बुधवार, १३ जून, २०१८

घोंघावत येणारे वादळ आणि राजकारण


अलीकडे ८जून ते १० जूनपर्यंत महाराष्ट्रातल्या पश्चिमेकडील म्हणजे कोकण मुबंई, ठाणे, पालघर इत्यादी भागात वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यामूळे 'लोकांनी वरील दिवसात शक्यतो बाहेर पडू नका' असा सरकार तसेच महापालिकांनी इशारा दिला. त्यात काही गैर नव्हते. परंतू ना मुसळथार पाऊस पडला ना घोंघावणारे वादळ दिसले. बहुधा 'पावसाने आणि वादळाने हवामान खात्याला हूल दिली' असाच विचार लोकांच्या मनात आजपर्यंतच्या अनुभवाने आला आणि तसा तो हवेत विरूनही गेला. लोक आपआपल्या दैनंदिन जीवनाचा गाडा ओढण्यात  गुंतले. बाहत्तरावा स्वातंत्र्यदिन जवळ येत आहे. अजनूही अचूक अंदाज वर्तविण्याचे तंत्रज्ञान हवामान खात्यापाशी नाही ह्यावर चर्चा होताना दिसली नाही. पण देशातील आणि राज्यातील घोंघावणार्या राजकरणावर मात्र चर्चा जोरदार सुरू आहे.

प्रथम आपल्या महाराष्ट्रातील राजकारणावर दृष्टीक्षेप टाकू या. पालघरमधील लोकसभेची पोटनिवडणूक भाजपाने जिंकली. पण चर्चा अशी होत आहे की ही जणू भाजपाचा पालघर पोटनिवडणूकीत पराभव झाला आहे. बरं असा सुर काढला तो शरद पवारांनी. शिवसेनेला चांगली मते मिळाली. ह्याबाबत दुमत नाही. परंतु शिवसेनेपेक्षा अधिक मास चढले आहे ते शरद पवारांचं आणि चॅनेलवर राजकीय अभ्यासक म्हणून वावरणार्या पवारांच्या चमच्यांच. एबीपी चॅनेलवर काही महीन्यापुर्वी 'भाजपाला वगळून शिवसेनेला स्वबळाचं राजकारण जमेल का?'' ह्या विषयावर 'विशेष माझा' ह्या सदराखाली एक चर्चेचा कार्यक्रम झाला होता. त्यामध्ये भाग घेताना भाजपाचे आमदार व प्रवक्ते अतूल भातखळकर ह्यांनी जेष्ठ राजकीय विश्लेशक श्री प्रकाश अकोलकर ह्यांच्या भूमिकेवर व त्यांच्या मानसिकतेवर जोरदार प्रहार केला. कारण असे होते की लोकसभेच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याच्या सेनेच्या निर्णयाचा अकोलकरांना इतका आनंद झालेला होता की ते आपला आनंद लपवू शकले नाहीत. ह्यावर भातखळकर म्हणाले, अहो अकोलकर, तुम्ही तुमच्या मनांतला अजेन्डा का सागता?."  त्या वाराचा तडाखा इतका जोरदार होता की, अकोलकरांची  बोलती बंद झाली झाली. हे स्पष्टपणे त्यांच्या देहबोलीतून जाणवले. एखाद्या राजकीय विश्लेषकाने आपले स्व राजकीय नेत्याच्या चरणावर गहाण ठेवले की अशी नामुष्कीची वेळ येते.  अशा व्यक्तीने राजकीय विश्लेषक हे बिरूद लावण्यापेक्षा सरळ आपल्या आवडत्या नेत्याच्या पक्षाचे  प्रवक्ता म्हणून काम करणे उचीत ठरेल. खासदार चिंतामण वनगांच्या दुर्दैवी निधनातून निर्माण झालेल्या सहानभूतीचा फायदा शिवसेनेने उचलूनही पालघरच्या पोटनिवडणूकीत भाजपाने यश संपादन केले  ह्याकडे राजकीय अभ्यासकांनी मुद्दामहून दुर्लक्ष केल्याचं दिसत असल्यामूळे मी ' एबीपी न्यूज चॅनेलवर भाजपा आमदार आणि प्रवक्ते श्री अतूल भातखळकर आणि प्रकाश अकोलकरांमधील शाब्दीक लढाईचा उल्लेख केला आहे.

