रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? (भाग-१)

 

आपल्या महाराष्ट्रातील मविआ सरकारचा कारभार पाहून सरकारचे  डोके ठिकाणावर आहे का असा विचार असंख्य मतदारांच्या मनात येत आहे. त्याचे प्रत्यतंर अर्णव गोस्वामीच्या पाठीमागे उभे राहण्याची जी सह्यांची मोहीम सुरू झाली आहे तिला जनसामान्यांचा दर दिवशी वाढत असलेल्या प्रतिसादावरून येत आहे. केवळ अर्णव गोस्वामीचा छळ होत आहे म्हणून या लेखाचे प्रयोजन नाही. आम्ही रोखठोक ,आम्ही वाघ, आमची भाषा मराठी, आम्ही मराठी लोकांचे हितचिंतक, आमची मुंबई अशा घोषणाबाजी करून राजकारणात ज्या मंडळीने गेली कित्येक वर्षे  एक नाटक कंपनी सुरू केली आहे, अशांनी सुडाचे राजकारण सोडून जरा सबूरीचे, सभ्यतेचे, शुचीतेचे राजकारण करावे हे या लेखाचे प्रयोजन आहे.

हा लेख लिहीण्याचा विचार मनात आला तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या कामाची पद्धत, त्यातून आलेले अपयश,  सरकारची हम करें सो कायदा ही वृत्ती,  विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्या संबंधीचे सरकारचे दुटप्पी धोरण, इत्यादी बाबीवर चर्चा करताना, ब्रिटीश राजवटीतील लोकमान्य टिळकांची पत्रकार व संपादक म्हणून भूमिका,  ' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क '  या सिंहगर्जनेचा व्यापक अर्थ (विद्यमान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी  दसर्याच्या मेळाव्यात शिवसैनिकांसमोर केलेल्या वाघाच्या डरकाळीशी तुलना करून काढलेला) आणि १९७५ सालची आणिबाणी इत्यादी विषयांना स्पर्श करता करता लेखाचा विस्तार होईल असे वाटले. म्हणूनच या लेखाचे दोन भाग करावे लागत आहे हे प्रांजळपणे मान्य करतो.  लेखाची सुरूवात अर्थातच गेली सहा वर्षे नव्हे तर गोध्रा हत्याकांडा नंतर सतत विरोधी पक्षांनी (पुर्वीचे दिल्लीतील सत्ताधार्यांनी ) टिकेचे लक्ष्य केलेले, व अनेक खोटे-नाटे आरोप करीत ज्यांचावर केसेस दाखल केल्या, भूकेपोटी तासन तास उलटतपासणी घेत  छळ केला, आणि आज ही तसाच मानसिक त्रास ज्यांना विरोधी पक्ष सकाळ पासून ते रात्री झोपेपर्यंत देत आहेत असे बिहारमधील निवडणूकीतले मॅन ऑफ द मॅच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या राजकारणातील स्थानासंबंधीचे थोडेसे प्रास्ताविकाने करतो.

देशाच्या राजकारणात एखाद्या राजकीय नेत्याला विकास पुरूष म्हणून उपाधी मिळण्याचा सर्वात पहीला मान मिळाला तो विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच.  गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव देशभर प्रसिद्ध झाले. याचे कारण गुजरात मध्ये वाढत्या उद्योगाला लागणारा  कामगार वर्ग देशभरातून आलेला होता. त्या कामगारांच्या कुटुंबियानां आपआपल्या मुलातर्फे गुजरातवरून मनीआर्डरने किंवा मनी ट्रान्सफरच्या नवीन तंत्राद्वारें दर महिन्याला येणार्या पैशामूळे ' अच्छे दिन आयेगे ' या आश्वासानात दम वाटला व तो दम अजूनही आहे. स्वच्छ, पारदर्शक व गतिमान प्रशासनच्या बळावर प्रगतशील गुजरातचे नाव जगभर पसरले होतेच. इतर विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री झोपा काढीत होते तेव्हा मुख्यमंत्री मोदी दिवसभर उसंत न घेता काम करीत होते. म्हणून भाजपाने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीचे नाव जाहीर करताच लाट निर्माण झाली. हे यश मिळविण्यात अनंत अडचणी युपीए सरकराने निर्माण केल्या तरी ते डगमगले नाहीत. आज ही विरोधी पक्ष हेच काम करीत आहे. आपले मविआ सरकार या कामात अग्रेसर आहे. मुखीं उदारमतवादी व पुरोगामीच्या गोष्टी आणि सरकारचा कारभार मात्र दळभद्री  याहून आपल्या मराठीचिया नगरीतील समाजाची अधिक नामुष्की कोणती असू शकेल? आजच्या घडीला ज्या राज्यात भाजपेतर पक्षांचे सरकार आहेत त्यातील सर्वात कुठल्या सरकारचा  पाठीचा कणा अधिक वाकल्यामूळे कुबड्याचे सरकार म्हणता येईल तर ते म्हणजे दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार होय. 

