बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

मृत्यु सुशांत पण महाराष्ट्र सरकार का अशांत ?

दिनांक २० मे रोजी ब्लाॅगवर महाराष्ट्रातील राजकारण या विषयासंबंधी लेख पब्लीश केला आहे. त्यात मी  म्हटले आहे की " जीव सामान्य नागरिकाचा का असेना तो अमूल्य असतो. त्यात भेदभाव करणे म्हणजे लोकशाही मुल्यांची प्रतारणा करणे होय. आपल्या देशाच्या संविधानाने चोरालाही मारण्याचा हक्क कोणाही व्यक्ती वा समाज समूहाला दिलेला नाही. तरीही पालघरला दोन साधूंची हत्या होते तीही कोरोनाच्या महामारीमूळे जमाव बंदी असताना. नंतर दिशा सॅलियनचा अनैसर्गिक मृत्यु , पाठोपाठ आपल्या येथील बाॅलीवूड नावाने ओळखल्या जाणार्या फिल्म-जगतात ज्याने स्वतःच्या मेहनतीने नाव कमाविले, त्या सुशांतसिंग राजपूताचा झालेला अनैसर्गिक मृत्यु.  इत्यादी घटनेतून महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याची निष्क्रियता वा चलाखी स्पष्ट झाली आहे. चलाखी शब्द वापरला याचे कारण आपल्या राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुखाने, सुशांत राजपूताच्या मृत्युसंबंधीचा तपास सुरू करण्याअगोदरच ' सुशांतने आत्महत्या केली ' असे वक्तव्य केले. तर त्यांचे बाॅस शरद पवारांनी " एका कलाकाराचे प्राणाचे मूल्य काय ते मोठे असे म्हणत, २० शेतकर्यांच्या आत्महत्येसंबंधी मिडीया का लक्ष घालत नाही असा उलटा प्रश्न उभा केला आहे. या शिवाय शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून संजय राऊत या विषयावर एकतर्फी अग्रलेख लिहितात आणि एका पाठोपाठ एकतर्फी व्टिट ही करीत असतात. अलीकडच्या काळात शरद पवार व संजय राऊत सतत काही तरी वाद उत्पन्न करीत असताना दिसत आहेत. या ठिकाणी ज्ञानपीठ विजेते वि स खांडेकर यांच्या एका पुस्तकातील प्रस्तावनेत म्हटलेले बोल आठवले आहेत. ते असे आहे. " तत्त्वबोधासाठी जगात फारच थोडे लोक वाद करतात. अहंकाराच्या समाधानासाठी, विद्वत्तेच्या प्रदर्शनासाठी, पूर्वग्रहाचे प्रिय असणारे पोकळ डोलारे सांभाळण्यासाठीच या जगात वाद उत्पन केले जातात आणि हिरीहिरीने लढविले जातात ! मनुष्य मुख्यतः आत्मपूजक आहे. सत्यपूजक नाही."  वि स खांडेकरांचे निधन १९७६ ला झाले. त्यामूळे आणिबाणीच्या कालखंडाविषयीची त्यांची मतें समजू शकली नाहीत. पण ते शरीराने १९७६ पर्यंत ताठ असते तर त्यांनी ' सत्तेचा व संपत्तीचा माज ' या गोष्टीमूळे  ही वाद उत्पन्न केले जातात हे वाक्य जोडले असते. सुशांतसिंग राजपूताच्या मृत्यु संबंधीत संशयाची सुई महाराष्ट्रातील सरकारमधील मंत्र्यावर व सत्ताधारी पक्षाकडे जी वळालेली दिसत आहे, त्यासंबंधीचा दोष मिडीया तसेच सर्वसामान्यांना देण्यात काही अर्थ नाही. कारण या केसमध्ये शिवसेना, व राष्ट्रवादी पक्षाला इतकं गुंतवावे का लागत आहे, ही केस बंद करण्याची घाई ही मंडळी का करीत आहेत, यातच सारं काही दडलंय आहे. अर्थात संपूर्ण चौकशी होऊन न्यायालयात सुशांतचा मृत्यू हा आत्महत्येचा प्रकार नसून ती हत्या आहे हे सिद्ध होईपर्यंत आपण वाट पाहात बसणे यातच शहाणपण आहे. जगभरातील अनेक कवी व अध्यात्मिक गुरूंनी मृत्यु म्हणजे चिरकाल विश्रांती असे वर्णन केले आहे. त्या अर्थाने मृत्यू सुशांत पण महाराष्ट्र सरकार, सुशांतसिंग राजपूताच्या मृत्युने का अशांत झाले असा प्रश्न आपल्या सर्वांना सतावत आहे. म्हणून हा लेख प्रपंच.

