आज ॠषिपंचमी. समाजाला सुसंकृतपणाचे धडे ज्यांनी गिरविले, अशा ऋषीमुनींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिन. वैदिक काळाच्या इतिहासाची पाने वरच्या वर जरी चाळली, तरी आपल्याला आढळून येते की प्रत्येक ऋषींनी आपाआपले आश्रम स्थापन करून समाजाला प्रथम 'अन्नं बहु कुर्वीत |' असे सांगत अन्नधान्याची वाढ करण्याचे कौशल्य शिकविले. सोबत वस्त्र आणि निवारा ह्या आणखिन मुलभूत गरजा कशा भागवयाच्या ह्याचे शिक्षण दिले. पुढे वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता आणि निरोगी आरोग्यासंबंधी धडे दिले. सकाळी झोपेतून उठल्यावर प्रातःविधीपासून ते रात्री झोपेपर्यंतचे दैनंदिन जीवन आनंदमय कसे करावे ह्या बाबतचे ऐहीक व परलौकीक नियम लोकांना अवगत केले. 'नायमात्मा बलहिनेन लभ्यः| (दुर्बलांना ईश्वर भेटत नाही) असा शाश्वत सिद्धात पटवून समाजाला बल व शक्तीची उपासनाही शिकविली. सुरक्षासाठी शस्त्रे -अस्त्रे चालविण्याचे शिक्षण, विविध विद्या, कला-संगीत-नृत्य, छंद-व्याकरण, उद्योग-व्यापार, न्यायशास्त्रे, तर्कशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादी संबंधीचे ज्ञान देण्यासाठी गुरूकुल व्यवस्था उभी केली. आपण जे काही मिळवितो, उपभोगतो ते सारे निसर्गाच्या कृपेने ह्याची जाणीव समाजाच्या मनीं ठासविण्यासाठी काही उत्सव साजरे करण्याची पंरपंरा निर्माण केली. निसर्गाप्रती कृतज्ञता व समरसतेचा भाव ठेवत एक सुसंस्कृत जीवनशैली निर्माण केली, जी आज जगभर हिंदू संस्कृती म्हणून ओळखली जाते. ह्या जीवन पद्धतीचा आधार ईश्वर आहे. म्हणून सारी कर्मे ईश्वराला अर्पण करण्याची दिक्षा समाजाला देण्यासाठी ऋषीमुनींनी ईश्वराचे विविध पद्धतीने असे काही वर्णन केले आहे की तो ईश्वर, जो दिसत नाही, तो जणू समोर उभा आहे असे वाटावे. त्यापैकी स्वच्छता-एक देवता ह्यावर आज चर्चा करू या.
ज्याच्या पायाशी सारं ऐश्वर्य, विराम पावते, त्या देवाला आपण नवस का करतो? देवाला काहीतरी वाहण्याचं कर्म का करतो? असे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. निर्गुण रूपातला देव पाहणे आपल्या सारख्या सामान्यजनांच्या आवाक्याच्या पलिकडचे असते. म्हणून मुर्तीपुजेची कल्पना मांडण्यात आली. त्यामूळे मला फूल आवडते म्हणून देवाला फूल आवडते. मला स्नान आवडते म्हणून मी देवाला स्नान घालतो. हा भक्ताचा भक्तीशील आग्रह, म्हणजे श्रद्धेचा भाग झाला. कोणी म्हणतं, जिथे विज्ञान थांबते तेथून श्रद्धेचा प्रवास सुरू होतो. 'सत्ये प्रतिष्ठत: धारणः सा श्रद्धा | ' (सत्य काय आहे हे जाणून घेऊन आचरण करणं म्हणजे श्रद्धा). हा झाला पहिला मतप्रवाह. तसे पाहता, विज्ञान सुद्धा एक प्रकारे सत्यच शोधत असते. श्रद्धेतून अंधश्रध्दा जन्मास येतात. हा झाला दुसरा मतप्रवाह. ह्यात सत्यांश नाही असे म्हणवत नाही. परंतु ह्या मतप्रवाहांपैकी देवाचे अस्तीत्वच नाही असे मानणारा एक पोटविभागही पहावयास मिळतो. तसेच विविध धर्मातील अंद्धश्रद्धां बाबत टिका करतांना पक्षपात करणारा, वा राजकीय फायदा-तोट्याचे गणित मांडणारा असा एक आणखिन वर्ग ह्या मतप्रवाहात निर्माण झालेला दिसतो. एक आणखिन पोट विभाग ह्या मतप्रवाहात आहे तो म्हणजे स्वतःच्या धर्माच्या अनुयायींची संख्या वाढविण्यासाठी इतर धर्मीय विशेषतः हिंदू समाजापैकी लोकांना अमिष दाखविणारे महाभाग. तिसरा मतप्रवाह असा आहे की जो ह्या जगताला बाजारपेठ मानणारा आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की आजचं जग कितीही म्हटले तरी आर्थिक जगत आहे. 