शनिवार, २९ जुलै, २०१७

बिहारमधील सत्तापालट


बिहारमध्ये पुन्हा जेडीयु-भाजपा युतीचे सरकार स्थानापन्न झाले. त्यामुळे राजकरणातील नैतिकता, लोकशाची मूल्ये,    राज्यपालांची  कर्तव्ये इत्यादी बाबीवर नेहमीप्रमाणे चर्चा होत आहे. आपल्या हिंदू मान्यतेप्रमाणे नीती हा शब्द द्वापार युगाच्या उत्तरार्धातच गायब झाला आहे आणि ह्या भूतलावावर  आता जे राहिलं आहे किंवा चालू आहे ते राजनीती नसून केवळ  राजकारण आहे.  एकदा हे सत्य मान्य झालं कि बिहारमधीलच नव्हे तर कुठेही  सत्तापालट झाला तरी त्यावरून  नैतिकता आणि अनैतिकतेची जी चर्चा होत आहे त्यात भाग घेणार्या कोणालाही पराभव शिवत नसतो.

भारतीय राजकारणात सर्वात बेजबाबदार राजकीय मंडळी कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारे केला तरी "जिथे समाजवादी तिथे भांडण आणि राजकिय अस्थिरता" ही बाब सर्वश्रूत आहे. सन १९७७ साली जनता पार्टीचे सरकार समाजवाद्यानी पाडले. कधी जनता पार्टी तर कधी जनता दल अस रूप घेत ही मंडळी केंद्रात आणि अनेक राज्यात सत्तेवर येत राहिली आणि लागलीच पायउतार होत राहिली. मूळात खोट कुठे आहे तर सदा तात्विकेतचा आव आणण्यात ह्यांना फार रस असतो. त्यामुळे ह्या पक्षांतील नेत्यांमध्येच भांडणं होत राहिली आणि छोटे तुकडे होत गेले. पूर्वी समाजवादी तसेच काॅम्रेड म्हणवून घेण्याची एक फॅशन विकसनशील आणि अविकासित देशात होती. परंतु साम्यवाद वा समाजवाद ह्या विचारसरणीचा ऐहिक विकासाच्या दृष्टीने उपयोग होण्यापेक्षा अडथळे निर्माण होत गेले. त्यामुळे आता बहुतांश देशांनी आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण स्विकारीत भांडवलशाहीला प्रोत्साहन देण्याचं धोरण स्विकारले. आपल्या देशाचा प्रवासही त्याच दिशेने सुरू झाला. मग कुठलं तरी एक नवीन तत्व राजकारणात आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय ह्या समाजवाद्यांना राजकारण रेटता येणं अशक्य झालं. देशात भारतीय जनता पक्षाचं बळ वाढू लागल्यानंतर सर्वधर्मसमभाव हे नाणं अधिक पाॅलीश करून राजकारण करता येते कां ह्यावर विचार करून भाजपाचा जो  विरोधी, तो आमचा मित्र असे ह्यांच धोरण ठरलं. म्हणून ज्या काॅग्रेस पक्षाला सत्तेवरून खेचण्यासाठी डाॅ राम मनोहर लोहियांनी जनसंघाचे अध्यक्ष पंडीत दिनदयाळ उपाध्यांशी चर्चा करून सहमतीच्या राजकरणाचा पाया रोवला, त्याच काग्रेस पक्षाशी संधान बांधत भाजपाद्वेश वाढत ठेवण्याचं काम लोहीयांच्या अनुयायांनी हाती घेतलं. सर्वधर्मसमभाव हे नाणं इतकं गुळगुळीत झालं कि ते निष्प्रभ होत जात आहे हे दृष्टीस येऊ लागले. मग भांडायचं कोणाबरोबर? हा प्रश्न ह्यांना कधीतरी सतावणार होताच. त्यातूनच बिहारमधील लोहियांच्या दोन शिष्यात शह-प्रतिशहचा खेळ झाला, आणि महागठबंधनचे सरकार कोसळले.

बिहारमधील जेडीयू आणि आरजेडी मधील भांडणाचं कारण समाजवाद्यांच्या वृत्तीतच दडलेलं आहे. नितिशकुमार आता कितीही टाहो फोडीत भ्रष्टाचारासंबंधी झिरो टाॅलर्नसचा आव आणत असले तरी लोक विश्वास ठेवतील असे वाटत नाही. विधानसभेच्या निवडणूकीत केवळ भाजपाला विरोध म्हणून महागठबंधन करीत लालूप्रसाद यादवांच्या आरजेडीला सामील केलं तेव्हा लालूप्रसाद भ्रष्टाचारी नव्हते कां? भाजपासह तब्बल दहा वर्षे सत्ता उपभोगली तेव्हा भाजपा सांप्रदायिक का वाटला नाही? बिहारमध्ये आज जे सत्तांतरचं नाटक घडले ह्यावर चर्चा करतांना नितिशकुमार आणि लालूप्रसादांना दोष देण्याऐवजी भाजपा केंद्रातील सत्तेचा गैरवापर करीत विरोधी पक्षांची सरकार पाडीत आहे असा आरोप काॅग्रेस आणि मित्र पक्ष करीत आहेत. असा आरोप करणे सर्वथा चूक जरी नसले तरी भाजपालाच खलनायक बनविण्याचा काॅग्रेस आणि आरजेडीचा प्रयत्न ही तितकासा पटत नाही. मूळात बिहारमधील गठबंधंन हे कोठल्याही तत्व व सिध्दांताविना अस्तित्वात आलेलं बूजगावणं होत. बिहारमधील मतदारांनी विधानसभेच्या निवडणूकीत महागठबंधनाच्या बाजूने कौल दिला होता, त्यामागील कारण मोदी नको वा भाजपा नको असं जे भासविण्यात येते ते ही तर्कसगंत वाटत नाही. बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपाचे नेते अरूण जेटलीनीं मतदारसंघनिहाय आकड्यासहीत दाखवून दिले होते कि भाजपाला जितकी मते लोकसभेच्या निवडणुकीत मिळाली होती जवळपास तिकीच मतें विधानसभेच्या निवडणूकीत मिळाली होती. केवळ विरोधी पक्षांची मते विभागली गेली नाही त्यामुळे भाजपाचा पराभव झाला. एक गोष्ट मान्य करावी लागेल कि नरेंद्र मोदी ह्यांच्यं  डीएनेसंबंधीचं वक्तव्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचं आरक्षणासंबंधीच्या विधानावरून मतदारांचा बुद्धीभेद होऊ शकतो ही बाब महागठबंधंनाच्या strategist मंडळींच्या लक्षात आली आणि तसा फायदा उठविण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण करणे सोप गेलं, त्यातूनच भाजपाचा पराभव करण्यात महागठबंधंनला यश मिळाले. असो.

आता लालूप्रसाद, नितिशकुमारांवर एका दंगलीत हात असल्याचा आरोप करीत आहेत. ह्यावर विश्वास ठेवता येणारच नाही असे ठामपणे म्हणता येईल इतकी विश्वासहर्ता नितिशकुमारची राहिलेली नाही. तेजस्वी यादवनी राजीनामा द्यावयास हवा होता आणि त्यांनी राजीनामा दिला असता तर महागठबंधनचं सरकार कोसळले नसते, असं खाजगीत नव्हे तर टिव्ही चॅनलवरील चर्चेत भाग घेताना अली नावाच्या आरजेडी नेत्यांनी म्हटले आहे. ह्याउलट काही जेडीयूचे नेते (अगदी शरद यादवासारखे नेतेही) नितिशकुमारांवर नाराज दिसतात. काही राजकीय अभ्यासकांचं म्हणणं असे आहे कि, लालूप्रसादांना जेडीयूमध्ये फूट पाडून तेजस्वी यादव ह्याला मुख्यमंत्री करून भ्रष्टाचार प्रकरणीची संभाव्य अटक तसेच खटला टाळावयाचा होता. म्हणून नितिशकुमारांनी घाई करीत शपथविधीचा सोपास्कर पार पडला. ह्यातही तथ्य असू शकते. जगभरातील प्रत्येक देशात कुठल्याही राज्यप्रणालीत वरच्या पातळीवर काय शिजत असते, हे सामान्यांपर्यत पोहचतेच असे होत नाही. एक पक्षीय किंवा हुकूमशाही राजवटीत सरकार दरबारात काय घडत असते हे कळत नसतं, कारण तिथे सरकार पुरस्कृत मिडीया असते. तर लोकशाहीमध्यें माध्यमांचा इतका सूळसूळाट आणि काही संपादकांचे किंवा चॅनेल, वा वृत्तसंस्थांच्या मालकांचे लागेबांधे राजकीय पक्षांशी इतके जुळलेले असतात की राजकीय पटलावर घडणार्या घटनांच्या सत्यतेबद्दल सर्वसामान्यांचा गोंधळ उडत असतो. शेवटी दोन्ही प्रकारच्या राजवटीत प्रशासन म्हणजेच Governance किती लोकहितवादी असते ह्यावरच लोकांना अवलंबून राहून आपले मत ठरविण्याचे तेवढे हाती राहते. फरक हा आहे कि लोकशाहीत निदान governance किंवा performance ह्यावर सर्वसामान्यांना मत देण्याचा अधिकार असतो. हुकूमशाहीत वा एकपक्षीय राजवटीत तशा प्रकारचा अधिकार जनतेला नसतो, म्हणून अशा प्रकारच्या राजवटीत रक्तरंजित क्रांतीच सत्तापालट करीत असते.