नुकताच सुप्रिम कोर्टाने सुशांतसिंगच्या मृत्युसंबंधीचा तपास सिबीआयकडे सुपूर्त करण्यास हरकत घेतली नाही. असा निकाल देऊन  महाराष्ट्र सरकारने सुशांतसिंगचा मृत्यू अपघाती  म्हणून जी नोंद केली त्यासंबंधी कोर्टाने फटकारले आहे. मुळातच सुशांतसिंगच्या मृत्युनंतर महाराष्ट्र सरकार जे  फक्त अशांत होते त्यात आणखिन भर झाली असून महाराष्ट्र सरकार सैरभैर होण्याची शक्यता वाढली आहे.

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यु संदर्भात शरद पवारांनी जे वक्तव्य केले त्या संबंधी आश्चर्य वाटण्याची गरज नाही. कारण ते हाडामासाचे राजकीय नेते आहेत. ज्या २० शेतकर्यांच्या आत्महत्याकडे मिडीयाने दुर्लक्ष केले आहे असा प्रश्न आज शरद पवार उपस्थित करीत आहेत, त्या प्रश्नांवर राजकीय व्यवस्थेनेच उत्तर द्यवयाचे असते आणि हे शरद पवारांना ठाऊक नाही असे जनता कशी गृहीत धरणार?  महाराष्ट्रातले सध्याचे मविआ सरकारचा जन्मदाता शरद पवार आहेत. मविआ सरकारने शेतकर्यांची आत्महत्या रोखण्यासाठी छोटीशी जरी उपाययोजना केली असती तरी मिडीयाने शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केलेच असते.

सध्या सुशांतसिंगच्या आत्महत्येसंबंधी जी चर्चा होत आहे, त्या पाठीमागील दुसरे कारण म्हणजे मुंबई पोलीसांनी आजपावेतो  सुशांतच्या अनैसर्गिक मृत्युसंबंधी  FIR दाखल केलेली नाही. मग पोलीस दल  तपास तरी कसला करीत आहेत, हा प्रश्न सामान्यजनांना पडला आहे. सिबीयाला विरोध करावयाचा, व बिहारमधून तपास करण्यासाठी आलेल्या पोलीसांचे क्वारनटाईन करण्यातच मुंबई पोलीसांचा वेळ बरबाद झाला. सुशांतसिंगचा मृत्यू खरोखरीच आत्महत्याने झाला असेल तर राज्य सरकारने या केसबाबतचा तपास सीबियाकडे वर्ग करायला हवा होता. त्यामूळे अगोदरच कोरोनाच्या महामारीशी टक्कर देऊन थकल्या-भागलेल्या मुंबई पोलिसांवर या नसत्या उठाठेवेतून अधिकचा ताण पडला नसता. केवळ  फिल्मी दुनियातील मित्रांसोबत मुख्यमंत्र्याचे पुत्र, जे राज्याचे पर्यावरण मंत्री आहेत, ते आदित्य ठाकरें एका पार्टीला उपस्थित राहिल्यामूळे ते आरोपी ठरत नाहीत. इतकं साधं ज्ञान महाराष्ट्र सरकारमधील भल्या, भल्या मंत्र्यांना व पोलीस अधिकार्यांना नसेल हे संभवत नाही. कदाचित आज आदित्य ठाकरे जात्यात आहेत, पण आपण सूपात आहोत या जाणीवाने ही बडी मंडळी बिथरली असावी. जर का आदित्य ठाकरे निर्दोष असतील तर ही केस सिबायलाच काय, बिहार राज्याच्या पोलीसाकडे वर्ग केली तरी ते निर्दोषच सुटतील असा आत्मविश्वास  मुख्यमंत्र्याने व्यक्त करून सिबीयकडे हा तपास सोपविला असता तर मुख्यमंत्र्यांची शान वाढली असती व अनायसे भाजपाला कोंडीत पकडण्याची एक मोठी संधी प्राप्त झाली असती. पण तसे नसावे. सीबीआय तर्फे चौकशी करण्यास केलेला विरोध हे ही एक कारण आहे, ज्यामूळे सुशांतसिंगच्या मृत्यू सबंधीत संशयाची सुई राज्य सरकार मधील नेत्यांवर जात आहे. जेव्हा राज्य सरकार सीबीआय चौकशीस विरोध करते तेव्हा केंद्रातील सत्ताधारी पक्ष आपले राजकीय डावपेच खेळते असे म्हणत राहावयाचे व सुशांतच्या मृत्यूबाबतच्या चौकशी फार्स उरकायला वेळ मिळेल, आणि  या प्रकरणातून आपली सुटका व्हावी हाच उद्देश राज्य सरकारचा होता, असे आज जवळपास सिद्ध झाले आहे. अर्थात जिथे आपल्या पक्षाचे सरकार नसते तेथील राज्य सरकारच्या कारभारातला गोंधळ, हलगर्जीपण वा पक्षपाती व्यवहाराचा फायदा केंद्र सरकार घेण्याचे सोडत नसते, हे ही तितकेच खरें आहे. शेवटी क्षेत्र कुठलेही असो, राजकारणापासून ते मुक्त नसते हे मोठे सत्य.

राजकारणात काम करणार्या मंडळीची दुनिया, चंदेरी दुनिया आणि मिडीया नावाच्या दुनिया मध्ये सत्ता, लोकप्रियता, पैसा, इत्यादी गोष्टींची कमालीची स्पर्धा असते. या तिन्ही क्षेत्रात मैत्री, सत्प्रवृत्ती, नैतिकता, इत्यादी जीवनमुल्यें बहुतांश वेळा आभासी व दिखाव्या स्वरूपाची असतात. कोणाला पटो वा न पटो बाॅलीवूडमध्ये  कोणाची चलती चालावी, तिथे कुणाला बरबाद करावयाचे, इत्यादी बाबी त्या सिनेउद्योगात जो पैसा गुंतवितो तोच ठरवितो. हा पैसा बेनामी असतो व त्याचे सुत्रधार माफीया असतात. त्यांचे निवासस्थानं देशात तसेच देशाच्या बाहेरचे असू शकतात. त्यामूळे प्रशासनाला या क्षेत्रात भरीव बदल करण्यात अनेक अडचणी असू शकतात. पण काश्मीरचे ३७० कलम रद्दबादल करणारे मोदी सरकार काही तरी मार्ग काढून या सिनेउद्योगाला माफीयांच्या तावडीतून सोडतील अशी आशा धरू या. 

काल परवा  टाईम्स नाऊ चॅनेलवर अनुपम खेर यांची मुलाखत सुरू होती. ॲन्करने अनुपम खेर यांना प्रश्न विचारला की, आप हिरो बननेके काबील थे, तो भी आपको, हिरोका रोल क्यों नही मिला, इसकी वजह क्या हैं? यावर उत्तर देताना अनुपम खेर यांनी उत्तर दिले ते असे आहे, ' मैंने साईड ॲक्टरकी भुमिका को स्विकार करके यश, शौनत हासील की है | मुझे हिरोका रोल न मिलनेका दुःख भी नही है | निर्माता, दिग्दर्शकोंने दिया हुआ मौका और दर्शकोंने दिया हुआ प्यार यह मै संपत्ती मानता हूँ | " याचा अर्थ असा आहे की आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात Level of ambition and Level of Satisfaction यामधील सुवर्णमध्य गाठण्याची कला अवगत करणे आवश्यक असते. हा एक आजच्या युगाचा मंत्र आहे असे समजून पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या गोष्टीने भारावलेल्या युवकांनी तो मंत्र सतत जपायला हवा असे वाटते. ॲन्करने पुढे सुशांतसिंगच्या मृत्युसंबंधी विचारले तेव्हा अनुपम खेर यांनी ' कुछ तो गडबड है ' असे सूचक विधान केले. सिनेजगतातील इतर कोणाची ही अधिकृत प्रतिक्रीया आली नाही. याचा अर्थ आपल्या येथील सिने-जगत पडद्यावर, किंवा अवार्ड फन्क्शन मधून दिसते तसे नाही याची खात्री पटते.

कुछ तो गडबड है असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे तीच भावना सुशांतसिगच्या फॅन्सना आणि कुटुंबियांना वाटत आहे. रिया चक्रवर्ती नावाची मुलगी सुशांतच्या जीवनात कशी येते व नंतर तिला त्याच्या पैशाचा, व संपत्तीचा मोह कसा सुरू होतो, त्यातून तिने सुशांतच्या जुन्या नोकराना काढून टाकण्यापासून ते तांत्रीकाची मदत घेणे , सुशांतला विशिष्ट औषधाचा डोस देण्याची सुरूवात कशी केली इत्यादी संबंधीची जी माहिती बाहेर येते त्यावरून सुशांतसिंगचा मृत्यु हा आत्महत्येचा प्रकार नसावा असेच वाटते. गळफास लावून सुशांतसिंगने आत्महत्या केली असेल तर तशा प्रकारचे पुरावे दिसत नाही. ना तिथे पंख्याला जाडजूड दोर बांधलेला दिसला ना टेबल वा खूर्ची सापडली. सुशांतसिगच्या मानेमागील भागात खोलगट भाग दिसणे, गळफासामुळे जीभ बाहेर येते तसे झाल्याचे न दिसणे,  त्याच्या शवाची ॲब्मील्युन्स बदलणे, सुशांतसिंगचे शव नजिकच्या लिलावती हाॅस्पीटल ऐवजी कूपर हाॅस्पीटल जिथे ठाकरे घराण्याचा प्रभाव आहे तिथे पोस्टमार्टम होणे,  रिया चक्रवतीने महेश भटशी, सलमानखानच्या वकीलाशी केलेला संपर्क, सुशांतसिंगच्या डेथ सर्टिफीकेटमध्ये मृत्युची वेळ नसणे, सुशांतचा बँक बॅलन्स कमी होत जाणे अशा अनेक गोष्टी बाहेर येत आहेत, ज्यावरून सुशांतसिंगला पद्धतशीरपणे मारण्यात आले आहे, असा अंदाज बांधता येतो. सुशांतसिंगचा मृत्यू हे एक मोठे कथानक बनत आहे ज्यावरून पुढे मागे चित्रपट निघू शकेल. त्यात आदित्य ठाकरे व त्याचा मित्र दिपेश सावंत, रियाचा भाऊ, सॅम्युयल मिरांडा, दिशा सॅलीयाॅन इत्यादींच्या भूमिका वठवणारे  कलाकार शोधावे लागतील. जस जसा तपास पुढे जात राहील तशी नावें वाढण्याची शक्यता आहे. कारण सुशांतला रियाने सुरू केलेला औषधाचा डोस हा नोव्हेंबर २०१९ पासूनचा आहे असे ऐकीवात आहे. कदाचित हे प्रकरण आदित्य ठाकरेंना ठाऊक असू शकते, आणि कधीतरी हाताबाहेर जाऊ शकते हे ही आदित्य ठाकरेंना समजले असेल. त्यामूळेच या प्रकरणातून आदित्य ठाकरेंना वाचविण्यासाठी शरद पवारांशी संगनमत करून मविआ सरकार आकारास आणले गेले असावे. तेव्हाच आदित्याला मंत्रीपदाचे कवच देण्याचे निश्चीत केलेले असावे. बाकी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री देण्याचे आश्वासन दिले होते हे कारण निव्वळ स्टंटच  होता.

