रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेशू कदाचन | (भाग १ )

 


भगवद्गीतेचा मी काही मोठा अभ्यासक नाही. माझी बुद्धी तशी यथातथाच. म्हणून माझी गीतेवरील श्रद्धा बौद्धिक प्रामाण्यावर आधारलेली नाही. ती भोळी भाबडीच. मागे मी ५ मे २०१८ ला  तस्मात उत्तीष्ठम् कौंतेय युध्दनिश्चयः | व ३ जूनला चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः| या दोन श्लोकांवर चर्चा केली आहे. तब्बल दोन वर्षानंतर मी भगवद्गीतेतील एका श्लोकावर चर्चा करावयास बसलो आहे. यावरूनच सिद्ध होत आहे की मी अध्यात्म क्षेत्रातला एक सामान्यातला अति सामान्य असा विद्यार्थी आहे.

अलिकडे ' मृत्यु सुशांत पण महाराष्ट्र सरकार का अशांत' या लेखात चंदेरी दुनियात आपलं नशीब उजळ्याचे स्वप्न पाहात मुबंईत आलेल्या युवक-युवतींची कशी फसगत होते, त्यातील अनेक जण नैराश्याच्या गर्तेत कसे जातात यावर चर्चा करीत ' सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे म्हणून कुठेतरी Level of ambition and level of satisfaction यामध्ये सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करणें गरजेचे आहे.' असे मी म्हटले आहे. मी एलआयसीत विकास अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतांना,  एजंटांशी व्यवसाय वृद्धीच्या संदर्भातील चर्चेत अनेक वेळा वरील वाक्यावर भर देत असे. या वाक्यावर भर देण्याचा माझा दृष्टोकोण स्पर्धेच्या नशेत आपल्या आरोग्याची हेडसांळ होऊ नये असाच होता व आज ही तसाच आहे. कारण शरीर माद्यं खलू धर्मसाधनः हा ऋषीमूनीनी दिलेला सल्ला मानावा हा हेतू होता. शरीराची हेडसांळ झाली की आजारपण येते. त्यातून औषधोपचाराचा खर्च, अशक्तपणा येतो आणि सक्तीची विश्रांती येते. त्यामूळे व्यवसायासाठी उपलब्ध असलेला वेळ निष्कारण खर्ची पडतो. शेवटी Time is money किंवा Time is the best  natural resources, the God has given to the man हे विसरता येत नाही.' समय बहुमूल्य है, पर जीवन अमूल्य है' असे वाक्य राष्ट्रीय महामार्गावर लिहीलेले असते, ते तर त्रिकालातीत सत्य आहे यावर माझी श्रद्धा आजही कायम आहे. पण Level of ambition and level of satisfaction मधील सुवर्णमध्य काढा असे फक्त बोलायला सोपे आहे हे सतत जाणवते. हिंदीमधील प्रख्यात साहित्यीक प्रेमचंदजीचे एक वाक्य आठवते, ' दुसरोंको उपदेश देना कितना सहज और सरल है ! ' ते मला ही लागू पडते याची जाणीव मला एलआयसीच्या सेवेत असतानाच होत असे. ती आज ही कायम आहे.

शेवटी श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय २ श्लोक क्रमांक ४७
' कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेषू कदाचन '  या श्लोकात वरील प्रश्नाचे उत्तर सापडते का ते पाहू या असे ठरले. म्हणून हा श्लोक चर्चा करण्यासाठी निवडला. प्रयत्न करणे हे आपल्या अधिकारात आहे असे भगवंताने म्हटले आहेच की !  शिवाय या श्लोकावर चर्चा करणे हे काही दृष्कृत्यं तर मूळीच नाही. मग भय कसले? इथेच चर्चेला सुरूवात करणार होतो पण लक्षात आले की, भय आहे पण ते लेखाचा विस्तार वाढेल यासंबंधीचे. म्हणून या चर्चेचे छोटे  भाग करता येतील का असा विचार केला तेव्हा उत्तर सापडले. या श्लोकाचे भाग पाडता येतात हे ध्यानात आले.  कर्मण्येवाधिकारास्ते यावर प्रथम चर्चा केली की पहिले दोन भाग होतील. मग मा फलेषू कदाचन याकडे वळता येईल.  प्रत्येक कार्याला निवृत्ती आणि प्रत्येक जीवाला मृत्यु हे अंतिम सत्य योगेश्वराने सांगितले आहेच, म्हणून लेखात काही त्रूटी राहिल्या तर त्या परम योगेश्वराकडे सोपवितो. 

