यज्ञ म्हणजे निष्काम कर्म. शुद्ध विचार ठेवून कर्म करणे हा एक स्वतंत्र विषय आहे. म्हणजे ज्ञानयोग व भक्तीयोगावरही चर्चा करून शेवटी योग म्हणजेच कर्म हाच संपूर्ण गीतेतला महत्वपूर्ण बोध आहे. इथपर्यंत आपल्या चर्चेचा प्रवास होईल असे दिसते. असे असले तरी आपण सामान्यजन मंदिरात, सत्य नारायणाच्या पुजेनंतर व घरी नित्य होणार्या पुजेनंतर देव-देवतांच्या आरत्या म्हटल्यानंतर शेवटी देवा पुढे जी प्रार्थना करतो त्यात सहजपणे यज्ञाची वा निष्काम कर्माची व्याखा खालील प्रमाणे गात असतोच --
"कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनः वा
प्रकृतीस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै
नारायणायेति समर्पयामी ||२|| "
(अर्थ - काया,वाचा,मन,इंद्रियें,अगर आत्मा यांच्या प्रवृत्तीने वा स्वभावानुसार जे काही आपण करतो ते सर्व परात्पर नारायणाला समर्पण करावे.) भले, आपण निष्काम रित्या कर्म पार पाडू शकत नसलो तरी निदान त्यावरील चर्चेचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण श्रीकृष्णानेच गीतेतील सहाव्या अध्यायात अर्जुनाला उपदेश केला आहे --
उद्धरेत आत्मनः आत्मानम् न आत्मानम् अवसादयेत
आत्मे एव हि आत्मनः बन्धुः आत्मा एव रिपुः आत्मनः
(अर्थ-- मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता, स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे.)
खरे स्वातंत्र्य मनाचे किंवा बुद्धीचे नसून आत्म्याचेच आहे. म्हणून आपल्यासारख्या सामान्यजनांनी त्यावरील चर्चा करावयास शास्त्राधारे काही अडथळा नाही. उलट तसा प्रयत्न करणे ही भगवंताची भक्ती होय. आणि तशी चर्चा करताना रसभंग होईल अशी न्यूनता ही बाळगू नये. कारण भगवंत भावाचा भूकेला असतो. याशिवाय कर्मापासून पलायन ईश्वरानेच निषिद्ध मानले आहे. म्हणूनच हातातून शस्त्र खाली ठेवून शोकग्रस्त झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने गीतोपदेश दिला. व पु काळे म्हणतात, त्याप्रमाणे आपण सारे अर्जुन ! आपण स्वतःला सामान्यातले सामान्य अर्जुन मानू आणि निष्काम कर्मयोगा वरील चर्चा पुढे कधीतरी स्वतंत्रपणे करू असा संकल्प सोडू या.
समर्थ रामदास स्वामींनी ' प्रपंच ते भाग्य, परमार्थ ते वैराग्य ' हा मंत्र दिला आहे. त्यातील प्रपंच हा भाग आपल्या वाटेला आला आहे. तो निभावत असताना, परमार्थ साधण्याचा प्रयत्न करीत राहील्यास आपला प्रपंच भाग्यमय बनविता येऊ शकतो, हे समर्थांनी मनाचे श्लोक आपल्या समोर ठेवून तद्नुसार आचरण करण्याच्या उपदेशातून दिला आहे. जीवनात जे काही दुःख वाटेला येते ते आपल्या कर्मातून येते. त्यातील काही दुःखे मागच्या जन्मातील ही असू शकतात. म्हणून समर्थानी म्हटले आहे,
जनीं सर्व सूखी असा कोण आहे |
विचारें मना तूंची शोधूनी पाहें ||
मना त्वांचि रे पूर्वसंचित केले |
तयासारिखें भोगणे प्राप्त झालें ||
आणि पुढे उपदेश देतात,
मना मानसीं दुःख आणू नको रे |
मना सर्वथा शोक चिंता नको रे ||
विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावे |
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ||
रामदास स्वामीचा हा चार ओळीचा उपदेश, आजच्या स्पर्धेच्या युगात समाधानाची पातळी कशी नियंत्रणात आणता येईल हे सांगत, एक प्रकारे आजच्या गतीमान जीवनात येणारा मानसिक ताण व त्यातून होणारा शारिरीक आजारावरचा रामबाण उपायच ठरतो. यावर आपण ' मा फलेशू कदाचान ' या भागात चर्चा करू या. आपल्या सर्वच संतांनी जो देह झिजविला तो आपल्या कल्याणासाठीच. त्यांचे कार्य, साहित्य व आचरण यातून ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तीयोगाच्या संगमाचे विलोभनिय दर्शन झाले आहे. परमेश्वर जगातील सर्व घडामोडीचा कर्ता करविता आहे. तथापी त्याच्याकडे निर्दयपणाचा वा पक्षपाताचा दोष येऊ नये म्हणून तो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फल देतो.
