आपल्या साधू- सतांनी नेहमी चांगले बोलावे, मृदू बोलावे असा उपदेश केलेला आहे. सांजवेळी देवाला दिवा लावतो त्यावेळी आपण प्रार्थना म्हणतो, त्यात संतांनी दिलेला उपदेश आपण जाणीव पुर्वक गात असतो.
"उपासनेला दृढ चालवावें|भूदेव संतांसी सदा नमावे|
सत्कर्मेयोगें वय घालवावे| सर्वां मूखी मंगल बोलवावे|"
समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
"कठीण शब्दें वाईट वाटतें| हे तो प्रत्ययास येतें|
तरी मग वाईट बोलावे तें| काय निमित्य|
आपणांस चिमोटा घेतला| तेणे कासावीस जाला
आपणावरून दुसर्यास| राखीत जावें|
जे दुसर्यास दुःख करी| ते अपवित्र बैखरी|
आपणास घात करी| कोणेयेके प्रसंगी|"
आजच्या काळातील प्रथितयश मॅनेजमेंट गुरूही दासबोधाचा आधार घेतात. अशा रामदास स्वामींचा उपदेश जीवनातील प्रत्येक पायरीवर, प्रत्येक क्षेत्रात, त्रिकाल सत्याइतका उपयोगी पडतो. ह्यात नवल ते काय. आपण एका कथेच्या आधारे रामदास स्वामीच्या "आपणास घात करी!कोणेयेके प्रसंगी"या उपदेशाची प्रचिती कोणासं कशी व का येते?ते पाहू या.
एकदा एका राजाला आपल्या हस्तमूद्रिकावरून भविष्य जाणून घ्यावयाची इच्छा झाली. राजदरबारातल्या ज्योतिषीना बोलाविण्यात आले. ज्योतिषीबूवा आले. राजाच्या बाजूला त्यांच्यासाठी ठेवलेल्या आसनावर बसले. राजाने आपला उजव्या हाताचा तळवा पुढे करीत म्हटले, बूवा सुरवात करा, आपली भविष्यवाणी! ज्योतिषीबूवा राजाचा हात न्याहाळत म्हणाले, "अहाहा! किती सूदंर हात आहे आपला. आपल्या तळव्यावरील पराक्रमाची रेषा इतकी स्पष्ट आणि अखंडीत आहे कि, आपण युध्दात बलाढ्य राजांनांही पराभूत करणार आहात; अनेक राजे युद्ध न करतांच मांडलिकत्व स्विकारतील; खर्या अर्थाने चक्रवर्ती होण्याचा हा योग आहे". राजा म्हणाला, "व्वा छान! पुढे चला". जोतिषीबूवांनी रेषा पाहात म्हटले, "हातावरील ही विद्या रेषा गडद आहे; देश-विदेशातील विद्वान आपल्या आश्रायास येऊन आपल्या राज्यात विद्यालय सूरू करतील". "आणि ही धनरेषा, हीचं वर्णन शब्दांत करता येत नाही; आपल्या राज्याचा खजिना कधीच रिक्त होणार नाही; आपल्या राज्यात सगळी प्रजा सूखाने आणि शांततेने गुजराण करील". " महाराज, ही आयुष्य रेषा पहा, कूठे खंडित आहे, असे दिसत नाही; आपल्याला दिर्घ आयुष्य लाभणार आहे". पण---ज्योतिषीबूवा पुढे काही बोलणार, इतक्यांत महाराजांनी विचारले, "बूवा काही अपघात आणि शारीरिक इजा दर्शवित आहे कां?". ज्योतिषीबूवा म्हणाले, "तसं काही नाही, परंतु आपल्याला पूत्रशोक दिसतोय." महाराज गरजले, "खामोश! प्रधानजी, ह्या जोतिषीबूवांना नजरकैदेत ठेवा आणि जो पर्यंत दूसर्या ज्योतिषीबूवांकडून भविष्य कथन आम्हांस ऐकैवात येत नाही, तोपर्यंत ह्यांची सूटका नाही". सारा दरबार हबकला. आपण युवराजाला गमावणार; ही कल्पनाच अंत्यत क्लेश देऊ लागली. राजदरबारातल्या ज्योतिषबुुुवांच्या ज्ञानासंबंधी कुणालाच शंंका नव्हती त्यामुळे सर्वानांच ज्योतिषीबूवांप्रति दया उत्पन्न झाली. परंतु दूसर्या बाजूला आपण युवराज गमावितो, हे दूःख. करावे तरी काय? महाराजांचं सांत्वनही करता येत नव्हतं; आणि ज्योतिषीबुुुवा प्रती सहानुभूती दाखविता येत नव्हती. त्यामुळे महाराजांचा आदेश मोठ्या दूःखद अंतःकरणाने पाळावा लागला. ही वार्ता राज्यभर वार्यासारखी पसरली. प्रजाजनांना ही धक्का बसला. लोक आपआपसांत चावडीवर चर्चा करीत होते.