आम आदमी पार्टी संबंधी कोणी किती ही बोटं मोडली तरी ती पार्टी देशाच्या कानाकोपर्यात निवडणूका लढवित आपले चिन्ह पोहचवित आहे हे नाकारता येत नाही. दिल्लीत त्या पक्षाने सलग दोनदा विजय मिळविला. तसेच पंजाब मध्ये ही गेल्या निवडणूकीत २० जागा पटकाविल्या होत्या. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की राजकीय पार्श्वभूमी नसलेले पण राजकारणात काम करण्याची जबरदस्त इच्छा असेल तर राजकारणात जम बसविता येतो.
केजरीवाल माजी प्रशासकीय अधिकारी असल्यामूळे त्यांनी राजकारण जवळून पाहीले आहे. तसेच देशो-देशीचे मिडीयाचे स्वरूप, तेथील व्यवहार आणि कारभार, एनजीओंचे स्वरूप तेथील कारभार आणि व्यवहार इत्यादी गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि हळूहळू संपर्क साधला. आजचे जग हे व्यापारी तसेच आर्थिक जग मानले जाते. अनेक अविकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक सत्ता किंवा आर्थिक अधिराज्य मिळविणे म्हणजे एक प्रकारे त्या देशांना गुलाम करण्याची एक स्पर्धा आर्थिक दृष्ट्या संपन्न झालेल्या देशांत आहे. प्रत्यक्ष युद्ध न करता अशा प्रकारचे आपले साम्राज्य निर्माण करण्याची वा वाढविण्याची प्रगत देशांना जडलेली खोड आहे. ही एक विकृती आहे हे मान्य पण या जगात जीवो जिवस्य जिवनम् हाच धर्म मानला जातो त्यावर ' हे विश्वची माझे घर ' हे आपले तत्व राजकारणात कोण स्विकारणार?
विकसनशील तसेच अविकसित देशांच्या राज्यव्यवस्थेत दोष आहेत हे ही मान्य करावे लागते. केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला विदेशी आर्थिक बळ मिळाल्यामूळेच त्यांच्या पक्षाला जम बसविणे शक्य झाले आहे हे निखालस सत्य आहे. समाज सेवक अण्णा हजारेंना चेहरा बनवून ' इंडिया अगेन्स्ट करप्शन ' ही चळवळ उभारली आणि त्यातून निर्माण झालेला या पक्षाबद्दल लोकांच्या फार अपेक्षा होत्या. पण तेरड्या सारखे रंग बदलत तो ही शेवटी पारंपारीक राजकीय पक्षाचे स्वरूप घेऊन देशात स्थिरावू पाहात आहे. पंजाब मध्ये गेल्या विधानसभेत त्याने पहिल्याच फेरीत २० जागा कमाविल्या होत्या. ही त्या पक्षाची करामत नसून काॅग्रेस आणि अकाली दल यांच्या नाकर्तेपणाचे आप पक्षाला मिळालेले फळ आहे. दुसरे असे आहे की आता केजरीवाल यांच्या पत्नी आणि मुलगा ही आपच्या प्रचार मोहिमेत भाग घेणार आहेत. ही बाब पंजाबी लोकांना खटकणारच. म्हणजेच आप ला बहुमत मिळाले तर पंजाब सरकारवर नियंत्रण गांधी घराण्याकडून केजरीवालांच्या घराण्याकडे जाणार अशी भावना तेथील मतदारात निर्माण होत आहे. त्यामूळे आप पक्ष मोठे यश मिळण्यापासून वंचित राहू शकते. मागील निवडणूकीत केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित न केल्यामूळे पंजाबवासियांना केजरीवाल यांनाच मुख्यमंत्री व्हावेसे वाटते ही भिती वाटली. म्हणून आप पक्षाला अनुकूल स्थिती असतानाही त्यांची विजयाची गाडी २० जागावर अडकली.
मागील निवडणूकीत कॅप्टन अरमिंदरसिंगांच्या पाठिशी पंजाब उभा राहीला हे सत्य . पण काॅग्रेसने तो गांधी घराण्याचा विजय मानला. कॅप्टन अरमिंदरसिंग हे निव्वळ स्थानिक उमेदवार आहेत असे नाही तर ते एक कर्तबगार नेते आहेत हे सन १९९८ पासून सिद्ध झालेले आहे. म्हणूनच काॅग्रेसला मागच्या वेळी प्रचंड बहूमत मिळाले होते. या ठिकाणी लोकसभेच्या २००९ ला केंद्रात काॅग्रेस प्रणित आघाडीला पुन्हा सत्ता का मिळाली याचे कारण नमूद करणें आवश्यक वाटते.