आता आपण कर्माचा अधिकार यावर चर्चा करू या. भगवान श्रीकृष्णाने कर्म करणे हा आपला अधिकार आहे असे स्पष्ट सांगितले आहे. आजच्या लोकशाही राज्यप्रणालीचे हे एक महत्वाचे मूल्य आहे. आपल्या देशाच्या प्राचीन इतिहासात राजेशाही होती तर काही ठिकाणी गणतंत्रप्रणाली ही होती. यादवांचे राज्य हे एक गणतंत्र होते. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने कर्म करणे हा 'अधिकार 'आहे हा शब्द वापरला असे वाटत नाही. त्यांनी चातुर्वण्यम मया सृष्टी गुणकर्मविभागशः असे जे म्हटले आहे, त्या सत्याला अनुसरून कर्म हा अधिकार अशी मान्यता दिली आहे. अधिकार या शब्दाचा गीतानुरूप अर्थ स्वभावजन्य कृती. म्हणजे निसर्गतः मानवाला तो अधिकार प्राप्त झाला आहे. त्या अधिकाराचा उपयोग न करणे म्हणजे निष्काम कर्म असा अर्थ काढू नये. कारण मानव म्हणून जन्म झाला तेव्हा सृष्टीच्या त्रिगुणानुसार मनुष्याची जी विभागणी झाली आहे, त्यातून त्याला कर्माचा अधिकार मिळालेला आहे. तो वापरात आणायला हवाच म्हणून कर्म हे एक कर्तव्य पण आहे. आणि कर्तव्य निभावताना वैयक्तीक जीवनातील जय-पराजय, लाभ-हानी, याचा विचार न करता ते पार पाडावयास हवे. असे म्हटले जाते की आपली प्राचीन वैदिक संस्कृती सहजीवनाचं एक माॅडेल होते. सहजीवनात प्रत्येक जण आपले कर्म जबाबदारीने पार पाडत असे. कारण प्रत्येक वर्णाचे काम इतर वर्णांच्या कामाला पूरक असे. सोबत सर्व प्राणीमात्रांच्या जीवन चर्येला आणि पर्यावरणाला धोका व अडथळा निर्माण न करण्याची काळजी घेतली जात असे. म्हणजेच निसर्गाचे चक्र अखंडीत चालतं ठेवण्याची व्यवस्था होती. असे असले तरी सत्ता स्पर्धा तेव्हा ही होती. प्रत्येक युगात मानवी जीवनाच्या व्यवस्थेत दोष ही असतात. म्हणून जे इतिहासात जमा झाले आहे, त्यातील चांगलं व शाश्वत आहे व दिर्घकाळ आपल्याला मार्गदर्शन मिळेल ते जपून ठेवावे आणि कालानुसार बदलत जाणे हेच हिताचे असते. त्यामूळे गतम न शोचम् हेच हितकारक ठरणारं असते.
प्रकृती वा सृष्टी , सत्व रज तम या त्रिगुणांनी भरलेली असल्याने कलीयुगातील माणसाला आपला अधिकार, आपल्या हक्कासंबंधीचे आकर्षण वा प्रिती म्हणा अधिक असते. शिवाय त्या अधिकाराचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. कारण Bad ideas swiftly conqure human brain and mind too. तो ही सृष्टीचा नियम आहे. काटेरी झुडपे विना मशागत, खत तसेच सुर्यप्रकाशाच्या अभावात ही वाढत असतात. जी सृजन होते ती सृष्टी, आणि ती सृजन करण्याची जबाबदारी मानवावर आहे. म्हणून कर्म पार पाडताना जबाबदारीचे भान सतत ठेवावे. असाच संदेश आपल्याला साधूसंतानी भक्तीच्या मार्गाने दिला आहे. कर्म हे भगवान विष्णूच्या म्हणजेच श्रीकृष्णाच्या संतुष्टासाठी करावे अशी भावना ठेवणे गरजेचे आहे आणि तसे कर्म उच्च कोटीचे असते. आपण जबाबदारी नीट न पाळली की त्याची वाईट फळे भोगणे क्रमप्राप्त आहे. यालाच Theory of Karma असे मानले जाते. साध्या व सोप्या भाषेत ' पेरिले तसे उगवते ' 'करावे तसे भरावे ' हेच होय. आपण जे द्याल तेच आपल्याकडे परत येते. या संबंधीची एक घडलेली हकीकत श्रद्धेय स्वामी सुखबोधानंद यांनी आपल्या पेरिले तसे उगवते या विषयावर ' मन रिलॅक्स प्लीज ' या पुस्तकात सांगितली आहे. ती इथे थोडक्यात मांडणे आवश्यक आहे असे वाटते. कारण आपले जीवन प्रत्येक जन्मात उन्नत करीत जाणे हा एक मोक्षाकडे जाण्याचा मार्ग आहे. म्हणजेच प्रत्येक जन्मात पुण्याचा संचय करणे हे होय. त्यासाठी परोपकार हा सर्वोत्तम उपाय आहे. महर्षी व्यासांनी अठरा पुराणे लिहीली पण त्यात मानवी जीवनाचे प्रयोजन केवळ दोन वचनात मांडले आहे ते खाली दिले आहे आणि आपल्या सर्वांना परिचीत आहेत.
