गीत रामायण हे आधुनिक साहित्य सृष्टीतील नक्षत्राचे लेणे आहे. गीत रामायणाची ख्याती अशी आहे की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर प्रांतात ही आपआपल्या भाषात अनुवादाच्या रूपाने गावोगावी प्रयोग होत असतात.निवडक ' गीत रामायणाचे ' नोटेशन च्या पुस्तकाचे लेखक अशोक सहस्त्रबुद्धे म्हणतात, " नोटेशन्स बनविणे हे सर्वसाधारणतः कठीण -किचकट व कंटाळवणे आहे. आणि त्यात गीतरामायणाचे नोटेशन्स बनविणे म्हणजे साक्षात शिवधनुष्य उचलण्यासारखे ! पण सदाबहार गीतरामायणाची जादूच न्यारी ! २० ऑक्टोबरला काम सुरू केले आणि व न कंटाळता केवळ २ महिन्यात २० डिसेंबरला हस्तलिखीत संपविले. या दोन महिन्यात मी राममय झालो, अनेक दिव्य अनुभव आले. यावरून गदिमा व बाबुजींना ५० वर्षापुर्वी किती दैवी-दिव्य अनुभव आले असतील याची कल्पना यावी." अशोकजी सहस्त्रबुद्धे यांनी ग दि मा व बाबूजींच्या कलेची केलेली प्रशंसा समोर ठेवली, याचे कारण माझ्या हातून ' लहान तोंडी मोठा घास ' घेण्याचा प्रमाद होऊ नये. हे आपणास उमगले असावे.
शब्दसम्राट कै ग दि मा आणि स्वरसम्राट बाबूजी म्हणजे कै सुधीर फडके या दोन मराठीचीये नगरीतील आधुनिक ऋषींनी आपल्या प्रखर तपश्चर्येने गीतरामायण रूपी मंगलमय गंगा मराठी भाषेतून प्रवाहीत केली. गीत रामायणाचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा प्रत्यक्ष ज्यांनी पाहीले आहेत अशी बुजूर्ग मंडळी शरीराने आज थकली आहे, तरीही आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात अधून मधून यु ट्युब वरून गीत रामायणाचे लाईव्ह कार्यक्रम पाहात असतात. मराठी युवक-युवतींना सुद्धा गीत रामायणाने भारावून टाकले आहे. प्रत्येक पिढीला गीत रामायणाने आपल्या कवेत घेतले आहे. ग दि मा च्या भाषेत सांगावयांचे तर --
" छंद जाणतेपणीचा तिर्थे काव्याची धुंडिली | कोण्या एका भाग्य वेळी पुजा रामाची मांडिली || देव वाणीतले ओज शितळले माझ्या ओळी | वाल्मिकींच्या भास्कराचे चांदणे झाली मराठी || "
श्रीरामजन्मभूमीच्या मालकी संबंधित न्यायालयीन खटल्याची सुनावणी होऊन अयोध्येत श्रीरामाचे मंदिरच होते असा देशातील सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर रितसर रामज्नमभूमी न्यासाची स्थापना झाली. श्रीरामजन्मभूमी मंदिराचे बांधकाम सुरू झाले आणि ते बहुतांशी पुर्णात्वात जात आहे.
रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापनाची तारीख जाहीर झाल्यानंतर देशातल्या कानाकोपर्यातील चावडी, चौक चहाच्या टपरी, ग्रामदेवतेच्या मंदिर, शहारातील वाचनालय, मंदिरे अशा सार्वजनिक ठीकाणी लोक रामजन्मभूमी मुक्ती साठी झालेल्या लढाया, त्यातून देशबांधवाचे झालेले बलिदान, न्यायालयीन लढाई इत्यादी विषयावर होत असलेल्या चर्चा पाहिल्या. रामजन्मभूमी मुक्तीचा संपुर्ण इतिहास मिडीयातून पाहीला. फक्त ' रामजन्मभूमीचाच आग्रह का या संबंधीत जनसामान्यांच्या मनात उद्भवलेल्या शंका-कुशंका, प्रिन्ट इलेक्ट्राॅनिक्स व सोशल मिडीयातून धर्मशास्त्र व अध्यात्म, इतिहास व पुरातत्व, न्यायव्यवस्था, राजव्यवस्था आणि संशोधकीय व्यवस्था इत्यादी क्षेत्रातील अभ्यासकांच्या चर्चेतून बहुतांशी दूर झाल्या आहेत.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाचा मुहूर्त जसा जवळ येत गेला तसा संपूर्ण देश राममय होत गेला. देशभरातील सार्वजनिक ठिकाणी भजने, किर्तने, शोभा यात्रा, गीत रामायण, रामचरीत मानस, हनुमान चालिसा असे सांस्कृतिक कार्यक्रम होत गेले. शाळा-काॅलेजात राम सप्ताह साजरे होत गेले. कथाकथन, निबंध स्पर्धा, चित्रकला, वकृत्व, रांगोळ्या इत्यादी स्पर्धा कार्यक्रम झाले. देशभरातील रस्ते, घरें, दूकानें, इमारती, सायकली, रिक्षा, स्कूटर, मोटार- सायकली, टांगे, मोटारी, टेम्पों, इत्यादी वाहनांवर श्रीरामाच्या प्रतिमा असलेल्या भगव्या रंगाच्या भव्य कटऑट्स, श्रीरामाच्या प्रतिमा असलेले भगव्या रंगाचे ध्वज फडकत असलेले आपण पाहिले. गावें, तालुका व जिल्हे, नगर- उपनगरें मोठी शहरें सर्वत्र रामजन्मभूमी अक्षत निमंत्रणे व श्रीरामजन्मभूमी मंदिराचे प्रतिमाचे वितरण होताना दिसले. संपुर्ण देश राममय झाल्यामुळे एक सामान्य भाविक म्हणून मी अशा कार्यक्रमात सामील झालो. निर्मळ तीर्थक्षेत्री झालेला गीतरामायण कार्यक्रम हा त्यापैकीच एक आहे.
रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ ला संध्याकाळी ७ वाजता आमच्या गावीं नालासोपारा (प) येथील श्रीक्षेत्र निर्मळ येथील शंकराचार्य समाधी मंदिराचे पटांगण गीत रामायणाच्या कार्यक्रमला आलेल्या रसिक श्रोत्यांनी तुडूंब भरले होते. सामवेद म्हणजे साम गायन. ऋग्वेदातल्या ज्या ऋचा गावयाच्या आहेत त्याचा संग्रह म्हणजे सामवेद ! ऋग्वेदात तीन स्वरांनी उगम झालेल्या संगीताचा प्रवास सामवेदात सप्त स्वराकडे पोहचतो असे मानले जाते.
मी गीतरामायणाचा आनंद प्रथमच घेत होतो असे नाही. पण या खेपेस माझे मन अधिक राममय झालेलं मला जाणवले. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा समारोहाची घोषणा झाल्यानंतरच्या वातावरणाचा हा परिणाम असावा. बरोबर संध्याकाळचे ७ वाजले. स्वर सामवेद संस्थेतर्फे संगीत प्रेमी भाविकांचे स्वागत झाले. माईक निवेदकाकडे आला. जमलेल्या श्रोत्यांची आतुरता शिगेला पोहचली. पटांगणात आल्यापासून भाविकांची आपसात होणारी थोडीशी कुजबूज संपली. पटांगणात पीनड्राॅप शांतता पसरली. लागलीच --
' श्रीऽऽऽ राऽऽऽम, श्रीऽऽऽ राऽऽऽम ,
श्री ऽऽऽ राऽऽऽम, स्वयें श्री राम प्रभू ऐकती ' कानीं ऐकू आले. गीत रामायण सुरू झाले. विणा व मृदंग अशा साहित्यांनी त्या सुंदर मुलांनी आपल्या कोमल व मधुर कंठानी ते काव्य गाण्यास आरंभ केला, तेव्हा प्रभू रामचंद्रांची व यज्ञमंडपातील सर्व सभाजनांची चित्तवृत्ती तल्लीन होऊन ती सभा चित्रासारखी चित्त झाली होती.
तशीच निर्मळ या तिर्थक्षेत्रीच्या पटागंणात जमलेल्या भाविकांची सभा चित्रासारखी चित्त झाली. ती दोन छोटी बालके प्रत्यक्ष श्रीरामचंद्राची कुश, लव ही दोन मुलें. त्या कोवळ्या बालकांना ठाऊक नाही, की ते आपल्या पिताश्री समोरच त्यांचे चरीत्र गीत गात आहोत. प्रत्यक्ष देव-देवतांना डोईजड झालेल्या महान पराक्रमी राक्षस रावणाचा पराभव करून त्रैलोक्याचे अधिपती झालेल्या राजाधिराज प्रभू रामचंद्राना गीत गाणारी मूले आपली आहेत हे ठाऊक नाही. ही एखाद्या चित्रपटातील केवळ कल्पना नाही. त्रेता युगात भारतवर्षात प्रत्यक्षात घडलेली ही घटना आहे.
माझे मन मलाच विचारू लागले, 'आपल्या बाळांच्या वाटेला जन्मतः राजमहाल ऐवजी आश्रम आला हे प्रभू रामचंद्राना नंतर कळले असेल का? त्यावेळी त्यांना काय वाटले असेल? स्वतःहाचे बालपण राजमहालात गेले याचे त्यांना त्यावेळी स्मरण झाले असावे का, आणि स्मरण झाले असेल तर एक पिता म्हणून प्रभू रामचंद्राची त्याक्षणीं मनःस्थिती कशी झाली असेल, इत्यादी प्रश्न माझ्या मनात उद्भभवले.
अवतारी पुरूषांच्या चरित्राचा ज्यांनी सखोल अभ्यास केला आहे अशा महनीय व्यक्तींच्या प्रवचनातून, लेखांतून आणि पुस्तकातून माझ्या मनात उद्भलेल्या वरील प्रश्नांचे उत्तर मला गवसले ते असे आहे, 'अवतारी पुरूष स्थितप्रज्ञ असतात.' ते खरे ही आहे. स्थितप्रज्ञ या शब्दाची खरी ओळख ही झाली नाही असा मी एक सामान्यजनांपैकी एक, मग अनूभुती कोठून येणार? पण ----
अशा विभुतींनां ही नियतीशी पदोपदी टक्कर द्यावी लागली आहे, हे आपण सारे जाणतो. तरीही आपल्याला त्यांची चरित्रगाथा पुन्हा पुन्हा वाचावी, ऐकावी असे वाटते. या संबंधीतले कार्यक्रम मग ते चित्रपट असो वा नाटक, सिरीयल्स असो वा लोककला असो, किर्तन असो की प्रवचन असो, भजन असो वा संगीतमय निरूपण इत्यादींनी आपले मन, आपले कान तृप्त होतात. त्याच क्षणीं साहित्यकार, संगीतकार - गायक, कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, किर्तनकार, प्रवचनकार, इतिहास तज्ञ, आणि आयोजक इत्यादींची सुद्धा स्तुती आपल्या मुखातून आपोआप येत असते. त्यापैकी अग्रणी स्थानावर असलेली निर्मिती गीतरामायण होय.
क्रमशः-
जय श्रीराम !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा