शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

आपण व आपली दैवते - (ध्येय हाच देव)



गणपतीसाठी गावी (नालासोपारा -- नाळा) गेलो होतो. रविवारी जेष्ठागौरी पूजनाच्या दिवशी मी मागविलेली पुस्तके घेऊन माझा मित्र राजू नाईक माझ्या घरी सकाळी साडे अकराच्या सुमारास आला. तो पुस्तकप्रेमी आहे. त्याच्या पत्नीच्या विरार (प) येथील मुद्रा प्रकाशनाच्या व्यवसायात आणि छोट्याशा पुस्तक डेपोत मदत करतो. तसेच स्वयंसेवी संस्थांचेही कामे करीत असतो, ते ही स्वतःची नोकरी सांभाळून. पुस्तके देतानाच तो म्हणाला, "मी फार घाईत आहे. एका संस्थेच्या सांयकाळी होणार्या बैठकीच्या तयारीसाठी जावयाचे आहे, थांबत नाही."  सर्वत्र गणेशोत्सव जोरात साजरा होत आहे, आणि हा माझा मित्र एका समाजसेवी संस्थेच्या कामासाठी जाण्याच्या घाईत आहे हे पाहून मी चकीत झालो. मी ना त्याला चहाचा आग्रह धरला, ना माझ्या घरच्या गणपतीच्या दर्शनाचा आग्रह केला. त्याला जाऊ दिले. त्यावर आभार मानत तो जितक्या वेगात माझ्या घराच्या पायर्या चढला, त्याहून अधिक वेगाने पायर्या उतरत गेला. एकंदरीत समाजाच्या स्थितीवर विशेषतः युवक वर्गाबद्दल विचारवंत व समाजशास्त्रज्ञ नाराजीचा सुर आळवत असताना, माझ्या मित्राची स्वयंसेवी संस्थेच्या कामासंबंधीतील धावपळ आणि ती ही सणासुदींच्या दिवसात पाहून ऊर भरून आला. ध्येयाने वेडे होणे म्हणजे काय आणि ते ही वैयक्तिक उन्नतीसाठी नाही तर समाजाच्या भल्यासाठी ह्याचं उदाहरण प्रत्यक्ष डोळ्याने पाहावयास मिळाले. माणसे दुसर्याच्या भल्याचा, समाजाच्या भल्याचा विचार का करतात ह्या संबंधीचे उत्तर शोधताना केवळ त्यांच्या आई-वडीलांचे संस्कार एवढ्यावर थांबून माझे समाधान होई ना. विचार करता करता अचानक छोटा गंधर्वांचे शिष्य उदयराज गोडबोलेंनी गायलेले 'देह देवाचे मंदिर' हे गीत आठवले. कोडे सुटले. ध्येय म्हणजे देव आणि त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी झटणे म्हणजे भक्ती. मंदिरातील देवाला प्रसन्न करण्यासाठी जसे ध्यान आवश्यक असते तसेच आपल्या देहातील देवाला प्रसन्न करण्यासाठी ध्येय आवश्यक असावे अशी खात्री होत गेली. त्यातूनच ह्या विषयावर संवाद साधण्याचा हा प्रयत्न. 

धर्म, ज्ञान, यश, ऐश्वर्य, वैराग्य, पुरूषार्थ, पराक्रम, सौंदर्य ह्या आठ गुणांना भग म्हणतात. हे गुण ज्याच्यापाशी असतात त्याला भगवान म्हणतात. ह्या सर्व गुणांची जोपासना करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्यात विराजमान असलेल्या आत्मिक शक्तीची वाढ करण्याची एक उत्तम साधना होय. कारण हे सारे गुण दैवी शक्तीची रूपे आहेत.