'One man's expenditure, is another man's income' (एका व्यक्तीचा खर्च हा दुसर्या व्यक्तीसाठी आर्थिक उत्त्पन्नाचा स्त्रोत होय) हा आजचा युगमंत्र. त्याची अवहेलना कशी करणार? ईश्वर सर्वत्र आहे हीच दृष्टी ठेवावी. देव-देवतांच्या मंदिरांच्या पायथ्याशी कोणी नारळवाला आहे, कोणी फूलवाला आहे, कोणी पुजेच सामान विकणारा आहे, कोणी प्रसाद म्हणून मिठाई विकणारा आहे, कोणी मंडपाचं काम करणारा, कोणी रंगकाम करणारा आहे तर कोणी मुर्ती बनविणारा आहे इत्यादींच्या हातांना काम व रोजगार मिळतो. ह्यांच्याकडून आपण हवे तसे देवपुजेचे सामान खरेदी करतो म्हणजे आपण ग्राहक. 'ग्राहक हा देव' ही एक व्याख्या आजच्या युगात मान्य पावलेली आहे. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी ह्या व्याखेस संमती दिल्याचे वाचण्यात आले आहे. ग्राहक म्हणून आपण पुजेचं सामान विकत घेतो आणि आपण पैसे देतो.' जो देतो तो देव' ही कल्पना नाकारता येत नाही हे ही तितकेच खरे.
मुर्तीपुजेची गरज मांडली गेली त्यातूनच देव-देवतांची मंदिरे अस्तित्वात आली. हजारो-लाखो संख्येने वेगवेगळ्या मंदिरात भाविकांची ये जा असते. त्या मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवणे हे जसे प्रशासनाचे कर्तव्य आहे तसेच ते भाविकांचे आणि आसपासच्या हार-तुरे, प्रसादाचे जिन्नस विकणार्यापासून ते मोठमोठी दुकाने, हाॅटेल्स- लाॅज मालकांचेही कर्तव्य आहे. कारण सार्वजनिक ह्या शब्दातील सर्वजनात आपण स्वतः गणले जात असतोच.
मंदिराच्या आसपासचा परिसरच नव्हे तर आपल्या वस्ती भोवतालचा परिसरही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वसंबंधीतांनी नेकीने पार पाडली तर आपोआप मंगलमय वातावरण निर्माण होते. त्यातून आपले मन विकारपासून तर शरीर संसर्ग रोगापासून दूर राहते. शरीर विज्ञानामध्ये स्वच्छतेचा महीमा ठासून भरलेला आहे. परिसर स्वच्छ असला की साथीच्या रोगाचा फैलाव होत नाही. वैयक्तिक जीवनातही स्वच्छतेची सवय लावून घ्यावी. एकदा की मन स्वच्छ झाले की शरीर सक्षम बनते. सक्षम शरीर असले की बुद्धी तल्लक बनते. शक्ती आणि तल्लक बुद्धीच्या साह्याने आपले कर्म , कार्य चांगल्या तर्हेने पार पाडू शकतो. हे झाले शरीर विज्ञान. विज्ञानाप्रमाणे अध्यात्मातही स्वच्छतेचा कमालीचा आग्रह मांडलेला आहे. स्वच्छेतेचे महत्व मनावर ठसावे म्हणूनच आपल्या येथे केरसुणीला मान दिला जातो. दिवाळीला अन्य काही आणता आले नाही तरी केरसुणी अवश्य विकत आणतात. नवी केरसुणी आणली की तिला हळदकुंकू वाहतात. कारण देवाच्या अनेक नावापैकी 'स्वच्छता हे ही एक नाव मानले जाते. स्वच्छतेचे महत्त्व जसे विज्ञानाने सांगितले आहे तसेच अध्यात्माने ही स्वच्छतेचे महत्त्व विषद केले आहे. फक्त वेगळ्या शब्दात. 'हात फिरे तेथे लक्ष्मी वसे, असे म्हटले आहे. तेही पटते. अध्यात्मात शरीर विज्ञान 'आयुर्वेद ' ह्या नावाने ओळखले जाते. अलीकडे आयुर्वेदालाही सर्वत्र मान्यता मिळत आहे हे आपण पाहतोच.