' परोपकाराय पुण्याय पापाय परपिडनम् | '
पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, मोक्ष, पुनर्जन्म या कल्पना कोणी मानो की न मानो पण इत्यादी कल्पनांमूळे कर्माच्या अधिकाराचा वापर संयम व सद्भावनेने करण्यासाठी आवश्यक ती मानसिक तयारी होत असते, हे ही नसे थोडके. आता आपण त्या कथेकडे वळू या.
पेरिले तसे उगवते |
श्री ह्यूज फ्लेमिंग या स्काॅटिश शेतकर्याने एकदा मदतीकरिता कुणीतरी धावा करीत असल्याचे ऐकले. एक छोटा मुलगा कमरेपर्यंत चिखलात रूतला होता आणि सुटकेसाठी धडपडत होता. फ्लेमिंगने त्या मुलाचे प्राण वाचविले. दुसर्या दिवशी अत्यंत रूबाबदार पोशाख केलेली एक कुलीन व्यक्ती फ्लेमिंगकडे आली आणि म्हणाली," तुम्ही माझ्या मुलाचे प्राण वाचविले. तुमच्या या सद्कार्याकरिता मला तुम्हाला बक्षिस द्यावयाचे आहे. " त्यावर फ्लेमिंगने उत्तर दिले, " छे, छे, त्या कामाच्या मोबदल्यात मी बक्षिस स्विकारू शकत नाही. ते तर माझे कर्तव्यच होते." फ्लेमिंगच्या जवळच त्याचा मुलगा बाजूला बसलेला होता. त्या घरंदाज व्यक्तीने पृच्छा केली, " हा तुमचा सुपुत्र होय ?" फ्लेमिंगने होकारार्थी मान हलविली. सदिच्छेच्या भावनेतून त्या घरंदाज व्यक्तीने फ्लेमिंग च्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली.
पुढे काही वर्षे लोटली. फ्लेमिंगचा सुपुत्र पुढे सर अलेक्झांडर फ्लेमिंग झाला, ज्याने पेनिसिलीनचा शोध लावला. काही वर्षानंतर त्या कुलीन व्यक्तीचा सुपुत्र जिवघेण्या न्युमोनियाने आजारी पडला. तेव्हा त्या मुलाचे प्राण कुणी वाचविले? तर ती होती ' पेनिसिलीन ' ची लस ! त्या कुलीन व्यक्तीचे नांव होते " लाॅर्ड रॅन्डाॅल्फ चर्चिल " आणि न्युमोनियाने मृत्यूच्या दारात उभे होते ते त्यांचे सुपुत्र, ज्यांनी दुसर्या महायुद्धात विजय मिळवून दिला ते इंग्लडचे पंतप्रधान ' सर विन्स्टन चर्चिल ! '
मित्र हो, परोपकार करण्यासाठी जो कर्माचा अधिकार मानवाला मिळाला आहे, तो विश्वाची अलिखीत संविधान ज्याने तयार केले आहे त्या विधाताच्या राज्यातून मिळालेला आहे. जगाला दुष्टांच्या अत्याचारापासून वाचविण्यासाठी अर्जूनाला ईश्वराच्या दरबारातून मिळालेला शस्त्र चालविण्याचा परवानाचा, त्याने जय-पराजय, लाभ - हानीचा विचार न करता वापरावा यासाठीच गीताचा जन्म झाला. स्वातंत्र्यानंतर लागलीच पाकिस्तानने काश्मीर बळकाविण्यासाठी हल्ला केला होता, त्यावेळी अंहिसाचे पुजारी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीनी, पाकिस्तान जर जुमानत नसेल तर युद्धशिवाय पर्याय नाही असे म्हणत काश्मीरमध्ये लष्कर पाठविण्याची संमती दिली होती. आजही आपल्या न्यायालयातील न्यायाधिशांना गुन्हेगारांना जन्मठेप किंवा मरेपर्यंतची फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार आपल्या देशाच्या संविधानाने दिला आहे त्याची अंमलबजावणी करणे हे पापकर्म ठरत नाही. न्यायधिशांचा तो स्वधर्म आहे. तो