शुक्रवार, १ मे, २०२०

मुक्काम पोस्ट लाॅकडाऊन वरून (भाग १)


आपण सारे लाॅकडाऊन मध्ये आहोत. मार्च गेला, एप्रिल महिना ही संपला. लाॅकडाऊनमध्ये दोन प्रश्न आपल्यासमोर प्रामुख्याने आहेत ते म्हणजे कोरोनाची दशहत संपून लाॅकडाऊन कधी उठेल आणि कोरोना नंतरचे जग कसे असेल, आपला देश ( विशेषकरून अर्थव्यवस्था व रोजगाराच्या संधी संबंधीत )  कसा असेल? या दोन्ही प्रश्नासंबंधीच्या उत्तराबाबत अनेक जाणकारांची भाष्यें आपल्या पर्यंत विविध माध्यमातून पोहचली आहेत. त्याचा उहापोह करायचा हा प्रयत्न आहे. या शतकाच्या पुढील सर्व घटनांना व्यापून उरणारा हा विषय आहे. त्यामूळे  तसा उहापोह कितीही थोडक्यात करण्याचा प्रयत्न केला तरी एका लेखात पूर्ण होऊ शकणार नाही म्हणून आपल्या चर्चेचा हा पहीला भाग आहे असे समजू या. प्रथम अर्थातच पहील्या प्रश्नावर कोरोनाची दशहत व त्यातून आपल्या वाट्याला आलेला ऐताहासिक लाॅकडाऊन कधी उठेल या प्रश्ना वर चर्चा करू या.

कोरोनाचा फैलाव व त्यावरील उपाय या बाबतीत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळीत ही मतातंरे दिसत आहेत.  स्विडनचे ख्यातनाम इपिडोमीलाॅजिस्ट डाॅ जाॅन जिइसेक यांचे म्हणणे असे आहे की सार्वजनिक आरोग्यबाबत एकंदरीत झालेले दुर्लक्ष आणि त्यातून ढासळलेली रोगप्रतिकार शक्तीमूळे संसर्गजन्य रोगाच्या साथीत मृत्यूची संख्या वाढते असे ते म्हणत आहेत. ते संपूर्ण लाॅकडाऊनला फारसे समर्थन करीत नाहीत.  दुसरे संसर्गजन्य रोगासंबंधीचे डाॅक्टर जे पी मालीयिल लोकांमधील  रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करतात पण पुर्ण लाॅकडाऊनचे समर्थन करतात. डाॅ गॅल्लो यांनी पोलिओची लस एक उपाय सुचविला आहे. आपल्या दिल्लीतील एम्सचे संचालक  डाॅ रणदीप गुरेलियांनी पाच-सहा दिवसापूर्वी कोरोना दशहतीचे स्वरूप वस्तुस्थितीला धरून स्पष्ट केले आहे.  ते मला पटले व भावले ही. ते म्हणतात,
" Stigmatising of Covid-19 patients and families  is resulting in turning up cases late at hospitals, with hightened breathlessness and this could mean increased morbidity and mortality  " त्यानी पुढे म्हटले आहे की  ८० टक्के रूग्ण नीटपणे उपचार व काळजी घेतली तर बरे होतात. १० टक्के रूग्ण अधिक उपचाराने बरे होतात तर ५ टक्के रूग्णाला व्हेन्टीलेटर वर ठेवावे लागते. तर उरलेले ५ टक्के धोक्याची पातळीच्या पलिकडे जाऊन दगाविण्याची शक्यता असते. " थोडक्यात कोरोना बाधित रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होत असलेल्या घुसमटीमूळे रूग्णांना हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात उशीर होतो. त्यामूळे मृत्युदर वाढतो असे डाॅ गुरेलियांनी म्हटले आहे. त्यातून असे दिसते की, कुठेतरी क्वाॅरान्टाईनच्या उपायातून आपल्या येथील रूग्ण व त्याच्या नातेवाईकांच्या मनात अपराधीपणाची वा न्युनगंडाची भावना उत्पन्न होत असावी व त्यांतून रूग्णाला हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात उशीर होत असावा.  सरकार व प्रशासन, वेळोवेळी लोकांना आवाहन करीत आहे की ' भिती सोडा, कोरोनाची बाधा लपवू नका , उपचार घ्या व बरे होऊन घरी जा.' पण प्रतिसाद कमी मिळतो वा उशीरा मिळत असावा.