आपल्या आदर्श आणि न्यायी राजासमोर काय हा दुःखाचा पहाड येऊन ठेपला आहे; अधूनमधून दबक्या आवाजात ज्योतिषी बुवावर अन्याय होतो, अशी कुजबुज ही होऊ लागली. थोड्या दिवसानंतर 'आपल्या राजाला हातावरील रेषावरून भविष्य कथनासाठी राज्यातील ज्योतिषींनी दरबारात यावे आणि जो कोणी अचूक शब्दात अचूक भविष्य वर्तवेल, त्याला मोठ्यात मोठं ईनाम देण्यात येईल'. अशी दवंडी राज्यभर फिरविली गेली. एकदा नव्हे, महिन्याभरात चारवेळा फिरवली. परंतु कोणी ज्योतिषी पुढे येण्यास धजेना.
एके दिवशी राजधानी च्या जवळील गावातील एका ज्योतिषीने हे आव्हान स्विकारण्याचे ठरविले. त्याचे आई-वडील, पत्नी,नातेवाईक, मित्रमंडळी गावकरी सर्वानांच धक्का बसला. सर्वच लोक आपआपल्या परीने या ना त्या प्रकारे त्याची समजूत काढीत होते. कोणी म्हणाले, "अरे राजदरबारातील इतका मोठा विद्वान ज्योतिषीबूवा, त्याला तू काय खोटे ठरविणार?" कोणी वेड्यात काढीत त्याला म्हणत होतं, "अरे, तूझ्या त्या वृद्ध आई- वडीलांकडे बघ, ती तूझी पत्नी, कच्चीबच्ची मूलं सोडून, स्वतःहून मरणाच्या दारात कां जातोस? तूझा काय मोठा ज्योतिषशास्त्रावरील अभ्यास?" बायको तर अक्षरशः पाया पडून रडत होती. रडून रडून तिचे डोळे सूजले. पण तो ऐकायला तयारच नव्हता. आई-वडील व पत्नीने देव पाण्यात ठेवले. त्याने आपले ज्योतिषी पोषाख अंगावर चढवला. कपाळावर चदंनाचा मोठा टिक्का लावला, गळ्यात रूद्राक्ष माळ, काखेवर मोठी झोळी, त्यात पंचाग आणि ज्योतिष शास्त्रवरील एक मोठा ग्रंथ टाकून स्वारी राजमहालाकडे निघाली. राजमहालाच्या द्वारापाशी येतांच रखवालदाराने त्याचा तो पेहराव पाहून त्याला ओळखले आणि प्रधानांकडे ज्योतिषिबूवा आल्याची वर्दी दिली. प्रधानाने राजाच्या आज्ञेप्रमाणे दरबार भरविला आणि त्या ज्योतिषिबूवांना दरबारात आणले. राजाच्या शेजारीच त्यांची आसन व्यवस्था केली. राजाने आपला हात पुढे केला आणि ज्योतिष कथनास सुरूवात झाली. "अहाहा! महाराज, किती सुंदर आहे, आपला हात!" एका मागोमाग एक रेषेवरील दिसत असलेले भविष्यकथन पुढे सरकत होते. आतापर्यत ज्या ज्या रेषांसंबंधीचं भविष्य वर्तवले गेले, त्यातील बरेच राजदरबारांतील ज्योतिषीने वर्णिले होते, त्याच्याशी तंतोतंत जूळत होतं. शेवटी त्या बूवांचे भविष्यकथन आयुष्य रेषेवर येऊन ठेपले. दरबारातील सारेजण तसेच दरबाराच्या वरील दालनात बसलेल्या राजमाता आणि राणीमहाराज ह्यांच्या छातीतील धडधड वाढू लागली. ज्योतिषी बूवा म्हणाले, "राजन, आपल्याला दिर्घ आयुष्य लाभलेले आहे आणि ते ही पूर्णतया निरोगी. ही रेषा आणखिन एक मोठं भाग्य दर्शवित आहे". सर्वांनी कान टवकारले. ज्योतिषी म्हणाले, "महाराज, जे भाग्य, अजूनही कोणत्याही राजाच्या वाटेला आले नाही, ते तुम्हाला लाभलयं. ते म्हणजे तूम्ही आपल्या नातवाला स्वतःच्या हाताने राज्याभिषेक करणार आहात". महाराज पाच मिनिटे स्थब्ध झाले. दरबारात शांतता पसरली. नंतर राजानी म्हटलं," शाब्बास! ज्योतिषीबूवा! हेच ते, अचूक ज्योतिष,अचूक शब्दांत!" असे म्हणत राजाने ज्योतिषिबूवांना चक्क आपल्या मिठीत घेतले.(वाचकांच्या लक्षात आले असावे,कि ह्या ज्योतिषीबूवांनी अत्यंत खूबीने यूवराजाचा अपमृत्यूच्या भाकिताला बगल दिली). टाळ्यांच्या कडकडाट दरबारात घूमला. नंतर राजाने ज्योतिष बूवांना प्रश्न केला, बूवा तूमचा गूरू कोण? ज्योतिषी म्हणाले, "महाराज, क्षमा असावी, मला या क्षेत्रात कोणी गूरू नाही. ज्योतिषशास्त्र मी थोडेफार जाणतो आणि ते ही पूस्तक वाचूनच शिकलो आहे. मला माफ करा. ज्योतिष कथन हा माझा व्यवसाय नव्हे". राजाने चकित होऊन प्रतिप्रश्न केला, "मग तूमचा व्यवसाय कूठला?" बूवांनी ऊत्तर दिले, "महाराज, मी, एक सामान्य वाणी आहे". नंतर राजाने घोषित केलेल्याहून अधिक मोठ बक्षीस देऊन त्या ज्योतिषींचा सत्कार केला. राजाश्रय प्राप्त असलेले ज्योतिषी निर्विवादपणे ज्योतिष विषयात ज्ञानाने आणि अभ्यासाने सर्वश्रेष्ठ होते. या उलट साधारण प्रतीचं ज्ञान असूनही नंतर आलेल्या ज्योतिषीचा राजाकडून गौरव झाला. राजाने दरबारातील ज्योतिषिमहाराजाची सूटका केली आणि नंतर राजेमहाराज आपल्या विद्वान ज्योतिषीला म्हणाले, "सत्यम् बृयात्, प्रियम् बृयात् | न बृयात् सत्यम् अप्रियम्|" नेहमी सत्य बोलावे आणि जे प्रिय आहे तेच सांगावे. सत्य कडू असले, तर ते सांगू नये आणि तसे बोलणे भाग असले तर ते अशारितीने मांडावे कि ते ऐकणार्याला कडवट वाटू नये. त्या वाण्याचे स्वतःच्या वाणीवर पूर्ण नियंत्रण होते. नेहमी मृदू बोलण्याचा जाणिवपूर्वक सराव केला कि, आपोआप आपला स्वभाव मृदू बनतो. ही संतांची शिकवण त्याच्या वाचनात आली होती, ती त्याने आत्मसात केली. त्यामूळे राजाश्रय लाभलेल्या ज्योतिषबुवांची कूठे चूक झाली होती ही बाब त्याला उमगली होती. म्हणूनच त्याने आत्मविश्वासाने राजाचं भविष्य सांगण्याचं आव्हान स्विकारले होते आणि शेवटी तो यशस्वी झाला.
कठोर वागणे किंवा कठोर बोलणे अधिक परिणामकारक ठरते व तसे केल्याने आपल्या मोठेपणाची छाप पडते अशी आपली समजूत असते. तीच मूळी चुकीची असते. अगदी थोडासा विचार आणि प्रयोग केला तर आपल्या ध्यानात येते कि, सतत कठोर बोलण्यापेक्षा मृदु बोलणे अधिक प्रभावकारी ठरते. हे वरील उदाहरण वरुन आपल्या प्रत्ययास आले. म्हणून समर्थ रामदास स्वामी पुढे म्हणतात
"दुसर्याच्यां दुःखे दुखवावे| परसंतोषे सुखी व्हावे|
प्राणीमात्रांस मिळवूनी घ्यावे| बर्या शब्दें|"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा