आज आषाढी एकादशी. आपल्या हिंदू मान्यतेनुसार भगवंत चार महीन्यासाठी झोपी जातात. म्हणून ह्याला देवशयनी एकादशी म्हणतात. आपल्या धर्मातील आणखिन एक मान्यता माझ्या वाचनात आली आहे. त्यात चार युगाचे वर्णन एका वाक्यात केलेले आहे. आपण जेव्हा झोपलेलो असतो ते कलीयुग. झोपेतून जागे होतो तेव्हा द्वापार युग सुरू होते. जाग आल्यावर आपण उभे राहतो तेव्हा त्रेता युग असते. आणि आपण जेव्हा चालायला लागतो तेव्हा सत्ययुग असते. आता आपण ह्याच मान्यतेचा अर्थ काय असावा ते पाहू या. जेव्हा सर्वत्र सत्याचा संचार असतो ते सत्ययुग. सत्याचा विसर पडयाला सुरूवात झाली की त्रेतायुग सुरू होत असावे. सत्याचा विपर्यास सुरू झाला की द्वापारयुग सुरू होत असावे. आणि सत्य नष्ट होत जाऊन असत्य आणि अधर्माचे राज्य सर्वत्र माजते तेव्हा ते कलीयुग असते. जेव्हा आपण झोपतो ते कलीयुग असे वर्णन असल्यामुळे भगवंत झोपी जातात म्हणजे काय असावे? हा प्रश्न सहज आपल्या मनात उठतो. असा प्रश्न आपल्या मनात आला कि निश्चीतपणे आपण समजावे की भक्त होण्यासाठी आपले पहीले पाऊल पडले आहे. खाली दिलेले उत्तर वाचले की भगवंताच्या लाडक्या भक्ताच्या घरात आपला प्रवेश झाला अशी आपली खात्री होईल.
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पुज्यनीय पांडुरंगशास्त्री उर्फ दादा आठवले ह्यांनी आपल्या संस्कृती-पूजन ह्या पुस्तकात आपल्या बहूतांश सण, उत्सव, प्रतिकांच्या पाठीमागे व्यक्ती आणि समाजाची ऐहिक व परलौकीक उन्नतीचं प्रयोजन असते, हे उत्तमरित्या मांडले आहे. देव झोपी जातो म्हणजे काय, त्यातून शास्त्रकारांना काय अभिप्रेत आहे, ह्या संबंधींचं निरूपण वाचू या, पुज्यनीय दादांच्या शब्दात.
"या दिवसापासून चार महिने प्रभू झोपी जातो. ' मला जे आवडते ते प्रभूला आवडते.' या भावानेच भक्त प्रभूला फूल, अत्तर, प्रसाद इत्यादि वस्तू अर्पण करतो. भक्ताला स्नान आवडते म्हणून तो देवालाही स्नान घालतो. भक्ताला उत्तम उत्तम कपडे घालायला आवडते म्हणून प्रभूलाही सुंदर, जरीचे कपडे घालतो. काम करून स्वतः थकून जातो म्हणून त्याचा भगवानही आराम करतो. कारण, विश्वाचा व्यवहार चालवता चालवता तो थकून जात असेल. म्हणून त्यालाही आराम पाहिजे. त्यानेही चातुर्मासात झोपले पाहिजे असा भक्तिशील हट्ट देखील भक्ताने केलेला असेल. हा भक्तिशील हट्ट देवशयनी या कल्पनेत सौंदर्य व माधुर्य आणतो."
"माणूस जसा थकून जातो, तसा केव्हा केव्हा कंटाळूनही झोपी जातो. जिद्दी मुलांना कंटाळून ' तुला योग्य वाटते ते कर' असे बोलून पुष्कळ वेळा आई किंवा वडील झोपी जातात; तसे तर भगवंताचे मानवाच्या बाबतीत होत नसेल ना?"
पुज्यनीय दादा पुढे म्हणतात, "काही वेळा दुसर्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी माणूस झोपी जातो. फंड किंवा वर्गणी गोळा करणारे लोक येतात तेव्हा पुष्कळ वेळा माणूस त्यांच्यापासून वाचण्यासाठी जाणून बुजून झोपी जातो. शंकर कैलासात निघून गेले व विष्णू क्षीरसागरात झोपले ते अशा लोकांपासून स्वतःहाला वाचविण्यासाठी तर नाहीत ना?"