या पुढील काळात  कुत्रीम विषाणू वा नैसर्गिक जीवाणूंचा संसर्ग होऊन रोगाची लागण अधूनमधून होत राहणार आहे. अशा वेळी आपल्या समाजाची क्वाॅरान्टाईन बाबत गैरसमज व सतराव्या शतकातील मानसिकता टिकून राहिली तर  ही फार गंभीर बाब आहे. रूग्णाला व त्याच्या परिवाराला संपूर्ण समाज आपला आधार आहे असे वाटले पाहीजे. त्यासाठी वातावरण निर्माण करावे लागणार आहे. जनजागृती ही आवश्यक आहेच. शिवाय आपल्या धर्मातील कलमाच्या आडोशाला जाऊन समाजप्रवाह सोबत न येणार्या समाज वर्गाला कडक शब्दात सुनवावे लागेल. अशा वेळी आपल्या मतपेटीचा विचार करून कोण्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अप्रत्यक्ष रित्या आंदोलने छेडण्यास एखाद्या समाज वर्गाला उद्युक्त केले तर त्या नेत्यांना व आंदोलन करण्यांर्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून वठणीवर  आणायला हवे असे वाटते.  कारण लोकशाही व्यवस्थेची जडण-घडणच मुळी  ' बहूजन हिताय ' या ध्येयावर आधारलेली आहे. आणि हे सूत्र संसर्ग रोगाच्या महामारीत जर न पाळले गेले तर देशाचेच अस्तित्व धोक्यात येऊ शकते. पुढचा काळ एक समाज, एक देश हेच राज्यकारभाराचे सूत्र राहणार आहे. आपण एक मतदार, एक नागरिक म्हणून लक्षात ठेवावे की  पुढील काळात संसर्गजन्य रोगाची लागण इतरांना झाली की आपण  सुपात असलो तरी रूग्णासाठी ठेवलेल्या स्वतंत्र जात्यात (म्हणजे रूग्णालय वा क्वाॅरान्टाईन मध्ये) आपण ही असणार आहोत हे सदैव लक्षात ठेवून रूग्णाविषयी आत्मीयता बाळगावी. तसेच आपल्या स्वतःच्या वर्तनाने म्हणजे सामाजिक अंतर न पाळून रोगाचा प्रादुर्भाव वाढू  न देणे हे सध्या आपले केवळ  कर्तव्य मानले जाते ते बंधनकारक करून कठोर शिक्षेची तरतुद करणारा स्वतंत्र कायदा  विद्यमान संसदेने एकमताने संमत करावा जेणे करून समाजाचे भविष्य सुरक्षित करून ठेवता येईल.

दुसरीकडे  ' सामाजिक अंतर ' कायद्याच्या भंग करणार्या अनेक घटना घडतच आहेत. हा लेख लिहीत असताना देशातील कोरोना बाधीत रूग्णाची संख्या ३३००० च्या पुढे गेली आहे आणि मृत्युचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. देशातील कोरोना बाधीत रूग्ण बरें झालेल्याची संख्या ७००० च्या पुढे आहे, म्हणजे २४ टक्याच्या आसपास आहे तर मृत्यूदर ३•७ टक्के आहे. याचा अर्थ सोशल डिस्टन्स्टींग चा उपाय यशस्वी ठरत आहे असे दिसते. त्यामूळे लाॅकडाऊनवर टिका करण्याला केंद्र सरकार तर्फे उत्तर मिळाले आहे. कोरोना बाधीत रूग्णाची आपल्या महाराष्ट्रातील संख्या १००००च्या वर गेली आहे. महाराष्ट्राचा देशातील प्रगत राज्य हा मान टिकवयाचा असेल तर किमान केंद्र सरकार इतकी जरी नसली तरी जवळपास जाऊ शकेल अशी कामगिरी करावी लागेल. तशी कामगिरी महाविकास आघाडी सरकार करेल अशी आशा करू या.

