आसाम मधील नागरिक नोंदणीचा अंतिम मसुदा जाहीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे बांगला देशातील घुसखोरीचा आकडा जाहीर झाला. १९७१ साली पाकिस्तानातल्या गृहकलहातून पुर्व पाकिस्तानातल्या नागरिकांवर होणारा अत्याचार आणि तेथून आपल्या देशात येणार्या निर्वासितांचे लोंढे, पाहता माणुसकीच्या न्यायाने आपल्या देशाला युद्धात पडावे लागले. युद्धात आपला विजय झाला. पाकिस्तान देशापासून पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांगला देश निर्माण झाला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीच्या खंबीर नेतृत्वाची देशभर प्रशंसा झाली. तापलेल्या तव्यावर पोळी न भाजणारा एकही राजकीय पक्ष जागतिक क्षितीजावर उगवलेला नाही आणि उगवणारही नाही. कारण हे कलीयुग आहे. स्वाभाविकपणे पंतप्रधान इंदिरा गांधींनी मुदतपूर्व निवडणूका घेतल्या. भारतीय जनतेने काँग्रेसला न भूतो न भविष्यती असा विजय देऊन पुन्हा सत्तेवर बसविले. वाटले होते असे की बांगला देश आपल्या उपकाराबद्दल कायम कृतज्ञ राहील. परंतु बांगल देशाचे परराष्ट्र धोरण नेहमीच अस्थिर राहलेले आहे. त्या देशाला आपल्या देशापेक्षा चीनचा अधिक पुळका कधी येईल, हे सांगता येणार नाही. शिवाय अलिकडच्या काळात पंतप्रधान शेख हसीना यांचा हेफाझत आणि इतर प्रखर इस्लामी संघटनांशी वाढता घरोबा काही लपून राहिलेला नाही.
आपल्या देशाचा इतिहास सांगतो की आपला चांगुलपणा सतत आपल्या अंगाशी आलेला आहे. पृथ्वीराज चौहान ह्या राजाने महमंद घोरी सारख्या परकीय आक्रमकाचा सतरा वेळा पराभव करून त्याला क्षमा केले. पुढे झाले काय? अठराव्या लढाईत पृथ्वीराज हरला आणि घोरीने त्याला हाल हाल करून मारले. तेव्हा घोरीला मदत करणारा जयचंद राठोड आपलाच. आपल्या देशातील राजे-महाराजांच्या आपआपसातील दुहीमूळे देश एक हजार वर्षे पारतांत्र्यात अडकला. कोणाच्या ताब्यात होता देश? धर्माच्या नावाखाली आपआपसात रक्त सांडणार्या दोन जमातींकडे. पहीले मुस्लिम व दुसरे ख्रिश्चन. दोन्ही साम्राज्यवादी.
स्वातंत्र्य मिळाले. पण फाळणी होऊन. स्वतंत्र भूभाग दिला. सोबत एक्कावन कोटीची मदत दिली आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान निर्माण झाले. त्या बदल्यात आपल्याला काय मिळाले? देशाची फाळणी होते वेळीच पाकिस्तानातील मुस्लिमांनी लाखो हिंदू लोकांच्या वर अत्याचार केले; मालमत्तेची नासधूस केली; बायका-मूलींची अब्रू लुटली आणि जे काही हिंदू बांधव जीव मुठीत घेऊन भारतात आले ते ही रक्ताने माखलेल्या फाटक्या कपड्यात निर्वासितांसारखे. जे ह्या हिंदूस्थानचे मूळ रहिवासी त्यांची अशी अवस्था झाली. आपल्या देशातून जे मुस्लिम लोक नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात गेले तेही स्वखुषीने. ह्या देशातल्या हिंदूनी त्यांना सन्मानाने पाठविले आणि जे इथे राहीले त्यांना तर पुरोगामी पक्षांनी लाडके पुत्र मानले. हा आपल्या समाजाचा आणखीन एक चांगुलपणा. परंतु त्यामुळे हिंदु कायर, डरपोक, काफर आहेत ही भावना पाकमधील मुस्लिम बांधवात होती तशीच ती इथल्या काही जिहादी मुस्लिम बांधवातही रूजली आणि त्यातून हुरियत, सिम्मी, व ओवेसींच्या AIMIM सारख्या संघटना फोफावल्या. अर्थात त्यांना विरोध करणारे राष्ट्रीय बाण्याचे मुस्लिम बांधवही देशात सुदैवाने आहेत ही जमेची बाजू. पाठोपाठ पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. आपले जवान सडेतोड प्रत्युत्तर देत असतानाही आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूनी चांगूलपणा दाखविण्याच्या नादात काश्मीर प्रश्न नाहक युनोमध्ये नेला. झाले काय? एक तृतियांश काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यातच राहिला. जगभर त्या भागाचे पाकव्याप्त काश्मीर असे नाव झाले. त्याच भागात पाकिस्तानने आपल्यावर वारंवार हल्ले करणार्या खतरनाक दशहतवाद्यांचा अड्डा बनवून ठेवला. म्हणून स्वातंत्र्यानंतर काश्मीर सतत धुमसतच राहिले आहे.
पंचशील तत्त्वाखाली पहीले पंतप्रधान पंडीत नेहरूनी 'हिंदी-चीन भाई भाई 'असे धोरण आखले. देशाच्या संरक्षणांसाठी ना भक्कम तरतुद केली, ना सीमा सील केल्या. झाले काय? १९६२ साली चीनने आक्रमण केले आणि हजारो मैलाचा भूभाग चीनने बळकाविला. १९६५ मध्ये पाकिस्तानने पुन्हा युद्धाची आगळीक केली. आपला विजय झाला. अफगाणसंबंधीत अमेरिका आणि रशियामध्ये शीत युद्ध होते त्या वेळेचा काळ तो. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धाचा शेवट तहाने झाला. कुठे तर रशियातील ताश्कंदला. आपण युद्धात मिळविलेला पाकिस्तानचा भूभाग परत केला. काय आले आपल्या हातात? त्या युद्धातील विजयाचे शिल्पकार तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींजींचा ताश्कंद येथेच अकल्पीत रित्या मृत्यु झाला; हादरलेल्या, भेदरलेल्या स्थितीत सारा भारत; शास्त्रीजींचा पार्थीव देहच काय तो पाहत राहिला. देशाच्या सर्वोच्च नेत्याचा परदेशात झालेला गुढ मृत्यू इतक्या सहजासहजी इतर कोणत्याही सरकारने मान्य केला नसता.
१९७१ साली बांगला देशाच्या निर्मीतीसाठी झालेल्या युद्धात विजय मिळाला. आपला फायदा काय झाला? शूर जवान गमाविले; युद्धात तिजोरी खाली झाली; आणि बांगला देशाच्या पुनर्निर्माणासाठीची तरतूद भरून काढण्यासाठी कितीतरी वर्षे प्रजेच्या खिशातून सार्वजनिक बस सेवेच्या तिकाटात पन्नास पैसे अधिक घेतले गेले. त्या बदल्यात आपल्याला काय मिळाले? बांगला देशातील नागरिक लाखोंच्या संख्येने भारतातल्या ईशान्ये कडील राज्यात बेकायदा रितीने कायमचेच वास्तव्य करण्यासाठी येऊ लागले. त्याच्यांसोबत त्यांच्या देशात ब्रह्मदेशातून येणार्या रोहींग्ये मुस्लीम तसेच पाक पुरस्कृत दशहतवादी ही ईशान्य भारतात घुसलेले आहेत. एकट्या आसाममध्ये ४० लाख बांगला देशातील मुस्लिम नागरिक बेकायदा रितीने घुसखोरी झाली असल्याचा अहवाल आता बाहेर आला आहे. हा आकडा तयार करतेवेळी काही खर्या भारतीय नागरीकावर अन्याय झालेला आहे पण ती प्रशासनीय कामातील चुक आहे असे म्हणत महाप्रबंधक आणि जनगणना आयुक्त शैलेश ह्यांनी भारतीय नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, त्यांच्या वरील अन्याय दुर केला जाईल अशी हमी दिली आहे. त्यामुळे केवळ त्या कारणाचं निमित्त करून ह्या आकड्यांचे राजकीयकरण करण्याचे विरोधी पक्षाचे विशेषतः तृणमूल काँग्रेस, साम्यवादी, काँग्रेस पक्षाचे प्रयत्न समर्थनीय ठरू शकत नाहीत. साम्यवादी आणि तृणमूल काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांना ह्या घुसखोर्यामधील गुंडाची मदत ईशान्य भारतात निवडणूकात होत आलेली असावी, त्यामुळे त्यांचा आक्रास्तळेपणा होत आहे. परंतु काँग्रेस पक्षाने ह्याबाबतीत सुज्ञपणा दाखवावयास हवा. कारण ह्या समस्यासंबंधीचे गांभीर्य माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनाही कळले होते. परंतु ह्या दोन्ही नेत्यांनीही, ना सीमापार होणारा आंतकवाद थांबविला, ना घुसखोरी थांबविली. सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून पंजाब मधील खलिस्थान चळवळ मोडून टाकली. मग मस्जीद, मदरेशात आंतकवादी लपले जातात, तिथे कडवा धर्माभिमान शिकवला जातो. तिथे का नाही लष्करी कारवाईचे धाडस दाखविले? ख्रिश्चन धर्मगुरूंना चर्च मधून राष्ट्रवाद्यांना निवडणूकीत पराभव करा असे पत्रक काढण्याची हिम्मत कोणाच्या पांठीब्यावरून मिळते? हिंदु समाजातील लोकांचे कुठे बळजबरीने तर कुठे अमिष दाखवून धर्मातंर केले जाते, तिथे लष्करी कारवाई करण्याचे धाडस का दाखविले नाही?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची सुरूवात मोदी सरकारने केली आहे. विरोधकांनी संसदेत भाजपा अध्यक्ष अमित शहांना बोलू न देण्यासाठी हवे ते करा, सर्वधर्म समभाव संकटात आहे असा टाहो कितीही फोडा, देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे अशी कितीही आदळआपट करा; विदेशी आर्थिक सहाय्य घेऊन, देशात विविध समस्यांचा पुरेसा अभ्यास न करता कितीही अंदोलने करून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करा, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करा; देशके टुकडे होगे हजार, हमें चाहीये आझादी, घर घरसे अफजल निकलेगा, अशा आक्रमक घोषणा देणारे, मेवानी-कन्हैया, कितीही निर्माण करा, माओवाद्यांनी सशस्त्र क्रान्ती करण्याचे सत्र आणखिन कितीही जोरात करा, पंतप्रधान मोदींना जितक्या शिव्या देता येतील तितक्या दिल्या, तरी आपली छाती ५६ इंचाची आहे तसेच हे राष्ट्र मिश्र संस्कृतीचे (अभिप्रेत अर्थ अल्पसंख्यांकाच्या लांगूलचालनापायी देशहित विसरणे) नसून मुलतः सर्वसमावेशक हिंदु संस्कृतीचे आहे ह्याचा सढळ पुरावा दिल्याशिवाय पंतप्रधान मोदी थांबतील असे दिसत नाही.
