लाॅकडाऊन कधी उठेल हे आजही सागता येत नाही. म्हणून या लेखमालिकेचा तिसरा भाग आपल्या समोर ठेवतो. जेव्हा कधी लाॅकडाऊन संपेल तेव्हा आपण घराबाहेर पडणार आहोत पण पुर्वी सारखे नाही हे लक्षात ठेवावे लागणार. कारण कोरोना पाहूणा म्हणून आलेला होता व तो गेला आणि लाॅकडाऊन उठला असे होणार नाही. लाॅकडाऊन उठविताना नागरिकांनी आपआपली काळजी कशी घ्यावी यासंबंधीच्या सूचना आणि सोबत कुठल्या गोष्टी टाळाव्यात याचीही माहीती प्रशासन देणार आहे. याचा अर्थ हाच की कोरोना माझ्या घरात न आणण्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे, हे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याने लक्षात ठेवलेले बरे. लाॅकडाऊन नंतर वैयक्तीक व सार्वजनिक जीवनात घडल्या जाणार्या घटनांवर मग त्या कुठच्याही क्षेत्रातल्या का असेना कोरोना महामारीची छाया असणार हे निश्चीतच. व्यंगचित्रकार स्वर्गीय आर. के. लक्ष्मण यांची आठवण येते. आज ते हयात असते तर त्यांच्या व्यंगचित्रातील काॅमन मॅन सोबत अखिल मानव जातीवर हसत असलेला कोरोना विषाणू दिसला असता. तर राजकीय विषयावरील भाष्यात हाच कोरोना जगभरातील राजकीय व्यवस्थेवर एखाद्या राक्षसाप्रमाणे आक्राळविक्राळ रूप घेऊन खावयास तयार असलेला दिसला असता. कारण कोरोनाचा जन्म जगभरातील सत्ता आपल्या ताब्यात राहावी या ईर्षेने पेटलेल्या जागतिक महासत्तांच्या पशूवत व्यवहारातून झाला आहे असे जवळपास स्पष्ट झाल्याचे दिसते.
या लाॅकडाऊनच्या काळात आपण रोज टिव्ही चॅनेल्सवरून कोरोना संबधींत बातम्या, चर्चा, उपचार विडीओ, इत्यादी पाहातो व ऐकतो आहोत. यातील बहुतांश सारे कार्यक्रम व चर्चा तटस्थेने होत नाहीत असे अनुभवास येते. अलिकडे कोरोना विषयावर विडीओ काँन्फरन्स द्वारे एक भाषण लाईव्ह ऐकले. कोरोना महामारीच्या संकट काळातील आपल्या देशाचे वर्तमान व भविष्य यावर भाष्यं करणारे ते एक व्याख्यान होते असे म्हणावेसे वाटते . सदरहू कार्यक्रमात सन्माननीय व्याख्यात्यांनी एक वाक्य तर सोडाच पण एका शब्दानेही राजकारणाला स्पर्श केला नाही. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल, पण ते सत्य आहे. माझ्या कानाने मी ऐकले आहे. त्या व्याख्यानाचे सार माझ्या सुमार कुवतीच्या साह्याने काढलेले असले तरी ते आपल्याला नक्की आवडेल. कारण सोन्याचा कुठल्याही प्रकारचा आणि कसाही दागिना घडवून घेतला तरी शेवटी ते सोने चकाकणारच ना. म्हणून ते व्याख्यान आपल्याशी शेअर करीत आहे.
"नमस्कार मंडळी !
आज आपण अभूतपुर्व स्थितीत या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. कोरोना महामारी ही या शतकाच्याच नव्हे तर मानवाच्या इतिहासातील सर्वात भयानक व दुःखद घटना आहे. दुसर्या जागतिक महायुद्धापेक्षा अधिक देश या महामारीने प्रभावित झाले. जवळपास १८५ देशांना कोरोना विषाणूने आपल्या विळख्यात ओढले आहे. मानवी इतिहासात कधी नव्हती इतकी जिवीत व वित्तहानी झाली आहे. आजपावेतो जगभरात ४३४४१०१८ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे आणि २९७१९७ इतके लोक मृत्यमूखी पडले आहेत. आरोग्य,उद्योग, कृषी, व्यापार, वाहतूक, शिक्षण, कला इत्यादी सार्या व्यवस्था कोलमडून पडल्या आहेत. असे म्हटले जात आहे, की २००८ साली जगभर जी आर्थिक मंदी आली होती, ती दिड वर्षापर्यंत टिकली. पण कोरोना महामारीतून येत असलेली आर्थिक मंदी तीन ते चार वर्षापर्यंत टिकू शकेल. काही जण म्हणत आहेत, की जसे सनावली मांडताना आतापर्यंत BC म्हणजे Before Chriest आणि AC म्हणजे After Chriest अशी जी रीत आहे, त्यात बदल होऊन कोरोनाचे संकट टळल्यानंतर Before Corona आणि After Corona अशी कालगणना केली जाईल, इतकं मानवी जीवन उध्वस्त झाले आहे.