वर नमुद केलेले गुण परस्परांना पुरक आहेत. एका गुणाची जोपासना करता करता आपोआप आपल्यात दुसर्या गुणाची निर्मिती होत जात असावी. आपण देवाच्या नावाचा जप करण्यासाठी जशी माळ निर्मिली तशीच सृष्टीत ईश्वराने गुणांची माळ गुंफली असावी. एका माळेवरून हात सरकला की दुसर्या गुणाकडे आपोआप जात असावा. एक पेशीतून दुसरी, तिसरी पुढे अनेक संपूर्ण स्वतंत्र पेशी तयार होत जातात, तद्वत ही गुणांची उत्त्पती असावी. आपली धरती माताच अनेक गुणांची खाण आहे. आपल्या संस्कृतीत धर्म ह्या संज्ञातच सारे गुण सामाविलेले असतात आणि अधर्म म्हणजे सारे दुर्गुण. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणाले आहेत, 
धर्म संस्थापनार्थाय सम्भवामी युगे युगे ||

देव जाणण्याची मानसिक प्रक्रीया आपल्यात जन्मतःच विराजमान आहे हे मी मागच्या लेखात पटवून दिले आहे. म्हणून तर सांगावेसे वाटते कि वरील सर्व गुणांची जोपासना करण्याची पहीली पायरी म्हणजे आपल्या देहाला देवाचे मंदिर मानणे. म्हणजेच ध्येयवादी बनणे होय. मुलतः प्रत्येक व्यक्ती चांगली असते. जन्मतः मुल निरागस असतेच. आर्य चाणक्य म्हणत असत 'अयोग्यः पुरूषः नास्ती |' आपल्या हातून काहीतरी चांगले साधावे अशी इच्छा जेव्हा प्रबळ बनते तेव्हाच आपल्या मनीं कुठल्या तरी ध्येयाचा जन्म होत असावा. ध्येय हे देवासारखे पवित्र असावे लागते. कुणाचे तरी अहित करण्याची इच्छा म्हणजे ध्येय नव्हे. ती आसुरी वृत्ती. गुरूपूजन म्हणजे काय ह्यावर प्रवचन देताना पुजनीय पांडुरंग शास्त्रीजी सांगतात, " गुरूपुजन म्हणजे ध्येय पुजन. गुरूचे जीवन ध्येयमूर्तीसारखे असते. ध्येयाला साकार रूप असते. ध्येय जीवनात आले की संयम बळावतो. संयम बळावला की शक्ती संग्रहीत होत जाते आणि या शक्तीनेच आपण ध्येयाजवळ पोहोचतो आणि शेवटी त्याचा साक्षात्कार होतो." शास्त्रीजींचे बोल म्हणजे संताचे बोल. म्हणून ध्येयाला देव मानण्यास काही प्रत्यावाव नसावा असे वाटते.

जिथे सारे ऐश्वर्य एकटवलेले आहे, तो देव. व्यक्तीगत जीवनात प्रामाणिकपणे ऐश्वर्य प्राप्त करण्याचे ध्येय असणे ही बाब आपल्या संस्कृतीने गैर मानले नाही. जीवनाचे अंतिम ध्येय ऐहीक आणि परलौकीक उन्नती असेच आपण मानले आहे. म्हणून आपले अगस्ती ऋषी महालक्ष्मीचे स्तुती गाताना म्हणतात, 

पांडीत्यम् शोभते नैव न शोभन्ते गुणः नरे |
शिलत्वम् नैव शोभते महालक्ष्मी त्वया विना ||
(अर्थ--- मनुष्य विद्वान असला आणि सोबत तो धनवान असेल तरच त्याच्या पांडीत्याला अधिक झळाळी येते. अंगिभूत असलेले गुण आणि शील सुद्धा भरपूर धनदौलत असली की अधिक शोभिवंत बनतात) 

एक भोळा सज्जन लाकुडतोड्या होता. तो रोज जंगलातील लाकुड तोडून आपला व आपल्या पत्नी आणि मुलांचा उदरनिर्वाह करीत असे. जंगलातून परत येते वेळी एका साधूची सेवा करायचा आणि मग घरी जायचा. तो साधू त्याच्याशी प्रेमाने गोष्टी करायचा. त्या लाकुडतोड्याची इच्छा होती की आपल्या मुलाबांळानी चांगले शिकावे, मोठे व्हावे. एके दिवशी तो साधुला म्हणाला, "महाराज, ह्या लाकुडतोडीच्या धंद्यातून फारशी कमाई मिळत नाही. मला काही उपाय सुचवा." साधु महाराज म्हणाला, " हे बघ बेटा, केवळ इच्छा ठेवून तुला हवे असलेले मिळणार नाही. जे तुला हवे आहे, त्याचा तुला ध्यास लागला पाहिजे. तु तुझे ध्येय निश्चीत कर. चाकोरी जीवनातुन बाहेर पड. लाकुडतोड्याने विचारले, "म्हणजे काय महाराज?" साधुने उपदेश देत म्हटले, "तु पुढे जात जा. सतत पुढे जाण्याचा क्रम ठेव. मी सुद्धा सतत माझ्या ध्यानाची जागा बदलत असतो. थोड्या दिवसानंतर मी दुसर्या वनात जाणार आहे." दुसर्या दिवशी लाकूडतोड्या पुढच्या जंगलात गेला. ते तर सागाच्या झाडाचे जंगल होते. आता सागाच्या लाकडातून त्याला मोठी कमाई मिळू लागली. त्याने हाताखाली कारागिर नोकर ठेवावयास सुरूवात केली. साग लाकडाचे फर्निचर बनविणे सुरू केले. पैसा दामदुपटीने येऊ लागला. चांगले ऐसपैस घर बांधले. मुलांना शिक्षणासाठी शहरातील शाळेत पाठविले. गावात त्याचा लौकिक वाढला. एक शेठजी म्हणून आसपासच्या परिसरात त्याची ओळख झाली. आता त्याला नावीन्याचाही ध्यास लागला. तो थांबला नाही. आणखिन पुढच्या जंगलात जाऊ लागला. ते तर चंदन वृक्षाचेच जंगल होते. चंदनाच्या लाकडातून वेगवेगळ्या उदबत्त्या, धुप औषधे बनविण्याच्या कंपन्या सुरू केल्या. त्याचे नाव देशभरातील प्रमुख उद्योगपतींमध्ये गणले जाऊ लागले. सरकार दरबारातही त्याचा मान वाढला. तो थांबला नाही. पुढच्या जंगलात काय आहे ते पाहण्यासाठी जाऊ लागला. पण पुढे जंगल संपले. पुढे फक्त महासागर. पण पुढे जावयाचे होतेच. दोन बोटी खरेदी केल्या. महासागर धुंडाळून टाकण्यासाठी तज्ञ खलाशी व इंजिनियर्सना हाताशी धरले. अथक प्रयत्न सुरू झाले. तो शेठजी रोज खलाशी आणि इंजिनियर्सचे काम संपेपर्यंत थांबायाचा. का तर ध्येयाने त्याच्या देहाच्या नसानसात प्रवेश केला होता. शेवटी महासागराच्या विशिष्ट भागात ऑईल सापडले. रिफाइनरी सुरू केली. पेट्रोल, डिझेल कंपन्या काढल्या. आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख उद्योजक आणि ऐश्वर्यवान म्हणून ओळखला जातो. व्यक्तीगत जीवनात ध्येयालाच देव मानून त्यानुसार कार्यरत झाले की अंशात्मक का होईना ऐश्वर्यवान देवाचे दर्शन कसे होते हे ह्या कथावरून समजते. ही कथा काल्पनिक असली तरी अनेक उद्यीगपतींच्या जीवनचरीत्राशी मिळती-जुळती आहे. 

परंतु ज्या समाजात, ज्या राज्यात, ज्या देशात आपण वाढलो ते ऐश्वर्यवान न झाले तर मग आपण ईश्वराची अधिकाधिक अनुभूती कशी अनुभवणार? आज अमेरिकेला आपण पृथ्वीवरील स्वर्ग का मानतो? परमपित्याच्या ऐश्वर्याची अधिक अनुभूती घ्यावयाची असेल तर व्यक्तीगत जीवनाच्या उन्नतीच्या पलीकडे जाण्याचे ध्येय उराशी बाळगावे लागते. कारण तो परमपिता चराचर सृष्टीत व्यापुनही दशांगुळे वर उरतो. त्याचे दर्शन ध्येयरूपात अधिक स्पष्टपणे पाहावयाचे असेल तर आपल्याला अधिक व्यापक व्हावे लागेल तसेच ध्येयाची व्याप्ती वाढवावी लागेल. कोणीतरी त्याग केल्याशिवाय, ना समस्त समाजबांधवांचे भले होते, ना देशात स्वर्ग निर्माण होतो. मग त्याग कोणी करावयाचा? कोणी तरी करतातच ना ! का करतात? हाच तो प्रश्न, माणसे दुसर्याच्या, समाजाच्या, भल्याचा कसा काय विचार करतात, जो मी सुरवातीला मांडला आहे. ह्या लेखातील चर्चेचा केंद्रबिंदू. आता त्याकडे वळू या.

