शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

आपण व आपली दैवते (देव म्हणजे काय?)


'आपण व आपली दैवते ' ह्या विषयावर 'काहीतरी लिहावे ' असे बर्याच दिवसापासून वाटत होते. हा विषय अति व्यापक आणि गहन. तितकाच अति संवेदनशील. त्यामुळे ह्या विषयावर काहीही आणि कसेही लिहीले तर चालणार थोडेच? म्हणून प्रथम ईश्वर चरणी प्रार्थना केली, 'बाबा रे तुच सांभाळून घे मला.' सोबत ज्यांच्या मुळे अध्यात्म विषयात गोडी उत्पन्न झाली असे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पुजनीय पांडुरंगशास्त्रीजी आठवले ह्यांची मनोभावे पुजा केली. पाठोपाठ ह्या वर्षीच्या आषाढी एकादशीला आणि गुरू पोर्णीमेला  ह्या दोन्ही शुभ दिवसांचे महात्म्य, जे पुजनीय शास्त्रीजींनी मांडले आहे त्यावर आधारीत ह्याच ब्लाॅगवर लेख पब्लीश केले. त्यामुळे ह्या विषयासंबंधीत असलेले मनावरील दडपण कमी झाले.

विठ्ठल-विठ्ठल नामाच्या गजरात तहान-भूक विसरून ऊन- पाऊस ह्यांची तमा न बाळगता वर्षानु-वर्षे पंढरीची वारी करणार्या एखाद्या वारकर्याला  देव-देवतासंबंधीचे जितके ज्ञान आहे, त्यातील एका कणाएवढेही ज्ञान माझ्यापाशी नाही. हे प्रांजळपणे आपल्यासमोर कबूल करतो. ह्या विषयावर मी जे लिहीन, त्यातील आपल्याला जे म्हणून काही आवडेल ते माझे नाही हे आपण जाणताच. कारण ते सारं आपल्या देशात, ह्या जगात होऊन गेलेल्या आणि कार्यरत असलेल्या अध्यात्म विषयावरील महामेरूंचे आहे. जे काही कंटाळवाणे आणि  खटकणारे वाटेल त्यासंबंधीचा दोष हा सर्वस्वी माझा आहे.  मानवी जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यु ह्यामधील प्रवास होय. भगवान श्रीविष्णुच्या षोडषनाम स्त्तोत्रात 'प्रवासे त्रिविक्रमम' असे म्हटले आहे.  हा प्रवास कुठपर्यंत? फक्त तो देव जाणो. 'सतत भंगवंताचे नाम  मुखी ठेवा' असा आपल्या संताचा उपदेश आहे. तो उपदेश निदान ह्या लेखमालिकेच्या निमित्ताने का असेना मी पाळायला सुरवात केली आहे अशी  माझी भाबडी समजूत आहे. त्यातूनच ह्या संवादमय लेखमालिकेचा प्रंपच मांडला आहे. प्रथम देवाच्या विविध व्याख्या व स्वरूप  लिहण्याचे ठरविले आहे. नंतर संतमंडळी आणि थोर पुरूषांना झालेली  देवाची अनुभूती ह्या विषयाकडे वळेन. पुढे हळूहळू देवाच्या अवताराच्या पाठीमागील वैज्ञानिक तसेच  सामाजिक प्रयोजन शोधण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. एकूण ह्या विषयाचा आवाका फार मोठा आहे. म्हणून अधूनमधून ह्या लेखमालिकेवर लिहणार आहे. ही  लेखमालिका कुठपर्यंत सुरू राहील,  ह्याबाबत मी पामर काय सांगणार? कर्ता-करविता तो देवच आहे. आपली साथ मिळत राहो अशी प्रार्थना करतो आणि ह्या लेख मालिकेला सुरवात करतो.

