महाभारतावर 'भारतीय युद्ध' आणि रामायणावर 'रामचरित्र' अशा दोन पुस्तकांचे लेखक कै चिंतामण वैद्य आपल्या श्रीरामचरित्र पुस्तकाच्या उपोद्धात म्हणतात, 'आर्यांच्या बुद्धिमत्तेच्या खाणीतून निघालेले रामायण हे एक अमूल्य रत्न आहे.' या पुस्तकात त्यांनी पदोपदी आर्य, आर्यवर्त असे शब्द वापरले आहेत. यातून चिंतामणजी आर्यन इन्व्हर्जन सिद्धान्त बिलकूल मानत नाहीत हे स्पष्ट दिसते. ते पुढे म्हणतात की 'काव्याची अंगे दोन, एक कवी व दुसरे काव्यात वर्णिलेला नायक. या दोन्ही अंगानी रामायणाची बरोबरी करणारा जगात दुसरा ग्रंथच नाही. रामचंद्र सारखा अलौकिक सामर्थ्याचा व उदात्त नीतिमत्तेचा पुरूष जगाच्या इतिहासात झाला नाही व वाल्मिकी सारखा प्रतिभा संपन्न व उच्च कल्पनाचा कवी आजपर्यंत जगात झाला नाही."
श्रीरामाचे उदात्त व मनोहर चरीत्र म्हणजे संसारात मनुष्याने नीतीने कसे वागावे हे दाखविणारा एक निष्कलंक आरसा आहे. श्रीरामाचे नाव घेतल्यावर आपल्यासमोर सद्गुणांची मूर्ती उभी राहते. वाल्मीकी ऋषींनी एकदा नारद मुनींना विचारले "सर्वात उत्तम राजा साप्रंत कोण आहे?", तेव्हा नारदाने श्रीरामचंद्राचे नाव सांगितले. त्यावेळी नारदाने रामचंद्राचे जे वर्णन केले आहे ते असे आहे --
" इश्वाकु कुलातील रामचंद्राने आपणा स्वतःहास जिंकले असून आपल्या पराक्रमाने शुत्रूसही जिंकले आहे. तो नीतिमान, बुद्धिमान, धर्मज्ञ, व सत्यप्रिय आहे; त्याचे मन फार मोठे आहे. तो सज्जनांना उदार हस्ते आश्रय देणारा असून सर्वांवर त्याची समदृष्टी आहे. तो समुद्रासारखा गंभीर आहे; हिमालयासारखा धैर्याने निष्कंप आहे; अग्नी सारखा क्रोधाने तीव्र आहे; पृथ्वीसारखा क्षमाशील आहे; कुबेरासारखा उदार आहे व धर्मासारखा सत्यवादी आहे. "
यावत् स्थास्यन्ती गिरयः सरितश्च माहितले | तावद्रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यते ||
( अर्थ-- या भूतलावर पर्वत नद्या यांचे अस्तित्व आहे तो पर्यंत ही
श्री रामायण कथा जनमानसात प्रचलीत राहील.) साक्षात ब्रह्मदेवाने आद्यकवी महर्षी वाल्मिकींना दिलेला हा अभिप्राय आहे. इतकेच नव्हे तर ब्रह्मदेवाने एक दिव्य वरदान दिले होते की, ' महान तपस्वी वाल्मिकीने रचलेल्या या महाकाव्यातील एक ही गोष्ट खोटी ठरणार नाही.'