आता आपण म्हणाल, भाजपा राजकारण करीत आहे. परंतु वर नमूद केलेल्या देशापुढील समस्यांचे मूळ स्वातंत्र्य पुर्वकाळातील काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीत आणि रणनीतीत दडलेले आहे. लोकमान्य टिळक असे पर्यंत स्वराज्यासंबंधीची जागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती सारखे कार्यक्रम सुरू झाले. काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथम वंदे मातरम् गायल्या शिवाय कामकाज सुरू होत नव्हते. पण दुर्दैवाने लोकमान्य टिळक आपल्यातून निघून गेले. नंतर स्वराज्य लढ्याला सत्तातंराच्या मोहीमेच स्वरूप आले. मुस्लिम बांधवांना स्वातंत्र्य संग्रमात सामील करण्यासाठी खिलाफत स्थापनेचा संबंध स्वातंत्र्य संग्रामाशी जोडण्याची इच्छा काँग्रेसमधील अग्रणी नेते, महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरूनां कोठून उत्पन्न झाली देव जाणो. बस मुस्लिम लिग पेक्षा आपण कसे मुसलमानांचे खरे नेतृत्व करतो हे बिंबवण्यासाठी मुस्लिम बांधवांना गोंजरण्याची सुरूवात झाली. पुढे त्यांच्यातील धर्मांध हिंसक वृत्तीना वेळप्रसंगी आपल्या बलिदानाने बदलून घेता येइल का ह्याचे प्रयोगही झाले ( संदर्भ - गांधीजींनी देशाच्या फाळणी दरम्यानच्या काळात हिंदूनिर्वासितांना केलेले उपदेश पहावेत). ती परंपरा आजतागायत सुरू आहे. गांधीजींच्या ठिकाणी महात्मा होण्यासारखी वैशिष्टे जरूर होती, त्याबाबत दुमत नाही. त्यांनी रामराज्याची कल्पना मांडली. अकबरराज्याची कल्पना मांडली नाही. महात्मा गांधीजींच्या त्यागा बद्दल शंका नाही. त्यातून प्रेरणा घेऊन अज्ञान व दुष्ट रूढी निर्मूलन, साक्षरता प्रसार, व्यसन मुक्ती, अस्पृशता निवारण, स्वच्छता स्वावलंबन इत्यादी कार्ये करता आली आणि केली जातही आहेत. पण एका हातात आत्यंतिक अहिंसा हे शस्त्र धरून दुसर्या हातात खिलापत चळवळ हाती घेत स्वतंत्र मतदार संघ मुस्लीम बांधवासाठी राखीव करण्यात का आले हे समजण्याच्या पलिकडचे ठरले. तरीही मुस्लिम नेते आणि बहुतांश मुस्लीम बांधवाची सत्तेची भूक आणि स्वतंत्र भूभाग मिळविण्याची आस थांबली नाही. ब्रिटीशांना आपली सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेसचे नेतृत्व मवाळ नेत्यांच्या हातात राहणे सोयीचे पडत गेले. त्यांनी सारी शक्ती फोडा आणि झोडा ह्या तत्त्वावर केंद्रीत केली. त्यांनी झोडपले कोणाला? तर प्रखर राष्ट्रवादाची लोकमान्य टिळकांकडून दिक्षा मिळालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोसच्या नेतृत्वाखालील क्रातीकारांना. ना गांधीना झोडपले ना नेहरूंना झोडपले ना मुस्लीम लिगच्या नेत्यांना. अखेर धर्माच्या नावावर पाकिस्तान निर्माण झाले. त्यावेळी सच्चे गांधीवादी जयप्रकाश नारायण ह्यांनीही गांधीजी ऐवजी सरदार वल्लभभाई ह्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व असावयास हवे होते असे उद्गार काढले. थोर समाजवादी आणि गांधीवादी