सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

गीतरामायण ऐकताना - भाग ४


' शरयू तीरावरी अयोध्या ' हे पद सुरू झाले. मनुनिर्मित अयोध्या नगरीचे  वर्णन ऐकताना डोळ्याचे पारणे फिटले. माझे मन इक्ष्वाकु कुलाचा धर्मपरायण राजा दशराथाच्या काळात गेले. मराठीतील रामायणावरील जी काही पुस्तके वाचली आहेत आणि गीतरामायणाचे जे काही कार्यक्रम पाहिले, ऐकले आहेत त्यातून जे काही मला उमजले आहे ते आपल्या समोर मांडतो आहे. 

सामान्यतः वाचण्यापेक्षा प्रवचन, किर्तन व गायन ऐकण्यात आपला कल अधिक असतो. त्यात ही गीतरामायणाची चव इतकी न्यारी आहे की तिचा आस्वाद घेण्यास आपण सारेजण सदैव तयार असतो. 

श्रीरामांच्या यज्ञमंडपात कुश आणि लव अयोध्या नगरीचे जे वर्णन सांगत आहेत, ते ऐकूनच त्रेतायुगातील आर्यावर्तात कोसल नावाच्या विस्तीर्ण आणि सुपीक प्रदेश, तेथील साम्राज्य याची ओळख होते. शरयू नदीच्या काठी वसलेल्या राजधानी अयोध्या नगरीचे मुर्तीमंत दर्शन घडते. या शहरामधून मोठमोठाले रूंद राजरास्ते व काही ठिकाणी जाणेयेण्याकरिता काढता-घालता येणारे चमकादर पूल,  रस्त्यावर दुतर्फी फळ-फुलांनी बहरलेल्या वृक्ष-वेली पाहता प्रजेला  पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश आपोआप मिळत होता.  

तेथील रस्त्यावर रोज सुवासिक पाणी टाकले जाऊन ठिकठिकाणी फुलांचे मांडलेले उपहार आणि  सुशोभीत सात मजली वाडे इत्यादी ने अयोध्येची शोभा वाढलेली दिसे. नगराबाहेर विस्तीर्ण व रमणीय अशा बाग होत्या. तिथे नगरवासी फिरायला येत असत. काही उपवनात नृत्य, गायनासारखे कार्यक्रम घेता येतील असे मंच ही होते. अयोध्येत ठिकठीकाणी दुध-दुभते, फळे व भाजीपाला आणि किराणा मालांनी भरलेले बाजार होते. एकंदरीत प्रजा सुखी होती. त्यामूळे स्त्री- पुरूष स्वभावाने धार्मिक, सदाचारी व कुटुंब वत्सल होते. प्रजेच्या व राज्याच्या सुरक्षेसाठी सर्वत्र पराक्रमी, मजबूत बांध्याचे असे शस्त्रसज्य सैनिक तैनात असत. तसेच हिमालय विंध्यादी पर्वती भागातून आणलेले शेकडो उंच व शृंगारलेले हत्ती, तसेच सिंध, कांबोज, बल्क इत्यादी देशातून आणलेले हजारो सुंदर व दमदार घोडेही बाग- बगीचा मधून फिरत असताना दिसत असत. हत्ती-घोडे यांचे पालन-पोषण व शिक्षण अशा रितीने केले जात असे की त्यांना आसपास फिरणार्या लोकांपैकी स्वजन कोण आणि शत्रूचे हेर हे ओळखता येत असे. 

सतत सज्ज असलेले सैनिक बेसावध असणार्या शत्रुवर बाण व इतर शस्त्राचा वापर करीत नसत. पण दगा  देणारे शत्रू दिसले तर लागलीच त्यांना यमसदनास पाठवत असत. त्यामुळे तिथे कधी ना दंगा झाला, ना दगा झाला. थोडक्यात यथा राजा तथा प्रजा या सिध्दांतावर आधारलेली ईश्वकू कुळाची सक्षम व लोकाभिमूख राज्यव्यवस्था होती. तत्कालीन सर्वात सुंदर, आदर्श अशी राजधानी अयोध्या नगरी होती. इत्यादी गोष्टींचे दर्शन गद्य रामायण व गीतरामायणातून आजही घडत असते. राम आणि सिता हे सर्वात आदर्श पती -पत्नी असे जोडपं देशातील सर्व प्रान्तातल्या व परदेशातल्या कानाकोपर्यात अजरामर ठरले आहेत.