आपल्या येथे जशा राजकारणात लाॅब्या आहेत तशाच, डावी विचारसरणी,  जिहादी, पाक पुरस्कृत  दशहतवाद, नक्षलवाद, इत्यादींचा  सिने-जगतावर  प्रभाव आहे. त्याची कारणें स्वातंत्र्यपुर्व काळापासून पुढे चालत आलेली आहेत. म्हणूनच बाॅलिवूडमधील चित्रपटात नेहमी नायकाचा शेजारी अल्पसंख्याक दिखविला जातो आणि तो नायकाच्या सगेसोयर्या पेक्षा उदार व मदतगार दाखविला जातो. विदेशी पैसा, हवालाद्वारे येणारा पैसा, काळा पैशाने आपला सिनेउद्योग त्रस्त आहे. कदाचित सुशांतसिंगच्या अकाली, अनैसर्गिक मृत्युच्या तपासातून बाॅलिवूड मधील काळी बाजू ऊजेडात येऊ शकेल. असे असले तरी आपल्या समाजाला सिनेनट व नट्या, क्रिकेटर्स तसेच राजकीय नेत्यांना सेलिब्रटी मानण्याची जी ओढ आहे तिच्यामूळे अनेक क्षेत्रात बदल करण्याचे सामर्थ्य असलेल्या समाजाची गती मंदावते, हे ही नाकारता येत नाही. त्यामूळे पैसा, प्रतिष्ठा, आणि प्रभुत्व यांच्या अमर्याद मोहाने माणुसकी विसरलेला समाजाचा वरच्या थराचे ( इलाईट ग्रुपचे) राज्य सर्वत्र सुरू राहते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हेच घडत आलेले आहे. त्यातूनच सुशांतसिंगला एक तर संपविला असेल वा आत्महत्या करण्यासाठी उद्युक्त केले गेले असावे. त्या संबंधीचे सत्य न्यायालयाच्या निकालातून आपल्याला कळेल.  सिने-जगतातील मंडळी व राजकारणातील मंडळीचा परस्पर जो संबंध आहे, तो नवा नाही. पण त्यातून विलासराव देशमुखाचे मुख्यमंत्रीपद गेले होते, हा अलीकडचा इतिहास नजरे समोर येतो तेव्हा  शरद पवार यांच्या नातवाने (अजितदादा पवार यांचा मुलगा पार्थ ) सुरू केलेला संघर्ष व बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा सिनेसृष्टीतला हाय प्रोफाईल पराक्रमातून महाराष्ट्र सरकार जे अशांत आहे ते कायम स्वरूपाच्या स्मशान शातंतेत जाईल अशी शक्यता वाढली आहे. 