केशरयुक्त दुध न घासलेल्या, गंजलेल्या, कळकटलेल्या, घाणेरड्या पेल्यात कोणाला प्यावयास दिले तर चालेल का? तसेच चकचकीत भांड्यात नासलेला पदार्थ ठेवला तर तो आपण खाऊ शकतो का? बाह्य शुद्धी आणि आंतरिक शुद्धी दोन्ही महत्वाच्या. आंतरिक शुद्धीसाठी प्राणायाम तसेच सत्संग, ध्यानधारणा आवश्यक मानले आहे. आज जगभर योग दिवसही मानला जात आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहेच,
"आणि शौचहि निष्पाप|द्विविध जेथ|
मन भावशुद्धी भरलें|आंग क्रिया अळंकारिले|
ऐसें सबाह्य जियालें|साजिरें का||" .
एकदा एका रस्त्यावरून राजाची स्वारी जाणार होती. रस्ते झाडून धुऊन स्वच्छ केलेले होते. जागोजागी सुंदर कमानी उभारल्या होत्या. रस्त्यावरून राजा जाणार म्हणून दोन्ही बाजूस शिपाई उभे होते, ते कोणाला सडकेवर येऊ देत नव्हते. पण तेवढ्यात एक कुत्रे कोठून आले ते कळलेच नाही आणि सडकेच्या मधोमध घाण करून निघून गेले. ऐनवेळी काय करावे सुचत नव्हते त्या शिपायांना. राजाची स्वारी जवळ आली होती. वाद्यांचे आवाज ऐकू येऊ लागले होते. तेथे उभ्या असलेल्या शिपयांपैकी एकाने रस्त्याच्या कडेवर असलेल्या दुकानातून ओंजळभर गुलाल आणून त्या घाणीवर ओतला. झाले; वेळ निभावली. राजाची स्वारी निघून गेली. मागाहून येणार्या एका भाबड्या माणसाने गुलाल पाहिला, पिशवीतून चार फुले काढली, वाहिली गुलालावर. तो दुकानदार मोठ्याने हसला आणि म्हणाला, "अहो वर फुले आणि गुलाल आहे पण आंत काय आहे?"
