शुक्रवार, २७ जुलै, २०१८

गुरू पौर्णिमा-पुज्य पांडुरंगशास्त्रीजींच्या शब्दात



आज आषाढ शुद्ध पौर्णिमा. ह्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा तसेच गुरू पौर्णिमा असेही म्हटले जाते. आपल्या देशात वैदिक काळात संस्कृती घडविण्याचे काम वेगवेगळ्या रीतींने अनेक ऋषींनी केले आहे. पण महर्षी वेदव्यासांनी सर्व विचाराचे संकलन करून आपल्याला संस्कृतीचा ज्ञानकोष असा महाभारत ग्रंथ दिला. भारतः पन्चमो वेदः असे म्हटले गेले. महाभारत ह्या ग्रंथाला पाचव्या वेदाची उपमा प्राप्त झाली. महाभारताद्वारे व्यासांनी सांस्कृतिक विचार द्दष्टान्तासहित सरळ भाषेत समाजासमोर ठेवला. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने मुनिनामप्यहम् व्यासः असे विभूती योगात म्हणत व्यासांचा गौरव केला आहे. संस्कृती घडवितांना व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार ह्या दोन्ही आदर्शाकडे महर्षी व्यासांनी अभेद दृष्टीने पाहीले. अभ्युदय आणि निःश्रेयस ह्या दोहोंचा समन्वय साधता कसा येईल ह्यावर चिंतन करून त्यांनी ग्रंथ लेखन केले. म्हणून अध्यात्म परायण असे महर्षी व्यास एक अग्रणी समाजशास्त्रज्ञ ठरले. त्यांचे वैदिक व लौकीक ज्ञान एवढे अमर्याद होते की, 'व्यासोच्छिष्टं जगत् सर्व ' आणि महाभारताला 'सारं विश्वस्य' असे म्हटले गेले. सार्या मानव जातीला कवेत घेणारे साहित्य निर्मिती त्यांनी केली. पुढे त्यांनी पुराणेही लिहली. एका परिने महर्षी व्यासांना हिंदू संस्कृतीचा प्रणेता अशी मान्यता मिळाली. वेदव्यासांचे जीवन व कथन अमर बनविण्यासाठी त्यांच्या अनुयायी चिंतकांनी, संस्कृतीचा प्रचार करणार्या सर्वानी त्यांच्यासाठी' व्यास' संबोधन निश्चित केले. सांस्कृतिक विचार ज्या पिठावरून सांगितले जात होते त्याचे नाव व्यासपीठ म्हणून रूढ झाले. प्रणेता ह्या शब्दाला साधा पर्यायी शब्द म्हणजे गुरू. पंरपंरागत सुरू झालेली व्यासपूजा पुढे गुरूपुजा मानली गेली. तो दिवस आषाढ शुद्ध पौर्णिमा. 

पुज्यनीय शास्त्रीजींनी महर्षि व्यासांची महत्ती आपल्यासमोर मांडून व्यास पौर्णिमेचे नाव गुरू पौर्णिमा कसे झाले ; सांस्कृतिक कार्यक्रमाला जो मंच उभा केला जातो त्याचे नाव व्यासपिठ कसे झाले अशी माहिती देऊन शास्त्रीजींनी आपल्यावर फार उपकार केले आहेत असेच मानावयास हवे. कारण आपण सामान्यजन कुठे पुराणे, गीता, उपनिषदे वाचायला बसतो? सतत व्यासपिठाचा उच्चार करीत असतो पण व्यासपीठ म्हणजे काय हे आपणास ठाऊक होते कुठे? धर्मशास्त्रातील कर्मे करतो पण त्याचा अर्थ, त्यामागील धार्मिक, वैज्ञानिक, शारीरशास्त्रीय , सामाजिक इत्यादी कारणे काय आहेत हे कुठे ठाऊक होते? या संबंधीतील सारी माहिती सरळ आणि सोप्या भाषेत 'संस्कृती पूजन ' हे पुस्तकाद्वारे आपल्या समोर ठेवून आपल्यासारख्या सामान्यजनांत शुद्ध भक्तीभाव निर्माण केल्याबद्दल शास्त्रीजींचे धन्यवाद व्यक्त करावयास शब्द अपूरे पडतात. आजच्या गुरू पौर्णिमेच्या शुभ पर्वावर त्यांना कोटी कोटी प्रणाम! 