विचारवंत अच्युतराव पटवर्धन ह्यांनी मुसलमानांच्या प्रश्नाबाबत महात्मा गांधीजी आणि पंडीत नेहरूंनी केलेल्या चुका दाखविल्या आहेत. साने गुरूजींनी भारतीय संस्कृती ह्या पुस्तकात वैदिक मंत्र तसेच रामायण- महाभारत हे आपल्या संस्कृतीचे धागे मानले आहेत. डाॅ राम मनोहर लोहियांची तीच धारणा होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनीही हिंदू संस्कृतीशी नाळ असलेला बौद्ध धर्म त्याचमुळे स्विकारला. पाकिस्तान धर्माच्या आधारावर निर्माण झालेले नाही. ते निव्वळ धर्माच्या नावावर निर्माण झाले आहे म्हणजेच पाकिस्तान अधर्मानेच निर्माण झाले. काटेरी झुडपांवर आंबा-फणसाची कलमे करता येत नाही. हे सत्य दडविण्यासाठी धर्म राजकारणात नको असा टाहो करीत राहावयाचे, पाकपुरस्कृत हुरियत, हैद्राबादी ओवेसींना गोजारायचे व हिंदूत्ववादी नेत्यांना झोडपण्याचे काम आजतागायत सुरू आहे. परंतु सत्य फार काळ दडपता येत नाही. म्हणून २०१४ साली नविन सरकार दिल्लीत अस्तित्वात आले आणि ज्या विचारांवर व मुल्यांवर त्या सरकारला लोकांनी पांठीबा दिला आहे, ती विचारसरणी अवलंबात आणणे ह्याला सत्तेचा दुरूपयोग म्हणता येत नाही.घटनेच्या चौकटीत राष्ट्रहितासाठी जे जे करता येईल ते करण्याचे सरकारचे कर्तव्यच आहे. विरोधी पक्ष आणि काही मिडीयातील विचारवंत संघाचा अजेंडा सरकार राबवित असा आरोप करीत असतात ते लोकशाही मुल्याशी सुसंगत ठरत नाही. संघासारख्या संघटनेवर सतत टिका करता करता विरोधी पक्षांची शक्ती क्षीण होत चालली आहे. ह्याची जाणीव विरोधी पक्षांना होत आहे. म्हणून राहूल गांधी हिंदू मंदिरात जाऊ लागले. मोहरमसाठी दुर्गा विसर्जन सोहळा पुढे ढकलणार्या ममता बॅनर्जीं दुर्गादेवीच्या पायापुढे आज लोटांगण घालू लागल्या आहेत. पण लोकांना हे सारं नौटंकी वाटते. सार्या विरोधी पक्षांची स्थिती 'कळतेय पण वळत नाही' अशी झालेली दिसत आहे.
काश्मिरच्या Demography ची चिंता वाटणार्या विरोधकांना तिथे इतर राज्यातील भारतीय नागरीकही नको असतात. मात्र आसाम व आसपासच्या प्रांतात परकीयांची घुसखोरी राजरोस इतकी वर्ष चालली आणि त्यावर काही कारवाई प्रशासनाने वा सुरक्षा दलाने केली की विरोधी पक्ष, आणि तथाकथीत विचारवंत, मिडीयातील पुरोगामी-साम्यवादी-समाजवादी संपादक मंडळी, मुस्लीम पर्सनल बोर्ड, ख्रिश्चन धर्मगुरू इत्यादींना मानवतावादी दृष्टीकोण आठवतो. NRC मुळे गृहयुध्दाची धमकी देण्यापर्यंत ममता बॅनर्जींची मजल गेली आहे ह्यातच विरोधी पक्षांना देशापेक्षा मतपेटीचे सोयर सुतक अधिक आहे,.असेच दिसते. धोका परकियांपेक्षा आपल्याच व्यवस्थेतील आत्मघातकी जयचंदी वृत्तीचा अधिक आहे. अशा वृत्तीची बदलत्या भारतात डाळ शिजेल असे वाटत नाही.
सडेतोड,मुद्देसुद विश्लेषण!भारतीय मतदार जागरुक आहे, ममतासारख्यांना त्याची प्रचीती येईलच, त्याच भयापोटी हा दांभिक आक्रोष चालु आहे.चालु दे, त्यातुन मोदींचेच हात आणखी भक्कम होतील.
उत्तर द्याहटवा