लाॅकडाऊन नंतर उद्योग क्षेत्राला लिक्वीडिटी क्रंन्चला सामोरे जावे लागेल ; मजूर वर्ग जो भयभीत होऊन आपआपल्या गावाला गेला आहे, तो परत येणार नाही; मग उत्पादन करणार्या कारखांनाच्या चाकांची गती व खटखटाट आवाजाची तीव्रता कशी वाढेल ? उत्पादन क्षेत्र मंदावले की हायवे वरून दिवस-रात्र सुरू असलेल्या माल वाहतूक करणार्या वाहनांची रांग च् रांग कशी दृष्टीस पडेल? सेवा क्षेत्रात सेवा देणारा मुख्य वर्ग म्हणजे बँका, व पत पुरवठा संस्था. त्यांच्यासमोर एनपीएचे आव्हान असेल तर सेवा घेणार्या वर्गाची पाऊले मंदगतीने पडतील, मग ते क्षेत्र तरी कसे गतीने पुढे सरकणार ? अनेक कामगार व कर्मचारी आपल्या नोकर्या गमावून बसलेले असतील, मग त्यांची क्रयशक्ती तरी कशी वाढेल? आरोग्य, कृषी, लघुउद्योग, पर्यटन, व्यापार, शिक्षण कला, क्रिडा इत्यादी सर्वच क्षेत्रांत अनेक समस्या आ वासून उभ्या असतील. पण निराश होऊन कसे चालेल? ' Every cloud has silver shinning.' प्रत्येक आपत्तीतच तिचे इष्टआपत्तीत रूपातंर करण्याची संधी असते. पण संधी गमावून बसावयाचे नसते. 'Opportunity means a course of action which is immediately possible.' कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा तत्परतेने करावयाचा उपाय जो होता तो म्हणजे लाॅकडाऊन. तो भारत सरकारने धाडसाने इतर देशापेक्षा तत्परतेने घेतला. या बद्दल जग कौतूक करीत आहे.
सारं जग आजच्या लाॅकडाऊन मध्ये मानवी जीवनावर चिंतन करीत आहे. मानवी जीवनाचं प्रयोजन काय आहे. अंतीम गंतव्य स्थान काय आहे यावर चर्चा होत आहे, जी आपल्या येथे प्राचीन काळापासून होत आलेली आहे. आज आपण बाजारात भाजीपाला आणायाला जात नाही ; हाॅटेलमध्ये तयार जेवण घेण्यासाठी जात नाही; जे घरात आहे ते शिजवून खात आहोत; जीवनाचं गाडं तर चाललं आहे, ते तर थांबले नाही. मग प्रश्न पडतो की जगण्यासाठी माणसाला किती गोष्टींची गरज आहे ? किती गोष्टी आपण अनावश्यक रित्या खरेदी करीत असतो ? असे सर्वत्र ऐकू येते. हे एक प्रकारचे आत्मपरीक्षणच नव्हे काय? लाॅकडाऊनच्या काळाच्या अगोदर अनावश्यक खरेदीत जाणारा वेळ कुटुंबातील सदस्यां समवेत जाऊ लागल्यामूळे कुटुंब संस्थेत पिता-पुत्र, सासू-सून, आईवडील-मुले इत्यादी नातसंबंधातून परस्परांना मिळणारा आधार एक दमडी न मोजता अनुभवास मिळत असल्याचे लोक सांगत आहेत. टिव्ही चॅनेलवरून दिसणारे रूग्णालयें, रूग्ण, ऐकू येणारी मृताची संख्या इत्यादीतून जीवन किती क्षणभंगूर आहे हा विचार सर्वत्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. पर्यावरण क्षेत्र साफसुत्र दिसते. सूर्याच्या सोनेरी किरणांनी शोभिवंत झालेल्या हिमालयाच्या पर्वतराशीं आपलं मोहक दर्शन घडवित आहे. एकंदरीत आधूनिक