सामान्यतः आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांचा आपण आदर करतो, ज्यांचा आपल्याला आधार वाटतो अशा व्यक्ती आपल्या जीवनात बर्यापैकी संख्येने येतात. परंतु आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांचा आदर करतो तसेच जे आपल्याला आधारवड असतात आणि त्याही पलिकडे जाऊन आपल्याला ज्यांची भक्ती कराविसी वाटते अशा व्यक्ती दुर्मीळ असतात. अशा लोकांना आचार्य, गुरू संबोधले जाते. व्यक्तीगत जीवनात माता-पिता, आप्त आणि आप्तांच्या व्यतिरिक्तही गुरू असतात. मानवी जीवनाच्या कक्षा इतक्या विस्तारल्या आहेत की प्रत्येक क्षेत्रात गुरू आवश्यक असतात. मानवाने जी अनेक क्षेत्रात प्रगती केली ती पुर्वाश्रमींनी केलेल्या संशोधन, निष्कर्षाच्या आधारेच. मानवाने प्रगती केली पण पशू-पक्ष्यांचे काय? त्यांच्यात गुरू-शिष्य पंरपंरा आहे का? ना पक्षी आपल्या पिल्लांना उडण्याची कला शिकवतो, ना सिंह आपल्या बछड्याला शिकार शिकवितो. आपण आपली उन्नती करू शकतो ही जाणिव मानवातच आहे. म्हणून त्याला गुरूची आवश्यकता वाटते. दुसरे असे कि, आर्य चाणक्य म्हणत की,' प्रगतीद्वारा येणारी प्रत्येक नवीन सुविधा, एका असुविधेला अथवा दुष्परिणामांना जन्म देत असते.' म्हणून संस्कृती आणि समाज व्यवस्थेचं, सामाजिक स्वास्थ्याचे रक्षण करण्यासाठी जी व्यवस्था आपल्या समाजात आहे त्याचे नाव आहे 'गुरू-शिष्य पंरपंरा'. ती अबाधित राहणे गरजेचे असते. कारण गुरू हा मानव आणि ईश्वर यांच्यातील एक दुवा असतो. म्हणून आज भारतभर गुरू-पुजनाचा उत्सव साजरा होत असतो.

गुरू पूजन का हवे ह्याचे उत्तर देताना पुजनीय पांडुरंग शास्त्रीजी म्हणतात, जसे निर्जीव वस्तू वर फेकण्यासाठी जशी सजीव वस्तूची गरज(मानवी हाताची) लागते तशीच साधारणतः जीवनहीन व पशुतुल्य बनलेल्या मानवाला देवत्वाकडे पाठविण्यासाठी जीवंत व्यक्तीची आवश्यकता भासते. ही व्यक्ती म्हणजेच गुरू. मानवाला देवत्वा कडे जाण्याच्या वाटेवर स्वतःच्या पशुतुल्य वृत्तीवर संयम ठेवावा लागतो. ही संयमाची प्रेरणा त्याला गुरूच्या जीवनातून मिळत असते. गुरू म्हणजे जो लघु नाही तो आणि लघुला जो गुरू बनवितो तो. गुरूपुजन म्हणजे ध्येयपूजन. गुरूचे जीवन ध्येयमूर्तीसारखे असते. ध्येयाचे साकार रूप असते. मानवाच्या जीवनात ध्येय येताच संयम येतो. संयमाने शक्ती संग्रह होत जातो आणि या शक्तीनेच मानव ध्येयाच्या जवळ जातो आणि शेवटी साक्षात्कार होतो.
गुरूच्या उपकारानी ज्याचे हृदय भरून आले की त्याच्या मुखातून आपोआप कृतज्ञता बाहेर पडते--

गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः |
गुरूः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः || 

ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणाचा निर्मात; विष्णूप्रमाणे सद्वृत्तीचा पालक व महादेवाप्रमाणे दुर्गुण व दुर्वृत्तीचा संहारक, तसाच जीव व शिव ह्यांचे मिलन करणारा गुरू हा साक्षात परब्रह्मासमान आहे. अशा गुरूचे पुजन हे भारतीय संस्कृतीचे सुमधुर व भावार्द काव्य आहे. गुरूजवळ पोहताच बुद्धी ग्रहणशील बनते. त्याचा सहवासच इतका मधुर असतो की, त्याच्यापासून दूर होणे मनातच येत नाही. त्याच्या एका चित्ताने वर्षानुवर्षाचा थकवा दूर होतो. त्याची कृपादृष्टी होताच मनाची मलिनता दूर होते. म्हणून गुरू पूजन होत असते. गुरूबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. त्या भावनेतून एखादी वस्तू वा दक्षिणा गुरूच्या चरणी वाहण्याची पंरपंरा सुरू झाली आहे.

शास्त्रीजी पुढे म्हणतात, 'मी कोणाचा तरी आहे ' हा मधुर भाव त्यात आहे. ह्या भावनेत कृतज्ञता असते. जनकाचे गुरू याज्ञवल्क्य होते आणि शुकाचार्याचे गुरू जनक होते. सांदीपनीचा शिष्य म्हणवून घेण्यात कृष्ण व सुदामा गौरव मानीत होते. विश्वामित्राची सेवा करण्यामध्ये राम व लक्ष्मण कधी थकत नव्हते. वेद, उपमन्यु किंवा आरूणी ह्यांना धौम्य ऋषी गुरू लाभले ह्याबद्दल ते स्वतःला धन्याता समजत होते. द्रोणाबद्दल अर्जुनाच्या मनात असलेला नाजूक भावच त्याला युद्धकर्तव्यात थोडा शिथिल बनवितो. परशुरामापासून ज्ञान प्राप्त करण्यासाठी कर्णाने खूप कष्ट घेतले. शुक्रचार्यापासून संजीवनी प्राप्त करणार्या कचाची ज्ञाननिष्ठा व गुरूभक्ती आजही आपल्याला नतमस्तक बनविते. गंडपदाचार्याचे नाव येताच शंकराचार्य भावविभोर होत असत. पाश्चात्य देशातही ' मी अमक्याचा शिष्य आहे ' असे मानण्यात गौरव अनुभवतात.' मी साॅक्रेटीसाचा शिष्य आहे ' असे समजण्यात प्लेटो स्वतःला कृतकृत्य समजत होता. तर 'प्लेटो माझा गुरू आहे ' असे सांगण्यात आॅरिस्टाॅटल स्वतःचे जीवन धन्य समजत होता.