पाठीचा कणा वाकला की शरीर कुबडे होते. चालताना पाय वाकडे पडतात ; पाय वाकडे पडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीराचा तोल सांभाळता येत नसल्यामूळे ; शरीराचा तोल सांभाळण्याचे काम मेंदू करतो ; मेंदूत घाण साचली की तो ठिकाणावर राहात नाही. पाठीच्या कणा म्हणजे मेंदूतून मानेच्या पाठीमागून थेट शरीराच्या मुलाधार चक्रा पर्यंत पोहचणारा स्नायू. अथर्वशिर्षामध्यें गणपतीचे वर्णन ' त्वम मुलाधारोस्थितीसी नित्यम् ' असे आहे. शरीरात गणपतीची शक्ती म्हणजे बुद्धी. तसेच ते मूलाधारचक्र. बुद्धी अस्थीर झाली की,जे अपगंत्व येते ते एखाद्या अपघाताने येणार्या अपंगत्वापेक्षा कैक पटीने अधिक असते. मेंदु अस्थिर होतो तेव्हा आपले डोके ठिकाणावर राहात नाही.

ब्रिटीश सरकारने देशातील प्लेगच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी जनतेची केलेली छळवणूक ' रोगापेक्षा उपाय अधिक भयावह ' ठरत जात होते. ब्रिटीश अधिकारी कसली ही तपासणी न करता दिसला पेंशट की तो प्लेगचाच, असे समजून धरपकड चे सत्र सुरू केले. ते पाहून लोकमान्य टिळकांची आग मस्तका पर्यंत पोहोचली.  दुसर्या दिवशी लागलीच आपल्या केसरी मधून ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ' असा ठणकावणीच्या भाषेत अग्रलेख लिहीला. समाजावर होणार्या अन्यायासाठी कायद्यानुसार ब्रिटीश सरकारशी दोन हात करण्याची पद्धत म्हणजे अग्रलेख. पण आपण पडलो गुलाम. आपल्याला कारावास भोगावा लागणार हे ठाऊक असूनही टिळकांनी पत्रकार, संपादकांच्या भुमिकेला न्याय दिला याला म्हणतात पत्रकारीता. नाहीतर आमची आजची पत्रकारीता. सामना वृत्तपत्रात कोरोना संबंधी बातम्या कमी, कारण महाराष्ट्रातले सरकार आपल्या बापाचे मग टिका करावयाची नाही. शेतकर्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष. वादळी पावसाच्या तडाख्यांत सापडलेल्याबद्दल सहानुभूती व्यक्त करावयास वेळ नाही. लाॅकडाऊन बाबतीत निर्णय घेण्यात पक्षपात. जेथून काही द्रव्य हाती येते का असा हिशोब मांडून धोरण आखले जात आहे. जोडीला एक मोठं काम हाती घेतलं आहे. फक्त मोदी सरकारवर वर टिका करणे  आणि मोदी सरकारच्या कार्याची महती सांगणार्या संपादक, चॅनेल्सशी भांडण करण्यात हे सरकार गुंतले आहे. तरी स्वतःची रोखठोक म्हणत पाठ थोपटून घेण्याची खाज ही सुटत नाही. लोकशाही राज्यातील पत्रकारिता ही अशी असावी काय?  पुर्वीच्या राजेशाहीतील ही आधुनिक भाट मंडळी. पण तिथे निदान राजा व भाट भिन्न व्यक्ती होत्या. पण महाराष्ट्रातल्या घराणेशाही पक्षात राजा ही तोच व पत्रकार ही तोच. संपादक ही तोच. म्हणजे राजाचा भाट ही राजाच. म्हणून वाटते कुठच्याही राजकीय पक्षाला वर्तमानपत्राच्या व्यवसायाचे लायसन्स मिळता कामा नये.