सुशांतसिंग एक हुषार व आपल्या भावी जीवनाची रितसर नियोजन आखणारा कलावंत होता हे त्याच्या डायरीतील नोंदीतून समजते. त्याने शिक्षण क्षेत्रात काही विद्यार्थ्यांना मदत देऊन प्रोत्साहन दिले आहे.  त्यामूळे तो डीप्रेसनमध्ये जाण्याची शक्यता नव्हतीच हे पटते. त्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास असणे गरजेचे नाही. तो गुणी होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आमुलाग्र बदल करण्याच्या प्रयत्नात होता हे सुशांतच्या डायरीतून स्पष्ट झाले आहे. त्याने डायरीत मांडलेल्या कल्पना ऐकल्या की तो एक दूरदृष्टीचा कलाकार होता हे मान्य करावे लागते. " कलेची निर्मिती कोठल्याही विषयाच्या संपूर्ण ज्ञानातून किंवा निव्वळ बौद्धिक जाणीवेतून  होत नाही. कलेचा उगम बुद्धीत नसून तो भावना व कल्पना यांच्या अपूर्व संगमात आहे. विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने एके ठिकाणी म्हटले आहे की, Imagination is more important than knowledge.  ज्ञाना पेक्षा भावना व कल्पनाशक्ती महत्वाची असते. भावना कुठल्याही अनुभूतीच्या आत सळसळणार्या मानवी जीवनाचे दर्शन देत असते. म्हणूनच  Portrait in a Mirror या इंग्रजी  चित्रपटाचा नायक म्हणतो,
' धार्मिक मनुष्य जी मनःशांती संपादन करू शकतो, तो काही अष्टपैलू पंडीत असतो म्हणून नव्हे; तर त्याच्या अंगी उत्कट श्रद्धा असते म्हणून ! कलावंताचे तसेच असते. तो सर्वज्ञ असला पाहिजे असे मुळीच नाही. पण आपल्या कलादृष्टीद्वारे होणार्या जीवनदर्शनावर त्याची निष्ठा असली पाहिजे. ' अशी शुद्ध बावनकाशी निष्ठा असलेला सुशांतसिगच्या रूपात एक उमदा कलाकार आपण गमाविला आहे. त्यामूळे त्याच्या मृत्युबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत असल्याचे दिसत आहे. शेवटी जन्म आणि मृत्यु या दोन गोष्टींचा अधिकार ईश्वराने आपल्याकडे दिलेला नाही. पण त्यात सत्तेच्या, पैशाच्या, स्पर्धेच्या, अहंकाराच्या बळावर हस्तक्षेप करून कुटील कारस्थानाने  एखाद्याची जीवनयात्रा संपवितात ते नराधमच असतात. त्यांचे ते शौर्य नसून कौर्य आहे. त्यांना त्यांच्या पापाची किंमत मोजावी लागेलच अशी आशा व्यक्त करतो. आज सुप्रीम कोर्टाने सुशांतच्या मृत्यु संबंधीत सीबीआयला चौकशी करण्यासंबंधी याचीकेचा निकाल जाहीर केला व तो सुशांतसिगचे कुटुंबिय व फॅन्सच्या बाजूने दिला आहे. या केस मधील हा पहीला पाडाव होता तो जिंकला आहे. नंतर गुंतागुंताने भरलेली ही केस उभी राहील. आपल्याला फार वाट पाहावी लागेल हे ओघाने आलेच. सुशांतसिंगच्या कुटूंबियांना न्याय मिळो आणि सुशांतसिंगच्या आत्म्यास शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या लेखाची समाप्ती करतो.
                             
                             हरि ओम ! 

४ टिप्पण्या:

  1. सत्यमेव जयते. सीबीआय तपासानंतर सत्य बाहेर येईलच.प्रतिक्षा करु या.

    उत्तर द्याहटवा
  2. म्हात्रेजी, अतिशय ज्वलंत विषयावर,तर्कसंगत, मुद्देसुद विवेचन निर्भिडपणे केल्याबद्दल धन्यवाद. पवार व राऊत यांची विधान बघुन हसाव कि त्यांची कींव करावी असा प्रष्न पडतो. सुदैवाने सुप्रीम कोर्टाने सर्व बाबी विचारांत घेऊन सुबुध्दपणे केस सीबीआय कडे दिली व जन मानसाचा त्यांच्यावरील विश्वास द्विगुणीत केला. फक्त आता परत राजकीय हस्तक्षेपाविना तपास होऊन दोषींना कोर्टासमोर आणल जाव ही अपेक्षा. नाहीतर आरुषी तलवार प्रकरणांत सीबीआयन कसा तपास केला ते आपण पाहिल आहे. आपल्या विवेचनातला एक नविन मुद्दा प्रिप्लॕन्ड सीएम शिप हा फार फेच्ड वाटतो कारण दिशा सुशांत प्रकरणं ही या वर्षींची आहेत, तरिही जुने संबंध नाकारता येत नाहित, कारण एका बिहारी बाबुच्या व्हीडीओंत तो मुलाखतकाराला विचारतांना बघितलय कि " राऊत व महाराष्ट्र सरकार रियावर एवढे मेहेरबान का आहेत, वो क्या उनकी बहु है? ". दुसर्या रियाच्या सीडीआर रिपोर्टमधे सुशांतच्या मृत्युआधी व नंतर AU या नंबर्सवर काॕल्सची देवघेव झाल्याचा उल्लेख आहे. तपास अतिशय कौशल्याने व निर्भिडपणे करण्याची आवश्यकता आहे.
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...