प्रथम कर्म म्हणजे काय  यावर चर्चा करणे आवश्यक आहे. प्राथमिक शाळेत असताना आम्हाला मराठीच्या पुस्तकात मी कोण? असाच काहीसा धडा होता आणि त्यात खालील वाक्ये व प्रत्येक वाक्या समोर माणसाचे चित्र. पण प्रत्येक वाक्याच्या समोरच्या माणसाचे चित्र भिन्न दाखविलेले होते.
१)चाक फिरवितो गरागरा मडकी बनवितो भराभरा मी कोण?
२)कापड घेतो, कात्रीने कापतो, दोरा घेतो, कपडे शिवतो मी कोण?
3) लाकूड घेतो, करवितेने तुकडे करतो नंतर ते तुकडे जोडतो, टेबल खुर्ची कपाट बनवितो मी कोण?
पुढे, अशाच प्रकारची प्रश्नात्मक वाक्ये व प्रत्येकाच्या समोर  दाखविलेल्या चित्रावरून त्याचा वर्ण वा व्यवसाय ओळखावयाचा. एकंदरीत कुंभार, शिंपी, सुतार, लोहार, शेतकरी, या सर्वांची कामे कोण कोणती आहेत हे बालवयात समजले होते आणि स्मरणात ही आहे. पण कर्म हा शब्द कुठे काही कोणाच्या वाट्याला वाईट प्रसंग आल्यावर ' हे ज्याच्या त्याचा कर्माचे फळ, भोग आता ' अशी वाक्ये समज आल्यावर सर्वत्र ऐकू येऊ लागली.  तेव्हा कर्म याचा अर्थ समजला. पण वाईट कृत्य इथपर्यंतची ती मजल. आणखिन समज वाढली आणि पुढे भगवद्गीता अर्था सकट वाचायला लागल्या नंतर कर्माचा व्यापक अर्थ थोड्या फार प्रमाणात समजू लागलो.

सोप्या व साध्या शब्दात, कर्म म्हणजे आपल्या पोटापाण्यासाठी प्रत्येक मनुष्याने केलेला उद्योग. हे उद्योग भिन्न भिन्न असतात. त्यालाच आपल्या संस्कृतीत वर्णव्यवस्था असे म्हटले जाते. ही जातीव्यवस्था नव्हती. त्यात दोष निर्माण झाले. हे मान्य पण समाजबांधवात प्रयत्न पुर्वक  समरसतेचा भाव जागृत करीत राहिलो तर कालाऔघात ते दोष निघून जाऊ शकतात. त्यावर स्वतंत्र चर्चा केलेला ' अस्पृशता एक बडी भूल ' २९ आक्टोबर १९१८ ला पब्लीश केलेल्या लेखात वाचता येईल. असो. 

शालेय पुस्तकातील त्या धड्यावरून कुंभाराचे कर्म  मडकी बनविणे, शिंपीचे कर्म कपडे शिवणे, हे बालपणापासून मनात ठसले आहे ते आज ही पुसले गेले नाही ही सुद्धा त्या योगेश्वराचीच कृपा. प्रत्येक माणसाला कर्म हे जन्मतः चिकटलेले असते. सुताराचा मुलगा सुतार बनतो, शेतकर्यांचा मुलगा शेतकरी होतो, वाण्याचा मुलगा वाणी, डाॅक्टराचा मुलगा डाॅक्टर अशी लांबलचक यादी बनेल. आजच्या विज्ञानाने माणसाच्या शरीराच्या जीन्सचा अभ्यास केल्यावरून ही यादी तयार झाली असे आपण मानतो.  ते खरे आहे. व्यवसायावरून आडनाव ही जोडले गेल्याची उदाहरणे विद्यमान आहेत. व्यवसायिकांच्या पितरांच्या पिढ्या म्हणजे मुळ कूलपुरूषापर्यंत आपण मागे गेलो तर आपल्या लक्षात येते की व्यवसायाची दृष्टी ही सृष्टीतूनच प्राप्त झालेली असते. चातुर्ण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः या लेखात मुलतः सृष्टी विविधतेने नटली आहे तसेच Imbalance is the feature of universe या शाश्वत सत्यावरच या विश्वाचा प्रचंड पसारा सुस्थितीत आहे, असे मांडले आहे. त्या विश्वाचा आपल्या कल्पनेपलिकडे असलेला पसार्याचे वैशिष्ट असे आहे की पंचमहाभूतांचे स्वरूप भिन्न; सर्व ग्रहांच्या कक्षा, गती, आकार, गुरूत्वाकर्षण भिन्न आहे. तरीही तो पसारा सुस्थितीत आहे. आपण तो लेख वाचू शकता. एकंदरीत वर्गरहीत समाजव्यवस्था ही कल्पना फक्त कागोदपात्री राहते. बळजबरीने वर्गरहित समाज निर्माण करणे हे निसर्गालाच मानवणारे नाही. हा मुद्दा पटविण्यासाठी मी त्या लेखात सविस्तर लिहले आहे. तरी इथे सारांश रूपाने मांडले की व्यक्ती तितक्या प्रकृती, जशी दृष्टी तशी सृष्टी  इत्यादी Laws of nature वरून कर्म म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहचण्यास मदत होईल असे वाटते.