वरील विवेचन हे संक्षिप्त आहे. तरीही त्यातून भारताचा इतिहास किती प्राचीन आहे हे आपल्या लक्षात येते. तसेच जगातील सर्वात आदर्श राजव्यवस्था म्हणजे रामराज्य आहे हे सिद्ध झाले आहे. विशेष हे की हे सत्य तत्कालीन आणि सांप्रत काळात राजकीय आणि इतिहासाच्या अभ्यासांनी स्विकारले आहे. या वरून आर्य दक्षिण रशियातून भारतात आले होते आणि भारत हा कधी देश नव्हताच असा इतिहास जो जर्मन विचारवंत मॅक्सम्युलर आणि ब्रिटीश राजवटीतील लार्ड मेकाॅले या जोडीने लिहीलेला आहे तो खोटा हे ही सिद्ध होते. आपण स्वातंत्र्या नंतर मॅक्सम्युलर व मेकाॅले यांनी लिहीलेला इतिहास शिकत गेलो. दुर्दैवाने आपण आज ही तोच प्रमाणभूत मानत आहोत. हे ही एक कारण होते, ज्यामूळे श्रीरामजन्मभूमी संबंधीत खटल्याच्या निकाल प्रदिर्घ काळ लोबंकळत राहिला.
मेकाॅले आणि मॅक्सम्युलर या जोडीचा खोटारडेपणा श्री अभिजित जोग यांनी आपल्या 'अ सत्यमेव जयते ...? ' (भारताच्या इतिहासातील दिशाभूल) या पुस्तकात सविस्तर पणे उघडा केला आहे. या पुस्तकात त्यांनी मोहोंजोदारो व हरप्पा येथे इ स १९२५ ला करण्यात आलेल्या उत्खनातून प्राचीन सिंधु संस्कृती, ऋग्वेदातील आर्य शब्दाची व्याख्या व व्याप्ती ची उघड झालेली सत्यता मांडली आहे. या शिवाय उत्खनातून आर्यांच्या आक्रमणाच्या खूणा आढळल्या नसल्याकारणाने 'आर्य पश्चीमेकडून भारतात आले ' हा सिद्धांत धातांत खोटा आहे यावर परदेशातील विद्वानांनी शिक्कामोर्तब केले आहे. असे असूनही मॅक्सम्युलर आणि मेकाॅले यांनी आपला सिद्धांत खोटा नाही अशीच भूमिका घेतली होती. या भूमिकेला चिकटून राहण्या साठी त्यांना किती कोलांटी माराव्या लागल्या याचे सविस्तर पण सत्याला धरून वर्णन अभिजीत जोग यांनी केले आहे. अभिजित जोगांच्या या पुस्तकावर डाॅ विनय सहस्त्रबुद्धे, स्वामी गोविन्ददेव गिरी, डाॅ वसंत शिंदे इत्यादी मान्यवरांनी आपल्या अभिप्रायात हे पुस्तक नसून एक ग्रंथ आहे, एक ऐताहासिक दस्तऐवज आहे असेच म्हटले आहे. शाळा- काॅलेज मधील इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची फेररचना करतेवेळी या ग्रंथाचा फार उपयोग होईल असे मला वाटते.
हे सारं येथे नमूद करण्याची गरज वाटली. याचे कारण या भारतभूमीत जन्मलेल्या काही बांधवांनी श्रीराम जन्मलेच नाहीत असा पावित्रा घेतला होता. त्यामुळे श्रीरामजन्मभूमी अयोध्या मुक्तीसाठी देश पारतंत्र्यात असताना आणि स्वातंत्र्या नंतर ही अनेकांना बलिदान द्यावे लागले व कारावास भोगावा लागला. शेवटी न्यायालयात दावा टाकावा लागला हे शल्य करोडो रामभक्तांना सोसावे लागले. म्हणुनच विविध चॅनेल्सच्या सर्वेमधून देशात रामलाट तयार झाली आहे असे मांडत आहेत. त्यावर मला काही प्रतिक्रीया द्यावयाची नाही. अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर मंदिर उभे राहिले आहे ही आपली इच्छा पूर्ण झाली आहे. ती प्रभुरामचंद्राची कृपा आहे असे मानू या. तमाम भारतीयांनी ' अयोध्या नगरी ही जगाच्या पाठीवरील सुसंकृत मानवी जीवनाची सर्वात पहिली पुरी आहे, हे ध्यानात ठेवून आपले आचरण ठेवावे. हाच न्यायदेवतेचा आपणां सर्वासाठी संदेश आहे असे मला वाटते.
क्रमशः
जय श्रीराम !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा