रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः|



अलिकडे WhatsApp वर एक पोस्ट आली. ती अशी आहे, Life is very similar to a Boxing Ring. Defeat is not declared when you fall down. It is declared when you refuse to rise up. ही पोस्ट वाचल्यानंतर मी एलआयसीत काम करीत असतानाचा एक प्रसंग आठवला. एका रविवारी सकाळी मी आयुर्विमा व्यवसायानिमित्त जोगेश्वरी पश्चिम येथील बेहरामबाग भागात गेलो होतो. माझा एजंट त्याच भागात राहात होता. तेथील काम आटोपून मी जोगेश्वरी स्टेशनला बोरीवलीकडे येणार्या गाडीसाठी वाट पाहात होतो. गाडीला उशीर झाला होता. इतक्यात रेल्वेची अनौन्समेंट झाली. 'बारह बजकर दस मिनिटकी बोरीवली तरफ जानेवाली गाडी आज फ्लॅटफार्म क्रमांक एक के बजह फ्लॅटफार्म क्रमांक तीनपर आ रही है!'. अनौन्समेट 'गाडी आयेगी' अशी नव्हती तर 'गाडी आ रही है ' असा त्यामध्ये उल्लेख होता. विशेषतः मुबंईकरांना लोकलमध्ये प्रवास करीत असताना असा अनुभव येणे हे नित्याचे झाले आहे . धावपळीतच मी एकेक पायरी सोडूनच जीना चढलो आणि फ्लॅटफार्म क्रमांक तीनकडे उतरणार्या जीन्यातून सावधानेतेने उतरून कसाबसा एकदाचा गाडीत चढलो. गाडीत बसल्यानंतर माझं विचारचक्र सुरू झालं. फ्लॅटफार्म क्रमांक एकवरून जीना चढलो असं म्हणण्यापेक्षा अक्षरशः धावलो. परंतु फ्लॅटफार्म क्रमांक तीनसाठी उतरतेवेळी मी जिन्याच्या प्रत्येक पायरीवर पाय ठेवीत होतो. असे का? साधारणतः सारे प्रवासी जीन्यावरून उतरताना अशीच सावधगिरी बाळगत असतात. बस लक्षात आलं एक सत्य. मनुष्य खाली उतरताना सावधगिरी बाळगत असतो. घसरणे,पडणे म्हणजे अवनिती. अवनिती कुणालाही प्रिय नसते. मनुष्याच्या अंगी उन्नतीची आस जन्मतः विराजित असते. हेच ते सत्य. 

विकासाची इच्छा मानवाव्यतिरिक्त कोणताही दुसरा प्राणी करू शकत नाही. आपल्याला काय हवयं ह्याची जाणीव होणे आणि ती मिळविण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. Growth is the evidence of life. वाढ मग ती शारिरीक असो वा बौध्दीक, आर्थिक असो वा अध्यात्मिक हेच जीवंतपणाचं खरं लक्षण आहे. पृथ्वीच्या पोटात अनेक खनिजं, मौल्यवान रत्ने दडलेली असतात. जो शोधेल त्याला गवसतील. आदिशक्तीने आपल्या अंगी सृशनशिलता, सहनशिलता,उद्योमशिलता, नाविन्यता, शौर्य, धैर्य , इच्छाशक्ती, विविध कला, इत्यादी अनंत क्षमतेचे डबे भरून ठेवले आहेत. आळस, भिती, शंका-कुशंका, न्युनगंड अधंश्रध्दामुळे आपण ते उघडून बघत नसतो. आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून ते डबे उघडून बघणे आवश्यक असते. आर्य चाणक्यने म्हटले आहे 'अयोग्यः पुरुषः नास्ति|' प्रत्येक व्यक्तीत कुठलीतरी क्षमता असेतच. अयोग्य वा बिनकामाचा असा माणूस नसतोच.  आर्य चाणक्यांना स्वतःला काही उपभोगायचं नव्हतं; शारिरीक क्षमता, साधनेही मर्यादित; परंतु यवनांच्या आक्रमणांमुळे आणि अत्याचारांमुळे क्षुब्ध झालेले अंतःकरण होते; कर्तव्यविमुख, विलासी आणि उद्दंड नंदराजाचे वेडेचार पाहून कार्योद्यत झालेली बुध्दी होती; दृढनिश्चय होता;  त्यातूनच त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला घडविले, आणि स्वतः हाती शस्त्र न घेता मायभूमीवरील, देशबांधवांवरील अन्यायाचे निराकरण केले.

दैनंदिन जीवनात अनेक उदाहरणे आपल्याला काय दर्शवित असतात? कुस्ती असो वा कबड्डी ह्या खेळात आव्हान देते वेळी प्रतिस्पर्धी काय म्हणत असतात 'दम आहे का तुमच्यात?'. पूर्ण शक्तीने चढाई आणि पकड म्हणजेच ह्या दोन्ही खेळातील यश. शिकारी जेव्हा शिकारीला जातो आणि योग्य स्थान पाहून बंदूक रोखून बसतो, तेव्हा त्याला दमाचाच अवलंब करावा लागतो. तो त्या वेळी खाणेपिणे, हसणे, बोलणे सारे काही विसरतो. शरीरातील सारी शक्ती त्याने आपल्या डोळ्यात एकवटलेली असते. एक डोळा मिटून, दृष्टी, बंदुकीच्या नळीचे टोक आणि शिकार यांचे ऐक्य साधले रे साधले की, क्षणमात्र तो श्वास रोखून धरतो आणि गोळी मारतो. अचूक नेम लागून शिकार साधते. प्रचंड शक्ती असलेला हिंस्त्र पशू निमिषार्धात धरणीवर लोळू लागतो. पाण्यापासून वीज निर्माण करावयाची असल्यास त्या पाण्याला वर न्यावे लागतेच. सभेमधील भाषण असो वा घोषणा असो आपल्याला आवाज वरच्या पातळीवर न्यावाच लागतो. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायाचं असेल तर आपल्या आंतरिक शक्तीला उच्चतम श्रेणीत न्यावे लागते तरच आपल्याला इच्छीत कार्यात यश मिळते. प्राणशक्ती, प्रतिकारशक्ती, धैर्य इत्यादी वाढविण्यासाठी प्राणायमच आवश्यक असतो. 

पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत सुर्याभोवती फिरते. त्यामूळे दिवस -रात्र असे चक्र सुरू झाले. भले हे सत्य असले, तरीही सूर्य उगवतो आणि मावळतो असाच अर्थ जगभरातल्या प्रत्येक भाषेत रूढ झालेला दिसतो. ह्याचं कारण जगभरातील सार्याच तत्ववेत्त्यांनी, संतमहंतानी प्रगती म्हणजे वर चढत जाणे rising up तर अधोगती म्हणजे downfall असेच मानले आहे. "Sunset at one place is always Sunrise at another place and at the same place too after twelve hours. संकटे येतात, ती आपली कसोटी पाहात असतात. पुष्कळदा आपला व्यवसाय, उद्योग, संशोधन वा नोकरीतील बढती असो ह्यातील यशासाठी करावे लागणारे कष्ट , ज्ञान, संपर्क आणि क्षमतामध्ये वृद्धी करण्यासाठी 'Sky is the limit ' असेच मॅनेजमेंट वा मार्केटिंग गुरू सांगत असतात. त्यामागील हेतू हाच कि आपल्यामध्ये आकाश नावाचं पंचमहाभूताचा अंश जन्मतः असतो, त्याचे विस्मरण होऊ नये. There is no limit to our ability and efficiency. Excellence is always a moving target. म्हणूनच वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे कि Defeat is not declared when u fall down .It is declared when u refuse to rise up.

एक साधा भोळा लाकूडतोड्या होता. लाकडे तोडून झाली की तो त्या रानातील साधूची सेवा करायचा आणि मग घरी जात असे. एकदा तो साधूमहाराजांना म्हणाला, "महाराज माझी स्थिती फार वाईट आहे. जेमतेम पोटापुरता मिळते. फाटके कपडे घालतो; मोडक्या झोपडीत राहतो. आपण काही कृपा करा आणि मला चांगले दिवस येतील असा आशिर्वाद द्या". साधू म्हणाला पुढे जा, म्हणजे तुला चांगले दिवस येतील. दुसर्या दिवशी तो नेहमीच्या लाकूड तोडण्याच्या जागी न थांबता पुढे गेला तेव्हा त्याला खैराची आणि शिसवाची लाकडे मिळाली. त्याला नित्यापेक्षा अधिक पैसे मिळाली. मग तो रोज तेथून लाकडे आणू लागला. तो आता श्रीमंत झाला. एकाएकी त्याला आठवण झाली कि साधूने पुढे जा असे म्हटले होते. मग तो पुढे गेला तेव्हा त्याला सागाचे लाकडे मिळू लागली. आता तो लखपती झाला. पण थांबला नाही. साधूचे म्हणणे आठवले पुढे जा. बस तो आता पुढे जाऊ लागला. तिथे चंदनाचे जगंल लागलं. चदंनाची लाकडे विकून तो करोडपती झाला. तरी तो थांबला नाही. ' पुढे जा ' हे साधू महाराजाचे बोल आठवले. तो आणखिन पुढे गेला तर त्याला क्रमाक्रमाने चांदीच्या, सोन्याच्या, आणि रत्नाच्या खाणी सापडल्या. तो सर्वात धनवान म्हणून प्रसिध्दीस पावला. 

