देशातील स्वायत्त संस्था निकालात काढल्या जात आहेत, देशात असहिष्णूता वाढली आहे, अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्याचे सत्र आरंभिलेले आहे, संविधान धोक्यात आले आहे, शेतकर्यांना देशोधडीला पाठविण्याचे सत्र सुरू आहे, देश अंबानी व अदानींना विकला आहे, चीनने आपली जमीन गिंळकृत केली आहे, श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य म्हणजे उच्च वर्णियांचे वर्चस्व स्थापन होत आहे, विरोधी पक्षांचे राज्य सरकर पाडण्याचे कारस्थान चालू आहे, निवडणूक आयोग, सीबीआय इत्यादी संस्था भाजपाच्या झाल्या आहेत, भ्रष्टाचाराच्या खोट्या केसेस लावून विरोधी पक्ष नेत्यांचे खच्चीकरण होत आहे, मोदी चोर है, अशा प्रकारची टिका केंद्र सरकारवर गेली सहा वर्षे होत आहे. इतकं स्वातंत्र्य असूनही विरोधी पक्ष आम्हाला 'आजादी हवी असे म्हणत गोरगरीब वर्गाला केंद्र सरकार आपल्यावर अन्याय करीत आहे असे फितवून आंदोलनाला उभे करीत आहे, तर कोणी आपला धर्मग्रंथ म्हणजेच कायदा असे फितवून गोर-गरीबांना उपोषणाला बसवित आहेत, कोणी धनधांडगे पण कागदावर शेतकरी म्हणून सरकार विरूद्ध आंदोलनाला बसविले जात आहेत. महाराष्ट्र, पश्चीम बंगाल, पंजाब, आणि केरळ इत्यादी राज्यातील विरोधी पक्षांनी सत्तेच्या साह्याने केंद्र सरकारशी पंगा घेण्याचे सत्र अवलंबविले आहे. या पंग्याचे स्वरूप असे आहे की वादी-प्रतिवादी परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी नावाजलेल्या वकिलांना भरमसाठ फी देऊन न्यायालयात दाद मागत आहेत. देशातील सांप्रत राजकीय स्थिती व राजकीय पक्षांचे व्यवहार पाहाता, राजकीय पक्षांना परस्परांवर कुरघोडी करण्यासाठीच देशात न्यायालयीन व्यवस्था उभी झाली आहे का, ज्यांनी आपल्या देशाची घटना तयार केली, त्या महापुरूषांना अभिप्रेत असलेले हेच ते कायद्याचे राज्य आहे का, असे प्रश्न मनात उभे राहात असल्यामूळे यावर संवाद साधावा असे वाटले म्हणून हा लेख प्रपंच. या विषयाला सीमा नाही. जग सतत बदलत असते. कारण काळ बदलत असतो. बदल हा निसर्गाचा स्थायीभाव. त्यामूळे काळानुसार जशा मानवाच्या गरजा बदलत असतात तदनुसार समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थाचे स्वरूप बदलत जाते. त्यामूळे नवीन सुधारीत कायदे आणण्याचे काम राज्यव्यस्थेला म्हणजेच सरकारला करावे लागते. म्हणून या विषयावरील चर्चा राजकीय पक्षांच्या व्यवहारापूरता आपण सिमीत करणार असलो तरी आपली चर्चा लांबली जाणार आहे हे विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणतो. प्रथम या लेखाच्या शिर्षकाच्या संबंधीत एक छोटी कथा माझ्या वाचनात आली आहे, ती आपल्यासमोर सादर करतो.