ज्ञानदेवाने मांडलेल्या आंतरिक शुद्धीचं महत्व पटवून देणे हा उद्देश वरील कथेत दिसला आहेच शिवाय 'दिसला गुलाल, वाहा फुले' अशा मानसिकतेचाही समाचार घेतला आहे. अशा मानसिकतेमुळे रस्त्यावरील वळणावर किंवा चार रस्त्यावर मधोमध कुठे छोटे मंदिर, कुठे मुस्लीम बांधवांचा पार -मस्जीद वा कुठे ख्रिचन बांधवांचा क्राॅस दिसतात. ते ही जागोजागी. रस्त्यावरील वाहतूक खोळबंत सरकणार. डिझेल, पेट्रोलची नासाडी, जोडीला प्रदुषण आणि सार्वजनिक स्वच्छेतेचा बोजवारा. लोकांच्या धार्मिक भावना दुखविता येत नाहीत. कारण सर्वधर्मसमभाव. हा शब्द आपल्या देशाच्या राज्यघटनेत दुरूस्ती करून सामावला आहे. त्यावर इथे चर्चा नको. पण वरील कथेत राजा रस्त्यावरून जाणार असतो, म्हणून तो रस्ता आधीच पूर्णपणे चकाचक करून ठेवला होता, तसा अनुभव आजही आपल्याला येत असतो. राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान तसेच मंत्री रस्त्यावरून जाणार असतील तर पालिका असो वा जिल्हा परिषद खडबडून जागी होतात. रस्ता तात्पुरता चकाचक, खड्डे बुजवून गुळगुळीत, परिसर स्वच्छ, गटारी सुध्दा स्वच्छ केलीली असतात. पण ही तात्पुर्ती डागडूजी. अशी स्वच्छता दरदिवशी पहावयास कधी मिळेल हे फक्त तो देव जाणो. आजही आपल्याच नव्हे तर विकसनशील आणि अविकसीत देशात हजारो लाखो लोक पालिकेच्या, झेडपीच्या हद्दीत वर्षोनुवर्षे घाणीच्या नरकात राहतात. का? दुसरा पर्याय नाही. गावे ओसाड अन् शहरं-नगरं बकाल. असे किती वर्षे चालणार? जोपर्यंत आपले मन स्वार्थाने बरबटले राहणार तोपर्यंत. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे "ज्या कर्मात दोन्ही प्रकारचे शौच असते ते खर्या अर्थाने पवित्र कर्म होय." अशा पवित्र कर्माचा आदर्श नेतेमंडळीने घालून दिला तर गावात, तालूक्यात, वार्डात, नगरात, शहरात सर्वत्र स्वच्छता-देवतेचं पदोपदी दर्शन घडेल.
धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरूषार्थ. त्यांच्या प्राप्तीचं साधन आपले शरीर होय. म्हणून धर्मशास्त्रात 'शरीर माध्यम् खलू धर्मसाधनम्|' असे म्हटले आहे. घरंदारें स्वच्छ, की शरीर सक्षम, परिसर स्वच्छ आणि समाजही सक्षम होतो. पुढे आपोआप बौध्दीक तसेच शारिरीक कष्ट उपसता येतात. त्याच जोडीला मनाच्या शुद्धतेकडे लक्ष पुरवित गेले की 'कष्टापोटी असती फळे गोमटी' हे अनुभवयास येते. त्या गोमटी फळाचे नाव आजच्या आर्थिक जगतात पैसा हे होय. म्हणजेच 'हात फिरे तिथे लक्ष्मी वसे' ह्या सिध्दांताची अनुभूती मिळते. ह्याचा अर्थ हाच की ' जिथे सारं ऐश्वर्य विराम पावते तो देव ' थोड्या अंशाने का असेना अनुभवयास येतो. कोणीतरी म्हटले आहे 'दारिद्य्राचा उगम हा पैशाच्या अभावात नव्हे तर मानसिकतेतून होत असतो. सरकारी कचेर्या आणि खाजगी कंपनीच्या कचेर्या ह्यांच्यात स्वच्छते बाबतीत जमीन आसमानाचा फरक का दिसतो. ह्याचे कारण असे की जे कोणी यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आले त्यांनी स्वच्छता नावाच्या देवतेची भक्ती केलेली असते. स्वच्छता राखणे हे एक आचरण आहे. त्यामुळे त्याचा समावेश सदाचारात होत असतोच की. म्हणून जिथे सारा सदाचार एकवटलेला असतो तो देव अंशात्मक रित्या अनुभवयास येतो.
देव सर्वत्र आहे. ह्या सृष्टीतील कण न् कण ईश्वराचं आसन आहे. शरीर-मन, व्यक्ती-समाज, घर-अंगण, घर- गाव, गाव-तालुका, तालुका-राज्य, राज्य-देश सर्वत्र स्वछता असली पाहिजे. कारण ह्या जोड्या नसून एकाच गोष्टीचे दोन रूपे आहेत. आतंरिक आणि बाह्य स्वच्छतेची उपासना अविरतपणे सुरू ठेवावी. कारण प्रत्यक्ष माऊलीचे तसे सांगणे आहे.
जय योगेश्वर!
उत्तम!साध्या शब्दांत आशयपुर्ण विवेचन, धन्यवाद.
उत्तर द्याहटवा