पराक्रमी, कर्तबगार, प्रजेचा कैवारी आणि विद्वान महाराज दशरथ यांना  तीन पत्नी असून मूलं-बाळं नाहीत हे एक मोठे शल्य होते. ते महाराज दशराथाला आणि तिन्ही पत्नींना सतत सतावत आहे याची साक्ष गदिमांनी खालील ओव्या द्वारें दिली आहे--- 

राजसौख्य ते सौख्य जनांचे

एकच चिंतन लक्ष मनांचे

काय कांज त्या सौख्य-धनाचे

कल्पतरूला फूल नसे का? वसंत सरला तरी .

' सरयू तीरावरी अथोध्या ' या पदातून अयोध्या नगरीचे वर्णन ऐकल्यानंतर त्रेता युगात आपला देश किती समृद्ध होता हे कळते. परकीयांच्या आक्रमणा पुढे देश हरला आणि भारतभूमीचे आम्ही पुत्र गुलामीत गेलो. इस्लामी आक्रमणाच्या अगोदर आपला भारत व्यापारात आणि सुखसाधनात जगात पहील्या क्रमाकांवर होता. इस्लामी आणि ब्रिटीश राजवटीने आपल्या देशाची प्रचंड लूट केली आहे. अजुनही आपली गुलामी मानसिकता संपली नाही. ती लौकरात लौकर ती संपावी अशी रामलल्ला कडे प्रार्थना करतो. 

जसे संपन्न आणि शक्तीमान अशा अयोध्या नगरीचे दर्शन झाले. तसेच नियतीच्या शक्तीचे ही दर्शन गीत रामायण आणि श्रीराम कथां मधून होते. सर्व सुखें पायाखाली लोळण घालीत असले तरी पुत्रप्राप्ती झाली नसण्याचं दुःख दशरत महाराज आणि त्यांच्या तिन्ही राण्यांना पचवायला किती जड गेले होते याचे वर्णन गदिमांनी ज्या शब्दात मांडले आहे त्यातून एक नैसर्गीक, शाश्वत नियमाची म्हणा वा नियतीच्या करामतीची ओळख होते. या विश्वात छोट्या-मोठ्या असंख्य अशा घटना घडतात ज्याचे आकलन आजच्या आधुनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही होत नाही. 

ज्यांना प्रत्यक्ष श्रीरामाचे दर्शन झाले आहे असे संत श्री रामदास स्वामींनी   हे सत्य दासबोध मांडले आहे |        जनीं सर्व सूखी असा कोण आहे ?   विचारें मना तूंचि शोधून पाहे ||       मना त्वां चि रे पूर्वसंचित केले |     तयासारिखें भोगणे प्राप्त झाले || 

दशरथ महाराज केवळ राजा नव्हते. ते विद्वान ऋषीतुल्य व्यक्ती ही होते.  दशरथ राजाला यज्ञ करून पुत्रप्राप्ती झाली. पण वारस नसल्याचे शल्य काही काळ त्यांनाही भोगावे लागलेच. सितेचे पिताश्री जनकराजाचे व्यक्तीमत्व ऋषी-मुनी सारखे होते.  जनक महाराजांनाही सिता सारखे कन्या रत्न दैवीकृपेने धरणीतून प्राप्त झाले.

आपण कोणाच्या पोटी आणि कधी व कुठे जन्म घेणार, आपण कोणाचे पती वा पत्नी होणार, आपल्या पोटी कोण व केव्हा जन्म घेणार, आपल्याला देवाज्ञा कशी, कुठे, व केव्हा होणार इत्यादी बाबीचे भविष्य सांगणारी यंत्रणा मानवा कडे नाही. या संबंधित  आपली हतबलता संत तुकाराम महाराजांनी ' आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना ' या अभंगातून पटवून दिली आहे. तुम्ही देव आहे असे माना वा न माना पण ती यंत्रणा आहे असे जगातील बहुतांश संत-महंतानी म्हटले आहे. ती अदृष्य स्वरूपात आहे. तिचेच नाव आहे नियती. म्हणजेच महाकाळ होय.

