दोन पेशीत होते. एक संपूर्ण पेशी बाहेर पडली तरी पहिली पेशी पूर्णच राहते. असे विज्ञान सांगते. हेच सत्य अध्यात्मिक पातळीवरून मांडताना आचार्य विनोबा भावे म्हणतात "देवांना ईश्वरी विद्या जिच्यापासून मिळते त्या देवतेचे उपनिषदात नाव उमा आहे." उमा ह्याचा अर्थ ईश्वरी विद्या असा का लावतात, ह्यावर विनोबाजी म्हणतात "ओम् हा वेदान्तात ईश्वराचा अर्थ आहे. ह्या ओमची अ उ म अशी तीन पदे आहेत. उमा हा शब्दही अ उ म ही पदे वेगळ्या अनुक्रमाने (शब्दाचे रूप बदलून) घेऊन आला आहे. म्हणजे क्षणापूर्वी देवासमोर जो ओम उभा होता तो आता पुरूषाचे रूप बदलून स्त्री असे रूप झाले आहे . म्हणजे उ म अ असे होत उमा झाले."  देव हा एकच आहे असे आपण मानतो, तरी अनेक देव-देवता पुजीत असतो. ह्यापाठीमागे विज्ञानातील 'एका पुर्ण पेशीतून दुसरी पुर्ण पेशी, दुसर्यातून तिसरी अशा क्रमाने अनेक पूर्ण पेशी होतात' हा सिध्दांत आहे. त्यामुळे विविध देव-देवता, ही एकाच चैतन्याची रूपे आहेत. जसे की एकाच विद्यूत प्रवाहातून वीजेचे अनेक प्रकारची उपकरणे काम करीत असतात, जणू काही स्वतंत्र अस्तीत्व असल्यासारखी. त्यामुळे तेहतीस कोटी देवाची कल्पना हास्यास्पद वाटण्याची गरज नाही. उलट देव तेहतीस कोटीची संख्या ओलांडून फार पुढे कधीच गेलेला आहे. आज जग जवळ आले आहे असे आपण म्हणतो. का तर माहीती व तंत्रज्ञानाच्या शाखेतील अभूतपुर्व होत असलेल्या क्रान्तीमुळे. ती क्रान्ती अभूतपुर्वच. म्हणजे कालचे तंत्रज्ञान आज टाकाऊ ठरेल; उद्याचे तंत्रज्ञान परवा टाकाऊ ठरणार. वस्तुतः जुने नव्या रूपात येत असते. ह्याचाच अर्थ जग प्रसरण पावत आहे. ज्ञानाच्या कक्षा विस्तारीत होत आहेत. ज्ञान हे पूर्ण तर विज्ञान हे अपूर्ण आहे असे आपले तत्तवेत्ते म्हणतात त्यासंबंधी शंका उपस्थित करण्यात काही अर्थ आहे असे दिसत नाही.  गणक ऋषींनी अथर्वशिर्षात पुढे म्हटले आहे,
                  'त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ||' 
हा बोध देव जाणण्यासाठी निश्चितच उपयोगी आहे. ज्ञान आणि विज्ञान ह्यातील परस्पर संबंध शोधण्याचा प्रयत्न म्हणजे अध्यात्म असावे असे वाटते. आपल्या तत्तवेत्त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहेच की, 
      ' सर्व देवं नमस्कारम् केशवं प्रतिगच्छती |'   
ही आपली धारणा अयोग्य ठरत नाही. म्हणजे देव जाणण्याचा प्रयत्न करीत राहणे इतकेच काय ते आपल्या हाती असते. तेच आपण ह्या लेखमालिकेतून करीत राहू या.

जय योगेश्वर! 

1 टिप्पणी:

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...