मुळात पालघर आणि वसई विधानसभा मतदार संघ, हे पारंपारीकरित्या काँग्रेसचे बालेकिल्ले. नंतर प्रजा  समाजवादी पक्षाने ताकद वाढविली आणि दोन तीन वेळा काॅग्रेसवर मात केलेली आहे. हळुहळू शिवसेनेही आपलं बळ वाढविले. नंतर  ठाकूर घराण्यांचा बहूजन विकास आघाडीला चांगले समर्थन मिळू लागले. सोबत विवेक पंडीत पुरस्कृत जनअंनोदलानेही जम बसविला. त्यामुळे काॅग्रेस व समाजवादी निष्प्रभ झाले. जनसंघ वा भाजपाचं बळ दखल घेण्याइतके नव्हते. परंतु शहरीकरण होत गेले आणि भाजपाचा जनाधार वाढू लागला. पुर्वी हे दोन्ही भाग  उत्तर मुबंई मतदार संघात जोडलेले होते. नंतर पालघर जिल्हा झाला आणि हे दोन्ही मतदारसंघ लोकसभेसाठी पालघर ह्या मतदार संघाला जोडले गेले. ह्या मतदार संघात आदिवासी क्षेत्राच्या समावेशामूळे भाजपाचा फायदा झाला हे मान्य केले तरी वसई, नालासोपारा, खुद्द पालघर येथे भाजपाने चांगली मते मिळविली आहेत. ह्यावर राजकीय अभ्यासक चर्चा करू इच्छीत नाहीत. कारण ते त्यांना आणि त्यांच्या मालकांना सोयीचे नाही. नुकताच देशभर झालेल्या पोटनिवडणूका प्रचारात मोदींनी भाग घेतला नव्हता. पालघरच्या पोटनिवडणूकाच्या प्रचारातही मोदीजी सामील झाले नव्हते. तरीही भाजपाने विजयाची बाजी मारली हे कौतुकास्पद आहे हे मान्य करण्याचे औदार्य माध्यमातील लोकांनी दाखवयाला हवे होते की नाही? भाजपासंबंधी इतकी अस्पृशता माध्यमाचे प्रतिनिधी पाळीत असल्यामूळे भाजपाचे बळ वाढत आहे.

देशभरचे अनेक राजकीय अभ्यासक मोदी फॅक्टर अस्तित्वात आहे हे मान्य करीत आहेत परंतु तथाकथीत पुरोगामी राजकीय अभ्यासकांना हे मान्य नाही. पोटनिवडणूकीतील विरोधी पक्षाच्या यशाने ही मंडळी हुरूळून जात आहेत. परंतु त्यांच्या ह्या हुरूळून जाण्याच्या वृत्तीमुळे, ते ज्या विरोधी पक्षाचे अघोषित प्रवक्ते म्हणून काम करीत आहेत त्या पक्षांचा आत्मविश्वास फाजीलरित्या बळाविण्याचे काम करीत आहेत. महाराष्ट्राच्या गेल्या विधानसभेच्या निवडणूकीत सार्या मराठी न्यूज चॅनेलनीं भाजपावर बरीच टिका करून शिवसेनेला सहानुभूती मिळवून दिली. तरीही भाजपा सर्वाधिक जागा जिंकून सत्तेवर बसली. शरद पवारानी भाजपाला सरकार स्थापन करण्याकरीता विना अट पांठीबा दिला होता. त्याला केराची टोपली दाखवून भाजपाने आपल्या मित्र पक्षाला म्हणजे शिवसेनेला सरकारात सामील करून घेतले. परंतु शिवसेनेने सत्तेत राहूनही भाजपावर विशेषकरून मोदी-शहांवर सतत टिका करण्याचे काम चालूच ठेवले आहे.  आता 'शिवसेनेने टिका करीत राहावयाचे आणि भाजपाने त्या टिकेवर अधून-मधून प्रतिहल्ला करीत जावे' अशी  राजकीय चाल निर्माण केलेली दिसू लागली आहे. त्यातून   इतर विरोधी पक्ष निष्प्रभ होत गेलेले दिसत आहे.  उत्तर प्रदेशमध्ये बुवा आणि बबुआ असे एकमेकांना संबोधून परस्परांवर टिका करण्याची राजकीय चाल बसपाच्या नेत्या मायावादी आणि सपाचे अखिलेश यादव खेळत राहीले. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा निष्प्रभ झाले. परंतू ही चाल शेवटी बसपा आणि सपाच्या अंगावर आली. हे आपण अनुभविले. तशाच  प्रकारचा भाजपा विरूध्द शिवसेना असा सामना रंगविण्यात येत आहे. काही काळ भाजपा आणि सेनेला ह्याचा फायदा होईल. पण २०२४ नंतर ह्या दोन्ही पक्षांना अशी चाल महागात पडण्याची शक्यता आहे आणि त्यात अधिक नुकसान शिवसेनेचे होईल. कारण शिवसेनेचे प्रमुख ऊध्दव ठाकरे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना भेटून आले. शरद पवारांचीही त्यांनी भेट घेतली. ते ही सत्तेत राहूनही. त्यामुळे शिवसेनेच्या भुमिकेसंबंधात सामान्यजनांत रोष आहे. त्यातच भरीस भर म्हणून राज ठाकरे हे  शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे असा प्रचार करीत आहेत. सेनेला प्रान्तीय अस्मीताच्या नावाच्या  राजकीय चालीत मनसेच्या रूपाने एक आव्हान कायम राहणार आहे. त्यामुळे सेना-भाजपात युती झाली नाही तर दोन्ही पक्षांच नुकसान होणार ह्यात काही संदेह नाही पण शिवसेनेचं नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे. ह्याची जाणिव सेनेच्या बुजूर्ग आमदारांना असू शकते म्हणून सेना सरकारमधून बाहेर पडत नसावी.

माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जींनी राष्ट्रीय स्वयंसंवक संघाच्या व्यासपीठावरून भाषण दिले. त्यावरही उलट-सुलट चर्चा रंगत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर अनेक मान्यवरांनी हजेरी लावलेली आहे. संघासाठी ही बाब नित्याची आहे. श्री प्रणव मुखर्जीने संघाचं आमत्रंण स्विकारल्यापाठीमागचं कारण काय असावे ह्यावर चर्चा रंगली. प्रणव मुखर्जी ह्यांना दोनदा पंतप्रधानपदाच्या हुकलेल्या संधीबाबतचे शल्य मनात टोचत असण्याची शक्यता असू शकते. त्यामूळे त्या शल्यावरील उपाय म्हणून आणि जोडीला गांधी घराण्याला धडा शिकवावा म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निमंत्रण स्विकारले असावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरून भाषण केले म्हणून प्रणवदादांना पंतप्रधान पद हवे आहे असा अंदाज बांधणे हे तर्काला धरून नाही. सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे, त्यात अलिकडे प्रकाशित झालेल्या प्रणवदांच्या 'द कोईलेशन ईयर्स ' ह्या पुस्तकात युपीएच्या राजवटीत हिंदूचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले असा गौप्यस्पोट केलेला आहे. ते पुस्तक मी वाचलेलं नाही. पण ते सत्य असेल तर प्रणवदांचे संघाच्या व्यासपीठावर जाऊन संघ स्वयंसेवकांना संबोधण्याच्या कृतीच्या पाठीमागील रहस्याचा उलगडा होतो. तसेच ख्रिशन धर्मगुरूंचा भाजपाला विरोध करण्याचे कारस्थानही प्रणवदांच्या पुस्तकातील त्या तपशिलामुळे उघड झाल्याचे दिसेल. त्यातूनही भाजपाला फार मोठे बळ प्राप्त होण्याची शक्यता आहे. मग विरोधकांनी भाजपावर  धार्मीक धृवीकरण करीत आहे असा आरोप केला तरी विरोधी पक्षांना  फायदा होणार नाही. 

सध्या सार्या विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिथे डझनभर पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना माजी राष्ट्रपती प्रणवदांना पंतप्रधानपद मिळणे दुरापास्त आहे. प्रणवदांच्या संघाच्या व्यासपीठावरून झालेल्या भाषणाचा काँग्रेसने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढला आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर उठसूठ टिका करण्याच्या विरोधी पक्षाच्या धोरणाला प्रत्युत्तर देण्याची आयती सोय भाजपाला प्राप्त झाली आहे हे  स्पष्ट दिसतेय.  


कर्नाटकातील जेडीयु आणि काँग्रेस मध्ये सत्तावाटपात रस्सीखेच सुरू झालेली दिसते. लोकसभेच्या निवडणूकाच्या वेळी तेथील सरकार अस्थिर होण्याची शक्यता नसली तरी जागावाटपावरून परस्परामध्ये झुंज होणार नाही असे गृहीत धरता येत नाही. त्यातच काँग्रेसच्या कर्नाटक खेळीचे सुत्रधार डि. के. शिवकुमारही मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाने संतुष्ट नसल्याचे ऐकण्यात आहे. त्यांची नाराजी काँग्रेसला परवडणारी नाही. तसेच काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या आडमुठेपणापुढे किती नमते घेईल ह्यावर कर्नाटकासह सर्वच राज्यामधील विरोधी पक्षाच्या आघाडीचे भवितव्य अवलंबुन आहे. लोकसभेच्या निवडणूकीत विरोधी पक्षांची आघाडी झाली तरी पुन्हा सत्तेच्या चावीवरून झगडे होणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.

भीमा-कोरेगाव प्रकरणी एल्गार लाॅबीचे माओवादी पुरस्कृत नक्षलवाद्यांच्या अटकेमुळे, त्यांच्या कटकारस्थानांचा पडदा फार्श होण्याची शक्यता वाढली आहे. आंबेडकरी जनतेच्या नावावरून चाललेले हे देशविघातक उद्योग विरोधी पक्षांना  फारच महाग पडण्याची शक्यता आहे. खूद्द आंबेडकरी जनतेलाच नक्षलवाद्यांबरोबर जाणे रास्त वाटणार नाही. सोशल मिडीयावर विद्रोह साप्ताहीकमध्ये आलेलं भारत मातेचं अश्लील चित्र व्हायरल झाले आहे, त्याची फार मोठी किंमत माओवाद्यांना चुकावी लागेलच पण जोडीला त्यांना वेळोवेळी सहानूभुती दर्शविणार्या इतर विरोधी पक्षांच्या प्रचारातील हवा संपण्याची शक्यता दिसते. ह्या शिवाय जेएनयु मधील टुकडे-टुकडे गॅन्ग, सर्वोच्च न्यायालयातील बंडखोर न्यायाधिशांची लाॅबी, काश्मीर मधील अलगावाद्यांची पाक पुरस्कृत दशहतवाद्यांशी असलेले संबंध, नॅशनल हेराॅल्ड चे भूत, काँग्रेसचे नेते आणि पुर्व अर्थमंत्री पी. चिदंबरम ह्यांच्या कुटुंबीयांची सुरू असलेली चौकशी, रामजन्मभूमीच्या खटल्याची होणारी सुनावणी, राहूल गांधीच्या विरोधात संघाच्या बदनामी संबंधी भिंवडीतील न्यायालयात चाललेली सुनावणी, गौरी लंकेशच्या हत्यासंबंधी अटक केलेल्या आरोपीशी काॅग्रेसच्या नेत्याची असलेली सलगी इत्यादी हुकूमाचे पत्ते भाजपाकडे आहेत. विरोधी पक्षांनी किती थयथयाट केला तरी भाजपा ह्या पत्त्यांचा  उपयोग करणार असे दिसत आहे. 

शेवटी हा राजकीय मंचावरील मोठा खेळ आहे. ह्या खेळात पंतप्रधान मोदींच्या कारभारातील पारदर्शकता, त्यांचा करिष्मा, त्यांची देशभक्ती, त्यांनी आखलेली विदेश नीती आणि अविरतपणे काम करण्याची त्यांची शक्ती इत्यादींचा फायदा भाजपाला होईल. कारण विरोधी पक्षांनी राजकीय खेळाचं स्वरूपच मोदी विरूध्द सगळे विरोधी पक्ष असे केले आहे. त्यामुळे मोदींच्या व्यतिरिक्त इतर कुणा भाजपा नेत्याचं नाव पंतप्रधानपदाबाबत चर्चेला येण्याची सुतराम शक्यता नाही. भाजपाच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांच्या एकदिलाने काम करण्याचे हेच ते शक्तीवर्धक औषध आहे आणि हेच विरोधी पक्षांच्या दुर्लबतेचं लक्षण आहे. त्यामूळे राजकीय मंचावर सुरू असलेले वादळही फुसकेच ठरणार असे दिसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...