समर्थ रामदास स्वामिनी ही म्हटले आहे --

मना सांग पा रावणा काय जाले |      अकस्मात तें राज्य बुडाले ||     म्हणूनी कूडी वासना सांडी वेगीं |   बळें लागला काळ हा पाठिलागीं || 

                                    क्रमशः

                जय श्रीराम !

गीतरामायण ऐकताना - भाग ३



गीत रामायण हे आधुनिक साहित्य सृष्टीतील नक्षत्राचे लेणे आहे. गीत रामायणाची ख्याती अशी आहे की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर प्रांतात ही आपआपल्या भाषात अनुवादाच्या रूपाने गावोगावी प्रयोग होत असतात.निवडक ' गीत रामायणाचे ' नोटेशन च्या पुस्तकाचे लेखक अशोक सहस्त्रबुद्धे म्हणतात,  " नोटेशन्स बनविणे हे सर्वसाधारणतः कठीण -किचकट व कंटाळवणे आहे. आणि त्यात गीतरामायणाचे नोटेशन्स बनविणे म्हणजे साक्षात शिवधनुष्य उचलण्यासारखे ! पण सदाबहार गीतरामायणाची जादूच न्यारी ! २०  ऑक्टोबरला काम सुरू केले आणि व न कंटाळता केवळ २ महिन्यात २० डिसेंबरला हस्तलिखीत संपविले. या दोन महिन्यात मी राममय झालो, अनेक दिव्य अनुभव आले. यावरून गदिमा व बाबुजींना ५० वर्षापुर्वी किती दैवी-दिव्य अनुभव आले असतील याची कल्पना यावी." अशोकजी सहस्त्रबुद्धे यांनी ग दि मा व बाबूजींच्या कलेची केलेली प्रशंसा समोर ठेवली, याचे कारण माझ्या हातून ' लहान तोंडी मोठा घास ' घेण्याचा प्रमाद होऊ नये. हे आपणास उमगले असावे.  

शब्दसम्राट कै ग दि मा आणि स्वरसम्राट बाबूजी म्हणजे कै सुधीर फडके या दोन मराठीचीये नगरीतील आधुनिक ऋषींनी आपल्या प्रखर तपश्चर्येने गीतरामायण रूपी मंगलमय गंगा मराठी भाषेतून प्रवाहीत केली. गीत रामायणाचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा प्रत्यक्ष ज्यांनी पाहीले आहेत अशी बुजूर्ग मंडळी शरीराने आज थकली आहे, तरीही आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात अधून मधून यु ट्युब वरून गीत रामायणाचे लाईव्ह कार्यक्रम पाहात असतात. मराठी युवक-युवतींना सुद्धा गीत रामायणाने भारावून टाकले आहे. प्रत्येक पिढीला गीत रामायणाने आपल्या कवेत घेतले आहे. ग दि मा च्या भाषेत सांगावयांचे तर --
" छंद जाणतेपणीचा तिर्थे काव्याची धुंडिली | कोण्या एका भाग्य वेळी पुजा रामाची मांडिली || देव वाणीतले ओज शितळले माझ्या ओळी | वाल्मिकींच्या भास्कराचे चांदणे झाली मराठी || " 

श्रीरामजन्मभूमीच्या मालकी संबंधित न्यायालयीन खटल्याची सुनावणी होऊन अयोध्येत  श्रीरामाचे मंदिरच होते असा देशातील सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर रितसर रामज्नमभूमी न्यासाची स्थापना झाली. श्रीरामजन्मभूमी मंदिराचे बांधकाम सुरू झाले आणि ते बहुतांशी पुर्णात्वात जात आहे. 

रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापनाची तारीख जाहीर झाल्यानंतर देशातल्या कानाकोपर्यातील चावडी, चौक चहाच्या टपरी, ग्रामदेवतेच्या मंदिर, शहारातील वाचनालय, मंदिरे अशा सार्वजनिक ठीकाणी लोक रामजन्मभूमी मुक्ती साठी झालेल्या लढाया, त्यातून देशबांधवाचे झालेले बलिदान, न्यायालयीन लढाई इत्यादी विषयावर होत असलेल्या चर्चा पाहिल्या. रामजन्मभूमी मुक्तीचा संपुर्ण इतिहास मिडीयातून पाहीला. फक्त ' रामजन्मभूमीचाच आग्रह का या संबंधीत जनसामान्यांच्या मनात उद्भवलेल्या शंका-कुशंका, प्रिन्ट इलेक्ट्राॅनिक्स व सोशल मिडीयातून  धर्मशास्त्र व अध्यात्म, इतिहास व पुरातत्व, न्यायव्यवस्था, राजव्यवस्था आणि संशोधकीय व्यवस्था इत्यादी क्षेत्रातील अभ्यासकांच्या चर्चेतून बहुतांशी दूर झाल्या आहेत. 

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाचा मुहूर्त जसा जवळ येत गेला तसा संपूर्ण देश राममय होत गेला. देशभरातील  सार्वजनिक ठिकाणी भजने, किर्तने, शोभा यात्रा, गीत रामायण, रामचरीत मानस, हनुमान चालिसा असे सांस्कृतिक कार्यक्रम होत गेले. शाळा-काॅलेजात राम सप्ताह साजरे होत गेले. कथाकथन, निबंध स्पर्धा, चित्रकला, वकृत्व, रांगोळ्या इत्यादी स्पर्धा कार्यक्रम झाले. देशभरातील रस्ते, घरें, दूकानें, इमारती, सायकली, रिक्षा, स्कूटर, मोटार- सायकली, टांगे, मोटारी, टेम्पों, इत्यादी वाहनांवर  श्रीरामाच्या प्रतिमा असलेल्या भगव्या रंगाच्या भव्य  कटऑट्स, श्रीरामाच्या प्रतिमा असलेले भगव्या रंगाचे ध्वज फडकत असलेले आपण पाहिले. गावें, तालुका व जिल्हे, नगर- उपनगरें मोठी शहरें सर्वत्र रामजन्मभूमी अक्षत निमंत्रणे व श्रीरामजन्मभूमी मंदिराचे प्रतिमाचे वितरण होताना दिसले. संपुर्ण देश राममय झाल्यामुळे एक सामान्य भाविक म्हणून मी अशा कार्यक्रमात सामील झालो. निर्मळ तीर्थक्षेत्री झालेला गीतरामायण कार्यक्रम हा त्यापैकीच एक आहे. 

रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ ला संध्याकाळी ७ वाजता आमच्या गावीं नालासोपारा (प) येथील श्रीक्षेत्र निर्मळ येथील शंकराचार्य समाधी मंदिराचे पटांगण गीत रामायणाच्या कार्यक्रमला आलेल्या रसिक श्रोत्यांनी तुडूंब भरले होते. सामवेद म्हणजे साम गायन. ऋग्वेदातल्या ज्या ऋचा गावयाच्या आहेत त्याचा संग्रह म्हणजे सामवेद ! ऋग्वेदात तीन स्वरांनी उगम झालेल्या संगीताचा प्रवास सामवेदात सप्त स्वराकडे पोहचतो असे मानले जाते.

