' शरयू तीरावरी अयोध्या ' हे पद सुरू झाले. मनुनिर्मित अयोध्या नगरीचे वर्णन ऐकताना डोळ्याचे पारणे फिटले. माझे मन इक्ष्वाकु कुलाचा धर्मपरायण राजा दशराथाच्या काळात गेले. मराठीतील रामायणावरील जी काही पुस्तके वाचली आहेत आणि गीतरामायणाचे जे काही कार्यक्रम पाहिले, ऐकले आहेत त्यातून जे काही मला उमजले आहे ते आपल्या समोर मांडतो आहे.
सामान्यतः वाचण्यापेक्षा प्रवचन, किर्तन व गायन ऐकण्यात आपला कल अधिक असतो. त्यात ही गीतरामायणाची चव इतकी न्यारी आहे की तिचा आस्वाद घेण्यास आपण सारेजण सदैव तयार असतो.
श्रीरामांच्या यज्ञमंडपात कुश आणि लव अयोध्या नगरीचे जे वर्णन सांगत आहेत, ते ऐकूनच त्रेतायुगातील आर्यावर्तात कोसल नावाच्या विस्तीर्ण आणि सुपीक प्रदेश, तेथील साम्राज्य याची ओळख होते. शरयू नदीच्या काठी वसलेल्या राजधानी अयोध्या नगरीचे मुर्तीमंत दर्शन घडते. या शहरामधून मोठमोठाले रूंद राजरास्ते व काही ठिकाणी जाणेयेण्याकरिता काढता-घालता येणारे चमकादर पूल, रस्त्यावर दुतर्फी फळ-फुलांनी बहरलेल्या वृक्ष-वेली पाहता प्रजेला पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश आपोआप मिळत होता.
तेथील रस्त्यावर रोज सुवासिक पाणी टाकले जाऊन ठिकठिकाणी फुलांचे मांडलेले उपहार आणि सुशोभीत सात मजली वाडे इत्यादी ने अयोध्येची शोभा वाढलेली दिसे. नगराबाहेर विस्तीर्ण व रमणीय अशा बाग होत्या. तिथे नगरवासी फिरायला येत असत. काही उपवनात नृत्य, गायनासारखे कार्यक्रम घेता येतील असे मंच ही होते. अयोध्येत ठिकठीकाणी दुध-दुभते, फळे व भाजीपाला आणि किराणा मालांनी भरलेले बाजार होते. एकंदरीत प्रजा सुखी होती. त्यामूळे स्त्री- पुरूष स्वभावाने धार्मिक, सदाचारी व कुटुंब वत्सल होते. प्रजेच्या व राज्याच्या सुरक्षेसाठी सर्वत्र पराक्रमी, मजबूत बांध्याचे असे शस्त्रसज्य सैनिक तैनात असत. तसेच हिमालय विंध्यादी पर्वती भागातून आणलेले शेकडो उंच व शृंगारलेले हत्ती, तसेच सिंध, कांबोज, बल्क इत्यादी देशातून आणलेले हजारो सुंदर व दमदार घोडेही बाग- बगीचा मधून फिरत असताना दिसत असत. हत्ती-घोडे यांचे पालन-पोषण व शिक्षण अशा रितीने केले जात असे की त्यांना आसपास फिरणार्या लोकांपैकी स्वजन कोण आणि शत्रूचे हेर हे ओळखता येत असे.
सतत सज्ज असलेले सैनिक बेसावध असणार्या शत्रुवर बाण व इतर शस्त्राचा वापर करीत नसत. पण दगा देणारे शत्रू दिसले तर लागलीच त्यांना यमसदनास पाठवत असत. त्यामुळे तिथे कधी ना दंगा झाला, ना दगा झाला. थोडक्यात यथा राजा तथा प्रजा या सिध्दांतावर आधारलेली ईश्वकू कुळाची सक्षम व लोकाभिमूख राज्यव्यवस्था होती. तत्कालीन सर्वात सुंदर, आदर्श अशी राजधानी अयोध्या नगरी होती. इत्यादी गोष्टींचे दर्शन गद्य रामायण व गीतरामायणातून आजही घडत असते. राम आणि सिता हे सर्वात आदर्श पती -पत्नी असे जोडपं देशातील सर्व प्रान्तातल्या व परदेशातल्या कानाकोपर्यात अजरामर ठरले आहेत.