हरि ओम् ! नमस्कार !
देव हा संस्कृत भाषेतील शब्द. देव म्हणजे तेज. ह्या विश्वाची उत्पत्ती एका तेजगोळ्याच्या स्फोटाने झाली असे विज्ञान म्हणते. ह्याचा अर्थ आपल्या अध्यात्मातील विश्वाच्या उत्पत्तीची कल्पना विज्ञानाशी मिळती जूळती आहे असे दिसते. संपूर्ण ब्रह्मांडावर नियंत्रण करणारी एक शक्ती आहे ह्या पलीकडे आपण सामान्यजन देवा संबंधी अधिक काही बोलू शकत नाही. 'जो आपल्याला संकटात, दुःखात तारतो तो देव.' तसेच 'जो देतो तो देव' अशी आपली धारणा. आपली संत मंडळी म्हणतात, " देव आपल्या हृदयात स्थिर असतो. देव सतत चांगले ते आपल्याला देत असतोच पण एक तर आपण चांगले घेण्यात कमी पडतो वा चांगले घेतलेले टिकवू शकत नाही." आपल्याच कर्मदारिद्र्यामूळे आपण चांगले घालवून बसतो. म्हणूनच 'दैव देते आणि कर्म नेते ' असा वाकप्रचार संभाषणात दृढ झालेला असावा. ह्याचा अर्थ आपल्या कर्मातही देव असतो हे ही ओघाने आलेच की.

सर्व प्राणीमात्रात जे चैतन्य आहे, ते एकच आहे. भगवंताने अर्जुनाला गीतेत म्हटले आहे,
               ईश्वरः सर्व भूतानां हृदेशेऽर्जन तिष्ठती !
          (मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थिर असतो)
ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे,
               जे जे भेटें भूते ते ते मानीले भगवते !
इतक्या परम कोटी दर्जाची अध्यात्मिक शक्ती आपल्या सारख्या सर्वसामान्यांत नसते. तरीही ' जे जे भेटें भूते ते ते मानीले भगवते ' ह्या संबंधीचा अनुभव आपल्याला दैनंदिन जीवनात येत असतो. आपल्या घरातील एखादा पाण्याचा नळ गळू लागला तर आपली चिडचिड सुरू होते. तसेच घरातल्या गिझरचे सर्कीट जळाले की तशीच आपली अवस्था. एक दोन दिवस घरातल्या कोणाही सदस्याला दैनंदिन रडगाण्यातून सवड मिळत नाही. आणि मग अचानक रविवारच्या सकाळी ओळखीचा प्लबंर वा इलेक्ट्रीशियन आपल्या घरी येतो, आणि त्याला पाहताच आपल्या मुखातून आपोआप शब्द बाहेर पडतात, 'बघ, तू आज कसा देवासारखा धावून आलास.' अशी कैक उदाहरणे देता येतील. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीत असलेला चांगुलपणा पाहून आपण त्याची 'देवमाणूस' 'देवभोळा' किंवा 'भोळा शंकर' अशी भलावणही करतो. ह्याचा अर्थ असा आहे की देवासंबंधीची ठोस व्याख्या भले आपल्याला करता येत नसली, तरी देव जाणण्याची एक मानसशास्त्रीय प्रक्रिया थोड्याफार प्रमाणात तरी का असेना जन्मतः आपल्यात असावी. त्यामूळे तो देव चल की अचल हा प्रश्न आपल्याला उद्भवत नाही. तो अचल असला, तरी त्याचा वेग मानवी मनाच्या वेगाहून सहस्त्रपटीने अधिक आहे, असेच आपण मानतो. तो क्षणात येथे तर क्षणात विश्वाच्या पल्याडच्या अंनत अंतरावरील बिंदूमध्येही आहे. हे ही आपण स्विकारले आहे. देव दिसत नसल्यामुळे देवाचं अस्तित्व न मानण्याची वृत्ती ही आपल्यात येऊ शकते. पण ते ही आपण स्वाभाविक मानले आहे. हेच आपल्या संस्कृतीचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य.