केंद्रीय गृह खात्याने  लाॅकडाऊन अंशतः उठविली आहे अशी बातमी हा लेख लिहीत असताना फ्लॅश झाली आहे. त्यासंबंधी खबरदारी कशी घ्यावी अशी मार्गदर्शिका केंद्र सरकारने राज्यांना पाठविली आहे. जे मजूर देशातील विविध ठिकाणी अडकले होते त्यांना आपआपल्या राज्यात परतण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे.  ही व्यवस्था सुरळीत व्हावी अशी अपेक्षा प्रत्येक राज्यातील सरकार पुर्ण करेल अशी आशा बाळगावयास हरकत नाही. आज लाॅकडाऊन अंशतः संपला आहे. पण देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात यावयास जूलै उजाडेल असे तज्ञांचे म्हणणे आहे.  विशेष करून मुंबई व पुण्यातील स्थिती चिंताजनक आहे. कोरोनावरील लस शोधण्याचे कार्य जगभरातील सर्व देशात सुरू आहेत. कोरोना वरील उपायाबाबत तज्ञांमध्ये मतभेद असले तरी दिवस- रात्र संशोधन करण्यात गुंतलेले डाॅक्टर्स, तंत्रज्ञ, वैज्ञानिक आपआपले संशोधन शेअर करीत असतात. ही या लाॅकडाऊनच्या काळातील दिलासा देणारी बातमी आहे. दिल्ली येथील आयआयटी चे प्राध्यापक बिस्वजीत कुंडू यांनी ही एक दिलासा देणारी बातमी आपल्याला दिली आहे.  प्राध्यापक बिस्वजीत कुंडू व त्यांच्या सहकार्यांनी कोरोना उपचारावरील डी - किट तयार करण्यात यश मिळविले आहे. काही भारतीय कंपन्याशी बोलणी होतील व पुढील तीन आठवड्यात स्वदेशी बनावटीचे डी-कीट बाजारात उपलब्ध होतील ते ही कमी किमतीत. या संकटकाळात मेक इन इंडीया  च्या वाटचालीतले हे आपल्या मोठे पाऊल आहे. ' हॅट्स ऑफ टू बिस्वजीत ॲन्ड हिज टिममेट्स !'

या लेखात बहूतांश ठिकाणी मी आशावाद व्यक्त केला आहे. ती एक स्वाभाविक बाब आहे. राजकारणातील विभिन्न इझम पेक्षा आशाइझम चांगलाच होय. आज  बैजू बावरा या गाजलेल्या चित्रपटाची आठवण येते. त्यातील  नैराश्याने ग्रासलेला नायक आपली कैफियत ईश्वरासमोर एका गीतात मांडतो. त्याचे पहीले कडवे खालील प्रमाणे आहे--
" ओ दुनियाके रखवाले, सुन दर्दभरे मोरे नालें,
   सुन दर्द भरे मेरे नाले |
"आश- निराश के दो रंगोसे दुनिया तूने सजायी | "
मानवी जीवन एक प्रवास आहे. कुठे सपाट, चांगला रस्ता, तर पुढे खांच-खळगे व धोक्याच्या वळणानी भरलेला. चित्रपटातील बैजू निराश होता पण ईश्वराशी त्रासिक, वा त्वेषाने असभ्य भाषेत बोलत नाही. तो  
'दो रंगोसे दुनिया तूने सजायी है ' असे भावपूर्ण भाषेतच  बोलतो. शेवटी विख्यात गायक तानसेनशी रंगलेल्या जुगलबंदीत तो विजयी ठरतो.  तानसेनच्या नियमामूळे आपल्या पिताश्रीला देहदंडाची जबर शिक्षा आपल्या डोळ्यादेखत, ते ही बालवयात पाहिलेल्या बैजूच्या मनात सूडबुद्धीचा विचार शिवला नाही आणि तानसेनला जीवदान दिले. तानसेनला जीवदान देताना कुठलाही अंहकार नाही उलट  तानसेनासंबंधी आदर व्यक्त करताना त्याच्या मुखातून सहजबोल आले, ' आज संगीतको संजीवनी मिल गयी है | ' ही आपली संस्कृती व हीच खरी संपत्ती. ती ही जपावी लागेल कारण संकटसमयी तीच आपली शक्ती ठरते असा आपला इतिहास आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ झाले असले तरी जीवनातील आशा व निराशाचा खेळ संपणार नाही असेच वाटते. अन्न, वस्त्र, निवारा, हवा,  पाणी, कपडालत्ता, पैसा, ज्ञान, विज्ञान, इतके जगण्यासाठी असूनही मनुष्य आशेवर जगत असतो. प्रयत्नाने सर्व काही प्राप्त होत असते हे जरी सत्य असले तरी आपल्या नियंत्रणाच्या पलिकडील शक्तीमूळे नको ते घडते व आपल्याला क्लेश देऊन जाते. आपल्या व्यक्तीगत जीवनात अशा घटना घडतात तेव्हा आपण किती हादरतो. पण स्वतःला सावरतोच ना. तशाच घटना देशाच्या बाबतीतही घडतात. आपले काही ही चूकले नसताना आपल्या देशावर लाॅकडाऊनची वेळ आली आहे. ठिक आहे. ' वेळेची एक गोष्ट बरी आहे,  ती कशी का असेना, पण कधी थांबत नाही.' हाच तो शाश्वत नियम आपण लाॅकडाऊनच्या काळात स्मरणात ठेवू या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...