आज महाराष्ट्रातील मविआ सरकारला कोरोनाच्या साथीवर नियंत्रण आणण्यात इतर राज्याच्या तुलनेत यश फारच कमी मिळाले आहे.  कोरोनाच्या साथीच्या सुरवातीला (फर्स्ट स्टेजला) दिल्लीतील एम्सच्या एका अधिकार्याने पत्रकार परिषदेत म्हटले होते की  " कोरोनो साथीत जे काही ५ टक्के रूगण दगावले आहेत त्यातील काही जेष्ठ नागरिक तसेच काही रूग्णाला रूग्णलयात उशीरा दाखल केल्यामूळे होत आहे." कोरोनाचा संसर्ग  शिघ्र गतीने होत असल्याने कोरोना बाधीत रूग्णाला काॅरन्टाईनवर (विलगीकरण ) ठेवणे हा वैद्यकीय उपचाराचा एच भाग आहे असे केंद्र सरकारकडून वारंवार सांगितले जात होते. पण विलगीकरण करण्याचा उपाय समाजाला पचायला जड जात होता. जुन्या काळात कुष्ठ रोग्यासंबंधीची जी मानसिकता होती त्या मानसिकतेचं पुनरागमन झाल्यामूळे कोरोनाची लागण झाली तरी त्याची माहिती दडविण्याचे प्रकार घडले जात होते. पण नंतर केंद्र सरकारने या रोगाची भिती बाळगू नका, कोरोनाच्या बाधेसंबंधीची माहिती दडवू नका, असा संदेश वारंवार दिला गेला आणि मग कोरोना रूग्ण स्वतःहून रूग्णालयात दाखल होऊ लागले. पण ९० टक्के कोरोना रूग्णांना हाॅस्पीटलात जागा नाही असे उत्तर ऐकायला मिळते, मग दुसर्या हाॅस्पीटलाचा शोध. तिथे ही तसेच उत्तर. जिथे मिळाला प्रवेश ते खाजगी हाॅस्पीटल. बस लुटारूंची सोय झाली असेच म्हणू या. रूग्णाची बिलं सरासरी तीन ते चार लाखाच्या पलिकडे. खरें रूग्ण किती आणि किती रूग्ण लूटले गेले याचा शोध कोण घेणार? त्यांच्या वतीने आवाज कोण उठविणार ? पत्रकार व संपादक मंडळीनीच शोध  घ्यायला हवा आणि आवाज उठवयाला हवा ना ! पण
' India wants to know ' असा स्पष्टपणे सरकारला जाब विचारणार्या अर्णव गोस्वामीचा या ना त्या प्रकारे ठाकरे सरकार छळ करीत आहे. म्हणूनच कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या सुपूत्राचे सुशांतसिह राजपूतच्या आत्महत्येसंबंधीत काहीतरी धागेबंधे असावेत का अशी शंका जनमानसात उत्पन्न झालेली दिसते. लोकशाहीमध्ये लोकांच्या मनात येणार्या शंकेला साक्षात ब्रम्हदेव ही बंदी आणू शकत नाही, आणि त्यांच्या शंकेचे सत्ताधार्यांना निरसन करता आले नाही की मग सत्ताधारी पक्षाला उतरती कळा लागते. तसे पाहता मविआ चे घटक पक्ष सत्ताधारी नाहीतच. जनतेने लाथाडलेल्या पक्षांनी चोरून सत्ता मिळविली आहे. सत्ता म्हणजे संपत्ती. स्वतःच्या कष्टाने कमाविलेली संपत्ती आणि चोरून आणलेली संपत्ती यात फरक असतो. चोरून आणलेली संपत्ती आपल्या मनाला टोचत असते. सतत भिती वाटते. त्यातून सहज प्रवृत्तीचे रूपातंर विकृतीत होत जाते.

अट्टल गुन्हेगाराच्या उलट्या काळजाच्या कोपर्यातही कुठेतरी जशी  माणूसकीची इवलिशी मंद ज्योत तेवत असते, तशी संवेदनशिलता, सत्ताधारी पक्षात असावी की नाही? निदान मुख्यमंत्र्यांत तरी असावी की नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री विसरून जावे व देशाचे पंतप्रधान आहेत हे समजून काम केले पाहिजे अशी खोचक टिका तुम्ही करीत होतात ना आणि आजही करीत आहात ना? पंतप्रधान मोदी आपल्या वडीलांनी काढलेल्या पक्षांचे राजकीय वारस म्हणून राजकारणात आलेले नाहीत. स्वतःच्या मेहनतीने ते भाजपाचे सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत पंतप्रधानपदावर विराजमान झाले आहेत. म्हणून अर्णव गोस्वामीच काय, राजदिप सरदेसाई आणि शेखर गुप्ता सारखे विरोधी विचारसरणीची संपादक मंडळी ही मान्य करतात आणि म्हणत आहेत ' Today there is no leader in India who can match with Mr Narendra Modi.'  पण हे सांगून उपयोग काय 
होणार ? ऐकण्यार्याचे डोके ठिकाणावर असले पाहिजे की नाही ?

माणसाचे डोके ठिकाणावर नसले की त्याचा प्रवास विकृतीकडे सुरू होतो. माणूस तीन वृतीचा बनलेला असतो. त्या तीन वृत्तीचे नावे आहेत. संस्कृती, प्रवृत्ती आणि विकृती. सृष्टीच मूळी तीन गुणांची बनलेली आहे. त्या तिन्ही गुणांच्या वैशिष्ट्यांतून वृत्तींची निर्मिती झाली असावी. सत्व गुणाने संस्कृती,  राजस गुणाने प्रवृत्ती तर तम गुणाने विकृती. मूलतः माणूस जन्मतःच सहज प्रवृत्तीचा असतो. सहज प्रवृत्तीतून सततच्या प्रयासाने, संस्कृतीकडचा (सत्वाकडे) प्रवास करता येतो. पण त्यासाठी प्रवृत्तीवर संस्कार घडवावे लागतात. उपनिषधात म्हटले आहे,  ' संस्कारः एकमेव धनम् न क्षीणं जायते | ' पण प्रवृत्तीवर संस्कार घडले नाही तर विकृतीच्या म्हणजे अधोगतीच्या वाटेवर जाणे आले. नंतर मग तुम्ही कितीही संस्कार करावयाचा प्रयत्न केला तरी त्याचा फायदा होत नाही. सत्ताधिशांच्यातील विकृती हातातील सत्तेमूळे पाशवी वृत्ती होते. जागतिक इतिहास हेच सांगतो. अशा स्थितीत माणूस पोहचला कि म्हटले जाते ' विनाशकाले विपरित बुद्धी.'  महाराष्ट्रातले वर्तमान सरकाराची कारस्थानें पाहाता या सरकाराचा प्रवास विनाशाकडे सुरू झालेला दिसतो.

माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीनी न्यायालयाचा निर्णय झुगारून स्वतःची सत्ता वाचविण्यासाठी १९७५ साली देशात आणिबाणी आणली, अभिव्यक्ती स्वातंत्र्य खलास केले, बळजबरी लोकांना कारावासात पाठविण्याचे सत्र सुरू केले होते. तेव्हा सर्वोदयवादी जयप्रकाश नारायणांच्या मुखांतून   ' विनाशकाले विपरीत बुद्धी ' हेच वाक्य बाहेर पडले होते. शेवटी जयप्रकाश नारायणाच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या जनता पक्षाने १९७७ सालच्या निवडणूकीत श्रीमती इंदिरा गांधीचा तसेच त्यांच्या सरकारचा पराभव केला.

( कृपया भाग २ वाचावा ) 

२ टिप्पण्या:

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...