पहीले उदाहरण आपण भूमातेचं घेऊ या.  या पृथ्वीवर माणूस जन्माला येण्या अगोदर पर्वत, नद्या, जंगल, डोंगर वृक्ष वेली उगवलेल्या असाव्यात.  जमिनीतून अन्न मिळते हे ज्यांच्या लक्षात आले, त्यांना बी-बियाणे पेरून तांदूळ, गहू इत्यादीचे पीक काढण्याची बुद्धी लाभली ते शेतकरी झाले. ज्यांनी जमिनीत पावसाचे पाणी मुरते हे लक्षात आले त्यांनी विहीरी खणल्या. हे खोदकाम करताना जिथे जमिनीतून खनीज कोळसा धातू इत्यादी वस्तु आढळल्या तेव्हा त्यांच्या बुद्धितून खाण उद्योग (माईनिंग), लोखंड, हिरे, स्टील घडविणारे व्यवसायी बनले.  भाताचे पिक काढले की ते साफ करावेसे वाटले ते साफसफाईच्या उद्योगात शिरले. म्हणजे भात -गहू गिरण्याचा व्यवसाय करणार्यांचा वर्ग निर्माण झाला. माणसाच्या गरजोपयोगी वस्तूंची निर्मिती सुरू झाली की, वाटप व्यवस्था आली, ग्राहक तयार झाले मग विक्री आली.  वाटप, विक्रीचा विचार वा कल्पना मनात ज्यांच्या मनात रूजल्या ते ट्रक ओनर्स, व्यापारी झाले. ज्यांना डोंगर नद्या, पर्वत, पाहून मनात मुर्तीमंत पावित्र्य साकारले ते तत्वज्ञानी, कवी, लेखक मंडळी म्हणून नावारूपास आली.  प्रत्येक व्यक्तीत बुद्धीची पातळी तसेच कल्पना शक्ती भिन्न स्वरूपाची असते. ही सृष्टीचीच करामत.म्हणून  जशी दृष्टी तशी सृष्टी. पण या ही अगोदर जशी बुद्धी तशी दृष्टी हा ही एक नैसर्गिक नियम असावा. कारण डोळ्यांनी आपण जे पाहातो ती नजर असावी जेव्हा बुद्धीची साथ मिळाली की दृष्टी बनते. म्हणजे सामान्यजनांकडे असते ती. त्यापुढची दुरदृष्टी. तिथे फार मोठे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर महाजनांपासून ते महामानव, ऋषीमुनी, महर्षी, देवर्षी, विभूती, अवतारी पुरूष मग प्रत्यक्ष ईश्वराची रूपे विराजमान असतात. बुद्धीमत्तेचं हे एक विश्व.  पण याचा अर्थ असा नाही की जन्मतः दृष्टहीन समाजबांधवांना बुद्धी वापरता येत नाही. दिव्यांग समाजबांधवात इतर इंद्रियात शक्ती निसर्गच जन्मतः अधिक देत असतो. ते स्पर्शाने तसेच अव्यक्त शक्तीतून ही सृष्टीचे चित्र रेखाटत असतात. सर्व मानवजात एकाच कल्पनेने व एकाच पद्धतीची बौद्धिक पातळीची असती तर मानवी जीवन प्रगत झालेच नसते. विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनचे एक वाक्य मला फार भावले आहे, ते वाक्य असे आहे, Imagination is more important than knowldge. अगदी ईश्वराची कल्पना भिन्न असल्यामूळे धर्म सांप्रदाय निर्माण झाले. आपल्या आकाशगंगेतील  सुर्य एकच आहे. पृथ्वी एकच आहे. पृथ्वी कधीपासून स्वतःभोवती व सुर्याच्या भोवती फिरू लागली याचे खास ज्ञान मानवाला झाले असे म्हणता येत नाही. आपण अनुमान काढले आहे. त्यातून दिवस-रात्र चक्रानुसार आपण आपल्या सोयीसाठी  पौर्वात्य व पाश्चीमात्य देश  अशी जगाची विभागणी केली की नाही. पण हे सर्वभेद म्हणजे सृष्टीचे सौंदर्य आहे. ' मेळवूनिया पंचमहाभूताचा मेळ, अंबे त्वा रचिला ब्रम्हांड गोळ ' अशी अंबामातेची आपण स्तुती करतो, त्या अंबामातेच्या विविध रूपातली ही विविधता आहे. पण त्यात मेळ आहे. सुर्य म्हणजे तेज. समुद्राच्या (आप) पाण्याची वाफ करतो, आकाशात ती वाफ साठली जाते. ते आकाश एक पंचमहाभूत,  त्या समुद्राच्या पाण्याचे वाफेचं  ढगात रूपातंर करताना खारट पणा काढते. कसे ते फक्त ईश्वरालाच ठाऊक. मग वायु त्या ढगांना घुसळवितो आणि वर्षा ऋतूत पिण्यायोग्य जलाचा वर्षाव होतो. जमीन ( पृथ्वी- धरणीमाता ) पाणी घेते व आपल्या अन्न देते. पंचमहाभुतांमध्ये परस्पर सहकार वा कोआर्डीनेशन विराजमान असेल तर मानवजातीत भिन्न व्यवसाय वा विभिन्न रूप, बुद्धी , भाषा भिन्न असली तरी सहकाराच्या तत्वावर मानवी जीवन संघर्ष रहीत राहू शकते. मुंबईतील हिर्याचे बाजार केंद्र म्हटल्या जाणार्या पंचरत्न इमारतीच्या दर्शनी भागावर एक वाक्य कोरल ' Path of co-operation is so narrow that an individual and the society can not walk on it.' इथे थोडसं विषयातंर झाले पण ते आवश्यक होतं त्यामूळे कर्म म्हणजे काय तर स्वधर्म इथपर्यंत आपण पोहचलो. स्वधर्म म्हणजेच भौतिकदृष्ट्या प्रकृतीच्या (सृष्टीच्या) गुणांच्या (सत्व, रज, तम) प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक व शारीरिक स्थितीला अनुसरून आलेले कर्म. स्वभावतः उत्पन्न होणार्या कर्मात प्रवृत्तं होण्याची क्षमता असा ही अर्थ निघतो.  म्हणूनच श्रीकृष्णाने अर्जूनाला पुढे ' स्वधर्में निधनं श्रेयः परधर्मो भयावहः' असा उपदेश तिसर्या अध्यायात ३५ व्या श्लोकात केला आहे.