माझा एक मित्र; तो देव न मानणारा. पण नेहमी म्हणत असे की मी नियतीला मानतो. एकदा अशीच चर्चा सुरू असताना मी सहज त्याला विचारले, तु कधी नियतीला पाहिले आहेस? नियती तुला दिसते का? त्याने उत्तर दिले, 'नाही.' मी मुद्दा पुढे रेटत म्हणालो, " रस्त्यावरून चालताना मागे वळून पाहीले तर ठेंच लागते ना. रस्त्यावरून चालताना आपण सावधानी बाळगत नसतो, तेव्हा असे प्रकार घडतात. रस्त्यावर चालताना डावीकडून चालणे इत्यादी नियम आपणच  निर्माण केलेले असले तरी शेवटी रस्त्यावरील वर्दळीला एका व्यवस्थेत बसविणे हा प्रशासनाचा राजधर्म आहे असेच आपण मानतो. म्हणून तो एक समाजशास्त्रीय नियम झाला. तो आपण पाळला पाहिजे. कारण ' समाज ' हा ही आपण एक प्रकारे देवच मानला आहे. आपल्या संस्कृतीत एके ठिकाणी देवाच्या स्वरूपा संबधीचे वर्णन आहे, ते असे आहे, 
        ओम् सहस्त्रशीर्षः पुरूषः सहस्त्राक्षः सहस्त्रपात||
              स भूमिं विश्वतो वृत्वात्यातिष्ठद्दशांगुलम्||
(अर्थ ---- त्याला हजारो मस्तके, हजारो डोळे, आणि हजारो चरण आहेत. सकल प्राणीरूपाने अनंतशः अनंत अवयव धारण करणारा विराटसंज्ञक पुरूष सर्व भागी व्यापून दहा अंगुळे उरलाच आहे.)"

माझा मित्र शांतपणे ऐकत होता. बरं ते जाऊ दे, असे म्हणत मी त्याला विचारले, "एखादा माणूस रस्त्याच्या डाव्या बाजूला सायकल चालवित जात असताना पाठीमागून एखादी कार भरधाव वेगाने येते; ड्रायवरचा कारवरील ताबा सुटतो; आणि सायकलस्वाराला कारची धडक बसते. तो खाली शेतात पडतो, तोही अशा रितीने की त्याचे डोकेच एका दगडावर आपटते, आणि मृत्युमुखी पडतो. अशा गोष्टी घडत असतात की नाही?." माझा मित्र म्हणाला, 'हो घडतात'. मी म्हणालो, "मित्रा, सायकलस्वाराची काही चूक नसताना तो प्राण गमावितो. अशा वेळी मी म्हणेन, त्याचा काळ आला होता. तु म्हणशील हा नियतीचा खेळ. काळ आणि नियतीत काही फरक आहे का?" मित्र उत्तरला, 'बिलकूल नाही.' मी त्यावर म्हटले, "काळ हे ही देवाच्या अनेक नावापैकी एक आहे. कोणी त्याला काळ म्हणतात, कोणी महाकाळ. एकीकडे कधीतरी सुर्याची ऊर्जा संपणार असे विज्ञान म्हणते. तेव्हा जीवसृष्टी राहील का? नाही हेच उत्तर. तर दुसरीकडे अध्यात्म म्हणते, कधीतरी प्रलय होणारच.त्यावर पुष्टी म्हणून अध्यात्म सांगते ' ईश्वराच्या असतात तीन शक्ती; उत्पत्ती, स्थिति आणि लय. लय म्हणजे नाश.' ह्या उदाहरणात मृत्यु. शेवटी मृत्यु म्हणजे शरीराचा नाश. सायकलस्वारामध्ये प्राण होता, त्याचेच नाव आत्मा वा चैतन्य. आणि ते अविनाशी असते. तोच परमात्मा. आपल्यात परमात्माचा अंश असतोच  आता आपल्याला ना आत्मा दिसतो, ना परमात्मा. आणि नियतीही दिसत नाही. पण एवढ्यावरून देवाचं अस्तित्व नाहीच असे म्हणणे म्हणजे तू ज्या नियतीला मानतो तिचेही अस्तित्व न मानणे असेच ना. आपल्यात सुध्दा देवाचा अंश असतोच. त्याचं अस्तीत्व केवळ तपोबलानेच दिसू शकते. ते आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. पण देव दिसत नसला तरी आपल्या  आचरणाने वा कर्मातून आपल्याला देवाची अनुभूती येऊ शकते." ह्यसंबंधीचे एक दोन उदाहरणे कथाच्या माध्यमातून मी त्याला दिली. तरीही माझ्या मित्राचे मतपरिवर्तन झाले नाही. (वाचकांनी कृपया ह्याच ब्लाॅग वरील ३० मार्च २०१७ चा 'आपल्यातला देव' ह्या शिर्षकाचा लेख वाचावा. त्यामध्ये आपल्यात देव कुठल्या स्वरूपात असू शकतो ह्या संबंधीत कथांच्या माध्य्यामातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.) 

शेवटी मी माझ्या मित्राला आणखिन एक गोष्ट ऐकवली. एकदा एका राजाला देव आहे की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर हवे होते. दरबारातील सारे विद्वान-पंडीत म्हणाले 'देव आहे.' राजाने म्हटले 'दाखवा मला'. सारे विद्वान-पंडीत गोंधळून गेले व लागलीच म्हणाले, "आम्ही देव दाखवू शकत नाही. आम्ही देव पाहीला नाही, मग आम्ही तुम्हाला कसा दाखविणार?" राजाने प्रधानाला सांगितले 'दवंडी पिटवा, प्रजेपैकी कोणी मला देव दाखवू शकतो का ते पाहू या.' झाले; दवंडी पिटविली. एका महीन्यात चार वेळा दिवंडी पिटविली गेली तरी राजाच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास प्रजेपैकी कोणी पुढे येईना. शेवटी राजाने ' जो कोणी मला देव दाखवील, त्याचा राजकन्येशी विवाह होईल ' असे जाहीर केले.

पंधरा दिवसाने एक युवक राजवाड्यात आला. प्रधानाने त्या युवकाचे स्वागत केले. दरबार भरला. राजा आपल्या सिंहासनावर बसला. त्याने युवकाला नाव, गाव विचारले, आणि थेट प्रश्न विचारला 'कुठे देव आहे , दाखव पाहू.' त्या युवकाने राजाला वंदन केले आणि तो उत्तरला, "महाराज, मी देव दाखविण्याऐवजी आपणांस देवाची शक्ती दाखविली तर चालेल का? राजा म्हणाला, 'दाखव की'. युवक म्हणाला 'माझी एक अट आहे.' राजाने अट विचारली. तो युवक म्हणाला, "महाराज, आपण सिंहासनवरून खाली उतरावे व माझ्या जागेवर बसावे. मी तुम्हाला सिंहासनावर बसून देवाची शक्ती दाखवू शकेन. राजाने अट मान्य केली. तो युवक सिंहासनावर बसला. राजा, राणी व राजकन्या तसेच दरबारातील मंडळी पुढे काय होणार, हे बघण्यासाठी आतुरलेले होते. युवकाने पाच मिनिट डोळे मिटून आपल्या इष्टदेवतेचे चिंतन केले आणि म्हणाला, "महाराज, देव कुठे आहे, ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याच प्रजाजनातील माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडून मिळावे यासाठी आपल्या सारख्या महाराजाला खाली बसावे लागले आहे आणि मी सिंहासनावर बसलो आहे. ह्यावरून महाराज, देवाची शक्ती कीती मोठी असेल ह्याची कल्पना करा. जिथे ह्या विश्वातील सारी शांती, दया, क्षमा, सत्य, दानधर्म, संयम, सद्भाव, सहकार, सहमती, सदाचार, शालीनता, प्रेम, करूणा एकटवलेले दिसते तो देव. सारे ज्ञान-विज्ञान, सार्या कला, विद्या, चातुर्य, सारं संगीत, सारे