पराक्रमी, कर्तबगार, प्रजेचा कैवारी आणि विद्वान महाराज दशरथ यांना तीन पत्नी असून मूलं-बाळं नाहीत हे एक मोठे शल्य होते. ते महाराज दशराथाला आणि तिन्ही पत्नींना सतत सतावत आहे याची साक्ष गदिमांनी खालील ओव्या द्वारें दिली आहे---
राजसौख्य ते सौख्य जनांचे
एकच चिंतन लक्ष मनांचे
काय कांज त्या सौख्य-धनाचे
कल्पतरूला फूल नसे का? वसंत सरला तरी .
' सरयू तीरावरी अथोध्या ' या पदातून अयोध्या नगरीचे वर्णन ऐकल्यानंतर त्रेता युगात आपला देश किती समृद्ध होता हे कळते. परकीयांच्या आक्रमणा पुढे देश हरला आणि भारतभूमीचे आम्ही पुत्र गुलामीत गेलो. इस्लामी आक्रमणाच्या अगोदर आपला भारत व्यापारात आणि सुखसाधनात जगात पहील्या क्रमाकांवर होता. इस्लामी आणि ब्रिटीश राजवटीने आपल्या देशाची प्रचंड लूट केली आहे. अजुनही आपली गुलामी मानसिकता संपली नाही. ती लौकरात लौकर ती संपावी अशी रामलल्ला कडे प्रार्थना करतो.
जसे संपन्न आणि शक्तीमान अशा अयोध्या नगरीचे दर्शन झाले. तसेच नियतीच्या शक्तीचे ही दर्शन गीत रामायण आणि श्रीराम कथां मधून होते. सर्व सुखें पायाखाली लोळण घालीत असले तरी पुत्रप्राप्ती झाली नसण्याचं दुःख दशरत महाराज आणि त्यांच्या तिन्ही राण्यांना पचवायला किती जड गेले होते याचे वर्णन गदिमांनी ज्या शब्दात मांडले आहे त्यातून एक नैसर्गीक, शाश्वत नियमाची म्हणा वा नियतीच्या करामतीची ओळख होते. या विश्वात छोट्या-मोठ्या असंख्य अशा घटना घडतात ज्याचे आकलन आजच्या आधुनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही होत नाही.
ज्यांना प्रत्यक्ष श्रीरामाचे दर्शन झाले आहे असे संत श्री रामदास स्वामींनी हे सत्य दासबोध मांडले आहे | जनीं सर्व सूखी असा कोण आहे ? विचारें मना तूंचि शोधून पाहे || मना त्वां चि रे पूर्वसंचित केले | तयासारिखें भोगणे प्राप्त झाले ||
दशरथ महाराज केवळ राजा नव्हते. ते विद्वान ऋषीतुल्य व्यक्ती ही होते. दशरथ राजाला यज्ञ करून पुत्रप्राप्ती झाली. पण वारस नसल्याचे शल्य काही काळ त्यांनाही भोगावे लागलेच. सितेचे पिताश्री जनकराजाचे व्यक्तीमत्व ऋषी-मुनी सारखे होते. जनक महाराजांनाही सिता सारखे कन्या रत्न दैवीकृपेने धरणीतून प्राप्त झाले.
आपण कोणाच्या पोटी आणि कधी व कुठे जन्म घेणार, आपण कोणाचे पती वा पत्नी होणार, आपल्या पोटी कोण व केव्हा जन्म घेणार, आपल्याला देवाज्ञा कशी, कुठे, व केव्हा होणार इत्यादी बाबीचे भविष्य सांगणारी यंत्रणा मानवा कडे नाही. या संबंधित आपली हतबलता संत तुकाराम महाराजांनी ' आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना ' या अभंगातून पटवून दिली आहे. तुम्ही देव आहे असे माना वा न माना पण ती यंत्रणा आहे असे जगातील बहुतांश संत-महंतानी म्हटले आहे. ती अदृष्य स्वरूपात आहे. तिचेच नाव आहे नियती. म्हणजेच महाकाळ होय.
समर्थ रामदास स्वामिनी ही म्हटले आहे --
मना सांग पा रावणा काय जाले | अकस्मात तें राज्य बुडाले || म्हणूनी कूडी वासना सांडी वेगीं | बळें लागला काळ हा पाठिलागीं ||
क्रमशः