मी मांडलेलं वरील विवेचन हेच सत्य मानण्याचा माझा आग्रह नाही. वाचकांची मतें भिन्नच असणार हे मी नाकारीत नाही. आणि ह्याचच नाव, जरी सुसंवाद म्हणता येत नसलं तरी, संवाद आहे असं माझं म्हणणं आहे. नितिशकुमारांवर भाजपाने दबाव आणला असेल असं जे म्हटलं जात आहे, त्यात फारसं तथ्य दिसत नाही. परंतु असं काहीतरी कारण आहे ज्याच्यामूळे नितिशकुमार भाजपाच्या दावणीला गेले. मग ते कारण कोणते? लालूप्रसादांनी नितिशकुमारचा पक्ष फोडून तेजस्विनी यादवाला मुख्यमंत्री बनाविण्याची तयारी केली होती. अस सुत्रांच म्हणणं आहे. मला वाटतं ह्याच कारणामुळे नितिशकुमारांना भाजपाच्या आधाराची गरज भासली असावी. दुसरे असे की राष्ट्रीय पातळीवर मोदींशी सामना करणं आता आपल्या आवाक्यात नाही ह्याची जाणीव नितिशकुमारांना झालेली असावी. त्यातही लालूप्रसादांच्या परिवारातील सदस्यावर एकामागोमाग भ्रष्टाचाराच्या केसेस दाखल होत आहेत. ते ओझे आपल्या डोक्यावर घेऊन बिहारमधील आपली राजकीय कारकीर्द पणाला लावणे मूर्खपणाचे आहे हे ही नितिशकुमारांच्या लक्षात आलेलं असणारच. एकंदरीत भाजपाने नितिशकुमारला फितविलेलं नसून नितिशकुमारांना भाजपाची साथ हवी आहे. हे इतकं स्पष्ट असताना भाजपावर आरोप करण्यात येतात. हे काही बरोबर नाही. भाजपावर राजकीय पटलावरील डावपेचांबाबत टिका झाली तर तीही मान्य करण्यासारखी आहे पण ह्या नाट्यात भाजपालाच खलनायक मानण्याची वृत्ती ही सुध्दा खलप्रवृत्ती आहे. मूळात लालूप्रसाद आणि नितिशकुमाराची हातमिळवणीच कमकुवत होती. जयप्रकाश नारायण, डाॅ राम मनोहर लोहीयांचा वारसा, सेक्युलरिझम इत्यादी सार्या गप्पा हवेतल्या आहेत. महात्मा गांधीजींचा काॅग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला काॅग्रेसने मानला कां? नाही, का तर स्वातंत्र्य लढ्याचं श्रेय घेत सत्ता मिळत  होती. परंतु लोकशाहीत सदा सर्वकाळ सर्वच लोकांना ऊल्लू बनविण्यात यश मिळत नसते. निपक्षपातीपणे म्हणावयाचे असल्यास भाजपाला दोष देण्याऐवजी आघाडी धर्माचं पालन करण्यात लालूप्रसाद आणि नितिशकुमार अयशस्वी ठरले हेच खरे कारण बिहारमधील सत्तापालटासंबंधीच आहे. मग बिहारी जनतेने दिलेल्या मॅन्डेट (कौल) ह्यासंबंधी चर्चा तरी का करावी?

आता पुढे काय? राजभवन हे नेहमी केंद्रातल्या सरकार पक्षाची मर्जी राखत असते. त्यामुळे "पार्टी विथ डिफरन्स " ह्या भाजपच्या घोषवाक्यावर टिका करणार्या विद्वान मंडळींची भारतात कमतरता नाही. टिका करणार्यापैकी काही विद्वान निःपक्षपातीपणाने म्हणत असतील, कि भाजपाला ह्यात पडायावयास नको होते. हे जरी तत्वतः खरे मानले तरी कुठल्याही राज्यातील घडामोडीवर केंद्र सरकारला स्वस्थ बसणे शक्य नसते. प्रश्न नैतिकतेचा नसून संविधानात्मक कार्यवाहीचा असतो. संविधानात कूठेही एका सर्वात मोठ्या पक्षाला संधी देण्याचे निर्देश नाहीत मात्र बहूमताच्या जवळपास पोहोचून स्थिर सरकार देऊ शकणार्या समुहास सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी असे नमूद केले आहे. केंद्रात काॅग्रेसचे सरकार असतेवेळी, १९९६ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी असूनही भाजपाला बहूमत सिध्द करण्याची संधी तत्कालीन राज्यपाल रोमेश भंडारीनी दिली नाही. इतकेच नाही तर पूढे कल्याण सिंह ह्यांना नरेश अगरवाल व चौधरी नरेंद्र सिंह ह्याच्या पक्षांचा पाठिंबा असूनही सरकार बरखास्त केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यपाल महोदयांच्या ह्या निर्णयाला असंवैधानीक ठरवून पून्हा कल्याणसिंह यांना मुख्यमंत्री बनविले. परंतू त्यानंतर भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये उतरती कळा लागली. ही बाब ह्या ठिकाणी का नमूद केली, तर सामान्यतः कुठलाही मतदार आपल्या राज्याचा राज्यपाल संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यात कूचराई करतात का ह्यावर काथ्याकूट करीत बसत नाही तर नवीन मूख्यमंत्री वा आघाडी लोकहिताची कामे करते कि नाही ह्यावरच त्याचं लक्ष असते. त्यानंतरच्या काळात मूलायमसिंग आणि मायावतींनी मिडियाला हाताशी धरून असं काही चित्र रंगविले कि भाजपा आणि काॅग्रेस हे पक्षच उत्तरप्रदेशात नाहीत. त्यामुळे सपा आणि बसपा लोकानुनाय घोषणा व जातीयवादी राजकारण करीत मतदारांना गुंगवत ठेवीत गेले आणि सत्ता आलटून पालटून एकेक टर्म उपभोगीत राहिले. परंतु मोदीलाटे नंतर मतदारांना भूलविण्याचा प्रकार करणारे हद्दपार झाले. केंद्रात मोदी सरकार अस्तित्वात आल्यावर सार्याच पक्षांच्या मूखातून विकासाची भाषा येऊ लागली. ह्याहून आपल्या लोकशाहीसाठी चांगली बाब तरी कुठली? इतकं जरी श्रेय भाजपा आणि पंतप्रधान मोदींना द्यावयास कोणी तयार नसतील तर त्यांनी लोकशाहीची मूल्यें, नैतिकता इत्यादीवर चर्चा तरी का करावी? व्यवहारात आपण म्हणत असतो कि झोपलेल्या माणसाला उठवता येते. पण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही, हेच खरें. जर नितिशकुमार आणि भाजपा यूतीचं सरकार चांगलं काम करेल तर पुन्हा निवडून येऊ शकते. आणि काही चागंली कामगिरी नाही केली तर मोदींचा करिष्मा विधानसभेच्या निवडणुकीत कामाला येईलच असेही नाही. परंतु त्या अगोदर आरजेडीने ह्यासदंर्भात न्यायलयात दाद मागितली त्यावर न्यायालयाचा काय निर्णय येतो, आरजेडी पक्षाचे सर्वच आमदार ठामपणे लालूप्रसादाच्या पाठी उभे राहतात कां इत्यादी गोष्टी बघणे औत्सूक्याचं ठरेल. तसेच महागठबधंनातील आमदार नव्याने स्थापन झालेल्या सरकाराला विधानसभेत कसा विरोध करतात, जनतेकडे आपल्यावर अन्याय झाला आहे ही बाब कशा रितीने पेश करतात ह्यावर महागठबंधन विरूध्द जेडीयु-बीजेपी ह्या सामन्याचा निकाल अवलंबून आहे. तुर्तास राष्ट्रीय पातळीवरील भाजपा विरूद्ध विरोधी पक्ष ह्यांच्या मधील महायुध्दांत मोदींच्या तोडीचा सेनापती विरोधी पक्षाकडे नाही, हे बिहारमधील सत्तापालटांतून सिध्द झालं आहे.

शनिवार, १५ जुलै, २०१७

युध्द मोदी समर्थक आणि विरोधकांचे‍‍!



केंद्रात मोदीचं सरकार आरूढ होऊन तीन वर्षे पूर्ण झाली. मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा अनेक वृत्तपत्राद्वारे, टिव्ही चॅनेल्स द्वारे आपल्यापर्यंत पोहचला आहे. भाजपातर्फे सरकारने केलेल्या जनहिताच्या कामाची जंत्री पाहिली तसेच विरोधी पक्षांनी दाखविलेल्या सरकारच्या उणीवा, त्रूटी ह्यासंबंधीची माहिती आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे ह्या लेखात त्यावर चर्चा न करता मोदी समर्थक आणि विरोधक ह्यामधील चालू असलेले युध्द ह्यावर चर्चा करावी असे मनात आले. आपली लोकशाही ही संसदीयप्रणालीची असूनही आजच्या चर्चेचा विषय भाजपा विरुद्ध विरोधी पक्ष असा का नाही? ह्याचं कारण मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या वेळेपासून एक दिवस असा गेला नाही कि मोदींवर कोणी विरोधी पक्षाच्या नेत्याने टिका केली नसेल. असे असूनही काही राजकीय समीक्षक भाजपाला दोष देत म्हणत आहेत कि भाजपाने एका व्यक्ती भोवती लोकशाहीचं केंद्रीकरण केलं. सत्य हे आहे की हीच समीक्षक मंडळी भाजपाऐवजी मोदीजीवर टिका करीत असतात. टिव्ही न्यूज चॅनेल्सवर राजकीय घडामोडीवरील चर्चेचं स्वरूप चर्चा कमी आणि वादविवाद अधिक असेच असते टिव्हीवरील चर्चेत संसदेतील संख्याबळावर आधारीत प्रवक्त्यांची संख्या नसते. त्यामुळे भाजपाचा एक प्रवक्ता तर विरोधी पक्षाचे चार प्रवक्ते असा सामना असतो. ह्याचंच प्रत्यतंर सोशल मिडीयावर असते. मोदीविरोधी आवाज मोठा परंतु विरोधी पक्षाचं विविध निवडणूकीतील यश नगण्य. असे का ह्यावर विरोधी पक्ष चितंन करीत आहेत असे दिसतच नाही. मग सत्तेचं केंदीकरण होत आहे असा आरोप करण्यात काय अर्थ? बहुतांश विरोधी पक्ष सत्ताधारी म्हणून वावरलेले. त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही सत्ताधिशाप्रमाणे वावरत, सोशल मिडीयावर मोदी विरोधी टिपणी करीत चमकण्याच्या नशेत तर भाजपाचे कार्यकर्ते बूथ आणि वार्ड पातळीवर कूठल्याही निवडणूकीच्या सहा महीने अगोदरच कामाला लागलेले असतात. मोदींच्या विरोधी वक्तव्य करीत राहणे हाच एक कलमी कार्यक्रम ज्यांचा आहे, ती मंडळी माझ्या ह्या लेखावरही टिका करणार हे मी गृहीत धरले आहे. आज राजकीय पटलावर जो तमाशा सुरू आहे तो शांतपणे बघत बसलेला मतदार राजाच काय तो निवाडा २०१९ साली होणार्या निवडणुकीत देणार असल्यामुळे माझ्या लेखावर होणार्या टिकेचंही मी हसतमुखानं स्वागत करीन. 