वरील कथा आणि पोस्टचा अर्थ हाच कि विधाता आपल्याला पराभूत कधी घोषीत करतो, जेव्हा आपण थोडसं अपयश आल्यावर प्रयत्न सोडून देतो तेव्हाच. जीवन हे बाॅक्सींग रिंग सारखेच आहे. दुसर्या महायुध्दात बेचीराख झालेले जर्मनी आणि जपान देश पुन्हा उठून जोमाने काम करीत प्रगत राष्ट्रात पुन्हा स्थान मिळविते झाले हे आपण पहातच आहोत. इजरायल एक छोटासा देश. पण सामरिक तसेच तंत्रज्ञानात आज अग्रणी देशात स्थान मिळवून आहे. पोखरणच्या अणूचाचणीनंतर जगातील अनेक देशांनी आपल्या देशावर आर्थिक, आयात-निर्यातसंबंधीची बंधने लादली, तरीही आपल्या देशाची प्रगती अडली नाही. 
आल्या जरी कष्टदशा अपार 
न सोडती धीर तथापी थोर | 
केले जरी पोत बळेंची खाली
ज्वाळा तरी ते वरती उफळी|| 
ह्या नियमानुसार,आलेल्या संकटांना जे दुप्पट आवेशाने तोंड देतात, ते यशस्वी होतात. अपयश, पराभव ह्या गोष्टी तात्पुरत्या असतात. पराभवाने खचून जाणे हाच मोठा पराभव असतो. थांबला तो संपला. स्वामी विवेकानंद म्हणत असत, 'नैराश्य म्हणजे मृत्यु, उत्साह म्हणजे जीवन'.

असे वाचनात आले आहे की इंगंल्डचा एक राजा होता. त्याच्या राज्यावर एका पर प्रान्तातील राजाने अकस्मात रित्या आक्रमण केले. इंग्लडच्या राजाचा सपशेल पराभव झाला. तो आपला जीव मुठीत धरून एका गुहेत लपला. अत्यंत निराश अवस्थेत तो तिथे बसला असता, त्या गुहेत एक कोळी आपलं जाळं विणत होता, त्यावर त्याचे लक्ष गेलं. हे करीत असता तो कोळी पुन्हा पुन्हा वर चढण्याचा प्रयत्न करीत होता आणि पुन्हा पुन्हा खाली पडत होता. असे वारंवार घडत होते. इंग्लडचा तो पराभूत राजा टक लावून त्या कोळ्याकडे पाहात होता. त्या कोळ्याने चिकाटी सोडली नाही. शेवटी तो यशस्वी झाला. यत्कचिंत तो कोळी इतक्या वेळा खाली पडत होता तरीही शेवटी यशस्वी झाल्याचं पाहून त्या राजाला स्पुर्ती आली. गुहेतून बाहेर आला, पुन्हा आपल्या सैनिकांना गोळा केलं आणि शेवटी सारी शक्तीपणाला लावून आपलं गमाविलेलं राज्य परत मिळविण्यात यशस्वी झाला. चराते चरति भाग्यः| जो चालत राहतो त्याच्या गळ्यात सदैव भाग्यश्री वा यशश्री माळ घालीत असते. हे त्रिकालातीत सत्य आहे. 

रणागंणात हात-पाय गळून पडलेल्या अर्जुनाला भगवंत टोमणा मारतात, 'क्लैब्यं मा स्म गमः पार्थ'! अरे, अर्जुना काय हा लाजिरवाणा प्रकार, नामर्दपणाची कास धरली आहेस? भगवंत पुढे सागंतात, 'ठार झालास तर स्वर्गाची प्राप्ती होणार आहे, आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील'. शेवटी मात्र अधिकारवाणीनेच म्हणतात, 
'तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युध्दाय कृतनिश्चयः| 'अर्जुना उठ, युध्दास तयार हो. जीवन जगत असताना अनेक आघाड्यावर आपलाही संघर्ष वा युध्द चालू असते. पुष्कळदा निर्णय घेताना मानसिक गोंधळही  होत असतोच. त्या अर्थाने आपण सारे क्षत्रियच आणि अर्जूनच. Life is challenge ,accept it. आपल्यामधली क्षात्र तेज जे सुप्त अवस्थेत गेलेलं असते, ते वारंवार मनाच्या पृष्ठभागावर आणण्याचा प्रयत्न करीत राहणे हाच खरा धर्म. व्यक्ती असो वा समाज किंवा देश, जो आव्हान स्विकारील, तोच विकास करीत जाईल, त्याचीच प्रगती होईल. स्वामी विवेकानंदानी म्हटले आहे "Arise, Awake and stop not till the goal is achived ".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...