शोध-उद्योग, मानवाने साधलेला विकास, सारे ऐश्वर्य, ज्याच्या चरणाशी विराम पावतात तो देव. जिथे सारे धैर्य, शौर्य, कल्पकता, नाविन्यता, कर्तृत्व, निर्मीती, सारं बल, शक्ती, शस्त्रे, ज्याच्या पुढे थिटे पडतात तो देव. महाराज, आपण जो सुर्य पाहतो त्याहून कितीतरी लाखो पटीने ज्याचे तेज आहे, असा महाकाय, अंनंत कोटी ब्रह्मांडनायक जो आहे, तो देव. असा तो देव, त्याचे ते विराट रूप, त्याचे प्रचंड तेज पाहण्याइतकी तोला-मोलाची दृष्टी, आणि शक्ती आपल्याकडे आहे का? महाराज, कृपया विचारा हा प्रश्न आपण स्वतःलाच." इतके बोलून तो युवक थांबला. राजा जागेवरून उठला. थेट युवकाच्या दिशेने जाऊ लागला. आता पुढे काय होतेय, ह्याकडे दरबारात हजर असलेल्या सार्यांचे डोळे लागले. राजा त्या युवकाकडे पोहचताच युवक सिंहासनावरून उठतो. राजाने त्या युवकाला, प्रेमाने अलिगंन देत, शाब्बास असे म्हणत पाठीवर शाबासकी दिली. तो युवक पुढे काही म्हणायच्या आतच राजा म्हणाला, "हे युवका, मला तुझ्या धाडसाचे कौतुक आहे. आपला राजा अतार्कीक प्रश्न विचारीत असताही तु राजाच्या डोळ्यात अंजन घालायला बिथरला नाहीस. मी आज तुझ्यात देव पाहीला. तुझ्यातले धाडस, तुझा आत्मविश्वास, आणि तुझ्या वाणीतून मला देवाचे दर्शन झाले. हेच ते देवाचे रूप. मी तुझ्यावर प्रसन्न आहे." दरबारात टाळ्याचा कडकडाट झाला. युवकाने राजाला वंदन केले आणि सिंहासनावरून खाली उतरला. पुढे त्याचा राजकन्येशी विवाह झाला.

मी मित्राला म्हणालो, मित्रा, उत्तर मिळाले का? तो भानावर आला, व म्हणाला "देव आहे हे निश्चीत. पण त्याला पाहण्यासाठी कठोर तप करावे लागते. कच्च्या दुधापासून तुप तयार होत नसते. प्रथम दुध फार तापवावे लागते; मग त्याचे लोणी करावयाचे; लोणी फार घुसळवयाचे; लोणी भरपूर घुसळवून झाले की मंद आचेवर उकळावयाचे; लोणीवरील आपली नजर जराही ढिली होऊ न देता; मग आपल्या हाती तुप येते. देव प्रत्यक्ष पाहण्यासाठी शीव आणि जीव ह्यामधुन जीव वजा केला म्हणजे राहतो तो शीव, तोच देव. जीव वजा करीत जाणे म्हणजे आपल्यात विराजमान असलेल्या आत्मीक शक्तीची उन्नती करण्याच्या कामाला लागणे हेच होय. त्यात कसलाही हलर्गजीपणा नको वा आळस नको." एका तासापुर्वी देव न मानणार्या माझ्या मित्राचे उत्तर ऐकून मला त्याच्या उत्तरात देव दिसला.

जय योगेश्वर !

५ टिप्पण्या:

  1. धन्यवाद विष्णुजी, अतिशय उत्तम विषयावर भाष्य केलत.आपल्या संस्कृतीमधील शिकवणीनुसार दैवी शक्तिच अस्तित्व कोणीही,आस्तिक/नास्तिक,नाकारणार नाही.ईश्वर सर्वांठायी आहे हे लक्षात घेतल तर तर देव सगळीकडे दिसेल.ज्यांना हे आकलन होऊ शकत नाही त्यांना नतमस्तक करण्यासाठी दृष्य स्वरुपात मुर्तिपुजेची प्रथा सुरु झाली असावी,पण त्याच प्रथेच सामान्यांच्या श्रध्देचा गैरफायदा घैत बहुतांशी झालेल व्यापारी स्वरुप बघवत नाही.लेख उत्तमच आहे,नमस्कार.

    उत्तर द्याहटवा
  2. श्री बिवलकरजी,आणि संदीपजी,धन्यवाद.असाच लोभ ठेवा ही विनंती.

    उत्तर द्याहटवा
  3. ता 16/2/2022माझ मोठा मुलगा एटॅक आला व मला सोडून गेला, अचानक 28 व्या वर्षी? फिटचा आजार होता तेव्हा आम्ही त्याला घराबाहेर पडू देत न्हवतो .(फिटच्या गोळ्या चालू होत्या,आयुष्यभर खाव्या लागणार होत्या .फिट येत न्हवती) 9/30 वाजता माझ्याशी विडीवो कॉल करून बोलत होता की आण्णा मि दुध पित आहे .हसत खेळत बोलत होता आणि लगेच बायकोचा 9/45ला फोन येतो कि गणेश सिरियस झालाय घरी लवकर या .मि घरी पोचायच्या अगोदरच माझ्या लाडक्याला एटॅक आला व मला सोडून गेला. आमची काय चुक देवान त्याला अकाली ऊचलून न्हेला? मि अजुनही डिप्रेशन मधी आहे. कशातच लक्ष लागत नाही. त्याच्या बदली मला ऊचलले असते तर काय झालं असत? मला अजुनही विश्वास बसत नाही की माझा लाडका पिल्लु मला सोडून गेला आहे. विमनस्क स्थितीत आहे. देवाने हे असे का केले? माझ्या लेकराला कसले व्यसन न्हवते राजाला. ऐकदम इनोसंट, पाप पुण्य काय हेच माहीत न्हवते लेकराला त्यालाच देव माझ्या अगोदर घेउन गेला त्याच्या अर्थीला मला खांदा द्यावा लागला ह्यापेक्षा मिच का मेलो नाही असे वाटते. काय करू देवाच? 😢😢🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  4. श्री Unknown नमस्कार ! आपण गेल्या महिन्यात हा लेख वाचला हे मी आज पाहिले. मला हा लेख दुसर्या एका वाचकाला पाठवयाचा होता म्हणून आज मी वाचला. त्या वाचक मित्राला हा लेख फारवड करीत आहे , सोबत ब्लाॅगवरील आपल्यातला देव या शिर्षकाचा लेख ही पाठवत आहे. आपले नाव-गाव, फोन नबंर कळले तरी मी कोणालाही वाच्यता करणार नाही. आपल्या दुःखात सहभागी होण्यासाठी संधी दिली तर बरे होईल. कृपया आपणही या ब्लाॅगवर अध्यात्मिक लेख लिहले ते वाचावेत. त्यातून दुःख सहन करण्याची शक्ती वाढते. आपल्या मुलाचे ऋणबंधची मर्यादा नियतीने कमी ठेवली होती ती संपली असेच मानणे आवश्यक असते. मी वस्तुस्थिती मांडली. हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रचंचंदजीने उनके एक उपन्यासमें कहा है की दुसरोंको उपदेश देना सहज तथा सरल है लेकीन स्वयंपर ऐसा संकट आता है तो उसे भी शोकग्रस्त होना स्वाभाविक है | ईश्वर आपले पुत्रके आत्माको परमशांती दे तथा आपको और परीवारके सदस्योंको धैर्य प्रदान करें ऐसी प्रार्थना करता हूँ | हरी ओम !

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...