एक खोटेगाव नावाचे गाव होते. तिथे एक गावदेवीचे मंदिर होते. त्या मंदिराला लागूनच रेल्वे स्टेशन असल्यामूळे भाविक आपल्या पायातील पादत्राणे न काढता मंदिराच्या गाभार्यात जाऊन गावदेवीचे घाईघाईने दर्शन घेत रेल्वेच्या गाडीने आपआपल्या नोकरी धंद्यासाठी शहराकडे जात असत. पंचक्रोशीतल्या इनामराव कोतवाल नावाच्या एका सद् गृहस्थाला ही गोष्ट खटकत होती. म्हणून त्याने संरपंचाकडे लेखी तक्रार नोंदविली. सरपंच म्हणाले, इनामरावजी अशा तक्रारी आजपावेतो पुष्कळ दाखल झालेल्या आहेत. पण काही फरक पडलेला नाही. आपलीच ही मंडळी ! किती समजावले पण पालथ्या घागरीवर पाणी ! काय करावे हेच मला कळेनासे झाले आहे. तुमची तक्रार दाखल करून घेतो आणि उद्या मंदिराच्या आवारात फळ्यावर लेखी आवाहन करतो." दुसर्या दिवशी मंदिराच्या आवारात सुवाच्च अक्षरात खालील प्रमाणे एक आवाहन लिहलेला फलक दिसला.
" भाविक हो, नमस्कार !
आमच्या निदर्शनात आले आहे की, अनेक भाविक आपली पादत्राणे बाहेर न काढताच मंदिराच्या गाभार्यात जाऊन गावदेवीचे दर्शन घेत असतात. अशा सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की, आपल्या गावदेवीच्या मंदिरातले पावित्र्य टिकविण्यासाठी देवीचे दर्शन घेण्यासाठी पादत्राणे मंदिराच्या बाहेरील पटांगणात काढून ठेवाव्यात आणि नंतर मंदिरात प्रवेश करावा. आम्हाला आशा आहे की, सर्व भाविक या विनंतीचा मान राखतील. धन्यवाद !
दुसर्या दिवसापासून भाविक मंडळी आपआपली पादत्राणे बाहेर ठेवून देवीचे दर्शन घेऊ लागले. ज्या गावकर्याने तक्रार केली होती त्याला आनंद झाला. पण तो आनंद फार दिवस टिकला नाही. पंधरा-वीस दिवसानंतर पाहतो तर भाविक पादत्राणे बाहेर न काढता देवीचे दर्शन घेऊ लागले. मग त्या ग्रामस्थाने तहसिलदारकडे तक्रार केली. दुसर्या दिवशी मंदिराच्या आवारातील फलकावर तहसिलदाराच्या सहीचे एक पत्रक चिकटविलेले दिसले. त्या पत्रकातील भाषा ग्रामपंचायतच्या आवाहनासारखीच होती. फक्त सहीच्या खाली 'तहसिलदार' असे लिहले होते. काही दिवस भाविक आपली पादत्राणे बाहेर ठेवून देवीचे दर्शन घेऊ लागले. पण नंतर येरे माझ्या मागल्या हीच स्थिती.
त्यानंतर इनामराव कोतवाल जिल्हाधिकार्याकडे गेले आणि त्यांनी तिथे तक्रार नोंदविली. पाच दिवसानंतर जिल्हाधिकार्यांच्या हुकूमाचे पत्रक घेऊन एक अधिकारी त्या मंदिरात हजर झाले. त्या अधिकार्यानी जिल्हाधिकार्याचे पत्रक फलकावर चिकटविले आणि स्वतः एक खुर्ची व टेबल ठेवून तिथे सकाळपासून ते रात्री नऊवाजेपर्यंत गस्त करीत राहू लागले. जिल्हाधिकार्याचे ते पत्रक म्हणजे ना विनंती होती ना आवाहन होते. ते पत्रक म्हणजे कडक इशारा होता. भाविकांनी आपली पादत्राणे बाहेर न काढता दर्शन घेतले तर त्यावर कडक कारवाई केली जाईल. खाली जिल्हाधिकार्याची सही व त्या सहीच्या खाली हुकूमावरून असे लिहलेले पाहाताच, सारे भाविक पादत्राणे बाहेर काढून देवीचे दर्शन घेऊ लागले. भितीने का असेना पण सारे भाविक जिल्हाधिकार्याचा आदेश पाळू लागले हे पाहून त्या तक्रारदाराचे समाधान झाले. सहा-सात महिन्यानंतर त्याला वेगळेच चित्र दिसू लागले. सारे भाविक त्या अधिकार्याच्या टेबलाखालून दहा रूपयाची नोट देत मंदिरात पादत्राणे न काढताच देवीचे दर्शन घेऊ लागले. इनामराव कोतवाल कपाळवार हात ठेवत म्हणाले, " हे भगवान ! पंचक्रोशीतल्या माझ्याच समाजबांधवानी बांधलेल्या गावदेवीचे दर्शन घेण्यासाठी पैसे द्यावे लागत आहे, मी काय करू आता? " पुन्हा ते जिल्हाधिकार्याकडे गेले व झालेला प्रकार सांगितला. तेव्हा ते जिल्हाधिकारी म्हणाले, " इमानराव कोतवालजी मला तुमच्या चिकाटीचे कौतूक वाटते. मी आता सदाशिव इनामदार नावाच्या अधिकार्याला पाठवितो. ते भाविकांना सुतासारखे सरळ करतील. तुम्ही निश्चींत राहा."