आपण या भागातील  कर्माचा अर्थ, जगाचे व्यवहारी रूप डोळ्यासमोर ठेवून काढला आहे. पण भगवान श्रीकृष्णाने  अध्याय ३ मध्ये  यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्भबन्धनः असे म्हटले आहे. भगवान श्रीविष्णूला संतोष मिळावा म्हणून जे कर्म केले जाते त्याचे नाव यज्ञ आहे. ते तू कर असे म्हटले आहे. असे न केले तर(अन्यत्र) ती कर्मे भौतिक जगात बद्ध करतात. म्हणजे चांगल्या व वाईट, दोन्ही प्रकारच्या कर्माना आपआपली फळे असतात. वर चौथ्या परिच्छेदात, ' मग भोग आपल्या कर्माची फळे असे सर्वत्र ऐकू येते ' असे जे मी  म्हटले आहे, तिथेच आपण परत आलो आहोत.  आपल्या चर्चेने वर्तुळ पूर्ण केले आहे. म्हणजे ही चर्चा थांबविण्याची वेळ आली आहे असे वाटते. कारण आपली चर्चा भले अध्यात्मिक विषयावरील असली तरी त्यातील गोडी  Law of diminishing utility नुसार कमी होत जाईल. म्हणून इथे थांबाव असे वाटले. पण त्या अगोदर माझ्या वाचनात आलेली एक कथा जिचे शिर्षक ' कर्म ' आहे ती सादर करून या लेखाची समाप्ती करतो.
               --- कर्म ---
एकदा एक राजा हत्तीवर बसून आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता. फिरता फिरता एका गावातील दुकानासमोर राजा थांबला. प्रधानाला बोलावून म्हणाला, ' का कोण जाणे मी या दुकानदाराला कधी पाहिले नाही पण मला या दुकानदाराला फाशी द्यावे असे वाटते. प्रधान बुचकळ्यात पडला. तो काही बोलायच्या अगोधरच राजाची स्वारी पुढे निघून गेली होती. प्रधानाने ते दुकान बघून ठेवले. दुसर्या दिवशी प्रधान त्या दुकानापाशी जातो. दुकानात त्या दुकानदारा शिवाय कोणी नव्हतं. प्रधानाने आसपासच्या गावकरी मंडळीशी चौकशी करता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले. प्रधान त्या दुकानात जातो. दुकानदाराकडे सुवर्ण वर्णाचे सुगंधी वासाचे उच्च प्रतिचे चंदन होते. मात्र कोणी खरेदीदार नसल्याने तो वैतागला होता. चौकशी करता कळले की लोक नुसते दुकानात येतात वास घेतात आणि दर ही न विचारता निघून जातात. म्हणतात ना, ' रिकामे मन सैतानाचे घर ' मग काय त्या दुकानदाराला बर्याच वेळा राजाला मरण यावे असे वाटत होते. राजा वारला की परिसरात दुसरे चंदनाचे दुकान नसल्याने राजाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोठ्या प्रमाणात चंदनाची खरेदी होईल आणि चार पैसे हातात येतील.