विकास हा खरा विकास आहे कि एक आभासी जीवन; सध्याच्या जीवनशैलीत काही बदल करावेत की काय ; आजच्या आर्थिक विकासाचे जीडीपी, जीएनपी इत्यादी मापदंड टिकाऊ की कामचलाऊ ठरू लागतील ; विकासाच्या धोरणात विकेद्रिकरणावर भर देता येईल का ; पर्यावरण स्नेही, व कमी ऊर्जा खाणारे व गावोगावी रोजगार निर्माण करणार्या लघुउद्योगांना ही विकासात स्थान देता येईल का ; मानवी जीवनात स्थायी स्वरूपाचे परिवर्तन करता येईल का ; आज या लाॅकडाऊनमध्ये जे वैराग्य दिसते ते स्थायी स्वरूपाचे असेल की ते केवळ स्मशान स्वरूपाचे ठरून पुन्हा आपले आहे तसे रूटीन सुरू होईल; इत्यादी प्रश्नाने आपल्याला अंतर्मूख होऊन विचार करावयास लावले आहे.
एके काळी आपला भारत देश विश्वगुरूपदी विराजमान होता. तो विद्यमान स्थितीत अखिल मानव जातीला कल्याणाचा मार्ग दाखविण्यात महत्वाची भूमिका निभावू शकेल का? यावर ही विचार सुरू झालेला आहे. कोरोनाशी लढत देत असताना सदैव नागरी सुविधा तसेच भविष्य निर्वाह सारख्या बाबींवर सरकारी व्यवस्थेवर अवलंबून असलेला अमेरिकन समाज आज भयभीत आहे. आपल्या सुरक्षेसाठी तेथील लोकांची आंतरॲनिमेशन खरेदी करण्यासाठी जागोजागी झुंबड पडलेली आहे. आज जागतिक समाजात ' आपण व आपले घर बरे ' असे मानून घरातून कोणी बाहेर पडत नाही, अशी स्वार्थी वृत्ती दिसते. या उलट भारतात अजब चित्र दिसते. भारतात सर्वत्र सेवाभाव जागृत झालेला दिसतो. भारतीय समाज परस्पराला सोशल डिस्टन्सिंग पाळत मदत करीत आहे. केवळ कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांनाच नव्हे तर गोरगरीब, व प्रवासात ताटकळत राहिलेल्या समाजबांधवांना कोणी रेशन देतो तर कोणी भोजन देत आहे. प्रत्येक जण आपआपल्या परिने प्रत्यक्ष रणागंणात काम करणार्या डाॅक्टर्स, नर्सेस, रूग्णालयातील व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस व सुरक्षा दल इत्यादी मंडळींना जेवण, नाश्ता, चहापाणी देत आहे. उद्योजक, हाॅटेल्स मालक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था, मंदिरे -गुरूद्वार इत्यादी धार्मिक संस्था, अन्य छोट्या-मोठ्या चॅरीटेबल संस्था, व्यावसायिक वर्ग, कला-चित्रपट क्षेत्रातील मंडळी, चाकरमनी, छोट्यातील छोटे व्यापारी, व लघुउद्योजक सारे आपआपल्या परिने आर्थिक मदत सरकारकडे देत आहेत. कोणी वैद्यकीय उपकरणांची मदत देत आहेत, तर कोणी मनुष्यबळ पुरवित आहेत. भारतीय समाजाचा एक जगावेगळा व्यवहार पाहून सारं जग चकीत झाले आहे. भारत सरकारच्या लाॅकडाऊनच्या धाडसी निर्णयाचे कौतूक होत आहे. जाती -जमातीत विभागलेला, वैचारिक दृष्ट्या मागासलेला, शिस्तहीन, निर्णय घेण्यात विलंब व हेडसाळ करणारा देश अशी टिंगल उडविणारे अनेक देश भारताकडे आज आशेने पाहू लागले आहेत.