मी गीतरामायणाचा आनंद प्रथमच घेत होतो असे नाही. पण या खेपेस माझे मन अधिक राममय झालेलं मला जाणवले. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा समारोहाची घोषणा झाल्यानंतरच्या वातावरणाचा हा परिणाम असावा. बरोबर संध्याकाळचे ७ वाजले. स्वर सामवेद संस्थेतर्फे संगीत प्रेमी भाविकांचे स्वागत झाले. माईक निवेदकाकडे आला. जमलेल्या श्रोत्यांची आतुरता शिगेला पोहचली.  पटांगणात आल्यापासून भाविकांची  आपसात होणारी थोडीशी कुजबूज संपली. पटांगणात पीनड्राॅप शांतता पसरली. लागलीच -- 
' श्रीऽऽऽ राऽऽऽम, श्रीऽऽऽ राऽऽऽम , 
श्री ऽऽऽ राऽऽऽम, स्वयें श्री राम प्रभू ऐकती ' कानीं ऐकू आले. गीत रामायण सुरू झाले. विणा व मृदंग अशा साहित्यांनी त्या सुंदर मुलांनी आपल्या कोमल व मधुर कंठानी ते काव्य गाण्यास आरंभ केला, तेव्हा प्रभू रामचंद्रांची व यज्ञमंडपातील सर्व सभाजनांची चित्तवृत्ती तल्लीन होऊन ती सभा चित्रासारखी चित्त झाली होती. 

तशीच निर्मळ या तिर्थक्षेत्रीच्या पटागंणात जमलेल्या भाविकांची सभा चित्रासारखी चित्त झाली. ती दोन छोटी बालके प्रत्यक्ष श्रीरामचंद्राची कुश, लव ही दोन मुलें. त्या कोवळ्या बालकांना ठाऊक नाही, की ते आपल्या पिताश्री समोरच त्यांचे चरीत्र गीत गात आहोत. प्रत्यक्ष देव-देवतांना डोईजड झालेल्या महान पराक्रमी राक्षस रावणाचा पराभव करून त्रैलोक्याचे अधिपती झालेल्या राजाधिराज प्रभू रामचंद्राना गीत गाणारी मूले आपली आहेत हे ठाऊक नाही. ही एखाद्या चित्रपटातील केवळ कल्पना नाही. त्रेता युगात भारतवर्षात प्रत्यक्षात घडलेली ही घटना आहे. 

माझे मन मलाच विचारू लागले,  'आपल्या बाळांच्या वाटेला जन्मतः राजमहाल ऐवजी आश्रम आला हे  प्रभू रामचंद्राना नंतर कळले असेल का? त्यावेळी त्यांना काय वाटले असेल? स्वतःहाचे बालपण राजमहालात गेले याचे त्यांना त्यावेळी स्मरण झाले असावे का, आणि स्मरण झाले असेल तर एक पिता म्हणून प्रभू रामचंद्राची त्याक्षणीं मनःस्थिती कशी झाली असेल, इत्यादी प्रश्न माझ्या मनात उद्भभवले.

अवतारी पुरूषांच्या चरित्राचा ज्यांनी सखोल अभ्यास केला आहे अशा महनीय व्यक्तींच्या प्रवचनातून, लेखांतून आणि पुस्तकातून माझ्या मनात उद्भलेल्या वरील प्रश्नांचे उत्तर मला गवसले ते असे आहे, 'अवतारी पुरूष स्थितप्रज्ञ असतात.' ते खरे ही आहे. स्थितप्रज्ञ या शब्दाची खरी ओळख ही झाली नाही असा मी एक सामान्यजनांपैकी एक, मग अनूभुती कोठून येणार? पण ---- 

अशा विभुतींनां ही नियतीशी पदोपदी टक्कर द्यावी लागली आहे, हे आपण सारे जाणतो. तरीही आपल्याला त्यांची चरित्रगाथा पुन्हा पुन्हा वाचावी, ऐकावी असे वाटते. या संबंधीतले कार्यक्रम मग ते चित्रपट असो वा नाटक, सिरीयल्स असो वा लोककला असो, किर्तन असो की प्रवचन असो, भजन असो वा संगीतमय निरूपण इत्यादींनी आपले मन, आपले कान तृप्त होतात. त्याच क्षणीं साहित्यकार, संगीतकार - गायक, कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, किर्तनकार, प्रवचनकार,  इतिहास तज्ञ, आणि आयोजक इत्यादींची सुद्धा स्तुती आपल्या मुखातून आपोआप येत असते. त्यापैकी अग्रणी स्थानावर असलेली निर्मिती गीतरामायण होय.  

                                       क्रमशः- 
               जय श्रीराम !


मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

गीतरामायण ऐकताना - भाग २



महाभारतावर 'भारतीय युद्ध' आणि रामायणावर 'रामचरित्र' अशा दोन पुस्तकांचे लेखक कै चिंतामण वैद्य आपल्या श्रीरामचरित्र पुस्तकाच्या उपोद्धात म्हणतात,  'आर्यांच्या बुद्धिमत्तेच्या खाणीतून निघालेले रामायण हे एक अमूल्य रत्न आहे.' या पुस्तकात त्यांनी पदोपदी आर्य, आर्यवर्त असे शब्द वापरले आहेत. यातून चिंतामणजी आर्यन इन्व्हर्जन सिद्धान्त बिलकूल मानत नाहीत हे स्पष्ट दिसते. ते पुढे म्हणतात की 'काव्याची अंगे दोन, एक कवी व दुसरे काव्यात वर्णिलेला नायक. या दोन्ही अंगानी रामायणाची बरोबरी करणारा जगात दुसरा ग्रंथच नाही. रामचंद्र सारखा अलौकिक सामर्थ्याचा व उदात्त नीतिमत्तेचा पुरूष जगाच्या इतिहासात झाला नाही व वाल्मिकी सारखा प्रतिभा संपन्न व उच्च कल्पनाचा कवी आजपर्यंत जगात झाला नाही." 

श्रीरामाचे उदात्त व मनोहर चरीत्र म्हणजे संसारात मनुष्याने नीतीने कसे वागावे हे दाखविणारा एक निष्कलंक आरसा आहे. श्रीरामाचे नाव घेतल्यावर आपल्यासमोर सद्गुणांची मूर्ती उभी राहते. वाल्मीकी ऋषींनी एकदा नारद मुनींना विचारले "सर्वात उत्तम राजा साप्रंत कोण आहे?", तेव्हा नारदाने श्रीरामचंद्राचे नाव सांगितले. त्यावेळी नारदाने रामचंद्राचे जे वर्णन केले आहे ते असे आहे --

" इश्वाकु कुलातील रामचंद्राने आपणा स्वतःहास जिंकले असून आपल्या पराक्रमाने शुत्रूसही जिंकले आहे. तो नीतिमान, बुद्धिमान, धर्मज्ञ, व सत्यप्रिय आहे; त्याचे मन फार मोठे आहे. तो सज्जनांना उदार हस्ते आश्रय देणारा असून सर्वांवर त्याची समदृष्टी आहे. तो समुद्रासारखा गंभीर आहे; हिमालयासारखा धैर्याने निष्कंप आहे; अग्नी सारखा क्रोधाने तीव्र आहे; पृथ्वीसारखा क्षमाशील आहे; कुबेरासारखा उदार आहे व धर्मासारखा सत्यवादी आहे. "

यावत् स्थास्यन्ती गिरयः सरितश्च माहितले | तावद्रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यते ||
( अर्थ--  या भूतलावर पर्वत नद्या यांचे अस्तित्व आहे तो पर्यंत ही 
श्री रामायण कथा जनमानसात प्रचलीत राहील.) साक्षात ब्रह्मदेवाने आद्यकवी महर्षी वाल्मिकींना दिलेला हा अभिप्राय आहे. इतकेच नव्हे तर ब्रह्मदेवाने एक दिव्य वरदान दिले होते की, ' महान तपस्वी वाल्मिकीने रचलेल्या या महाकाव्यातील एक ही गोष्ट खोटी ठरणार नाही.'