प्रथम असहिष्णुतेच्या भावनासंबंधी चर्चा करू या. मुळात असहिष्णुता हा विषय चर्चेला ज्यांनी आणला,ते लोक कोण आहेत? प्रतिथयश सिनेस्टार अमीर खान ह्यांनी त्यांच्या पत्नीला भारतात रहावयास असुरक्षित वाटू लागले असे निवेदन प्रसिद्ध केले. ह्यावर WhatsApp वर एक प्रतिक्रिया अशी आली कि '' मी काय म्हणतोय, कि बायको बदलून ह्या प्रश्नाचं उत्तर मिळते कि नाही हे बघायला काय हरकत आहे?".संपूर्ण भारतीय जनतेला आरोपीच्या पिंजर्यात टाकणार्या अमीरखानची भाषा असहिष्णुतेची कि WhatsApp वर अमीरखानच्या भाषेला प्रत्युत्तर देणार्याची भाषा असहिष्णुतेची? अमीरखानचा बोलाविता धनी दुसराच कोणी असू शकतो. (सध्या अमीरखानचा दंगल चित्रपट चीनमध्ये जोरात चालतो,आणि सीमेवर चीनची अरेरावी सूरू असतांना गुप्तपणे काॅगेसचे उपाध्यक्ष चीनच्या राजदूतांना भेटतात ह्या सार्या गोष्टी एक योगायोग आहे कि राजकीय षडयंत्र. देव जाणे).अमीरखानवर टिकेचा भडीमार सोशल मिडीयावरून झाला. मग अमीरखानची भाषा बदलली.

कोणीतरी एक लेखक म्हणे मोदी पंतप्रधान झाल्यावर मी देश सोडून जाईन असे म्हणाले होते. ते आता खरोखर देश सोडून गेले की नाही ह्याबद्दल मला काही माहिती नाही. ते खरेच देश सोडून गेले असतील तर त्यांच्या पाठोपाठ किती लेखकांनी देश सोडला आहे? जर पंधरा वीस लेखकांनी देश सोडला असेल तर ती बातमी आम जनतेला माहीत पडली असती. परंतु तसे काही घडले नाही. मग ह्या लेखक महाशहाची भाषा असहिष्णुतेची कि त्यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शविणार्या लेखक मंडळीची? मोदीजी पंतप्रधान झाल्यावर पुरस्कार वापसीची साथ आली होती. परंतु सरकारद्वारे ह्या रोगाच्या साथीवर काहीही औषधोपचार न करता ती थांबली. कशी थांबली? मला उत्तर देता येत नाही. भारतीय मतदारांना ह्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक आहे. पण ते सारेजण लोकसभेच्या पुढील निवडणुकीत उत्तर देणार. 

मोदीजी वारंवार परदेश दौर्यावर असतात, त्यासंबंधी उपहासाने चर्चा केली जाते. प्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे कि आजही ह्या जगात बळी तो कान पिळी हा कायदा अस्तित्वात आहे. त्याच जोडीला व्यापार, उद्योग, संरक्षण इत्यादी क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविणे हा ही आजच्या युगाचा धर्म आहे. आपला देश अजून महसत्ता झालेला नाही. आपला देश महासत्ता असता तर मोदींनी कशाला परदेशवारी केली असती? आता तर मोदीजी इजरायल ह्या छोट्या परंतु जगात दबदबा असणार्या देशाचा दौरा करून आले. मोदीजींचे अमेरिका, रशिया, इग्लंड, फ्रान्स ,जर्मनी, जपान ऑस्ट्रेलिया तसेच पच्चीम आशिया असो वा आखाती देश ह्या सार्या देशांचे दौरे झाले. ह्या सार्या देशाबरोबर शेती, व्यापार, गुतंवणूक, उद्योग सहकार्य,संरक्षण सहकार्य, संरक्षण विभाग अपडेट इत्यादी विषयासंबंधी द्विपक्षीय करार झाले. इजरायल दौर्याचे टायमींग छान साधलं आहे. एक आक्रमक आणि अत्याधुनिक शस्त्रांने परिपूर्ण अशा देशाचा हा दौरा. आणि तो देखील सीमेवर चीनची अरेरावी चालू असताना. इजरायलचा दौरा पाकिस्तान आणि चीनला बदलत्या भारताची ओळख देऊन गेला. शत्रूनां कसे गोधंळात टाकावयाचे आणि आपसुकच चीनने सूरू केलेला अरेरावीपणाचा विषय अप्रत्यक्षरित्या आतंरराष्ट्रीय करून मोदींजीनी बड्या देशांनाही चक्रावून सोडले आहे. आमचा पर्याय हा आम्हीच शोधू हेच पंतप्रधान मोदीजींनी इजरायलचा दौरा करून आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. ह्यालाच म्हणतात खंबीर नेतृत्व. बीबीसचे जेष्ठ संपादक आणि राजकिय विश्लेषक मार्क टूलीने म्हटलं आहे कि "मोदींच्या कारकीर्दी पासून भारत बदलत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण झाला आहे. असे असूनही मोदींच्या मार्गात अडथळे निर्माण केले जातील तरीही श्री मोदी समर्थपणे तोंड देत सर्व अडथळ्यावर मात करतील". मार्क टूलींचा भारतातील राजकरणाचा अगदी जवळून अभ्यास आहे. त्यामुळे मार्क टूलीने ' मोदींच्या मार्गात अडथळे निर्माण केले जातील ' असं जे म्हटलं आहे त्यात तथ्य आहे असे मला वाटतं. ह्याची कारणे दोन आहेत. एक काॅग्रेसचे मणी शंकर अय्यर पाकिस्तान टिव्ही चॅनलेच्या सुत्रसंचालकला मोदी सरकारला संबोधून  "आप इन्हे हटाइये और हमे लाईए" अशी विनंती कि सूचना देताना आपण टिव्हीवरून पाहिले. दूसरी गोष्ट ही कि एका बाजूला चीन आणि पाकिस्तानवर दबाव वाढावा म्हणून जगातील अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या इजरायल देशाशी विविध करार करीत आपले पतंप्रधान मैत्री वाढवित आहे तर दूसर्या बाजूला काॅग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी चीनच्या राजदूतांना गूप्तपणे भेटतात. काय म्हणावं? अशा नेत्यासंबंधी. विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्क टूलीचं मत पटत नसेल, तरी सामान्य मतदार सरळ पुढील निवडणुकीतच ह्यावरचा निवाडा देइल तो पर्यंत वाट पाहणे ह्यातच शहाणपण आहे. 

मोदींच्या कार्यपद्धतीत जाहिरातबाजी जास्त आणि काम कमी. अशी चर्चाही अधून मधून होत असते. "इंदिरा गांधी आयी है, नयी रोशनी लायी है" अशी जाहिरात माझ्या काॅलेज जीवनात ऐकू येत होती. इंदिराजीच्या अगोदर पंडित नेहरू म्हणजे इंदिरा गांधीचे वडील आणि काही काळासाठी लालबहाद्दूर शास्त्रीजी पंतप्रधान होते. म्हणजे काॅग्रेसचेच सरकार होते. जाहिरतीवरून वाटले कि इंदिरा गांधीच्या अगोदर देशात अंधार होता कि काय ? इंदिराजींनी संस्थानं खालसं केली, त्यांचा तनखा बंद केला. पण त्यांच्याच कुटुंबाचं संस्थान निर्माण झालं. सपूर्ण काॅग्रेस पक्षच त्यांच्या कुटुंबियांचा झाला. मग हळूहळू देशात, डीएमके, शरद पवार घराणे, पश्र्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथेही प्रत्येक पुढाराच्यांची संस्थाने, मुलायमसिंग घराणे, ठाकरे घराणे, मायावती घराणे, शेखअब्दूला घराणे, बादल घराणे लालू घराणे इत्यादी आणि  अशीच  भारतातल्या प्रत्येक जिल्हा, तालूका, पातळीवर अनेक संस्थानं उभी राहिली. प्रश्न असा आहे कि राजकीय क्षेत्रात इतकी संस्थानं कशी आणि कोणी उभी केली? राज्यशास्त्राच्या अभ्यासकांचं ह्या प्रश्नावरील उत्तर "राजा कालस्य कारणम्!" हेच होय. स्वर्गीय इंदिरा गांधीनी 'गरीबी हटाव' चा नारा दिला होता, गरीबी हटली कां? हटली असेल तर मग राहूल गांधी कोणाच्या झोपडीत जाण्याचं नाटक करीत आहेत? राजीव गांधीची ' Mr Cleen ' अशी जाहिरात झाली. भ्रष्टाचार कमी झाला कां? जर राजीव गांधी हे Mr Cleen होते तर त्यांच्या मातोश्री भ्रष्ट होत्या कां? इत्यादी प्रश्नांची उत्तरे काॅग्रेस पक्षाकडून अनुत्तरीत राहिली. परंतु मतदारांनी वेळ आली त्या त्या वेळी मतदानाद्वारे दिली. नोटबंदीने काय साधले ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही काही लोकांना तातडीने हवं आहे. पण वाचकहो, सामान्य जनतेने त्रास सहन करीत सरकारच्या निर्णायाचं स्वागत केले. तरीही विरोधी पक्षांनी आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही घसा फोडीत विरोध केला. आणि अजूनही करीत आहेत. आणि करीतही राहणार. नोटाबंदी एक राजकीय खेळी आहेच असे मी आणि आणखिन कोणी मानले तरी त्यासंबंधीचा निर्णय मतदारच देणार . आता मतदार हुषार झाला आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष कुठे आणि कोणते डावपेच खेळत आहेत हे मतदारांना चांगले ठाउक आहे. पण ते शांतपणे तमाशा बघतात आणि उत्तर मात्र लोकसभेच्या पुढील निवडणुकीत देतील. तोपर्यंत वाट पहायची.