अधिकार आहे. पण लोकमान्य टिळक, सावरकर, भगतसिंग, आझाद, मदनलाल डिंग्रा इत्यादींना शिक्षा केली ती दुष्ट ब्रिटीश राजवटीने. कर्मयोगी व गीतारहस्य म्हणजे कर्मशास्त्र असा उपदेश देणार्या लोकमान्य टिळकांनी न्यायालयातच ब्रिटीश सरकारला सुनावले आहे, " न्यायधिश महोदय, आपल्या न्यायालयातून मला न्याय मिळाला नाही, पण देवाच्या दरबारात मला न्याय मिळेल. मी कारावासात असलो तरी मी स्विकारलेले कार्य जोमाने वाढेल व आमचा देश लौकरच पारतंत्राच्या बेड्या तोडून चक्काचूर करेल." झालेही तसेच. लोकमान्य टिळकांचे स्वप्न १५ऑगस्ट १९४७ साली पूर्ण झाले.
युद्ध होऊ नये त्यासाठी शिष्टाई करावयास गेलेल्या श्रीकृष्णाने कौरवांकडून पांडवासाठी फक्त पाच गावे मागितली. ती मागणी सुद्धा दुर्योधनाने फेटाळून लावली. तेव्हा श्रीकृष्णाकडे युद्धाशिवाय पर्याय राहिला नव्हता. ऐन युद्धाला सामोरे जाण्याच्या वेळी अर्जून शोकग्रस्त झाला म्हणून तस्मात् उत्तीष्ठ कौतेंय युद्धाय कृतनिश्चयः हा सल्ला श्रीकृष्णाने अर्जूनाला दिला. काही पाश्चीमात्य विचारवंत व दुर्दैवाने आपल्या येथील काही विचारवंतानी श्रीकृष्णाने अर्जूनाला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केले असा आरोप करतात. गीतोपदेश संपल्यानंतर शेवटी श्रीकृष्णाने अर्जुनाला काय म्हटले आहे हे पाहू या. त्यातून श्रीकृष्णावर आरोप करणार्या विचारवंतांना उत्तर मिळू शकेल तसेच कर्म हा आपला अधिकार आहे हे ही स्पष्ट होईल. आणि मग अधिकारयुक्त कर्तव्यावरील या चर्चेला विराम देऊ या.
इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तम् मयानघा |
एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृत्यः भारत ||
(अर्थ - हे निष्पाप अर्जुना ! हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे ;आणि तो मी तुला सांगितला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो.) यावरून असेच दिसते की श्रीकृष्णाने अर्जूनाला फक्त उपदेश दिला पण अर्जुनाला स्वतःचा विवेक व स्वतःची बुद्धी वापरून युद्ध करावे की करू नये याबाबतचा निर्णय घेण्यास सांगितले. त्या अर्थी कर्म हा आपला अधिकार व कर्तव्य आहे आणि त्यावरील फलदोषाला आपण स्वयं कारणीभूत असतो. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या अधिकारात ना हस्तक्षेप केला ना जबरदस्ती केली. कारण ज्याच्या त्याच्या कर्माची फळे ज्याला त्यालाच भोगावी लागतात. असाच उपदेश महर्षी नारदांनी वाल्या कोळीला सांगितला. तो त्याने ऐकला व रामायण या महान ग्रंथाची निर्मिती केली. सारांशाने म्हणता, आपल्या कर्माच्या अधिकारावर ईश्वर सुद्धा कात्री आणू शकत नाही, आणि आपल्याला ही कर्मापासून पलायन करता येत नाही. त्या कर्माची बरे-वाईट फळे, ईश्वराने सृष्टीच्या निर्मिती सोबत ठेवली आहेत. तेच सत्य होय. त्यावर पुढील भागात चर्चा करू या.
जय श्रीकृष्ण!
उत्तर द्याहटवाजय श्रीकृष्ण !
उत्तर द्याहटवा