पाच दिवसानंतर ते सदाशिव इनामदार नावाचे सिनियर अधिकारी आपल्या दोन शिपायांना घेऊन गावमंदिरात डेरेदाखल झाले. मंदिराच्या आवारात मंडप उभा केला. मंदिरात येणार्या महिला भाविकांसाठी व पुरूषांसाठी दोन स्वतंत्र रांगा लागतील अशी व्यवस्था केली. आपआपली पादत्राणे काढून ठेवण्यासाठी व्यवस्था उभी झाली. स्वतः इनामदार अधिकारी जातीने लक्ष देऊ लागले. भाविकांना मग ते सरपंच असोत वा तहसिलदार सर्वांना रांगेत उभे राहून आपला क्रमांक आल्यावरच पादत्राणे काढून देवीच्या मंदिरात प्रवेश मिळू लागला. तक्रारदार इनामरावांना आनंद झाला. दोघा-चौघां ग्रामस्थांनी इनामदार साहेबांना लांच देण्याचा प्रयत्न केला पण ते बधले नाही. उलट त्यांनी त्या भाविकांना अर्ध्या दिवसासाठी पोलीस कोठडीची शिक्षा दिली. आपआपल्या कामधंद्यासाठी शहराकडे जाणारे सारे भाविक उशीर होऊ नये म्हणून सकाळी लौकर उठू लागले आणि मंदिरात देवीचे दर्शन घेऊ लागले. एकंदरीत गावकर्यांत शिस्त आली.
चैत्र महिना सुरू झाला. गावदेवी मंदिराचा वार्षिक उत्सव दिवस उजाडला. भल्या पहाटे भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली. ' भाविक हो, सुप्रभात नमस्कार ! आपले सहर्ष स्वागत आहे; चप्पला बाहेर काढा; स्टॅन्डवर ठेवा, आणि पुढे पुढे चला, गप्पा मारू नका, असे आवाहनाची टेप सतत सुरू होती. भाविक पुरूष व महिलांच्या खांद्यावर असलेल्या बालक-बालिकांचे ही चपला बाहेर काढावे लागत होते. पण कोणी नाराजी व्यक्त केली नाही. एका भाविकाचा क्रम लागला. तो अणवाणीच होता. तो घाईने मंदिरात जाऊ लागताच एका हवालदाराने त्याला अडविले, आणि म्हणाले, " अहो काका चप्पल बाहेर काढा आणि मगच दर्शनासाठी आत जा." ते भाविक काका म्हणाले, 'अहो हवालदार , मी चपला घातलेल्याच नाहीत." त्यावर हवालदार म्हणाले," तुमचे हे उत्तर चालणार नाही. तो बोर्ड वाचा, काय लिहले आहे ; चपला बाहेर काढून मंदिरात जा; असेच आहे ना ?" तेवढ्यात तिथे इनामदार साहेब आले. त्यांनी हवालदारांना विचारले, " काय झालं आहे ? " तर हवालदार म्हणाला, " हे काका चप्पल बाहेर न काढताच दर्शन घेण्यासाठी आत जात आहेत. " त्यावर इनामदार साहेब त्या काकांना म्हणाले, "अहो काका, नियम सर्वांना सारखा आहे." त्यावर ते भाविक काका म्हणाले " मी चपला घालून आलेलो नाही. मग मला प्रवेश का देत नाहीत? " इनामदार साहेब म्हणाले तुम्ही घरी जा, चपला घालून या, चपला इथे स्टँन्डवर ठेवा मग देवीचे दर्शन घ्या. " त्यावर ते काका म्हणाले, अहो साहेब, मीच तो इनामराव कोतवाल, ज्याने तुमच्या मोठ्या साहेबाकडे इथले पुष्कळ भाविक चपला न काढताच दर्शन घेतात त्यासंबंधीची तक्रार नोंदविली आहे. त्यासाठी ग्रामपंचायत, तहसिलदार आणि तुमच्या मोठ्या साहेबांच्या कार्यालयात माझ्या चार-पाच खेपा झाल्या आहेत." त्यावर इनामदार साहेब म्हणाले, " याचा
अर्थ तुम्हाला इथल्या अनेक भाविकांपेक्षा कायदा अधिक चांगला कळतो आहे. म्हणून मी सांगतो आहे, तुम्ही घरी जा किवा येथे जवळच चपलांचे दुकान आहे तेथून चपला विकत घ्या आणि दर्शनासाठी या. या पलिकडे मी काही करू शकत नाही." इनामराव कोतवालने आपल्या कपाळावर हात ठेवत वर आकाशाकडे पाहात सर्व भाविकांच्या साक्षीने म्हणाले, " हे देवा, जिल्हाधिकार्याने इथे पाठविलेले पहिले अधिकारी, लोकांना, 'काय द्यायचे ' आहे याचा विचार करा, तसे पैसे द्या आणि मग देवीचे दर्शन घ्या असे म्हणत असत. आणि आता आलेले इनामदार साहेब फक्त ' कायद्याचे ' काय तेवढेच बोलतात. लोकशाही अशीच असते का? "
मित्रहो, ही कथा मूळात छोटीसी आहे. त्यातील पात्रांना नावे देऊन मी रंगविली आहे. ही कथा काॅग्रेसचे सर्वात सनदशीर आणि अभ्यासू असे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कैलासवासी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगिळांनी कुठल्यातरी कार्यक्रमात सादर केली होती. ती मी २५-३० वर्षापुर्वी दै लोकसत्तेत वाचलेली आहे. कायद्याची भाषा सामान्यजनांना समजत नसली तरी साम, दाम, भेद आणि दंड ज्यांच्याकडे आहे अशांना ती अवगत असते. इंग्रजीत म्हटले जाते ' A smile speaks every language त्याच प्रमाणे राजकारणात ' An influential man speaks every language असेच समजावे. सनदी अधिकारी, राजकीय नेते, वकील, मिडीया, आणि जागोजगी असलेले अंडरवल्ड जगतातील मंडळी इत्यादींचे कायदा फारसे काही बिघडवू शकत नसतो. म्हणून कायद्याचे राज्य या विषयावर चर्चा म्हणजे कायदा या विषयासंबंधी कमी पण मध्यस्थांचे व्यवहार आणि वर्तन यावर अधिक चर्चा असते हे गृहीत धरून आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. तुर्तास आज मी इथेच थांबतो.
नमस्कार म्हात्रेजी.
उत्तर द्याहटवाज्वलंत विषय निवडला आहे, धन्यवाद.
यावर पुर्वद्वेष बाजुला ठेऊन मुद्दे आधारीत चर्चा होण्याची आवश्यकता आहे. ती होतांना दिसत नाही व तथा कथित बुध्दिवादी व हताश विरोधक गैरहेतुने सरकारला येनकेन प्रकारेण, शाहीन बाग समान बेकायदेशीर पध्दतीने या तथाकथित आंदोलनाचा वापर करुन बदनाम करु पहात आहेत.चार गोष्टी प्रामुख्याने दिसतात
१ हे आंदोलन अखिल भारतीय नाही
२ या मध्ये धनवान, ज्यांना नवीन सुधारणांनी आर्थिक तोटा होणार आहे, अशांनी केलेलं प्रायोजन
३ अजुनही, सरकारने न केलेला बळाचा वापर- शाहीन बाग वेळी सार्वजनिक रस्ते न अडवण्याची सर्वोच्च न्यायालयानी केलेली टीप्पणी असुनही.
४ सर्वोच्च न्यायालयाची, वरील टीप्पणी प्रतिकुल तटस्थता.
योग्य विषय हाताळल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद बिवलकरजी !
उत्तर द्याहटवा