म्हणे मोदीजी जातीयवादी आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिम बांधवांला उमेदवारीचं तिकीट दिलं नाही. विरोधी पक्षांचा हा आरोप उत्तर प्रदेशातील जनतेला पंसत पडला नाही. तेथील जनतेने भाजपाला अभूतपूर्व बहुमत देउन विजयी केलं. हे कसं शक्य झालं? कारण मुस्लिम बांधवांच्या घरातही गॅसच्या शेगड्या पोहोचल्या आणि आगीच्या चूलीतील धूरांपासून सगळ्या गृहीणीची सूटका केली. आणि हे मी मुंबईतील रिक्षाचालकाकडून निवडणूकीपूर्वी ऐकलं होतं. आता मला सांगा की मोदीजी कूठे भेदभाव करतात? "जशी दृष्टी तशी सृष्टी ".मोदीजी सव्वाशे कोटी भारतीयांचे विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत."सबका विकास, सबका साथ" आता ही घोषणा मोदीजींनी उत्तर प्रदेशात प्रत्याक्षात उतरविली. म्हणून त्यांना उत्तर प्रदेशात प्रचंड यश मिळाले. परंतु ह्या विजयाचं श्रेयही मोदींना द्यायला विरोधी पक्ष तयार नाहीत. मला वाटतं " सबका साथ सबका विकास" ह्या घोषणेत "ना किसी एकके उपर मेहरबान" हे तत्व समावलेले असल्याकारणाने ह्यांची दूकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ह्या विरोधी पक्षांना नैराश्याने ग्रासले असावे. सन १९९८-९९ मध्ये दै लोकसत्ता ह्या वृत्तपत्रात " सर्वधर्मसमभाव आणि राजकिय पक्षांचा व्यवहार" ह्या मथळ्याखाली माझा संपादकीय लेख प्रसिद्धीस आला होता. तो लेख मी काॅग्रेसचे विद्वान नेते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळांनी दै मटामध्ये दिलेल्या मुलाखत मधील एका वाक्याच्या अनुषंगाने लिहिला होता. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळांच ते वाक्य असे होते. "काॅग्रेस पक्षाला बहूसंख्यांकांच्या हिताला, त्यांच्या भावनाकडे दूर्लक्ष करून चालणार नाही". बॅ विठ्ठलराव गाडगीळांचा सल्ला काॅग्रेस आणि सहयोगी पक्षांनी मानला नाही. अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करीत एक गठ्ठा मते मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचं धोकादायक धोरण भाजपेतर पक्ष करीत राहिले. त्यामुळे भाजपा संसदेतील सर्वाधिक जागा मिळवूनही त्याला सत्तेपासून दूर ठेवण्यात विरोधी पक्ष यशस्वी होत राहिले. सत्ताधारी पक्ष मग जगभरातील कुठल्याही देशातील असो, त्यांना बहुसंख्यांकाकडे दूर्लक्ष करणे कधीतरी महाग पडत असतेच. जगभरातील अनेक देशात अशा पध्दतीचे सत्तांतर घडून आल्याची उदाहरणे आपण पाहिली आणि पाहात आहोत. फरक इतकाच कि आपल्यासारख्या लोकशाहीप्रधान देशात निवडणूकीच्या माध्यमातून सत्तातंर होत असते. २०१४ मधील आपल्या देशात भाजपाला बहूमत प्राप्त मिळण्याच्या पाठीमागे भाजपेतर पक्षांचा सर्वधर्मसमभावासंबंधीचं ढोंग हे ही एक कारण आहेच. हे मान्य करण्याचं धाडस भाजपेतर पक्षांकडे नाही. जे धाडस बॅ विठ्ठलराव गाडगीळांनी दाखविले होते. वाजपेयीच्या सरकार नंतर तब्बल दहा वर्षे काॅग्रेस आघाडीने राज्य केलं. परंतु जनतेचा भ्रमनिरास झाला. पुढला इतिहास आपण जाणत आहात. काॅग्रेसच्या पतनाचं कारण भ्रष्टाचार हे होतेच. तसेच बहूसंख्यांकाची नाराजी ह्यावरही आपण चर्चा केली. परंतु आणखिन एक वेगळं कारणही होते. ते म्हणजे २००९ सालच्या विजयाबाबत काॅग्रेसच्या नेत्यांनी काढलेला चूकीचा निष्कर्ष. वस्तूतः डाव्या पक्षांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंगाची वेळोवेळी केलेली कोंडी मतदारांना पसंत पडली नव्हती. त्यातून डाॅ मनमोहनसिंगसंबंधी सहानुभूती निर्माण झाली. डाव्या पक्षांना धडा द्यावयाचा निर्णय मतदारांनी घेतला आणि काॅग्रेस विजयी झाली. परंतु काॅग्रेसला वाटले कि हा विजय सोनीया गांधीच्या करिष्माचा होता. त्यातून मनमोहनसिंगाच्या पदाचे अवमूल्यन होत गेले आणि काॅग्रेस व मित्र पक्ष ह्याचें बारा वाजले. मतदार टोकाची भूमिका का घेतात ह्याचं कारण राज्यकर्ते मतदारांना गृहीत धरून चालतात. हेच होय. 

आजही जातीवरून किंवा धर्मावरून एखाद्या पक्षाने निवडणुकीत उमेदवार उभे करावेत का? प्रत्येक वेळी सरकारने नागरिकाला त्याच्या धर्मावरून ओळखावे का? ही कुठली राजनीती ? हा कुठला राजधर्म झाला? महाराष्ट्रात सेना-भाजपाची प्रथमच युती झाली होती. तेव्हा सत्ता हातातून निसटती आहे हे लक्षात आल्यावर शरद पवारांनी एका जाहीर सभेत "आपणास जोशी-महाजनाचं सरकार हवयं कां? असा प्रश्न केला. लागलीच एका जाहीर सभेत स्व. प्रमोद महाजनांनी "दिल्लीत ब्राह्मणांची लुगडी धुण्यात ज्यांनी आपली हयात घालविली त्यांना मतदार चागंले जाणतात". असेच काहीतरी उत्तर दिल्याचं आठवतंय. अलीकडे ह्या जातीय जाणता राजाने कुठल्या तरी एका कार्यक्रमात आपले जातीय विष ओकलेच. फडणवीस नावाची व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर कशी काय बसू शकते? हीच बाब ह्यांना सतावत असते. भारतीय जनता पार्टीने कोल्हापुरातील राजघराण्याच्या वशंजाला राज्यसभेवर पाठविले. त्यामुळे एका कार्यक्रमात म्हणे " पूर्वी राजे पेशवाईची नेमणूक करीत व पेशवे फडणवीसांची, आता फडणवीस राजेंना राज्यसभेवर पाठवित आहेत". इतक्या खालच्या थरावरचे उद्गार शरद पवारांनी काढले. हेच शरद पवार सातार्यातील राजेनां सतत आपल्या पक्षाचं तिकीट देत लोकसभेवर वा राज्यसभेवर वर्णी लावत आहेत. आपण काय बोलतोय ह्याचं भान ह्या जाणत्या नेत्याला राहात नाही तर ह्यांचे अनुयायी जितेंद्र आव्हाड ह्यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा कशी काय ठेवावी? जितेंद्र आव्हाड तर राष्ट्रवादी पक्षाचं स्वरूप एका जिल्हापुरता आणून ठेवणार असे दिसत आहे. हे झालं महाराष्ट्रात. तसेच अनेक राज्यात विरोधी पक्षांची अशीच स्थिती झाली आहे. भारत बदलत आहे. हे मार्क टूली म्हणतात. आणि ह्यावर विश्वास ठेवावयाचा नसेल तर आपल्या येथील समाजशास्त्राचे बुजुर्ग अभ्यासक शीव विश्वनाथन ह्याचां हिंदुस्थान टाईम्स ह्या वृत्तपत्राच्या दिनांक 1 जुलै 2017 च्या अंकातील "Why South India finds BJP more acceptable now" ह्या मथळ्याखालील लेख वाचावा. ते म्हणतात, "The new aspirational and mobile, global South Indian is more ready for BJP and Modi than epic battles of ideology and electoral politics." ज्या दक्षिण भारतात भाजपाला कधीही स्थान मिळू शकत नव्हते आणि इतक्या लौकर मिळणार नाही असे खात्रीलायक रित्या म्हणणार्या विरोधी पक्षांचे नेते आणि मिडीयातील बुध्दीवाद्यांना तेथील मतदार चक्क वेड्यात काढणार असेच दिसू लागले आहे. दाक्षिणात्य प्रान्तांतील मतदारांना पारंपारिक स्थानिक पक्ष बुरसटलेल्या मनोवृत्तीचे वाटू लागले आहेत. तर भाजपा आणि पंतप्रधान मोदीजी आधूनिकेतेचे प्रतिक वाटतात. हे सारं काय दर्शविते? भारत बदलतोय हेच ते सत्य. आता हे सत्य कोणाला जाहिरातबाजी म्हणून थट्टेवर सोडावयाचे असल्यास ते सोडू शकतात. मी एवढंच म्हणेन, घोडा मैदान जवळ आहे.