जगभरातल्या प्लेटो, हेगेल, अॅडम स्मिथ, टाॅलस्टाॅय, थाॅमस हाॅब्ज, मार्क्स, इत्यादी विदेशी समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञांच्या साहित्याचाही ज्यांनी अभ्यास केला आहे असे प्राध्यापक प्र ग सहस्त्रबुद्धे , वैचारिक लिखाण करणार्या लेखकापैकी एक सिद्धहस्त लेखक. ते म्हणतात " एक मनुष्य दुसर्या मनुष्याचा विचार का करतो, आणि त्याने तो का करावा, यासंबंधी भारतवर्षात अतिप्राचीन कालापासून जो विचार विद्यमान आहे तो अधिक मूलगामी आणि निर्दोष वाटतो. भीती, स्वार्थ, करार, अहंकार,दयाबुद्धी, परलोकभय, केवळ ह्या कारणांमुळे मनुष्य व्यापक विचार करीत नाही, तर स्वतःच्या व्यापकतेचा ज्या ज्या प्रमाणात त्याला साक्षात्कार घडतो त्या त्या प्रमाणात तो दुसर्याचा विचार करतो. 'अणोरणीयान् महतो महीयान्' अशा परभेश्वराचा अंश असल्यामुळे त्याला स्वतःच्या विशालतेची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जाणीव होते, आणि तो दुसर्याचा विचार करतो. हृदयातून शुद्ध होऊन निघालेला रक्तकण ज्याप्रमाणे सगळ्या शरीराला माझे म्हणतो, तद्वत आत्मानुभूती झालेला मनुष्य सगळ्या समाजाला आपले म्हणतो." 

म्हणूनच अनाथ मुलांना नाथ कसा मिळेल, कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंदवन कसे फूलेल, वनवासी बांधवांना जीवनात राम कसा वाटेल, भटक्या, विभूक्ती जनजातींना स्थैर्य कसे मिळेल, व्यसनाआहारी गेलेल्यांना भक्तीच्या मळ्यात कसे यावयास वाटेल, इत्यादी सुरवातीला वेडगळ वाटणार्या कल्पना, अनुक्रमाने सिंधुताई सकपाळ, स्वर्गीय बाबा आमटे, राष्ट्रीय स्वयंसेवकांचे जेष्ठ कार्यकर्ते व विश्व हिंदू परिषदेचे स्व माधवराव काणे, भटक्या व विभूक्त जनजाती परिषदेचे व संघाचे जेष्ठ कार्यकर्ते गिरीष प्रभूणे, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते स्व पांडुरंगशास्त्रीजी, इत्यादींनी प्रत्यक्षात साकारल्या ना ! आपआपल्या क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या जीवनाची होळी करून समाज बांधवासाठी स्वर्ग उभे केले ना ! 

