बुधवार, ५ जून, २०२४

निसर्ग आणि मानव मधील ऋणानुबंध भाग - २

मनुष्याला सुख देण्यासाठीच कोण्या दयाळू देवाने ही सृष्टी निर्माण केली अशी प्रबळ निष्ठा मानवाच्या मनात उभी राहिली आणि ति ही निसर्गाच्या पाठिंब्यानेच.मानव आणि पशू मध्ये सर्वात महत्वाचा फरक म्हणजे माणसाला बुद्धीचे वरदान लाभले आहे. पशुपक्ष्यानांही मेंदू असतो. आपल्याला काय हवे आहे याची जाणीव पशूपक्ष्यांना असतेच पण ते मिळविण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करणे हे फक्त माणसाचे वैशिष्ट्य आहे. सिंह वाघ इत्यादी पशू बलवान खरेच ! परंतू उद्या लागणारे अन्न ठेवण्यासाठी फ्रिजचा शोध लावला नाही. सृष्टीच्या निर्मितीपासून पशूपक्ष्यांची स्थिती जशी आहे तशीच आहे. वाघ व सिंह सारख्या पशूनीं आपल्या डावपेचात सुधारणा केलेली नाही. 

अनेक पशूपक्षी अतिशय सुंदर दिसतात. त्या सौदंर्यासाठी ते स्वतः कोणताही जाणीवपूर्वक प्रयत्न करीत नाहीत. चपळ खारीचे धावणे, थबकणे, वळून पाहणे, गोंडेदार शेपूट उभारणे इत्यादी सारं मोहक असते. हरिणाचे डोळे, सशाचे पांढरे शुभ्र, मऊ मखमली अंग, मोराचा विविध गडद रंगानी नटलेला पिसारा, वाघाचे पट्टेदार धिप्पाड शरीर, हत्तीचे पांढरे शुभ्र दात, लांब सोंड आणि डौलदार चाल या सर्व गोष्टी सुंदर असतात. पण कोणाला ? मनुष्याला. पशुपक्ष्यांच्या दृष्टीने त्यांचे ते फक्त अवयव आहेत. पशूपक्ष्यांना परमेश्वरांने ना दिली विकासाची दृष्टी, ना सौंदर्याची अभिरूची ! परंतु त्यांना तसेच ठेवण्यामागे विधात्याच्या योजना मधील प्रयोजन काय असावे ? याचा मानवाने अभ्यास करून आपली उन्नती निसर्गातील समतोल राखून सृष्टीला अधिक सुंदर बनविणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. ते पार पाडणे यालाच पर्यावरणाचा समतोल असे म्हणतात. पर्यावरण म्हणजे जमीन, पाणी, हवा, तसेच सर्व प्राणीमात्रांचा-सजीवांचा एकमेकांशी असलेला नैसर्गिक संबंध जपणे होय. 

मनुष्याच्या सुखसोयी साठी त्या दयाळू देवाने या सृष्टीची रचना किती ममताळूपणे केली आहे पाहा ! हा सूर्य, हा समुद्र, किती प्रचंड महाभूतें ! पण मनुष्याच्या सेवेस त्यांना देखील देवाने सज्ज ठेवले आहे. दुपारी तहान तहान करीत खेळून दमून मूले येतात आणि आई सकाळीच माठात ठेवलेले गार पाणी आपल्या बाळांना देते. तितक्याच मायेने हा सूर्य उन्हाळ्यात नद्या सुकून जाण्याआधिच समुद्रात असताना तोंडी धरवेना असे खारट पाणी आकाशाच्या विस्तीर्ण सरोवरात गोड आणि गार करून वर्षा ऋतूत आपणांस पोहचवितो. बरं समुद्राचे पाणी गोड करण्याच्या धाधंलीत सारा समूद्र गोड होऊन मनुष्यास मीठ मिळणे बंद करीत नाही. नाहीतर सारा संसार अळणी व्हावयाचा ! ज्याच्या तेजाने सारी जीवसृष्टी अस्तीत्वात आली, तो सूर्य किती नम्र आहे ! सकाळी तुम्ही उठा अगर उठू नका  तुमच्या आमच्या दाराशी, खिडक्यापाशी नम्र पणे उभा असतो. बरं तो ही वेळवर ! किती वक्तशीरपणा ! तुम्ही त्याला नमस्कार करो वा ना करो ! सर्वांना सारखाच प्रकाश देणार, सर्वांना सारख्याच वाटा दाखविणार ! अशा चैतन्यमय सूर्याला उगवतेवेळी आपण नमस्कार करणार नसू, तर चक्रीवादळात पावसाने थैमान घातलेल्या वेळी ईश्वराची याचना करण्याचा आपणांस काय तो अधिकार ! 

हा पाहा समूद्र ! आहे अथांग ! परंतू आपल्या मर्यादा ओलांडीत नाही. मर्यादा पाळणे हा गूण सागरकडून शिकावा ! व्यापकतेचा गर्व जसा त्याला नाही, तसाच आकाशाला ही नाही. आपण ज्या काही बर्या-वाईट कृती करतो त्या सगळ्या ते आपल्या उदरात सामावून घेते. आपले आजच्या नित्याचे मित्र रेडीओ, टिव्ही, संगणक, इन्टरनेट मोबाईल यांचा जन्मदाताच मूळी ते आकाश आहे. आकाशाची विशालता मोहक की चंद्राचे चांदणे मोहक, की लुकलुकणार्या तारकांचे सौंदर्य 
मोहक ? ते आकाश क्षणभर आपल्या  मनाची चलबिचल करते पण नंतर मान वर करून त्या आकाशाकडे पाहिले की क्षणभरात आपले मन असे काही स्थिर करते की त्यातून आपली बुद्धी आणि दृष्टी व्यापक होत जातात. मग आपोआप मन शांत होते. 

तो चंद्र पाहा ! श्रीमंताच्या महालावर प्रकाश देतो तसेच गरीबांच्या चंद्रमोळी झोपड्यांनाही चंदेरी मुलामा ठेवतो. गरीब श्रीमंत असा भेदभाव आहे का त्याच्याकडे ? चंद्राच्या उमळत्या कला पाहा, की प्रचंड ग्रहगोलांची परिभ्रमणे पाहा ; साधा रिमझीम पडणारा पाऊस असो;  की उकळता धातूरस फेकणारा ज्लालामुखीचा स्पोट असो; गवतावर फूल उगवणे असो की समुद्राची भरती ओहटी असो ही सर्वत्र प्रंचड कल्पनाशक्ती असलेल्या ईश्वराने तयार केलेली सुव्यवस्था आहे. सारे ग्रह एकाच आकाराचे नाहीत पण आपआपल्या कक्षातच नियम पाळून भ्रमण करत असतात. अनियमीत जीवन म्हणजे स्वतंत्रता नव्हे. स्वतःच्या मनाला अशी बंधने स्वतःच निर्माण करावीत व ती कसोशीने पाळायची हाच शाश्वत निसर्ग नियम आहे. त्यातच पर्यावरणातील समतोल राखण्याची शक्ती असते. 
                                       क्रमशः--

1 टिप्पणी:

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...