अटलबिहारी वाजपेयी हे उदारमतवादी होते ही एक नवी तक्रार विरोधक आळवताना दिसतील. हो उत्तर शंभर टक्के बरोबर. परंतु विरोधी पक्षांनी हे केव्हा मान्य केलं? मोदी नावाचे वादळ ह्या पक्षांच्या अंगावर धडकावयास सुरवात झाली तेव्हापासून. अटलजींच्या नेतृत्वाखाली भाजपा संसदेतील सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष परंतु त्यावेळी ते उदारमतवादी आहेत असे ह्या पक्षांना वाटले नाही. निवडणूकपूर्व आघाडी नसतानाही ही मंडळी एकत्र आली आणि देवेगौडांना पंतप्रधान म्हणून बसविले आणि सरकार स्थापन केले. नंतर देवेगौडा त्यानांच आवडेनासे झाले. कां? ना मिडीयाला कळलं ना मतदार राजाला. मग गुजरालांना पंतप्रधानपदी बसविले. कोणालाही पंतप्रधानपदी बसविण्यात ह्या सार्या विरोधी पक्षाचां हातखंडा. तशी तालीम ह्या मंडळीनी ह्याआधी चरणसिंह आणि चंद्रशेखरांच्या वेळी केली होती. नरसिंहराव हे ही बसविलेलेच पंतप्रधान. कारण त्याचं सरकारही अल्पमताचंच. फक्त भाजपाने अविश्वासाचा ठराव आणला कि आपआपसात अविश्वास असणारी मंडळी एकत्र येत होती. अटलबिहारी वाजपेयींबद्दल ज्या विरोधी पक्षांना आदर वाटतो त्या मडंळीनी एका मताच्या फरकाने त्यांचे सरकार पाडले होते. त्यासाठी महाराष्ट्रातील पहेलवान शरद पवार ह्यांचा उपयोग झाला. मायावतीच्या साह्याने एक मत जे कमी पडत होते त्याची व्यवस्था शरद पवारांनी केली हे आपण टिव्ही वरून लाइव पाहिले. देशावर विनाकारण तेरा महिन्याच्या कालावधीत निवडणूकीचा प्रचंड खर्चाचा बोजा टाकला. आणिबाणीच्या खालोखाल पापकृत्य म्हणून भारतीय राजकरणाच्या इतिहासात ह्याची नोंद झाली. तेव्हाच खरं म्हणजे नियतीने नरेंद्र मोदीचा राष्ट्रीय राजकरणातील प्रवेश      निश्चित केला होता. आणि सोबत ह्या सार्या राजकीय नेत्यांची हाकलपट्टीही निश्चित केली होती. जनतेलाही कळून चूकले होते की वाजपेयींसारख्या उत्तुंग व्यक्तीमत्व असलेल्या नेत्यावर दुष्ट दृष्टी ठेवण्याचं पाप ह्या मंडळीनी केलं. त्यामुळे वाजपेयीचं सरकार पाडून सुध्दा पुन्हा निवडणुकीत भाजपप्रणित आघाडीचाच विजय झाला. तेरा महिन्याच्या कालावधीत कुठला लेखाजोगा मतदार मागणार होते? पण सत्तेसाठी सर्वात लाचार आणि संधीसाधू नेते म्हणजे शरद पवार, मायावती, मूलायमसिंग आणि लालूप्रसाद यादव. देशात सदैव अस्थिरता रहावी, त्यातून लोक कम्युनिझमकडे वळतील अशी आशा बाळगणारे डावे पक्ष, ह्या संधीसाधूना बाहेरून पाठिंबा द्यायला नेहमी तयार असतातच. येनकेन प्रकारे भाजपाला सत्तेत बसू द्यायच नाही, हेच ह्याचं ध्येय. आपला जन्मच सत्ताधारी म्हणून झालाय असा काॅग्रेसचा भ्रम. त्यामुळे जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागली. पुढे वाजपेयींनी पाच वर्षे चांगल्या कारभाराचं दर्शन घडविले. परंतु भाजपाला अतिआत्मविश्वास नडला. पुन्हा काॅग्रेस पुरस्कृत आघाडी सत्तेत आली. मनमोहनसिंगांचा कारभार कसा होता ह्यावर चर्चा करण्याची गरज नाही. मोदी नावाचं अस्त्र भाजपाने आपल्या पोतडीतून काढले आणि ह्या सर्व पक्षांचा पायाच उध्वस्त केला. खरं म्हणजे लोकशाहीत प्रजाच मालक. मग मोदींनी ह्या पक्षांचा पाया उध्वस्त केला असं कां म्हणावं? श्री नरेंद्र मोदींच्या पुढे ह्या सार्याचं गुजरात मध्ये काही एक चाललं नाही. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करीत नाना प्रकारे मोदींचा छळ केला. भगवा आतंकवाद काय, इशरत प्रकरण काय, मौतका सौदागर काय, सारी यंत्रणा आणि मिडीया हाताशी धरून जेवढं मोदीं आणि भाजपाला बदनाम करता येईल तितके सारे महाउद्योग सार्या विरोधी पक्षांनी केले. परंतु ह्यांच्या पापाचा घडा भरला होता. जनतेने ह्या सार्या मंडळीनां आता एकेक राज्यातून उखडावयास सुरूवात केलेली आहे. अनेक वर्षे सत्ताधारी म्हणून वावरल्यामूळे लोकांकडे जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणे ह्यांना जमत नाही. म्हणून त्यातील काही लोक भाजपामध्ये गेले. काही जाण्याच्या वाटेवर आहेत. भाजपामध्ये ती मंडळी जात आहेत म्हणून भाजपा इतर पक्षांची फोडतोड करीत आहे अशी ओरड अनेक विश्लेषक करतात. भारतीय राजकरणात आयाराम-गयाराम ह्या पध्दतीचा पाया स्वर्गीय इंदिरा गांधीनींच घातला आहे. हे सोयिस्करपणे विसरयाचे हा अनेक बुद्धीवाद्यांचा धंदा आहे. आता धंदा म्हटलं तर ह्यावर चर्चा तरी कशी करावी? काय धडा त्यांना द्यावयाचा हे मतदार राजालाच ठरवू द्या की.

आता मोदी आणि मोदींचे भक्त ह्यासंबंधी चर्चा करू या. मोदींवर टिका करीत असताना हमखास मोदींच्या भक्तांना अंधभक्त म्हणून संबोधले जात आहे. संबोधले जाते ऐवजी हिणवले जाते असा शब्दप्रयोग मी टाळीत आहे. कारण आज अनेक दृष्टीहीन समाजबांधव स्वकर्तृवाने विविध क्षेत्रात चागंल यश मिळवित आहेत. अंधभक्त असा शब्दप्रयोग करणार्यांनी प्रथम हे ध्यानांत घ्यावे कि कूण्या समाजबांधवाच्या शरीर रचनेवरून टिका करण्याचा अधिकार आपल्या देशाच्या संविधानद्वारा आपल्याला मिळालेला नाही. मी तर भाषातज्ञ आणि सरकारला सूचवू इच्छितो कि सर्व भाषांमधील मानवी शरीराच्या अवयवावरून जितक्या म्हणी, वाक्प्रचार वा शब्दप्रयोग आहेत ज्यामुळे काही समाजबांधवाना यातना पोहोचतील ते सर्व शब्द, वाक्प्रचार,म्हणी रद्दबातल करावेत. नाहीतरी अशा शब्दांमूळे भाषेचं सौंदर्य वाढते असे काही दिसत नाही. ज्याचां काही संबंध नाही अशा समाजबांधवांना अशा प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार, शब्दाद्वारे मानसिक क्लेश देणे ही सुध्दा एक प्रकारची हिंसा आहे. जागोजागी अशी हिंसा करणारे विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोदीजींना हिटलर तर कधी चहावाला म्हणून संबोधितात. आता ह्यानां काय म्हणाव? मोदींना हिटलर आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना अंधभक्त सबोंधणार्या विरोधी पक्षांच्या नेत्याचीं आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करू या. भाजपा सोडून भारतातील बहुतांश पक्ष मग ते राष्ट्रीय, प्रादेशिक,जिल्हा, किंवा तालूका पातळीवरील असो ते घराणेशाहीवर आधारीत आहेत. त्या सर्वांच्या पक्षांतर्गतील निवडणूका वैगरे नुसता फार्स असतो. जो पक्षाचा प्रमूख त्याचा आदेश हाच कायदा. त्यामुळे त्या पक्षातील कार्यकर्त्यांना तसेच नेत्यांना सर्वत्र हिटलर दिसत असावा. आणखिन दोन महत्वाच्या बाबी म्हणजे मानहानीकारक पराभव पचविण्याची ताकद ह्यांच्यात नसावी ,आणि दूसरी बाब ही कि मोदी सरकारवर टिका करण्यासाठी ह्यानां मुद्दा मिळत नसावा. मोदी समर्थकांना अंधभक्त हे लेबल ह्यांना कोठून सूचलं असेल? कदाचित ह्यानां ह्याच्यांच पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला भेटण्यासाठी डोळ्यावर कापडी पट्टी बांधून जावे लागत असेल कां? मी तो विचार सोडून दिला. आणि नंतर कळले कि ह्या घराणेशाही असलेल्या पक्षांची धूरा हळूहळू त्या घरातील शेंबड्या पोरांकडे गेलेली दिसत आहे. आणि तिथे त्या यूवा नेत्यांचे आजोबा शोभतील इतक्या वयाचे कार्यकर्ते देखील यूवा नेत्यांचे चरणस्पर्श करताना दिसत असतात. त्यामुळे ही मंडळी स्वतःची दृष्टी हरवून बसले असावेत का? तस असेल तर त्यातून मोदींचे समर्थक ह्यानां अंध दिसणारच त्यात नवलं काय ते. अर्थात मला काय वाटते ह्यापेक्षा जनता-जनार्दनला काय वाटते, हेच महत्वाचे ठरणार आहे. मी फक्त एवढेच सांगू शकतो कि पंतप्रधान मोदीसंबंधी जितका पराकोटीचा द्वेष कराल, तितका मोदींना लोकांचा पाठिंबा मिळत जाणार. गुजरातच्या तीन विधानसभा निवडणूकीचा प्रचार आणि निकाल आपल्या समोर आहे. निवडणुकीत मोदी हाच मुद्दा राहात गेला तर लोकांचा मोदी मोदी असा घोष सुरूच राहणार. तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना अंधभक्त म्हणून हिणवण्याने भाजपा पराभूत होणार नाही हेच मला विरोधी पक्षांना सांगावयाचे आहे. भाजपा कार्यकर्ते किती? परंतु लाखो मतदार मोदींच्या पाठीशी उभे आहेत त्यांना तुम्ही अंध कसे संबोधणार? प्रथम विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डोळस वृत्तीने आत्मपरीक्षण करावे आणि मतदारांपर्यंत पोहचलं पाहिजे. परंतु ह्यातील बरेच पक्ष सत्ताधारी राहिलेले. त्यामुळे ह्यांचे कार्यकर्ते मिडीयावर चमकण्याच्या नशेत तर भाजपा, संघाचे लोक वार्ड आणि बूथ पातळीवर घाम गाळीत आहेत. विजयश्री कोणाकडे जाणार? 

शेतमालाची किंमती, अपूरं पर्जन्यमान, अपूरी सिंचन व्यवस्था, अवकाळी पावसामुळे होणारं शेतमालाचं नूकसान, ह्यातून होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्या, कर्जपुरवठा,कर्जमाफी इत्यादी समस्या बाबत मोदी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या चकमकी चालू असतात. मूलतः ह्या समस्यांचा जन्म स्वातंत्र्याकाळापासूनचा आहे. भले हरित क्रांती, धान्य उत्पादनात आपलं स्वयंपूर्ण होणं ह्या जमेच्या बाजू असल्या तरी सिंचन व्यवस्थापनातील भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, त्यात सुधारणा करण्यासाठी लागणार्या दूरदृष्टीचा अभाव तसेच शेतमालाची होणारी नासाडी थाबंविण्याच्या उपाययोजनात आधूनिकता आणण्यातील अपयश, विविध पिकांच्या उत्पादनात लागणार्या जलाचा शास्त्रोक्त अभ्यास, जलस्त्रोत शोधण्यासाठीचं आणि जल साठवण्याच्या युक्त्या शोधण्यात अपयश, बी बियाणे, वीजेचा पुरवठा , धरणातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी किती, शेती, उद्योग तसेच एकमेकांच्या शेजारी असलेल्या स्वभाषिकांना किती, त्यातही एकमेकांच्या शेजारी असलेल्या प्रान्तामधील विवाद इत्यादी गोष्टीचं खापर कोणाच्या माथ्यावर फोडायचं हेच सरकार आणि विरोधी पक्षांमधील लढाईच स्वरूप आहे. केंद्रात दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून श्री शरद पवार होते. त्यांचा शेती ह्या विषयांवरील अभ्यास दांडगा असूनही ते कूठेतरी कमी पडले असा रोष जनसामान्यांत आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. केवळ मोदींच्या "अच्छे दिन आयेंगे " ह्या घोषणांनांना भूलून लोकांनी मोदींजीना आणि फडणवीसांना सत्तेवर बसविले नाही. आजचा मतदार भूलथापांना बळी पडणारा नाही. स्वच्छ चारित्र्य आणि लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारे कोण हे आता जनतेला चांगलं कळतयं. महाराष्ट्रापुरता म्हणायचं झालं तर साखर उत्पादनावर आणि साखर कारखानदारीवर तसेच जिल्हा सहकारी बॅंका ह्या तिन्ही संस्थावरील अमर्याद सत्ता ह्यामूळे काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काग्रेसचे नेते आधूनिक संस्थानिक झाले अशी भावना सर्वसामान्यात आहे. तसेच दहा वर्षात जी काही कर्जमाफी झाली, त्याच्या वाटपातही घोटाळा आहे. जिल्हा सहकारी बॅंकाही तोट्यात. सरकारी तिजोरीत ठणठणाट आणि राज्यावर प्रचंड कर्जाचा बोजा अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी कारभार हाती घेतला. शेतकर्यासाठी जल शिवारं, कर्जमाफी, शेतमालाची खरेदी विक्री मधील दलाली संपुष्टात आणण्याचं काम असो त्यात त्यांचा प्रामाणिकपणा दिसतोय. तरीही विरोधी पक्ष तसेच शिवसेनेची टिका सुरूच आहे. दूध आणि शेतमालाची ,सरकारी मालमत्तेचं नुकसान करीत आंदोलनं चालूच राहणार असतील तर ह्या तिन्ही पक्षांकडे चांगला पर्याय आहे, तो म्हणजे फडणवीस सरकारवर अविश्वासाचा ठराव पास करून राज्यात नवीन शेतकर्याचं हितरक्षण करणारं सरकार स्थापन करावं, किंवा मध्यावधी निवडणूकीला सामोरं जावे. लोकभावना काय आहे हे मतदानाद्वारें कळेलच की. उगीच तमाशा कशाला? आपला महाराष्ट्र पुरोगामी! फूले-शाहू-आंबेडकरांचा वारसा जपायला हवा ना!

आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने श्री रामनाथ कोविंद ह्यांना उमेदवारी दिली. ह्यावर चर्चा होताना त्याचं दलित होणं ही राजकीय खेळी आहे असा कयास विरोधी पक्षांनी लावला आणि मीराकुमारींना मैदानात आणले. परंतु आतापर्यंत डाॅ अब्दुल कलामांचा अपवाद वगळता बहुतांश राष्टपतीपदासाठी उमेदवार काही ना काही राजकीय स्वरूपाचा फायदा वा सोय बघूनच निवडले गेले आहेत. ते कूणी निवडले? ह्यावर चर्चा करावयास कोणी मोदी विरोधक येणार नाहीत. सत्य हेच 'जे पेरले ते उगवते'. किंवा आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येते हा सृष्टीचा नियम आहे. विरोधी पक्षांनी राजकीय मैदानावर जे नियम केले त्याच नियमानुसार मोदीजी खेळत असतील तर चरफडण्यात काय अर्थ? विरोधी पक्षातील नेते म्हणत असतात कि "मोदीजीको प्रधानमंत्रीपदके गरीमाको भूलना नही चाहिये". पण मोदी पंतप्रधान आहेत ही बाब विसरावयाची आणि त्यांच्यावर खालच्या पातळीवर येऊन टिका करावयाची. त्याचं काय? आपलं जाऊ द्या हो. मतदारांना काय वाटते हे आपल्याला कूठे माहित आहे?  ते सारे जण लोकसभेच्या पुढील निवडणुकीत उत्तर देणार. 

राहता राहिला प्रश्न अलीकडच्या GST संदर्भातील. नोटबंदी असो वा GST ह्या संबंधी अनेक जाणकारांची मते भिन्न. जगातील सर्व घड्याळ निर्मिती करणार्या कंपन्यांनी कितीही दावा केला तरी त्यांनी तयार केलेली घड्याळे एकाच वेळी तंतोतंत अगदी सेंकदाचा फरक न दाखविता वेळ दाखवू शकतात कां? नाही हाच आपला अनुभव. तसेच अर्थशास्त्रातील तज्ञ ह्या GST आणि नोटासंबंधीच्या विषयांवर भिन्न मते मांडणार. GST संदर्भात निदान एक गोष्ट स्पष्ट आहे कि सार्या राजकीय पक्षांनी केवळ सहमतीनेच नव्हे तर एकमताने बील केलं  पारीत आहे. त्यामुळे आता GST संबंधी सोशल मिडीया वा टिव्ही चॅनेलद्वारे दिसणार्या चर्चा म्हणजे वेळेचा अपव्यह आहे. कारण विरोधी पक्षांनीही ह्या विषयाचा चेंडू २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी मतदाराच्या कोर्टवर ढकलला आहे. लोकशाहीत निवडणुकीतील निकालानेच सरकारच्या कामगिरीचे व विश्वासाहर्यतेचे मूल्यमापन होत असते. जनतेचा कौल बघितल्यानंतर एकच वाक्य आपल्या सर्वाच्या मूखी असते ते म्हणजे "ये पब्लिक है, सबकुछ जानती है!".

गुरुवार, ६ जुलै, २०१७

आषाढी एकादशी निमित्ताने



आज आषाढी एकादशी. आपल्या हिंदू धर्मातील मान्यते नुसार भगवंत चार महिन्यासाठी झोपी जातात. मागील लेखात मी भगवंतांचं स्वरूप जशी दृष्टी तसे त्या शक्तीचं रूप असे म्हटलेलं आहे. आणि त्यातूनच विविध स्वरूपाने नटलेल्या त्या शक्तीचं रूप ज्यांना जसं दिसलं ते ते त्या धर्माचे संस्थापक म्हणून गणले गेले आणि त्यानुसार धर्मांची नावे उदयास आली असावीत. असा निष्कर्ष आपण काढला. आपल्या धर्माची व्याख्या फार व्यापक असल्यामुळे,आणि कोणी संस्थापक नसल्यामुळे 'जो समाजाची धारणा करतो तोच धर्म ' तोच शाश्वत धर्म,असे आपण मानले. आणि तोच हिदूं ह्या नावाने ओळखला जातो. त्यामुळे आपल्या सर्व सणांच्या उद्दिष्टांमागे कुठलंतरी एक सामाजिक प्रयोजन असतेच. ह्यासंबंधीचं परिपूर्ण आणि सुरेख विवेचन स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांच्या ' संस्कृती पूजन ' ह्या पुस्तकात आढळते. पूजनीय शास्त्रीजी देवशयनी एकादशीच्या निमित्ताने संदेश देतात तो असा "कर्म करा पण अभिमान करू नका. कर्म करतांना ' मी ' ची समाधी लागू दे. 'अहम ' गाडा, झोपू द्या. प्रभू झोपी गेला म्हणजे अहम् न ठेवता तो स्वतःचे कर्म म्हणजे जगव्यवहार करीत राहिला". अशा प्रभूचं स्वरूप ज्यांना पुर्णपणे कळले आणि आपल्यातील 'अहम् ' ला गाढून ज्यांनीं जगाच्या उद्धारासाठी आपलं जीवन वेचलं ते देवदूत वा संतजन. त्यांचा ह्या भूतलावरील वावर ही सृष्टीची आपल्याला मिळालेली देणगी होय.

संतांच्या शिकवणीत आणि त्यांच्या साहित्यात समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणी शुद्ध भाव निर्माण करण्याची क्षमता आहे. संतंमंडळींचं चरीत्र आणि त्यांचे साहित्य थोडेफार जरी कळले, तरी त्यांच्या बुद्धीमत्तेचा आवाका पाहून आपण अचंबित होतो. ह्या संतमडंळींचा भूतलावरील वावर पाहिला, तर आपल्या लक्षात येते कि ही सारी मंडळी एकाच जन्मात शांतीदूत, तत्ववेत्ता, साहित्यिक, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, प्रबोधनकार, समुपदेशक, व्यवस्थापनकुशल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानवजातीचेच नव्हे तर सार्या प्राणीमात्रांचे पालक होते. आपण म्हणतोच कि "जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती!". मंडळी, आपल्याच नव्हे तर जगभरातील सर्वच संतांनी आपआपल्या परीने, आपआपल्या भाषेत जो काही उपदेश दिला आहे, त्यात फारसा फरक नाही. तसेच संतांच्या वाटेला आलेली उपेक्षता, छळ ह्यातही बरेच साम्य दिसून येते. संतांच्या संपूर्ण कार्यावर तसेच साहित्यावर चर्चा करणे ही अशक्यप्राय बाब आहे. एक सत्य असे आहे कि संतांना सारी सृष्टी प्रिय होती तसेच सृष्टीतील सत्यें त्यांनी जाणली होती आणि ही बाब त्यांनी आपणांस सांगितलेल्या जीवनमूल्यांतून समजू शकते. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शुध्द भाव रूजावा ह्यासाठी संतांनी नामस्मरणावर भर दिला. ह्यामागे एक मानसशास्त्रीय सत्य असावे ते असे की, माणूस जन्मतो आणि चालायला, बोलायला लागतो,असे घडत नसते. संतानांही संतपदापर्यत पोहोचताना कुठली तरी शक्ती मग ती गुुरूरूपाने किंवा एखादी घटना वा अनुभूतीच्या रूपाने मदतगार ठरली होती.  कुठलीतरी एक शक्ती ह्या विश्वाचं नियंत्रण करीत असते. त्या शक्तीचं जे रूप आपल्याला भावते त्या शक्तीला शरण जाणे म्हणजेच नामस्मरण होय!  त्यातून आपला अंहकार जो जन्मताच आपल्यात असतो, तो कमी होतो. तसेच जन्मतः भीती असते तीही नष्ट होण्यास मदत होते. म्हणजेच आत्मविश्वास वाढतो. आणखिन सांगायचे म्हणजे, आपल्या शरीरात ऊर्जेचा प्रभाव हृदयाखालोखाल मेंदूत जास्त असतो. नामस्मरणामूळे आपल्या शरीरात विराजमान असलेली सकारात्मक ऊर्जा सशक्त बनते आणि चंचल असलेले मन स्थिर बनते. त्यातून एकाग्रता वाढते. कुठल्याही क्षेत्रातील यशाचा मार्ग आत्मविश्वास आणि एकाग्रतेतूनच दिसतो. हे सत्य तर आपल्याला दैनंदिन जीवनातही अनुभवयास येते. शेवटी यश हेच तर स्वर्गीय आंनदाचं दूसर नाव आणि तेच परमआत्म्याचे सत् चीत् आनंदमय रूप. 

नामस्मरणाबरोबर सुसंगतीचं महत्व, श्रमाचं वा प्रयत्नाचं महत्व, परोपकार आणि परपीडा न देणे ह्यावरही संतानी जास्त भर दिलेला आहे असे मला वाटतं. आपले तुकाराम महाराज म्हणतात "संग सज्जनांचा, उच्चार नामाचा!". मोरोपंतांनी म्हटलं आहे, "सुसंगती सदा घडो!". दूर्जनांची संगत घडली कि, निसर्ग नियमानुसार आपण सराईत गुन्हेगारच होणार. मग कूठल्या क्षेत्रात काम करता हा प्रश्न गौण आहे. प्रत्येक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात फसवाफसवी, बनावटगिरी असतेच. दूर्जन वा दूष्टप्रवृत्तीची लोक मूळात असतातच कां? किंवा सामान्यतः माणूस पूर्णतः शुध्द अंतःकरणाचा का नसतो? हा आपल्याला नेहमी सतावणारा प्रश्न. त्याचही उत्तर सृष्टीचा नियम वा तत्व ह्यातच दडलं आहे. जशी झाडावरून कोकीळेचं मधुर कुजंन ऐकू येते तसाच आपणांस भयभीत करणारा घुबडाचे कर्कश खेसकणेही ऐकू येते. निसर्गात काटेरी झूडपे कशीही आणि कोठेही वाढतात. त्यांना त्यांच्या वाढीसाठी, ना सूर्यप्रकाश लागतो, ना पाणी! ना खतें, ना मशागत! आंबा-फणसांच्या झाडांच्या वाढीसाठी किती अपार कष्ट लागतात, हे आपण पाहतोच आणि म्हणूनच सत्संगला संतांनी मानवी जीवनात अग्रकमाने महत्व दिल्याचे दिसून येते. सत्संग महत्वाचा का? असा प्रश्न नारदमूनींनाही पडला होता. तेव्हा भगवंतांनी त्यांच्या शंकेचं निरसन केले. त्यासंबंधीची एक कथा पूजनीय श्री रामकृष्ण क्षीरसागरमहाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितली आहे. ती थोडक्यात अशी आहे.

देवर्षी नारद, भंगवंताना "सत्संगचे जीवनात महत्व काय?",असा प्रश्न विचारतात. तेव्हा नुकताच जन्मलेल्या एका किड्याला हा प्रश्न विचारून ये. असे भगवंतं सांगतात. नारदमूनी किड्याला तो प्रश्न विचारतात, तात्काळ किडा मरून पडतो. भगवंतं नारदानां नुकताच जन्मलेल्या कूत्र्याकडे पाठवितात. प्रश्न तोच. नारदानी प्रश्न विचारला तेव्हा ते कूत्रं मरण पावते. नंतर गाईच्या वासराबाबतीत असेच घडते. आपल्या प्रश्नामूळे तिघांना मरण आले ही बाब नारदांच्या जिव्हारी लागली. भगवंतांनी त्यांच सांत्वन केलं आणि हाच प्रश्न तेथील राजघराण्यात नुकताच जन्मलेल्या बालकाला जाऊन विचार अशी आज्ञा केली. नारदमूनी अनिच्छेनेच राजमहालात जातात. राजाने यथोचित स्वागत केले. नारदांनी राजाचे पूत्रलाभानिमित्त अभिनंदन केले आणि सांगितले कि मला तुमच्या बाळाला एक प्रश्न विचारायाचा आहे. राजाने आश्चर्याने म्हटले, "देवर्षी, ते नुकतेच जन्मलेले बाळ कसे काय उत्तर देऊ शकेल". नारदांनी म्हटले, "राजन तशी भगवंतांची आज्ञा आहे." राजाने नारदांना बाळापाशी नेले. नारदांनी बाळाला विचारले, "बाळा,संत्संगचे महत्व काय?" आणि काय आश्चर्य! त्या बालकाने उत्तर दिले, "देवर्षी मी किडा असताना तुम्ही हा प्रश्न विचारीत आहात, तेव्हापासून तुमच्या संगतीतून मला उत्तोरत्तर उच्च कूळात जन्म मिळत गेला आणि आता राजकूळात जन्माचं भाग्य लाभलं. नारदांना सत्संगचं महत्व कळले. सुसंगतीतून सत्याचा साक्षात्कार होतो तर कूसंगतीत सत्यानाश होत असतो. संतांनी सुसंगतीसाठी इतका कमालीचा आग्रह का धरला असावा, ह्याच कारण काय असू शकते? इथेही वैश्विक सत्य दडलेलं दिसते. ते सत्य असे कि "Man gets attracted towards bad ideas in faster manner". विकृतीकडे मानवी मन लौकर धावते. त्याच बरोबर विकृतीचं लोण ही लौकर पसरते. हयावरून संतांचा मानसशास्त्र व समूह मानसशास्त्राचाही (Group Psychology) अभ्यास होता, हे स्पष्ट दिसते. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम सत्संग निर्माण केला. त्यातून वारकरी पंथ निर्माण झाला,आणि बहरला. समतेचा झेंडा फडकला. आणि आज पढंरीची वारी जगभरातील अनेक विद्वानांच्या कुतूहलाचा विषय ठरला.

संतांनी सृष्टीतील आणखीन सत्य जे आपणासमोर मांडले आहे, ते हे कि "जी सृजन होते ती सृष्टी". आणि विधात्याने विश्वाची रचना अशी केली आहे, कि इथली सृष्टी सृजन करण्यासाठीचे प्रयत्न वेळोवेळी मानवालाच करावे लागणार आणि तेही आपल्यातील अंगभूत निर्मितीशक्तीतूनच. प्रत्येक व्यक्तीच्या ठायी निसर्गदत्त अशी कुठली तरी कला वा शक्ती असते. "अयोग्यः पुरूषः नास्ती|". समाजातील प्रत्येक व्यक्तीमधील निर्मितीशक्ती, सृजनशीलता शाबूत रहावी, तिच्यात नाविन्यता यावी, तसेच आळसरूपी राक्षसाने ती गिळू नये, त्यासाठी संतानी छोटे-मोठे दृष्टांत सांगून देवाची व्याख्या "यत्न तोची देव" किंवा "प्रयत्नांती परमेश्वर " अशी मांडलेली दिसून येते. क्षेत्र कोठलेही असो, नामस्मरण, सत्संग आणि अथक परिश्रम ह्या मूल्यांचे महत्व अपार आहे. संतंमंडळीनीं नामस्मरणावर भर निश्चित दिला,परंतु सर्वसामान्यांनी आकाशातील देव आपलं भलं करील अशी आशा बाळगून आपल्या ठायी असलेली निर्मितीशक्ती वाया घालवू नये, ह्यासाठी संतंमडंळीनी उपदेश देताना "प्रयत्नांती परमेश्वर " ह्यावर अधिक भर दिलेला दिसतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, " भाग्याचिये भडसे | उद्यमाचेनि मिषे | मग समृद्धीजात आपैसे | घर रिघे |. अग्नी अति सुक्ष्म असला तरी वार्याच्या साह्याने चेतून मोठा होतो त्याचप्रमाणे कर्माच्या साह्याने दैव कितीही दुबळे असले तरी ते चेतले जाऊन मोठं यश मिळून जाते. एडीसन ह्या शास्त्रज्ञाचे म्हणे नऊशे नव्याण्णव प्रयोग असफल झाले आणि नंतर हजाराव्या प्रयोगात त्यांना टेलीफोनचा शोध लावण्यात यश मिळाले. अशा प्रकारे सर्वच क्षेत्रात यश मिळाल्याची उदाहरणे देता येतील. मूळात विद्वत्ता आणि कुवत ह्यांच्यामध्ये एक फरक आहे. An intelligent man not necessarily be an abled man. विद्वान व्यक्ती कर्तबगार असतेच असे काही म्हणता येत नाही. परंतु विद्वत्ता नसतानाही एखादी व्यक्ती कर्तबगार बनू शकते. Ability has to be acquired. कुवत ही कमवावयाची असते. त्यासाठी आलेली संधी गमावयाची नसते. इग्रंजीमध्ये संधीची व्याख्या अशी आहे, Opportunity means a course of action which is immediately possible. काही शास्त्रज्ञ शालेय जीवनात अभ्यासात साधारण श्रेणीचे होते. तसेच काही उद्योगपतीही शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात उच्च श्रेणीचे नव्हते. मूळात जिज्ञासा महत्वाची आणि त्याच्या जोडीला चिकाटी असणे गरजेचे असते. चिकाटी विना जिज्ञासा माणसाला अधिक चंचल बनविण्याचा धोका असतो. एकदा एक अध्यात्मिक गुरू जीवनात चिकाटीचं महत्व आपल्या शिष्याला पटवून देत होते. त्यावेळी एका शिष्याला गुरूला निरूत्तर करण्याची इच्छा झाली. त्या शिष्याने गुरूला विचारले, "गुरूवर्य मी चाळणीत पाणी घालीत आहे,तर चालता चालता मी चिकाटीने कोठवर चालत जावे, जेणेकरून चाळणीत पाणी जमा झालेलं असेल. मला वाटतं ह्या ठिकाणी तुम्ही सांगितलेली चिकाटी उपयोगी पडणार नाही". परंतु गुरू ते गुरूच. गुरूने लागलीच उत्तर दिले, तू चाळणीत पाणी टाकत टाकत उत्तरेकडील शेवटच्या टोकापर्यंत चालत राहा. एक दिवस तु चाळणीत टाकत असलेले पाणी बर्फाच्या रूपात साचलेले आढळेल. संतांनी सांगितलेला यत्न तोची देव, तो अशाच रूपाने दर्शन देतो.

महर्षी व्यासांनी अठरा पुराणातील महत्वाची दोन वचने कोणती ह्यावर उत्तर देताना म्हटले आहे " परोपकाराय पुण्याय,पापाय परपीडनम्|". ह्या सृष्टीचा कारभारच मूळी कर्माच्या सिध्दांतावर आहे. असेच भंगवंतानी गीतेत पदोपदी सांगितले आहे. "पेरीले ते उगवते" "करावे तसे भरावे", संताची ही दोन्ही वचने म्हणजे सृष्टीतील सत्यच होत. पूजनीय स्वामी सुखबोधानंदानी आपल्या "हे मना, रिलॅक्स प्लीज!" ह्या पुस्तकात एक बोधप्रद सत्यकथा सांगितली आहे. ती थोडक्यात अशी आहे - 

फ्लेमींग या स्काॅटीश शेतकर्याने एकदा मदतीकरीता कुणीतरी धावा करीत असल्याचे ऐकले. एक छोटा मुलगा कमरेपर्यंत चिखलात रूतला होता. आणि सुटकेकरीता धडपडत होता. फ्लेमिंगने त्या मुलाचे प्राण वाचविले. दुसर्या दिवशी अत्यंत रूबाबदार पोषाख केलेली एक कुलीन व्यक्ती फ्लेमींगकडे आली आणि म्हणाली," तुम्ही माझ्या मुलाचे प्राण वाचविले. तुमच्या या सद्कार्याकरिता मला तुम्हाला बक्षिस द्यावयाचे आहे". "छे,छे, त्या कामाचे बक्षिस कशाला हो, ते तर माझे कर्तव्यच होते," फ्लेमिंग उत्तरला. तेथेच उभ्या असलेल्या मुलाकडे बोट दाखवित त्या घरंदाज व्यक्तीने विचारले,हा तुमचा सुपुत्र होय?"फ्लेमींगने होकारार्थी मान डोलाविली. सदिच्छेच्या भावनेतून त्या घरंदाज व्यक्तीने फ्लेमिंगच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली. काही वर्षे लोटली. फ्लेमिंगचा सुपुत्र पुढे सर अॅलेक्झांडर फ्लेमिंग झाला,ज्याने पेनिसिलीनचा शोध लावला. तर दुसरीकडे त्या कुलीन व्यक्तीचा पुत्र जिवघेण्या न्युमोनिया ह्या रोगाने आजारी पडला. त्या मुलाचे प्राण कुणी वाचविले? तर ती होती पेनिसिलीनची लस! त्या कुलीन व्यक्तीचे नाव होते लार्ड रॅन्डाॅल्फ चर्चिल आणि जे न्युमोनियातून वाचले ते त्यांचे सुपुत्र, त्यांच नाव सर विन्स्टन चर्चिल! दुसर्या महायुद्धांतील इंग्लंडच्या विजयाचे नायक! शेवटी "जे तुम्ही देता,तेच फिरून तुमच्याकडे परत येते. "परोपकाराय पुण्याय:" हेच सत्य. 


अशीच एक दुसरी कथा--- एका खेड्यातील दुधदुभत्याचा व्यवसाय करणारा एक शेतकरी गावातील बड्या दुकानदाराला रोज एक किलो लोणी विकत असे. एके दिवशी त्या दुकानदाराने त्या शेतकर्याकडून लोणी घ्यावयाचे नाकारले, आणि शेतकर्यावर रागावूनच म्हटले, "तु फसवेगिरी करतोस,तुझे लोणी शंभर ग्रॅम कमी भरते". त्यावर तो गरीब शेतकरी गयावया करीत म्हणाला " शेठजी, असे करू नका,माझ्यावर दया करा. मी खरच लबाडी करीत नाही. माझ्याकडे तराजू आहे पण वजनाचं माप कुठे आहे ?, 'आपणच मला एक किलोची साखर देता तेच माप म्हणून वापरतो". असे म्हणत त्या शेतकर्याने दुकानातील एक किलोच्या साखरेचं पाकीट तराजूत ठेवून दुसर्या बाजूला स्वतः आणलेल्या लोण्याचा गोळा ठेवला. पाहतो तर दुकानदाराचीच लबाडी उघडकीस आली. लोण्याचं वजन आणि साखरेचं वजन समसमान." पापाय परपीडनम्!".' करावे तसे भरावे '! "जे तुम्ही देता,तेच फिरून तुमच्याकडे परत येते". ह्याहून अधिक स्वच्छ सृष्टीचा नियम तरी कुठला?.

साध्या राहणीचे आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याचे महत्व संतानी वेळोवेळी पटवू दिले. उपयोग आणि भोग ह्यावर छोटे छोटे दृष्टांत देऊन भोगवृत्तीवर प्रहार केले. सर्वांच्या गरजा पुर्या करण्याइतकी क्षमता आपल्या धरणीमातेची आहे, परंतु लालसा पुरी करण्यात ती कमी पडणारच आणि म्हणून संतांनी स्वतःच्या गरजा कमीत कमी ठेवून आदर्श निर्माण केला. मग ते आपले तुकोबा महाराज असो वा साॅक्रेटिस असोत,संत हे देवदूतच हो.

सारांश रूपाने म्हणायचे असल्यास एवढंच म्हणू या की, मानवाची कितीही प्रगती झाली असेल आणि होत जाणार असली तरी सृष्टीतील महत्वाचं सत्य हे आहे कि विज्ञानातून येणारी हर एक नवीन सुविधा, एका नवीन असुविधाला जन्म देत असते. आणि त्यातून धोक्याची घंटी ऐकू येत असते. मग ती पर्यावरणासंबधी असो वा वाढते सायबर क्राइमच्या घटना असो. वाढते अत्याचार असो वा बलात्कार की गुंडगिरीच्या घटना असो. संपत्तीविषयक भांडणे वा सीमासंबंधीचे वाद असो. किंवा शस्त्रस्पर्धेतून घोघांवणारं तिसरे महायुद्धासंबंधी असो. पिण्याचे पाणी,ऊर्जा इधंन असे एक ना अनेक बाबींचा तुटवडा पडत जाणार. विचार तर संपूर्ण मानवजातीने करावयास हवा. शास्त्रज्ञांनी जे काही शोध लावले ते मानवाच्या कल्याणासाठी हे निश्चीत. उर्जेची कमतरता भासू नये ह्यासाठी अणूचा शोध लावला. विनाशकारी वा संहाकरक शस्त्रे बनविण्यासाठी नाही. असं म्हटलं जातं कि संपूर्ण सृष्टी ही एका नियमानुसार चालत आहे. तो नियम म्हणजे उत्पती, स्थिती आणि लय म्हणजे विनाश. आणि पुन्हा उत्पत्ती. सृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न म्हणजे यत्किंचित काजव्याने सूर्याचे तेज फिके पाडण्याचा प्रयत्न होय. एक सृष्टी नष्ट झाली तरी त्या विश्वाला काही फरक पडेल असे वाटत नाही. मानव नव्हता त्या कालातही पशू पक्षी इत्यादी प्राणी होतेच. समुद्र होते ,नद्याही वाहात होत्या. सृष्टीला आणि ह्या विश्वाला मानवाची अत्यंत गरज आहे, असे काही अनुभवयास येत नाही. उलट इतर प्राण्यांपेक्षा मानवाला विशेष उपयूक्त अशी ही सृष्टी आहे. सृष्टीत मानवासाठी असलेल्या अनुकुलतेचा फायदा मानवाने करीत रहावे, आपला ऐहिक आणि परलौकीक विकास करीत सहजीवनाचा आनंद घ्यावा. मानवाने स्वतःहून स्वतःच्या विनाशासाठी खड्डा खणू नये. हीच संतांची शिकवण. आणि हेच सृष्टीचे बोल. "नरेची केला नर किती हीन "अशी स्थिती येऊ द्यावयाची की, "नरकी करणी नरका नारायण हो जाय " हे सत्यात आणावयाचे. सृष्टी हसत हसत मानवाला सांगत आहे. Choice is yours. 

जय योगेश्वर !

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...