लाॅकडाऊन उठविल्यानंतर काय पाहावयास मिळेल? मागे म्हटल्याप्रमाणे उद्योजकांसमोर उत्पादनासाठी लिक्विडीटीची समस्या असेल ; बँकांना एनपीए, विद्यार्थ्यासमोर परीक्षांचा निकाल, पुढे ढकलेल्या परीक्षा, नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश इत्यादी बाबीवरील प्रलंबित निर्णय; मजूर, नोकरदारांनी गमाविलेला रोजगार; छोट्या-मोठे व्यावसायिक, व्यापारी, कृषी माल उत्पादक, हाॅटेल्स, पर्यटन, ट्रान्सपोर्ट, कुटीरोद्योजक इत्यादींनी गमाविलेले ग्राहक , अशा नाना समस्यांनी प्रत्येक क्षेत्र ग्रासलेले दिसेल. त्यावर उपाययोजना शोधून मार्ग काढावा लागेल. मग प्रश्न पडतो की मार्ग कसा शोधावा? यावर विचार करता दोन महत्वाची सुत्रे समोर येतात. संवेदनशील सरकार आणि सक्रीय समाज.
संवेदनशील सरकार म्हणजे काय? लाॅकडाऊननंतर उग्र समस्यांनी ग्रासलेल्या बहूतांश क्षेत्रासाठी अनुकूल व पुरक नीती तयार करावी लागेल, व्यवस्था उभी करावी लागेल, ज्या द्वारें उद्याजकांना, व्यावसायिकांना, व्यापारी, शेतकरी वर्गाला लागणार्या निधीची उपलब्धता होईल. उत्पादन क्षेत्रातील जटील नियमात बदल करावे लागतील. सरकारतर्फे काही उद्योग -व्यवसायांचे Hand Holding करावे लागेल. सर्व क्षेत्रात उत्पादनाला सुरूवात होणे आवश्यक आहे. पण केवळ संवेदनशील सरकार वर अवलंबून राहाता येणार नाही. कोरोना महामारीने एका युगाचा अंत झाला आहे व नव्या युगात आपला प्रवेश होईल हे समाजाने ही लक्षात घेणे आवश्यक आहे. कोरोना आपत्ती काळात आपल्या समाजाच्या अंगभूत सेवाधर्माचे दर्शन झाले आहे, ते असेच पुढे चालू राहावयास हवे. कारण त्यातून नव्याने उभी राहिलेली आव्हाने पेलाविण्याची समाजात एक स्थायी स्वरूपाची शक्ती निर्माण होते. त्यालाच आपल्या संस्कृतीत युगधर्माचे पालन करणे असे म्हटले जाते व त्यातूनच समाजाच्या सक्रीयतेचे दर्शन होते.
सक्रीय समाज म्हणजे काय? सरकारच्या नीती- निर्धारणात समाजाने स्वयंस्पुर्तीने, सुचना, सल्ला देणे अभिप्रेत असते. त्यासाठी समाजातील विभिन्न क्षेत्रातील बांधवांनी आपआपले गट बनवून सखोल अभ्यास करून आपआपल्या क्षेत्रासंबंधीच्या अडचणी, व उपाय याचा एक आराखडा द्यावा व सरकारने त्यावर विचार करून धोरण तयार करावे. सक्रीय समाज निर्माण करणे ही एक निरंतर चालत राहणारी प्रक्रीया असते. प्रत्येक बाबतीत समाज बांधवांत वेळोवेळी एक समान ध्येय व समान भाव उत्पन्न करीत राहणे हीच ती प्रक्रिया होय. याला समाज घडविणे असे ही म्हटले जाते. चिनी वस्तूवर बहिष्कार घाला असे म्हणून समाजमन तयार करीत राहावेच पण पोस्ट कोरोना सिनॅरिओत प्रथम आपल्याला चीन मधून आयात होणार्या वस्तूंचा पर्याय निर्माण करावयास हवा. याचा अर्थ मग ती खेळणी असो की, इलाॅट्रानिक्स वस्तू असो अशांचे उत्पादन देशात सुरू व्हावयास हवे. बिग बिझनेस हाॅऊसेस, बँका, पत पुरवठा संस्था, सरकार, इत्यादींनी एकत्र बसून विचार करावा. अशा वस्तुंच्या उत्पादनात जिथे जिथे लघुउद्योजकांना सहभाग देता येईल तो दिला पाहिजे. सरकारने उत्पादन, व्यापार, आणि वाहतूक व्यवसायाला पुरक वातावरण उत्पन्न करावयास हवे व आपल्या संवेदनशिलतेचे दर्शन घडवावे.