प्राध्यापक सहस्त्रबुद्धेच्या म्हणण्याचा सारांश हाच की व्यापकता ही जन्मतः आपल्यात असते. जो जितक्या प्रमाणात सामाजिक बांधिलकी जपतो तितके त्याचे ध्येय व्यापक बनते आणि तितक्या प्रमाणात तो श्रेष्ठतेच्या उंचीवर जातो. म्हणजेच त्याची देवा विषयीची अनुभूती वाढत जाते. आपण जन्मलो आणि चालू लागलो, बोलू लागलो असे होत नाही. आपले जन्मदाता आई-वडील, काका-काकी, मामा-मामी, आत्यांजी-आत्या, आजी-आजोबा, इतर सगे-सोयरे ह्यांच्या प्रेमातून आपली वाढ होत जाते. पुढे शाळेत जाणे सुरू झाले की गुरूजन, आपले संवगडी. नंतर पुढे महाविद्यालयीन शिक्षण, तेथील मित्र. नोकरी-व्यवसायात आपल्याला ज्यांचे सानिध्य लाभते ते सहकारी व अधिकारी. ज्ञाती संस्था, सहकारी संस्था, सरकारी संस्था, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक उत्सव इत्यादींच्या सानिध्यामुळे आपण परिपक्व होत जातो. आपल्या जन्मापासून ते अंतिम यात्रेपर्यंत ही नात्याची साखळी आपल्या भोवती असते तिलाच संक्षिप्त रित्या समाज, आणि देश असे मानले जाते. जग, विश्व, परलोक इत्यादी हे प्रवासाचे पुढचे टप्पे आहेत. 

ऐश्वर्य हे केवळ आर्थिक प्राप्तीचा निकष लावून मोजवयाचे नसते. मनाची श्रीमंती, वर्तणूकीची श्रीमंती, वैचारिक श्रीमंती, शारिरीक व मानसिक शक्ती, संयम, शांती, इत्यादी बाबी ऐश्वर्यदर्शक असतात. ह्याशिवाय समाज, राज्य, देश इत्यादींचे ऐश्वर्य मोजण्यासाठी एखाद्या राज्यात वा देशात ज्ञानदान व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, न्याय व्यवस्था, राजकीय व्यवस्था, स्वच्छता, कायदा व सुव्यवस्था, सहिष्णूता, शांती, इत्यादी समाधानकारक आहेत का,  प्रत्येक क्षेत्रातील कारभार आणि त्यातून दिसणारी पारदर्शकता, नागरिकांचे व नेत्यांचे चारित्र्य,  सेनादले, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील तत्परता, शेती-उद्योग, पशुधन, ऊर्जा व अन्न निर्मिती ह्या सर्व बाबीं देवरूपी ऐश्वर्याची अनुभूती मिळू शकतील अशी परिमाणे वा निकष आहेत. कारण मानव ही ईश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे, आणि ही सृष्टी अधिक सृजन करण्याची जबाबदारी मानवाची आहे. सर्वांगिण विकास हेच खरेखुरे ऐश्वर्य मग ते व्यक्तीचे असो वा समाजाचे वा एखाद्या संस्थेचे. आपले ध्येय जितके व्यापक व उच्च, तितके आपण भगवंताचे दर्शन घेण्यास अधिक पात्र होतो. इंग्रजीत म्हटले जाते Low aim is crime. समर्थ रामदास स्वामीनी म्हटले आहे, " उत्कट तेचिं घ्यावे | मिळमिळीत अवघे टाकावें ||

जय योगेश्वर !

८ टिप्पण्या:

  1. सुंदर,चिंतनीय,देव आणी देवत्व याचे साध्या भाषेत सोदाहरण विवेचन !

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्या प्रतिसाद बद्दल धन्यवाद! असाच लोभ ठेवत राहा.

    उत्तर द्याहटवा
  3. संदीपजी, आपले मनःपुर्वक आभार. असेच सहकार्य सतत चालू राहू द्या ही विनंती.

    उत्तर द्याहटवा
  4. संदीपजी, धन्यवाद! असाच लोभ सतत ठेवा. ही विनंती

    उत्तर द्याहटवा
  5. संदीपजी, धन्यवाद असाच लोभ ठेवा ही विनंती.

    उत्तर द्याहटवा
  6. आपल्या देहातील देवाला प्रसन्न करण्यासाठी ध्येय आवश्यक असावे।
    म्हणजे हेच मुख्य ध्येय झाले। पुढचे सर्व subgoals, strategy.
    देहातील देव प्रसन्न केंव्हा? मी त्याचे विषयी कृतज्ञ राहुन त्यापोटी त्याचे काम करीन तर

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...