वरील विवेचन हे संक्षिप्त आहे. तरीही त्यातून भारताचा इतिहास किती प्राचीन आहे हे आपल्या लक्षात येते. तसेच जगातील सर्वात आदर्श राजव्यवस्था म्हणजे रामराज्य आहे हे सिद्ध झाले आहे. विशेष हे की हे सत्य तत्कालीन आणि सांप्रत काळात राजकीय आणि इतिहासाच्या अभ्यासांनी स्विकारले आहे. या वरून आर्य दक्षिण रशियातून भारतात आले होते आणि भारत हा कधी देश नव्हताच असा इतिहास जो जर्मन विचारवंत मॅक्सम्युलर आणि ब्रिटीश राजवटीतील लार्ड मेकाॅले या जोडीने लिहीलेला आहे तो खोटा हे ही सिद्ध होते. आपण स्वातंत्र्या नंतर मॅक्सम्युलर व मेकाॅले यांनी लिहीलेला इतिहास शिकत गेलो. दुर्दैवाने आपण आज ही तोच प्रमाणभूत मानत आहोत. हे ही एक कारण होते, ज्यामूळे श्रीरामजन्मभूमी संबंधीत खटल्याच्या निकाल प्रदिर्घ काळ लोबंकळत राहिला.               

मेकाॅले आणि मॅक्सम्युलर या जोडीचा खोटारडेपणा  श्री अभिजित जोग यांनी आपल्या 'अ सत्यमेव जयते ...? ' (भारताच्या इतिहासातील दिशाभूल) या पुस्तकात सविस्तर पणे उघडा केला आहे. या पुस्तकात त्यांनी मोहोंजोदारो व हरप्पा येथे इ स १९२५ ला करण्यात आलेल्या उत्खनातून प्राचीन सिंधु संस्कृती, ऋग्वेदातील आर्य शब्दाची व्याख्या व व्याप्ती ची उघड झालेली सत्यता मांडली आहे. या शिवाय उत्खनातून  आर्यांच्या आक्रमणाच्या खूणा आढळल्या नसल्याकारणाने  'आर्य पश्चीमेकडून भारतात आले ' हा सिद्धांत धातांत खोटा आहे यावर परदेशातील विद्वानांनी शिक्कामोर्तब केले आहे. असे असूनही मॅक्सम्युलर आणि मेकाॅले यांनी आपला सिद्धांत खोटा नाही अशीच भूमिका घेतली होती. या भूमिकेला चिकटून राहण्या साठी त्यांना किती कोलांटी माराव्या लागल्या याचे सविस्तर पण सत्याला धरून वर्णन अभिजीत जोग यांनी केले आहे. अभिजित जोगांच्या या पुस्तकावर डाॅ विनय सहस्त्रबुद्धे,  स्वामी गोविन्ददेव गिरी, डाॅ वसंत शिंदे इत्यादी मान्यवरांनी आपल्या अभिप्रायात हे पुस्तक नसून एक ग्रंथ आहे, एक ऐताहासिक दस्तऐवज आहे असेच म्हटले आहे. शाळा- काॅलेज मधील इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची फेररचना करतेवेळी या ग्रंथाचा फार उपयोग होईल असे मला वाटते. 

हे सारं येथे नमूद करण्याची गरज वाटली. याचे कारण या भारतभूमीत जन्मलेल्या काही बांधवांनी श्रीराम जन्मलेच नाहीत असा पावित्रा घेतला होता. त्यामुळे श्रीरामजन्मभूमी अयोध्या मुक्तीसाठी देश पारतंत्र्यात असताना आणि स्वातंत्र्या नंतर ही  अनेकांना बलिदान द्यावे लागले व कारावास भोगावा लागला. शेवटी न्यायालयात दावा टाकावा लागला हे शल्य करोडो रामभक्तांना सोसावे लागले. म्हणुनच विविध चॅनेल्सच्या सर्वेमधून देशात रामलाट तयार झाली आहे असे मांडत आहेत. त्यावर मला काही प्रतिक्रीया द्यावयाची नाही. अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर मंदिर उभे राहिले आहे ही आपली इच्छा पूर्ण झाली आहे. ती प्रभुरामचंद्राची कृपा आहे असे मानू या. तमाम भारतीयांनी ' अयोध्या नगरी ही जगाच्या पाठीवरील सुसंकृत मानवी जीवनाची सर्वात पहिली पुरी आहे, हे ध्यानात ठेवून आपले आचरण ठेवावे. हाच न्यायदेवतेचा आपणां सर्वासाठी  संदेश आहे असे मला वाटते.  
                                         क्रमशः
                जय श्रीराम !

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...