आपल्या राजाला त्या अनोळखी दुकानदाराला का फाशी द्यावी असे वाटत होते याचा उलगडा झाला. प्रधानाने थोडे चंदन खरेदी केले व राजमहलात परतला, आणि राजा दरबारात येण्याअगोदर प्रधानाने ती चंदनाची पुडी सिंहासनाच्या समोर ठेवली. राजाने ती पुडी उघडून पाहिले तेव्हा राजा त्यातील सुवर्ण वर्णाचे चंदन व त्याच्या सुगंधाने मोहीत झाला. राजाने प्रधानाला विचारले '' कोठून हे चंदन आणले? ' प्रधानाने त्या दुकानदाराचे नाव व गावाचं नाव व रस्त्याचे नाव म्हणजेच, काल रस्त्यात पाहिलेल्या दुकानाचे नाव सांगितल्यावर राजा म्हणाला  ' अरेरे, काल मला उगीच त्या दुकानदाराला फाशी द्यावीसी वाटती. राजाने प्रधाना मार्फत त्या दुकानदाराला सुवर्णमुद्रा दिल्या. हळू हळू राजा आपल्या भेटीला येणार्या अनेक लोकांना चंदनाची भेट देऊ लागला. त्यामूळे त्या दुकानातून मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी करू लागला. आता त्या दुकानदाराला राजा दिर्घायु होवो असे वाटू लागले. राजा व दुकानदाराशी चांगली मैत्री झाली.

आपल्या मनात इतरांविषयी चांगले विचार व दयाळूपणा आणला तर इतरांच्या ही मनातून ही चांगल्या भावना आपल्या पर्यंत येतात व आपला उत्कर्ष होतो.आपण जे देतो तेच परत आपल्याकडे येते. मग कर्म म्हणजे काय,  विचार हेच खरे कर्म. 

आपल्याला ही कथा आवडली असावीच. जसा विचार तसा आचार व जसा आचार तसा आपल्या जीवनाला आकार येत असतो. त्यातून निरपेक्ष भावनेने कर्म करणे शक्य होत असावे. मला वाटतं, हेच ते उच्च कोटीचे कर्म असावे जे श्रीकृष्णाने अर्जूनाकडून यज्ञ अपेक्षिले होते.

               जय योगक्षेमं |
                जय योगेश्वर ||

२ टिप्पण्या:

  1. म्हात्रेजी,
    निराळ्या परंतु सर्वांना सामावुन घेणारा अमुल्य गीतोपदेश आपण सविस्तर समजावुन सांगितला आहे. समजण्यास सोपे पण आचरण्यास कठीण असे मर्म त्यामधे आहे. जर ते साधता आले तर अशांत आत्म्यांस नक्कीच मनःशांती लाभु शकेल.
    धन्यवाद व नमस्कार.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...