लाॅकडाऊन नंतरच्या जगात अमेरिका व युरोप देशाच्या अर्थव्यवस्था कोलमडलेल्या अवस्थेत असणार. तिथे आर्थिक मंदी असणार. त्यामूळे जगात ही आर्थिक मंदी असणार. जागतिक बाजारपेठेत युरोप व अमेरिकेतील मंदी मूळे एक पोकळी निर्माण होईल. चीन आक्रमक नीती अवलंबून ती व्यापून टाकण्याचा प्रयत्न करणार, हे तर निश्चीत. आपला देश ती पोकळी भरून काढू शकतो का? आपले उद्योजक हे आव्हान स्विकारतील काय ? यासाठी सरकारने आधी म्हटल्याप्रमाणे पुढाकार घेऊन कर सवलती, सुलभतेने पतपुरवठा करावयास हवा. उत्पादन वाढीसाठी जे जे शक्य आहे ते सारे सरकारने केले पाहीजे. आपल्या येथील उद्योजकांमधील उद्यमशीलता, तंत्रज्ञ व विज्ञान शाखेतील तज्ञांचे नैपूण्य वर्ल्ड क्लास आहे. यापैकी बहुताशांनी पोस्ट कोरोना सिनॅराओमध्यें राष्ट्रोत्थानासाठी आपआपली तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच विविध स्वयंसेवी संस्था ज्या एकत्रीतपणे कोरोना आपत्तीत सेवाधर्म निभावीत आहेत त्या सर्वांनी सक्रीय समाज निर्माण करण्याच्या दिशेने कार्य सुरू केले आहे. आपत्तीचे इष्टापत्तीत रूपातंर करण्याचे जे प्रयत्न सुरू झाले आहेत, त्यांसंबधीची माहिती सविस्तर देणे आज शक्य नाही पण संक्षिप्त रित्या देतो.
१)गुजरातमध्ये जानेवारीपासूनच प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी पुढाकार घेऊन India Techno Eco Fouram उभा केला आहे. आपआपल्या कंपनीला पॅकेज मिळावे अशी संकूचित भावना न ठेवता या फोरमने प्रत्येक छोट्या-मोठ्या संस्था, काॅर्पोरेट सेक्टर्सशी, सहकारी संस्थांशी डिजीटल संपर्क केला आहे. त्यांच्या अडचणी तसेच त्या संबंधीत त्यांना आवश्यक वाटणारी उपाययोजना यावर चर्चा होऊन एक प्रारूप गुजरात सरकारकडे सुपूर्द केले आहे.
२)महाराष्ट्रात पार्क म्हणजे Policy Advocacy and Research Centre स्थापन झाले आहे. कोरोना मूळे कोणकोणते क्षेत्रे अधिक प्रभावित झाले आहेत, त्याची गटवारी निर्माण करून प्रत्येक गटाचा अभ्यास सुरू केला आहे. विभिन्न अडचणी व त्यावर मात कशी करता येईल यावर मते घेऊन तज्ञांना सामील करीत सरकारशी संपर्क होणार आहे.
३) महाराष्ट्र किसान संघाने ही कृषी मालाचे उत्पादन, वितरण, त्यासंबधीतील अडचणी, त्या क्षेत्रात नवीन तंत्र आणता येईल का यावर विचारमंथन सुरू झाले आहे.
४) महाराष्ट्र व गुजरात मधील दोन विद्यापिठांच्या
उप- कूलगुरूंची एक ऑनलाईन बैठक झाली. तिथे ही अभ्यासक्रमात Skill Development हा विषय प्राथमिक स्तरावरून सुरू करता येईल का, ग्राम विकासात अशा शिक्षणाचा उपयोग कसा करता येईल इत्यादीवर चर्चा होऊन एक निश्चीत धोरणासाठी सरकारकडे आराखाडा सुपूर्द करण्यात येईल.