तत्कालीन पंतप्रधान डाॅ मनमोहनसिंगांनी देशाच्या संरक्षणासंबंधी डाव्या पक्षांचा दबाब झिडकारून अमेरिकेशी जो करार केला तो भारतीय जनतेस भावला. पण डाव्या पक्षांनी डाॅ मनमोहनसिंग सरकारला दिलेला पाठींबा काढून टिका सुरू करण्याचे सत्र अवलंबिवले. सन २९६२ ला साम्यवादी चीनने भारतावर आक्रमण करून भारताचा भाग पादक्रांत केला तेव्हापासून भारतियांच्या मनात साम्यवादी पक्षांबाबत अडी निर्माण झालेली आहे. त्यामूळे डाव्यांनी पंतप्रधान डाॅ मनमोहनसिंगावर केलेल्या यथेच्छ टिकेतून मनमोहनसिंग संबंधी भारतियांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. त्यामूळे युपिएला पुन्हा सत्ता मिळाली.
पण गांधी घराण्याने तसेच काॅग्रेसमधील त्या घराण्याच्या निष्ठावंतानी तो सोनियांच्या करीष्माचा विजय मानला. नुसता विजय मानलाच असे नव्हे तर राहूल गांधीमध्ये इतका अंहकांर वाढला की ते पदोपदी पंतप्रधान मनमोहनसिंगाचा अपमान करू लागले. राहूल गांधीची सरकारच्या कारभारात लुडबूड वाढू लागली. त्यातच सरकार दरबारात भ्रष्टाचार ही प्रचंड वाढला. परीणाम काय झाला, काॅगेस नामशेष झाली. आज ही गांधी घराण्याचा अंहकार कमी होताना दिसत नाही. इथे काॅग्रेसने केलेल्या चूकीचा उल्लेख केला याचे कारण आम आदमी पार्टी काॅग्रेसेचीच मतें कापणार आहे. काॅग्रेसने कॅप्टन अरमिंदरसिंगासारखा मोहरा ही गमाविला. पण त्यांच्या मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांना चन्नीच्या सरकारमध्ये स्थान ही दिले. इतकेच नव्हे तर काॅग्रेस सर्व सिटींग आमदारांना तिकट वाटप ही करणार आहे. याचा अर्थ काॅग्रेस अरमिंदरसिंगाना एकाकी पाडून आपले अस्तित्व शाबूत करीत आहे. पण हा प्रकार ' बाटली नवी पण दारू जुनीच ' असा वाटतो. काॅग्रेसच्या या धोरणामूळे आप पक्षाला फायदा होईल असे आतापर्यंतचे सर्वे ओपिनियन पोल सांगत आहेत. या शिवाय भविष्यात कॅप्टन अरमिंदरसिंगचा कोणी वारसाने पक्ष काढला तर पंजाबमध्यें काॅग्रेसची अवस्था आन्ध्र आणि तेलंगणात आहे तशी होईल.
या सालच्या निवडणूकीत आप बर्यापैकी जागा घेईल असे मानले जात असले तरी या पक्षाचे नियंत्रण दिल्लीत असल्यामूळे तिकीट वाटपावरुन या पक्षातील उमेदवारांची जी निवड झाली आहे त्यासंबंधी पक्षात नाराजी आहे. एक तर या पक्षाची संघटन बांधणी कच्ची आहे. आपचे उमेदवार राजकारणातले नवखे आहेत. त्यामूळे ज्यांना तिकीट मिळाले नाही असे नेते आपल्या स्थानिक कार्यकर्त्यासोबत आप चा नाद सोडतात आणि वेळप्रसंगी अपक्ष म्हणून निवडणूकीत उभे राहण्यासाठी फार्म ही भरतात. इतकेच काय निवडून आलेले आमदार First timer असल्याने पक्षातंर ही करण्याची शक्यता अधिक आहे. पंजाबात काॅग्रेस आणि अकाली दलासारखे फ्रोफेशनल राजकीय पक्ष आपच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करतील. केजरीवालांनी मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार म्हणून भगवान मान यांची ज्या पद्धतीने निवड केली त्याबाबत फारसे कौतूक झाले नाही. कारण तो एक स्टंट आहे हे कळण्या इतके लोक खुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री पदाचे घोषित उमेदवार भगवान मान यांना फार मोठा नेता मानला जात नाही. ते फक्त शिख आहे हीच काय ती जमेची बाजू. भगवान मान यांना काॅग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदरसिंगांने आणले असे दस्तूरखुद्द कॅप्टन अरमिंदरसिंगांनी लल्लन टाॅप चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामूळे भगवान मान फितूर आहेत असा प्रचार करण्याची संधी चरणजीत सिंग यांना प्राप्त झाली आहे. भगवान मान असो वा चरणजीतसिंग चन्नी हे दोन्ही नेते सोबर आहेत असे कॅप्टन अरमिंदरसिंग म्हणत आहेत पण त्यांच्यात मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची कुवत नाही अशी पुष्टी कॅप्टन अरमिंदरसिंग जोडतात. कॅप्टन प्रचार सभेत हे दोघे नेते दिल्लीतील त्यांच्या श्रेष्ठींचे होयबे ठरतील ही बाब ही सविस्तरपणे स्पष्ट करतील असे दिसते. पंजाबात जात-धर्म असे धृविकरण होणार नसले तरी पंजाबवासियांना आपल्या अस्मितेचा अभिमान आहे. ही नस ओळखून कॅप्टन अरमिंदरसिंग आपल्या प्रचाराची दिशा आखत आहेत हेच त्यांनी लल्लनटोप चॅनेल्सला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट दिसले आहे. याचा अर्थ हा आहे की निवडणूकीच्या निकालाचे अंदाज बांधतांना कॅप्टन अरमिंदरसिंग यांना पुर्णपणे राईटऑफ करणे चूक ठरू शकते. अर्थात प्रत्यक्ष पंजाबात मी काही जाऊन आलेलो नाही त्यामूळे माझे हे विधान ही चूक ठरू शकते.
आप असो वा किसान मोर्चा असो अशा नवीन पक्षांसमोर अनेक वर्षे पंजाब राज्यातल्या जटील समस्यां ज्याचा उल्लेख पहिल्या भागात केला आहे, त्याविषयीची अपेक्षा मतदार करीत नसतात हा त्यांचा एक फायदा असतो. काॅग्रेस आणि अकाली दल सुस्ती चढल्यासारखे दिसू लागल्यामूळे लोकांची नव्याची हौस भागविली जाईल हे नाकारता येत नाही. तसेच दिल्लीतील या पक्षांच्या कारभाराबद्दल लोकात कुतूहूल आहे. पण आप पक्षाला कार्यकर्त्यांची वानवा आहे. त्यातच पक्षाच्या स्थापनेपासून जे कार्यकर्ते नोंदले गेले होते त्यांच्यात मागील निवडणूकीतला जोश दिसत नाही अशी नोंद राजकीय अभ्यासकांनी केलेली आढळली. तसेच एक खांबी पक्ष अशी टिप्पणी पंजाबी भाषेत ऐकू येत आहे. तरीही आप पक्षाला ३५ ते ४० जागा मिळतील असा काही सर्वेचा अंदाज आहे. तो अर्थातच पंजाब मधील मतदार काॅग्रेस आणि अकाली दल या पक्षांच्या कारभाराला कंटाळलेले दिसत असल्याने बांधला असावा. तामिळनाडूत डीएमके किंवा एडीएमके याचा landslide सारखा विजय-पराजय होत असतो तशा प्रकारचे मतदानाचे दर्शन होते पंजाबात अजून तरी दिसले नाही आणि तशी द्विपक्षीय रचना भविष्यात ही दिसेल असे वाटत नाही. पुढील भागात अकाली दल -- बसपा आघाडी संबंधीत चर्चा करणार आहोत आणि शक्य झाल्यास त्यासोबत भाजपा कुठपर्यंत मजल मारू शकेल याचा ही समावेश करीन.
विश्लेषण सत्य स्थितीवर व विविध ओपिनीअन पोल्सवर आधारित आहे. आपण दर्शवल्याप्रमाणे, आप राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या तयारीत आहे हे स्पष्टच आहे पण केजरीवाल हे अराजकी शिक्का पुसण्यात यशस्वी झाले व पंजाबमधे सत्ता मिळवण्यात पोल्सच्या अंदाजानुसार यशस्वी झाले तर केंद्रांबरोबर सहकार्याची भुमिका घेतली तरच त्यांना राष्ट्रीय नेता म्हणुन मान्यता मिळेल. वय व कुवत त्यांच्या बाजुला आहेत. पण विश्वासार्हता नाही कारण, अण्णांचा त्यांनी वापर करुन ंनंतर विश्वास गमावला व दिल्लीमधे सतत केंद्र विरोधाची भुमिका घेतली.अशा परिस्थितींत मोदींची डोकेदुखी वाढु शकते व खलीस्तान्यांचे फावेल हे घातक ठरेल.
उत्तर द्याहटवाधन्यवाद