पुज्यनीय शास्त्रीजींनी गुरू-शिष्य पंरपंरा विशद करून आपण शिष्य कसे असलो पाहिजे हे ही अप्रत्यक्षपणे वरती सांगितले आहे. मनुष्य कितीही बुद्धिमान असला तरी गुरू केल्या शिवाय त्याला खरे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. अशी भारतात सार्वत्रिक मान्यता आहे. ज्याच्या ठिकाणी अहंकार नसेल आणि जो ज्ञानार्त असेल तोच गुरू करील आणि त्याच्याच ज्ञानाला काही आकार येऊ शकतो. पंढरपुरच्या विठ्ठलाचा नामदेव किती परमभक्त! पण ज्ञाना शिवाय नाम ही अधुरे असते. म्हणून देवाने नामदेवाला विसोबा खेचरांना गुरू करण्याविषयी पुनः पुनः स्वप्नादेश दिला. म्हणून "गुरूपुजन म्हणजे ज्ञानाचे पुजन, अनुभवाचे पुजन, सत्याचे पुजन." गुरू-शिष्य परंपरा ही मानव जातीतच आहे. एका पिढ्याकडून दुसर्या पिढीला ज्ञानाची पुंजी सरकत गेली म्हणून मानव प्रगत झाला. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक शतकात ज्ञानी, तसेच शिक्षण, आरोग्य, विज्ञान, कला, उद्योग, शेती इत्यादी क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याचे कसब असलेली मंडळीच प्रायः गुरूपदावर आरूढ होत आलेली आहेत. गुरू-शिष्य पंरपंरा म्हणजे ज्ञानाची गंगोत्रीच. गुरूशिष्य पंरपंरेमुळे मनुष्याला अनंत काळाचा वारसा प्राप्त झाला. गुरूशिष्य पंरपंरा म्हणजे मानवाच्या व्यापकतेचा आणि एकात्मतेचा साक्षात्कार आहे. संसहवेदना हे मानवाचे एक वैशिष्य आहे. गवसलेल्या गोष्टीचा आपण एकट्यानेच उपभोग घेणे ही पाशवी वृत्ती आहे. आपल्याला मिळालेली वस्तु इतरांना वाटावी ही मानवाची सहज प्रवृत्ती. तिच्यामुळेच गुरू-शिष्य पंरपंरा सुरू झालेली दिसते.
जें जें आपणास ठावे | तें तें इतरांस शिकवावे | शहाणे करून सोडावे | सकल जन | 
ह्याच मानवी स्वभावातून गुरू- शिष्य परंपंरा निर्माण झालेली दिसते. 

क्षेत्र कुठलेही असो प्रत्येक क्षेत्रातल्या गुरूचे वर्तन, स्वभाव, शिष्यासंबंधीची ओढ, इत्यादी गुण-वैशिष्टे कमी अधिक प्रमाणात सारखीच असतात. 
पुढे शास्त्रीजी गुरू कसा असतो, ह्याचे वर्णन पुजनीय संस्कृतमधून लिहून मराठीत अर्थ समजून देतात, 



ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तीं |
द्वंदातीत गगनसद्दशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ||
एकं नित्यं विमलमंचलं सर्वधीसाक्षिभूतं |
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरू तं नमामि || 



ब्रह्माचा आनंदरूप, परमसुखरूप,ज्ञानमूर्ती, द्वंदापासून दूर, आकाशासारखा निर्लेप व सूक्ष्म, तत्त्वामसि तोच तू आहेस, हे ईशतत्त्व तूच आहेस त्याची अनुभूती हेच ज्याचे लक्ष्य आहे; अद्वितीय, नित्य, विमल, अचल, कोणत्याही मनाच्या पलिकडे, त्रिगुणरहित, अशा सद्गुरूला मी नमस्कार करतो.'

शेवटी शास्त्रीजी म्हणतात असा गुरू मिळाला नाही तर? ' कृष्णं वन्दे जगदूगुरूम् '. भगवान कृष्णाला गुरू मानून त्याने गीतेत सांगितलेल्या जीवनपंथावरून चालणे हैच श्रेयस्कर.' त्यासाठी स्वाध्याय परिवाराच्या आश्रयास जाऊन तेथून ' कृष्ण चरीत्र ' व 'गीतामृत ' ही पुस्तके घेऊन वाचावित आणि त्यातील बोधावरून जीवनाचा प्रवास केला की खरे गुरूपुजन होईल आणि गुरूला खरी दक्षिणा मिळाल्यासारखे होईल.



जय योगेश्वर !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...