पुज्यनीय दादांच्या मनात आलेले असे प्रश्न ऐकताना वाटते की आपली संतमंडळी जसे देवाला प्रश्न विचारीत तद्वत दादा साक्षात पांडुरंगालाच हे प्रश्न विचारीत असावेत. कारण त्यांच्या वाणीत, लेखणीत, संताच्या वाणीतला आणि लेखणीतला लाडीकपणा दिसतो. आपले संपूर्ण जीवन भक्तीमय झाले की भगवंतापाशी भक्त हट्ट करू शकतो, हेच खरे. पुज्यनीय दादांची ईश्वरनिष्ठा आणि समाजिक बांधिलकी उच्च कोटीची होती. समाजातील उच्च-निच्चता, राजस आणि तामस वृत्तीची सतत होणारी वाढ थांबवून सात्विक वृत्तीचा अंगिकार करण्यासाठी समाज बांधवांना प्ररीत करण्याची साध्या आणि सोप्या भाषेतील प्रयोग शाळा म्हणजे त्यांच्या पाठशाळा. समता ही कायद्यापेक्षा ममतेने आणि अध्यात्मिक अधिष्ठानातून होऊ शकते. त्यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला 'स्वाध्याय परिवार' ह्यातील परिवार हा शब्दच दर्शवितो की 'आम्हां सार्या देशवासीयांची ओळख फक्त आणि फक्त बंधुत्वाने होईल,अन्य कुठल्याही शब्दाने होऊ शकत नाही.' आधुनिक जीवनशैलीतून सर्वत्र उत्पन्न होत असलेल्या व्यसनाधिनतेच्या रोगाचं भक्तीमार्गाने उच्चाटन करणारे, आपल्या धरतीमातेला सतत हिरवागार शालू परिधान करता यावा ह्यासाठी वृक्षारोहणाचे कार्य करणारे महामानव म्हणजे पुजनीय पांडुरंगशास्त्री आठवलेजी. 'ज्ञानाशिवाय भक्ती अपुरी, भक्तीशिवाय ज्ञान अपूरे' आणि ह्या दोन्ही गोष्टीं शिवाय कर्म अधांतरीत राहते. हेच तत्व मानवी जीवनात शांती निर्माण करू शकते हे त्यांनी आपल्या जीवनयात्रेतून सिध्द केले आहे. पुज्यनीय दादांचं व्यक्तीमत्व म्हणजे ज्ञानयोग,भक्तीयोग आणि कर्मयोगाचा विलोभनीय संगम. म्हणूनच देव चार महिन्यासाठी झोपी जातात म्हणजे काय ह्या प्रश्नांचे उत्तर ते लिलयाने तितक्याच मातेच्या ममत्वाने समजावून देतात.
पुढे ते म्हणतात, "भगवंताच्या मंदिरात लहान मोठ्या लोकांची जी गर्दी होते ती मागणार्यांची असते. भगवंताकडे मागणे यात वाईट काही नाही. मागणार्याला भगवान देतो देखील. पण भगवंताला आनंद तर तेव्हाच होतो की, जेव्हा कोणी तरी त्याला निरपेक्षरीत्या भेटायला येतो अथवा स्वतःच्या कर्माची फळे भगवंताच्या चरणावर अर्पण करायला येतो."