देशभरात असे अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. याबाबत आपल्याला माहिती वेळोवेळी मिळत राहील. आज इथे चर्चा करताना हे वर्ष २०२० असल्यामूळे माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ अब्दूल कलाम यांनी INDIA-2020 मधील PUFRA संकल्पना (म्हणजे Providing Urban Facilities To Rural Areas) मांडली होती ती डोळ्यासमोर दिसते. या संकल्पनेत गावोगावी शहरी सुधारणा, रूग्णालयें, अत्याधुनिक शिक्षण संस्था निर्माण व्हाव्यात, ॲग्रोबेस उद्योग, माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांचे ऑफीसेस, इत्यादीचा समावेश आहे. शहरात पोटापाण्यासाठी गेलेला खेड्यातील कामगार वर्ग आज आपआपल्या गावी भय व चिंताने ग्रस्त होत आपल्या गावी परतला आहे, त्यांच्या कौशल्याचा व शक्तीचा उपयोग आत्मनिर्भर खेडी उभारण्यासाठी सुरूवात करावयास हीच वेळ आहे. हीच वेळ आहे स्वेदशी नीती अमंलात आणण्यासाठी. स्वदेशी नीती केवळ विदेशी वस्तूंचे उत्पादन व उपभोगाशी निगडीत नाही. ती एक मानसिकता आहे. स्वदेशी भाव जागृत व्हावयास हवा. तो एक स्वभाव बनला पाहीजे. समाजाचा तसा स्वभाव बनण्याचे कार्य म्हणजे सक्रीय समाज निर्मितीचे एक अंग आहे. कोरोनाच्या संकटात अनेक स्वयंसेवी संघटना, मंदिरे, गुरूद्वार, मठ इत्यादी संस्था, अन्य चारीटेबल संस्था, हाॅटेल्स, इत्यादी हातात हात घालून सेवायज्ञात एक होऊन काम करीत आहेत. हा एकोपा टिकला पाहीजे. सेवाधर्म फक्त आपत्तीतच निभावयाचा का? दुसरी आपत्ती येण्याची वाट पाहावयाची का? लाॅकडाऊनमध्ये झुग्गी-झोपडीत राहणार्या गरीब, दलित, उपेक्षित, पिडीत अशा समाज वर्गाशी आपण जोडलो गेलो आहोत. तो नररूपी नारायण मानावा. त्याच्याशी सतत संपर्क साधा, सेवा करीत राहा. देव मंदिरात तसाच समाजात ही असतो. सामाजिक समरसतेचा भाव हा उपासनेचा मंत्र आहे तो सेवाच्या माध्यमातून कृतीत यावा. एक व्यापक स्प्रेक्टम बनवून लोकशक्तीचे नेटवर्क तयार होईल आणि तेच समाजातील सज्जनशक्तीचे इन्फ्रास्ट्रक्चर होय ज्या द्वारें सेवायज्ञ निरंतर सुरू ठेवता येईल व ठेवावा ही लागेल कारण एका गीतकाराने म्हटले आहे ,
अपनेही विजयपर, हमारा विश्वास है पुरा |
पर स्वेद और रक्तका, कूंड अभीतक है अधूरा || "
वन्दे मातरम |
मित्रहो, हे भाषण रविवार १मे रोजी झालेले आहे. भाषणाचे वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चीम क्षेत्रीय प्रचारक माननीय अतुलजी लिमये हे होते. त्यांच्या भाषणातील कोवीड१९ ची बाधा झालेल्या रूग्णांची व मृत्युची संख्या ही गुगल्स वरून अपडेट केलेली आहे. माननीय अतुलजींचे भाषण हिन्दीत झाले. त्या भाषणाचा अनुवाद करून सार काढण्याचे काम माझ्या कुवतीनूसार केले आहे. आपण भाषण वाचले, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो, आणि मुक्काम पोस्ट लाॅकडाऊनवरून- भाग ३ ची समाप्ती करतो.
धन्यवाद !
अतिशय संतुलीत,वस्तुस्थिती निदर्शक व माहिती पुर्ण लेख व अतुलजींच व्याख्यान देखील! धन्यवाद.
उत्तर द्याहटवाधन्यवाद बिवलकरजी !
उत्तर द्याहटवाअति सुंदर प्रस्तुति
उत्तर द्याहटवाधन्यवाद संजयजी !
उत्तर द्याहटवाव्वा, अत्यसंत संतुलित आणि सुस्पष्ट
उत्तर द्याहटवा