देवशयनी एकादशी संबंधीचे दादांचे हे निरूपण आता भक्तीयोगातून कर्मयोगाकडे वळते. पण मायेचा ओलाव्यात काही कमी पडू देत नाहीत. ते म्हणतात, "या सर्व कल्पनाहून श्रेष्ठ अशी एक कल्पना आहे आणि ती म्हणजे कर्मयोग्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान झोपी जातो. प्रभू जे चार महीने झोपी जातो त्याला आपल्या देशात चातुर्मास म्हणतात. सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपी गेला तर सृष्टीचा व्यवहार चालणार नाही, मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात, ज्यावेळी सर्व सृष्टीसाठी जल व अन्नाची व्यवस्था करायची असते त्यावेळीच भगवान झोपतो हे कसे चालेल? त्यामुळे काही लोकांना 'भगवान झोपतो ही कल्पना जुनी, पुराणातून शोधून काढलेली कथा आहे असे वाटते. पण तसे नाही. वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य सोळाही कलांनी फुलून उठते. मानवाला जीवन मिळते. शेतकर्याला मुबलक पीक मिळते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरते. भगवंताच्या या कृपेने न्हाऊन निघालेला कृतज्ञ बुद्धीचा मानव प्रभूचे गुण गाताना थकत नाही. 'माझे वैभव हे तुझ्या कृपेचे फळ आहे.' असे जेव्हा मानव प्रभूला सांगतो त्यावेळी प्रभू त्याला जणू उत्तर देतो की,'मला माहित नाही. हे सर्व वैभव तुझ्या परिश्रमाचे फळ आहे. मी तर चार महिने झोपी गेलो होतो.' काम करताना सतत जागृत राहणे आणि फळ येते त्यावेळी माहित नसल्याचा बहाण करून झोपी गेलो होतो असे सांगणे ह्याच्यापेक्षा हृदयाची महान विशालता कोणती असू शकेल का? खर्या कर्मयोग्याला याच्यापेक्षा दुसरे श्रेष्ठ मार्गदर्शन कोणते होऊ शकते? भावनेच्या दृष्टीने ही कल्पना जेवढी आर्द्र वाटते तेवढीच विचारांच्या दृष्टीनेही माधुर्यपूर्ण वाटते. शिवाय याच्यावरून असेही फलित निघते की, कर्म करा पण कर्म करताना अभिमान करू नका. कर्म करताना 'मी' ची समाधी लागू दे. 'अहम' गाडा, झोपू द्या. प्रभू झोपी गेला म्हणजे अहम न ठेवता तो कर्म म्हणजे जगव्यवहार करीत राहिला."
पुजनीय दादाजींच्या निरूपणाचा अर्थ किंवा आपल्यासाठी संदेश म्हणा तो हाच आहे की भंगवतांचे लाडके भक्त व्हावयाचे असेल तर आपले प्रत्येक कर्म भक्तीमय झाले पाहीजे. क्षेत्र कुठलेही असो आपआपले कर्म आनंदाने स्विकारा. म्हणजे तुम्ही त्या कर्मात रमाल, रंगाल. इतके तास काम केले हे कळणारही नाही. आपण काहीच करीत नसून सगळी हितावह, शुभ कर्म भगवंत आपल्याकडून करवून घेतात. कर्माचा नैवेद्य त्याला दाखवयाचा आणि म्हणायचे देवा अजून हे कर्म हवे तसे साधले नाही. कृपा करून मला सहाय्य करा. भगवंत झोपले नसून ते बघत आहेत कि कोण भक्त त्यांना निश्चिन्त बनविण्यासाठी झटत आहे. आपल्यासारख्या लेकरांकडून त्या परमपित्याने जी अपेक्षा केलेली आहे ती पुर्णत्वाकडे नेण्यासाठी जो काही प्रयत्न करवयाचा त्याची सुरूवात करण्यासाठी ह्या एकदशी सारखा शुभ दिवस अन्य कुठला असू शकतो ? शिखरावर चढून चमकण्यापेक्षा स्वतःला कार्यमंदिराच्या पायात गाढून घेण्यात धन्यता माना. मग आपोआप आपण भगवंताचे लाडके होऊ .
जय योगेश्वर !
जय हरी विठ्ठल, जय योगेश्वर !
उत्तर द्याहटवाजय पांडुरंग हरी,
उत्तर द्याहटवाफारच सुंदर, संस्कृती-पूजन पुस्तकाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
जय योगेश्वर
बिवलकरजी,आणि संदीपजी आपले मनःपुर्वक आभार.ह्या चातुर्मासात अध्यात्मिक विषयावर लेख मालिका(अर्थात अधून मधून) सादर करावयाचे ठरविले आहे. असाच लोभ ठेवत राहा.धन्यवाद.
उत्तर द्याहटवा